बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

खरी मैत्री - मराठी कथा



खरी मैत्री - कथा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
             
            

फोटो साभार: गूगल


       जया व उषा अगदी पहिली पासूनच्या मैत्रिणी. दोघींची घरे एकमेकींच्या जवळ नव्हती पण दोघींची मने फारच जवळ होती. दोघींनाही एकमेकीशिवाय अजिबात करमायचे नाही. एकीने कांही अपरिहार्य कारणास्तव शाळा चुकवायचं ठरवलं की, दुसरीही त्या दिवशी शाळा चुकवायची. त्या दोघींना मैत्रिणींनी जोडगोळी हे टोपणनांव ठेवले होते. हायस्कूलमध्ये या दोघींसाठी रेकॉर्ड फिश पाँड़ ठरलेला होता' यें दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे'.

       उषाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिवाय ही पाच भावंडं. उषाला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. तिचे वडील शेतकरी होते. याउलट जयाची परिस्थिती होती. जयाचे वडील शिक्षक होते. त्यांचे कुटुंबही छोटे होते. जयाला एक भाऊ होता. तिचे वडील अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायचे. जया उषाला अभ्यासात मदत करायची.

       दोघींनी अकरावीची म्हणजेच मॅट्रिकची परीक्षा दिली. दोघीनी एकत्रच कॉलेजला जायचे ठरविले. पण दैवाचे फासे कसे पडतील सांगता येत नाही. उषाला एक स्थळ चालून आलं. मुलाला चार-पाच एकर बागायत शेती होती. तो एकुलता एक होता. उषाच्या वडिलांनी विचार केला आपल्याला तीन मुली आहेत पाठोपाठ. त्यामुळे असं सोन्यासारखं चालून आलेले स्थळ नाकारण बरं नाही. एका मुलीच्या कर्तव्यातून मुक्त होण्याची नामी संधी आहे. ती कशाला सोडून द्यायची? त्यांनी उषाचं लग्न करून टाकलं, उषा चारचौघीसारखी संसारात रमून गेली. पतीला मदत करू लागली.

       इकडे जया बी. कॉम् झाली. बँकेत नोकरी करणाऱ्या उत्तमरावांशी ती विवाहबद्ध झाली. उत्तमरावांची नोकरी नॅशनल बँकेत असल्याने तिला बदली होईल तिकडे स्थायिक होणे भाग पडले. सुरुवातीच्या काळात सणावाराच्या, यात्रेच्या निमित्ताने माहेरी आल्यावर दोघींची भेट व्हायची. छान गप्पा रंगायच्या, सुखदुःखाची बोलणी व्हायची. कालांतराने दोघींचेही माहेरी येणे जाणे कमी झाले. दोघीही आपापल्या संसारात रंगून गेल्या. त्यामुळे मैत्रीत कांही काळ अंतर पडले. उषाला दोन मुले. दोघेही ग्रॅज्युएट झाले. एक मुलगा गावातील पतसंस्थेत नोकरी करु लागला. दुसरा मुलगा बी एस्.सी. ॲग्री झाला. त्याला शेतीची आवड असल्याने स्वखुषीने तो वडिलांना शेतीत मदत करू लागला. शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न दुपटीने घेवू लागला. दोन्ही सुना सुस्वभावी मिळाल्या. उषाचा संसार दृष्ट लागण्या सारखा झाला.

       जयाला एक मुलगा व एक मुलगी. दोघेही खूप हुशार होते. मुलगा इंजिनिअर झाला. कंपनीत भरपूर पगाराची नोकरी लागली. कंपनी तर्फे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली, थोड्या कालावधीसाठी गेलेला तो तिथेच रमला. आईवडिलांना न कळवता तिथल्याच मुलीशी विवाहबध्द झाला. त्यांची लेकही इंजिनिअर झाली. जया उत्तमरावांनी तिचा विवाह करून दिला. जावई अमेरिकेत जॉब करत असल्याने तीही पतीबरोबर अमेरिकेला निघून गेली. तिथेच नोकरी करू लागली. अशाप्रकारे दोन पिलं घरट्याबाहेर निघून गेली.

       योगायोगाने उत्तमरावांची बदली उषाच्या गावात झाली. भाजी मंडईत दोघी अचानकपणे एकमेकींसमोर आल्या, आणि त्यांची बालपणीची मैत्री बहरून आली. दोघी वेळात वेळ काढून एकमेकींकडे जायच्या. उषाच्या कुटुंबातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात जया व उत्तमराव सहभागी होऊ लागले. सुट्टीच्या दिवशी शेतात सहभोजन होऊ लागले. घरोबा इतका वाढला की उषाची मुलं-सुना-नातवंडं यांना ही दोघं घरचीच वाटू लागली. या दोघांनाही आपली मुलं आपल्याजवळ नाहीत याचा विसर पडला. दिवस सुखासमाधानात चालले होते.

       दैव जाणिले कुणी? म्हणतात ते अगदी खरे आहे. एके दिवशी बँकेतून परत येत असताना उत्तमरावांच्या स्कूटरला एका ट्रकने ठोकरले, त्यातच त्यांचा अंत झाला. उषाच्या संपूर्ण कुटूंबाने जयाला मानसिक आधार दिला. तिच्या सासर माहेरच्या नातेवाईकांना बोलावून त्यांनीच अंत्यविधी पार पाडला. निवृत्ती जवळ आल्याने उत्तमरावांनी त्याच गावात एक बंगला घेतला होता. पण त्या बंगल्यात जया घायाळ पक्षिणीप्रमाणे राहू  लागली. वडिलांच्या अंत्यविधीला डिलेव्हरी झाल्याने मुलगी येऊ शकली नाही. मुलगा पाच दिवसानंतर आला. आईला अमेरिकेला येणार का असं विचारून तिनं कशाला म्हटल्याबरोबर आपलं कर्तव्य संपल असं समजून निघून गेला. पती निधनानंतर जया मनानं खूप खचली. उषासमोर आनंदी असल्याचं नाटक करायची पण एकांतात खूप रडायची. रात्र तिला खायला उठायची. या प्रचंड मानसिक तणावामुळे व्हायचे तेच झाले. एके दिवशी झोपेतच तिला पॅरालेसिसचा अटॅक आला. शेजाऱ्यांनी उषाला फोन केला. उषाचे कुटुंब धावून आले. तिला दवाखान्यात नेले. उपचार सुरु केले. तिच्या मुलांना फोन केला. पण रजा नसल्याचे सांगून दोघेही आले नाहीत. उत्तमराव एकुलते एक असल्याने सासरचे कोणीच इकडे येऊन तिची सेवा करण्यासारखे नव्हते. जयाचा भाऊही मुंबईत नोकरीला होता. भावजयही नोकरी करणारी त्यामुळे तो दवाखान्यात आला व पाहुण्यासारखा बघून निघून गेला. जयाच्या तब्येतीत किंचीत सुधारणा होऊ लागली.

       पण ती बोलू शकत नव्हती. तिला उठवून बसवावे   लागायचे. भिंतीला तक्क्या लावून त्याच्या आधाराने थोडा वेळ बसू लागली. तिला घास भरवावा लागायचा, तिचे केस विंचरावे लागायचे. कपडे बदलावे लागायचे. उषा पाठच्या बहिणी प्रमाणे अगदी मनापासून तिची सेवा करत होती. जयाला बोलता येत नव्हते पण सर्व काही समजत होते. तिचे डोळे खूप बोलके होते. ती डोळ्यानेच उषाचे आभार मानायची. आपल्या हलणाऱ्या एका हाताने तिच्या तोंडावरून हात फिरवायची.

       तब्बल पंधरा दिवसांनी मुलाला रजा मिळाली तो हॉस्पिटलमध्ये आला. त्याला पाहून जयाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. आईची ही अवस्था बघून पुढं काय करायचं या विचाराने तो पुरता गोंधळून गेला. उषानं त्याला सांगितलं की चार-पाच दिवसांनी तिला डिसचार्ज मिळणार आहे. जयाचे चिरंजीव तिचा हात हातात घेऊन उषाला म्हणाले, "उषाअंटी आईला अशा अवस्थेत अमेरिकेला नेणे शक्य नाही. मी तिची शहरातील कुठल्यातरी चांगल्या वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था करून जातो. अधेमधे तुम्ही तिकडे जाऊन लक्ष द्या. मी ही फोनवर चौकशी करत जाईन "उषा म्हणाली, " जयाची ही मैत्रिण जिवंत असतांना तिला बेवारसाप्रमाणे वृध्दाश्रमात जाऊ देणार नाही " चिरंजीव आनंदाने म्हणाले, "हे ठिक होईल आंटी! मी दरमहा सांभाळण्याचे पैसे पाठवत जाईन. तुमचा खातेनंबर द्या. महिन्याला खात्यावर पैसे जमा होतील" उषा म्हणाली, "तुझ्याकडून पैसे घेऊन माझ्या जिवाभावाच्या बालमैत्रिणीची सेवा करायला आम्हाला कांही भीक नाही लागली. देवानं खूप दिलंय आम्हाला. पती, मुलं, सुना, नातवंडांनी घर भरलंय माझं त्यात माझी मैत्रिण मला जड नाही. सगळी मदत करतात मला. सुना तिला खाऊ घालतात. मुलं बाहुलीप्रमाणे उचलून आंघोळीला नेतात आणतात. तू निर्धास्तपणे जा. मी बघते माझ्या मैत्रिणीचं!"

       उषाने जयाची कुटुंबियांच्या मदतीने मनोभावे सेवा केली. तिला फुलाप्रमाणे जपलं. स्वच्छ ठेवलं. जया हे सर्व डोळे भरून पहायची. खाणाखुणा करून देव तुमचं भलं करो अशी प्रार्थना करायची. आणि मैत्रिण असावी तर तुझ्यासारखी असं इशाऱ्यानं बोलायची. अशा अवस्थेत दोन वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही. एके दिवशी झोपेतच जयाने जगाचा निरोप घातला. उषाला थँक्यू म्हणून ती निघून गेली!


शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख

 

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख 

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मियांसह शीख धर्मियांसाठीही फार महत्त्वाचा मानला जातो. परमोच्च ज्ञानाचे सार सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत देणाऱ्या गुरूनानक यांचा जन्म इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे १५ एप्रिल १४६९ मध्ये सध्या पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या पंजाबच्या तलवंडी येथे झाला. त्यांचे जन्मस्थान 'ननकाना साहिब' या नावाने ओळखले जाते. संत गुरुनानक यांच्या वडिलांचे नांव मेहता काळू तर आईचे नांव तृप्तीदेवी होते. त्यांच्या बहिणीचे नांव नानकी होते. नानक लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते. प्रखर बुद्धिमता असणाऱ्या नानकांनी बालपणीच सांसारिक विषयांकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली होती. ते शाळेत जात असताना, शाळा सुटल्यावर गायी-गुरांना रानात चरावयास घेऊन जात असत. तेथे जाऊन ते देवाचे भजन करत असत. लवकरच त्यांनी शाळा सोडून दिली आणि त्यानंतर त्यांनी आपला सर्व वेळ आध्यात्मिक चिंतन व सत्संगात व्यतीत  केला. ते म्हणत, 'मन हे शेतकरी असून आपले शरीर हे एक सुंदर शेत आहे, तर ईश्वराचे नाम हे या शेतातील बियाणे आहेत. प्रेमानेच ही बियाणे रुजतात, फुलतात. माझ्या शेतातून मी अशा पद्धतीने पीक काढीन की, माझ्या कुटुंबाला भरपूर उत्पन्न मिळेल.' नानक यांचे वडील त्यांना बाजरात भाजी विकायला पाठवायचे. त्यावेळी हिशेब करतांना ते तेरा या संख्येला अडखळायचे. जेंव्हा ते तेरा उच्चारायचे तेंव्हा ते ईश्वराच्या स्मरणात रमून जायचे. कारण हिंदी मध्ये तेरा म्हणजे तुझा. त्यांचे मग तेथे लक्ष नसायचे तर ते ईश्वराकडे असायचे. ते नेहमी ईश्वराला उद्देशून म्हणायचे. 'मै तेरा, मै तेरा'.


प्रेम, भक्तीचे समतादूत: गुरुनानक

भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्यामध्ये समन्वय साधून प्रेम भक्तीला महत्त्व देणारे गुरूनानकजी खऱ्या अर्थाने समतेच्या वारीतील निष्ठावंत वारकरी आहेत. पंजाबातील शिखानांच नव्हे तर साऱ्या भारताला भक्ती प्रेमाद्वारे समतेचा संदेश देण्याचे काम गुरूनानकजी यांनी केले. संत कबीर यांच्याप्रमाणे अंधश्रद्धा, पाखंडीपणा, धार्मिक खेळांचा बुरखा फाडण्याचे काम गुरूनानकजीनी केला.


गुरूनानक यांचा उपदेश:

गुरूनानकजी त्यांच्या प्रवचनांमध्ये जातीवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्त्याच्या मार्गावर चालणे आणि सर्वांचा आदर सन्मान करणे आदि उपदेश द्यायचे. त्यांनी स्वतःला भक्ती योगाला वाहून घेतले होते. भक्तीयोग म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा योग होय.  गुरूगोविंदसिंग कर्मयोगी होते. कर्म करणे म्हणजेच मुक्तीचा मार्ग असे ते मानत तर नानकजी भक्तीयोगी होते. बाह्य घडामोडींमध्ये अडकून ईश्वराला विसरू नका, अंतर्मुख होऊन ईश्वराचे नामस्मरण करण्याचा संदेश देऊन त्यांनी लोकांना याकरिता प्रवृत्त केले. त्यांनी पंधराव्या शतकांमध्ये लंगर परंपरेला सुरुवात केली. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, तेथे जमिनीवर बसूनच भोजन केले. जातपात, उच्च नीच आणि अंधविश्वास संपविण्याच्या हेतूनेच त्यांनी ही लंगर परंपरा सुरु केली. लंगरमध्ये सर्वजण एकत्र बसून जेवण करू शकतात. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा शीख धर्मातील तिसरे गुरू अमरदास यांनी पुढे चालू ठेवली व ती आत्तापर्यंत कायम आहे. देशभरातील कोणत्याही गुरूद्वारामध्ये एखादा सण साजरा करण्यासाठी लंगरचे आयोजन केले जाते. लंगरशिवाय कोणताही सण संपन्न होत नाही. लंगरमध्ये विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र येतात. जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे शीखधर्मिय राहतात तेथे लंगरची प्रथा चालू आहे. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जगातील सर्वात मोठ्या लंगरचे आयोजन केले जाते. मंदिरात श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही.


गुरूनानक यांचे साहित्यिक तत्त्वज्ञान:

नानकांच्या मते ईश्वर कृपा झाल्यानंतर कदाचित तत्वज्ञानाचे दार्शनिक भांडार साधकासमोर प्रकट होईल, पण गुरूकृपेनेचते अनुभवाच्या पातळीपर्यंत पोहोचेल म्हणून ते नानकवाणीमध्ये एके ठिकाणी म्हणतात...

'आपे जाने आपे देई, आखहि 

सि भी केइ-केइ.

जिसनो बसते सिफती सलाह

नानक पतीसाही'


       भारतीय तत्व दर्शनात ईश चैतन्याचे जे एकरुपत्व आढळते ते नानकांच्या साहित्यातही भेटते. ईश्वर एक ओ, तो ओंकार स्वरूप आहे. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाची तो मूळ उर्जा आहे. त्यांचे कुणाशी शत्रुत्व नाही आणि मित्रत्व नाही, कारण तो कालातीत आहे म्हणून शिष्यांना मूलमंत्र देतांना नानक म्हणत......

ओंकार, सतिनामु, करता पुरस्खु निरभै, निरवैस, अकालि मुरति

अरजुनि सैभं गुरू प्रसादि ।


इस्लामी शक्तीच्या राजकीय वरवंट्याखाली रगडल्या गेलेल्या, विखुरलेल्या भारतीय समाजास एकत्र करून त्याला सत्नाम, सत्धर्म, सत्जीवन यांना नवी दिशा देण्याचे, त्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य गुरूनानकजींनी केले. त्यांच्या वाणीत एक अद्भूत प्रेरणाशक्ती होती. आपल्या जीवनातील घटनांची कर्मसुसंगत चिकीत्सा मांडतांना ते एके ठिकाणी म्हणतात....

'करमी वे कपडा, नदरीमोखु दुआरू।

नानक एवै जानिए , सभी आपे सचिआरू ।।


       आपण आपल्या जीवनात ज्याप्रमाणे प्रसंगानुरूप आपली वेशभूषा बदलत असतो, त्याचप्रमाणे कर्मास अनुसरून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात. या बदलातील अनुकूलता आणि प्रतिकूलता प्रेमयुक्त समर्पणाने आपल्याला सुखीच करते.


गुरुनानक यांचे कार्य: 

शीख धर्मात दहा गुरू असून, गुरुनानक हे संस्थापक गुरु मानले जातात. सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माविषयी जागृती करणाऱ्या, शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांनी जीवनभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. भारतातच नव्हे तर इराकमधील बगदाद, सौदी अरेबियातील मक्का मदिनासह अनेक अरब देशात भ्रमण केले. त्यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ त्यांच्या चिंतनात होते. एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या क्रांतिकारक विचारांच्या गुरुनानक यांनी 'ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे म्हणून प्रत्येकाशीआपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे' हा महत्त्वाचा संदेश दिला. ते केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा असून त्यांनी आपल्याला त्यांच्या मूल्यातून जीवनाचे महत्त्व शिकविले. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासावर आधारित आर्थिक व्यवस्था दिली. समाजात समानता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली.


आज गुरूनानक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पायी अनंत दंडवत ।।