शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

इस्लामी जीवनशैली

 इस्लामी जीवनशैली


       काही तरूण मुले-मुली आपल्या तारूण्याच्या जोशात महामार्गावर आखलेल्या पट्ट्यांचे किंवा लेनचे भान ठेवत नाहीत. ते लेन मोडतात, वेगवान वाहनावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे स्वतःचे व दुसऱ्याचेही प्राण गमावून बसतात. जगात विद्यमान असलेले सर्व धर्म म्हणजे जनमानसांना जीवनाच्या महामार्गावर आखून देण्यात येणाऱ्या 'लेन' आहेत. आपल्या धर्मावर म्हणजे आपल्या लेनमध्ये राहून, वेळ आणि वेगमर्यादा सांभाळून द्रुतगतीने गाडी चालवा, कधीही अपघात होणार नाही. स्वतःच्या धर्मामध्ये करायचे आणि शिकायचे बरेच काही आहे. लोक ते सोडून बऱ्याचदा इतरांच्या धर्मात शिरकाव करतात व विनाकारण फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे अयोग्य आहे.


       इस्लाम एक साधा, सोपा आणि सर्वसाधारण व्यक्तिंना सहजासहजी आचरणात आणता येणारा धर्म आहे. इस्लाम धर्माला धर्म म्हणण्यापेक्षा दीन म्हणजे जीवनशैली समजण्याकरिता फार मोठ्या ज्ञानाची, तर्क अथवा दर्शनशास्त्राच्या भांडवलाची गरज नसेत. अल्लाह एक आहे. अल्लाहव्यतिरिक्त कुणीही उपास्य नाही. मुहम्मद सलेल्लाहु अलैहि वस्सलम त्याचे प्रेषित आहेत म्हणजे अंत:करणातून 'ला इलाहा इल्ललाहु मुहम्मदुर रसूलुल्लाहची उद्घोषणा करणे, इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरिता पुरेसे आहे. यालाच कल्लमाए तैयबाः किंवा इमान म्हणतात. इमानची यादी करायची झाली तर 

१) एकेश्वर वाद, वहदत किंवा अद्वैतवार म्हणजेच एका अल्लाहवर विश्वास ठेवणे, 

२) दुसरी गोष्ट मुहम्मद सलेल्लाहु अलैहिवस्सलम यांच्यावर अवतरित झालेल्या ईश ग्रंथ कुरआन आहे.

 ३) मुहम्मद सलेल्लाहु अलैहिवस्सलम अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. 

४) चौथी बाब यापूर्वीच्या सर्व प्रेषिर्तावर व त्यांच्यावर अवतरित झालेल्या ईश ग्रंथावर विश्वास ठेवणे, 

५) पाचवी बाब मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवणे, 

६) सहावी बाब अल्लाहचे दूत म्हणजे फरिश्ते यांच्यावर विश्वास ठेवणे, 

७) सातवी बाब नशीब आणि प्रलयाच्या दिवसांवर तसेच पुनरूत्थान व हिशोब तपासणीवर विश्वास ठेवणे इत्यादी 

ईमानचे अविभाजीत अंग आहेत. ईस्लामी जीवशैलीत त्याच्या चार उपासना आवश्यक आहेत. 

१) पहिली उपासनो नमाज म्हणजे सलात 

२) दुसरी उपासना रोजा म्हणजे उपवास 

३) तिसरी उपासना जकात म्हणजे अनिवार्य करण्यात आलेले दानधर्म 

४) चौथी उपासना हज्ज म्हणजे आयुष्यातून एकदा मक्केतील काबा गृहाच्या परिसरातील विधीकरिता प्रवास.

 संपूर्ण इस्लामी जीवनशैली फक्त दोन गोष्टीवर आधारित आहे. पहिली गोष्ट आहे कुरआन व दुसरी गोष्ट आहे हदीस. हदीस म्हणजे पैगंबर साहेबांचे कथन व आचरण.  कुरआन व हदीसचा फार मोठा वारसा मुस्लिम समाजाला लाभला आहे. इस्लामी धर्मकायदा म्हणजे शरीअत, शरीअत कायदा संकलित करताना किमान चार बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. पहिली बाब कुरआन, दुसरी बाब हदीस वा पैगंबरवारसा तिसरी परंपरा व चौथी बाब भाषा कारण मध्ये काही बाबतींमध्ये स्पष्ट संकेत आहेत. त्यात कुठलाही बदल करता येणार नाही. पैगंबर साहेबांनी आपल्या जीवन काळात जे आदेश दिले व आचरण केले त्यात आता कुठलाही बदल करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे कुरआन आणि पैगंबर साहेबांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी कसे वागले व त्यांनी या आदेशांचे कसे पालन केले, त्याचप्रमाणे तत्कालीन थोर सिहाबी म्हणजे पैगंबरसाहेबांच्या सोबतियांनी कुठल्या  शब्दाचा व संज्ञांचा काय अर्थ लावला व त्याला कसे वापरात व आचरणात आणले? या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विधीतज्ज्ञ, ज्यांना अरेबिक भाषा उत्तम अवगत असते आणि ते सुध्दा मक्तेतील परंपरेच्या संदर्भात तेथील भाषेचा सखोल अभ्यास करून शरीअतच्या कुठल्या कायद्याचे विश्लेषण व संकलन करू शकतात. भाषेच्या अभ्यासामध्ये व्याकरणाला विमानाच्या उड्डाणामध्ये मजबूत धावपट्टीला आणि द्रुतगती आगगाडीच्या खाली रूळाला जे महत्व आहे, नेमके तेच महत्व कुठल्याही धर्मात त्याच्या धर्मकायद्याला म्हणजेच शरीअतला आहे. इस्लामी शरीअत एक अजमावलेली व परिपूर्ण शरीअत असल्याकारणाने तिचे अस्तित्व प्रलयापर्यंत टिकणारे आहे. 


       इस्लामी शरीअतमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरविण्यासाठी उत्तेजित करण्यात आले आहे. विविध उपासनांच्या दरम्यान माणसाच्या हातून काही चुका घडतात उदाहरणार्थ रमजान महिन्यात कुणी जाणून बुजून वेळेच्या आधी उपवास सोडला किंवा उपवास राखलाच नाही अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून ६० दिवसांचे उपवास राखण्याचे आदेश आहेत. असे करताना एकही खाडा झाला तर पुन्हा एकपासून साठपर्यंत उपवास करावेत. एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने रोजा राहणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने साठ गरिबांना दोन वेळचे पोटभर जेवण द्यावे यालाच कफ्फारा म्हणजे परतफेड म्हणतात. तात्पर्य असे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने लोक देणारे बनावेत.