मराठी कथा, कविता, लेख, साहित्य यांचा सुरेख संगम जो जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो.
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१
खरी मैत्री - मराठी कथा
शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१
चूक कुणाची, शिक्षा कुणाला? - मराठी कथा
चूक कुणाची, शिक्षा कुणाला? - मराठी कथा
मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०
भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा
भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गूगल
एप्रिल महिना सुरू होता. उन्हाचा तडाखा प्रकर्षाने जाणवत होता. अंगाची लाही लाही होत होती. अशावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कांही कामासाठी जावे लागले. ते काम अपेक्षेपेक्षा लवकर झाले आणि आम्ही दोघांनी कुलकर्णी काकांना भेटण्यासाठी दिंडेनगरला जायचे ठरविले. दिंडेनगर तिथून तसे खूप लांब होते. त्यात ऊन मी म्हणत होते. शिवाय त्यांचे नवीन घर नेमके कुठे आहे हे पण आठवत नव्हते. कारण दोन वर्षांपूर्वी वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांच्याच गाडीतून जाऊन बघितले होते. बस स्टॉपपासून घर सापडणे कठीण होते, त्यामुळे रिक्षाने जाण्याचा निर्णय झाला. अर्धा तास थांबून लगेच परत येता येईल असा विचार करून एका रिक्षावाल्याला पत्ता सांगून भाडे विचारले. तो म्हणाला, "तीनशे रूपये लागतील. रिक्षाभाडे २५० रुपये व वेटिंग चार्ज ५० रू आणि हो अर्ध्या तासाच्या वर एक मिनिटही जास्त थांबणार नाही". दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारले तर तो ३५० रूपये म्हणाला, म्हणून पहिल्या रिक्षावाल्याला २५० रू. घे आणि चल म्हणालो. पण तो तयार झाला नाही. शेवटी असू दे बाबा म्हणून रिक्षात बसलो.
रिक्षा कांही अंतर पार करत असतानाच आकाशात ढगांनी गर्दी केली. ढगांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. पाऊस येणार की काय म्हणत असतानाच पाऊस जोरात पडू लागला. गारा रिक्षावर जोराने आदळू लागल्या. वळवाचा पाऊस असाच असतो. रिक्षा कशीबशी दिंडेनगर बोर्डजवळ उभी राहिली. तो म्हणाला, "सांगा आता कुणीकडे जायचं?" आम्हाला कांहीच समजेना. म्हणून काकांना फोन केला. त्यांनी रिक्षावाल्याला नेमका पत्ता सांगितला पण धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रिक्षा चालवणेही कठीण झाले. थोडा वेळ थांबलो इतक्यात काकांचा फोन आला, अजून कसे नाही आलात? कांही वेळाने रिक्षा कशीबशी काकांच्या गेटजवळ थांबली. पहातो तर काय काकी छत्री धरून हातात दोन तीन छत्र्या घेऊन उभ्या होत्या. ड्रायव्हरसह आम्हा दोघांसाठी छत्र्या दिल्या हेतू हा की गेटपासून घरात येईपर्यंत आम्ही भिजायला नको. बाथरूममधून बाहेर काकी टॉवेल घेऊन उभ्या होत्या. पाच मिनिटाच्या आतच फक्कड असा गरमागरम चहा दिला. घरातील सर्वासर्वांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्या मते चौकशीत कमालीची माया, आपुलकी होती. थोड्याच वेळात मस्त पैकी ओलं खोबरं व कोथिंबीरीने सजलेली पोह्यंची प्लेट आमच्यासमोर हजर झाली.
अर्धा तास झाल्याबरोबर रिक्षावाल्याला आम्ही म्हणालो, "चला, अर्धा तास संपला". तो म्हणाला, "थांबा अजून थोडा वेळ. पाऊस कमी झाल्यावर निघू या". पुन्हा गप्पा रंगल्या. काकीनी मुलांना खाऊचे पॅकिंग दिले. माझी खणानारळाने ओटी भरली. ड्रायव्हरला व यांना नॅपकिन, पानसुपारी दिली. पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहून आम्हीच उठलो. काका काकीना निरोप देऊन रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला यांनी शंभराच्या तीन नोटा दिल्या. त्याने त्यातली शंभराची नोट परत दिली. प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो म्हणाला, "तुमच्या दोन कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी बघून मी थक्कच झालो. तुमचा धर्म वेगळा त्यांचा वेगळा पण मनाने तुम्ही एकमेकांच्या किती जवळ आहात हे मी जवळून बघितल. खूष झालोय मी, नाहीतर हल्ली कुठं बघायला मिळतं असं चित्र?"
ड्रायव्हरप्रमाणेच सर्वांना थक्क करून सोडणारं आमच्या दोन कुटुंबातील हे नातं जातीधर्माच्या पलीकडचे आहे. कुलकर्णी काका मिल्ट्रीमन पंधरा वर्षाच्या सेवेनंतर कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क आणि आमचे हे रजिस्टार ऑफिसमध्ये क्लार्क. दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. काकांची गावाकडे शेती, घर होते. नोकरी संपल्यानंतर गावाकडे किंवा कोल्हापूरात त्यांना स्थायिक व्हायचं होतं. तिथून गावाकडच्या शेतीकडे लक्ष देता येईल, म्हणून ते जयसिंगपूरात भाड्याच्या घरी रहात होते. त्याचवेळी आम्ही बँकेचे कर्ज घेऊन सहा खोल्यांचे घर बांधले व तीन खोल्या भाड्याने द्यायचे ठरविले. अशाप्रकारे काकांची फॅमिली आमच्या घरात रहायला आली. मैत्री होतीच त्यात इतक्या जवळ रहायला आले त्यामुळे दुधात साखर पडली. दोघेजण ऑफिसला एका गाडीवरून जाऊ लागले. एकत्र खरेदी होऊ लागली. माझ्या सासूबाई व काकी एकत्र गप्पा मारत भाजी निवडू लागल्या. काकांच्या मुलीने स्मिताने आमच्या लेकीना अरमान व यास्मिन ला इतका लळा लावला की स्मिता परगांवी गेली की या दोघींना तिचा जोसरा काढून ताप येऊ लागला. काकांचा मुलगा स्वप्निल, पुतणे सचिन व सुयोग आमच्या मुलापेक्षा मोहसीनपेक्षा थोडे मोठे असल्याने आमच्या मुलांना सायकलवरून शाळेत नेऊ आणू लागले. काकांना पाच बहिणी आहेत. त्या इकडे आल्या की आम्हाला भेटू लागल्या. त्यांच्याशीही आमची घट्ट मैत्री झाली. आमची दोन कुटुंबे एकरूप होऊन गेली.
स्वातीकाकी पत्रद्वारा दासबोध अभ्यास करत होत्या. मी त्यांच्याकडे चौकशी केली व मलाही अभ्यास करता येईल का असे विचारले. काकी म्हणाल्या, "का नाही?, उलट तुमचं विशेष कौतुक होईल." त्यांच्यामुळे मी तीन वर्षाचा पत्रद्वारा दासबोध अभ्यास पूर्ण केला. भारतीय संस्कृती दर्शनाच्या काकींसमवेत परीक्षा दिल्या. काका आम्हा दोघींना चेष्टेने म्हणायचे, "तुम्ही दासबोध अभ्यास करून आम्हा दोघांना सज्जनगडावर पाठवू नका म्हणजे झाले."
२००६ साली अयोध्येत बाबरी मशीद प्रकरण सुरु होते. नेमक्या त्याच वेळी बेंगलोरच्या आत्या व त्यांच्या मुली काकांकडे आल्या होत्या आणि दोन्ही कुटूंबाचे आमच्या अंगणात चांदणी भोजन सुरु होते. रस्त्याने जाणारे लोक म्हणत होते, "थोडा आदर्श घ्यावा या दोन्ही कुटुंबाचा आणि संपवून टाकावा तो वाद."
रमजानमध्ये काका सत्ताविसावा रोजा करायचे. दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज पडून आल्याचे अभिमानाने सांगायचे. काकी मोहरममध्ये पीराला नैवद्य व वस्त्र अर्पण करायच्या. काकांच्या तुळशीच्या लग्नाला आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहेर घेऊन हजर असायचो. मंगळागौर, ऋषीपंचमी, चैत्रागौर या सर्व कार्यक्रमांना आमची हजेरी ठरलेली असायची. दोन्ही कुटुंबातील पै पाहुण्यांच्या घरातील मुंजीपासून लग्नापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना आम्ही आवर्जून हजर रहायचो. अशा प्रकारे आमचं अनुभवविश्व समृद्ध व संपन्न झालं.
असे हे आमचे कुलकर्णी काका एकदा खूप आजारी पडले. ते आजारी असल्याचा फोन येताच आम्ही दोघे ताबडतोब दवाखान्यात हजर झालो. काकांंची तब्येत खूपच गंभीर होती. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते पण प्रतिसाद नव्हता. त्यांच्या किडनीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितल्यानं त्यांच्या बहिणी, भाऊ, मेहुणे, भाचे, पुतणे सगळे सगळे हजर होते. जेवणाचे डबे असूनही दोन वाजून गेले तरी कुणी अन्नाचा कणही घेतला नव्हता. त्यांची अवस्था बघून दोघीतिघी नातेवाईक स्त्रिया पुढच्या म्हणजेच अंतिम तयारीसाठी घरी गेल्या. काकी पूर्ण खचून गेल्या होत्या. आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्या गळ्यात पडून खूप रडल्या. त्यांना रडतांना बघून सर्वांनाच गलबलून येत होते. पेशंट बघायला आत कुणालाही जायला परवानगी नव्हती. त्यांचा डॉक्टर भाचा निरंजन फक्त त्यांच्याजवळ होता. आम्ही डॉक्टरांना खूप विनवलं व दोनच मिनिटासाठी आत जावून काकांना बघून आलो. विमनस्क मनःस्थितीत सगळेजण देवाचा धावा करत होते. असाच अर्धा तास निघून गेला. आणि काय आश्चर्य निरंजन हसतच बाहेर आला आणि म्हणाला, "मामा प्रतिसाद देताहेत. त्यांनी डोळे उघडले आहेत. ते पूर्ण शुद्धी वर आलेत. डॉक्टरांच्या संपलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत."
सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची बरसात झाली. आम्ही तिथे थांबलो व सर्वांना जेवण करण्यासाठी बाहेर पाठवलं. कदाचित आम्ही तिथे जाणं आणि काका बरं होणं हा निव्वळ योग असावा. डॉक्टरांच्या प्रयत्नाचं फळ असावं किंवा बोला फुलाला गाठ पडली असावी, ईश्वर अल्लाहची कृपा असावी. पण काकी म्हणाल्या, "मोहरम सुरू आहे. पीरबाबांसाठी आमच्यातर्फे वस्त्र घेऊन जा".
असा हा जिव्हाळा अंतःकरणात रूजलेला मनात साठवून ठेवलेला.
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०
जगू या प्रत्येक क्षण आनंदाने - मराठी कथा
जगू या प्रत्येक क्षण आनंदाने!
हिरेमठ सर तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते नुसतेच नावाला तत्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचा जीवनात अंगिकार करत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीनुसार त्यांची जीवनशैली होती. त्यामुळे हिरेमठ सर आदर्श व विद्यार्थीप्रिय होते. त्यांची पत्नी मधुरा, नावाप्रमाणेच मधुर होती. ती जेमतेम जुनी मॅट्रिक शिकलेली होती पण सरांच्या सहवासात राहून, त्यांचं जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान ऐकून ती जणू तत्त्वज्ञानाचं विद्यापीठच बनली होती. संसार काटकसरीने, निगुतीने कसा करावा हे तिच्यापासून शिकण्यासारखं होतं. सरांच्या पगारातील पैसा न् पैसा ती सत्कारणी लावायची. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संसार सुखासमाधानाचा करण्यात ती यशस्वी झाली होती. दोन्ही मुलांना सुसंस्कारित बनविले होते. सद्या ते दोघेही उच्चशिक्षण घेऊन फॉरेनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
कोरोना लॉकडाऊनच्या या बिकट काळात मधुरा कांहीशी नाराज दिसत होती. दोन्ही मुलांच्या काळजीने त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. आजूबाजूला कोरोना बाधितांची सतत वाढत चाललेली संख्या पाहून मनातल्या मनात त्या हबकून गेल्या होत्या. जवळच्या नातेवाईकांंच्या, परिचीत व्यक्तींच्या मृत्यूची बातमी मधुराला घायाळ करत होती. तिला वाटायचे इथे आपण दोघेच आहोत. आपलं कांही बरंवाईट झालं तर आपली मुलं येतील का? आपल्या मुलांना त्या देशात कोरोनाची बाधा होईल का? अशा असंख्य विचारांनी ती गारठून गेली होती. सरांनी तिची मनःस्थिती ओळखली होती आणि त्यांच्या परीने ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
लॉकडाऊन संपले, दुकाने उघडली आणि मधुराने सरांकडे बेडशीट आणण्यासाठी तगादा लावला. सर विचार करत होते, एरव्ही कांही आणू या म्हटले की राहू दे आता नंतर आणू या, म्हणणारी मधुरा बेडशीट आणण्याची एवढी घाई का करत असेल? बेडशीट मध्यभागी फाटले होते हे मान्य परंतु यावेळी ती अतिघाई करतेय असे सरांंना वाटत होते.
सरांनी बेडशीट आणून दिले. बेडशीट बेडवर विराजमान झाल्याचे त्यांनी पाहिले. कांही दिवसानंतर एका निवांत क्षणी त्यांनी मधुराला विचारले, "मधुरा, नवे बेडशीट बेडवर अंथरल्याचे मी पाहिले. पण त्या जुन्या बेडशीटचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा मध्यभागी जीर्ण झालेला भाग काढून टाकला. बेडशीटचे गादीखाली फोल्ड केलेले दोन्ही भाग एकदम छान होते. ते दोन्ही भाग एकमेकांना जोडून दिवाणवरील छोट्या गादीवर अंथरण्यासाठी त्याचे छानसे बेडशीट तयार केले."
सर म्हणाले, "मग त्या दिवाणवरील जुन्या बेडशीटचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा चांगलासा भाग काढून त्याचे दोन पिलोकव्हर शिवले."
सर म्हणाले, "अरे वा! पण त्या जुन्या पिलोकव्हरचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या पिलोकव्हरचा चांगला भाग काढून घेतला. त्या कापडाचा तुकडा मी भांडी, डबे पुसायला घेतला."
सर म्हणाले, "फारच छान केलंस. पण त्या जुन्या कपड्याचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या जुन्या कापडाचे धागे काढून आपल्या काथ्याच्या पायपुसणीतील छिद्रात बसवले. त्यामुळे ती पायपुसणी मऊसूत झाली."
सर म्हणाले, "हे बघ मधुरा, मी तुला एक बेडशीट आणून दिलं आणि तू त्याचा किती हुशारीने, कौशल्याने वापर केलास. कसलाही एक कण वाया न घालवता त्याला नवं नवं सुंदर रूप दिलंस, असंच आहे आपल्या आयुष्याचं! परमेश्वराने आपल्याला एक सुंदर जीवन दिलंय. त्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा. या आयुष्यातील सुंदर क्षणांचा उपभोग घ्यायला हवा. आपल्या आयुष्यातील बरेच क्षण आपण काळजी करण्यात घालवत आहोत. कित्येक दिवस आपण कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत आहोत. ही भितीची छाया, काळजी सर्व बाजूला ठेवून प्राप्त परिस्थितीत आलेला प्रत्येक क्षण आनंदाने घालविण्याचा प्रयत्न करू या."
मधुरा म्हणाली, "छान समजवलंत हो मला जीवनाचं तत्त्वज्ञान. म्हणून तर मी नवं बेडशीट आणण्याची घाई केली. त्याच्या येण्यामुळे असं काय काय बनवायचं होतं. कोरोनाच्या काळजीला पळवायचं होतं." दोघेही मोठमोठ्याने हसले व कामाला लागले.
सरांनी सांगितलेले तत्वज्ञान ह्रदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे जपून ठेवू या.
जगू या आनंदाने
कोरोनाचा सामना करू नेटाने।
मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०
कोणता पुत्र श्रेष्ठ? - मराठी कथा
कोणता पुत्र श्रेष्ठ?
सविता आपल्या पतीसह पुण्याला निघाल्या होत्या. ५, ६ तासांचा प्रवास होता. आता मुलांकडे जाणार म्हटल्यावर आईच्या मुलांवरील मायेपोटी घेतलेले बरेच साहित्य होते. तिखट, पीठ, डाळी, घरचे तांदूळ, भाज्या, भडंग, मुद्दाम केलेले तुपातील बेसनचे लाडू आदी बसमध्ये सर्व साहित्य चढवताना त्या दोघांना पुरेवाट झाली. पण त्यांना समाधानही वाटत होतं की सर्व काही लेकासाठी घेता आलं याचं. एवढ्यात सविताची बालमैत्रिण वनिता पतीसह बसमध्ये चढल्या. सविताप्रमाणेच वनिताही आपल्या मुलांकडे निघाल्या होत्या. त्यांच्याकडेही सविताप्रमाणेच भरपूर साहित्य होते. सामान व्यवस्थित ठेवल्यावर दोघी एका बाकावर बसल्या. मग काय गप्पांना पुण्यापर्यंत पूर आलेला होता. तुझा मुलगा काय करतो? कोठे राहतो? सविताने विचारले. वनिता म्हणाली, "माझा मुलगा बी.कॉम झालाय. टेलिफोन ऑपरेटर आहे. २०-२२ हजार पगार आहे. माझी सून पण कंपनीत जॉब करते. तिलाही १५ हजार पगार आहे. दोघं खूप आनंदात आहेत. ४- ५ महिन्यांंनी मी आजी होणार आहे. मुलानं आधीच सांगितलं आहे की, नातवडं आलं की तुम्ही दोघांनी इथेच कायमपणे रहायचं. माझा मुलगा वडगांवमध्ये रहातो, तुझा मुलगा काय करतो? कोठे राहतो? वनिताने विचारले. सविता जरा सावरून बसत अभिमानाने सांगू लागली. माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मोठ्या कंपनीत मुख्य मॅनेजर आहे. ९० हजार पगार आहे. शिवाय दोन वर्षे अमेरिकेत राहून आला आहे. सूनबाईही इंजिनिअर आहे. तिलाही ६० हजार पगार आहे. पैशांचा पाऊस पडतोय महिन्याला. चांगला अलिशान फ्लॅट घेतलाय त्यानं. त्या दोघांनी ठरवलय सद्या तरी मूल नकोच लाईफ एन्जॉय करायचं.
एवढं बोलून थांबेल ती सविता कसली? ती पुढे म्हणाली, ३०-३५ हजारात पुण्यात राहताना तुझ्या मुलाला कठीण जात असेल. फ्लॅट वगैरे घेण्याचा विचारसुध्दा केला नसेल त्यानं. वनिता म्हणाली, "खरं आहे तुझं म्हणणं पण माझा मुलगा व सून दोघे समजूतदार व काटकसरी आहेत . नियमितपणे बचत करतात. त्यांनी फ्लॅटही बुक केलाय. येत्या एक-दीड वर्षात फ्लॅटचा ताबा मिळेल. वनिता मध्यमवर्गीय सुखी, समाधानी रहाणीमानाचे यथार्थ समर्थन करत होती. तर सविता आपल्या मुलांच्या व सुनेच्या उत्तुंग कार्याचे व भरमसाठ पगाराचं तोंड भरून कौतूक करत होती. मध्यंतरी दोन वेळा तिच्या मुलाचा फोन आला. आई-बाबा तुम्ही कुठपर्यंत आलाय? तुम्ही आल्यावरच सगळे मिळून जेवण करू या म्हणून. दोघींच्या गप्पात बस स्वारगेटला केव्हा येवून पोहोचली ते कळलेच नाही.
बस थांबताच वनिताचा मुलगा व सून चपळाईने बसमध्ये चढले. त्यांना बिलगून नमस्कारही केला त्यांनी. ते दोघे १० मिनिटे आधीच इथे पोहचून चारचाकी पार्क करून थांबले होते. त्या दोघांनी आई-बाबांना सांगितले की तुम्ही निवांत मोकळेपणाने खाली उतरा. प्रवासाने तुमचे पाय भरून आले असतील. आई-बाबांनी आणलेले साहित्य गाडीत व्यवस्थित ठेवल्यावर हे दोघे वर चढणार तोपर्यंत मुलाचा एक मित्र त्याला भेटायला पुढे आला. ते दोघे थोडा वेळ गप्पात रंगले.
वनिताने सविता गेली की काय म्हणून नजर टाकली. कारण तिने अध्यातासापूर्वीच मुलाला फोन करून तसे सांगितले होते. वनिता बघते तर काय सविता बसमधून एकेक बॅग खाली आणत होती. तिचे पती लंगडत लंगडत ते बाकावर ठेवत होते. प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गडबड करत होते. त्यामुळे सामान उतरवताना या दोघांची दमछाक चालली होती. सामान उतरवून झाल्यावर तिच्या मुलाचा फोन आला गाडीतून न उतरताच त्याने सांगितले की इकडे गाडीकडे या म्हणून. दोघे सामानाच्या बॅगा घेवून गाडीकडे गेले व स्वतःच बॅग गाडीत चढवू लागले. वर तिचे चिरंजीव म्हणाले, "आई-बाबा तुम्हाला हजार वेळा सांगितलय की गावाकडून एवढं सामान आणत जावू नका म्हणून. तरी एवढं सामान घेवून येता कशाला? आणि काय गं आई मी बरोबर आठ वाजता जेवायला बसतो हे माहित असूनही बरोबर आठ वाजता कशाला फोन केलास? मग मला जेवण करूनच निघाव लागलं. यापुढे काहीही न बोलता मुलानं गाडी स्टार्ट केली व निघाले. मघाशी अभिमानाने, मोठमोठ्याने मुलाचं कौतुक करणाऱ्या सविताचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. हे वेगळं सांगायला नको.
थोडक्यात समाधान मानून सुखाने जीवनाला सामोरे जाणारी वनिताची फॅमिली आनंदाने घरी पोहोचली. आता तुम्हीच सांगा वाचक बंधू-भगिनींनो पगार कमी असला तरी आई-वडिलांवर मायेचा वर्षाव करणारा पुत्र श्रेष्ठ की फॉरेन रिटर्न, उच्च शिक्षित, भरमसाठ पगार असलेला पुत्र श्रेष्ठ?
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
बहिणीची माया - मराठी कथा
बहिणीची माया
बऱ्याच कलावधीनंतर एका स्थळाकडून होकार आला. मुलगा इंजिनिअर होता. पगारही चांगला होता. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. बंगला, गाडी सर्व काही होते पण त्यांची एक अट होती. तुझ्या भावाने आमच्या घरी कधीही येऊ नये. आम्ही तुमच्या घरी आलो की घरात थांबू नये. लग्नातही त्याने हजर राहू नये. सुनिताला ही अट मान्य नव्हती. तिने या स्थळाला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिच्यासाठी आणखी एक स्थळ आलं. बऱ्याच कालावधीनंतर एका वराकडून होकार आला. अमोल नुकताच इंजिनिअर झाला होता. खाजगी कंपनीत अल्पशा पगारावर नोकरीस लागला होता. त्याला शेत, घर काहीच नव्हते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने मोलमजुरी करून त्याला शिकविले होते. अमोलनेही स्वतः कष्ट करून शिक्षण घेतले होते. अमोलने सुनिताच्या वडिलांकडे सुनिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यापूर्वीच सुनितानेही वडिलांकडे लग्न ठरविण्यापूर्वी अमोलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती अमोल सुनिताच्या घरी आला. तो तिला म्हणाला, "तू श्रीमंत परिस्थितीत लहानाची मोठी झाली आहेस. इथे तुला सर्व प्रकारच्या सुखसोयी प्राप्त आहेत. असे असताना तू माझ्यासारख्या दरिद्री वराला कसा काय होकार दिलास?" सुनिता म्हणाली, "तुझं दारिद्रय मी अगदी मनापासून स्विकारलं आहे. दारिद्र्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात, अडचणीत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, तुझी सावली बनेन. दारिद्रयातून येणारी प्रत्येक गैरसोय सोसेन. प्रसंगी उपाशी राहीन पण माझी एक अट आहे."
सुनिता अमोल विवाहबद्ध झाले. संजय त्यांच्या घरी येतो जातो. त्यांचा संसार सोन्यासारखा झाला आहे.
या गोष्टीवरुन समस्त बहिणीनी आपला संसार फुलवत असताना दुर्दैवाने त्रस्त झालेल्या भावाला सुनिताप्रमाणे मायेचा वर्षाव केला, त्याला आधार दिला, तर बहीण भावाच्या या पवित्र नात्याला कधीही बाधा येणार नाही, होय ना?
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
जादू शब्दांची - मराठी कथा
जादू शब्दांची
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
रुपाताई आदर्श शिक्षिका म्हणून नावाजलेल्या होत्या. शाळेचे गॅदरिंग, वेगवेगळ्या स्पर्धा, परीक्षा, शैक्षणिक उपक्रम, सहली या सर्वात त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. त्यांच्या अध्यापनाच्या विशिष्ट पद्धतीमुळे त्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका होत्या. मितभाषी व लाघवी बोलण्यामुळे त्या सर्व सहकारी शिक्षकांच्याही आवडत्या शिक्षिका होत्या. त्यांचे पती जवळच्याच गावात शिक्षक होते. अरूण व अनिता ही दोन अपत्ये होती. दृष्ट लागण्यासारखा त्यांचा संसार होता. पण नियतीला हे मंजूर नव्हते.
अरूण आठवीत
आणि अनिता सहावीच्या वर्गात शिकत होते. दोन्ही
मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुंदर स्वप्ने पहात असतानाच रूपाताईंच्या पतीना हार्ट अटॅक आला आणि ते देवाघरी निघून गेले. संसाराचा डाव अर्ध्यावरच
मोडून पडला. दुःखाचा डोंगर कोसळला. मुलांची जबाबदारी एकटीवरच येऊन पडली. दुःख
बाजूला ठेवून त्यांनी ही जबाबदारी पेलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सासर माहेरचा
विशेष पाठिंबा नसतानाही आपल्या मुलांना कांही कमी पडू दिले नाही. स्वतःच्या इच्छा
आकांक्षा दाबून ठेवत त्यांनी मुलांना सर्व गोष्टी अगदी वेळेवर पुरवल्या.
अरुण सायन्स
साईडने बारावी पास झाला. चांगल्या क्लासमध्ये घालूनही जेमतेम मार्कस् मिळाले.
इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणे कठीण झाले. त्याने प्रायव्हेट कॉलेजला डोनेशन भरून प्रवेश घेण्याचा हट्ट केला. डोनेशन देण्यासाठी रूपाताईंकडे रक्कम नव्हती. मुलाच्या
भविष्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकून प्रवेश घेतला. अरूण पहिल्या सेमिस्टरला
सर्व विषयात नापास झाला. दुसऱ्या सेमिस्टरला एकाच विषयात पास झाला. मला हे जमणार
नाही म्हणून नाद सोडून दिला? पुढे एक वर्ष
असेच गेले. नंतर त्याने मी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेण्याचा हट्ट केला. फी भरुन
प्रवेश घेतला व कांही महिन्यानंतर कोर्स अर्धवट सोडून दिला. अशा प्रकारे प्रत्येक वेळी नवीन
कुठल्यातरी कोर्सला प्रवेश घेतो व मध्येच सोडून देतो. अलीकडे तर सर्वच सोडून दिले
आहे. दिवसभर मित्रांसोबत बाहेर हिंडतो. रात्री अपरात्री केंव्हातरी घरी येतो.
स्मोकिंग, ड्रिंक्स करून येतो. रोज आईकडे पैसे मागतो.
पैसे न मिळाल्यास खूप संतापतो. आईच्या अंगावर धावून येतो म्हणून आई नाईलाजास्तव
त्याला पैसे पुरवते. परवाच त्याचा पंचविसावा वाढदिवस झाला. आईकडून पैसे घेऊन
त्याने मित्रांना मोठ्ठी पार्टी दिली. अरूणच्या अशा वागण्याने आई हैराण झाली.
अनिता
अरुणच्या मानाने शिक्षणात ठीक आहे. तिने बी. कॉम. होऊन एम्. बी. ए. पूर्ण केले व
एका कंपनीत नोकरीला लागली. अनिताची तऱ्हा कांही वेगळीच होती. अनिता आत्मकेंद्री
झाली होती. घरातील कुठल्याच गोष्टीशी तिचा कांहीच संबंध नव्हता. घरातील कुठल्याही
कामाला ती हात लावायची नाही. आईला घरकामात थोडीही मदत करायची नाही. उलट स्वतःची
सर्व कामे आईकडून करून घ्यायची. तिची सर्व कामे आईने केलीच पाहिजेत, ते तिचे
कर्तव्यच आहे, असे तिला वाटायचे. शिवाय मी इतकं शिकलेय त्या
मानाने आपली आई निव्वळ अडाणी असे तिला वाटायचे. आई तुला काय कळतय? असं वारंवार
म्हणायची, स्वतःला फार हुशार समजत होती ती. दिवसभर जॉब, सुट्टीच्या
दिवशी मित्र मैत्रिणी बरोबर फिरणे, पिकनिक, मौजमजा यातच
गुंग असायची. ती बी. कॉम झाल्यापासून स्थळे येत होती पण तिला एकही मुलगा पसंत
पडत नाही. आत्ता तर तिने आईला चक्क सांगून टाकलय, माझ्या
लग्नाचा विषय तू अजिबात काढायचा नाहीस. मी माझं बघून घेईन तू या भानगडीत पडू नकोस.
काय करावं
रुपाताईनी अशावेळी! हळूहळू त्या डिप्रेशनमध्ये जायला लागल्या. मुलांच्या
वागण्यामुळे सतत हिणवण्यामुळे आत्मविश्वास गमावू लागल्या, निरूत्साही
बनू लागल्या, अबोल बनू लागल्या. ही गोष्ट त्यांच्या एका खास
मैत्रिणीच्या लक्षात आली. निवांत क्षणी तिने रूपाताईना बोलते केले. रूपाताईनी खरी
हकीकत अश्रूभरल्या डोळयानी सांगितली. मैत्रीण वैशाली हुशार होती. तिने रूपाताईंना या
प्रसंगातून बाहेर काढण्याचा निश्चय केला. वैशालीची मावसबहिण समुपदेशक होती.
त्यांची मदत घ्यायची असे ठरविले. मुलांना तिकडे घेऊन जाणे शक्य नव्हते त्यामुळे
वैशाली ने आपल्या घरी एक छोटी पार्टी ठेवून अरूण, अनिता व
रूपाताईना आमंत्रण दिले. आपल्या मावसबहिणीला रत्नालाही पूर्व कल्पना देऊन बोलवून
घेतले.
बोलता बोलता
समुपदेशक रत्ना म्हणाल्या, "काय हो रूपाताई, काय करतो
तुमचा मुलगा?" अरूणला वाटले, आई आता आपले
सारे पाढे वाचणार. तो पटकन म्हणाला, "आईला काय विचारताय तिला काय कळतंय यातलं? आई निव्वळ
अडाणी आहे." हे ऐकल्यावर रत्नाला फार राग आला. त्या संतापाने म्हणाल्या,
"अरुण लाज नाही
वाटत तुला आईला अडाणी म्हणायला. स्वतःला फार शहाणा समजतोस काय? आईने इतक्या कठीण
परिस्थितीत लाखो रूपये खर्च करून तुला इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन दिला तेंव्हा ती
अडाणीच होती का? इंजिनिअरिंग सोडून तू पुन्हा हॉटेल मॅनेजमेंटला
प्रवेश घेतलास तेही तुला पूर्ण करता आले नाही, आत्ता तर तू
सर्व सोडून बसला आहेस." अरुण म्हणाला, "मला इथे रहायचेच नाही आई मला जराही फ्रीडम देत
नाही. फॉरेनमध्ये बघा कसं स्वातंत्र्य मिळतं मुलांना. रात्री थोडा जरी उशीर झाला
तरी ही लगेच फोन करते, कुठे आहेस बाळा? हिचं हे मला
अजिबात आवडत नाही." त्यावर रत्ना म्हणाल्या, "अच्छा म्हणजे तुला फॉरेन कल्चर आवडते?" अरुण म्हणाला,
"हो आवडते, तिथे
प्रत्येकाला स्वतःची स्पेस असते." रत्ना म्हणाल्या,
"अरे तुला हे
माहित नाही का की तिथे मुलं बारा वर्षाची झाल्यावर स्वतः कमावतात व खर्च करतात.
तिथे अर्न अँड लर्न ही सिस्टीम आहे वयाची पंचविशी ओलांडली तरी
घरी बसलेल्या तुझ्यासारख्या मुलाला फक्त भारतातील आईच खायला घालू शकते रोज आईकडे
पैसे मागताना जराही लाज वाटत नाही तुला? तुझी काळजी
वाटते म्हणून ती फोन करते. आईच्या मायेला तू अडाणी म्हणतोस. तिच्या चांगुलपणाचा
फायदा घेऊन तिलाच अडाणी म्हणतोस?"
थोडा तरी
विचार कर आईच्या मनाचा, तिने तुमच्या साठी केलेल्या त्यागाचा आणि
कष्टाचा असे म्हणत रत्नाने मोर्चा वळवला अनिताकडे. त्या तिला म्हणाल्या,
"काय ग अनिता
फेल न होता ग्रॅज्युएट झालीस म्हणून असे कोणते मोठे दिवे लावलेस? आई तुझ्या
लग्नासाठी स्थळं बघते आणि तू ते नाकारतेस. आत्ता तर तू लग्नच करायचे नाही म्हणतेस.
तिला कधी तुझा विचार काय आहे हे समजावून सांगितलसं? घरात तरुण
मुलगी असल्यावर आईला काळजी वाटणारच. तुझी आई शिक्षित आहे. त्या काळातील ग्रॅज्युएट
आहे हे विसरलीस वाटतं. तुझ्या आईने सर्व्हिस करायची, तुमची
जबाबदारी घ्यायची, घरातील सर्व कामे करायची आणि वर ऐकून घ्यायचे
तिला काय कळतय, अडाणी आहे. तू तिला घरकामात काहीच मदत करत नाहीस. तू स्वार्थी आहेस. अनिता एच्.
आर्. मध्ये एम्. बी. ए. केलंस वा! काय दुर्दैव बघ घरातील दोन व्यक्तींंशी आई
भावाशी कसे वागावे हे तुला कळत नाही. मग काय उपयोग तुझ्या पुस्तकी
शिक्षणाचा."
रूपाताई शांतपणे रत्नाचे व आपल्या मुलांचे
चेहरे न्याहाळत होत्या. मनातल्या मनात घाबरल्या होत्या. घरात गेल्यावर आपली कांही
खैर नाही हे त्यांनी गृहीत धरले होते. रत्नाने दोघानाही आत्मचिंतन करण्याचा सल्ला
दिला व त्या निघून गेल्या.
एका महिन्याने
रुपाताईनी रत्नाला फोन केला. खूपच आनंदात होत्या. त्या म्हणाल्या, रत्नाताई,
"तुमच्या
शब्दानी जादू केली माझ्या मुलांवर. तिथून आल्यापासून दोघेही खूप बदललेत. अरुण एका
टेलिफोन ऑफिस मध्ये नोकरी करत आहे. संंध्याकाळी सातच्या आत घरात येतो. आणि हो
त्याने माझ्याकडे अजिबात पैसे मागितले नाहीत, मीच त्याला
पगार होईपर्यंत पाचशे रूपये घे म्हणून दिले. पगार झाल्यावर त्याने मला पाचशे रुपये
तर दिलेच, शिवाय तीन हजार घे तुला खर्चाला म्हणून दिले.
अनिता तर सकाळी लवकर उठते. मला स्वयंपाकात मदत करते. संध्याकाळी मला चहा करून
देते. नशीब उघडले माझे. तुमच्या तोंडात साखर पडो रत्नाताई. मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही."
आजची युवा
पिढी भरकटली आहे. गोंधळलेली आहे. त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन, समुपदेशन करून मार्गावर
आणावे लागेल हेच खरे.