रविवार, ९ मार्च, २०२५

माँ के आशिर्वाद की ताकद

माँ के आशिर्वाद की ताकद

           ✍️:डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                   फोटो:साभार गुगल


        एकदा हजरत मुसा अलैस्सलाम यांनी अल्लाहना विचारले की, जन्नतमध्ये (स्वर्गामध्ये) माझ्या शेजारी कोण असेल. अल्लाहनी सांगितले, एक कसाई तुझा शेजारी असेल. हे ऐकून मुसा अलैस्सलाम नाराज झाले. त्यांना फार आश्चर्य वाटले ते पाहून अल्लाह म्हणाले, तू स्वतः त्या कसाई भाईला भेट. त्याला भेटल्यावर तुला समजेल. खात्री पटेल. हजरत मुसा अलैस्सलाम त्या कसाईच्या शोधात निघाले. शेवटी त्यांना कसाई भाईच्या दुकानाचा पत्ता सापडला. तो भाई मांस बारीक करून गिऱ्हाईकांना हसतमुखाने देत होता.


       ह. मुसा अलैस्सलाम त्याच्याजवळ गेले वत्याला म्हणाले, मी एक प्रवासी आहे. मला आजच्या दिवशी तुझ्या घरी रहायला आसरा देशील का. भाई म्हणाला, का नाही देणार, खुशाल रहा माझ्या घरी तुम्हाला वाटेल तितके दिवस. भाईनी दुकानची वेळ संपल्यानंतर शटर बंद केले व त्यांना घेवून घरी गेले.


       घरी गेल्यावर पाहुणे आल्याचे सांगितले. त्यांचे स्वागत केले. प्राथमिक पाहुणचार झाला. पाहुण्यासोबत राहण्याच्या मुलाला सुचना दिल्या. पाहुण्यांच्या स्वयंपाकाबद्दल पत्नीला सांगून भाई थेट आईजवळ गेले. आईचे हातपाय चोळत तिच्याशी छान गप्पा मारल्या. स्वयंपाक तयार झाल्यावर भाकरी बारीक कुस्करून आईला घास भरवले. तिच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. आई खूश झाली. आई भाईच्या तोंडावरून हात फिरवत काहीतरी बोलली. ह. मुसा अलैस्सलाम यांनी ते सर्व पाहिले, 'पण त्यांना आई काय बोलली ते नीटसे ऐकू आले नाही.


        भाई ह. मुसा अलैस्सलाम यांच्याकडे आले व म्हणाले, चला आता आपण जेवण करू या. ह. मुसा अलैस्सलाम भाईना म्हणाले, तुझा हा नित्यक्रम आहे का. भाई म्हणाले, होय मी दररोज अशाप्रकारे आईची सेवा करतो. ह. मुसा अलैस्सलाम म्हणाले, मघाशी तुमची आई तुम्हाला काय म्हणाली. भाई हसून म्हणाला, वेडी आहे माझी आई, ती म्हणत होती अल्लाह माझ्या मुलाला जन्नतमध्ये हजरत मुसा अल्लैस्सलाम यांच्याशेजारी जागा दे. ते कसं शक्य आहे. मी आपला साधा माणूस, मला कशी काय एवढ्या महान व्यक्तीजवळ जागा मिळेल. यावर ह.मुसा अलैस्सलाम म्हणाले, का नाही मिळणार तुझ्या पाठीशी तुझ्या आईचा आशिर्वाद असताना. आणि हो मीच आहे हजरत मुसा अलैस्सलाम. असे असतो आईचा आशिर्वाद.

शनिवार, ८ मार्च, २०२५

अन्नदानाची किमया

                       

                ✍️: डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी 


                          फोटो: साभार गुगल 


       रमजानचा महिना भुकेची जाणीव करून देणारा महिना आहे. स्वतः उपाशी असल्याशिवाय भुकेची जाणीव होवू शकत नाही. गोरगरीब लोक परिस्थितीमुळे उपाशी असतात. आपल्याकडे मागतात पण त्यावेळी त्यांच्या उपाशी पोटाची आपल्याला अनुभूती नसते. अकरा महिने आपण सर्वजण २/३ वेळा पोटभर जेवण घेत असतो. भरल्या पोटी अंतरआत्म्यात डोकावण्याची संधी मिळत नाही. ती संधी रमजानमध्ये मिळते. मन शांत व मवाळ होते. रोजा करुन जे अन्न रोजामुळे वाचते ते गरजूना देणे हा रोजाचाच एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला अल्लाहची कृपा मिळते. अल्लाहच्या कृपेने दारिद्रय व उपासमारी पासून सुटका होते हे सांगणारी ही कथा.


       एक अत्यंत गरीब माणूस एकदा एका महान सुफीकडे गेला. आणि म्हणाला, बाबा! मला चार मुली आहेत. लग्नाच्या वयाला आल्या आहेत. गरिबी अशी आहे की, दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण होत आहे. बाबा! कांहीतरी उपाय सुचवा. बाबांनी त्याला सांगितले की, दररोज दोनशे भुकेल्यांना जेऊ घाल. तो गृहस्थ गडबडला, आश्रमाबाहेर येऊन रडू लागला. त्याचे रडणे बघून एका व्यक्तिने त्याला रडण्याचे कारण विचारले. गरीबान सांगितले की, माझ्या कुटुबिंयांना दोन घास मिळणे कठीण झाले आहे.


       बाबांनी सांगितल्यानुसार दोनशे माणसांना कसे जेवण घालू? का रडतोस हे विचारणारा मनुष्य हुशार व जाणकार होता. तो म्हणाला, भूक केवळ माणसानाच लागत नसते. चिमण्या,पक्षी एवढेच काय मुंग्यादेखील भुकेल्या असतात. मूठभर पीठ मुंग्यांच्या बिळापाशी अथवा मूठभर धान्य चिमणी पाखरांना खाऊ घाल दोनशे प्राण्यांची भूक भागेल. तुला तेवढेच पुण्य लाभेल.


       तो गरीब गृहस्थ घरी आला. त्याने मुंग्याना पीठ व पक्षांना मूठभर धान्य घालण्याचा रतीब सुरू केला. कांही दिवसातच तो इतका श्रीमंत झाला त्याच्या चारही मुली चांगल्या ठिकाणी विवाहबध्द झाल्या आणि समाधानाने संसारात रमल्या. तो गृहस्थही छोटाशा व्यवसायात व अल्लाहच्या भक्तीत रममाण झाला. बंधूभगिनीनो अल्लाहने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवले आहे त्या परिस्थितीतही जमेल तेवढे अन्नदान करू या आणि आल्लाहच्या कृपेचे धनी होवू या.

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

कमाल सत्कृत्याची

               

                   कमाल सत्कृत्याची 

          
                ✍️:ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

.                     फोटो:साभार गुगल

       पवित्र रमजान महिन्यात सत्कृत्ये करण्याची सुवर्णसंधी मिळते. या संदर्भात ५ ते ६ हजार वर्षापूर्वीची ही कथा.

       बनी इस्त्राईलमध्ये तीन प्रवासी प्रवासासाठी निघाले होते. एके दिवशी सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस जोरात पडण्याची चिन्हे दिसू लागली. ते तिघेजण एका गुहेत आश्रयासाठी जावून बसले. काही वेळाने त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठा दगड येऊन पडाला. तो तिघांनी ढकलण्यासारखा नव्हता. फोन करून क्रेन मागविण्याची त्यावेळी सोय नव्हती. दगड बाजूला झाल्याशिवाय त्यांना बाहेर येणे महाकठीण होते. त्या तिघांनी अल्लाहकडे प्रार्थना केली. व हे संकट दूर करण्यासाठी विनवले पण दगड कांही हटेना. त्या तिघांनी ठरले की आपण तिघांनी जीवनामध्ये कांही सत्कृत्य केले असेल तर ते सांगून अल्लाहची अगदी मनोभावे प्रार्थना करू या.

       पहिला म्हणाला, मी मातृभक्त आहे. मी व माझी पत्नी, मुलेबाळे माझी आई जेवल्याशिवाय जेवन करत नव्हतो. एका रात्री आईला झोप लागली. तिची झोपमोड करायची नाही व ती जेवल्याशिवाय आम्ही जेवणार नाही म्हणून आम्ही कुणीच जेवण घेतले नाही. आईला मध्येच जाग येईल, तिला भूक लागलेली असेल असा विचार करून मी रात्रभर जागलो. बायको मुले भूक लागलेली असतानाही उपाशी झोपलो. ही गोष्ट माझ्या अल्लाहला आवडली असेलच. त्याच बोलणे संपताच तो दगड थोडासा बाजूला गेला.

       दुसरा सांगू लागला, माझा एक मित्र दूरच्या प्रवासासाठी निघाला होता. त्याने थोडी रक्कम माझ्याजवळ आणून ठेवली मी त्या रकमेतून दोन बकऱ्या विकत घेतल्या. त्यांचा सांभाळ करू लागलो. दोनाच्या चार झाल्यानंतर कळप तयार झाला. मला खूप पैसे मिळू लागले. मी श्रीमंत झालो पण, मित्राचा काही ठावठिकाणा नव्हता. एके दिवशी अचानकपणे तो परत आला. तो हलाखीच्या परिस्थितीत आहे हे दिसतच होते. मी त्याला मिळवलेली सर्व संपत्ती देऊन टाकली व मी माझ्या पूर्वीच्या घरी गेलो. नव्याने कष्ट करून उदरनिर्वाह करु लागलो. माझा हा प्रामाणिकपणा अल्लाहना आवडला असेल असे म्हणताच दगड आणखीन बाजूला गेला.

        तिसरा म्हणाला, माझे एका सुंदर मुलीवर प्रेम होते. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, अचानकपणे त्या मुलीचे वडील वाराले व त्या कुटुंबाची दुर्दशा झाली. ती मुलगी माझ्याकडे आली मदत मागण्यासाठी. मी ठरवले की हीच वेळ आहे मागणी घालण्याची. मी तिला आत बोलवले. घरात व आजूबाजूला कुणीच नव्हते. ती खूप घाबरलेली होती. ती मला म्हणाली, बाबा रे अल्लाहसाठी तू असे काही गैरकृत्य करू नकोस. माझ्या असाहय्यतेचा गैरफायदा घेवू नकोस. तिच्या तोंडून अल्लाहचे नाव ऐकताच मी तिच्यापासून दूर झालो. तिची माफी मागितली व तिला मदतही केली. तिसऱ्याचे बोलणे संपताच दगड पूर्णपणे बाजूला झाला व त्या तिघांची सुटका झाली.

       बंधुभगिनीनो रमजानमध्ये आपण ही सत्कृत्ये करू या व अल्लाहच्या कृपेने आपल्यावर आलेल्या संकटाना दूर करू या.

गुरुवार, ६ मार्च, २०२५

अल्लाह देतो छप्पर फाडके

 

         अल्लाह देतो छप्पर फाडके


✍️: ज्युबेदा मन्सूर तांबोळी

फोटो:साभार गुगल
 

        रमजान महिना अल्लाहची इबादत (भक्ती)करण्याचा त्यांच्याजवळ आपल्यासाठी आशिर्वाद मागण्याचा महिना अल्लाहकडे मागा म्हणजे मिळेल हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट.


       फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक जाहितदक्ष राजा होता. तो प्रजेसाठी सर्व सुखसोयी मिळवून देण्याचा रात्रंदिवस प्रयास करायचा. अधेमधे वेश पालटून राज्यामध्ये फिरायचा. लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा. आपण राज्यकारभार करत आहोत, ते योग्य दिशेने होत आहे का हे जाणून घ्यायचा. राज्यकारभाराबद्दल प्रजेला काय वाटते, काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घ्यायचा. राजाच्या सोबत त्याचे विश्वासू सोबतीही असायचे.


       एके दिवशी राजा व त्याचे सोबती राज्यातून फेरफटका मारत असताना राजाच्या शर्टाचे बटन तुटले. आता काय करायचे असा प्रश्न पडला. बटन तुटलेल्या अवस्थेत फिरणे योग्य होणार नाही हे त्यांना समजले. त्यांच्याजवळ बटन लावण्यासाठी सामग्रीही नव्हती. पुढे जात असताना त्यांना शिंप्याचे दुकान दिसले. शिंपी आपले काम गडबडीने पूर्ण करत होता. बरेच लोक शिवलेले कपडे घेवून जाण्यासाठी थांबलेले होते. राजाचे सोबती तिथे गेले. शिंप्याने काही वेळ थांबावे लागेल म्हटले. थोडा वेळ थांबूनही नंबर लागत नाही हे पाहून सोबत्यांनी शिंप्याला बाजूला बोलावून खरी हकीगत सांगितली. शिंप्याने हातातील काम बाजूला सारून बटन लावून दिले. सामान्य वेशातील राजाने विचारले किती रक्कम द्यायची या कामाची. तो विचारात पडला. त्याने विचार केला दोन रूपये मागावेत, पुन्हा त्याला वाटले दोन रूपये थोडे जास्तच होता. राजा म्हणेल एवढ्याशा कामाचे दोन रूपये घेवून लोकांना फसवतोय. शेवटी शिंप्याने म्हटले, तुम्हाला जे द्यायचे ते द्या.  त्याने राजावर ही गोष्ट ढकलली. राजा म्हणाला, अमुक अमुक ही दोन गावे तुला बक्षिस देत आहे. तू आमच्या अडचणीच्यावेळी मदत केली आहेस. दोन गावे बक्षिस दिली याचा अर्थ त्या दोन गावचे वतन शिप्याला मिळाले, शिंपी खूष झाला.


        ही गोष्ट फक्त राजा आणि शिंपी यांची नसून ती तुमची-आमची सर्वांची आहे. अल्लाहकडे मागायचे आहे. ते भरभरून मागा, त्यात कंजुशी करू नका. अल्लाहला सांगा की जे द्यायचे आहे, जेवढं द्यायचं आहे ते मला दे. मागितल्यावर अल्लाह देईल की, नाही अशी शंका, किंतू-परंतू मनात ठेवू नका. अल्लाह देईल असा ठाम विश्वास बाळगा. अल्लाह जब देता है, छप्पर फाडके देता है. असे म्हटले जाते ते उगीच नाही.









बुधवार, ५ मार्च, २०२५

सत्कार्य करा पण गर्व नको

            सत्कार्य करा पण गर्व नको

              ✍️डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

                    
                        फोटो:साभार गुगल


       बनी इस्राएलमध्ये एक वयस्क मनुष्य होता. त्याने अल्लाहजवळ प्रार्थना केली, ए अल्लाह तू मला या संसाराच्या चिंतेपासून मुक्त कर कि ज्यामुळे मी रात्रंदिवस तुझी भक्ती, नामस्मरण करू शकेन. अल्लाहनी त्याची प्रार्थना ऐकली. त्याला एका डोंगरावर पोहोचविले. तेथे एक डाळिंबाचे झाड उत्पन्न केले. एक झरा निर्माण केला. तो मनुष्य दररोज डाळिंब खायचा, झऱ्याचे पाणी प्यायचा व रात्रं दिवस अल्लाहचे नामस्मरण व प्रार्थनेत मग्न रहायचा. आपल्या पाचशे वर्षाच्या आयुष्यात तो मनुष्य एकही गुन्हा न करता अल्लाहची उपासना करत राहिला. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला फरिस्त्यांनी (देवदुतांनी) अल्लाहसमोर उभे केले तेव्हा अल्लाहनी हुकूम दिला की जा मी तुला माझ्या कृपेने माफ केले आहे.

       त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला की माझ्या मुक्ततेसाठी माझी पाचशे वर्षाची उपासना उभी असताना अल्लाहनी आपल्या कृपेने मला कसे काय मुक्त केले? विश्वकर्ते अल्लाह तर मनातील विचारही जाणतात. त्यांनी फरिशत्यांना हुकूम दिला की याला स्वर्गाकडे घेवून जा. पण पायी पायी, स्वर्गाचा रस्ता नरकाच्या वरूनच जातो. पुलसिरात हा मार्ग नरकाच्यावर आहे. तो प्रत्येकाला पार करावाच लागतो. अल्लाहचे जे प्रामाणिक भक्त आहेत. ते या रस्त्यावरूनच वीजेच्या वेगाने जाऊ शकतात. परंतू जे भक्त अप्रामाणिक आहेत. त्यांना फारच संकटे अडचणी येतात.

       जेव्हा फरिश्ते त्या मनुष्यास पायी पायी स्वर्गाकडे घेवून चालले तेव्हा स्वर्गाच्याजवळ जाईल तशी उष्णता वाढू लागली. त्याला तहान लागली. घसा कोरडा पडू लागला. त्याची तहान इतकी वाढली की सहनशक्तीच्या बाहेर गेली. त्याचवेळी एक हात त्याच्यासमोर अवतरला. त्या हातात पाण्याचा एक ग्लास होता. त्या हातातून आवाज आला. हे पाणी विकत घेणार आहेस का? तुझी इच्छा असेल तर घे. तो तहानेले व्याकुळ झाला होता. त्याने विचारले, केवढ्याला देशील हे पाणी. त्याची किंमत तुझी पाचशे वर्षाची उपासना आहे.  ताबडतोब त्यांने आपली उपासना दिली व घटाघट पाणी प्यायला आता त्याच्या नोंदवहीत सत्कार्याच्या बाजुला काहीच नव्हते. ते पाहून फरिशत्यांनी त्याला दारातच उभे केले. त्या मनुष्याने अल्लाहचरणी नतमस्तक होवून क्षमा याचना केली. तो म्हणाला, ए अल्लाह तु ज्याच्यावर कृपेचा वर्षाव करशील ज्याला क्षमा करशील तोच स्वर्गात जाईल. त्या मनुष्याने उपासना केली खरी पण आपल्या सत्कार्याबद्दल त्याला गर्व झाला. त्यामुळेच त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकली नाही. अल्लाहची कृपा, अल्लाहचा आशिर्वाद असेल तरच स्वर्गप्राप्ती (जन्नतप्राप्ती) होऊ शकते.

        एके ठिकाणी म्हटले गेले आहे की नेक अमालपर किसी को गुरूर नही होना चाहिए । अल्लाहची उपासना करावी पण त्याबद्दल गर्व बाळगू नये. मी उपासना करतो याचा दिखावा करू नये. दुसरा उपासना करत नाही आणि मी एवढी उपासना करतो आहे, असा विचारही मनात आणू नये. त्याला आपल्या परीने उपासनेसाठी प्रवृत्त करावे. मग कराल ना निगर्वीपणे अल्लाहची उपासना ?

सोमवार, ३ मार्च, २०२५

जे मागायचे ते अल्लाह कडे मागा

          जे मागायचे ते अल्लाह कडे मागा 
        
              ✍️डॉ. ज्युबेदा तांबोळी

                     फोटो साभार ःगूगल

       रमजानमध्ये अल्लाहकडे दुवा मागण्याची नामी संधी आहे. या पाश्वभूमीवर अल्लाहकडे भरभरून मागा हे सांगणारी ही कथा.

         एका दर्गाहच्या दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन कट्टे बांधलेले होते. या दोन्ही कट्ट्यावर दोन फकीर खैरात घेण्यासाठी बसायची. डाव्या बाजूला सलीम बसायचा व उजव्या बाजूला करीम बसायचा. त्या दर्गाहमध्ये शहानवाज नावाचा एक मनुष्य दररोज यायचा. तो खूप श्रीमंत होता. शहानवाज दर्गाहमधून बाहेर येताना त्या दोघांना खैरात (दान) द्यायचा. सलीम श्रीमंत जे देईल ते घ्यायचा व अल्लाहच्या नामस्मरणात रमायचा. करीम श्रीमंताजवळ मागायचा. त्यांना म्हणायचा अल्लाहने तुम्हाला खूप काही दिलयं. आणखीन द्या माझ्यासाठी. तो सलीमला डीवचायचा तू श्रीमंताकडे का मागत नाहीस. सलीम म्हणायचा माझा अल्लाह मला जरूर देईल.

       शहानवाजांना एक दिवस त्यांचे मित्र म्हणाले, करीम तुमच्याकडे मागतो, त्याला द्या ना काहीतरी. शहानवाजनी एक डबा भरून खीर करून करीमकडे पाठवली. ती खीर फारच स्वादिष्ट होती. करीम सलीमला म्हणाला, बघ सलीम मी श्रीमंताकडे मागितले नी मला खीर मिळाली. तू मागत बस अल्लाहकडे. खीरवर ताव मारून झाल्यावर थोडीशी खीर डब्यात उरली. करीमच्या मनात आले ही थोडीशी उरलेली खीर सलीमला द्यावी, त्याने खीर सलीमला दिली.

        दुसऱ्या दिवशी श्रीमंत दर्गाहला आले. जाताना करीमला म्हणाला, "खीर खाल्ली की नाही काल". करीम म्हणाला," खूप खूप आभारी आहे मी तुमचा. खीर फार स्वादिष्ट होती. खीर खाऊन मी तृप्त झालो आहे. अल्लाह तुमचे भले करो. खीर थोडीशी उरली होती, ती मी सलीमला दिली. तो आज दर्गाला आला नाही". श्रीमंत म्हणाले, "अरे काय केलं हे, तुझ्यासाठी सोन्याचे पाच क्वाईन्स मी खिरीच्या तळाशी ठेवले होते". करीमने कपाळावर हात मारला व पश्चाताप करू लागला.

       ही गोष्ट केवळ सलीम, करीमची नसून आमची तुमची सर्वांची आहे. आपण अल्लाहकडे थेट मागू शकतो. अल्लाह दयाळू कृपाळू आहे. तुम्हाला भरभरून देण्यासाठी तो सज्ज आहे. फक्त जे. मागायचे आहे ते पूर्ण श्रद्धेने, भक्ती भावाने मागितले पाहिजे आणि मागताना अल्लाहवर पूर्ण विश्वास हवा. आपण दुसऱ्या कुणाकडे मागतो, दुसऱ्याकडून मिळण्याची अपेक्षा करतो असे न करता फक्त अल्लाहकडे मागा, निश्चित मिळेल.