शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाताळ ख्रिसमस - विशेष लेख


नाताळ ख्रिसमस: विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       

       नाताळ  किंवा ख्रिसमस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म ही दंतकथा किंवा काल्पनिक गोष्ट नसून एक ऐतिहासिक घटना आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पवित्र शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त हे देवाचे, जिवंत देवाचे पुत्र आहेत.


       या देवाच्या पुत्राला या भूतलावर मनुष्याचा जन्म का घ्यावा लागला ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातील पहिलं पुस्तक अर्थात उत्पत्तीच्या पुस्तकात पहावे लागेल.


       उत्पत्तीच्या पुस्तकात असे नमूद केलेले आहे की, देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आकाश, पृथ्वी, समुद्र, नद्या, डोंगर, झाडी, पशू, पक्षी, पाण्यातील जीव इत्यादी आणि सर्वात शेवटी त्याने आदाम आणि इव्ह अर्थातच पुरुष व स्त्री यांची निर्मिती केली. देवाने या पुरुष आणि स्त्रीला ऐदेन नावाच्या बागेत ठेवले होते. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणिमात्र यांच्यावर देवाने मनुष्याला अधिकार दिला होता. बागेतील वाट्टेल त्या झाडाचे फळ खाण्याची मुभा होती पण 'बऱ्या वाईटचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको' अशी देवाने आदामाला आज्ञा दिली होती. 'ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील' अशी ताकीद देवाने आदामाला दिली होती. पुढे उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटले आहे की, सर्प जो सैतानाचा प्रतीक आहे, ज्याच्या आमिषाला बळी पडून स्त्रीने, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करून, त्या झाडाचे फळ खाल्ले व आदामाला ही ते खाण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीमुळे, पाप या जगात आले व मनुष्य देवापासून दूर झाला. देवामध्ये व मनुष्यामध्ये या पापामुळे एक दरी निर्माण झाली. ( उत्पती३ः१७-१९)


       देव जो पवित्र आहे, प्रेमळ आहे, कनवाळू आहे त्याची इच्छा होती की, मनुष्याबरोबर समेट करावा. यासाठी सर्वप्रथम पापाची खंडणी गरजेची होती. पापाचे वेतन मरण आहे. रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. रक्ताशिवाय जिवंत राहता येत नाही. अर्थातच पापक्षमेसाठी रक्तार्पण होऊ लागलं. प्राण्यांना व पक्षांना बळी देण्याची प्रथा सुरू झाली. परंतु या प्रथेने पापाचा नायनाट होत नव्हता तर पापावर तात्पुरते पांघरूण घातले जात असे आणि मनुष्य पुन्हा पुन्हा पाप करत असे व निष्पाप जनावरांचा व पक्षांचा बळी जात असे. देवाला या गोष्टीचा वीट आला. पापांच्या क्षालनासाठी पुरेपूर परिपूर्ण व कायमस्वरूपी खंडणी गरजेची होती अनिवार्य होती आणि म्हणून गलतीकारास पत्र ४ः४ मध्ये म्हटले आहे, 'काळाची पूर्णता झाली तेंव्हा देवाने पुत्राला पाठवले.' तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एका विशिष्ट उद्देशासाठी झाला होता. ख्रिस्ताचा जन्म ख्रिस्ती धर्म स्थापित करण्यासाठी नव्हे तर पापात गुरफटलेल्या समस्त मानव जातीला पापापासून सुटका करण्यासाठी, पापाच्या शापापासून त्यांना बंधमुक्त करण्यासाठी, लोकांना क्षमेचा अनुभव देऊन सार्वकालिक जीवनाची आशा देण्याकरिता ख्रिस्ताचा जन्म झाला होता.


     ख्रिस्ताचा जन्म झाला तेंव्हाच त्याने मोठेपणी मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावर बलिदान देणे निश्चित होते. मनुष्याच्या पापासाठी एका निष्पाप मनुष्याचाच बळी आवश्यक होता आणि यासाठी देवाला त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवावं लागलं. त्या देवाच्या पुत्राचा जन्म आपण नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून जगभर साजरा करतो.


ख्रिसमसचा केंद्रबिंदू:

       आज ख्रिसमस साजरा करताना लोक ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, ख्रिसमस केक इत्यादि गोष्टींचा समावेश करतात परंतु आपण सर्वांनी ख्रिसमसचा केंद्रबिंदू कधीच विसरता कामा नये आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला जगाचा प्रकाश म्हणतो (योहान८:१२) प्रकाश हा प्रत्येक सणाचा अविभाज्य हिस्सा आहे आणि ख्रिसमसचा प्रकाश म्हणजे स्वतः प्रभू येशू आणि प्रभू येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनादेखील जगाचा प्रकाश म्हणतो. मत्तय ५:१४,१६ मध्ये ते म्हणतात, "तुम्ही प्रकाश आहात त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा."


ख्रिस्ती जीवनशैली:

       ख्रिस्ती ही एक जीवनशैली आहे. या ख्रिसमसच्या दिवशी आपण सर्वांनी हे लक्षात ठेऊया की, ख्रिस्त आपल्याला धर्मांतर करायला शिकवत नाही तर कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करा असे अवाहन करतो. आपल्याला जर ख्रिसमस खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर आपण इतरांना क्षमा करू या, दुःखितांचे अश्रू पुसूया आणि सर्वांशी प्रेमाने आणि शांतीने वागून हा ख्रिसमस साजरा करू या. गरजू लोकांना मदतीचा हात देवू या. हे नेहमी लक्षात ठेवू या की, ख्रिसमसच्या दिवशी देवाचा पुत्र मनुष्य झाला जेणेकरुन मनुष्याच्या पुत्रांना देवाचे पुत्र होण्याचे सौभाग्य मिळावे.


सर्वांना ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा.....।


गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

बळी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण


बळी (कादंबरी) -   पुस्तक परीक्षण

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी 




लेखक- श्री. सुनिल इनामदार

प्रकाशक- पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी 

ISBN: 978-81-951642-0-2


       लेखक सुनिल इनामदार यांच्या धारदार लेखणीतून साकारलेली 'बळी' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती लगेच वाचनात आली हे माझे परमभाग्य समजते.


       'बळी' हे कादंबरीचे शीर्षक वाचल्यानंतर 'बळी तो कान पिळी' या म्हणीची आठवण झाली. बळी कुणाचा गेला, कान कुणी पिळला हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. आजकाल सतत कानावर पडणाऱ्या हुंडाबळी, नरबळी, भूकबळी या शब्दांचीही आठवण झाली. बळी कोण पडला, कुणाकडून पडला हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने कादंबरी वाचण्यास सुरूवात केली. वाचल्यानंतर लक्षात आले की बळी या शब्दाचा वेगळा अर्थ आहे. एखाद्याचे मानसिक खच्चीकरण करणे, त्याच्या प्रगतीला मागे खेचणे हासुद्धा बळी घेण्याचाच एक प्रकार आहे.


       या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे कादंबरी, लिहून झाल्यानंतर ३५ वर्षानंतर प्रकाशित होणे. लेखक सुनिल इनामदार यांनी डाव्या कामगार काम करताना आलेले अनुभव प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहेत. कार्यकर्त्यानी भोगलेल्या यातना ठळकपणे, खूबीने वाचकांच्या समोर उभ्या केलेल्या आहेत. थोडक्यात ३५ वर्षे जपून ठेवलेली ही मर्मबंधातली ठेव, एक ऐतिहासिक ठेवा मुक्तपणे, सहजसुंदर शैलीत वाचकांच्या हाती दिला आहे.


       चंद्रशेखर कळंबीकर हा एक साधाभोळा, अतिशय प्रामाणिक, राजकीय डावपेच माहित नसलेला, पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याच्या जीवन संघर्षाची ही कहाणी आहे. चंद्रशेखरकडे संघटन कौशल्य आहे. हजारो श्रोत्यांवर प्रभाव टाकणारी वक्तृत्वशैली त्याच्याकडे आहे, हे सांगताना लेखक म्हणतात "चंद्रशेखरचं तंत्रच वेगळं. सरळ चौकात जाऊन स्टेजवर, पारावर उभं रहायचं आणि मेगँमाईकवर क्रांतिगीते म्हणायला सुरुवात करायची, तसा त्याचा आवाजही खणखणीत, त्याची भाषणाची शैलीही ढंगदार होती. हावभाव, आवाजातील चढ उतार, पटवून द्यायची पद्धत उत्तम होती.''


       चंद्रशेखरला अनेक लोक भेटले. बरे वाईट अनुभव आले. त्याच्या सानिध्यात मुंबईत राहणारे कार्यकर्ते ही आले, की ज्यांना बड्या पुढाऱ्यांचे डावपेच, प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून स्वतःचे चमचे पुढं घुसविण्याची वृत्ती माहित होती त्यांनी चंद्रशेखरला ते सांगण्याचा प्रयत्नही केला पण त्याची पक्षनिष्ठा ते ऐकायला तयार नव्हती.

       

मोठ्या पुढाऱ्यांची वृत्ती स्पष्ट करताना लेखक म्हणतात

       "मोठ्या पुढाऱ्यांना अडचणीत आणणारा कार्यकर्ता नकोसा वाटायचा. मग अशा कार्यकर्त्यांला वेगवेगळ्या मार्गाने आवरण्याचा प्रयत्न व्हायचा. कधी वरिष्ठ पदावर घेण्याचं तर कधी आर्थिक लाभाचं अमीष दाखवलं जायचं त्यातून तो बदलला नाही तर त्याची बदनामी करायचा हुकमी डाव नेतेमंडळी खेळायची".


या उताऱ्यावरून लेखकाची उत्कट व निर्भिड लेखनशैली वाचकांना दिसून येते.

       चंद्रशेखरच्या बाबतीत त्याचा मित्र विकास त्याला एकदा म्हणतो, "शत्रूच्या गराड्यात देखील मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आराम झोपू शकेन" अशा मित्रप्रेमाचे, चंद्रशेखरच्या उतुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.


ही कादंबरी फारच सुंदर सामाजिक, तात्विक  विचार देते. वाचकांना चिंतन करायला लावते. उदाहरणार्थ...

"तुम्ही बंदूक कुणाकडून घेता यापेक्षा ती कुणाविरूद्ध चालवता हे महत्त्वाचं आहे." 

"तोंडानं म्हणायचं भवानी भवानी आणि मनात मात्र अल्ला को प्यारी है कुर्बानी" हे अहिल्या रांगणेकर यांचं वाक्यही चपखलपणे बसले आहे.

"एखाद्या युनिटमध्ये वाद निर्माण होणं ही नेत्यांच्या दृष्टीने सुखद घटना असते."


जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारं एक वाक्य वाचकांच्या काळजाला जाऊन भिडते. ते वाक्य असे...

"चळवळीतल्या ब्राम्हणी पुढाऱ्यांना कार्यकर्ता कामासाठी पाहिजे होता पण दलित कार्यकर्ता नको होता." 


       ही कादंबरी एका प्रामाणिक पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं जीवन किती कष्टाचं असतं, बेभरवशाचं असतं हे दाखवून देणारी आहे. अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची ससेहोलपट कशी होते याचे प्रभावी चित्रण वाचकांच्या समोर उभे करणारी आहे.

   

       या कादंबरीत चंद्रशेखर, रामा,  विलास, मांगले, सुशीला, विकास के. आर्, श्रीकांत, विजय व संजय अशी भरपूर पात्रे आली आहेत. ही सर्व पात्रे वाचकांशी बोलतात, आपल्या मनातील भाव वाचकांसमोर आपुलकीने व्यक्त करतात. एकूण १८ प्रकरणात विभागलेली ही कादंबरी ३५ वर्षापूर्वीची असूनही वाचकांना विचारांचं खाद्य देऊन खिळवून ठेवणारी आहे.


       कादंबरीचे मुखपृष्ठ खूप आकर्षक व बोलकं आहे. बळी जाणाऱ्यांची वज्रमूठ पक्की आहे हेच मुखपृष्ठ सांगत आहे असे वाटते. उत्तम छपाई, सुबक बांधणी,सोपी भाषाशैली असलेली ही उत्कृष्ट  कादंबरी वाचकांच्या पसंतीस निश्चितपणे उतरेल अशी खात्री वाटते. सूज्ञ, रसिक वाचकांनी ही कादंबरी लवकरात लवकर वाचावी अशी नम्र विनंती.


लेखकांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!! 


डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

जयसिंगपूर.