गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

बुवाबाजी एक समाजकलंक

बुवाबाजी एक समाजकलंक



                         फोटो:साभार गुगल


        स्वतःच्या अंगी अफाट दैवी शक्ती आहे, आपल्याला एखादी अघोरी विद्या, चेटूक विद्या प्राप्त झाली आहे. या विद्येमुळे आपल्याला सिध्दी प्राप्त झाली आहे किंवा आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त झाले आहे असे भासवून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी दैवी उपचारांचे नाटक करून धनसंपत्ती, प्रसिध्दी मिळविण्याच्या प्रवृत्तीला बुवाबाजी म्हणता येईल.


       'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' असे संतानी म्हटल्याप्रमाणे आज समाजामध्ये, लोकांच्या जीवनात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आणि अडचणी निर्माण झाल्या आहेत. बहुसंख्य लोक अज्ञानी व दरिद्री आहेत. त्याच्यावर देव-धर्माचे संस्कार झालेले आहेत. आपल्या जीवनातील अडचणी कशा सोडवायच्या ते त्यांना माहीत नाही. दारिद्र्यामुळे हातात पैसा नसतो, अडचणी कशामुळे निर्माण झाल्या हे त्यांना समजत नसते. मग आपल्या नशिबाला दोष देत या सर्व समस्यांवर उपाय म्हणून एखाद्या बुवांचा आधार घेतात. कारण हे बुवा त्यांना साक्षात् परमेश्वराचे अवतार वाटतात. बुवांच्या कृपाप्रसादाने आपल्या अडचणींचे निराकरण होईल अशा वेड्या आशेने लोक बुवांच्या नादी लागतात व हे बुवा त्यांचा गैरफायदा घेतात.


        सुशिक्षित बेकार असलेल्या लोकांना वाटते, 'बरा बिन भांडवली धंदा आहे बुवा महाराजांचा' म्हणून कांही लोक तिकडे वळतात. विशेष म्हणजे अभिनेते, अभिनेत्री, गायक, खेळाडू, नेते मंडळी सुध्दा कुणा ना कुणा बुवांचे भक्त असतात. या सगळ्यांना स्पर्धेत टिकून रहायचे असते. वास्तविक हे सर्वजण त्यांच्या अंगभूत गुणांनी यशस्वी झालेले असतात, होणार असतात पण हे लोक आपल्या यशाचे श्रेय मात्र बुवाकडून मिळालेल्या गळ्यातील ताईताला देतात. जनतेच्या गळ्यातला ताईत झालेले एखादे पुढारीसुध्दा बुवांच्या ताईताला बळी पडलेले असतात. हे बुवाजी असणारे सर्वजण भोंदू, हुषार, चलाख व तल्लख बुध्दीचे असतात. लोकांना नादी लावण्यात त्यांचा हातखंडा असतो, भक्तांच्या समस्यांवर खोटेनाटे उपाय सुचविण्यात ते वाकबगार असतात. समाजाला लुटण्याचा ठेका घेतलेले ठेकेदार असतात.


        'गलती करनेवाला गुनहगार होता है, मगर गुनहगारका साथ देनेवाला गुनहगारका बादशहा होता है।' या उक्तीप्रमाणे बुवा गुन्हेगार आहेतच पण या बुवांचे लोण पसरविण्यास मदत करणारे तुम्ही-आम्हीच खरे गुन्हेगार आहोत. काळा  धंदा करणारे, शिक्षणाचा बाजार मांडणारे, भ्रष्टाचार करणारे, सावकारी करणारे लोक गैरमार्गाने भरपूर कमाई करतात आणि त्यातील काही भाग बुवांच्या नावावर खर्च करून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपण केलेले दान सर्वांना कळावे, दानशूर म्हणून आपला नावलौकिक करण्याची केविलवाणी धडपड करतात. बुवांच्या मठाचे ऐश्वर्य पंचवीस किंवा एक्कावन्न रूपयांच्या सामान्य देणग्यातून वाढत नाही. तर गैरमार्गाने मिळविलेल्या कोट्यावधी रूपयांतून वाढते. शेकडो एकराची जमीन सहजासहजी बुवांच्या मालकीची होते.


            स्त्रिया आणि बुवाबाजी यांचे नाते घनिष्ठ आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण निसर्गतः चोखंदळ असणाऱ्या स्त्रिया बुवाबाजीसाठी हवा तेवढा खर्च करायला एका पायावर का तयार होतात? घर-संसार, मुले-बाळे, कामधंदा सोडून बुवांकडे का जातात? भाजीची पेंडी घेताना चार ठिकाणी चौकशी करून, घासाघीस करून संसारासाठी चार पैसे वाचवणाऱ्या स्त्रिया बुवांसाठी सुकामेवा व तुपाची वाटी घेऊन भल्या पहाटे का जातात? वृध्द सासू-सासऱ्यांना वृध्दाश्रमात पाठवून बुवा महाराजांना हात टेकविण्यासाठी खांदा का देतात? माझ्या मते स्त्रियांजवळ एक नैसर्गिक शक्ती असते, तिला आपल्याकडे वाईट नजर टाकणारा तात्काळ ओळखता येतो. मग अशी वाईट नजर टाकणारे बुवा महाराज तिला का ओळखत नाहीत? घरंदाज स्त्रिया, उच्चविद्याविभूषित स्त्रिया, मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या सुंदर स्त्रिया बुवांकडे का आकर्षित होतात? बुवांच्या वखवखलेल्या वासनेला बळी पडणाऱ्या हजारो-लाखो स्त्रियांपैकी केवळ एक-दोन स्त्रियाच बंड करू शकतात का?


       आज कामकरी, कष्टकरी वर्गाची पिळवणूक होत आहे. सर्वसामान्य जनतेसमोरील अनेक प्रश्न कमालीचे वाढले आहेत. जटिल बनले आहेत. जीवनाबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या सर्व अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून कमालीच्या नैराश्य, आगतिकता व असहाय्यतेच्या गर्तेत माणूस अडकला आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, रोगराई, दुष्काळ, वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक आपत्ती यासारखे अनेक प्रश्न खांद्यावर घेऊन जगणारे ८०% लोक, सुखदायी व आरामदायी जीवन जगणारे २०% लोक अशी विषमतेची दरी निर्माण झाल्यामुळेच बुवाबाजीला वाव मिळत आहे. बुवाबाजीला विविध स्तरातून अभय मिळत आहे. अज्ञानी, भोळ्या जनतेपासून सुशिक्षित, धनदांडग्या जनतेपर्यंत सर्वजण बुवाबाजीला बळी पडताना दिसत आहेत.


       आज बहुतांश ठिकाणी आपल्याला जवळचे रस्ते हवे असतात. इन्स्टंट सुखाचे सर्वजण भुकेले असतात. निःस्वार्थी भावनेतूनत समाजसेवा करणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. राजकारणातील नेत्यांची भडक भाषणं सर्वांच्या' अंगवळणी पडली आहेत. भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला आपण नित्य आहार घालत आहोत. एखाद्या दुर्घटनेनंतर मोर्चे, संप, धरणे, आंदोलने होतात हे खरे पण असे लोक एका वेगळ्या अपेक्षेने एकत्र येतात. दोन-दोन, तीन-तीन दिवस आमरण उपोषणे होतात, फोटो पेपरमध्ये झळकतात नंतर सर्व कांही शांत होते.

  

        आजच्या तरूणाईला या बुवांचा खोटेपणा दूर करण्यासाठी विचारपूर्वक वाटचाल करावी' लागेल. अनिश्चिततेच्या आवर्तात, आदर्शाचा धूसर दीपस्तंभ पहात पहात यशस्वी जीवनशैलीचा आधार घेऊन तणावमुक्त समाजाची निर्मिती करणे आता तरूणांच्या हाती आहे. बदलत चाललेल्या समाजरचनेतील जबाबदार घटक, कौटुंबिक आरोग्यात ताण-तणाव निर्माण करणारे घटक, ऐहिक सुखाची जाहिरात करून समाजात अनिती पसरविणारे घटक, चारित्र्यसंपन्नता, शूचिता यांना मूठमाती देणारे घटक, संतविचारांना, संस्कृतीला बाधा आणणारे घटक वरील सर्व घटक प्रबळ झाल्यामुळे बुवाबाजीला ऊत आला आहे. भानामती, अंगात येणे, नरबळी, चमत्कार अशा तथाकथित अंधश्रध्दाना प्रतिबंध करण्यासाठी फक्त कायदा करून चालणार नाही. कायद्यांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायला हवी. समाजमनातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर झाली तरच अज्ञानाने घडणारा मृत्यू बंद होईल व सर्व बाबांचे चमत्कार बंद होतील. समाजात प्रगतीचा, विज्ञान-तंत्रज्ञानाने संपन्न झालेला सुर्य उगवेल व आपल्या रातकिरणांनी समाजातील प्रत्येक व्यक्तिला उजळून टाकेल यात शंका नाही.