रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ मार्च, २०२६

बैतुलमाल : दान वितरणाचे सामाजिकरण

बैतुलमाल : दान वितरणाचे सामाजिकरण



         'बैतुलमाल' म्हणजे इस्लामी शासन पध्दतीतले कोषागार. 'बैतुलमाल' या यंत्रणेचा आणि शब्दांचा वापर सर्वप्रथम इस्लामचे दुसरे खलीफा हजरत उमर रजिअल्लाह यांच्या शासनकाळात झाला. हजरत उमर यांच्या आधी सरकारी खजिना किंवा राजकोष जरूर होता. मात्र त्याचे आधुनिकीकरण आणि व्यवस्थापन हजरत उमर यांनी केले. त्यांनी कोषागाराला राजकर्त्यांच्या तावडीतून मुक्त केले आणि खजिनदाराला खलिफा आणि खलिफाला जनसामान्य सल्लागार समितीसमोर उत्तरदायी ठरविले.


       बैतुलमालमध्ये सर्व प्रकारचे कर, दंड, शेतसारा, मांडलिककर कफ्फारा म्हणजे उपासनेदरम्यान झालेल्या चुकांबद्दलचे प्रायश्चित, दान, फिदिया म्हणजे कैद्याला सोडविण्यासाठी दिले जाणारे द्रव्य, सदका, फित्रा इत्यादि रक्कमा या बैतुलमालमध्ये गोळा करण्यात येत असत व प्रत्येक जमा-खर्चाची वर्ग विभागणी त्या त्या खात्यामध्ये वेगळी करण्यात येत असे. एका अनुमानानुसार भारतीय मुस्लिम समाज वर्षभरात किमान पन्नास हजार कोटी रूपयांचा बटवडा जकात नावाखाली गोरगरिबांमध्ये करीत असतो. बैतुलमाल एक नियोजित धर्मादाय संस्था असल्यामुळे वेतन देऊन नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रत्येक लाभार्थींची सविस्तर माहिती मिळविता येते. आणि हे दान गरजू लोकांपर्यंत पोहचू शकते. येथे बैतुलमाल म्हणजे खाजगीरित्या चालवली जाणारी एक संस्था होय. ही संस्था धर्मादाय आयुक्ताकडून मान्यताप्राप्त असते. किंवा धर्मादाय आयुक्तांकडे त्याची नोंद असते.


         भारतात आज प्रत्येक शहरात असे 'बैतुलमाल' सुरू करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा फायदा जकात देणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाही मिळतो. येथे रक्कम जमा केल्याची रीतसर पावती मिळते. अशा संस्थांची ऑडिटरमार्फत हिशोब तपासणी होते आणि आयुक्तांकडे त्याची नोंद असल्याकारणाने अशा संस्थांना प्राप्तीकर खात्याकडून ८० जी चा दाखला दिला जातो. पावतीवर असलेली सदर रक्कम प्राप्ती करामधून वजा केली जाते आणि कर भरतेवेळी कर दात्याला तेवढी सूट दिली जाते.


        आपल्या नातेवाईकांना विशेष मदत करायची असेल तर त्यांची यादी आणि दिली जात असलेल्या रकमेची यादी या संस्थेला दिली तर त्याचीही अंमलबजावणी होऊ शकते. आता तुमच्या लक्षात आले असेलच की बैतुलमाल म्हणजे काय ? आता एक दृष्टीक्षेप टाकू इस्लामी अर्थव्यवस्थेवर कुठल्याही व्यक्तीला, समाजाला अथवा देशाला आपले अस्तित्व टिकविण्याकरिता आर्थिकदृष्टया मजबूत राहणे आवश्यक असते. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की आर्थिकदृष्ट्या सुबत्ता नसलेले राष्ट्र संपुष्टात आले आणि त्यांचे नागरिक कुठल्याही परकीय राष्ट्राच्या अधिपत्याखाली आले. सामाजिक शक्तीपेक्षा जास्त आर्थिक सुबत्तेला महत्व आहे. कारण फौजा आणि हत्यारे दररोज लागणाऱ्या वस्तू नाहीत. त्यांचा भरपूर साठा आणि त्यांना दक्षतापूर्वक सुसज्ज राहणे गरजेचे असते. शेती, खनिज व उद्योग कुठल्याही देशाच्या आर्थिक उन्नतीचे आधारस्तंभ असलेतरी त्या देशाची जनता या उन्नतीला हातभार लावू शकते.


       इस्लामची आर्थिक कवायत याच जनतेच्या वैचारिक परिवर्तनापासून सुरू होते आणि त्यांच्या आर्थिक सुबत्तेवर संपते. एक राजकीय विधान असेही आहे की, ज्या देशाची जनता गरीब त्यांचे सरकार श्रीमंत असते. परंतू सरकार श्रीमंत असलेतरी तेथील जनता मात्र गरीब असते.


        अर्थव्यवस्थेचे इस्लामी धोरण आखताना इस्लामी राज्यकर्त्यांनी आणि विशेषतः पैगंबर साहेबांनी जनतेच्या आर्थिक सुबत्तेवर जास्त भर दिला आहे. जनता सुखी असली तर राष्ट्र सुखी राहणार इस्लामी अर्थव्यवस्थेचे चार मुलभूत आयाम म्हणजे. १) जकात, २) दान-कर, जिजिया-शेतसारा इत्यादी ३) रिबा म्हणजे व्याजापासून मुक्ती, ४) अदल व एहसान म्हणजे उचित वित्तीय वाटप. या सर्व गोष्टी अंमलात आणायच्या आधी पैगंबर साहेबांनी आपल्या सोबत्यांना हलाल आणि हरामच्या दरम्यान एक वैचारिक रेषा आखून दिली आहे. हलाल व विहित कमाई, हलाल, पदार्थ इत्यादींच्या स्वीकृतीमुळे समाजात एक सुखी परिवर्तन घडून आले आणि प्रत्येक घास उचलण्यापूर्वी ते विहित किंवा निषिध्द असल्याच्या चौकशीविना घशाखाली जाऊ न देण्याची एक प्रथाच पडली. ही प्रथा आजही कायम आहे आणि याचे प्रबोधन सातत्याने प्रत्येक प्रवचनातून केले जाते.


         पैगंबर साहेबांच्या आणि त्यानंतरही राज्याला मिळणारा वित्तीय नफा किंवा लढाई जिंकल्यामुळे गनिमाकडून मिळणारे धन व मांडलिक कर ताबडतोब सैन्यामध्ये व नागरिकांमध्ये त्यांनी केलेल्या सेवेच्या अनुषंगाने वाटून टाकण्यात यायचा. त्यामुळे जनता नेहमी सरकारच्या बाजूने असायची आणि त्यांच्या एकात्मतेवर कुणी प्रहार करण्याची हिंमतदेखील करावयाचा नाही अशी होती इस्लामी अर्थव्यवस्था.

रविवार, १५ मार्च, २०२६

माँ बाप राजी, तो खुदा राजी

माँ बाप राजी, तो खुदा राजी


          मनुष्यावर सर्वापेक्षा ज्यादा हक्क त्या एकमेव ईश्वराचा आहे. अल्लाहवर दृढ विश्वास ठेवून त्याची भक्तिभावाने प्रार्थना करणे हे प्रत्येक मनुष्यमात्राचे कर्तव्यकर्म आहे. अल्लाहनंतर मनुष्यावर सर्वापेक्षा जादा हक्क आई-वडिलांचा आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या हक्काबरोबर ठिकठिकाणी आई-वडिलांच्या हक्काचेही विवेचन करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे अल्लाहच्या स्तुतीबरोबर त्याची उपासना करण्याची ताकीद देणेत आली आहे. त्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांच्या सेवेबरोबर त्यांना सतत खूश ठेवण्यासाठी कार्यरत राहण्याची ताकीद आपणा सर्वांना देण्यात आली आहे. यावरून आई-वडिलांचा दर्जा किती मोठा आहे, याची कल्पना येते.


         पवित्र कुरआनच्या 'बनी इस्त्राईल' या अध्यायामध्ये म्हटले आहे की, तुम्ही सर्वांनी एक अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना मुळीच करू नका, आपल्या आई-वडिलांशी चांगली वागणूक ठेवून त्यांच्यापैकी एक अगर दोन्ही वयोवृध्द झाले असतील तर त्यांना रागाने उत्तर न देणे, त्यांच्याशी आदरपूर्वक विनयाने व सौजन्याने बोलणे, मोठ्या रागीट आवाजाचा त्यांना यत्किंचितही त्रास होऊ न देणे, मानसिक त्रास अगर दुःख होऊ न देता अल्लाहच्या नामस्मरणात त्यांना सुखासमाधानात ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आई-वडिलांची सेवा एक सर्वोत्तम उपासना आहे.


          हजरत उमर बिन अम्र रजिल्लाहु यांनी निवेदन केले आहे की, एकदा पैगंबर साहेबांनी आपल्या उपदेशात लोकांना सांगितले की, अल्लाहची मर्जी आई-वडिलांच्या इच्छा-आकांक्षामध्ये आहे. अल्लाहची नाराजी आई वडिलांच्या नाराजीमध्ये आहे. आई-वडिलांच्या हक्काकडे सरळ कानाडोळा करून आपण ईश्वराला केव्हाही प्रसन्न करू शकणार नाही. जो सतत अल्लाहला खूश ठेवतो तोच त्याला प्रसन्न करू शकतो. जे आई-वडिलांची उपेक्षा करतील, त्यांना नाराज करतील अल्लाहही त्यांच्यावर नाराज नि अप्रसन्न होईल. जो आपले कर्तव्यकर्म समजून नियमितपणे आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असतो त्याला जे सात्विक सुख-समाधान नि आनंद मिळतो तो इतर कोणालाही मिळणे शक्य नाही. उपकार कर्त्याबद्दल कृतज्ञता आणि सौजन्यता ठेवणे हा भलेपणाचा एक उत्कृष्ट नमुनाच नव्हे काय? म्हणून आई-वडिलांची सेवा करून आपणही सात्विक सुखाचे धनी होवू या. कारण माँ बाप राजी तो खुदा राजी' असे सत्यवचन आहे.


           हजरत अब्दुल्लाह रजिअल्लाह निवेदन करतात की, एका पैगंबर साहेबांच्या सेवेत उपस्थित होऊन सांगितले की माझी धर्मयुध्दावर येण्याची व हिजरत करण्याची प्रबळ इच्छा आहे. याकरिता मी आनंदाने आपल्या हातावर हात देवून आपले अनुयायित्व स्विकारत आहे. तेव्हा पैगंबर साहेबांनी त्याला विचारले, 'तुझ्या आई-वडिलांपैकी कोणी जिवंत आहे का?" त्याने म्हटले, 'होय आई-वडिल दोघेही अद्याप जिवंत आहेत. त्याबद्दल मी अल्लाहचा शतशः आभारी आहे. 'यावर पैगंबर साहेबांनी म्हटले, 'काय तू खरोखरच आपल्या धर्मयुध्दाबद्दल व हिजरत बद्दल अल्लाहकडून मोबदला मिळविण्याची अपेक्षा करतोस?' त्याने म्हटले, 'होय माझ्या या कामगिरीबद्दल अल्लाहकडून मला मोबदला मिळावा, अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. तेव्हा पैगंबर साहेबांनी म्हटले, 'याबाबतीत मी तुला सोपा पण योग्य सल्ला देत आहे. प्रथम तू घरी जाऊन नियमितपणे आपल्या आई-वडिलांची सेवा करीत रहा. या तुझ्या सेवेने प्रसन्न होऊन अल्लाह तुझ्या ज्या काही इच्छा-आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण करील म्हणून सतत आपल्या आई-वडिलांशी नम्रतेची व सौजन्याची वागणूक ठेवून त्यांना दुःख होईल असे कोणतेही काम करू नकोस. जा आजपासून सेवेला सुरूवात कर.'


         या उदाहरणावरून असे दिसून येते की, आई वडिलांच्या सेवेकडे कानाडोळा करून आपण अल्लाहला केव्हाही प्रसन्न करू शकणार नाही. जो अल्लाहला खूश ठेवतो तोच त्याला प्रसन्न करू शकतो. जे आई वडिलांची उपेक्षा करतील त्यांना नाराज करतील अल्लाहही त्यांच्यावर नाराज नी अप्रसन्न होईल. आई वडिलच तुमच्याकरिता स्वर्ग आहेत आणि तेच तुमच्याकरिता नरकाचा दरवाजा उघडू शकतात.


        आणखी एक 'हदिस पाक' चिंतन मनन करण्यासारखी आहे. हजरत इब्ने अब्बास रजिअल्लाह यांनी कथन केले आहे की, एकदा हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैहिवस्सलमनी आपल्या सर्व अनुयायांना उद्देशून सांगितले आहे जो प्रामाणिक व आज्ञाधारक मनुष्य आपल्या आई वडिलांच्यावर सात्विकपणे, प्रितीयुक्त असा प्रेमपूर्वक दृष्टीक्षेप टाकेल तर त्याला अल्लाहने कबूल केलेल्या एका हज्ज यात्रेच्या पुण्याईइतके पुण्य मिळेल. म्हणून बंधू भगिनींनो या पवित्र रमजान महिन्यापासून आईवडिलांची सेवा सुरू करा. सेवा सुरू असेल तर त्यात वाढ करा व पुण्याचे धनी व्हा !

शनिवार, १४ मार्च, २०२६

इस्लामची अर्थव्यवस्था व दानधर्म जकात

इस्लामची अर्थव्यवस्था व दानधर्म जकात



         रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे जकात देण्याची हे. एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशोब करून देणे गरजेचे आहे. जकात म्हणजे काय ? जकात म्हणजे आपल्या मालाला स्वच्छ करणे. म्हणजेच ठराविक रक्कम दान करणे. दान केल्यामुळे आपला माल स्वच्छ होतो. अरबी भाषेत जक्कू म्हणजे एखाद्या वस्तुला घासून पुसून स्वच्छ करणे, त्यास चमकविणे, जकात न काढल्याने आपला माल साफ होत नाही आणि काही दिवसांनी संपुष्टात येतो. स्नान केल्याने जसे आपले शरीर स्वच्छ व निरोगी बनते त्याप्रमाणे जकात काढल्याने आपला माल, संपत्ती स्वच्छ व निरोगी बनते. नाही तर संपत्तीचे अनेक रोग तिला समाप्त करून टाकतात.


        जकात सहिबे निसाब म्हणजे दारिद्रय रेषेच्या वरची धनाढ्य माणसे देतात.आजपासून तब्बल १४५० वर्षापूर्वी ही दारिद्रय रेषा ठरविण्यात आली आहे. ज्या व्यक्तियाशी ९० ग्रॅम इतके सोने अथवा ६३० ग्रॅम इतकी चांदी किंवा या किमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफ.डी शेअर सर्टिफिकेटस कंपन्यांमध्ये इतर गुंतवणुक लोकांना दिलेले कर्ज आदी रक्कमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालमत्तेचा ४० वा भाग म्हणजे २.५ टक्के वजा करून गोरगरिबामध्ये वाढून टाकावी जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात यावी मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. आई वडील आपल्या मुलामुलींना तसेच मुले आपल्या माता पित्यांना जकात देवू शकत नाहीत. तसेच आजी-आजोबांकडून मुला-मुलींच्या संतानाला देखील जकात दिली जात नाही. दांपत्य एकमेकांना देवू शकत नाहीत. परंतू काही उलेमांच्या मते पत्नी पतीला जकात देवू शकते. कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही. मालावर एक संपूर्ण वर्ष ओलांडल्यानंतरच जकात लागू होते. वर्षाच्या मध्यंतरी खर्च झाला. तर त्यावर जकात नाही. जकात अनिवार्य होण्याइतका माल असला आणि वर्षभर त्यात माल जमा होत राहिला तर संपूर्ण जमा पुंजीवर जकात काढावी लागते. काही विशेष कारणासाठी पैसे काढून ठेवले असतील. परंतू, ते काम वर्षाच्या आत पूर्ण झाले नाही आणि रक्कम तशीच राहिली, अशा रकमेवर जकात आकारावी. कुणी आपल्याकडे एक मोठी रक्कम ठेव म्हणून सांभाळण्याकरीता आणून ठेवली तर मूळ मालकाने त्याची जकात दिली पाहिजे. एलआयसी, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि असा सर्व निधी आणि रकमा ज्यांचे स्वामित्व अथवा मालकी हक्क आपल्याकडे नसतील अशा सर्व रकमांवर जकात लागू होत नाही. व्यवसायाची सर्व अवजारे व हत्यारे, जसे डॉक्टरी मशीन्स, ट्रक, ट्रॅक्टर, वाहने, विमाने आदीवर जकात नाही.


         आता ही जकात घेण्यास पात्र कोण कोण ? याचा उलगडा पवित्र कुरआनमध्ये अत्यंत सोप्या आणि सरळ भाषाशैलीत करण्यात आला आहे. हे दान तर खऱ्या फकीर आणि गोरगरिबांसाठी आहे. आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता आहे. असे तौबा या अध्यायातील साठाव्या श्लोकात म्हटले आहे. जकातची रक्कम घेणेस पात्र असलेले लोक पुढीलप्रमाणे आहेत. असे अल्लाहनी सुचविले आहेत.


          १) फकीर २) अत्यंत गरीब ३)जकात वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पगार ४) ज्यांचे काही कारणास्तव मन राखायचे आहे. ५) गुलाम आणि खोट्या खटल्यामध्ये अटक केलेल्यांच्या सुटकेसाठी ६) कर्जदारांचे ऋण फेडण्यासाठी ७) ईश्वरी मार्गात झटणाऱ्यांच्या मदतीसाठी ८) वाटसरूंच्या सेवेसाठी ही रक्कम कुठे द्यायची ? गरजूंना रास्त आपल्या हाताने द्यायची कि कुणामार्फत पाठवायची, मनिऑर्डरने पाठवायची की बँकेव्दारा द्यायची. देण्याची अनेक मार्ग आहेत. त्यापैकी कुठलाही मार्ग स्विकारावा.


        आयकर आणि जकात या दोन भिन्न गोष्टी आहेत. जकात दिल्याने आयकर माफ होणार होणार नाही. जकात एक धार्मिक उपासना आहे ज्यांचा संबंध भुकेलेल्यांच्या पोटाशी आणि दारिद्रय रेषेच्या खाली जगणाऱ्या माणसांच्या दैनंदिन गरजांशी आहे. आयकर देशाची सुरक्षा आणि उन्नतीच्या कामासाठी वापरला जातो. आयकरच्या ८०-जी क्रमांकातर्गत दिल्या जाणाऱ्या जकातला आयकरमधून सूट देण्यात येते. त्याकरिता मात्र जकात दिल्याची पावती जमा करावी लागते. पैगंबर हजरत मुहम्मद अलेअल्लाहू अलैहिवस्सलम यांच्या निधनानंतर काही लोकांनी जकात देण्यास नकार दिला. पहिले खलीफा अबूवक्र सिद्दीक रजिल्लाह यांनी त्यांच्याविरूध्द जिहाद पुकारले आणि त्यांना जकात देण्यास भाग पाडले. या युध्दात १० हजार मुर्तद मारले गेले आणि सहाशे मुस्लिम बांधव धारातीर्थी पडले. यावरून आपणास कल्पना येईल की इस्लामी शरीअतमध्ये जाकतचे किती महत्व आहे.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

शुभवार्ता देणाऱ्या रजनी-शबै कद्र

 शुभवार्ता देणाऱ्या रजनी-शबै कद्र


          अल्लाहने मानवी समाजाला रमजानच्या महिन्या एक पवित्र अशी रात्र दिली आहे की, ज्या रात्री केलेल्या प्रार्थना आणि उपासना एक हजार महिन्यापेक्षा जास्त पुण्य मिळवून देणाऱ्या आहेत. या पवित्र रात्रीचा उल्लेख पवित्र कुरआन शरीफच्या तिसाव्या खंडात सूरह म्हणजे अध्याय अलकद्र मध्ये आहे. ज्यात म्हटले गेले आहे की 'वमा अद्राका मा लैलतुल कद्र, लैलतुल कद्री खैरूम्मिन अल्फिशहर' याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला काय माहित की लैलतुल कद्र काय आहे? लैलतुल कद्र हजार महिन्यापेक्षा श्रेष्ठ रात्र आहे. म्हणजे ही रात्र आणि त्यात शांतपणे जागरण करून केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना, नमाज, दुआ, जप म्हणजेच जिक्र, कुरआन पठण आणि याच प्रकारच्या सर्व उपासनांचा मोबदला हजार पटीने जास्त दिला जातो. त्याचप्रमाणे दुष्कर्माचा गुन्हादेखील हजार पटीने जास्त दिला जातो.


पवित्र कुरआनमध्ये तीन ठिकाणी तीन शुभ रजनींचा उल्लेख करण्यात आला आहे.


१) पहिली रात्र शबे मेअराज होय. ही प्रेषित साहेबांच्या उर्ध्वगमनाची रात्र.


२) दुसरी पवित्र रात्र शबेबरात - ही रात्र मोक्ष वा निर्वाण अथवा सुटका करून घेण्याची रात्र.


३) तिसरी रात्र शबे कद्र होय - ही प्रतिष्ठा आणि मान मरातब राखणारी रात्र होय.


        शबे मेअराजचा उल्लेख पवित्र कुरआनमध्ये असा आहे. 'पवित्र आहे तो जो घेऊन गेला एका रात्री आपल्या भक्ताला मस्जिदे हरम म्हणजेच काबा मस्जिद पासून दूरच्या त्या मशिदीपर्यंत जिच्या वातावरणाला त्याने समृध्दी दिली आहे. जेणेकरून त्याला आपल्या काही संकेतांचे निरीक्षण घडवावे. वास्तविक तोच आहे. सर्वकाही ऐकणारा व पहाणारा असे बनी इस्त्राईल या अध्यायात सतराव्या खंडातील पहिल्या श्लोकात म्हटले आहे.


        शबेबारात या दुसऱ्या पवित्र रात्रीचा उल्लेख आहे. "हामीम शपथ आहे या उज्वल ग्रंथाची की, आम्ही याला एका अत्यंत कल्याणकारी व समृध्दशाली रात्रीत अवतरला आहे. कारण आम्ही लोकांना सावध करण्याचा इरादा बाळगत होतो. ही ती रात्र आहे जिच्यात प्रत्येक मामल्याचा विवेकपूर्ण निर्णय आमच्या आज्ञेने सादर केला जातो. सर्व भाष्यकारांचे यावर एकमत आहे की, अदुखान या अध्यायात ज्या पवित्र रात्रीचा उल्लेख आहे तीच ही 'लैलतुल बरात' म्हणजे शाबानं' महिन्यातील पंधरावी रात्र. या आयतीवरून असे कळते की सर्वोच्च अल्लाहच्या राज्यव्यवस्थेत ही एक अशी रात्र आहे, जीत तो व्यक्ती, राष्ट्रे आणि देशांच्या भाग्याचा फैसला करून आपल्या फरिश्त्यांच्या स्वाधीन करतो. मग ते याच फैसल्यानुसार अंमलबजावणी करीत असतात.


         शबे मेअराज, शबेबरात आणि शबे कद्रच्या संदर्भात बरेच काही लिहिण्या वाचण्यासारखे आहे. परंतू एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, पृथ्वीच्या ज्याभूभागावर पवित्र कुरआनचे आगमन झाले ते अरबस्तान होय. हे मात्र आश्चर्य जनक आहे की एकाही अरब राष्ट्रात शबे मेअराज आणि शबेबरात साजरी करण्यात येत नाही किंवा साजरी होताना कुणी पाहिले नाही.


        शबे कद्र मात्र अरब राष्ट्रात आणि संपूर्ण मुस्लिम जगतात मोठ्या इतमामाने साजरी करण्यात येते. शबे कद्र साजरी करतात म्हणजे काय करतात? रात्रभर घराघरातून किंवा मशिदीतून लोक जागरण करतात. नफ्लच्या जादा नमाजचे पठण होते. कुरआन पठण करतात. ईश्वरचरणी आपल्या व आपापल्या नातेवाईकांसाठी दुआ मागतात. देश आणि देशवासीयांच्या कल्याणाकरिता प्रगती आणि उन्नतीकरिता शांतता आणि एकात्मतेकरिता दुआ मागतात. अल्लाह आपल्या दासांवर अत्यंत दयाळू, कृपाळू आणि मेहरबान आहे.


          शबे कद्रच्या रात्री रात्रभर नमाज पठण, कुरआन पठण व नामस्मरणाच्या कार्यक्रम फार कसरतीने होत असतात. रमजानचे शेवटचे दहा दिवस क्षमायाचनेचे आहेत. तुम्ही केलेल्या गुन्ह्यांची माफी या दिवशी केली जाते. क्षमायाचना मंजूर केली जाते आणि सद्भावना, सद्बुध्दी, भक्तीभाव अल्लाहचरणी अर्पित केला जातो. अशावेळी प्रफुल्लीत झालेल्या अल्लाहकडून माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या या शेवटच्या पाच रात्री आहेत. महिनाभर उपवास करून शूचिर्भूत झालेले मन आणि रात्री उठून अल्लाहच्या दरबारी नतमस्तक झालेले शरीर अल्लाहला फारच आवडत असावे म्हणूनच त्याने मानवाला अशी शुभवार्ता देणारी शबेकद्रची रजनी प्राप्त करून दिली असावी. अल्लाहकडे दीर्घ प्रार्थनेला, उपासनेला महत्व नसून तुमच्या हेतूला आणि इराद्याला जास्त महत्व आहे. म्हणून बांधवांनो या रात्री उपासना पूर्ण भक्तिभावाने करून पुण्याचे भागीदार व्हा !

गुरुवार, १२ मार्च, २०२६

पवित्र कुरआनचे अवतरण

 पवित्र कुरआनचे अवतरण



          हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैवस्सलम यांचे अनेक सोबती होते.  ज्यांना काही लिहिता वाचता येत नव्हते. स्वतः पैगंबर साहेबांनाही लिहिता वाचता येत नव्हते; परंतू अल्लाहने त्यांच्या हृदयाला संपूर्ण जगाच्या ज्ञानाने संपन्न केले होते. अरब बांधवांचे दुसरे वैशिष्ट्ये असे की, त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती. पैगंबर साहेबांचे अनेक सोबती असे होते जे एकदा ऐकलेले वाक्य अथवा संवाद त्यांच्या जुजबी बाबींसह स्मरणात रहायचे. अनेकांना संपूर्ण कुरआन मुखोद्गत होते. पैगंबर साहेबांवर तेवीस वर्षाच्या कालखंडात संपूर्ण कुरआन अवतरित झाले. ईशदूत हजरत जिब्रईल जेव्हा कुरआनचे श्लोक पैगंबर साहेबांना सांगायचे, त्याचक्षणी पैगंबरसाहेब ते श्लोक पाठ करायचे आणि लगेचच आपल्या लेखनिकाला बोलावून ते लिहून काढायचे. सुरूवातीच्या काळात आयत म्हणजे श्लोक स्मरणात ठेवण्याकरिता खूप प्रयत्नशिल असायचे आणि या प्रक्रियेचा त्यांच्यावर खूप ताण पडायचा नंतर अल्लाहनी त्यांना आदेश दिले की या आयतीना लक्षात ठेवण्याकरिता आपण फार तसदी घेऊ नका, त्या विस्मरणात जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ आणि पुढे तसेच घडले.


            रमजानच्या पवित्र महिन्यात हजरत जिब्रईल पैगंबर साहेबांच्यासमोर उपस्थित व्हायचे आणि त्यांच्याकडून संपूर्ण कुरआन ऐकून घ्यायचे. एके वर्षी ते पैगंबर साहेबांना म्हणाले, "यावर्षी मी तुमच्याकडून दोनदा कुरआन ऐकून घेणार आहे." पैगंबर साहेबांना हे समजायला उशीर लागला नाही की कदाचित् हा माझा अंतिम रमजान असावा. हजरत जिब्रईलकडून निवेदन मिळताच त्यांनी मोठ्या स्वरूपात आपल्या साथीदारांना उपस्थित राहून ऐकविण्याचे आदेश दिले. सोबत्यांच्या या समोरासमोर पठणाला 'अर्जा:' सादर करणे असे म्हणतात. पैगंबर साहेबांच्या जीवनकाळापर्यंत कुरआनचे संपादन झालेले असले तरी त्याचे संकलन झालेले नव्हते. म्हणजे एका ग्रंथाच्या रूपात त्याचे अस्तित्व नसून लोकांच्या स्मरणात किंवा लहान-मोठ्या प्रमाणात चर्मपत्रे, कातडे, लाकूड, वस्त्र, धातू, शिला, मातीच्या विटा अथवा झाडांच्या सालीवर कुरआन लिहिलेले होते. परंतू, कुरआनच्या संरक्षणाचा आणि जतन करण्याचा अधिक भार संपूर्ण कुरआन तोंडपाठ असलेल्या हाफिज मंडळीवरच होता. हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैवस्सलम यांच्या निधनानंतर 'मुसैलमा कज्जाब' नावाच्या एका तोतया प्रेषिताने संपूर्ण अरबस्तानात हाहाकार माजवला. त्याने मदिनेच्या उत्तरेस यमामा येथे प्रचंड शक्ती गोळा केली आणि इस्लाम व इस्लामी राष्ट्राच्या विरोधात बंड पुकारले. त्याचा नायनाट करणे जरूरीचे होते. पहिले खलिफा हजरत अबुबक्र यांनी एक सशक्त सेना त्याच्या दिशेने पाठवली. घणाघाती युध्द झाले. तोतया प्रेषित मारला गेला. त्यात कुरआन तोंडपाठ केलेल्या 'हाफिज' लोकांची संख्या खूपच कमी झाली. या युध्दानंतर पवित्र कुरआनच्या संरक्षणाचा, त्याला अखंड राखण्याचा प्रश्न उपस्थित झाला.


       हजरत उमर एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले पैगंबर सोबती होते. त्यांच्यासंदर्भात एकदा स्वतः पैगंबर साहेब म्हणाले होते, "माझ्यानंतर कोणी प्रेषित झाले असते तर ते उमर झाले असते !" यावरून आपण कल्पना करू शकतो की उमर रजिअल्लाह किती विद्वान व दूरदर्शी होते. या युध्दतील नरसंहारामुळे त्यांची झालेली व्याकुळता अवाजवी नव्हती. कारण त्यामागे प्रश्न होता. पवित्र कुरआनच्या संरक्षणाचा उमर रजिअल्ला हजरत अबूबक्रना भेटले आणि त्यांना म्हणाले, "कुरआनचे संकलन करून त्याला एका ग्रंथाचे रूप द्यायला हवे. "अबूबक्र रजिल्लाह यांचे पैगंबर साहेबांवर अफाट प्रेम होते. ते भावनात्मक होऊन म्हणाले, "जे काम पैगंबर साहेबांनी केले नाही ते काम मी कसे करणार? पैगंबर साहेबांनी आपल्या आयुष्यात संपूर्ण कुरआन लिहून घेण्याचे आदेश कधीच दिले नाहीत." परंतू हजरत उमरनी आग्रह सोडला नाही.


         शेवटी अबूबक्र रजिल्लाह म्हणाले, "ठीक आहे. यावर आपण एक पंच नेमू. तो देईल तो निर्णय आपण मान्य करू या. दोघांनी हजरत जैद बिन साबित रजिअल्लाह यांना हकम म्हणजे पंच. नेमले. हजरत जैद बिन साबित यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'कात्तिबे वह्यी' अर्थात पैगंबर साहेबांचे कुरआनचे लेखनिक होते. कुरआनच्या आयतींचे अवतरण होताच पैगंबर साहेब त्यांना त्या आयती लिहून घेण्याचे आदेश देत असत. ते स्वतः कुरआनचे हाफिजी होते. हे ऐकताच हजरत जैद रजिअल्लाह म्हणाले, "जे कार्य पैगंबर साहेबांनी केले नाही ते आपण कसे करू?" परंतू हजरत उमर म्हणाले, "ओ जैद ! जर आपण संपूर्ण कुरआन अक्षरबध्द केले तर त्यात काय हरकत आहे?" जैद म्हणाले, "काहीच हरकत नाही." त्याचक्षणी पवित्र कुरआनच्या संकलनाचे काम सुरू झाले.

बुधवार, ११ मार्च, २०२६

पवित्र कुरआन : सर्व मानवजातीसाठीचा ग्रंथ

 पवित्र कुरआन : सर्व मानवजातीसाठीचा ग्रंथ


        रमजानच्या पवित्र महिन्यात कुरआनचे अवतरण झाले हे सर्वांनाच माहित आहे. पवित्र कुरआन हा एकमेव असा ग्रंथ आहे, ज्याच्या वाचकांची, अभ्यासकांची, अध्यन करणाऱ्यांची, पठण करणाऱ्यांची आणि विशेषतः मुखोद्गत करणाऱ्यांची संख्या जगभर मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक मशिदीमधून प्रत्येक नमाजमध्ये कुरआनचे पठण केले जाते. पहाटेच्यावेळी घराघरातून कुरआनचे पठण केले जाते. काही कुटूंबातून आई-वडिलांच्यासोबत लहान मुलेदेखील कुरआनचे पठण करतात. त्यांना यावेळी कुरआन पठणाची पध्दत, नियम, कायदे, उच्चारण, शिष्टाचार इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक मशिदीतून कुरआन पठण शिकविण्याचे वर्ग दररोज भरविले जातात. कुरआनची मूळ भाषा अरेबिक असल्याकारणाने त्याच्या उच्चारणावर विशेष भर देण्यात येतो. काही विशेष वर्गातून त्याचा अर्थ व भाषादेखील शिकविण्याची व्यवस्था केली जाते.


       पवित्र कुरआन एक आकाशी ग्रंथ आहे आणि दिव्यबोधामार्फत प्रेषित हजरत मुहम्मद सलेअल्लाहु अलैवस्सलम यांच्यावर अवतरित करण्यात आला आहे. कुरआन ईश्वरवाणी आहे. त्याला कुणी माणसाने ग्रंथित केले नसून खुद्द प्रेषित साहेबांनीदेखील लिहिले नाही. पवित्र कुरआनमधील शब्द न शब्द अल्लाहकडून आदेशात्मक स्वरूपात उतरला आहे. स्वतः कुरआन आपल्याबद्दल साक्ष देतो की, 'कुरआन ईशवाणी व मार्गदर्शन असल्याबद्दल यत्किंचीतही शंका नाही' असे दुसऱ्या खंडातील अलबकरा अध्यायात पाचव्या श्लोकात म्हटले आहे. कुरआन, अल्लाहकडून आलेला प्रकाश व सत्यदर्शी ग्रंथ आहे. त्याद्वारे लोकांना शांतता व सुरक्षिततेच्या पध्दती दाखविल्या जातात व त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेले जाते. पवित्र कुरआन एक समृध्दशाली ग्रंथ आहे.


       कुरआन ईशवाणी आहे. या संदर्भात कुरआनमध्ये अनेक संकेत व अवाहने देण्यात आली आहेत. 'कुरआन एका प्रतिष्ठीत प्रेषिकामार्फत सांगितलेला आहे. हे कोणत्या कवीचे काव्य नाही की, कुणा भविष्यकाराची वाणी नाही असे अलहाक्का अध्यायातील ४० ते ४३ व्या श्लोकात म्हटले आहे. पुढे एक आवाहन देण्यात येत आहे की, 'कुरआन ईशग्रंथ आहे किंवा नाही यात जर शंका वाटत असेल तर त्याच्या समान एकच अध्याय रचून आणा.'अशा आवाहनांना चौदाशे वर्षाचा इतिहास आहे. रमजानच्या महिन्यात लोक कुरआनचे पठण करतात. त्या पठणाच्या स्वराने परिसर दुमदुमून जातो. तरावीहच्या नमाजमध्ये महिनाभरात संपूर्ण पठण करण्यात येते. कुरआनचा वर्षदिन साजरा करण्याची ही विधायक रीत होय.


        पवित्र कुरआन अल्लाहकडून या पृथ्वीतलावर अवतरित होणारा अंतिम ग्रंथ असल्याकारणाने त्याची परिपूर्णता आणि उदारता विलक्षण आहे. तो सर्व मानवजातीला उद्देशून आदेश देतो, तर्क करवितो, बोलावितो, आकर्षित करतो. त्यांच्या कल्याणासाठीचे गुण शिकवितो आणि संदेश देतो. पवित्र कुरआनचे प्रबोधन सर्व मानवजातीसाठी असल्याची घोषणा वारंवार करण्यात आली आहे. 'कुरआन मानवांना पुरेपूर मार्गदर्शन करणारा, सत्य व असत्य वेगवेगळे करून दाखवणारा ग्रंथ आहे' असे अल्बकरा या अध्यायात १८५ व्या श्लोकात म्हटले आहे. कुरआन लोकांसाठी स्पष्ट व उघड तंबी आहे, तर अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन व उपदेश आहे. असे आलेइम्रान या अध्यायातील एकशे आडतिसाव्या श्लोकात म्हटले आहे. जी माणसे सत्याच्या शोधासाठी आणि मानसिक व आत्मिक शांतीसाठी सतत हैराण होत असतात, पवित्र कुरआन त्यांच्या शोध प्रवासाचे अंतिम चरण आहे व होऊ शकते. त्यांनी केवळ विश्वास ठेवून त्याचे अध्ययन केले पाहिजे. कारण 'पवित्र कुरआनला अल्लाहने उतरविले आहे. अत्यंत कल्याणकारी व समृध्दी प्रदान करणारा ग्रंथ आहे. तसेच पूर्वीच्या ईशग्रंथातील सत्यताही प्रमाणित करणारा ग्रंथ आहे, असे अल्अनआम या अध्यायातील ९२ व्या श्लोकात म्हटले आहे.


       माणसांना अनेक रोगांचा संसर्ग होणे शक्य आहे. शारीरिक रोगांपेक्षा मानसिक, नैतिक आणि आत्मिक आजार अधिक धोकादायक असतात. मनस्थिती, मनःशांती व मनःशक्तीचे पवित्र कुरआन प्रेरणास्थान आहे. 'कुरआन मनाला बळकटी देणारा, सत्यज्ञान प्रदान करणारा आणि श्रध्दावंतांसाठी उपदेश देणारा ग्रंथ आहे' असे हृद या अध्यायातील १२० व्या श्लोकात म्हटले आहे. कुरआन अरबी भाषेत उतरला आहे. त्यात लोकांना वक्र चालीपासून दूर ठेवण्यासाठी व त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी विविध प्रकारे तंबी देण्यात आल्या आहेत.


      पवित्र कुरआनमध्ये एक विलक्षण श्लोक म्हणजेच महावाक्य आहे. त्याचा मराठी अर्थ असा 'ज्याने एखाद्या माणसाला कारण नसताना ठार केले त्याने जणू काही समस्त मानवजातीला ठार केले; आणि ज्याने कोणाला जीवदान दिले, त्याने जणू काही समस्त मानवजातीला जीवन प्रदान केले असे अल्माईदा या अध्यायात बत्तीसाव्या श्लोकात म्हटले आहे.काहीच आयती येथे नमूद केल्या आहेत. संपूर्ण कुरआनमध्ये अनेक ठिकाणी माणसांना आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान शोधून देणारा हा एक वैभवशाली ग्रंथ आहे.

मंगळवार, १० मार्च, २०२६

बहुजन हिताय, बहुजन सुखाय

 बहुजन हिताय, बहुजन सुखाय



           मानवाच्या एकूण शारीरिक हालचाली त्याच्या मानसिक व बौध्दीक आदेशावर अवलंबून असतात. कुणी असे निर्धारच केले की, आयुष्यभर मी हरामकमाईचा एक थेंबसुध्दा माझ्या वा माझ्या मुलांबाळांच्या पोटात जाऊ देणार नाही, तर कसलीही भूक अथवा लालसा त्याला हराम कमाईवर अवलंबून राहण्याकरिता परावृत्त करणार नाही. आता पाहू हराम म्हणजे का ? हराम म्हणजे सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्ता, कायदे व्यवस्था, द्रव्य, शासन, पैसा इत्यादी बाबींना परवानगी नसताना स्वतःच्या अथवा कुटूंबियांच्या वा मित्र परिवाराच्या फायद्याकरिता अथवा कल्याणाकरिता वापरणे होय. साध्यासोप्या भाषेत यालाच चोरी किंवा लाचखोरी म्हटले जाते. इस्लामी शरीअतमध्ये गुन्हाचे स्वरूप व तीव्रता आणि विस्तार बघून हात कापण्यापर्यंतचे प्रावधान आहे. कर्मचाऱ्याच्या या कृत्यामुळे जर देशाची एकता व अखंडतेवर प्रहार होत असेल तर अशा आरोपीला मृत्यूदंड सुनावण्याचे देखील आदेश आहेत. इस्लामी विधीशास्त्राच्या इतिहासामध्ये याची अनेक उदाहरणे आहेत.


        चोरीचा गुन्हा एक सामाजिक अपराध असला तरी वैयक्तिकदृष्ट्या चोरी करणाऱ्या व्यक्तिच्या मानसिकतेवर त्याचा खूप वाईट परिणाम घडत असतो. चोर मानवी समाजात आयुष्यभर आपली मान उंचावून राहू शकत नाही. आयुष्यभर पैसा पैसा करून जमा केलेल्या मालावर चोराने अचानकपणे हात साफ करावा आणि त्या पैशाची अनावश्यक वस्तूवर उधळपट्टी करावी आणि समाजात एक अनैसर्गिक आर्थिक पोकळी निर्माण करावी अशा कृत्याला कुठलाही समाज क्षमा करणार नाही म्हणून ईस्लामी शरीअतने चोराचे हात कापून टाकण्याचे आदेश दिले ० आहेत ही शिक्षा इस्लामच्या उदयकाळापासून म्हणजे यहुदी आणि ख्रिस्ती काळापासून लागू होती. पैगंबर साहेबांनी काही नवे आदेश न देता प्रचलित कायद्यालाच मान्यता दिली होती. मनूस्मृतीमध्ये देखील चोराची याच शिक्षेच्या जवळपासचेच आदेश सुचविण्यात आले आहेत. चोराला किंवा लाचखोराला द्रव्य हरामात मिळाल्यामुळे त्याला पैशाची कदर नसते. आपली हौस किंवा चैनीच्या वस्तू बळकाविण्याकरिता तो बाजारात पैशांचा भडिमार करतो म्हणून महागाई वाढते, चलनाची किंमत कमी होते आणि व्यवहारात पैशांचा फुगवटा जाणवतो. नाणी आणि कागदी चलन अप्रभावित ठरतात म्हणून आपल्या गरजा भागविण्याकरिता चोर आणि लाचखोर आपल्या व्यवसायाचीही किंमत वाढवितात. सर्वात शेवटी देशाच्या आर्थिक आणि नैतिकतेवर याचा परिणाम होतो ती खालावते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाच्या विक्रीच्या किंमतीवर लाच देण्याची टक्केवारीही जोडली जाते म्हणून वस्तूंचे भाव वाढतात. मालाला उठाव राहत नाही. लाचखोर कर्मचाऱ्यांचा देश या नावाने देशाची नामुष्की होते. देशाच्या उन्नती आणि प्रगतीवर याचा पणिणाम होतो. देश एका भयानक संकटात पडलेला बरा की पहिल्याच चोरीच्या वेळी चोराचे हात कापलेले बरे? याचा अर्थ असा नाही की सरकारी यंत्रणेने प्रत्येकाचे हातच छाटत बसावे? आपल्याकडे हा कायदा लागू झाला तर निम्म्या देशाला एका हाताने टाळी वाजवावी लागेल. भुकेलेल्या माणसाने मुठभर चणे चोरले तर त्याचे हात कापावे अशातला भाग मुळीच नाही. खाण्यापिण्याच्या वस्तूमध्येदेखील इस्लामने खूप दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. अल्लाहशिवाय इतर कुणाच्या नावाने आहुती दिलेल्या अन्नाचे अथवा इतर पदार्थांचे सेवन करणे अथवा वापरणे निषिध्द व वर्ज्य आहे. तसेच मद्य व नशा आणणाऱ्या वस्तूंचे सेवन करणे हराम आहे. इस्लामचे दुसरे आदर्श खलिफा हजरत उमर यांनी एकदा एका वृध्द गृहस्थाला भीक मागताना पाहिले. ते ताबडतोब आपल्या स्वारीवरून उतरले आणि म्हणाले, "माझ्या खिलाफतीत कुणी भीक कसा मागत आहे?" चौकशी केल्यावर समजले की, हा एक यहुदी व्यापारी होता. वयाच्या मानाने आता त्याच्या हातून काम होत नाही. त्याच्या मागे-पुढेही कुणी नाही. हजरत उमरनी बैतुलमाल म्हणजेच इस्लामी कोषागारच्या रोखपालाला आदेश दिले की, "या वयोवृध्दाला कोषागारातून वजीफा म्हणजे पेन्शन बहाल करण्यात यावी." एका कल्याणकारी राजाच्या राज्यकर्त्याकडून एका विरोधी समाजाच्या सदस्याला दिली जाणारी जगातील ही पहिली-वहिली पेन्शन होती. विरोधी विरोधी समाज अशाकरिता की या लोकांनी पैगंबर साहेबांना खूप छळले होते. इस्लामने कल्याणकारी राज्याची संकल्पना दिली आहे. यालाच 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' म्हटले जाते. इंग्रजी भाषेत याला 'वेलफेअर स्टेट' म्हटले जाते. आधी सर्वांना सर्व गोष्टी उपलब्ध करून द्या, नंतर कठोर कायदे लागू करा. हे कायदेसुध्दा बहुजनांच्या हिताकरिता आहेत. चंगळवादी प्रवृत्तीवर आळा घालणे बहुजन सुखाकडे पडणारे पहिले पाऊल आहे. आपण या रमजानमध्ये बहुजन सुखाकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ करू या.

सोमवार, ९ मार्च, २०२६

इस्लामचा अर्थ व शिकवण

इस्लामचा अर्थ व शिकवण



       इस्लाम' हा एक स्वतंत्र अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ शांतता प्रस्थापित करणे. अल्लाहवर संपूर्ण विश्वास नि श्रध्दा ठेवणे. अल्लाहला पूज्य आणि सर्व ब्रम्हांडाचा एकमेव स्वामी मानणे. त्याला लीनतेने शरण जाणे, त्याची अनन्यभावे प्रार्थना आणि उपासना करणे. त्याला सर्वस्व अर्पण करून त्याच्या आज्ञेबरहुकूम वागणे, त्याच्या आज्ञेच्या, शिस्तीच्या आणि प्रसन्नतेच्या विरूध्द कोणतेही वाईट काम न करणे.


        'इस्लाम' म्हणजे मनुष्यमात्राचे स्वाभाविक व नैतिक जीवन सुरळीतपणे व्यतीत होणेकरिता, ईश्वराकडून काही उपदेशात्मक सत्याला नि नियमालाच 'इस्लाम' हे नामाभिधान देणेत आले आहे. इस्लाम सत्याचा पुरस्कार आणि असत्याचा प्रतिकार करण्याची आज्ञा देतो. तो प्रत्येकाला सदाचारी, सद्विवेकी नि सज्जन बनण्याचा आदेश देतो. अल्लाहची शिकवण आहे की, नेहमी सत्य बोला ! आपल्या तोंडातून गलिच्छ व ईश्वराला पसंत पडणार नाही असली कोणतीही अमंगळ भाषा काढू नका ! अत्याचाराने पातक जन्माला येते आणि पातकापासून मनुष्यमात्राची अपरिमीत अशी हाणी होते, म्हणून अत्याचाराने आपले हात विटाळू नका ! सर्वांशी न्यायबुध्दीने आणि शांततेते वागा ! कोणालाही उपद्रव करू नका व उपद्रवापासून सर्वांचे रक्षण करा ! सर्वांशी, प्रेमाची, आपुलकीची व बंधुभावाची वर्तणूक ठेवा ! यातच सर्व मानवजातीच्या उत्कर्षाची गुरूकिल्ली आहे.


       जो इस्लामच्या या स्वाभाविक निमहतम् अशा शिकवणुकीनुसार वागणार नाही तो ईश्वराचा सर्वस्वी दोषी ठरेल. त्याच्याकडून ईश्वर आज्ञेचा अपमान होईल आणि त्याचा ईस्लामशी काडीचाही संबंध राहणार नाही. कारण एकेश्वराच्या विशाल व दैदिप्यमान अशा तत्वावरच इस्लाम धर्माची उभारणी झालेली आहे. इस्लामचे जे सच्चे, अनुयायी आहेत अशाप्रकारे मुसलमानाने इतर धर्माच्या संस्थापकांचा व त्यांच्या धर्माचा योग्य प्रकारे आदर व मानसन्मान केला पाहिजे. जो इस्लामच्या आदेशानुसार वागणार नाही त्यांचा अपमान करील, त्यांना तुच्छ लेखील तो इस्लामचा अनुयायी राहणार नाही.


       अल्लाहने आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैवस्सलाम यांच्यावर ज्या ग्रंथाचे अवतरण केले तो ग्रंथ म्हणजे पवित्र कुरआन, प्रेषित साहेबांनी आपल्या आचरणाने, वर्तणुकीने आणि विचारसरणीने या ग्रंथाचे स्पष्टीकरण जगापुढे ठेवले. त्यांचे नाव सुन्नत म्हणजे पवित्र परंपरा आहे. कुरआन आणि सुन्नत या दोहोना मिळून 'इस्लाम' म्हटले आहे. एका आदर्श, परिपूर्ण जीवन पध्दतीचे दुसरे नाव इस्लाम आहे. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलाम यांचा जगावर सर्वश्रेष्ठ उपकार हाच आहे की त्यांनी या ईस्लामी जीवन पध्दतीला योग्य आणि सत्य, श्रध्दाशिलतेने आणि विचारसरणीने आभूषित केले. श्रेष्ठ चारित्र्यशीलता, नितीमुल्ये आणि न्यायधिष्ठित विधीव्यवस्था प्रदान केली. पवित्र संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेने प्रकाशित केले आणि एक अशी आदर्श आणि परिपूर्ण जीवन व्यवस्था जगाला उपलब्ध करून दिली. ज्यात मानवतेची मुक्ती आणि कल्याण आहे.


       प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांच्या शिकवणुकीचा आढावा पुढीलप्रमाणे मनुष्यासमोर हा प्रश्न नेहमीसाठीच उभा ठाकला आहे की, हे विश्व कशासाठी निर्माण केले आहे? काय हे विश्व असेच चालत राहणार आहे की कधीकाळी त्याचा अंत होणार आहे? मनुष्याने आपले जीवन कशाप्रकारे व्यतीत करावे ? मनुष्याचे जीवन-मापन करण्यासाठी निश्चित अशी एखादी जीवनप्रणाली आहे किंवा त्याला अंधारात टाकण्यासाठी जगात सोडून दिले आहे? त्याचा सदाचारांचा आणि दुराचारांचा मोबदला त्याला कधी मिळणार ह्या प्रश्नांच्या अचूक उत्तरानेच मनुष्याने जीवनमापन सत्यमार्गावर चालते.


आदरणीय प्रेषित साहेबांच्या शिकवणीत वरील प्रश्नांची उत्तरे योग्य आणि अचूकपणे सापडतात. ते असे की हे विश्व स्वतःहून अचानक अस्तित्वात आले नाही त्याला अनेकानेक शक्तींनीसुध्दा निर्माण केलेले नाही तर या सृष्टीला एकाच ईश्वराने निर्माण केले आहे. तोच या सृष्टीला नियंत्रित करत आहे. तो एकमेव आहे आणि त्याचा कोणीही भागीदार नाही. अल्लाह मनुष्य जातीचा निर्माणकर्ता आहे, पालनकर्ता आहे व शासनकर्ता आहे.


रविवार, ८ मार्च, २०२६

कअबागृहाची संक्षिप्त माहिती

 कअबागृहाची संक्षिप्त माहिती




        मक्का मुकर्रमा अर्थात आदरणीय मक्का हे शहर सऊदी अरेबियाच्या पश्चिमेकडे हिजाजच्या एका अशा खोऱ्यात वसलेले आहे, ज्याच्या चारही बाजूंना उंच डोंगराने वेढा घातला आहे.। मक्का शहराचा सपाट उतार 'बत्हा' म्हणून ओळखला जातो. समुद्र सपाटीपासून मक्का शहराची उंची ३०० मीटरहून अधिक आहे. या शहरात दाखल होण्याकरिता तीन दिशांनी मअल्लात, मुसिफला आणि शुबैकर असे तीन रस्ते आहेत. मअल्लातचा परिसर हजून या नावानेही प्रसिध्द आहे. हजून एक पहाड आहे आणि जन्नतुल मअल्लाची प्रसिध्द आणि पवित्र दफनभूमी याच डोंगराच्या उतारावर आहे.


        पवित्र कअबागृह या शहराच्या मध्यभागी विद्यमान आहे. ही वास्तू जवळपास घनाकार असून त्याची उंची चौदा मीटर पूर्वेकडील लांबी १५.८४ मीटर, पश्चिमेकडील लांबी १५ मीटर, उत्तरेकडील रूंदी ९.९० मीटर, दक्षिणेकडील रूंदी ११.५२ मीटर इतकी आहे. पवित्र कअबागृहाचा दरवाजा नेहमी बंद असतो आणि काही विशेष प्रसंगीच तो उघडला जातो. हा दरवाजा केव्हा, कधी आणि कुणाकरिता उघडायचा हे संपूर्णपणे शेबा घराण्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. कारण कअबागृहाची किल्ली पैगंबर साहेबांनी मक्केवर विजय प्राप्त केल्यानंतर हिजरी सन आठ म्हणजेच इ. स. ६३१ मध्ये उस्मान बिन तल्हाला सुपूर्द केली होती, जी आजतागायत त्याच घराण्यात आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते घराणे आणि कअबागृहाची किल्ली राखण्याची परंपरा आतमितीला देखील कार्यरत आहे. किल्ली स्वाधीन करण्याच्या कार्याला आज सुमारे साडे चौदाशे वर्षे झाली. मक्केवर राज्य करणारे हजारो राज्यकर्ते आणि बादशहा पृथ्वीतलावर येऊन गेले, लाखो घराणी नामोनिशाण झाली. पैगंबर साहेब आणि त्यांच्या सोबतियांना मदीनेत आश्रय देणारे 'अन्सारी' आणि त्यांचे वंशज संपुष्टात आले परंतू उस्मान बिन तल्हाचा 'शेबी' परिवार आजपर्यंत कायम आहे. त्यांचे वास्तव्य मक्केतच आहे. एकाही राज्यकर्त्याने त्यांच्याकडून ही किल्ली हिसकावून घेण्याचे धाडस केले नाही. उलट त्यांना सर्व सवलती आणि संरक्षण प्रदान करण्याचे काम सरकार करते. परंपरेनुसार हज यात्रेच्या काळात पवित्र कअबागृहावर आतून व बाहेरून गुलाबाच्या अत्तराने गुस्ल म्हणजे स्नान घालण्यात येते. त्यावेळी मोठ्या इतमामाने कअबागृहाचे दार उघडले जाते. त्याप्रसंगी सौदी बादशहा आणि त्यांचे मंत्री व राज्यपाल इत्यादि तेथे समारंभपूर्वक हजर असतात. परंतू, वास्तूच्या दारावर 'शेबी' कुटूंबातील जबाबदार व्यक्तिच्या उपस्थितीत व त्यांच्या मर्जीने कुणाला आत सोडायचे आणि कुणाला आत जाऊ द्यायचे नाही, हे ठरविले जाते. गर्दीला काबूत आणण्याकरिता तेथे प्रचंड बंदोबस्त करण्यात येतो. भेक तास चालू असणारा हा पवित्र सोहळा मनःचक्षुनी पाहण्यासारखा असतो. त्याची क्षणचित्रे व थेट प्रसारण जगभर प्रसिध्द करण्यात येते.


         सूरह अलिइमान मधील सोळाव्या श्लोकात म्हटले आहे की हे पृथ्वीतलावरचे सर्वात पहिले प्रार्थनास्थळ आहे. जे मानवाकरिता बांधण्यात आले. त्याला मांगल्य व समृध्दी दिली गेली होती आणि सर्व जगाकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनविले गेले होते. त्यामध्ये स्पष्ट संकेतचिन्हे आहेत. इब्राहिम' अलैहिस्सलाम यांनी कअबागृहाचे पुननिर्माण केले. त्याआधीही ही वास्तू होती. परंतु, कालांतराने ती लुप्त झाली होती. 


        कअबागृहाच्या आधी ही जागा एक सर्वसाधारण वाळवंटी आणि निर्जल व निर्मनुष्य होती. अधूनमधून उत्तरेकडे जाणारे काफिले येथून प्रवास करायचे. ईश्वरी आदेशावरून प्रेषित ईब्राहिमने जेव्हा आपल्या पत्नी हाजरा आणि तान्ह्या ईस्माईलला येथे सोडले आणि नंतर अल्लाहच्या कृपेने जमजमची विहिर अस्तित्वात आली. तेव्हा तिथे हळूहळू लोकवस्ती झाली. येथे सर्वप्रथम स्थायिक होणारे येमेनचे जुहुम कबिल्याचे लोक होते. नंतर याला एका छोट्याशा शहराचे रूप मिळाले. ज्याची आज इस्लाम धर्माचे एक पवित्र शहर म्हणून जगभर प्रसिध्दी आहे.


       जेव्हा पृथ्वी व आकाशाची निर्मिती होत होती. तेव्हा पाण्याच्या खालून जी भूमी सर्वप्रथम वर आली. त्यावरच कअबागृहाचे स्थान निश्चित करण्यात आले होते आणि नंतर त्याच्या खालून बाकीची जमीन पसरविण्यात आली, अशी हदीसमध्ये नोंद आहे


        कअबागृह नेहमी बंद ठेवण्यात येते आणि त्याच्या भोवतालच्या उघड्या पटांगणात तवाफ करण्यात येतात. इमारतीमध्ये चारही बाजूने कअबागृहाकडे तोंड करून नमाज पठण करण्यात येते. १९९७ मध्ये असे आढळून आले की, कअबागृहाच्या पायात पाणी मुरत आहे आणि छताला आधार देणारे चंदनाचे खांब कुजत आहेत. अभियंत्यांना मुरत असलेल्या पाण्याचा शोध घेण्याकरिता किमान ५०-६० फूट खोल जावे लागले. त्यावेळी कअबागृह दुरूस्तीसाठी चारही बाजूने सील करण्यात आले होते.


       २०१७ साली आम्हा उभयतांना हज यात्रा करण्याचे भाग्य लाभले. कअबागृहाचे नयनरम्य रूप पाहता आले. कअबागृहाच्या पटांगणात तवाफ, नमाज अदा करून उपासना करण्याची संधी अल्लाहकडून आम्हास प्राप्त झाली.


शनिवार, ७ मार्च, २०२६

कअबागृहाचे अंतरंग व किल्लीचे हस्तांतरण

कअबागृहाचे अंतरंग व किल्लीचे हस्तांतरण



       पवित्र कअबागृहातील आतील चटईक्षेत्र अंदाजे २६ बाय ३० फूट इतके आहे. त्याच्या भिंती अंदाजे तीन फूट जाड आहेत. आतील उत्तर पूर्व कोपऱ्यात एक वर्तुळाकार जिना आहे. ज्याभोवती सुबक भिंती उभारून एक लहानशी खोली तयार करण्यात आली आहे आणि त्यावर अस्सल सोन्याच्या चादरीनी मढलेला लाकडी दरवाजा लावण्यात आला आहे. या दरवाजाचे नाव 'बाबुत्तौबा' म्हणजे पश्चातापाचा दरवाजा असे आहे. या दारावर कामदानीचा पडदा, ज्यावर सोन्याच्या तारेने पवित्र कुरआनातील आयती म्हणजे श्लोक लिहिण्यात आल्या आहेत. हा दरवाजा २.३० मीटर उंच व ७० से. मी. रुंद आहे. त्यामधील जिना कअबागृहाच्या वर जाण्याकरिता आहे. छतावरील सफाई, दुरूस्ती आणि वर्षातून एकदा कअबागृहावरील वस्त्र बदलण्याकरिता या जिन्याचा उपयोग करण्यात येतो. छतावर एक छिद्र आहे. ज्याची लांबी, रुंदी १.७ बाय १.४ मीटर इतकी आहे. ज्यावर काचेची झडप आहे. त्याद्वारे सुर्यप्रकाश सतत कअबागृहात वास्तव्य करीत असतो.


        कअबागृहाची जमीन संगमखरी टाईल्सने सुसज्ज आहे. आणि भिंतीवर देखील अत्यंत मजबूत, आकर्षक व रंगीत संगमरवर बसविण्यात आला आहे. ज्यावर सुबक नक्षी कोरण्यात आली आहे. आतील भिंती व छतावर हिरव्या रंगाचे पडदे लावण्यात आले आहेत. ज्यांच्यावर पवित्र कुरआनातील आयती लिहिण्यात आल्या आहेत. या पवित्र गृहाच्या मध्यभागी लांबीच्या दिशेने छताला आधार देण्याकरिता तीन गोलाकार खांब आहेत. पूर्वी हे खांब चंदनाचे होते आणि बहुधा भारतीय चंदनापासून तयार करण्यात आले असावेत कारण चंदनाची झाडे केवळ भारतातच आढळतात. कअबागृहाचा छत लाकडी असून त्यात एक पोटमाळा आहे आणि वरच्या भागावर स्लॅब टाकण्यात आला आहे.


         पवित्र कअबागृहाचे बाहेरील दर्शनी दार लाकडी असून त्यावर सोन्याचे पत्रे चढविण्यात आले आहेत आणि त्यावर पवित्र कुरआनच्या आयती कोरण्यात आल्या आहेत. इ. स. १९७८ च्या आसपास जुने दार बदलून शाह खालिदने नवीन दार लावण्याचे आदेश दिले. ज्यावर एक कोटी ३४ लाख सौदी रियाल इतका खर्च आला. आणि २८० किलो सोन्याची किंमत याच्या व्यतिरिक्त आहे. प्राचीन काळात जेव्हा कअबागृहाची उभारणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर छप्परही नव्हते आणि दारसुध्दा लावण्यात आले नव्हते. या पवित्र वास्तूवर पहिला एकपाटी दरवाजा येमेनचा बादशहा 'असअद तब्बुअ सालिस' याने बसविला. इ. स. ६०६ मध्ये जेव्हा कुरैशने या वास्तूची पुनर्बाधणी केली, तेव्हा जमिनीपासून एक उंच चबुतरा बांधून दाराची उंची वाढविली जेणेकरून या पवित्रगृहात प्रवेश देण्याची मक्तेदारी त्यांच्याचकडे राहिली. तसेच त्यांनी पश्चिमेकडील दारही बंद करून टाकले. याचवेळी दोन पेटी दारही बसविण्यात आले. इसवी सन ६३१ मध्ये पैगंबर साहेबांनी जेव्हा मक्केवर विजय मिळविला. त्यावेळी स्वायत्तता असूनसुध्दा या वास्तूत कुठलेही फेरबदल केले नाहीत. कारण इस्लाममध्ये दाखल होणाऱ्यांच्या भावना त्यांना जास्त प्रिय होत्या. हिजरी सन आठमध्ये पैगंबर साहेबांना मक्केवर भव्य विजय प्राप्त झाला. तेव्हा प्रथमतः पैगंबर साहेबांनी उमराच्या विधी पार पाडल्या आणि सर्वांना कअबागृहाच्या पटांगणात एकत्रित होण्याचे आदेश दिले. हजारोंच्या संख्येने मक्केचे पराभूत झालेले नागरिक, बलाढ्य लढवय्ये आणि पैगंबर साहेबांचे सैनिक जमा झाले. सर्वांच्या देखत कअबागृहाच्या किल्ली राखणाऱ्याला म्हणजेच कलीदरबरदार राखणाऱ्याला बोलाविण्यात आले. याच इसमाने काही वर्षापूर्वी पैगंबर साहेबांसाठी कअबागृह उघडण्याच्या विनंतीला मान दिला नव्हता, परंतू आज तो एका विजेत्याच्या समोर मान खाली घालून उभा होता. पैगंबर साहेबांनी त्या इसमाला म्हणजेच उस्मान बिनतल्हाला आदेशपूर्वक किल्ली देण्याची आज्ञा दिली. पैगंबर साहेबांनी किल्ली घेवून आत पाचारण केले. बाहेर आल्यावर ते उस्मानबिनतल्हांना उद्देशून म्हणाले, 'आज अल्लाहच्या आज्ञेने आम्ही मक्केवर विजय मिळविला. आता किल्ली माझ्या हातात आहे. मी ज्याला पसंत करीन त्याला ही किल्ली देईन. मी ही किल्ली तुला देत आहे आणि अशी घोषणा करतो की ही किल्ली प्रलयापर्यंत तुझ्याच वंशात राहील, जो कुणी तुझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करील, तो मोठा पापी व अत्याचारी मानला जाईल'. त्यावेळी कुरैश हजर होते. पैगंबर साहेबांचे नातेवाईक हजर होते. परंतू, पैगंबर साहेबांनी ती किल्ली उस्मानला प्रदान केली. ती आजतागायत शैबी कुटूंबियांकडे आहे, जे उस्मान बिनतलहा वंशातील आहेत. पैगंबर साहेबांच्या वचनाचा हा चमत्कारच की उस्मान बिन तल्हाचे वंशज मक्केत हयात आहेत. किल्ली त्यांच्याकडेच आहे. त्यांच्या मर्जीविना सौदी बादशहा व मंत्रीसुध्दा पवित्र कअबागृहाच्या आत जावू शकत नाहीत. मौलाना सैयद अबुल हसन नद्वी १९१३ ते १९९९ या कालावधीतील एकमेव भारतीय विश्वविख्यात विद्वान असे आहेत. ज्यांच्या सन्मानात अनेकदा कअबागृह उघडण्यात आले. मुस्लिम जगतात हा सर्वात मोठा सन्मान समजला जातो.

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

दुआ केव्हा, कुणाची स्वीकृत होते ? नियम व शिष्टाचार

दुआ केव्हा, कुणाची स्वीकृत होते ? नियम व शिष्टाचार




          इस्लाम धर्मामध्धे वेळेबद्दल काही संकेत देण्यात आले आहेत. त्या वेळी मागितलेली दुआ त्वरीत स्वीकृत होते अशी मुस्लिम बांधवाची धारणा आहे. प्रत्येक रात्रीच्या सुरूवातीला, मध्यरात्री आणि उत्तररात्री म्हणजे रात्रीच्या अंतिम प्रहरी व पहाटेच्या वेळी. मस्जिदमधून अजान झाल्यावर आणि अकामत म्हणजे नमाजकरीता उभे राहण्याच्या दरम्यान, सज्दा करताना म्हणजे जमिनीवर नाक आणि डोके टेकले असताना, प्रत्येक नमाजनंतर, जेव्हा शत्रूवर हल्ला करण्याकरिता फौजा सज्ज होती, ऐन लढाईच्या दरम्यान, शुक्रवारच्या दिवशी, नऊ जिल्हेज म्हणजे हज्जच्या आदल्या दिवशी, पहाटे जेव्हा कोंबडा बांग देतो किंवा हल्ली गजर होतो, मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला पहावयास चालताना, पाऊस पडतेवेळी, कुरआन पठण झाल्यानंतर, रमजानचा संपूर्ण महिना, ईदुल फित्र (रमजान ईद) आणि इदुलअज्हा (बकरी ईद) , शुक्रवारची रात्री म्हणजे गुरूवार व शुक्रवारची मधली रात्र, कअबागृहावर नजर पडताक्षणी, जमजमचे पाणी पीत असताना ही जमजमची विहीर, क अबागृहाच्या पीरसरात, कअबागृहापासून अवघ्या पंधरा फुटाच्या अंतरावर आहे, तसेच कअबागृहाची प्रदक्षिणा म्हणजे तवाफ करतेवेळी, मुल्तजिम आणि मकामे ईब्राहिमच्या निकट मुल्तजिम हजरेअस्वद (कअबाशरीरफच्या भिंतीत एका कोपऱ्यात रोवलेला काळा दगड) आणि कअबा शरीफच्या दरवाजाच्या मधली अत्यंत पवित्र जागा मुल्तजिम म्हणून ओळखली जाते. तसेच कअबागृहापासून काही फुटाच्या अंतरावर सुरक्षीत करून ठेवण्यात आलेली शीला ज्यावर उभे राहून हजरत ईब्राहिम कअबा गृहाची बांधरी करीत होते ही दोन्ही ठिकाणे दुआच्या स्वीकृतीची उच्च ठिकाणे आहेत, अरफात, मिना आणि मुज्दल्फा या मैदानातील संपूर्ण परिसर दुआच्या स्वीकृतीची उत्तम ठिकाणे आहेत. ज्यांची दुआ कबूल होते त्या व्यक्ती पुढीलप्रमाणे, संकटात सापडलेल्या व्यक्तीची, अत्याचार पिढीताची मग तो गुन्हेगार का असेना किंवा तो अश्रध्दावंत म्हणजे काफिर का असेना, वाटसरूची प्रार्थना, आपल्या संतानाकरीता आई वडिलांनी मागितलेली दुआ, हजयात्रेला गेलेल्या हाजीची दुआ जोपर्यंत तो आपल्या घरी पोचत नाही, रोजा सोडतेवेळी म्हणजे रोजा इफ्तारच्या आधी, दुआ म्हणजे अल्लाहकडे एकचित्त होऊन अत्यंत नम्रपणे आपल्या मागण्या मांडण्याची व सादर करण्याची एक उपासना होय. 


        प्रेषितसाहेब आणि त्यांचे आदर्श खलिफा व सोबतियांच्या जीवन चरित्रावरून दुआ मागण्याचा वारसा सर्व मानवजातीपर्यंत पोहचला आहे. त्याच अनुभवाचे पैलू मांडत आहे, दुआ अल्लाहचरणी स्वीकृतीसाठी सर्वप्रथम खाण्यात-पिण्यात आणि इतर कमाईमध्ये हलाल मालाची व्यवस्था करणे आवश्यक आहे, दुआ मागताना दिखावटीपणा, अवडंबर आणि ढोंगबाजी न करता अत्यंत सच्चा मनापासून व खरा कळवळा राखून ही उपासना करावी आणि असेही ध्यानीमनी असले पाहिजे की अल्लाहशिवाय इतर कुणीही माझ्या या कार्याला पूर्ण करू शकणार नाही., स्वच्छ व पवित्र आणि शुचिर्भूत होऊन म्हणजे वुजू करून बसावे, किब्ल्याकडे म्हणजेच कअबागृहाचे दिशेने तोंड करावे, दोजानू, नमाजमध्ये गुडघे टेकून बसतात तसे बसावे, प्रार्थना सुरू करायच्या आधी अल्लाहची खूप प्रशंसा म्हणजे हम्दो सना करावी., नंतर पैगंबर साहेबांवर दुरूद पढावे, नंतर हातांना खांद्यापर्यंत उचलावे व दोन्ही हात जोडून तळहात पूर्णपणे उघडे करावेत., दुआ मागतेवेळी अत्यंत अजीजीने बसावे दुआच्या दरम्यान आपल्या अजीजीचा उल्लेख करावा. दुआ करतेवेळी आकाशाकडे पाहू नये., अल्लाहची अनेक शुभनामे आहेत जसे गफूर, रहीम, करीम, अल्मुईज्ज, अल-राफेय, अल्बासित इ. यांची एकूण संख्या ९९ आहे. या ईश्वरी नावांच्या आपल्या दुआमध्ये उल्लेख करावा., दुआ मागताना शक्यतो यमकबध्द व काव्यरूपी भाषेचा वापर करू नये. ज्यापुढे आपण हातं पसरविले आहेत तो सर्वज्ञ आणि जगातील तमाम भाषांचा निर्माता आहे. तो तुमच्या शब्दांच्या पलीकडील आशयांचा जाणणारा आहे., दुआ हळुवारपणे म्हणजे खालील स्वरात मागावी. पैगंबर साहेबांनी वापरलेल्या शब्दांचा वापर करावा., दुआ मागताना प्रधानतेचे भान राखावे म्हणजे प्रथम स्वतःकरिता नंतर आपल्या आई-वडिलांकरीता, नंतर आपल्या मुलांबाळांकरिता नंतर निकटवर्ती व नातेवाईकांकरिता व्र जगातील सर्व बांधवाकरिता मागावी., साश्रू नयनांनी दुआ मागावी, पाणावलेले डोळे अल्लाहना पसंत आहेत., दुआ ताबडतोब कबूल व्हावी याकरिता आग्रह धरू नये., आपली दुआ संपल्यावर अमीन म्हणजे अल्लाह माझ्या मागण्या मान्य करोत म्हणावे, दुआचा शेवट दरूद शरीफने करावा, दुआ संपल्यावर आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवावेत. अशाप्रकारे दुआ मागून मागण्या पूर्ण करून घ्याव्यात.

गुरुवार, ५ मार्च, २०२६

तौबा : एक अद्भुत उपासना

तौबा : एक अद्भुत उपासना



        नमाज, रोजा, हज्ज आणि जकातच्या व्यतिरिक्तदेखील अनेक उपासना आहेत. त्यात 'तौबा' या उपासनेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. 'तौबा' या संज्ञेचा शाब्दिक अर्थ होतो पश्चाताप, पस्तावा, अनुपात, उपरती अथवा खेद, सुगम मराठी भाषेत याकरिता परतणे, रूजू होणे किंवा पश्चाताप असे शब्द वापरता येतील.


         आपल्या हातून कुठलेही अवज्ञाकारी कृत्य घडल्यानंतर व्यक्तीला पश्चाताप होणे नैसर्गिक आहे. या पश्चातापाची खरी पूर्ती करावयाची असेल तर अल्लाहच्या चरणी अशी एक प्रतिज्ञा करावी लागते की, माझा हातून जो गुन्हा घडला आहे, त्याची पुनरावृत्ती माझ्या हातून यापुढे कधीही होणार नाही. याकरिता मी अल्लाहसमोर वचनबध्द आहे. मी अल्लाहच्या आज्ञांकडे पुनश्च रूजू होत आहे. माझ्या हातून जे काही घडले, त्याचा मला खूप पश्चाताप आहे. म्हणून आजपासून मी माझ्या अवज्ञाकारी आणि दुष्कर्मी जीवनाच्या दुष्ट चक्रातून अल्लाहच्या आज्ञाधारी जीवनाकडे परत फिरलो आहे. अंत:करणापासून वाममार्गाचा तिरस्कार करणे व सद्मार्गाचा अवलंबन करणे हा तौबाचा मूळ अर्थ आहे. तौबा देखील उपासनेचा एक अत्यंत मौल्यवान प्रकार आहे. अवज्ञाकारी जीवन, पाप, गुन्हा, दुष्टप्रवृत्ती आणि तामसिक जीवन असे घाणेरडेपणाचे अनेक प्रकार आहेत. ज्याप्रकारे घाणीवर आपण स्वच्छ पाणी टाकून जागेला स्वच्छ करतो, त्याचप्रकारे ही घाण जर आपल्या वृत्तीत साचत राहिली तर मने क्रुर व कठीण बनतात. अशा मनावर प्रेमळ उद्‌गारांचा आणि कोमल शब्दांचा परिणाम होत नाही. कुणाची दुर्दशा  त्यांना प्रभावित करू शकत नाही. अशी माणसे पापाला पाप समजत नाहीत ते अल्लाहला भीत नाहीत. म्हणजे एकंदर त्यांच्या सात्विक जीवनात श्रध्दा अवस्थेवरच पूर्णविराम लागतो. यालाच ईमानविरहित जीवन म्हणतात. व्यक्तीच्या जीवनात ही जाणीव सतत जागृत राहिली पाहिजे की इहलोकातील जीवन क्षणभर आहे. खरे जीवन तर परलोकजीवन आहे. जेथे अल्लाह श्रध्दावंतांवर आपल्या सर्व देणग्यांचा वर्षाव करील ज्या देणग्यांचे त्याने पवित्र कुरआनातून आणि प्रेषित साहेबांच्या मुखातून वचन दिले आहे. अल्लाहची प्रसन्नता ही खरी मेजवानी आहे. हे ध्येय साध्य झाले म्हणजे आपल्या जीवनाचे मनोरथ पूर्ण होईल. अल्लाहचा खरा दास किंवा बंदा तो आहे जी पाप घडो अथवा न घडो, अल्लाहचरणी त्याचे प्रायश्चित सदैव सुरू असते. तौबा हा शब्द पवित्र कुरआनात वापरला गेला असून या शीर्षकाचा पवित्र कुरआनमध्ये एक संपूर्ण अध्याय आहे. सदरच्या अध्यायात अनेकेश्वरवाद्यांना चिथावणी, मुदत आणि करारांवर कायम राहण्याची संधी देण्यात आली आहे. अनेकेश्वरवादी श्रध्दावंतांशी करारही करायचे, पण त्याचे पालन करत नसत आणि करारभंग करूनसुध्दा तमाम सवलती घेण्यास तत्पर असत. ते मक्केमधील अल्लाहच्या मस्जिदीचे म्हणजे काबागृहाचे सेवक बनण्याचा आग्रह धरायचे या परिस्थितीत सदर अध्यायात त्यांना उघड उघड तंबी देण्यात आली आहे की, त्यांनी तौबाचा मार्ग पत्करावा म्हणजे अनेकेश्वर तत्वापासून मुक्त व्हावे. एकेश्वर तत्व स्विकारावे. नमाज अदा करावी आणि जकात द्यावी. अल्लाह क्षमा प्रदान करणारा क्षमाशील व दया दाखविणारा आहे.


        पवित्र कुरआनात तौबा पत्करणाऱ्या म्हणजे अवज्ञाकारी जीवनापासून आज्ञाकारी जीवन स्विकारणाऱ्यांकरिता शुभवार्ता देण्यात आली आहे आणि त्यांची शिफारस अशाप्रकारे करण्यात आली आहे. ते जणू एका निष्पाप, नवजात अर्भकासारखे नुकतेच आईच्या गर्भातून जन्मले आहे. खऱ्या मनाने तौबा केल्यास त्यांचे मागचे सर्व पाप नाहीसे करण्यात येईल एकही पाप न करता त्यांनी उर्वरित जीवन व्यतीत केले तर मरणोत्तर त्यांना कसलेही जाब विचारले जाणार नाहीत. त्यांना स्वर्गातील अशा नंदनवनात पाठविले जाईल जेथे यातनांची चाहूलसुध्दा लागणार नाही.


        तौबा स्विकारण्याचे सर्व हक्क अल्लाहकडे आहेत. अल्लाहकडे पश्चाताप स्विकारण्याचा हक्क त्याच लोकांसाठी आहे जे नादानीमुळे एखादे वाईट कृत्य करून बसतात आणि त्यानंतर लगेच पश्चाताप करतात. अशा लोकांवर अल्लाह आपल्या कृपादृष्टीने पुन्हा लक्ष देतो. अल्लाह सर्वज्ञ, विवेकशील व बुध्दीमान आहे. परंतू, पश्चाताप त्या लोकांकरिता नाही जे वाईट कृत्ये करतात. जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची मृत्यू घटका जवळ येवून ठेपते तेव्हा तो म्हणतो की, आता मी पश्चाताप केला आणि याचप्रकारे पश्चाताप त्या लोकांकरिता नाही जे मरेपर्यंत अश्रध्दावंत राहिलेत अशा लोकांकरिता तर दुःखकारक शिक्षा तयार करून ठेवली आहे. असे अन्निसा अध्यायातील १७ व्या व १८ व्या श्लोकात म्हटले आहे.


रमजानचा महिना अनेक वाईट कृत्यांपासून 'तौबा' करण्याची सर्व उपवासधारकांना उत्तम संधी प्रदान करतो. तौबा म्हणजे पापापासून मुक्ती आणि श्रध्दावंतांबरोबर पुनर्वसनाची संधी आहे.

बुधवार, ४ मार्च, २०२६

इस्लाममध्ये नारी-स्थान

 इस्लाममध्ये नारी-स्थान



           इस्लामच्या आगमनापूर्वी अरब राष्ट्रात मुलगी एक तिरस्कृत व्यक्ती होती. इस्लाम धर्माने तीला वारसाहक्क दिला. विवाह सोहळ्यामध्ये तिच्या मान्यतेला प्रथम स्थान दिले. तिच्या उत्तमरित्या पालनपोषण करणाऱ्या पित्याला स्वर्गप्राप्तीचा शुभसंदेश दिला. उत्तम मातृत्व करणाऱ्या मातेच्या पायाखाली स्वर्ग असल्याची माहिती तिच्या संतानाला करून दिली. शारीरिकदृष्ट्या महिला दुर्बल असलीतरी सामाजिकदृष्ट्या तिला पुरूषाइतकेच स्थान दिले गेले. पवित्र कुरआनमध्ये महिलांसंदर्भात एक संपूर्ण सुरह म्हणजे अध्याय अवतरविण्यात आला असून एकूण ४९ आयतीत म्हणजे श्लोकात महिलांचा आणि त्यांच्या कौतुकास्पद बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. पवित्र कुरआन हा एकमेव असा आकाशी ग्रंथ आहे. ज्यांत स्त्री-पुरूष समानतेचा उल्लेख करण्यात आला आहे. जे कर्मकांड पुरुषावर बंधनकारक आहेत ते जसेच्या तसे महिलांवर देखील आहेत. जेणेकरून महिलांना देखील पुण्यप्राप्तीचे पुरेपूर अवसर प्राप्त झाले आहेत ज्यामुळे महिलांचे देखील मनोबल व मनोधैर्य वाढीला लागले. पुण्यप्राप्तीत आणि आध्यात्मिक सुबत्तेबाबत पवित्र कुरआनमध्ये पुरूषाबरोबर महिलांचे देखील बरोबरीने उल्लेख करण्यात आला आहे.


         हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैवस्सलम स्त्रियांचा आदर राखत होते. त्यांना आग्रह करत नव्हते ते महिलेच्या इच्छेला प्राधान्य देत होते. या संबंधीचे एक उदाहरण पाहू या. हजरत बरीरह (रजि) नावाची एक महिला हजरत मुहमंद सलेल्लाह अलैवस्सलम यांच्या धर्मपत्नी हजरत आएशा (रजि) यांची सेविका होती. तिला हजरत आएशा यांनी मुक्त केले होते. त्या महिलेच्या विवाह हजरत 'मुगीस' नावाच्या एका व्यक्तीबरोबर झाला होता. ज्यांना त्या पसंत करीत नव्हत्या. काही दिवसांनी त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्या आता मुक्त होत्या. त्यांचे पती त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करण्याचा आग्रह करीत त्यांच्यामागे अक्षरशः रडत फिरायचे. एकदा ते आपली मागणी घेऊन हजरत प्रेषित साहेबांजवळ गेले आणि हजरत बरीरहने त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करावा, अशी शिफारस करण्यास भाग पाडले. पैगंबर साहेबांनी हजरत बरीरह यांना त्यांच्या पतीची इच्छा सांगितली. बरीरहने विचारले, 'या रसूलुल्ला सलेअल्लाहु अलैवस्सलम हा आपला सल्ला आहे की आग्रह ? "प्रेषित साहेब म्हणाले, "हा आदेश नसून केवळ सल्ला आहे. बरीरह म्हणाल्या, “मग तर मी त्यांच्याशी विवाह करू इच्छित नाही" प्रेषित साहेबांनी तिच्या इच्छेप्रमाणे वागू दिले. महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत अनेक कार्यक्रम राबवित असताना जगभरात आणि विशेषतः भारतात काय घडत आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. महिलांना शक्ती प्रदान करण्याकरिता तीन बाबी महत्वाच्या मानल्या जातात. १. वित्तीय किंवा आर्थिक स्वायत्तता, २. सामाजिक्र आत्मनिर्भरता आणि ३. ज्ञान वा शिक्षणक्षेत्रातील स्वावलंबन. परंतू स्त्रियांच्या बाबतीत एक चौथी गोष्ट देखील लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे स्त्रियांचे शील रक्षण. केवळ इस्लाम नव्हे तर प्रत्येक धर्मात स्त्रियांच्या शील रक्षणाबाबत कठोर शिक्षा व उपाय सुचविण्यात आले आहेत. पुरूषांबाबत देखील विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि परस्त्री गमनाच्या प्रवृत्तीला आळा घालण्याकरिता चाबकाचे १०० फटके आणि विवाहित स्त्री किंवा पुरुषाने व्यभिचार केल्यास जमिनीत निम्मे पुरून, दगडांचा वर्षाव करून ठार मारण्याची शिक्षा आहे. ही शिक्षा इस्लामपूर्वी ज्यू-इस्त्रायली आणि ख्रिस्ती काळापासून चालू होती. पैगंबर साहेबांनी ती होती तशीच चालू ठेवली त्यात काहीही बदल केले नाहीत.


         इस्लामी संस्कृतीत नारी समाजाला अत्यंत आदरभावनेने वागविण्याची प्रथा आहे. महिलांना विधीशास्त्रात आणि साहित्यात 'सन्फे नाजूक' म्हणजे नाजूक अस्तित्व राखणारी म्हणून संबोधले जाते. त्यांच्याकडून अवजड कामे करून घेणे उचित नाही. त्यांच्या रक्षणासाठी इस्लामने त्यांना वयात आल्याबरोबर गोषा-पर्दा म्हणजेच हिजाब आणि बुरखा प्रदान केला आहे. मुलींनी जर आपल्या सौंदर्याला गोड पदार्थाप्रमाणे झाकून ठेवले तर त्यावर माशी बसणार नाही. मग तिला जुदो कराटे सारख्या कठीण कठीण कवायती शिकण्याची गरज भासणार नाही असे वाटते. समाजात पसरलेल्या लैंगिक छळाची पन्नास टक्के तीव्रता कमी करण्याचे कुरआनातील मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. हे पैगंबर सलेअल्लाहु अलैवस्सलम श्रध्दावान स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टीची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आपल्या साजशृंगार दर्शवू नये. आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये, असे कुरआनच्या २४ व्या' भागातील अननुर या अध्यायात ३१ व्या श्लोकात म्हटले आहे. या आदेशाव्यतिरिक्त असेही म्हणण्यात आले आहे की, आपल्या पत्नी व मुली यांना सांगा की आपल्या चादरीचे पदर उत्तपणावर अच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पध्दत होय. जेणेकरून त्यांना त्रास दिला जाणार नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे. अमीन.

मंगळवार, ३ मार्च, २०२६

रोजे आत्म्याला तेजस्वी प्रकाश देतात व कॅन्सरपासून वाचवतात

रोजे आत्म्याला तेजस्वी प्रकाश देतात व कॅन्सरपासून वाचवतात



        वसंत श्रुतूमध्ये निष्पर्ण झालेल्या झाडांना कोवळी लुसलुसीत पालवी फुटते. वृक्षवल्ली बहरलेली दिसतात. कोकिळेची मधुर स्वरातील तान ऐकू येते. सृष्टीवर सर्वत्र नवा उत्साह, नवा जोम जाणवू लागतो. सर्वांच्या मनात आनंदाचा संचार होवू लागतो. जवळपास हीच अवस्था रमजान महिन्यात दिसू लागते. हा महिना सत्कर्माचा मानला जातो. पवित्र रमजान महिना आला की, वातावरणात नेकीचे म्हणजेच चांगुलपणाचे वारे वाहू लागतात. रमजानच्या आगमनानिमित्त जाणवणाऱ्या शुभ हालचालीमुळे प्रसन्नता जाणवते.


         या महिन्यात मुस्लिम बंधुभगिनी भक्तिभावाने उपवास करतात. भल्या पहाटे उठून नाष्टा करतात. त्याला सेहरी म्हणतात. दिवसातून पाच वेळा उपवासाबरोबर नमाज पठण करतात. कुरआन वाचन करतात. बरेच जण पहाटेची ताहज्जुदची नमाज पठण करतात. यावेळी सर्वांची मने भक्तीरसात डुंबलेली असतात. प्रत्येकजण जास्तीत जास्त इबादत (भक्ती) करून सवाब म्हणजे पुण्य पदरी पाडून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. कारण अल्लाहच्या आदेशान्वये या महिन्यात सैतानाला कैद करण्यात येते. म्हणजे सत्कर्माना चालना देण्यास अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात येते.


          प्रत्येकाने सत्कर्मासाठी प्रयत्नशील रहावे कारण अल्लाह प्रत्येकाच्या मनातले जाणणारा आहे. त्याला सर्व ज्ञात आहे. तुम्ही अल्लाहसाठी एक पाऊल चालतात तर अल्लाह तुमच्यासाठी दहा पावले चालत येतो. म्हणून तुम्ही अल्लाहसाठी चालत रहा. तो तुमच्यासाठी धावत येईल. रमजानच्या आध्यात्मिक महिन्यात सत्कर्माची म्हणजे पुण्याची पाने जणू काही बहरतात. रोजे धारकांची मने प्रसन्न होतात. या जाणीवेलाच इस्लामी तर्कशास्त्रात बरकत असे म्हटले आहे. काही अभ्यासक रमजानच्या महिन्याला फस्ल की कटाई का महिना म्हणजे सुगीचा महिना म्हणून देखील संबोधतात. काहींच्या मते आत्म्याला तेजस्वी प्रकाश देणारा महिना आहे. कारण उपवासाच्या काळात मनुष्य आपल्या अंतःकरणात डोकावून पहातो. भूक म्हणजे काय हे त्याला नेमके समजते. अविरत बरसणारी अल्लाहची दया, कृपा उपवासकर्त्याला सुखावून जाते. त्याचा आत्माही सुखावतो. उपवासकर्ता सज्जन व मवाळ बनतो. रोजा मनुष्याच्या आत्म्याला तेजस्वी प्रकाश देतो ही झाली रोजाची भावनात्मक बाजू. रोजामुळे शरिराला काय फायदे होतात ते पाहू. 


         रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास करणे ही इस्लाम धर्मातल पाच उपासनांपैकी एक उपासना आहे. या उपासनेमागील शरीर विज्ञान एका व्हिडीओमुळे मला समजले. हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांनी आपल्या अनुयायांवर रोजे सक्तीचे का केले आहेत ? तर अनुयायांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार होवू नये म्हणून. त्या व्हिडीओतील वैज्ञानिक माहिती रसिक श्रोत्यांसाठी देत आहे.


           ३ ऑक्टोबर २०१६ साली योशिनोरी ओशमी या जपानी शास्त्रज्ञाला नोबेल प्राईज फॉर मेडिसीन दिले गेले. मेकॅनिझम फॉर ऑटोफॅगी त्याच्या संशोधनाचा विषय होता. नोबेल प्राईज प्रदान झाल्यानंतर त्यांना विचारले गेले की, ज्यामुळे आपल्याला जगातील सर्वात मोठा पुरस्कार नोबेल प्राइज दिला गेला .त्याकरिता तुम्ही अशी कोणती गोष्ट शोधून काढली. योशिनोरी ओशुमी म्हणाले, मी कॅन्सर न होण्याच्या संभाव्य औषधांचा शोध लावला. या उत्तराचे जगाने जोरदार स्वागत केले आणि म्हटले, "तुम्ही कॅन्सर न होण्याचे औषध शोधून काढले ? ओशुमी म्हणाले, हे औषध नाही, परंतू, एक खात्रीलायक उपाय म्हणजे प्रिकॉशन मी शोधून काढले आहे. जगातील प्रत्येकजण म्हणाला, 'सांगा, सांगा असा कोणता उपाय आहे. ते म्हणाले, ज्यावेळेस आपण उपाशी राहतो. त्यावेळी आपल्या शरीरातील पोषणतत्वे म्हणजे न्यूट्रीयन्स संपून जावू लागतात. भूक लागते पण काही खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरातील सडलेल्या, कुजलेल्या भागाला, जंतूना शरीरातील पेशी खाऊ लागतात. या क्रियेला वैज्ञानिक भाषेत ऑटोफॅगी म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शरीरातील कुजलेल्या, सडलेल्या भागांना, जंतूना शरीरातील इतर पेशींनी खाऊन टाकावे तर त्यासाठी तुम्हाला उपाशी रहावं लागेल. असा शोध मी लावला आहे. जेव्हा शरीरातील पेशी अशा भागांना खाऊ लागतील. त्यावेळी कॅन्सरचा परसंटेज कमी होत जातो. लोकांनी त्यांना विचारले, 'माणसाला वर्षभरात यासाठी किती दिवस उपाशी रहावं लागेल? त्यांनी सांगितले २० ते २५ दिवस दररोज ९ ते १० तास उपाशी रहावं लागेल. जो अशाप्रकारे उपाशी राहील त्याच्या शरीरातील पेशी त्याच्याच शरीरातील मलीच्छ भागाला खाऊन टाकतील व उपवासकर्ता कॅन्सरपासून आपला बचाव करू शकेल.


सोमवार, २ मार्च, २०२६

प्रेषितांची क्षमायाचना

प्रेषितांची क्षमायाचना




          आपणा सर्वांना रमजानचा महिना लाभला आहे. क्षमा याचनेकरिता यापेक्षा उचित पर्व कुठलेच नाही. रमजान एक शुभ आणि प्रत्येक उपासनेकरिता अल्हाददायक महिना आहे. या महिन्यात फक्त हज करता येत नाही. कारण इस्लामी शरीअतने हजकरिता एक वेगळ्याच महिन्याची घोषणा केली आहे. आणि तो महिना आहे जिलहिज्जचा. रमजान महन्याच्या तीस दिवसांना दहा दहा दिवसांच्या तीन समान संचामध्ये विभाजण्यात आले असून प्रत्येक संचाला 'अश्रः' असे नाव देण्यात आले आहे. रमजानचा पहिला अश्रः रहेमत दुसरा माग्फिरत आणि तिसरा अश्रः नरकाच्या अग्नीपासून मुक्तीचा म्हणजे 'आगसे निजातचा' आहे. म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त इस्तिगफारचा इतमाम करावा. रमजानच्या महिन्यात प्रत्येक कर्माचे पुण्य सत्तरपटीने जास्त देण्यात येते. म्हणून असे म्हटले जाते की, एकदा इस्तिगफारचे शब्द उच्चारल्याने सत्तर श्लोक उच्चारल्यासारखे होईल.

 

           रमजानच्या महिन्यातील शेवटचे दहा दिवस फार महत्वाचे मानले जातात. कारण या दहा दिवसातील पाच रात्री या फारच महान मानल्या जातात या पाच रात्रींना 'ताकरात' असे संबोधले जाते. या पाच रात्रीपैकी एका रात्रीस शब्बेकद्र असे संबोधले जाते. आपल्याकडे खास करून सत्तावीस तारखेस बडीरात किंवा शब्बेकद्र साजरी केली जाते. २१ व्या रोजापासून या महान रात्रींची सुरूवात होते. या शेवटच्या दहा दिवसात रात्रभर नमाज पठण व नामस्मरणाचा कार्यक्रम फार कसरतीने होत असतो. हे दहा दिवस क्षमायाचनेचे आहेत. तुम्ही केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची माफी केली जाईल आणि सद्बुध्दी, सद्भावना, भक्तिभाव अर्पित केला जाईल. अशावेळी प्रफुल्लीत झालेल्या परमेश्वराकडून माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या या पाच ताकरात्री आहेत. महिनाभर रोजा करून हलके झालेले मन रात्री उठून अल्लाहच्या दरबारी नतमस्तक होऊन नमाजपठण करून सद्बुध्दीची भीक मागणे अल्लाहला फारच आवडते.


           अल्लाहला सर्वात जास्त भिणारे आणि त्यांच्यावर अफाट प्रेम करणारे प्रेषित असतात. या पृथ्वीवर मानवाच्या मार्गदर्शनासाठी प्रथम प्रेषित हजरत आदम अलैहिवस्सलामपासून तर अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद अलैहिवस्सलम पर्यंत सुमारे एक लाख चोवीस हजार इतके प्रेषित अल्लाहकडून पाठविण्यात आले. प्रेषितांना अल्लाहकडून सान्निध्य प्राप्त असते. हजरत मुसा अलैहिस्सलाम तर अल्लाहबरोबर थेट संवाद साधायचे म्हणून त्यांना कलीमुल्लाह म्हणजे अल्लाहबरोबर संवाद साधणारा ही पदवी देण्यात आली होती. तसेच हजरत ईब्राहिम अलैस्सलाम  यांना खलीलुल्लाह ही पदवी देण्यात आली होती. खलीलुल्लाह म्हणजे अल्लाहचा मित्र होय. यावरून आपणास कल्पना येईल की प्रेषितांचे अल्लाहबरोबर संबंध कसे असतात. एवढे असूनसुध्दा ते अल्लाहकडून सतत क्षमायाचना करत रहायचे. काही प्रेषितांनी मागितलेल्या क्षमांची शब्दावली अशी आहे.


           हजरत आदम अलैहिस्सलाम यांची दुआ, "हे पालनकर्त्या आम्ही स्वतःवर अत्याचार केला. जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू." ही दुआ अलअराफ या अध्यायातील २३ व्या श्लोकात समाविष्ट आहे. हजरत मुसा अलैहिस्सलाम क्षमा मागताना म्हणाले, "हे पालनकर्त्या मला व माझ्या भावांना क्षमा कर आणि आम्हाला आपल्या कृपा छत्रात घे, तू सर्वात जास्त दयाळू आहेस" यापुढे ते म्हणाले, "आमचा पालक तर तूच आहेस, म्हणून आम्हाला क्षमा कर आणि आमच्यावर कृपा कर, तू सर्वापेक्षा जास्त क्षमा करणारा आहेस." ही दुआ अल्अअराफ या अध्यायातील १५१ ते १५५ या श्लोकात आली आहे.


          नूह अलैहिस्सलाम नावाचे एक प्रेषित होते. ज्यांच्या काळात जबरदस्त पूर आला होता. त्यात त्यांची पत्नी आणि मुलाला देखील बुडवून ठार मारण्यात आले होते. त्याप्रसंगी हजरत नूह अलैहिस्सलाम यांनी अल्लाहना विनवले, 'हे माझ्या पालनकर्त्या ! मी तुझा आश्रय मागतो. यापासून की ती गोष्ट तुझ्याजवळ मागावी जिचे ज्ञान मला नाही, जर तू मला माफ केले नाहीस आणि दया केली नाहीस तर मी नष्ट होऊन जाईन माझ्या पालनकर्त्या ! मला व माझ्या आई-वडिलांना आणि त्या प्रत्येक माणसाला जो माझ्या घरात श्रध्दावंत म्हणून शिरला आहे आणि सर्व श्रध्दावंत पुरूषांना आणि स्त्रियांना क्षमा कर आणि अत्याचाऱ्यांसाठी विनाशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत वाढ करू नकोस" ही दुआ हूद या अध्यायातील सत्तेचाळीसाव्या श्लोकात आली आहे. 


          अल्लाहच्या सान्निध्यात प्रयाण करण्याकरिता अत्यंत पवित्र आत्मा लागतो आणि पवित्र आत्मा जोपासण्याकरिता अत्यंत सुबक शरीर हवे असते. माणसाच्या हातून दुष्कर्म आणि पापे घडतच असतात. सात्विक जीवन केवळ प्रेषित जगू शकतात. परंतू, खरा दास आणि अल्लाहचा बंदा तो आहे जो पाप घडो अगर न घडो अल्लाहचरणी त्याचे प्रायश्चित मात्र सदैव सुरू असते तो नेहमी क्षमा याचनेत मग्न असतो. बंधुभगिनींनो आपणही या महिन्यात क्षमा याचनेत मग्न राहू या.


 

रविवार, १ मार्च, २०२६

दुआ : एक आत्मिक शक्ती

दुआ : एक आत्मिक शक्ती



          दुआ हा आरबी भाषेतील शब्द असून त्याकरिता मराठी भाषेत पर्यायी शब्द शोधणे कठीण आहे. इंग्रजी भाषेत दुआ करीता 'सप्लिकेशन' असा शब्द आहे. दुआ म्हणजे अल्लाहचरणी दीनपणे याचना करणे, नम्र प्रार्थना करणे, नम्र विनंती करणे दुआ म्हणजे फक्त अल्लाहला ध्यानीमनी ठेवून आपल्या गरजा मांडण्याची आणि त्या साकार होवोत हे मागण्याच्या उपासनेचे नाव आहे. मुस्लिम बांधव प्रत्येक नमाजनंतर, कुरआन पठणानंतर ईदच्या दिवशी, शबेकद्रच्या रात्री, शुक्रवारच्या दिवशी, बिकट प्रसंगी दिवस आणि रात्रीच्या कुठल्याही प्रहरी अल्लाह समोर हात पसरवू शकतो आणि जे पाहिजे ते सर्व अल्लाहकडून मागून घेवू शकतो. तो देणारा जबरदस्त आहे. आपणास त्याच्याकडून मागता आले पाहिजे.


         अल्लाहचे म्हणणे आहे की, 'माँगनेवालो को हम दुनिया भी नयी देते है।' अल्लाहजवळ मागण्यासाठी कुणी मध्यस्थ लागत नाही. त्याचा उपासक त्याच्याबरोबर संपर्क साधू शकतो. एकदा अल्लाहशी संपर्क प्रस्थापित झला तर याचकाचे मन स्वतः ग्वाही देते की तो अल्लाहच्या संपर्कात आहे. ज्याच्याकडे कोट्यवधी माणसांनी मागितले आहे मात्र त्या दात्याच्या खजिन्यात कणमात्रसुध्दा कमतरता आली नाही. याच अल्लाहकडे पीर-फकीर आणि सम्राटांनी मागितले आहे. प्रेषित पैगंबरांनी मागितले आहे. प्रेषित आदम, नूह, इब्राहिम, मूसा, ईसा आणि तमाम प्रेषितांचे सरदार हजरत मुहम्मद सलेलल्लाहु अलैवस्सलाम यांनी सुध्दा मागितले आहे. त्या दात्याकडे अशी प्रथा नाही की त्याने फक्त दिग्गजांना द्यावे आणि दीन-दुबळ्यांना इन्कार करावा तो देणारा आहे त्याला मागणारा हवा आहे. त्याच्यावर संपूर्ण विश्वास आणि श्रध्दा राखणारा हवा आहे. मागितली जाणारी वस्तू मात्र निषीद्ध नसावी. मानवतेकरीता आणि सृष्टीकरीता हानिकारक नसावी.


         दुआ मागत असताना एकचित्त रहावे. मागण्यांचे प्रदर्शन नसावे. आरडाओरड किंवा गोंगाट करता कामा नये. त्यात दिखावा नको. त्यात ढोंग किंवा दगलबाजी नको तो देणारा असला तरी आपल्या ऐपतीपेक्षा जास्त मागू नये. एखाद्या मजूराने जागतिक सत्ता किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या मालकाचा वध करण्याची शक्ती मागू नये. मागण्यात सर्वात उत्तम मागणी मरणोत्तर सफलतेची मागणी आहे. मोक्षप्राप्तीची मागणी आहे. कारण खरे जीवन मरणोत्तर जीवन आहे. त्याकरीता सत्कर्माबरोबरच 'दुआ'चीही साथ हवी आहे. पवित्र कुरआनचे सुप्रसिध्द भाष्यकार आणि भाषाशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल्लाह अब्बास नदवींच्या मते, "दुआ अर्थात प्रार्थना ही श्रध्दावंतांची एक मोठी शक्ती आहे. श्रध्दावंतांचा फार मोठा सहारा आहे. दुआ श्रध्दावंतांची तलवार ही आहे आणि दुआ हीच श्रध्दावंतांची ढालसुध्दा आहे. दुआच्या तलवारीनेच तो हल्ला चढवितो आणि दुआच्या ढालीवरच तो शत्रूचे वार रोखतो. दुआ उपासकाला अल्लाहकडून मिळणारी एक महान पात्रतात आणि सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य अल्लाहच्या प्रिय लोकांनाच प्रदान करण्यात येते. यालाच तौफिक म्हणतात. तौफिक अल्लाहच्या मान्यता प्रक्रियेला असे अच्छादित करते जसे पावसाआधी पाण्याच्या थंडगार थेंबांनी भरलेले ढग तहानलेल्या जमिनीला अच्छादित करतात. इस्तिगफार म्हणजे क्षमायाचना आणि दुरूद म्हणजे हजरत मुहम्मद पैगंबरसाहेबांवर पाठविले जाणारे स्तुतीपर सलाम व प्रार्थना ही दोन्ही दुआची आभूषणे आहेत. दुरूद स्वतः एक अत्यंत प्रेरणादायी उपासना आहे. एक अशी याचना जी कधीच रद्द होत नाही. आपण अल्लाहच्या दया, कृपा आणि करूणामयी स्वभावावर सदैव विश्वास बाळगला पाहिजे. भाग्य किंवा नशीब अटळ आहे. जी आपत्ती एखाद्यावर येणे पालनकर्त्याने ठरविले आहे, ती आल्याशिवाय रहात नाही परंतू सुरक्षिततेची दुआ आपत्तीच्या त्या अवधीला पुढे ढकलत रहाते. संकट विविध दिशेने आपला हल्ला चढवत असते. परंतू, आपण मागितलेली दुआ त्याच्या मुकाबल्याकरीता सज्ज असते. संकटाला पृथ्वीतलावर उतरू देत नाही.


        संकट यायच्या आधी मागितलेली दुआ संकट आल्यावर मागण्यापेक्षा कितीतरी पटीने लाभदायक आहे. तरूण वयात मागितलेल्या दुआचा दर्जा वृध्दापकाळी मागितल्या जाणाऱ्या दुआपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. दुआ मागितल्यावर माणसाने दुराग्रही आणि गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. दुआ कधीच रद्द होत नाही. यावर विश्वास ठेवला पाहिजे. उचित वेळी त्याचे फलित आपणास मिळते. थोडासा संयम आणि थोडीशी सबुरी बाळगल्याने दुआ या उपासनेचा लाभ मिळतो.


        म्हणून रमजान महिन्यात ईश्वरासमोर (अल्लाहसमोर) अत्यंत लीनपणे दुआ मागण्यात गर्क राहिल्यास त्याला इच्छित गोष्टी प्राप्त होतात. म्हणून रमजानची संधी अत्यंत बलवान आहे. त्यात जे काही मिळविता येईल ते मिळवून घ्यावे. अमीन !

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

शारिरीक स्वच्छता व पावित्र्य

शारिरीक स्वच्छता व पावित्र्य




       इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे जेव्हा गुस्ल म्हणजे स्नान आणि वुजू म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे तोंड, हात, पाय धुण्याची गरज असते. तेव्हा माणसाने टाळाटाळ करू नये व हे काम लवकर आटोपून टाकावे. तसे न केल्याने बाधा होण्याची भीती जास्त असते. शूचिर्भूत झाल्याने माणसात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि पुढे शूचिर्भूत होईपर्यंत त्यास ईश्वरी संरक्षणाचे विशेष कवच लाभते.


         खगोल शास्त्रज्ञांच्या मते माणसांसाठी राहण्याचे सर्वात असुरक्षित स्थान म्हणजे आपले पृथ्वीतल कारण आकाशातील हवामानापेक्षा जमिनीवरचे वातावरण कितीतरी पटीने हाणीकारक व बाधक असते. संसर्ग फक्त बॅक्टेरिया आणि अन्य जंतू पासूनच होत नसून काही कारणे अशी असतात. ज्यांच्यामुळे माणूस मानसिकरित्या आजारी पडतो. शारीरिक विकासापेक्षा मानसिक आणि आत्मिक विकार खूप त्रासदायक असतात. हे रोग लवकर बरे होत नसल्याने माणसे हतबल होतात आणि शेवटचा उपाय म्हणून तांत्रिक मांत्रिकांच्या कारस्थानांना बळी पडतात. खरे पाहता मानवी शरीरात संसर्गजन्य परिस्थिती केव्हा निर्माण होते. उत्तर अत्यंत सोपे आहे. शरीराची देखरेख अथवा स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर आजारी पडण्याची भीती अधिक असते. स्वच्छता ही चिकीत्साविषयक संज्ञा झाली परंतु ' धर्मशास्त्रात केवळ स्वच्छता अभिप्रेत नसून तिथे एक दर्जा अधिक म्हणजे पवित्रता किंवा पावित्र्य ही आहे. परिधान केलेले कपडे कितीही स्वच्छ दिसत असले तरी त्यावर मद्य, पू, रक्त, शौच, वीर्य अथवा लघवीचे थेंब असतील तर असे कपडे स्वच्छ असूनसुध्दा मलिन आहेत. इस्लामी शरीअतप्रमाणे असे कपडे परिधान करून कुठलीही इबादत म्हणजे प्रार्थना आपण करू शकत नाही आणि केलीच तर अल्लाहच्या दरबारात त्यांना स्वीकृती लाभत नाही.


         ईस्लाम धर्मात शारीरिक पावित्रतेला खूप महत्व आहे. शरीर शुध्द असले तर मन शुध्द रहाते. मन शुध्द राहिले तर आत्मा शुध्द रहातो. शरीर शुध्द नसल्याने काही विकार होणे अगदी नैसर्गिक आहे. त्या शारीरिक विकारांचा दुष्पपरिणाम मनावर होतो. मनाचे आरोग्य बिघडते तर आत्मा विचलित होतो. आत्मा बैचेन झाला की, माणसाला झपाटल्यासारखे वाटते आणि तो नको त्या उपायांच्या शोधात हिंडतो-फिरतो. म्हणून सफाई आणि पावित्र्य या. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सफाई केवळ शरीराला शुध्द करू शकते, परंतु पवित्रता मात्र आरोग्याचा एक अत्यावश्यक असा गुण आहे. ज्याला पर्याय नाही. पावित्र्य एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे माणसाला ईश्वराचे सामीप्य प्राप्त होते. अपवित्र माणूस ईश्वरी देणग्यांच्या निकट जावू शकत नाही. पवित्रता माणसाच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्तीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असते.


          इस्लामी धर्मकायद्यात शारीरिक निर्मलता आणि पावित्र्यास खूप महत्व आहे. हे पावित्र्य मूल जन्मल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत जोपासण्यात येते. माणूस मरण पावला तरी त्याच्या अंत्यविधीत प्रेताला स्नान घालण्याचे खूप महत्व आहे. प्रेताला स्नान घालण्याचे काम त्याच्या निकटच्या नातेवाईकांनी पार पाडावे. प्रेताला स्नान यासाठी की ती व्यक्ती आता संसारातील आपली सर्व कामे आटोपून मृत्यूमार्गे अल्लाह दरबारी दाखल होत आहे आणि अल्लाहचे स्थान अत्यंत पवित्र असे आहे. तेथे इहलोकातील अनिर्मल व अपवित्र शरीर घेवून जाणे म्हणजे अल्लाहच्या प्रकोपाला चिथावणी देण्यासारखे ठरेल.


         एवढेच नव्हे तर आता त्याचे संबंध अत्यंत पवित्र अशा ईश्वर निर्मित सृष्टी आणि फरिश्ते म्हणजे ईशदूत यांच्याबरोबर येणार असून ते संसार मानवाच्या संकल्पनेपासून अत्यंत भिन्न असे आहे. म्हणून मृत शरीराला सुध्दा सजीव प्राण्याप्रमाणेच स्नान घालण्याचे आदेश आहेत.


         गुस्ल करतेवेळी आधी शूचीर्भूत होण्याचा इरादा करावा नंतर 'बिस्मिल्लाह' उद्‌गारून सर्वप्रथम मनगटापर्यंत हात धुवावेत. शरीरावर जिथे घाण लागली असेल प्रथम ती धुवावी. नंतर गुळणी करून, नाकात पाणी टाकून नाक स्वच्छ करावे. नंतर सर्व शरीरावर पाणी टाकून चांगले चोळून चोळून मळ काढावा. नंतर तीनदा उजव्या खांद्यावरून, तीनदा डाव्या खांद्यावरून व तीनदा डोक्यावरून पाणी टाकावे. संपूर्ण शरीरावर एका केसाइतकीही जागा कोरडी राहिली असेल तर गुस्ल परिपूर्ण होणार नाही आणि उपासकाला पवित्र न झाल्याने त्याला व्यवस्थित स्नान केल्याशिवाय कुठलीही प्रार्थना करता येणार नाही. गुस्लकरिता किमान एक किलो ऐंशी ग्रॅम इतके पाणी आवश्यक आहे.


         मलमूत्रापासून सावध न रहाणे अत्यंत छोटा गुन्हा असला तरी त्याच्या यातना गुन्हेगाराला भोगाव्या लागतील. यावरून आपणास जाणीव होईल की ईस्लामी धर्मात शारीरिक स्वच्छता व पावित्र्य याला किती महत्व आहे. तेव्हा बंधूभगिनींनो या महिन्यात पावित्र्य राखून उपासना करा.

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे कार्य

हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे कार्य



         इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैहिवस्सलम एका अशा जनसमुदायासाठी अल्लाहकडून संदेशवाहक म्हणून पाठविण्यात आले, जो आपल्या जहाल प्रवृत्तीमुळे संपूर्ण सभ्य आणि सुशिक्षित जगापासून तुटलेला व अलिप्त होता. अरबस्तानच्या या दक्षिण-पश्चिम भागात कुठलेही राजघराणे नव्हते, राजकुमार नव्हते, नाण्याचे चलन नव्हते. राजमहाल दरबार, मंत्री, सैनिक, कायदे, न्यायालये वगैरे प्रकार नव्हते. 'बळी तो कान पिळी' असा प्रकार होता. या भौगोलिक क्षेत्रातील काही घराणी अत्यंत सभ्य व सुसंस्कृत होती. परंतु दुर्गम आणि वाळवंटी प्रदेश आणि काही लोकांच्या रानटीपणामुळे हा प्रदेश सुसंस्कृत जगतापासून दुर्लक्षित होता. कुणीही राज्यकर्ता या प्रदेशावर राज्य करण्यास तयार नव्हता. मक्का शहर यमेन आणि सिरीया आणि इराकच्या हमरस्त्यावर असले तरी येणारे जाणारे काफिले केवळ विसावा व चारापाणी घेण्यासाठीच तेथे थांबायचे. या शहरात अत्यंत प्राचीन काळापासून पवित्र कअबागृह असल्याने ज्या कबिल्यांची या गृहावर श्रध्दा होती. त्यापैकी अनेक जण वर्षातून किमान एकदा या शहरी हज्ज यात्रेसाठी हमखास यायचे. यापलिकडे या क्षेत्राची जगाला माहिती नव्हती.


         अशा दुर्गम प्रदेशात सोमवार दि. २३ जून ५७१ बारा रबीअलअव्वल रोजी पैगंबर हजरत सल्लल्लाहु अलैहीवस्सलम यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या सहा महिन्याआधीच वडिलांचे निधन झाले होते. वयाच्या सहाव्या वर्ष आईचेही निधन झाले. नंतरचे पालनपोषण वृध्द आजोबा अब्दुल मुत्तलिब आणि चुलते अबुतालिब यांनी केले. एका संकेतानुसार हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना २२ डिसेंबर ६०९ रोजी अल्लाहकडून प्रेषितत्व बहाल करण्यात आले. प्रेषित म्हणजे दिव्य बोधाद्वारे प्राप्त होणारे ईश्वरी आदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविणारा संदेशवाहक...


          या मक्का शहरात तब्बल तेरा वर्षे पैगंबर साहेबांनी कुरआन, एकेश्वरवाद, सत्य आणि अहिंसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु, बोटावर मोजण्याइतकीच माणसे त्यांच्या धर्मात परावर्तित झाली. उलट मक्कावासी आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या जिवाचे शत्रू बनले. नाईलाज म्हणून पैगंबर साहेबांनी स्वदेशत्याग करण्याचे ठरविले आणि ८ सप्टेंबर ६२२ रोजी मक्केहून मदिनेकडे त्यांनी स्थलांतर केले. मदिनेत पोहोचल्यावर दहा वर्षाच्या आत संपूर्ण परिसरात एक विधायक क्रांती घडून आली.


         मार्च ६३२ मध्ये जेव्हा पैगंबर साहेबांनी अंतिम हज्जयात्रा केली आणि अरफातच्या मैदानात हज्जचा एक विधी म्हणून अंतिम प्रवचन दिले. त्याप्रसंगी त्या मैदानात श्रोत्यांची संख्या एक लाख वीस हजारापेक्षा अधिक होती. जे कुटूंब आणि लांबच्या प्रदेशात वास्तव्य करणारी जी माणसे हज्ज यात्रेस पोहचली नव्हती त्यांची संख्या अगणित होती. ज्या लोकांनी इमान व श्रध्देच्या अवस्थेत पैगंबरसाहेबांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यावर ईमान राखले, त्यांच्यावर आपले सर्वस्व म्हणजे प्राणसुध्दा अर्पण करण्याचे साहस केले आणि खऱ्या अर्थाने ते राखले. अशाच व्यक्तींना इतिहासात सिहाबी म्हणजेच पैगंबर साहेबांचे सोबती ही उपाधी देण्यात आली. मक्कावासियांच्या द्वेष व अत्याचाराला कंटाळून जेव्हा पैगंबर साहेबांनी स्वदेशत्याग केला आणि सुमारे ४५० कि.मी. उत्तरेकडे प्रवास करून मदिना शहरी स्थायिक झाले. तेव्हा त्यांचे नातलग, अनुयायी, पैगंबर साहेबांचे सोबती म्हणजेच सिहाबी देखील त्यांच्या पाठोपाठ हिजरत म्हणजेच स्थलांतर करून मदिनेत दाखल झाले. ते पूर्णतः लुटले गेले होते. शरीरावर असलेले वस्त्र एवढीच त्यांची मालमत्ता होती परंतू यापैकी एकालाही पैगंबर साहेबांनी भीक मागू दिली नाही. त्यांनी मदिनेत बंधुसंघाची म्हणजे मुआखतची स्थापना केली. येणारा प्रत्येक मक्कावासी मदिनावासियांचा भाऊ होता. हे लोकदेखील इतके स्वाभिमानी होते की ते सतत मदीनावासियांवर अवलंबून राहिले नाहीत. काहीनी तर पहिल्या दिवशीच बाजारपेठ गाठली. काहींनी दुसऱ्या दिवशी जंगलाची वाट धरली आणि जळाऊ लाकडे तोडून बाजारात विकायला लागले. काहींनी मोलमजूरीची कामे पत्करली आणि पहाता पहाता मदिना शहर हे एक स्वावलंबी शहर म्हणून परिसरात प्रसिध्द झाले. पैगंबर साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन कार्यामुळे एका आत्मनिर्भर आणि आदर्श समाजाची निर्मिती झाली. मक्कावासियांकरिता मदिना एक नवीन शहर, अनोळखी गल्लीबोळ, अपरिचित माणसे, शेजारी परंतु प्रेषितसाहेब म्हणजे सर्वांचे अंतिम आणि पृथ्वीतलावरील एकमेव आश्रयस्थान, आत्मविश्वास आणि एकमेकांवरील भरवसा यामुळे एका मातब्बर समाजाची निर्मिती झाली.


          मदिनावासियांचे सर्वात मोठे संरक्षक त्यांचे शेजारी होते. आणि हे शेजारी एकाच धर्माचे नसून विविध धर्मीय होते. जेणेकरून या शहराचे रूपांतर लगेचच एका राष्ट्रकुलात कॉमनवेल्थमध्ये झाले जे नंतर एका शक्तीशाली संस्कृतीमध्ये परावर्तित झाले.