गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज- विशेष लेख


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख....


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल

       आधुनिकतेची कास धरून अज्ञानाचा नाश करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन आणि कार्य अतिशय उद्बोधक आहे. समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी यांच्यावर घणाघाती प्रहार करून आदर्श समाजरचनेची उभारणी करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. आपल्या परखड विचारांनी आणि जागृतीपर लिखाणाने समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामविकास, राष्ट्रीय एकता, मानवता आणि विश्वशांती यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग त्यांनी दाखविला. त्यांच्या या महान कार्यामुळे 'राष्ट्रसंत' असा लौकिक त्यांना मिळाला.


       ३० एप्रिल १९०९ रोजी 'शहीद यावली 'या छोट्याशा गावी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव 'माणिक' असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नामदेव गणेशपंत इंगळे आणि आईचे नाव मंजुळादेवी असे होते. गरिबीचे चटके तुकडोजी महाराजांना बालपणी सहन करावे लागले. त्यांचे आई वडील अशिक्षित होते. मात्र त्यांनी छोट्या माणिकला इयत्ता चौथीपर्यंत शिकविले. माणिकला बालपणापासून भजन, कीर्तन, कविता करणे यांची आवड होती. शाळा सोडून ते रानावनात जात. तेथे भजन करीत बसत. शाळेपेक्षा त्यातच त्यांचे मन अधिक रमत असे. हळूहळू ते कीर्तनातच रमू लागले.


       भजन, कीर्तन आणि काव्य यामध्ये मन रमू लागल्यावर  त्यांच्या मनात भगवंताच्या दर्शनाची तळमळ वाढू लागली, म्हणून पंढरीनाथांच्या दर्शनासाठी ते पंढरपूरला दाखल झाले. पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचे चित्त वेडावले, देह भांबावला. अश्रूधारा विठ्ठलाच्या चरणावर ओसंडू लागल्या. पांडुरंगाच्या दर्शनाने ते देहभान विसरले. त्यामुळे वेडा समजून बडव्यांनी त्यांना कोरड्यांनी मारले.


       ते पंढरपूरहून यावलीला परत आले, मात्र देवदर्शनाची ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. मंजुळादेवीना वाटत होते की, आपल्या मुलाने विवाह करून आनंदाने संसार करावा. मात्र तुकडोजी महाराजांना या विश्वाचा संसार सुव्यवस्थित करायचा होता. आईचा विचार त्यांना पटला नाही. पुढे त्यांनी काशी, ओंकारेश्वर, हरीद्वार, पशूपतिनाथ इत्यादि तीर्थयात्रा केल्या. देश व देवदर्शनाबरोबर समाजातील चालीरीती, अंधश्रद्धा, विषमता यांचे निरीक्षण केले. अनेक ठिकाणच्या पंडीतांशी चर्चा केल्या.


       स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात तुकडोजी महाराजांनी असामान्य कार्य केले. पारतंत्र्यात भारतीय जनतेवरील अन्याय, अत्याचार स्वतः पाहिला व अनुभवला. त्यांनी १९३५ साली सालबर्डीचा महायज्ञ केला. जनतेला भावनिकदृष्ट्या संघटित करून राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली. १९४२ साली आष्टी आणि चिमूरच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले. त्यांनी चार महिने तुरुंगवास भोगला. राष्ट्र प्रेमाने ओथंबलेली भजने गाऊन जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनतेला स्वातंत्र्याचा विचार करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी धडपड चालू ठेवली.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिक्षणविषयक विचार:

       आपल्या भाषणात ते म्हणतात, "भारतात शिक्षणाची अत्यंत उणीव आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही नसतील इतके निरक्षर लोक आपल्या देशात आहेत. स्वातंत्र्यप्राप्ती होऊनही या देशाची ऐंशी टक्के जनता अंगठाछाप आहे. परंतु ही स्थिती भूषणावह नाही. हा ऋषीमुनींचा देश आहे. या देशात गुराखीसुद्धा पदवीधर असले पाहिजेत. कोणतेही काम जाणीवपूर्वक व ज्ञानपूर्वक करण्यातच खरी मजा आहे".


       तुकडोजी महाराजांच्या या भाषणातून आपणास जाणवते की, शिक्षणाविषयी ते अतिशय जागरूक होते. ग्रामगीतेमध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात...


ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण ।

उद्याचे राष्ट्र, आजचे संतान ।

यासाठी आदर्श पाहिजे गुरूजन ।

राष्ट्रनिर्माते ।


       ग्रामविकासाचा पाया शिक्षणातच दडला आहे, असे ते आवर्जून सांगत. आजची बालके उद्याचे भावी नागरिक होतील. त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था करणे हे प्रत्येक राष्ट्राचे कर्तव्य आहे असे ते सांगत.


       ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांनी जिव्हाळ्याने आणि आवडीने अध्यापन करायला हवे, असे त्यांचे मत होते. बालकांच्या साक्षरतेबरोबर प्रौढशिक्षणांविषयीही ते जागृत होते. साक्षरता प्रसाराविषयी ते म्हणतात, "साक्षरता प्रसार हा समाजशिक्षणाचा पाया आहे. भारताचा प्रत्येक घटक सुसंस्कृत, स्वावलंबी आणि सुखी व्हावा यासाठी समाजशिक्षणासारखा दुसरा उपाय नाही. आज आपल्या देशातील एक माणूससुद्धा अंगठाछाप असणे हे आम्हा सर्वांना लाजिरवाणे आहे. राष्ट्राचा हा कमजोर घटक म्हणजे राष्ट्राच्या जीविताला धोका आहे हे विसरू नका. समाजशिक्षण हाच खरा धर्मयज्ञ आहे, कारण यामुळेच समाजाचा विकास योग्य रीतीने होऊ शकेल. जनतेला जर आपण सुसंस्कृत व डोळस बनविले नाही तर यापुढील परिस्थिती आम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही". प्रौढशिक्षणांविषयी ते म्हणतात..


अक्षरशत्रूना सामर्थ्य यावे ।

म्हणोनी प्रौढ शिक्षण चालवावे ।

घरोघरी नंबर द्यावे।

नामपाटी लावोनिया ।


तुकडोजी महाराजांचे देशप्रेम:

       भारताबद्दल महाराजांच्या मनात अतिशय आदर होता. भारत-पाक व भारत-चीन युद्धाच्या वेळी ते प्रत्यक्ष युद्ध सीमेवर संरक्षण मंत्र्यांबरोबर गेले. सैनिकांसमोर देशप्रेमाने ओथंबलेली भजने गाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. देशसंरक्षणार्थ सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ते देशातील तरूणांना करत.


       ग्रामोन्नती झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही असे ते म्हणत. ग्रामगीतेमध्ये त्यांनी आदर्श ग्रामसंकल्पना मांडली आहे. ते म्हणत....


मेरा प्रभू सब व्याप्त है ।

हर मानवो की जान में ।

इस बात को भूलो नही ।

हर काम में हर ध्यान में।


सामान्य जनांमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महान राष्ट्रसंतास कोटी कोटी प्रणाम ।


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

'दाते' होऊन पुण्य प्राप्त करा - विशेष मराठी लेख


‘दाते' होऊन पुण्य प्राप्त करा

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       पवित्र कुरआनमध्ये अनेक ठिकाणी गरिबांना जेवण देण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील गरीब लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरविण्यासाठी श्रीमंत लोकांना उत्तेजित करण्यात आले आहे.


       विविध उपासनांच्या दरम्यान माणसाच्या हातून कांही चुका घडतात. उदाहरणार्थ, रमजानच्या महिन्यात कुणी जाणूनबुजून वेळेच्या आधी उपवास सोडला किंवा उपवास राखलाच नाही अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून सतत ६० दिवसांचे उपवास राखण्याचे आदेश आहेत. असे करतांना एकही खाडा झाला तर पुन्हा एकपासून साठपर्यंत उपवास करावेत. एखाद्या व्यक्तिला आरोग्याच्या दृष्टीने असे करणे जमत नसेल तर अशा व्यक्ति साठ गरिबांना दोन वेळचे पोटभर जेवण द्यावे. यालाच 'कफ्फारा' म्हणजेच परतफेड असे म्हणतात.


       तात्पर्य असे की, कुठल्या ना कुठल्या पध्दतीने लोक देणारे बनावेत. फक्त घेणारी माणसे समाजाला घातक ठरतात आणि त्यांच्यामुळेच केवळ समाजाच नव्हे तर संपूर्ण देश आणि संपूर्ण संस्कृतीचा अस्त होतो. या दृष्टीकोनातून आपल्या समाजाचे विश्लेषण केले तर दिसून येईल की घेणारे हात अधिक आहेत, देणारे कमी आहेत. म्हणूनच या पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना सढळ हाताने मदत करा व सवाब (फळ) मिळवा.


मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

रमजान: मुलांवर संस्कार करण्याची संधी - विशेष मराठी लेख


रमजान: मुलांवर संस्कार करण्याची संधी

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       मुस्लिम कुटूंबव्यवस्थेवर इस्लामी शरिअतची पकड मजबूत आहे. मुलांनी केलेल्या लहान-मोठ्या गुन्हांबद्दल आईवडिलांना शिक्षा दिली जात नाही. मात्र त्यांना जबाबदार मानण्यात येते. कारण त्यांनी मुले लहान असताना त्यांच्यावर चांगले संस्कार केले नाहीत. मुस्लिम कुटूंबात एकमेकांना खूप आदराने वागणूक देण्याची प्रथा आहे. मुलांसमोर आई-वडिलांनी कसे वागावे व मुलांकडून कशा वागणुकीची अपेक्षा करावी याची अनेक उदाहरणे प्रेषितसाहेबांच्या व त्यांच्या सोबत्यांच्या जीवनातून पहावयास मिळतात. मुलाने वडीलधाऱ्यासमोर असभ्य वर्तन केले तर त्याला शिक्षा द्यावी. आई-वडिलांनीसुध्दा मुलांसमोर असभ्य वर्तन करु नये. पती-पत्नीचे भांडण मुलांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम करते. आपल्या नातेवाईकाबद्दल आपल्या मुलांसमोर नेहमी चांगले उद्गार काढावेत. जेणेकरून मुलांना आपल्या परिवाराबद्दल आदर वाटेल. मुलांना उत्तम संस्कार देणे ही सुध्दा एक उपासना आहे.


       इस्लामी आचार संहितेनुसार मुलांनी आईवडिलांसमोर मोठ्या आवाजात बोलण्यास देखील मनाई आहे. ज्या पालकांनी आपल्या अपत्यांचे आणि विशेषतः मुलींचे उत्तमरित्या पालनपोषण केले, त्याला मरणोत्तर स्वर्गप्राप्ती निश्चित आहे. आयुष्यात आपल्या मुलांना चांगले प्रशिक्षण देण्याच्या अनेक संधी येतात. त्यात रमजान महिनादेखील आहे. या महिन्यात प्रशिक्षणाचे काम सत्तर पटीने सोपे जाते. याचा लाभ पालकांनी जरूर घ्यावा.


सोमवार, २६ एप्रिल, २०२१

पैगंबरसाहेबांचा वचनपालनाचा आदेश - विशेष मराठी लेख


पैगंबरसाहेबांचा वचनपालनाचा आदेश

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       मुहम्मद पैगंबर प्रेषितत्वप्राप्ती आधीपासूनच वचनपालन व सत्यपालन करत होते. अफ्रिकेतील अव्हेसिनियाच्या बादशहाने त्यांची ख्याती ऐकून त्यांचे कडवे विरोधक अबूसुफियानला विचारले की "काय मुहम्मद (स.) वचन आणि कराराचा भंग करतात?" अबूसुफियान म्हणाले "नाही". यावरुन असे दिसून येते की पैगंबरसाहेबांचे विरोधकही त्यांची वचनबध्दता मान्य करत होते.


       याबाबतचे एक उदाहरण देता येईल. बद्रची लढाई अत्यंत कठीण परिस्थितीतून लढली गेली होती. पैगंबर साहेबांच्या जवळ मनुष्यबळ अत्यंत कमी, एकूण ३१३ माणसे होती. समोर १००० बलशाली सैन्य होते. साधनसामग्रीही अत्यंत कमी होती. या लढाईत भाग घेण्याकरिता हुजैफा बिन यम्मान आपले स्नेही अबूहसील यांच्याबरोबर मदिनेहून निघाले, परंतु गनिमांच्या तावडीत सापडले. विचारणा केल्यावर ते म्हणाले, "आम्ही मदिन्याला निघालो होतो, वाट चुकलो" गनिमांनी त्यांना एका शर्तीवर सोडले, की मदिनेला जा, युद्धात सामील होऊ नका. ते लपत छपत मुहम्मद (स.) पर्यंत पोचले आणि जे घडले ते सांगितले. पैगंबर साहेबांनी त्यांना मदिनेला परत जाण्याचे आदेश दिले व म्हणाले की, "तुम्ही काफिरांबरोबर केलेले वचन पाळा आणि त्यांच्याबरोबर मुकाबला करण्याची शक्ती अल्लाहकडे मागतो". (मुस्लिमशरीफ) यावरुन मुहम्मद पैगंबर प्रतिकूल परिस्थितीतही वचन पाळा हाच संदेश देत होते हे सिध्द होते.


रविवार, २५ एप्रिल, २०२१

सिहाबींची 'नमाज' मधील एकाग्रता - विशेष मराठी लेख

सिहाबींची 'नमाज' मधील एकाग्रता

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       पैगंबर साहेबांच्या असलेल्या सोबतींची संख्या एक लाख चोवीस हजारांच्या आसपास होती. जी व्यक्ती ईमानच्या स्थितीत म्हणजे इस्लाम धर्म स्विकारून पैगंबराच्या सहवासात राहिली किंवा त्यांचे दर्शन जरी घेतले, अशा व्यक्तींना 'सिहाबी' म्हणजे पैगंबरसाहेबांचे सोबती म्हणतात.


       हे सिहाबी रणांगणात शत्रूवर तुटून पडायचे; परंतु तोच शत्रू जेव्हा जेरबंद व्हायचा तेव्हा त्याच्याबरोबर आपल्या बंधुप्रमाणे प्रेम करायचे. स्वतः उपाशी राहून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे. युध्द मैदानात उत्तम सेनानी, कुटूंबात ते प्रेमळ पिता, पती, बंधू आणि नातेवाईक असायचे. अल्लाहजवळ प्रार्थनेच्या वेळी दुवा मागताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटायचा. पैगंबर साहेबांचे प्रवचन व आदेश ऐकताना ते स्तब्ध व शांतचित्त असायचे. नमाजमध्ये त्यांची एकाग्रता कमालीची होती.


       खैबरच्या युध्दात हजरत अली नावाच्या एका सिहाबीच्या गुडघ्यात बाण रूतला. बाण निघेना, वेदना अनावर झाल्या. हजरत अली म्हणाले, "थांबा नमाजकरिता उभा राहतो, तेव्हा बाण काढा". सैनिकांनी तसेच केले. बाण केव्हा काढला गेला, समजलेसुध्दा नाही. नमाजमध्ये ते अल्लाहच्या सान्निध्यात विलीन व्हायचे. आज आपल्यापाशी इस्लामचा जो कांही ज्ञान, वारसा, संपूर्ण शरीअत, पवित्र कुरआन, हदीस, संस्कृती, शिष्टाचार, रीतीरिवाज, परंपरा, उपासना आणि प्रार्थनापध्दती आहे ते सर्व कांही आपणापर्यंत सिहाबींच्या मार्फतच पोहोचले आहे.


असे होते सिहाबींचे अस्तित्व..!


शनिवार, २४ एप्रिल, २०२१

भगवान महावीर - विशेष लेख

 

भगवान महावीर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       भगवान महावीरांचा जन्म इ. स. पूर्व सहाव्या शतकात चैत्र शुद्ध त्रयोदशीला कुंडलपूर येथे झाला. त्यांच्या  पित्याचे नांव सिद्धार्थ व मातेचे नांव त्रिशला राणी होते. राजा सिद्धार्थ हे वैशालीचे राजे होते. त्रिशला राणी ही राजा चेढकची कन्या होती.


भगवान महावीरांची शिकवण:

अहिंसा हाच खरा धर्म आहे. कोणत्याही जीवाची हिंसा करु नका जगा आणि जगू द्या. सर्व प्राणिमात्रांवर दया करा, प्रेम करा. सर्वांशी संवाद साधा. शत्रू व मित्र सर्व आपलेच माना. संपूर्ण मानव समूह एक आहे. सर्वांच्या उदर्निवाहाची व्यवस्था करा. कुणीही उपाशी रहायला नको ही शिकवण दिली. जगात पहिल्यांदा अहिंसा धर्म कुणी सांगितला असेल तो भगवान महावीरांनीच. अहिंसेबरोबरच सत्य धर्माचे पालन करणे आवश्यक आहे असे ते सांगत. खोटे बोलणे म्हणजे सुद्धा एक प्रकारची अहिंसाच आहे, खोटे बोलण्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावते त्यामुळे ती हिंसाच आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, चोरी ही सुद्धा हिंसाच आहे. दुसऱ्याचे धन हरण करणे म्हणजे दुसऱ्याचे मन दुखवणे, ती सुद्धा हिंसाच आहे. अपरिग्रह म्हणजे गरजेपुरतं धनधान्य ठेवून घेणं आणि जादाचं गरजूंना देणं.


भगवान महावीर यांच्या जन्मापूर्वीची सामाजिक परिस्थिती:

भगवान महावीरांचा कालखंड सव्वीसशेहून अधिक वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी जिकडे तिकडे मिथ्या तत्वांचेच साम्राज्य प्रस्थापित झालेले होते. सामाजिक विषमतेला कुठलीच मर्यादा राहिली नव्हती. सामाजिक रूढी, परंपरा वैषम्याने बरबटलेल्या होत्या. स्त्रियांना शूद्राहून अधिक मोल नव्हते. शूद्रांना अतिशूद्र बनवून पशूहूनही त्यांना हीन लेखले जात  होते. पशूंना, मुक्या प्राणीमात्रांना याज्ञिकांच्या होमकुंडात बळी जावे लागे. मानव प्राण्यांचा तर स्वतःच्या अनंत शक्तीवरील विश्वास केंव्हाच उडून गेला होता. अन्यायी राजदंड आणि अनिष्ट रूढी परंपरा यामुळे सारा मानवसमूह भयाकुल व भयभीत बनला होता. थोडक्यात मिथ्यात्वाला महापूर आला होता.


       भगवान महावीर यांच्या कालखंडात देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठेमोठे यज्ञ करीत असत. यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला जात असे. हे सर्व धर्माच्या नावाने करीत असत. यज्ञ करणारा यजमान क्षत्रिय आणि पूजा करणारा पुजारी हे दोघेही यथेच्छ मांसाहार करीत, सुरापान करीत. अशाने देव प्रसन्न होतो अशी त्यांची समजूत होती.


भगवान महावीरांचा जन्म, बालपण व कार्य:

मिथ्यात्वाचा महापूर दूर करण्यासाठी एका भव्य जीवाचे या पृथ्वीतलावर आगमन होत होते. कुंडलपूरच्या सिद्धार्थ राजाच्या राजवाड्यात लगबग सुरु होती. महाराणी त्रिशलेला सोळा स्वप्ने पडलेली होती आणि तिच्या पोटी एक महामानव जन्माला येणार होता. त्याच्या येण्याची तयारी सुरू होती. अत्यंत आनंदाचा सोहळा पहाण्यासाठी इंद्रादी देवसुद्धा उत्सुक होते. महाराणी त्रिशला अत्यंत आनंदात होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. भव्य जीवांच्या जन्माच्या वेळी सगळी अनुकूलता असते. त्यांची पुण्याईच जबरदस्त असते. रात्रीची निरव शांतता होती. मंद वारा वहात होता. सगळी प्रजा आनंदात होती. राजकुमाराची वाट पहात सगळ्यांनी झोपेचा त्याग केला होता. महाराणी त्रिशलादेवीला प्रसव वेदनांचा  थोडासाही त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. पहाटेचा शांत चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर विराजमान झाला होता. जनतेचा उद्धारक जन्माला येणार होता. चतुर्थ काल संपून पंचमकालसुरू होण्याला अजून ७५ वर्षे तीन महिन्यांचा अवकाश होता. विश्व आनंदाने मोहरून गेले. भगवान महावीरांचा जन्मोत्सव फारच थाटामाटात साजरा झाला. अनेक नगर राज्यातील नायकांनी तर त्यात भाग घेतलाच पण स्वर्गातून देवेंद्र ही समारंभास हजर होते.


       बालकाला कुणी वर्धमान म्हणू लागले, कुणी सन्मती तर कुणी महावीर. सर्वांचा लाडका राजकुमार लहानपणापासूनच गुणी होता, निर्भय होता, विवेकी होता, धर्मशील होता. वयात आल्यावर विवाह करण्यास नम्रपणे नकार दिला.


       पहिली तीस वर्षे हा राजकुमार घरी राहून संयमाचे पालन करीत होता. आसक्ती अशी नव्हतीच. राजलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि इंद्रिय यावर त्यांनी सहजतेने लाथ मारली होती. आपल्यातच म्हणजे स्वमध्ये मग्न असणाऱ्या महावीरांनी आईवडिलांची अनुज्ञा घेऊन दिगंबरी दिक्षा घेतली. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा होता. त्यांनी आपली सारी संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली आणि ज्ञात्रु खंड वनाकडे तो निघाला. राजकुमार परिषह सहन करीत होता. घोर तपश्चर्या सुरु होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी, भूकतहान यांची तमा न बाळगता त्यांची तपश्चर्या सुरु होती. तो इतका आत्ममग्न होता की जगाचं त्याला भान नव्हतं. आतील आणि बाहेरील शत्रूशी त्याचा संघर्ष सुरू होता. बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर आत्म्यात लख्ख प्रकाश पडला. सर्वकांही उजळून निघाले सर्वकांही ज्ञात झाले. केवलज्ञानाची प्राप्ती झाली. देवेंद्राना कळलं की महावीरांना केवलज्ञान झालं आहे. ते स्वर्गातून खाली आले. भगवंताना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि जय हो, जय हो अशी गर्जना केली. समवशरणाची म्हणजे सभेची रचना केली. सर्वजण आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले. पशूपक्षी, मानव, राजेरजवाडे सर्व आले. पण भगवंतांचीवाणी कांही सुरु होईना. त्यावेळेस इंद्रभूती गौतम भगवान महावीरांशी वादविवाद करण्यासाठी आपल्या हजारो शिष्यांसह येत होते. आपल्या ज्ञानाचा त्यांना फार गर्व होता. समवशरणामध्ये आल्या आल्या त्यांचा अहंकार गळून पडला. भगवान महावीरांशी बातचीत झाली आणि ते त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. ते त्यांचे पहिले गणधर झाले. त्यांचे दोन भाऊही महावीरांचे शिष्य झाले. भगवंतांची वाणी सुरू झाली. गौतमांच्या मनातील अंधकार दूर झाला. भगवंतांची वाणी त्यांनी सोपी करून सांगितली.


       भगवान महावीरांची शिकवण आचरणात आणण्याचा निश्चय त्यांच्या जयंती दिनी करू या.


       अशा या थोर महामानवास कोटी कोटी प्रणाम। जय जिनेंद्र...


शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

नमाजमध्ये पूर्णपणे समरस व्हा! - विशेष मराठी लेख


नमाजमध्ये पूर्णपणे समरस व्हा!

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       एक इसम काबागृहाच्या आवरणाला मिठी मारून धाय मोकलून रडत होता आणि स्वत:च्या मोक्षप्राप्तीची याचना करीत होता. त्याच्या रडण्याचे लोक मनातून कौतुक करीत होते, ईश्वराच्या दरबारी असे रडण्याचे आम्हालाही भाग्य लाभो असे मनात म्हणत होते. त्याच ठिकाणी एक अंतर्यामी सूफीदेखील हे दृश्य पाहत होते. तेसुध्दा याच्या रडण्याने प्रभावित झाले. अचानकपणे त्यांच्या मनात आले की या भाविकाच्या अंतर्मनाची चाचणी घ्यावी. चाचणी घेताच कळले की, अंतिम मोक्ष मागणाऱ्याचे मन हमशरीफच्या आवारात नव्हतेच ते तर बाजारपेठेत हिंडत होते. अशी प्रार्थना काय कामाची?


       प्रार्थना (नमाज) कुठलीही असो, त्यात संसारमोहाला त्यागावे लागते. मग ती रमजान महिन्यातील असो किंवा एरवी करण्यात येणारी प्रार्थना असो. ईश्वराची समीपता व एकात्मता निर्माण करण्याकरिता आपल्या भोवतालच्या आपल्या सुखाला आणि विश्रांतीला एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वालाही विसरावेच लागते.


       पीरानेपीर हजरत अब्दुल कादिर जिलानी आपल्या शिष्याला नेहमी ताकीद करायचे की, प्रार्थनेच्या वेळी पूर्णपणे त्यात समरस व्हा जणू कांही तुम्हाला अल्लाहचे दर्शन घडत आहे. संसारिक जीवन व्यतीतताना त्यात पूर्णपणे समरस व्हा, नमाज पढताना मनावर संसारिक जीवनाची एक छटासुध्दा राहता कामा नये. हाच खरा संसार व हाच खरा संसारत्याग..!


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

हजरत मुहम्मद यांची रमजान पूर्वतयारी - विशेष मराठी लेख


हजरत मुहम्मद यांची रमजान पूर्वतयारी

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद (स.) रमजान महिन्याच्या आगमनाचे स्वागत दोन महिन्याच्या आधीपासून करायचे. रजब आणि शअबान हे ते दोन महिने होत. रमजानचा महिना आला की पैगंबरसाहेब उपवास करायला सुरुवात करायचे. जास्तीत जास्त कुरआन पठण, जप, अधिक नमाज पढ़ायचे. पैगंबर साहेबांचे अनुकरण त्यांचे सोबती (सिहाबी) हमखास करायचे. यामुळे रमजानच्या आगमनाचे आणि त्याच्या स्वागताचे एक उत्साही व आनंदी वातावरण तयार व्हायचे.


       पैगंबर साहेब अत्यंत दयाळू होते. मानवहितामुळे ते या दोन महिन्यात अधूनमधून उपवास करण्याचे टाळायचे कारण त्यांचे कथन आणि कृत्यच नंतर शरीअतमध्ये म्हणजेच मुस्लिम कायद्यामध्ये परिवर्तित होणार होते. लोकांना असे वाटू नये की रजब आणि शअबानचे दोन महिने सुद्धा उपवासाचे महिने आहेत. पैगंबरांचे हे कार्य तंतोतंत पाळणारी माणसे आजही मुस्लिम समाजात आहेत. ईश्वरांचे त्यांना सतत तीन महिने उपवास राखण्याची क्षमता प्रदान केली आहे. हे लोक केवळ उपवासच नव्हे तर बाकीच्या सर्व उपासना अत्यंत उत्साहात करतात. त्यांची ही श्रद्धा, उपासना, दृढविश्वास फक्त त्यांच्याकरिताच नव्हे तर संपूर्ण मानवजाती व सृष्टीकरिता एक उपहार आहे, एक अनमोल भेट आहे.


बुधवार, २१ एप्रिल, २०२१

इस्लाम मधील वचनबध्दता - विशेष मराठी लेख


इस्लाम मधील वचनबध्दता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       इस्लामी शरीअतमध्ये वचन आणि करार या बाबींना खूप महत्व आहे. पवित्र कुरआनमध्ये कराराचे पालन आणि वचनबध्दतेच्या संदर्भात अनेक आदेश अवतरविण्यात आले आहेत. वचन काय आहे व ते कसे राखावे हे पैगंबर साहेबांनी आपल्या दैनंदिन जीवनातून सिध्द करून दाखविले आहे. प्रेषित पैगंबरसाहेब वचन, तह आणि करार यांचा कधीही भंग करत नसत. ते इतरांनाही वचनबध्द राहण्याचे धडे देत होते.


       पैगंबर साहेबांना प्रेषितत्व प्राप्तीपूर्वी एकदा असे घडले की, अब्दुल्लाह बिन अबिलहसमाने हजरत मुहम्मद (स.) कडून एक वस्तू खरेदी केली; परंतु त्यांच्यापाशी वस्तूच्या किमतीएवढी रक्कम नव्हती. उरलेल्या रकमेबद्दल अब्दुल्लाह म्हणाले की, "आपण येथेच थांबा, मी घरी जाऊन उरलेली रक्कम घेऊन येतो". घरी जाऊन त्यांना विसर पडला आणि तीन दिवसानंतर त्यांना त्या गोष्टीची आठवण झाली. ते प्रेषित साहेबांना शोधत बाहेर आले. त्यांनी पाहिले की, प्रेषितसाहेब होते त्याच ठिकाणी त्यांची वाट पहात बसले आहेत. कारण त्यांनी अब्दुल्लाहला वचन दिले होते की मी वाट पहातो तू येईपर्यंत. त्यांना पाहून प्रेषितसाहेब म्हणाले, 'हे युवा! तू मला फार मोठ्या परिश्रमात गुतविलेस! मी येथे तीन दिवसापासून तुझी वाट पाहतोय' 


          यावरून आपणास कल्पना येईल की वचनबध्दता कशी असते.


मंगळवार, २० एप्रिल, २०२१

रोजा इफ्तार: बंधुभावाचा सोहळा - विशेष लेख


रोजा इफ्तार: बंधुभावाचा सोहळा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


रमजान महिन्यातील रोजा इफ्तारची वेळ हा बंधुभावाचा आगळावेगळा सोहळा असतो.


       सायंकाळी पाच वाजता 'असर' ची नमाज (प्रार्थना) झाली की महिलांची स्वयंपाकाची लगबग सुरू होते, कारण रोजा इफ्तारच्या वेळेपुर्वीच स्वयंपाक तयार करावा लागतो. घरातील पुरुष मंडळी रोजा सोडण्यासाठी व तिन्हीसांजेच्या (मगरीबच्या) प्रार्थनेसाठी मशिदीत जाणार असतात. त्यांच्यासाठी दररोज वेगवेगळे पदार्थ करून देण्यासाठी महिला सज्ज असतात.


       रोजा सोडण्यासाठी आपापले डबे घेऊन पुरूष मंडळी-मुले मशिदीत जमा होतात. आपल्या डब्यातील पदार्थ रोजा सोडण्यासाठी जमलेल्या सर्वांना वाटतात. त्यामुळे रोजा सोडताना विविध प्रकारचे रुचकर व पौष्टिक पदार्थ सर्वांना खायला मिळतात. कुणाच्या डब्यात गुलगुले, शिरा, उप्पीट, पोहे असतात, कुणाच्या डब्यात केळी, सफरचंद, चिक्कू, डाळिंब, पेरू या फळांच्या फोडी व फणसाचे गरेसुध्दा असतात. कुणाच्या डब्यात मसालेभात, पोळी-भाजी, खिचडी असते. तर कुणी भडंग, चिवडा, फरसाणा, भजी, वडे व समोसे आणलेले असतात. जमलेले सर्वजण हे पदार्थ मिळून-मिसळून आनंदाने खातात. आपल्याला आवडलेले पदार्थ दुसऱ्याच्या डब्यातून हक्काने घेतात. हे पदार्थ केवळ शरीराची भूक भागवतात असे नाही तर मनाचीही भूक भागवतात. एकमेकात बंधुभाव निर्माण करतात.


       या सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊन तिन्हीसांजेची (मगरीबची) नमाज पढून सर्व बांधव आपापल्या घरी परततात.


सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पवित्र रमजान मधील सेहरी - विशेष लेख


पवित्र रमजान मधील सेहरी

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       रमजान महिन्यात श्रध्दा, भक्ती व उपासना यांना भरती आलेली असते. सर्वांची मने भक्तिभावाने ओलीचिंब झालेली असतात. एरवी आळस करणाऱ्या सर्वांच्या मनाची पहाटे 'सेहरी' करण्यासाठी गाढ झोपेतून उठण्याची तयारी पक्की झालेली असते. घरातील महिलांना सेहरीचा स्वयंपाक करण्यासाठी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान उठावे लागते. पण हे काम महिला स्वयंस्फुर्तीने व आनंदाने करतात. अंगावर पिणारे लहान बाळ असलेल्या व गर्भवती महिला रोजे (उपवास) करू शकत नाहीत, पण घरातील रोजे करणाऱ्या सर्वांना सेहरीसाठी ताजा स्वयंपाक करून देतात. त्यामुळे अशा महिला अल्लाह मेहरबानीच्या कृपाप्रसादातील वाटेकरी होतात, त्यांनाही रोजांचे सवाब (फळ) मिळतात.


       रोजे (उपवास) करण्यासाठी ४-५ वर्षापासूनची मुले-मुली उत्सुक असतात. रात्री झोपतानाच आईजवळ मला उठव म्हणून हट्ट धरतात. आईने उठवले नाही तरी घरातील हालचाल ऐकून जागे होतात व रोजा धरतात. साडे चौदा तास पाण्याचा थेंबही प्राशन करायचा नसल्यामुळे सायंकाळी कांही वेळ व्याकुळ होतात पण लहानपणापासून त्यांना संयम राखण्याची सवय लागते. अल्लाहची उपासना करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी होते. रोजा केलेल्या आपल्या बालकाचे आई-वडील कौतुक करतात. पहिल्यांदा रोजा केलेल्या बालकांला नवीन कपडे आणतात. हारतुरे घालून त्यांचे अभिनंदन करतात. एकंदरीत रमजान हा महिना सर्व महिन्यांचा 'सरताज' आहे. भक्तिरसात पूर्णपणे तल्लीन होण्याची संधी या महिन्यात मिळते.


रविवार, १८ एप्रिल, २०२१

'नमाज' - विशेष लेख


'नमाज' मुळे जीवनाला नवी दिशा मिळते

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       नमाज दिवसातून पाच वेळा पडावी लागते. ही प्रार्थना प्रत्येक मुस्लिम बांधवावर सक्तीची आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी - तुवह की नमाज, दुपारी दीडच्या सुमारास - जोहर की नमाज, सायंकाळी पाचच्या आसपास - असर की समाज, सायंकाळी सूर्यास्तानंतर - मगरीब की नमाज, रात्री नऊच्या सुमारास - ईशा की नमाज पडावी लागते. जो या पाचही नमाज पडत असेल त्याच्याजवळ फावला वेळच उरत नाही. नमाज पडायला प्रत्यक्ष १०-१५ मिनिटे लागतात, परंतु नमाज पडण्यासाठी मानसिक व शारिरीक तयारी करण्याकरीता बराच वेळ लागतो. नमाज पडल्यानंतर त्याचा परिणाम दुसऱ्या नमाजपर्यंत मनावर टिकून राहतो.


       नमाजसाठी मशिदीचे वातावरण इतके शांत, खुले-खुले आणि प्राणवर्धक व तेजस्वी असते की त्यामुळे आत्मिक शांती प्राप्त होते. त्यामुळे विचारसरणीत बदल घडून येतो. नमाजी ईश्वराच्या जवळ जातो. त्याला संसारिक जीवन व त्यासाठी सतत झटणे दुय्यम दर्जाचे वाटू लागते. अल्लाहच्या आशिर्वादामुळे भाविकांना नवनवीन कल्पना सुचतात. त्याचे काम सोपे होते. कामातील कठीणपणा नाहीसा होतो. कुकर्म सतत झाल्यामुळे पुण्याई वाढते. नमाजमुळे अबालवृध्दांना एक दिशादर्शी जीवन जगण्यास मदत होते.


शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

जकात न देणारे श्रीमंत: हजरत निजामुद्दीन औलिया - विशेष लेख


जकात न देणारे श्रीमंत: हजरत निजामुद्दीन औलिया

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       दिल्लीचा बादशहा मुहम्मद बिन तुघलक यांच्या कारकिर्दीत हजरत निजामुद्दीन औलिया होऊन गेले. हजरत निजामुद्दीन पाच दिवस सोडून वर्षभर उपवास (रोजे) करायचे. त्यांनी जकात कधीच दिली नाही. याचा अर्थ असा नाही, की त्यांच्याकडे धनसंपत्ती नव्हती. त्यांनी सात अत्यंत प्रभावशाली बादशहांचा कार्यकाळ आपल्या डोळ्यांनी पाहिला. हे बादशहा त्यांच्या सेवेत आणि लंगरादीकरिता सोन्या-चांदीचे तोडे आणि सोन्याची तबकडी भरून मोठे मोठे खरे मोती पाठवायचे तरीसुध्दा त्यांच्यावर जकात देणे शरीअतप्रमाणे लागू नाही कारण त्या मालावर एक वर्ष ओलांडावे लागते, ज्याला इस्लामी कायद्यात "होलाने हौल' म्हणतात. मिळालेली संपत्ती एक रात्रही ते आपल्या जवळ ठेवत नसत. सकाळी माल आला की संध्याकाळच्या मैफिलीत ते त्याची विल्हेवाट लावून टाकायचे. चीजवस्तूंची लहान-लहान पोतडी करून गरजूंच्या घरी पोचती करायचे आणि या कामी त्यांचा सेवकवर्ग नेहमी सज्ज असायचा. प्रवासात असताना त्यांचे अनुयायी, भाविक त्यांचा तंबू सोन्याच्या मेखानी रोवायचे आणि त्यांना याची कल्पनासुध्दा नसायची. सिध्द हस्ते केलेला दानधर्म मालाची टंचाई कधीच भासू देत नाही


आजही हजरत निजामुद्दीनच्या दर्ग्यावर दररोज हजारोंच्या संख्येने हिंदू, मुस्लिम, शीख, बौध्द इ. भाविकांची गर्दी असते.


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

जकात: एक आर्थिक उपासना - विशेष लेख


जकात: एक आर्थिक उपासना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       इस्लामच्या पाच प्रार्थना पध्दती आहेत. १) ईमान २) सलात (नमाज पढणे), ३) उपवास (रोजा), ४) जकात, ५) हज या पाचपैकी एकाचाही इन्कार मुस्लिम बांधवाना करता येत नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे 'जकात' देण्याची. जकात हे एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशेब करून देणे गरजेचे आहे.


       जकात 'साहिबे निसाब' म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वरची श्रीमंत माणसे देतात. आजपासून सुमारे साडेचौदाशे वर्षापुर्वी ही दारिद्र्यरेषा ठरविण्यात आली आहे. ज्या व्यक्तीपाशी ८७.४७९ ग्रॅम इतके सोने अथवा ६१२.३५ ग्रॅम इतकी चांदी किंवा या किंमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफ. डी., शेअर सर्टिफिकेट, कंपन्यामध्ये इतर गुंतवणूक आहे त्या रकमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालाचा चाळीसावा भाग म्हणजे अडीच टक्के वजा करून गोरगरीबांमध्ये वाटून टाकावी.


       मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. जकात जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात येते. आईवडील आपल्या मुलामुलींना तसेच मुले आपल्या मातापित्यांना जकात देवू शकत नाहीत, तसेच आजी आजोबा व मुलामुलींच्या संतानाला देखील जकात देवू शकत नाहीत. पत्नी पतीला जकात देऊ शकते, कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही. 


       इस्लामी शरीअतमध्ये जकात देण्याचे फार महत्व आहे.


बुधवार, १४ एप्रिल, २०२१

रमजानचा महिमा - विशेष लेख


रमजानचा महिमा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       रमजान महिना सुरू झाला की, अल्लाहच्या नामस्मरणात दिवस कसे निघून जातात हे कळत देखील नाही. रोजांमुळे दिवसभर पोटाला विश्रांती मिळते. त्यामुळे शरीराच्या विकासशक्तीमध्ये सुधारणा होते. पचनसंस्थेला पूर्ण विश्रांती मिळाल्यामुळे प्राणशक्ती, श्रवणशक्ती व स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होऊन आत्मिक सामर्थ्य प्राप्त होते. 'रोजा' मुळे वाईट कृत्या पासून बचाव व अल्लाहचे भय बाळगण्याचा गुण व्यक्तिमध्ये निर्माण होतो.


       एखाद्या व्यक्तिचा रोजा (उपवास) सुरू असेल तर त्याने वाईट कृत्यापासून लांब रहावे. या काळात उपवास करणाऱ्याला कोणी अपशब्द वापरले तर नम्रपणे त्याला सांगावे की, "मी 'रोजा' मध्ये आहे, तुझ्याशी भांडण करणार नाही पण माझ्या बांधवा कृपा करून पुन्हा मला असे बोलू नकोस". रोजामुळे व्यक्तीला दीन दुबळ्यांच्या तहान-भुकेची कल्पना येते. रोजा स्वत:साठी नाही तर दुसऱ्यासाठी जगण्यास शिकवतो.


       रमजान म्हणजे उपासना, कृतज्ञता, आनंद व आभार प्रदर्शनाचा महिना मानला जातो. 'इस्लाम' या शब्दाचा अर्थ शांती, शुध्दता, समर्पण व आज्ञापालन असा आहे. 'इस्लाम' म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण व ईश्वराचे आज्ञापालन होय.


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

रमजान: आत्मिक शुध्दीचा महिना - विशेष लेख


उद्या दिनांक १४ एप्रिल २०२१ पासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे, त्यानिमित्ताने विशेष लेख मालिका आजपासून सुरु करत आहे.


रमजान: आत्मिक शुध्दीचा महिना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       'रोजा' इस्लामच्या पाच आवश्यक उपासनापैकी एक आहे. रोजे रमजानचा चाँद दिसल्यापासून सुरू होतात.


       रोजे (उपवास) करणे याचा अर्थ केवळ उपाशी-तापाशी राहणे नाही. मानवाच्या मनामध्ये चांगल्या भावना जागविण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया आहे. रमजान हा आत्मशुध्दी करणारा महिना आहे. रमजान पवित्र प्रार्थना करण्याचा, मनापासून अल्लाहची उपासना करण्याचा महिना आहे. 'रोजे' म्हणजे इंद्रियाना वश करण्याचा तप आहे. या काळामध्ये वाईट गोष्टीकडे जाणे, वाईट गोष्टी करणे तर दूरच, त्यांच्याबाबत विचार करणे हा सुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, खोटे अथवा दुसऱ्याला त्रास होईल असे बोलणे निषिध्द मानले जाते. थोडक्यात रोजे (उपवास) केल्यानंतर वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये व वाईट बोलू नये. रोजे राहणाऱ्याने मन, वचन आणि कर्माने स्वत:ला शिस्तबध्द आणि संयमित ठेवावे लागते.


       पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत फक्त आपल्या दीन अर्थात् अल्लाहच्या स्मरणात मग्न राहून आत्मिक शांती मिळविण्याची ही नामी संधी आहे. अल्लाह सर्वांना 'रोजे' करण्याची आणि उपासना करण्याची सुबुद्धी देवो...!


सोमवार, १२ एप्रिल, २०२१

गुढी पाडवा - विशेष लेख

 

गुढी पाडवा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       मराठी वर्षात एकूण साडेतीन शुभ अशा मुहूर्तांची माहिती मिळते. त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होय. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात चांगल्या दिवशी व चांगल्या मुहूर्तावर करावी अशी  आपल्या पूर्वजांची आज्ञा आहे. अशा शुभकामाच्या संकल्पाचा एक मंगल मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा होय.


       शिशिर ऋतुबरोबर कडाक्याची थंडी संपते. ऋतूंचा राजा वसंत पुढे सरसावतो. सृष्टीला नवे चैतन्य प्राप्त होते. उन्हाच्या झळा वाढत असतानाच सृष्टी बहरत असते. झाडेझुडपे आपला पर्णसंभार सोडून फुलांनी बहरून जातात. पांगारा, बहावा, गुलमोहर, पळस वेड्यासारखे वाढतात. झाडांवर आलेली पालवीसुद्धा कितीतरी प्रकारची असते. फिक्कट तांबडी, गर्द हिरवी, चक्क लालसर. कांही झाडांना पालवी येण्यापूर्वीच बहरण्याची हुक्की आलेली असते. यावेळी परागकण गोळा करणारे पक्षी, गुंजाररव करणारे भुंगे आणि मधमाशा यांची लगबग पहाण्यासारखी असते. वसंताच्या या आगमनाबरोबरच नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा मनामनात निर्माण होतात. चैत्र महिन्यात नव्या मराठी वर्षाची सुरुवात होते. वर्षाच्या सुरुवातीचा हा महत्त्वाचा दिवस लोक आनंदाने साजरा करतात. नव्या वर्षाची सुरुवात सुखासमाधानात साजरी केली की, सारं वर्ष सुखात जाते अशी भावना आहे. हा पहिला दिवस म्हणजे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडव्याचा मंगल दिवस.


सणाबद्दलच्या पौराणिक कथा:

       रामायण आपण सर्वजण जाणतो. त्यामध्ये एक कथा आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी चौदा वर्षे वनवासात काढली. वडील बंधूची प्रेमळ आज्ञा म्हणून भरत आयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्राच्या येण्याचीच वाट पहात होता. चौदा वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचं असं भरतानं ठरविलं. तशी त्यांनी तयारी पण केली. दुसऱ्या दिवशी भरत पहाटेच उठला. श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. मनोमन सीतामाई व श्रीलक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चित्तेकडे निघाला. एवढ्यात एक नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आला. भरतास वंदन करून त्यांनी प्रभू रामचंद्र येत असल्याची वर्दी दिली. भरताला खूप आनंद झाला. त्यानं शत्रुघ्नला सांगितलं, आयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्राम पासून आयोध्या नगरीपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या झंकाराने सारे आकाश भरून गेले. श्रीरामाचे पुष्पक विमान खाली आले. सर्वांचा आवडता राजा श्रीराम यांच्या दर्शनासाठी अनेकांचे प्राण डोळ्यात साठले होते. श्रीरामांच्या जयनादांनी आयोध्या दणाणून गेली. डोक्यावर श्रीरामांच्या पादुका घेऊन भरत पुढे गेला. भावाभावांची भेट झाली. तो देखावा पाहून आयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचे पूर लोटले.

ते म्हणू लागले...

राघवे उचलोनी ते समयी।

भरत दृढ धरिला हृदयी ।।


       श्रीराम भरत भेटीचा देखावा काय वर्णावा? लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली, गुढ्या उभारल्या. त्यातून आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस. तेंव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे मानतात.


       दुसरी एक कथा सांगितली जाते. फार वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती. प्रतिष्ठानपूर असेही त्या नगरीचे नांव होते. तिथे शालीवाहन नावाचा एक राजा होऊन गेला. राजा अतिशय पराक्रमी, न्यायी आणि शूर होता. याच काळात राजा शक आणि त्याचे सैन्य वेळोवेळी राज्यावर स्वारी करीत होते. जनतेची लूट, अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले. शक राजावर शालीवाहनाने स्वारी केली व त्याचा पराभव केला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले. लोकांना आनंद झाला. शालीवाहनाच्या पराक्रमाचा हाच विजयदिन होय. हाच तो चैत्र पाडव्याचा दिवस. या दिवसापासूनच इ. स.सुरू झाल्यावर ७८ वर्षानंतर शालीवाहन शक वर्षाची सुरूवात झाली. दक्षिण भारतात हाच वर्षारंभ मानतात.


सण कसा साजरा करतात:

       भारतातील बहुसंख्य लोक हा सण मोठ्या आनंदाने, हौसेने साजरा करतात. एखादा भव्य राजवाडा असो किंवा एखादी सामान्य फाटकी झोपडी असो या दिवशी त्यावर गुढी दिसतेच. एक सरळ उंच साधी किंवा वेताची काठी घेतात. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचे, तांब्याचे किंवा पितळी भांडे पालथे घालून बांधतात. एक सुंदरसं रेशमी वस्त्र किंवा चोळखण त्याच्या सोबत कडूलिंबाचे डहाळे आणि साखरेच्या गाठीची किंवा खोबऱ्याच्या वाटीची माळ त्याला घालतात. हीच गुढी होय. गुढीला गंध, फुले वाहून पूजा करतात. गूळ खोबऱ्याचा नैवद्य दाखवितात.


       गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी सर्वजण सुगंधी द्रव्य लावून मंगलस्नान करतात. गुढी उभारून पूजा करतात. त्यानंतर कडूलिंबाची पाने, मिरे, हिंग, साखर, जिरे, ओवा, चिंच यासह बारीक ठेचून खातात. या पदार्थामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते, बुद्धी तेजस्वी होते. या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या व अन्य गोडधोड पदार्थ केले जातात. एकत्र बसून मधुर जेवणाचा आस्वाद घेतला जातो.


       नव्या वर्षातील पहिला दिवस म्हणून लोक या नव्या दिवशी नव्या कामाची सुरुवात करतात. गुढीबरोबरच लोक आपल्या घरी नवे पंचांग आणून त्याची पूजा करतात. दुपारी जाणकार लोक पंचांगातील वर्षफल भविष्य वाचतात. हे वर्ष कसे जाईल? यावर विचार मांडतात. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात त्याचे श्रवण करतात. याच दिवशी ब्रम्हदेवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते.


       अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...।

शेवटी एवढंच म्हणेन....

वर्षाला येतो गुढी पाडवा।

सर्वांच्या जीवनात येऊ दे गोडवा।


मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

आरोग्यमंत्र कुटूंबाचा - विशेष लेख.

 

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्ताने,


आरोग्यमंत्र कुटूंबाचा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान आपण सर्वजण अनुभवत आहोत. कोरोनाने कित्येकांचे प्राण घेतले. मरण पावलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय अश्रूत भिजवून हुंदका आवरत घास गिळत आहेत. प्राप्त परिस्थितीशी सामना करता न आल्यामुळे कित्येकांनी आपली जीवनयात्रा आपल्याच हाताने संपवली आहे. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे.


       कोरोनामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली हे खरे आहे, पण कोरोनानं एक चांगले काम केले आहे.... दचकलात काय?


       कोरोनानं माणसाला आपल्या जीवनाचं मोल काय आहे हे दाखवून दिलं. सर्व प्रकारच्या धनसंपत्तीपेक्षा आपलं आरोग्य उत्तम राखणं महत्वाचं आहे हे पटवून दिले, समजावून सांगितलं. करोडोची संपत्ती, शेकडो नातेवाईक असूनही कोविड सेंटरमध्ये बेडवर एकट्यानेच जीवन मरणाची लढाई लढणे अटळ झाले. जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य व आपले कुटूंबीय हे कळून चुकले.


आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा आरोग्यमंत्र कुटूंबाचा.....

आरोग्य नियमांचे पालन करत असताना कुटूंबाचे सहकार्य खूप आवश्यक असते, शिवाय त्यामुळे सर्व कुटूंबाचे आरोग्य व्यवस्थित रहायला मदत मिळते. कुटूंबाच्या आरोग्याचा विचार करतांना सर्वप्रथम लक्षात घ्याव्या लागतील कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती व सवयी. कुटुंब म्हटले की परस्परासाठी थांबणे, परस्परांच्या आवडीनिवडीचा विचार करणे आले. कौटुंबिक प्रेमाखातर, कुटूंबाच्या मानसिक आरोग्याखातर हे करणे आवश्यक असले तरी त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही ना याकडे लक्ष द्यायला हवे. उदाहरणार्थ एखाद्या दिवशी यजमानांना रात्री घरी यायला उशीर होणार असला आणि पत्नी जेवायची थांबली तर दोघांना बरे वाटेल, पण पत्नीने दररोज असे करणे बरोबर नाही. अन्यथा रोजच्या जागरणाने व भुकेले राहिल्याने दोघांचे पचन बिघडून बाकीच्या त्रासांना आमंत्रण मिळेल.


       कुटूंबाच्या आहाराची योजना करतांनाही सर्वांच्या तब्येतीचा विचार करायला हवा. बहुतेक वेळेला आपण फक्त आवडीनिवडी सांभाळत राहतो. पण आरोग्य सांभाळण्यासाठी तब्येतीनुरुप आहारयोजना करणे अधिक गरजेचे आहे, हे समजून घ्यायला हवे. जसे इडली, डोसा, ढोकळा वगैरे आंबवून तयार केलेले पदार्थ कफप्रकृतीच्या व्यक्तीला सहज मानवतात पण पित्तप्रकृतीच्या व्यक्तीचे पित्त वाढवू शकतात किंवा वातप्रकृतीला पचायला जड ठरू शकतात. अशावेळी वात, पित्त प्रकृतीसाठी इडली सांबाराबरोबर भात सांबार किंवा वरण भातही बनवावा. दूध लोण्यासारखे कफ वाढविणारे पदार्थ वात पित्त प्रकृतीला थोडे अधिक दिले तरी चालते पण कफ प्रकृतीला मात्र मर्यादित प्रमाणात देणे चांगले. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य नीट रहावे यासाठी तांदूळ भाजून घेणे, कणीक भाजून घेणे यासारख्या साध्या उपायांचाही अधिक उपयोग होतो.


       कुटुंबाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन खेळ खेळण्याचा, सर्वांनी मिळून सहलीला जाण्याचा, कांहीतरी वेगळे उपक्रम करण्याचा उपयोग होत असतो. यातही कुटुंबातील सर्व सदस्यांचा विचार करायला हवा. उदा. वातपित्तात्मक प्रकृतीला अधिक धावपळ, दगदग सहन होत नाही, तर कफ प्रकृतीला शारीरिक हालचाली न करता एका ठिकाणी फार वेळ बसणे हितावह नसते. व्यायामाच्या बाबतीतही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे गोष्टी संतुलन साधणाऱ्या असल्याने घरातील सर्वांसाठी अनुकूल असतात, मात्र त्यांचे प्रमाण तब्बेतीला सोसवेल असे असावे. दमछाक करणारे, घामाघूम करणारे व्यायाम करू नयेत. सहलीला जातानाही असे ठिकाण निवडावे की जेथे कुटुंबातील सर्वांनाच आनंद घेता येईल. कुटुंबात आजी आजोबांनी अशा ठिकाणी जावे, जिथे चढ उतार करायची आवश्यकता भासणार नाही, दगदग होणार नाही.


       कौटुंबिक आरोग्याचा विचार करतांना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. घरातील सगळ्यांनी रोज किमान एकदा तरी एकत्र बसून जेवण करावे. याचा कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो. कुटूंबातील सर्वांना एकमेकांविषयी आदर व प्रेम असणे आवश्यक आहे.


       सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब ही संकल्पना मर्यादित ठेवू नये. घरातील लोक हे जसे कुटुंबातील असतात तसेच इमारतीतील किंवा कॉलोनीतील, आजूबाजूला राहणारे लोक मिळूनही एक मोठे कुटूंबच असते. आपल्या घरात काही समारंभ असला, लग्नकार्य असले तर  मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा किंवा वेळीअवेळी फटाके वाजविण्याचा आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवावे.


कुटूंबाच्या आरोग्याविषयी मौलिक टिप्स:

  • सर्वांनी रोज सकाळी भिजवलेले बदाम किंवा सुक्या मेव्यातील इतर पदार्थ खावेत.
  • रोजच्या आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा.
  • लहान मुलांना शारीरिक खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे. सातत्याने टीव्ही किंवा कॉम्प्युटर समोर बसून राहण्याची सवय लागणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • कुटुंबातील सर्वांनीच रात्री जड पदार्थ खाणे टाळावे. विशेषतः मांसाहार, तळलेले पदार्थ टाळावेत.
  • कुटुंबातील व्यक्तींच्या साध्यासुध्या तक्रारीवर उदा. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अपचन, हातपाय मुरगाळणे वगैरे साठी घरगुती उपाय करावेत. त्यासाठीचा किट तयार ठेवावा.
  • ऋतुनुसार हवामानात होणाऱ्या बदलांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या आहार आचरणात योग्य ते बदल करावेत. उदा. पावसाळ्यात पाणी उकळून पिणे, उन्हाळ्यात पित्त वाढविणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, हिवाळ्यात धातपोषक गोष्टींचे आवर्जून सेवन करावे.
  • अंगाला तेल लावणे, पाठीला तेल लावणे, यासारख्या गोष्टी कुटुंबातील सर्वांनाच हितकर असतात. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे वेळ काढला तर आरोग्य टिकेलच पण स्नेहबंध टिकायलाही हातभार लागेल.
  • स्वयंपाक करताना नुसत्या चवीचा विचार न करता आयुर्वेदिक संस्काराना महत्त्व द्यावे. केशर, डिंक, सुकामेवा, पालेभाज्या, फळभाज्या यांचा वापर योग्य प्रकारे करावा त्यामुळे स्वयंपाक चवदार बनेलच पण कुटूंबाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत मिळेल.


कोरोनासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी महत्वाच्या टिप्स...

  • आपले लक्ष आपण आरोग्यदायी होण्याकडे द्या. विनाकारण भिती बाळगू नका, काळजी करू नका, काळजी घ्या.
  • सतत कार्यमग्न रहा.
  • सकस आहार घ्या, अति खाणे पिणे टाळा.
  • व्यायाम किंवा शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल होईल असा व्यायाम करा.
  • सतत नवा विचार करा.
  • मनात निर्माण झालेले प्रश्न दाबून टाकू नका, त्यांची उत्तरे शोधा.
  • एखादा छंद जोपासा. एखादी कला आत्मसात करा, त्यात रममाण व्हा.
  • जे कच्चे खाता येते ते भाजून खाऊ नका, जे भाजून खाता येते ते शिजवून खाऊ नका, जे शिजवून खाता येते ते तळून खाऊ नका.
  • सकाळी नाष्टा राजासारखा घ्या. दुपारी प्रधानासारखा मध्यम आहार घ्या. रात्री मात्र भिकाऱ्याप्रमाणे अगदी थोडासाच हातावर मावेल एवढाच आहार घ्या.


अशा प्रकारे स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।