रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३० मार्च, २०२५

हमीदचाचांचा सेवाभाव

                      डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

                            फोटो: साभार गुगल


     हमीदचाचा नियमितपणे सकाळी सकाळी वेळेवर मस्जिदमध्ये हजर असायचे. सकाळची नमाज झाल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जायचे. पण हमीदचाचा तिथेच थांबायचे. मस्जिदचा परिसर मोठा होता. मस्जिदच्या सभोवताली चिंच, आंबा, डाळींब, लिंब अशी अनेक मोठी झाडे होती. मोगरा, गुलाब, शेवंती, चाफा अशी फुलझाडे होती. या सर्वांना पाणी घालणे, साफसफाई करणे, झाडांना अळे करणे हे त्यांचे नित्याचं काम होते. तासाभरात ही सर्व कामे संपवूनच ते घरी जायचे. एमएसईबीमध्ये वायरमन पदावर कार्यरत होते. आपली ड्युटी व्यवस्थितपणे सांभाळायचे. बायको-मुलांनाही हवं नको ते बघायचे. आपली पाच वेळची नमाज अजिबात चुकवायचे नाहीत.


          संध्याकाळी मगरिबच्या नमाजाला आले की वयोवृध्द व्यक्तींना पायऱ्या चढून येण्यासाठी व उतरण्यासाठी मदत करायचे. लहान मुलांना कुरआन पठणाचे धडे द्यायचे. शिकण्यासाठी आलेल्या घर लांब असलेल्या मुलांना त्यांच्या घरी सायकल वरून पोहोचवायचे. मस्जिदमधला बल्ब गेल्या, वायरींग खराब झाले. फॅन नादुरूस्त झाला तर ताबडतोब दुरूस्त करतात. त्यांची कामातील ही तत्परता पाहून सगळे आश्चर्यचकीत होतात. विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी ते एक रूपयाही मोबदला घेत नाहीत. स्थानिक लोकांना हे सर्व परिचीत होते.


          एकदा काही दिवसासाठी मस्जिदमध्ये एक जमाअत आली. जमाअतमधील सलमान नावाचा तरूण हमीदचाचांचे हे काम पाहून खुष झाला. त्याने इतराजवळ त्यांच्याबाबत चौकशी केली. की चाचांना या सर्व कामाचा किती मोबदला मिळतो? लोकांनी सांगितले की, काहीही नाही. विनामोबदला तो हे सर्व करतो. सलमानच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला न राहवून त्याने चाचांना विचारले. चाचा तुम्ही दररोज एवढं काम करता तेही मनापासून आणि हसत मुखाने विना मोबदला कसे जमते तुम्हाला.


        हमीदचाचा अदबीनं म्हणाले, मला उदरनिर्वाहापुरता पगार मिळतो. अल्लाहाच्या कृपेने मी व माझे कुटूंबीय खाऊन पिऊन सुखी आहोत. पण मी जकात देवू शकत नाही. माझ्याकडे शिल्लक काही रहात नाही. त्यामुळे मी गोरगरीबांना मदतही करू शकत नाही. अल्लाहच्या कृपेने मला उत्तम आरोग्य लाभले आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेचे मी ही छोटी छोटी कामे करून जकात दिल्याचा, दुसऱ्याला थोडीफार मदत केल्याचा आत्मिक आनंद मिळवतो. हमीदचाचांचा सरळ स्वभाव व सेवाभाव पाहून सलमान अवाक् झाला. आपणही त्यांचा सेवाभाव घेऊ या.

शनिवार, २९ मार्च, २०२५

खोटी प्रतिष्ठा काय कामाची !

                      डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

                            फोटो:साभार गुगल


        हजरत मौलाना रूमी रहमतुल्लाह (अलै.) यांनी मसनवी शरीफमध्ये एक हकीकत लिहिली आहे ती अशी, एक साहेब होते. ते परिस्थितीने अतिशय गरीब होते. परंतू, त्यांना आपण फार मोठे सावकार आहोत हे दाखविण्याची फार हौस होती. एकदा त्यांनी मटन मार्केटमधून थोडीशी चरबी खरेदी करून ठेवली होती. दररोज बाहेर जाताना चरबी पाजळून ते साहेब आपल्या मिशाना लावत आणि रूबाबात फिरून येत. त्यांचा उद्देश हाच होता की लोकांना वाटत्तवे की साहेब खूप श्रीमंत दिसतात. घरातून तुप खाऊन निघालेत वाटतं. काही दिवस हा दिनक्रम सुरू होता. परंतू, एके दिवशी मांजराने ती चरबी खाऊन टाकली. दुसऱ्यांदा चरबी आणायला त्यांच्याजवळ पैसे नव्हते. परिणाम असा झाला की कोरड्या पडलेल्या त्यांच्या मिशा पुन्हा त्यांच्या गरिबीचं गाऱ्हाणं मांडू लागल्या.


        या साहेबांच्याप्रमाणे जे लोक लग्न कार्यात व सण समारंभात किंवा दुःखद प्रसंगी आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून वारेमाप खर्च करतात. खर्चासाठी कर्ज काढतात व ते फेडता न आल्याने निराश व शरमिंदे बनतात. अशा वेळी त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाटला जातो व गरीबी हे खरे स्वरूप सर्वांसमोर उघड होते.त्यांच्या चेहऱ्यावरचे के विलवाणे भावच दारिद्रयाची करूण कहाणी सांगतात. चार दिवसापूर्वी चरबी लावून मिशांवर ताव मारणारे पाचव्या दिवशी तोंड बारीक करून बसतात. शेजाऱ्याने आपल्या मुलाचा वाढदिवस धुमधडाक्यात केला. तर हे महाशय इर्षेपोटी दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेवून त्याच्यापेक्षा जास्त धुमधडाक्याने साजरा करतात. व क्षणिक आनंदी होतात. शेजाऱ्याने एखादी वस्तू आणली तर हप्त्याने त्यांच्यापेक्षा भारी वस्तू आणतात. पुढे ते हप्ते भरताना मेटाकुटीस येतात. शेवटी सावकार किंवा कंपनी ती वस्तू उचलून नेतात व प्रतिष्ठा पूर्ण ढासळते. म्हणून माणसाने आपली कुवत पाहुनच खर्च करावा. खोट्या प्रतिष्ठेसाठी अवाढव्य खर्च करून देखावा दाखविणे बंद करावे. जे अल्लाहने आपल्याला दिले आहे. ज्या परिस्थितीत ठेवले आहे. त्या परिस्थितीत सुख-समाधानाने रहावे. श्रीमंत होण्यासाठी अल्लाहचे नामस्मरण करत खूप कष्ट करावेत व त्यानंतर अल्लाकडे दुआ मागावी. अल्लाह आपली दुआ कबूल करेल, अशी आशा बाळगावी. अल्लाह देईल जरूर देईल...

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

अल्लाहवरील श्रध्दा व विश्वासाचे फळ

                       डॉ. ज्युबेदा मन्सुर तांबोळी


फोटो :साभार गुगल


         एक इमाम होते. कामानिमित्त शहरात आले होते. काम पूर्ण होण्यास वेळ झाला. ईशाच्या नमाजची वेळ झाली. त्यांनी विचार केला आजची रात्र मस्जिदमध्ये मुक्काम करू व उद्या सकाळी सुबहची नमाज झाल्यानंतर आपल्या गावाकडे जावू. ते मस्जिदमध्ये आले. वुजू करून त्यांनी नमाजपठण केले व तिथेच बसले. सोबत रात्रीपुरती शिदोरी होती. येथेच आराम करण्याच्या विचारात होते, इतक्यात मस्जिदमधील वॉचमन आला व त्याने इमामना येथे थांबता येणार नाही सांगितले. त्यांनी वॉचमनला विनंती केली पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यांने इमामना अक्षरशः हाकलून दिले. त्याला काहीही न बोलता ते बाहेर आले व दरवाजाच्या बाहेरच्या कट्ट्यावर येवून बसले. मस्जिद बंद करून वॉचमन बाहेर आला. त्याला इमाम कट्ट्यावर बसलेले दिसले. त्याच्या रागाचा पारा आणखीन वाढला. तो रागाने म्हणाला, तुम्हाला बोललेले समजत नाही वाटतं. जा इथून, अजिबात थांबू नका, निघा लवकर.


        समोरच असलेल्या बेकरीचा मालक हे सर्व पहात होता. इमाम उठून चालू लागल्यावर बेकरीवाल्याने त्यांना बोलवले व म्हणाले, माझ्या घरी खुशाल थांबा, काही अडचण नाही, त्याचे आभार मानून इमाम त्याच्या घरात गेले. आल्यापासून इमाम पहात होते बेकरीवाला हाताने आपले काम करत होता आणि मुखाने तस्बीह (नामजप) करत होता. सुबाहनल्लाहू, अल्हम्दूलिल्लाहू, अल्ला-हो-अकबर हा मंत्रजप तो म्हणत होता. इमामनी न राहवून त्याला विचारले, तु सतत तस्बीह पठण करतोस का, तो म्हणाला, हो मी पाच वेळचे नमाज पठण करतो व काम करताना अल्लाहचे नामस्मरण करतो. इमाम म्हणाले, तुला काय मिळाले आहे सतत नामस्मरण करून. बेकरीवाला म्हणाला, भाईसाब अल्लाहच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे. माझ्या सर्व इच्छा - आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. एकच इच्छा बाकी आहे. अल्लाह ती पण इच्छा पूर्ण करेल असा माझा ठाम विश्वास आहे. इमाम म्हणाले, तुझी कोणती इच्छा अपूर्ण आहे. बेकरीवाला म्हणाला, मला विद्वान असलेल्या इमाम अहमंद इब्न हंबल यांना भेटायचे आहे. त्यांच्या विद्वत्तेबद्दल मी खूप ऐकलयं. त्यांच्याकडून मला अल्लाहची उपासना समजून घ्यायची आहे. त्यांचे उपासनेबद्दलचे मार्गदर्शन घ्यायचे आहे.


        इमाम म्हणाले, धन्य आहेस मित्रा. तुझ्या या उपासनेने खूप प्रभावित झालो. मीच आहे इमाम अहमंद इब्न हबल. असे मिळते अल्लाहवरील गाढ श्रध्दा उपासनेचे फळ

बुधवार, २६ मार्च, २०२५

व्यापारात नितीमत्ता शिकविणारे हजरत उस्मान बिन अफ्फान (रजि.)

                      डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                            फोटो:साभार गुगल


        हजरत उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांनी बाजारपेठेतील ज्यू व्यापाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून शुध्द इस्लामी पध्दतीने मदीना येथे व्यपार सुरू केला. मालाची गुणवत्ता स्पष्ट करण्याची पध्दत सुरू केली. हलका माल व भारी माल वेगवेगळा केला. सुका माला व ओला माल वेगवेगळा ठेवला व त्याच्या किमतीही गुणवत्तेप्रमाणे कमी अधिक ठेवल्या. तसेच मक्काहून येताना त्यांनी प्रचंड संपत्ती आणलेली असल्यामुळे मुळ भांडवल बिनव्याजी मिळाले. त्यामुळे कमी किमतीत ते माल विकू लागले. खोट्या शपथा खाणे निषिध्द असल्याने त्यांनी खरे बोलून व्यापार सुरू केला. दुकान उघडण्याच्या व बंद करण्याच्यावेळा निश्चित केल्या. हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांच्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे व्यापार सुरू केला. त्यांना इतर मुस्लिम व्यापाऱ्यांची मोलाची साथ मिळाली व अल्पावधीतच मदिना बाजारपेठेचा नूर पालटला व ज्यू व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला हादरे बसू लागले.


        ह.उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांचे दातृत्व सर्वविधीत होते. त्यांनी अनेक व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देवून बाजारपेठेत उभे केले. पैगंबरसाहबांनी सुरू केलेल्या मस्जिदीसाठी हजरत अबुबकर (रजि.) यांनी जो जमिनीचा तुकडा खरेदी केला होता त्यावर मस्जिदीच्या बांधकामाचा सर्व खर्च त्यांनी केला. त्यानंतर साठ वर्षांनी विस्ताराचा खर्चही त्यांनी उचलला. लढायांमध्ये त्यांनी सढळ हाताने संपत्ती खर्च केली. एकदा पैगंबर साहेबांनी स्वतः सांगितले की, इस्लामच्या विस्तारामध्ये हजरत उस्मान (रजि.) यांच्या संपत्तीचा मला जेवढा उपयोग झाला तेवढा कोणाच्याच संपत्तीचा झाला नाही. यावरून त्यांच्या दातृत्वाची कल्पना येते. मदिनामध्ये एक गोड पाण्याची विहिर होती व ती कधीच आटत नव्हती. ती विहिर एका ज्यू व्यापाऱ्याच्या खाजगी मालकीची होती. हजरत उस्मान (रजि.) यांनी लोकांच्या पाण्याची अडचण लक्षात घेवून ती विहिर दहा हजार दिरहम देवून खरेदी केली व ती सर्वासाठी खुली केली. लोकांची सोय झाली.


        सन ६२४ मध्ये ह. रूकैय्या यांची अल्पशा आजाराने निधन झाले. तेव्हा पैगंबरसाहेबांनी आपली दुसरी कन्या उम्मे कुलसूम (रजि.) ज्या विधवा झाल्या होत्या. त्यांचा विवाह ह.उस्मान (रजि.) यांच्याशी करून दिला. हजरत उस्मान (रजि.) यांची तृतीय खलिफा पदी निवड ते सत्तर वर्षाचे असताना झाली. ते बारा वर्षे खलिफा पदावर कार्यरत होते. दुर्दैवाने त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत कुफा व सिरीयामधून आलेल्या दोन हजार मुस्लिमांच्या बंडखोर गटाने त्यांच्यावर हल्ला करून शहीद केले. अशा महान शहिदास सलाम.

मंगळवार, २५ मार्च, २०२५

इस्लामचे तिसरे खलिफा : उस्मान बिन अफ्फान (रजि.)

                       डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


फोटो:साभार गुगल


       इस्लाम धर्माचे तिसरे खलिफा उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांचा जन्म इ.स. ५७६ मध्ये मक्का शहरात झाला. त्या काळात मक्का शहरात कुरैश जमातीचे एकूण दहा कुळगट होते. त्यापैकी दोन कुळगट एक बनू हाशम व दोन बनू उमैय्या हे मातब्बर गट म्हणून ओळखले जात. हजरत उस्मान यांचा जन्म बनू उमैय्या कुळ गटात झाला. त्यांचे वडील हजरत अफ्फान हे मक्का शहरातील मुठभर साक्षर लोकापकी एक होते. ते प्रसिध्द व्यापारी होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटूंबात जन्म होवूनही हजरत उस्मान (रजि.) हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या वडीलांचा व्यापार आपल्या मधूर स्वभावामुळे नावारूपास आणला. श्रीमंत अरबामध्ये मदीरा आदि छंदापासून ते चार हात लांब होते. मात्र ते अनेकेश्वरवादी होते. ते मूर्तीपूजा करत. व्यापारानिमित्त अबेसिनीया, सिरीया, यमन इत्यादि देशात त्यांचे दौरे असत. इ.स. ६१० मध्ये सिरीयामध्ये असताना एका रात्री त्यांना दृष्टांत झाला की, मक्कामध्ये एक नवे प्रेषित उदयास आलेले आहेत. तुम्ही त्यांचे शिष्यत्व पत्करा. त्यावरून त्यांनी मक्का शहर गाठले. त्यांनी शहरातील दुसरे प्रसिध्द व्यापारी अबुबकर (रजि.) यांची भेट घेवून इस्लामसंबंधी माहिती जाणून घेतली.. ह. अबुबकर (रजि.) यांनी त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्याचा सल्ला दिला.


        हजरत उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांनी थेट हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांच्याकडे जावून त्यांच्या हातवर हात ठेवून इस्लाम धर्म स्विकारला. त्यांच्यासारख्या श्रीमंत व्यक्तीने इस्लाम स्विकारल्यामुळे मक्का शहरामध्ये एकच गजहब उडाला. त्यांच्यासारखा व्यक्ती इस्लाम स्विकारतो म्हणजे इस्लाम हाच सत्यधर्म असावा असा एक प्रबळ विचार आमजनतेत पसरला. त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी आईसहित अन्य नातेवाईकांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचे चुलते बनी उमैय्या यांनी तर ह. उस्मान यांना हातपाय बांधून जबर मारहाणसुध्दा केली. परंतू ते आपल्या निश्वयापासनू जरासुध्दा विचलित झाले नाहीत. उलट आपल्याच कुळगटातील मातब्बर घरण्यातील दोन पत्नीना त्यांनी इस्लाम धर्म स्विकारण्यास नकार दिल्याने घटस्फोट (तलाक) दिला.


        इस्लामी श्रध्देवर दृढ निश्चय असेल तर सुरूवातीला भरपूर त्रास होते. परंतू त्रास सहन केला व श्रध्देवर ठाम राहिला तर प्रत्येकाला अल्लाहची छुपी मदत येते. श्रध्दावान मनुष्य यशस्वी होतो हा प्रत्येक मुस्लिम बांधवाचा अनुभव आहे. हजरत उस्मान (रजि.) यांचेही असेच झाले. त्यानंतर ह. मुहमंद पैगंबर (स.अ.) यांनी आपली कन्या रूकैय्या यांचा विवाह उस्मान (रजि.) यांच्याशी करून दिला.

सोमवार, २४ मार्च, २०२५

जैसी नियत, वैसी बरकत

                      डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                        फोटो:साभार गुगल


        दोन भाऊ होते. साजिद व वाजिद नावाचे. दोघेही शेती करायचे. शेतात राब राब राबायचे. व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करायचे. असे बरेच दिवस गेले. नंतर नंतर पावसाच्या लहरीपणामुळे, निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे शेतीचे उत्पन्न घटू लागले. आर्थिक परिस्थिती हलाखीची होवू लागली. यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे असे दोघांनाही वाटू लागले. त्यांना समजले की, येथून जवळच असलेल्या गावात एक शेतीतज्ञ आले आहेत. त्यांच्याकडे जावून सल्ला घ्यावा आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा. तो निश्चित तुम्हाला उत्पन्न वाढविण्याचे मार्ग सांगेल. दुसऱ्या दिवशी दोघेजण शेतीतज्ञाकडे गेले. त्यांनी त्यांची अडचण त्यांना सविस्तरपणे सांगितली. शेतीतज्ञांनी शेताची मशागत कशी करावी, जमिनीचा कस सुधारण्यासाठी सुपिक भागातील माती शेतात आणून टाकावी, बियाणे व खते कोणती व कशी वापरावीत हे सांगितले. पाणी कोणत्या सिंचन पद्धतीने द्यावे याचेही मार्गदर्शन केले.


       साजिद-वाजिदनी वडीलोपार्जित जमिनीचा हिस्सा वाटून घेतलेला होता. दोघांच्या शेतीचे क्षेत्र सारखेच होते. शेतीची गुणवत्ताही सारखीच होती. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दोघांनीही मशागत केली. सुपीक भागातील माती आणून टाकली. खते-बियाणे सारखीच वापरून गव्हाची पेरणी केली. तुषार सिंचन पध्दतीने पाणी दिले. औषध फवारणी एकाच दिवशी केली. गव्हाचे पीक चांगले आले. पण झाले काय साजिदच्या शेतातील गहू वीस पोती झाले तर वाजिदच्या शेतातील गहू पंधरा पोती झाले. दोघांचे क्षेत्र तेवढेच, मशागत सारखीच मग उत्पन्नात फरक कसा काय झाला.


         त्यांनी परिचित असलेल्या एका आध्यात्मिक ज्ञान असलेल्या वयस्क व्यक्तीला याबाबत विचारले. ते म्हणाले, साजिदला मी ओळखतो. तो साध्या सरळ स्वभावाचा आहे. त्याची अल्लाहवर पूर्ण श्रध्दा आहे. तो शेतीत काम करताना मनात म्हणायचा माझ्या शेतात खूप गहू पिकू दे. त्यातला काही भाग मी गरीब गरजूना देईन. वाजिद तुझा स्वभाव आत्मकेंद्री आहे. गोरगरिबांना मतद करण्याची तुझी वृत्ती नाही. शेतात काम करताना तू मनात म्हणत होतास माझ्या शेतात खूप गहू पिकू दे. मी श्रीमंत होईन. गाडी, बंगला घेईन. यालाच म्हणतात जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नियत (उद्देश) चांगली ठेवा. बरकत (समृध्दी) आपोआप येईल.

रविवार, २३ मार्च, २०२५

शुभवार्ता देणारी रात्र : शबेकद्र

                     

                     डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

                          फोटो:साभार गुगल


        अल्लाह आपल्या दासांवर अत्यंत दयाळू, कृपाळू आणि मेहरबान आहे. मनुष्यप्राणी कुरआनच्या म्हणण्याप्रमाणे दृष्ट, अत्याचारी व अडाणी आहे. निसर्गातील प्रत्येक निर्मितीपेक्षा तो स्वतः कितीतरी पटीने दुर्बल आहे व अल्प वयोमर्यादा दाखवणारा आहे. पूर्वीच्या लोकांचे वय आजच्या मानाने जास्त असायचे. सर्वसाधारण माणसाचे वय शे-पाचशे वर्षे असायचे. परंतू आजचा मनुष्य साठ-सत्तरच्या पलीकडे फारसा जात नाही. कमी वयात कमी उपासना केल्याने कमी पुण्यप्राप्तीची खंत प्रत्येक माणसाला वाटणे साहजिकच आहे. परंतू अल्लाकडे दीर्घ आयुष्याला महत्त्व नसून तुमचा हेतू आणि सद्विचार याला महत्त्व आहे. म्हणून म्हणतात जैसी नियत वैसी बरकत.


       रमजानच्या महिन्यात एक पवित्र रात्र अशी दिली आहे की, ज्यातील प्रार्थना आणि उपासना एक हजार महिन्यापेक्षा जास्त पुण्य मिळवून देणारी आहे. या पवित्र रात्रीचा उल्लेख पवित्र कुरआनच्या तिसाव्या खंडात सूरह (अध्याय) अल्कद्रमध्ये आहे.


        ज्यात म्हटले जाते की, वमा अद्राका मा लैलतुल कद्र, लैलतुल कद्रि खैरूम्मिन अल्फिशहर या वचनाचा अर्थ असा तुम्हाला काय माहित की लैलतुल कद्र काय आहे. लैलतुल कद्र हजार महिन्यापेक्षा बेहतर रात्र आहे. म्हणजे ही रात्र आणि त्यात शांतपणे जागरण करून केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना, नमाज, दुआ, जप (जिक्र) व कुरआन पठण आणि याच प्रकारच्या सर्व उपासनांचा मोबदला हजार पटीने जास्त दण्यात येतो. त्याचप्रकारे दुष्कर्माचा गुन्हादेखील हजार पटीने जास्त दिला जातो.


        आपल्याला सुचविण्यात आले आहे की, या रात्रीला रमजान महिन्यातील अंतीम दहा दिवसाच्या विषम तारखांमध्ये शोधा. म्हणजे २१, २३, २५, २७, २९ या तारखांपैकी कुठल्याही एका तारखेला ही रात्र असू शकते. याचा अर्थ असा की या विषम तारखांमध्ये आपण जागरण करावे व अल्लाहचेइनाम प्राप्त करावे. या तारखांमध्ये कुठली उपासना करावी या संदर्भात असे सुचविण्यात येते की, ज्या उपासनेत आपले मन लागेल ती उपासना करावी. आपल्या आयुष्यात अनेक वेळची नमाज चुकली असेल. कजा ए उम्र म्हणून ती प्रथम भरून काढावी. अल्लाहकडे देण्यास खूप आहे. आपल्याला मागता येत नाही. अल्लाहकडे खूप मागा. कारण तिथे कोणीच मदतनीस मिळणार नाही. शबे कद्रसाठी हार्दिक शुभेच्छा.

शनिवार, २२ मार्च, २०२५

जकात देताना उद्देश चांगला हवा

जकात देताना उद्देश चांगला हवा

                    डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

                         फोटो: साभार गुगल 


       पवित्र कुरआनच्या आज्ञेप्रमाणे इस्लाम धर्माची इमारत मुख्य पाच स्तंभावर उभी आहे. या पाच स्तंभापैकी चौथे तत्व आहे दानधर्म. याला इस्लाम धर्मात जकात असे म्हणतात. आपल्या एकूण उत्पन्नापैकी २ टक्के रक्कम गरीब गरजू लोकांना दान करायची असते. जकात देताना देणाऱ्याचा उद्देश प्रामाणिक व स्वच्छ असावा हे सांगणारी कथा.


        रफिकखान नावाचा एक श्रीमंत मनुष्य होता. सचोटीने व्यापर धंदा करत होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या तत्वाचे तो पालन करत होता. मिळालेल्या उत्पन्नातून तो गरजूना मदत करायचा. त्याला प्रसिध्दीची अजिबात हाव नव्हती. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा जकात देताना तो करायचा नाही. एकदा त्याने जकात दयायचे ठरविले. पण जकात रात्रीच्यावेळी करायची तेही स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून करायची. जेणेकरून जकात देताना कुणी पाहणार नाही व स्वतःलाही कुणाला जकात दिली हे कळणार नाही. रफिकखानचा उद्देश खरा, प्रामाणिक होता.


        ठरल्याप्रमाणे त्याने रात्रीच्या वेळी डोळे बांधून एका व्यक्तीला जकात दिली. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. काल एका वेड्या माणसाने चोराच्या हाती पैशाचे पाकिट दिले. रफिकखान नाराज झाला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा त्याचप्रकारे जकात दिली. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. त्या वेड्या माणसाने एका वेश्या स्त्रीला पैशाचं पाकिट दिले. रफिकखानला वाटले अल्लाहनी जकता मान्य केली नाही. नाउमेद न होता त्याने तिसऱ्या दिवशीही तीच कृती केली. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. त्या माणसाने एका श्रीमंताला पैशाचे पाकिट दिले.


        रफिकखान नाराज होवून एका जाणकार हाफिजीकडे गेला व त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हाफिजी त्याला पूर्णपणे ओळखत होते. ते म्हणाले, बिल्कुल निराश होवू नकोस. जकात देण्याबाबतचा तुझा उद्देश चांगला होता. प्रामाणिक होता. तु चोराला जकता दिलीस त्यामुळे चोराला वाटेल की चोरी न करताही अल्लाह आपल्याला देत आहे. मग मी चोरी कशाला करू. वेश्या स्त्रिला वाटत असेल देहविक्री न करताही अल्लाह आपल्याला देत आहे. मग मी देहविक्री कशाला करू. श्रीमंताला वाटले असेल माझ्याकडे एवढी श्रीमंती आहे त्या दात्याप्रमाणे मी ही दानधर्म केले पाहिजे.


       या कथेचा सारांश असा की, दानधर्म करावा पण ते या कानाचे त्या कानाला कळू नये. प्रसिध्दी करू नये. दानधर्म करण्याचा हेतू चांगला असावा. अल्लाह त्याचीच जकात मंजूर करतो ज्याची नियत (उद्देश) साफ आहे.

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

जकात : एक आर्थिक उपासना

जकात : एक आर्थिक उपासना

                     डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                          फोटो:साभार गुगल


         रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे जकात. हे एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशेब करून देणे गरजेचे आहे. पवित्र कुरआनमधून अनेक ठिकाणी नमाज बरोबर जकातीचाही उल्लेख आढळतो.


         जकात 'साहिबे निसाब' म्हणजे दारिद्रयरेषेच्या वरची धनाढय लोक देतात. आजपासून तब्बल साडेचौदाशे वर्षापूर्वी ही दारिद्रयरेषा ठरविण्यात आली. ज्या माणसाजवळ ८४.४७९ ग्रॅम इतके सोने अथवा ६१२.३५ ग्रॅम इतकी चांदी किंवा या किमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफडी, शेअर सर्टिफकेट, कंपनीमध्ये इतर गुंतवणूक, लोकांना दिलेले कर्ज इत्यादि रकमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालाचा चाळीसावा भाग म्हणजे अडीच टक्के वजा करून गोरगरीबामध्ये वाटून टाकावी. जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात यावी. मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. आईवडील आपल्या मुलांमुलींना तसेच मुले आपल्या आईवडीलांना जकात देवू शकत नाहीत. तसेच आजी-आजोबा व मुलामुलीच्या संतानाना देखील जकात देवून शकत नाहीत. दांपत्य एकमेकांना जकात देवू शकत नाहीत. परंतू काही उलेमांच्या मते पत्नी पतीला जकात देवू शकते. कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही.


        मालावर एक संपूर्ण वर्ष ओलांडल्यानंतरच जकात लागू होते. वर्षाच्या मध्यंतरी कितीही माल आला. परंतू वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच खर्च झाला तर त्यावर जकात नाही. जकात अनिर्वाय होण्याइतका माल असला आणि वर्षभर त्यात माल जमा होत राहिला तर संपूर्ण जमा पुंजीवर जकात काढावी. काही विशेष कारणासाठी पैसे काढून ठेवले असतील. परंतू ते काम वर्षाच्या आत पूर्ण झाले नाही आणि रक्कम तशीच शिल्लक राहिली अशा रकमेवर जकात आकारावी, कुणी आपल्याकडे एक मोठी रक्कम अनामत ठेव म्हणून सांभाळ करण्याकरीता आणून ठेवली. अशा रकमेवरदेखील जकात नाही. मात्र मुळ मालकाने त्याची जकात दिली पाहिजे. पती आणि पत्नीचा माल वेगवेगळा आहे. दोघांनी वेगवेगळी जकात काढली पाहिजे.


        एलआयसी, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि असा सर्व निधी आणि रकमा ज्याचे स्वामित्व अथवा मालकी हक्क आपल्याकडे नसतील अशा सर्व रकमावर जकात लागू होत नाही. व्यवसायाची सर्व अवजारे व हत्यारे जसे डॉक्टरी मशिन्स, ट्रक, ट्रॅक्टर, वाहने, विमाने इत्यादिवर जकात नाही.

गुरुवार, २० मार्च, २०२५

हजरत सलमान फारशी (रदी.) यांची नम्रता

हजरत सलमान फारशी (रदी.) यांची नम्रता

                    डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                         फोटो:साभार गुगल


       मदाएनचे गर्व्हनर हजरत सलमान फारशी (रदी) हे अगदी साधेपणाने रहात असत. त्यांच्या अंगावर नेहमीच जाडे भरडे, ठिगळ लावलेले कपडे असत. एकदा ते बाजारातून सहज टेहळणी करत होते. त्यांना हमाल समजून एका सीरीयत व्यापाऱ्याने त्यांना बोलावून सांगितले की हे गवताचे ओझे आमच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे. योग्य ती मजूरी ओझे पोहोचविल्यावर मिळेल. व्यापाऱ्याचे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि भर बाजारातून त्या व्यापाऱ्याच्या पाठीमागून डोक्यावर गवताचा भारा घेवून चालू लागले. भर बाजारातून ही जोडी निघाली असता त्यांच्याकडे पाहून कित्येक लोक अगदी स्तंभित झाले. तर कित्येक लोक माना खाली घालून त्यांच्या वाटेतून बाजूला सरकू लागले. शेवटी एका धाडशी तरूणाने त्या व्यापाऱ्याला सांगितले की, हे हजरत मुहंमद पैगंबर सल्लल्लाहू अलैहिवस्सल यांचे जीवश्च कंठश्च सहकारी असून हे मदाएनचे गव्हर्नर हजरत सलमान फारशी रदील्लाह आहेत.


       त्या तरूणाचे ते बोलणे ऐकून तो व्यापारी आश्चर्याने थक्क झाला. त्याला वाटले की जणू आपल्यावर आकाशच कोसळत आहे. तो व्यापारी गर्व्हनर साहेबांची क्षमायाचना करू लागला. मी आपल्याला ओळखले नाही मला माफ करा असे विनवू लागला. मी आपला खूप अपराधी आहे. पश्चातापाने माझे अंतःकारण विदीर्ण होत आहे असे म्हणत तो त्यांच्या डोक्यावरील ओझे खाली ठेवण्यासाठी वारंवार विनवणी करू लागला. तेंव्हा सलमान फारशी रदील्लाह म्हणाले, हे सद्गृहस्था तुझ्याकडून कसलाही अपराध घडला नाही. तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. मी आपल्या सर्वांचा नम्र सेवक असून हजरत मुहंमद सल्लल्लाहू अलैहिवस्सलम यांचा एक मामूली सहकारी आहे. आपल्याकडून मला सेवा करण्याची संधी मिळाली. मला हे ओझे आपल्या घरापर्यंत पोहचवू दे. मी अंतःकरण पूर्वक  आपला ऋणी राहिन


       मदाएनचे गर्व्हनर सलमान फारशी (रदी) यांचे हे नम्रतापूर्ण वर्तन आजच्या काळात अनुकरणीय आहे. आजच्या थाटामाटात राहणाऱ्या लोकांनी, राज्यकर्त्यांनी त्यांचे थोडेफार हा होईना अनुकरण केल्यास आपल्या देशातून विषमतेचे उच्चाटन होईल व आपला देश वैभव संपन्न होईल यात शंका नाही. हजरत सलमान फारशी (रदी) यांच्याप्रमाणे साधी राहणी व उच्च विचारसरणी ठेवण्याचा प्रयत्न करू या.

बुधवार, १९ मार्च, २०२५

रमजान : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक

 रमजान : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक

                     डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

               
                          फोटो: साभार गुगल 


       मुस्लिम समाजातील पाच वेळा नमाजपठण करणाऱ्या बांधवाबद्दल मुस्लिमेतर सर्वच बांधवांच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यामुळे या देशाची संस्कृती, रितीरिवाज, लोकपरंपरा या सर्वाबद्दल सर्वांना माहिती आहे. धर्म भिन्न असले तरीही सहजीवन, समाजातील वावर, एकमेकांशी असलेला व्यवहार यामुळे एकमेकांच्या नात्यातील वीण घट्ट बांधलेली आहे. कोणत्याही हिंदू किंवा इतर धर्मिय बांधवांचा एखादा तरी अत्यंत जवळचा मुस्लिम मित्र नाही, असे फार क्वचित दिसेल. प्रत्येक  मुस्लिम बांधवाचा एक तरी हिंदू बांधव अत्यंत जिवलग मित्र असतोच. याच मैत्री, प्रेम आणि बंधुतेच्या धाग्यामुळे ते एकमेकांचा आदर करतात. यातूनच रमजान महिन्यात अनेक हिंदू बांधव रोजाधारकांचा आदर करतात. तसेच बरेच हिंदू बांधव रोजे करतात. सत्ताविसावा रोजा खासकरून करतात. मुस्लिम बांधवांना इफ्तारसाठी मिठाई, फळे पाठवतात.


        अलिकडच्या काळात असामंजस्यामुळे आणि काही राजकीय खेळीमुळे यासंबंधात दुरावा आणला जात असला तरी भारतातील सर्व धर्माचे बांधव सुज्ञ आणि विचारी आहेत. त्यामुमळेच तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे सहजीवन शेकडो वयापासून अबाधित आहे. आपला देश एका शरीराप्रमाणे आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला जर इजा झाली तर संपूर्ण शरीराला अस्वस्थता येते. वेदना, यातना भोगाव्या लागतात. आपले शेजारी, आप्त मंडळी सुखी समाधानी असतील. तरच आपण सुखी होवू शकतो. खरे तर आपण सारेच एकाच आई वडिलांची, एकाच धर्माची लेकरे आहोत. हा बंधुभाव सर्वांनी आपल्या मनात कायम ठेवून तो वृध्दींगत केला पाहिजे. इस्लामची तशी शिकवणच आहे, की सर्व माणसांनी एक समुदाय बनून राहिले पाहिजे. जसे की ईश्वराने त्यांना समुदायाच्या रूपात जन्मास घातले आहे असे पवित्र कुरआनमध्ये नमूद आहे. प्रारंभी लोकांचा एकच समुह समाज होता. (अलब क्र.२:२३१)


       अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी जास्त ईशपारायण आहे. म्हणजेच अल्लाहचे भय ठेवून सदाचार करणारा आहे. (अल्हजरात ४९:१३) आपल्या प्रतिष्ठेचे आणि यशाचे निकष आपला सदाचार आणि ईशपारायणात आहे. आपण सर्वांनी सर्वांशी हा बंधुभाव जोपासला तरी आपले जगणे व सहजीवन सुलभ आणि सहज होईल. नेमकी हीच संधी आपणास रमजान महिना करून देतो.

मंगळवार, १८ मार्च, २०२५

अतिथी सत्कार हे महान कृत्य

 अतिथी सत्कार हे महान कृत्य 

                      डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                          फोटो:साभार गुगल


       इबादत से जन्नत और खिदमतसे खुदा असे म्हटले जाते. याचा अर्थ असा भक्ती व प्रार्थना केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. आणि अतिथींचा सत्कार (पाहुणचार) केला तर अल्लाहची प्राप्ती होते, असा महत्वपूर्ण संदेश इस्लाम देतो.


       भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा स्तंभ अतिथी देवो भव यापेक्षा वेगळा कोणता संदेश देतो. आपल्या घरी पाहुणा आला तर त्याला अत्यंत सन्मानाने वागविले पाहिजे. त्यांच्याशी गोड भाषेत बोलले पाहिजे, असे हजरत मुहंमद पैगंबर सल्लल्लाहू अलैहिवस्सलम आपल्या अनुयायास शिकविले. आपणास त्रास झाला किंवा आपली गैरसोय झाली तरी त्याची पर्वा न करता आपण पाहुण्यांच्या सुखसोयीकडे लक्ष दिले पाहिजे. पवित्र कुरआनमध्ये (१०:६९) याचा संदर्भ आला आहे. इस्लामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नसल्याने भेटावयास आलेली व्यक्ती जगाच्यादृष्टीने कितीही हलक्या दर्जाचा असली तरीही तिचा आदरपूर्वक सन्मान व्हावा.


       एकदा हजरत मुहंमद पैगंबर (स.अ.) आपल्या सोबतियांबरोबर बसलेले असताना एक पाहुणा आला. पैगंबर साहेबांनी उपस्थितांना विचारले, आहे कुणी ! जो या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करू शकेल ? कुणीही पुढे सरसावला नाही. दुसऱ्यांदा विचारले असता एक सोबती उठला आणि त्याचे पाहुण्याला घरी नेले. पत्नीला विचारले असता उत्तर मिळाले, की घरात दोनच नान आहेत आणि मुले अजून जेवली नाहीत. ते पत्नीला म्हणाले, की काळजी करू नकोस. मुलांना कसेबसे गोष्टी सांगून झोपव. मी काही बहाणा करून दिवा विझवतो. दोघे अंधारात जेवायला बसले. सोबती पाहुण्याबरोबर जेवण केल्याचा अभिनय  करत होते. पूर्ण परिवार उपाशी झोपला. पाहुण्याला मात्र त्यांनी उपाशी झोपू दिले नाही.


        इस्लाममध्ये सतकृत्याची फार मोठी कदर आहे. मनुष्याचा मोठेपणा हा नेहमी सत्कृत्यावरून मोजला जातो. नुसता अफाट पैसा, उच्च प्रतिचा मानसन्मान किंवा खानदानी घराणे यामुळे मोठेपणा प्राप्त होत नाही. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी सत्कृत्य केले पाहिजे. (पवित्र कुरआन २:१९५) ही शिकवण पवित्र कुरआन देते. हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) प्रवचन करीत असता सत्य, सदाचार, या विषयावर बोलताना म्हणाले की, प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकारच होय. रस्त्यावर पडलेले दगड, कोटेकुटे दूर करणे, तहानलेल्यांना पिण्यासाठी पाणी देणे या सर्व गोष्टी परोपकाराच्या सदरात येतात. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव असा परोपकार करून पुण्य मिळवतात.

सोमवार, १७ मार्च, २०२५

हजरत अयुब अलैस्सलाम यांची अल्लाह भक्ती

 हजरत अयुब अलैस्सलाम यांची अल्लाह भक्ती

                  डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी



                        फोटो:साभार गुगल


       हजरत अयुब अलैहिस्सलाम हे फार श्रीमंत गृहस्थ होते. त्यांना पुष्कळ शेती, जनावरे, गाई, उंट, शेळ्या होत्या. तेथे त्यांची सात मुले व सात मुली व हे दोघे नवराबायको रहात असत. इतकी श्रीमंती असून ते अल्लाहची प्रार्थना करण्यात मश्गुल असत. त्यांची अल्लाहची भक्ती मोडण्याचा अगर त्यांना त्या भक्तीपासून परावृत्त कसे करता येईल व त्या मार्गापासून दूर ठेवण्याची शैतानने आव्हान देवून अल्लाहचा लाडका सेवक अल्लाहपासून अलग करून दाखवीन असा विडा उचलला. परंतू अल्लाहनी त्याला सांगितले की, माझी भक्ती करणारा माझा सेवक हा कितीही संकटे आली तरी तो इबातद(भक्ती) पासून दूर होणार  नाही. पुढे शैतानाने एकामागून एक संकटे आणण्यास सुरूवात केली.


        पहिले संकट त्यांची शेती, पिके नष्ट केली. दुसरे संकट सर्व जनावरे मारून टाकली. तिसरे संकट भुकंप झाला. त्यात हजरत अयुब (स.) यांची सर्व मुले दफन झाली. फक्त ते दोघे पती-पत्नी शिल्लक राहिले. या संकटानेही दोघे भ्याले नाहीत. त्यांची भक्ती चालूच होती. एका श्रीमंताची पत्नी उदरनिर्वाहासाठी बाहेर काम करून पोट भरण्याची वेळ आली. हे सर्व एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे हजरत अयुब (स.) यांच्या शरीरात किडे पडले व घाण वास मारू लागला. त्यामुळे शेजारी पाजारी, गावातील लोक त्यांचा तिटकारा करू लागले. त्या साध्वीस छळू लागले. तुझ्या पतीला गावाबाहेर घेवून जा असे म्हणू लागले. तिने एके दिवशी आपल्या पतीला पाठीवर उचलून घेवून एका वनात आणून ठेवले. ना पाणी ना अन्न असे ते जंगल पण त्या साध्वीने धीर सोडला नाही. इबादत थांबवली नाही. हजरत अयुब (स.) यांचे सर्व शरीर खराब झाले. फक्त जीभ शाबुत होती. त्या जिभेने ते नमाज पठण करत. त्यांची पत्नी बीबी रहिमत गावात मजुरीचे काम करून जे मिळेल ते घेवून आपल्या पतीस जेवू घालत असे. त्यांचे सर्व शरीर सर्व नासले तरी ती सेवा करत होती. ह. अयुब (स.) इबादत बंद करत नव्हते. त्यांच्यापुढे शैतानही थकला.


       शेवटी अल्लाहनी दया दाखवून हा माझा खरा बंदा (सेवक) आहे असे दाखवून दिले. ह. अयुब (स.) यांना बीबी रहिमतने विचारले, इबादतीकरीता जीभ शिल्लक आहे, मग तुम्ही अल्लाहजवळ प्रार्थना का करत नाही. त्यावेळी ते म्हणाले, जेवढे सुख मी भोगले, तेवढे दुःख भोगल्याशिवाय अल्लाह मला क्षमा करणार नाही. हे शब्द ऐकून अल्लाहनी जिब्राईल अलैसल्लम यांना पृथ्वीवर पाठवले ते हजरत अयुब (स.) जवळ येवून बसले व अल्लहाच्या कृपेने त्यांनी पाण्याच्या दोन विहिरी निर्माण केल्या. एक गरम व एक थंड पाण्याची. जिब्राईल अलैस्सलम यांनी त्यांना आंघोळ घातली. त्याबरोबर ते संपूर्ण चांगले झाले.

रविवार, १६ मार्च, २०२५

असा हवा व्यापारातील प्रामाणिकपणा

असा हवा व्यापारातील प्रामाणिकपणा  

                  ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                          फोटो:साभार गुगल


        इस्लाम हा एक स्वतंत्र अबरी शब्द आहे. त्याचा अर्थ शांतता प्रस्थापित करणे. अल्हावर संपूर्ण विश्वास व श्रध्दा ठेवणे, अल्लाहना पूज्य आणि सर्व ब्रम्हांडाचा एकमेव स्वामी मानणे, त्याला लीनतेने शरण जाणे, अल्लाहची अनन्याभावे प्रार्थना आणि उपासना करणे, त्यांना आपले सर्वस्व अर्पण करून त्यांच्या आज्ञेबरहुकूम वागणे, त्यांच्या आज्ञेच्या, शिस्तीच्या आणि प्रसन्नतेच्या विरूध्द कोणतेही वाईट काम न करणे. या सर्व बाबींचे पालन करून व्यापार करणाऱ्या इमाम अबूहनिफा यांच्या जीवनातील हा प्रसंग.


       इमाम अबू हनिफा इस्लामी शरीअत कायद्याचे तज्ञ अन् कापड दुकानदारही होते. ते प्रामाणिकपणे कपड्यांचे व्यापार करायचे. कणाकडूनही वाजवी दरापेक्षा जास्त रक्कम घ्याचे नाहीत. कुणाचीही फसवणूक करायचे नाहीत. एकदा नोकराला ताकीद देवून ते बाहेर गेले की, या कपड्याच्या ताग्यातील दोष ग्राहकाला दाखवून वीक. ते कामावरून परत आले व त्यांनी पाहीले तो तागा विकला गेला आहे. त्यांनी नोकराला त्याबद्दल विचारले. त्या ताग्यातील दोष दाखविण्यास नोकर विसरला होता. इमाम अबू हानिफा यांनी नोकराला पुन्हा विचारले की, ग्राहक कोण व कसा होता. त्याचा तांडा कोणत्या दिशेने गेला.


       ते न थांबता घोड्यावर बसून त्या दिशेकडे रवाना झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी काफिलेवाल्यांना गाठून ग्राहकाला शोधून काढले. तो ग्राहक ख्रिश्चन समाजातील तरूण होता. इमाम अबू हानिफा यांनी त्या ग्राहकाला सांगितले की, नोकराची चूक झाली. एक तर पैसे तरी परत घे आणि कापड परत कर किंवा मालाप्रमाणे दरामध्ये कमी झालेली रक्कम तरी परत घे. तो ग्राहक तरूण तंबूत गेला. कापड परत आणले आणि दिलेली जास्त रक्कम परत घेतली आणि ती रक्कम त्याने जंगलात फेकून दिली आणि तो रडू लागला.


       इमाम अबू हानिफ यांनी त्याला रडण्याचे कारण विचारले. तो ग्राहक त्यांच्याकडे वळला आणि म्हणाला, मी इस्लामच्या अनुयायाबद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले. मला आपला शिष्य करा.


       असे होते त्या काळाचे मुस्लिम व्यापारी. भारतीयांना इस्लामचा परिचय ज्या माध्यमातून झाला त्यात सर्वात मजबूत साधन व्यापार हे होते. इमानदार व्यापाऱ्यांकरीत हजरत मुहमंद पैगंबर साहेबांनी फर्माविले आहे की, प्रलयाच्या दिवशी त्यांना हिशेब तपासणीसाठी बोलावले जाईल. हिशेब चोखपणे देण्यासाठी सज्ज असलेल्या इमाम अबू हानिफ यांना हार्दिक सलाम.

शनिवार, १५ मार्च, २०२५

परोपकारातून परमार्थ

 परोपकारातून परमार्थ

                    डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळ

                          फोटो:साभार गुगल


       कादरखान नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते. त्यांचा अल्लाहवर विश्वास होता. ते नमाजपठण करायचे. पण अल्लाहच सर्व काही देतो यावर त्यांची श्रध्दा नव्हती. दानधर्म करताना त्यांचा हात सढळ नव्हता. लोकांना मदत करताना ते कुरकूर करायचे. त्यांच्या मालकीची कंपनी होती. शेकडो मजूर कंपनीत काम करत होते. हे जे वैभव आहे ते मी मिळवलय असे त्यांना वाटायचे. ते आपल्या कंपनीच्या कामातच जास्तीत जास्त वेळ घालवायचे.


       एके दिवशी ते कंपनीतून घरी आले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटूंबियांनी डॉक्टरांना बोलवून चेकप केले. त्यांच्या शरीरामध्ये काहीही दोष नव्हता. डॉक्टरांनी औषधे दिली. झोपेची गोळी दिली. पण त्यांना झोप येईना. उठून पाहतात तर रात्रीचे तीन वाजलेले. ते घराजवळच असलेल्या मस्जिदच्या कट्ट्यावर बसले. बालपणीच्या आठवणी काढत बराच वेळ तिथेच बसले. ते परत निघणार तोपर्यंत तिथे एक कुत्रा आला व त्याने कादरखानजीचे एक चप्पल तोंडात उचलून चालू लागला. ते कुत्र्याच्या मागे चालू लागले. बरेच अंतर चालून गेल्यावर कुत्र्याने त्यांचे चप्पल एका छोट्याशा घराजवळ टाकले.


       शेठजीना त्या घरातून एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. ती स्त्री का रडतेय बघावे तरी असे कादरखानशेठजीना वाटले. म्हणून ते त्या स्त्रीच्या दरवाजाजवळ गेले आणि तिला म्हणाले, ताई गैरसमज करून घेवू नका. पण तुम्ही एवढ्या का रडत आहात. तिने सांगितले की, माझी ही सात वर्षाची मुलगी आजारी आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. ऑपरेशन करण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत. माझ्या पतीचे वर्षापूर्वी अपघाती निधन झाले आहे. अशा स्थितीत मी काय करू शकते. अल्लाहजवळ रडून रडून दुआ मागत आहे.


       कादरखान शेठजीनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलवली. त्या मुलीला दवाखान्यात नेवून ऑपरेशन करून घेतले. सगळा खर्च भागवला. त्या स्त्रीला आपल्या कंपनीत नोकरी दिली. रहायला एक खोली दिली. या मुदतीत त्यांची अस्वस्थता कुठल्या कुठे पळून गेली. या प्रसंगानंतर त्यांना वाटले मी खूप काही मिळवले ते सर्व अल्लाहची माझ्यावर कृपादृष्टी होती म्हणून. माझी अस्वस्थता दूर करण्याचा परोपकाराचा मार्गही त्यानेच दाखवला. मला समजले अल्लाह कर्ता करविता आहे. परोपकारातून ही परमार्थ (जन्नतुल फिरदौस) साधता येतो. या रमजानमध्ये परोपकार करून अल्लाहची कृपा मिळवू या.

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांचे झाडांबाबतचे विचार

 हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांचे झाडांबाबतचे विचार

               ✍️: डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                          फोटो : साभार गुगल


       इस्लामचे प्रेषित हजरत मुहमंद पैगंगर सल्लल्लाहू अलैहिवस्सलम प्रवासात असताना एकदा दोन कबरीजवळ पोहोचले. ते त्या दिवशी थोडे विचलित झाले. त्याने जवळच असलेल्या एका झाडाच्या दोन फांद्या तोडल्या आणि दोन्ही कबरीवर रोवल्या. त्यांची ही कृती पाहून सोबत्यांनी त्यांना असे करण्याचे कारण विचारले तेव्हा पैगंबरसाहेब म्हणाले, या कबरीत असलेल्यांना अजाब म्हणजेच यातना होत आहेत. मला याची जाणीव झाली. मी या फांद्या कबरीवर खोचल्या आहेत. या डहाळ्या जोपर्यंत वाळत नाहीत, तोपर्यंत त्या डहाळ्या अल्लाहच्या नावाचा जप करत राहतील आणि त्यामुळे कबरीत असलेल्यांच्या यातना दूर होतील.


       हजरत मुहमंद पैगंबर सल्लल्लाहू अलैहिवस्सलम यांच्या या कृतीने एक गोष्ट अशीही सिध्द होते की, आजपासून १४०० वर्षापूर्वी पैगंबर साहेबांना या विधानाची जाणीव होती की, झाडे सजीव आहेत म्हणूनच ते अल्लाहच्या नावाचा जप करू शकतात. म्हणजेच श्वास घेतात. झाड वाळल्यानंतर कदाचित ते मरत असतील. पण जिवंतपणी मानवासाठी वरदान ठरतात. आणखी एके दिवशी पैगंबर साहेबांनी सांगितले आहे की, झाडांना सुर्यास्तानंतर हात लावून त्रास देवू नका. कारण ही वेळ त्यांच्या विश्रांतीची असते. त्यांची झोपमोड करणे पाप आहे. १४०० वर्षापूर्वी प्रेषितसाहेबांनी केलेली ही कृती त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देते.


       पैगंबर साहेबांच्या वचनसंग्रहात एक विलक्षण वचन असे आहे. ज्यात प्रेषित हजरत मुहमंद (स.अ.) फर्मावतात की, तुम्ही प्रलय येत असलेला पाहत असाल आणि तुमच्या हातात खजुराच्या झाडाचे रोपटे असेल तर आधी त्याचे रोपण करा. झाडे, पर्यावरण याबाबत प्रेषितसाहेबांनी दिलेली ही केवळ एक सूचना नसून संपूर्ण मानवजातीला जणू काही आदेशच देण्यात येत आहे. त्यांना प्रलयाची कल्पना होती. आपणास माहिती आहे की, प्रलयानंतर विश्वात काहीच उरणार नाही. तरीसुध्दा प्रेषितसाहेब झाडे लावण्याचा आग्रह करीत आहेत. यातून आपण झाडे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची आवश्यकता समजू शकतो. पवित्र कुरआनात अनेक अध्यायामधून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची ताकीद दिली आहे. झाडे लावून पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची, आमची आपल्या सर्वांची आहे. म्हणून यावर्षी रमजानमध्ये झाडे लावून ती वाढवण्याचा संकल्प करूया.

गुरुवार, १३ मार्च, २०२५

अल्हाह पहात आहे

 अल्हाह पहात आहे

                    डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


फोटो:साभार गुगल


       नाफे अ (रजि.) म्हणतात, की हजरत अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) एकदा मदिना मुनव्वराच्या बाहेर निघाले हाते. खुद्दाम त्यांच्याबरोबर होते. जेवणाची वेळ झाली. खुद्दामने दस्तरखान अंथरले. दस्तरखान म्हणजे जेवतांना वापरावयाचा कपडा. ज्याच्यावर ताट ठेवून मुस्लिम बांधव जेवण करतात. सर्वजण जेवायला बसले. एक मेंढपाळ शेळ्यामेंढ्यांना राखत तिथून निघाला होता. त्याने सर्वांना अस्सलमो अलैकुम म्हटले.


        हजरत इब्ने उमर (रजि.) यांनी त्याला जेवायला बस म्हटले. तो म्हणाला, आज माझा रोजा (उपवास) आहे. हजरत इब्ने उमर (रजि.) म्हणाले, किती कडक उन्हाळा जाणवत आहे. ऊन बरसत आहे आणि अशावेळी तू रोजा करत आहेत. तो म्हणाला, मी माझ्यासाठी सवाब (पुण्य) अल्लाहकडून मिळवत आहे. त्यामुळे मला कसलाही त्रास वाटत नाही.


        त्यानंतर हजरत उमर (रजि.) त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणाले, आम्हाला एक बकरी विकत घ्यायची आहे. तिची किंमत सांग. आम्ही तिची कुर्बानी करू आणि तुलाही त्यातील काही भाग देवू. की जो तुला रोजा सोडतेवेळी उपयोगी पडेल. तो म्हणाला, या बकऱ्या माझ्या नाहीत. मी तर गुलाम आहे. या बकऱ्या माझ्या सरदाराच्या म्हणजेच मालकाच्या आहेत. हजरत इब्ने उमर (रजि.) म्हणाले, सरदाराला कसे कळेल. समज कळलेच तर म्हण की, लांडग्याने खाल्ली म्हणून. त्याने आकाशाकडे बोट दाखवत म्हटले, तो सर्वज्ञ अल्लाह पहात आहे ना. मग मी कस सांगू लांडग्याने खाल्ली म्हणून हजरत इब्ने उमर (रजि.) आश्चर्यचकीत झाले. ते मनात म्हणाले, एक गुराखी म्हणतो अल्लाह पहात आहे. किती प्रामाणिक आहे हा. त्यानंतर हजरत इब्ने उमर (रजि.) यांनी त्या गुलामाला आणखी बकऱ्या खरेदी करून दिल्या. त्याला गुलामीतून मुक्त केले.


        वरील प्रसंगावरून आपणास बोध मिळतो की, आपण जे काय करत आहोत ते अल्लाह पहात आहे असा भाव मनात ठेवनू केले तर आपल्या हातून कधीच गैरकृत्य घडणार नाही. नमाजपठण करताना चित्त विचलित होते तेव्हा अल्लाह आपल्याकडे पहात आहे असे समजून नमाजपठण करावे. त्यामुळे एकाग्र होवून अल्लाहची उपासना करता येते. जी उपासना अल्लाह कबुल करेल व आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होईल. (फजाईल अमाल पानं.७००)

बुधवार, १२ मार्च, २०२५

इस्लाम धर्मातील स्त्रियांचे स्थान

इस्लाम धर्मातील स्त्रियांचे स्थान

                   ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                        फोटो:साभार गुगल


        इस्लाम धर्म स्त्री आणि पुरूष भेद मानत नाही. स्त्रीला गुलाम म्हणून न वागविता त्यांना बरोबरीच्या हक्काने वागवावे, अशी कुरआनची आज्ञा आहे. स्त्रियांचे हक्क पवित्र आहेत. त्यांना दिलेले हक्क अबाधित राहतील अशी खबरदारी घ्या. हे उद्गार आहेत हजरत मुहंमद पैगंबर सल्लल्लाहू अल्लैहिवसल्लम यांचे . स्त्री म्हणजे आपल्या लहरीप्रमाणे वागणारी एक व्यक्ती नसून आपल्या बरोबरीने वागणारी सामान्य व्यक्ति आहे. असे प्रत्येकाने समजले पाहिजे. इस्लाम धर्मात स्त्रियांचा दर्जा फार मोठा आहे. तिला पशुप्रमाणे वागविण्याचा किंवा तिला मारझोड करण्याचा पुरूषाला अधिकार नाही. आपण जर स्त्रियांची कुचंबना करू, त्यांना शिवीगाळ करून दुखवू अल्लाहच्या घरी आपण गुन्हेगार ठरू. स्त्रियांना चांगल्या तन्हेने वागवा अशी अल्लाहची आज्ञा आहे.


       मुस्लिम म्हणविणाऱ्याने आपल्या पत्नीचा व्देष करू नये. तिच्या एखाद्या दुर्गुणाकडे पाहून नाखूष असाल तर तिच्या सद्गुणाकडे पाहून प्रसन्न व्हा. असा पैगंबर साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. एका गृहस्थाने आपल्या पत्नीस कसे वागवावे असे पैगंबरसाहेब यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले, तुम्ही ज्यावेळी खाता त्यावेळीच तिला खावयास द्या. आपल्याबरोबर तिलाही कपडे खरेदी करा. तिला शिवीगाळ करू नका. मारहाण करू नका.


       आपल्या पत्नीशी अत्यंत सहृदयतेने वागणे याचा अर्थ तिच्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा गौरव करणे होय. पैगंबर साहेबांच्या दृष्टीने पत्नीची योग्यता फार मोठी आहे. तिचे स्थान उच्च आहे. तिची प्रसन्नता हा आपल्या उत्कर्षाचा व सौख्याचा पाया आहे, असे आपण मानले पाहिजे. याहीपुढे जावून हजरत मुहंमद पैगंबर अलैहिवसल्लम म्हणतात, संतुष्ट स्त्रीने आपल्या पतीबद्दल केलेली प्रार्थना अल्लाह लवकर ऐकतात व त्याला स्वर्गात उच्च स्थान देतो.


        स्त्रियामध्ये विधवांची स्थिती अनुकंपनिय असते. त्यांचा जगामधला आधार तुटलेला असतो. त्यांचे सौख्य नष्ट झालेले असते. अशा विधवा स्त्रियांची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या होरपळून गेलेल्या भावनांवर सहानुभूतीची फूंकर घातली पाहिजे. त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदात जाईल, अशी खबरदारी घेतली पाहिजे. स्त्रियांना दिलेले हक्क-अधिकार केवळ दिखाऊ आहेत अशी कोणाची कल्पना असेल तर ती चुकीची आहे. स्त्रियांचे हक्क पवित्र व शाश्वत आहेत. रमजानमध्ये पहाटे उठून सेहरीची व रोजा असताना इफ्तारची व्यवस्था करणाऱ्या स्त्रीचा आदर करा. कराल ना!

मंगळवार, ११ मार्च, २०२५

नमाजमध्ये एकाग्रता ठेवा

 नमाजमध्ये एकाग्रता ठेवा 

               ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                         फोटो:साभार गुगल


        दररोज पाचवेळा मस्जिदअमनमध्ये नमाजसाठी जात असे. एके दिवशी काय झाले कुणास ठाऊक, तो हाफिजीना म्हणाला, मी उद्यापासून मस्जिदमध्ये नमाजला येणार नाही. यावर हाफिजी म्हणाले, का काय झाले, का नाही येणार. अमन म्हणाला, मी दररोज बघतो की लोक इथे येवून गप्पा मारतात. काहीजण नेहमी फॅनखालचीच जागा , विषयाला सोडून इतर गोष्टीवर चर्चा करण्यात वेळ घालवतात. अमका नमाजला येत नाही, तमका वर्गणी देत नाहीत याबद्दल बोलतात म्हणून मी उद्यापासून येणार नाही.


       अमनच्या बोलण्यावर हाफिजी शांतपणे बसले व नंतर म्हणाले, ठीक आहे तु म्हणतोस ते पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी तुला काहीतरी सांगू इच्छितो ते कर. अमन म्हणाला, सांगा मी तयार आहे. हाफिजी म्हणाले, हा पाण्याने भरलेला काचेचा ग्लास घे आणि मस्जिदीभोवती दोन प्रदक्षिणा घाल. परंतू माझी एक अट आहे की प्रदक्षिणा घालताना पाण्याचा एक थेंबसुध्दा खाली पडता काम नये. अमन म्हणाला, हे तर फारच सोपे काम आहे. ग्लास घेवून तर दोन प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यात काय मोठं काम आहे.


       अमन ग्लास धरून प्रदक्षिणा घालू लागला. ग्लास पाण्याने काठोकाठ भरलेला होता. भरभर चालता येत नव्हते. कारण पाण्याचा थेंब खाली पडण्याची भिती होती. अमनने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या व हाफिजीजवळ गेला. हाफिजीनी अमनला तीन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता प्रदक्षिणा घालताना तू लोकांच्या गप्पा ऐकल्यास, तुझ्या मनात त्यांच्या गप्पांचा विचार आला. दुसरा प्रश्नहोता, ठराविक लोक फॅनखालची जागा घेतात हा विचार आला. तिसरा प्रश्न होता लोकांच्या भक्ती सोडून चाललेल्या चर्चाबद्दल विचार मनात आला. अमन म्हणाला, मला यातलं काहीच मनात आले नाही. तसा विचारही मी केला नाही. माझे लक्ष फक्त या ग्लासकडेच होते. हाफिजी म्हणाले, पाणी खाली पडू नये म्हणून तू पूर्णपणे एकाग्र झाला होतास म्हणून तुझ्या मनात इतर गोष्टी आल्या नाहीत. यापुढे जेव्हा तू मस्जिदीमध्ये येशील तेव्हा एकाग्र होवून नमाजपठण कर. इतर गोष्टीबद्दल विचार करून नकोस. अल्लाह आपल्याकडे पहात आहे किंवा आपण अल्लाहना पहात आहोत असा भाव मनात ठेवनू अल्लाहची उपासना कर. अल्लाह तुला क्षमा करतील. तुझ्या इच्छा पूर्ण करतील. आपली नमाज कबुल होईलच ही खात्री बाळग.

सोमवार, १० मार्च, २०२५

इबादतीचा (भक्तीचा) पूल बांधूया

 इबादतीचा (भक्तीचा) पूल बांधूया

✍️: डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

फोटो:साभार गुगल
 

       रमजान महिना हा अल्लाहच्या इबादतीचा (भक्तीचा) महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सुर्योदयापूर्वीपासून सुर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही मुखात न घेता राहतात. दिवसभर व रात्री उशीरापर्यंत नमाजपठण, कुरआन पठण, तरावीहची विशेष नमाज अदा करतात. ही इबादत सर्वांना जीवनात जगण्याचे बळ अल्लाह कृपेने येते हे सांगणारी ही कथा.


       सलीम नावाचा एक गरीब माणूस शहरात कामानिमित्त गेलेला असतो. एके ठिकाणी त्याला खूप गर्दी झालेली दिसली. त्याने गर्दीबाबत विचारले असता त्याला राज्याचा भावी राजा निवडला जाणार आहे हे कळले. रस्त्यावर लोकांची मोठी रांग उभी होती. राजहत्ती पुष्पमाला घेवून निघाला होता. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो भावी राजा होणार होता. सलीम पण त्या रांगेत उभा राहिला आणि आश्चर्य हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली.


       सलीमला राजवाड्यात नेल्यावर राजा होण्यापूर्वी त्याला अटी सांगितल्या गेल्या की, ही निवड पाच वर्षापर्यंत राहील. पाच वर्षानंतर एक नदी पार करून जंगलात रहायला जावे लागेल. त्या नदीत मोठमोठ्या मगरी आहेत. त्या मगरीच्या तडाख्यातून जीव वाचविणे कठीण आहे. यापूर्वी बऱ्याच राजांनी आपला जीव गमावला आहे. सलीमने विचार केला पाच वर्षे तरी राजाप्रमाणे जगता येईल आरामात. नंतरचे नंतर बघू. त्याने राज्यकारभार हाती घेतला. उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. लोकोपयोगी अनेक कामे केली. बघता बघता पाच वर्षे संपली. राजाला आता इथून गेले की, आज जंगलात जावे लागणार हे बघून प्रजेला खूप दुःख झाले. पण सलीमराजा खूष होता. तो खूष होण्याचे कारण वेगळे होते.


       गेल्या पाच वर्षात त्याने जंगलात राहणाऱ्या लोकांच्या मदतीने नदीवर एक भक्कम लाकडी पूल बांधून घेतला होता. मगरींच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग सलीमने आधीच तयार केला होता. त्यामुळे तो निश्चित होता.


       बंधूभगिनीनो ही कथा सलीमराजाची नसून अखंड मानवजातीची आहे. मानवाने आपल्या जीवनात भक्तीचा, सत्कार्याचा पूल बांधून ठेवला पाहिजे. तरच तो संसार सागरातून पार होईल. सुलभतेने रमजान महिन्यात इबादतीचा (भक्तीचा) पूल बांधू या.


- डॉ.सौ.ज्युबेदा तांबोळी