सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

वुजू व नमाज

 वुजू व नमाज



       प्रार्थना कुठलीही असो, दैनंदिन जीवनातून माणूस प्रार्थनेकडे वळला तर त्याला शूचिर्भूत होणे गरजेचे आहे. शूचिर्भूतता म्हणजे काय? तर अल्लाहच्या निकट जाण्याची शारीरिक अथवा मानसिक तयारी. नमाजपठण करण्याकरिता दिवसातून पाच वेळा वुजू करावी लागते. म्हणूनच प्रत्येक मशिदीत नमाज पठण करण्यापूर्वी बुजू करण्यासाठी पाण्याची उत्तम सोय केली जाते. वुजू करताना बसण्यासाठी आसन असते. एकाचवेळी पाच ते सात लोकांना वुजू करण्याची सोय असते.


       प्रत्येक नमाज पठण करण्यापूर्वी वुजू करण्याचे अर्थात शास्त्रशुध्द पध्दतीने तोंड, हात, पाय, धुण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पवित्र कुरआनमध्ये आदेश आहे की, हे श्रध्दावंतांनो जेव्हा तुम्ही नमाजपठण करण्यासाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड स्वच्छ धुवून, कानात व नाकात पाणी घालून बोटाने ते स्वच्छ करावेत. हात कोपरापर्यंत धुवावेत. डोक्यावर-मानेवर ओले हात फिरवावेत. पाय घोट्यापर्यंत धुवावेत. दिवसातून पाच वेळा डोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या या स्वच्छतेमुळे नमाजकर्त्यांचे शरीर व मन निश्चितपणे निर्मळ व पवित्र बनते. पवित्र कुरआनमध्ये एके ठिकाणी म्हटले आहे की, अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच एके ठिकाणी म्हटले आहे की, अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच पसंत आहेत. (अततौबा ९:१०८) शरीअतमध्ये असाही उल्लेख आहे की वुजू आणि गुस्ल म्हणजे स्नान करण्यात जास्त पाणी वापरू नये. जास्त पाणी वापरल्यास विधी मकरूह म्हणजे निषिद्ध होतो. अल्लाहच्या दरबारी अशा नमाजचे पुण्य पुर्णपणे लाभत नाही.


         यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा हा संदेश फार पूर्वीपासून आपल्याला दिला गेला आहे. त्याचे पालन करणे म्हणजेच अल्लाहचे आज्ञापालन होय. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी स्वच्छ मातीवर, कच्च्या भिंतीवर किंवा विटांवर हात मारून शूचिर्भूत होता येते. या कृतीस 'तयम्मुम' करणे असे म्हटले जाते. पाणी जवळ असताना आणि आरोग्याविषयी काही तक्रार नसताना कुणी तयम्मुम करत असेल तर ती व्यक्ती शूचिर्भूत होवू शकत नाही. इस्लामी शरीअतमध्ये म्हणजेच इस्लामी धर्मकायद्यात शुध्द व पवित्र राहण्याचे कितीही आदेश देण्यात आले असले तरी पाणी सांभाळून वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. म्हणून पाणी काटकसरीने वापरून वुजू करून नमाज अदा करावी. इस्लाम धर्मामध्ये अत्यंत साधे व शास्त्रशुध्द जीवन जगण्याचे आदेश दिले आहेत. नमाज एक अनिवार्य उपासना मानली आहे. इस्लामी शरीअतने लोकांसमोर अनेक उपक्रम व कर्तव्ये मांडली आहेत. या कर्तव्यापैकी सर्वात महत्वाचे कर्तव्य म्हणजे एकाच ईश्वराची उपासना आणि आराधना. ही उपासना उपासकाच्या मर्जीनुसार किंवा सवड मिळेल तेव्हा करायची नसते. त्यासाठी ठराविक वेळेत व ठरवून दिलेल्या पध्दतीनुसारच करायची असते.


       नमाजपठण दिवसातून पाच वेळा करावे लागते. नमाजपठण प्रत्येक मुस्लिम बंधू-भगिनींच्यावर सक्तीची आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी नमाज पठण करायचे असते. तिला सुबह की नमाज म्हणतात. ती चार रकआत पठण करावी लागते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला 'जोहर की नमाज' म्हणतात. ही नमाज १२ रकआत पठण करावी लागते. सायंकाळी पाचच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला 'असर की नमाज' म्हणतात. ही नमाज आठ रकआत पठण केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर सात वाजण्याच्या सुमारास नमाजपठण होते. त्या नमाजला 'मगरीब की नमाज' म्हटले जाते. ही नमाज सात रकआत पठण केली जाते. रात्री उशिरा नऊच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला ईशा की नमाज' म्हणतात. ही नमाज १७रकआत पठण केली जाते. रमजान महिन्यात या पाच नमाज पठनाबरोबरच तरावीह की नमाज पठण करावे लागते.


         जी व्यक्ती या पाचही वेळा नमाज पठण करत असेल त्या   व्यक्तिजवळ फावला वेळच उरत नाही. फावल्या वेळात कुरआन पठण व हदीस पठणही करायचे असते. प्रत्येक नमाज अदा करणेसाठी १५ ते २० मिनिटे लागतात. परंतु, नमाज पठण करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी होण्याकरिता बराच वेळ लागतो. त्यामुळे नमाजी व्यक्तीच्या मनी अविचार येणे शक्य नसते. नमाज पठणामुळे व्यक्तिच्या विचारसरणीत बदल घडून येतो. तो अल्लाहच्या समीप जातो. अल्लाहच्या आशीर्वादामुळे उपासकाला नवनवीन कल्पना सुचतात. त्यांचे काम सोपे होते. कुकर्म टळते त्यामुळे पुण्याईचे वर्चस्व वाढते. आणि जीवनाला दिशा मिळते. तो वाईटाच्या मागे लागत नाही. त्याला भले बुरे समजायला लागते. 'नमाज' ही अशी उपासना आहे की जी व्यक्तिला सन्मार्गाला लावते. शरीराला व मनाला व्यायाम मिळून व्यक्ती सद्गुणी, शांत व सदृढ बनते. अल्लाह ! या महिन्यात सर्वांना नमाजपठण करून दिशादर्शी जीवन जगण्यास मदत कर.