विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ मे, २०२२

आमचा 42 वा लग्नवाढदिवस


आमचा ४२ वा लग्नवाढदिवस

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 




       मे महिन्यात मोसमी पावसासारखा वळवाचा पाऊस बरसला. तापलेली धरती शांत झाली. वरच्या दुधाने सुकलेली झाडे व वेली नी आईच्या दुधाने बाळसे धरले. आमच्या दारी कर्दळीवर लाल, पिवळ्या झुबकेदार फुलांनी हजेरी लावली. कुंडीत वाढलेल्या गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या फुलांनी मन भरून आले. जिन्यावरच्या मोगऱ्याने घरात सुगंधाची उधळण केली अशा रम्य वातावरणात माझ्या दोन्ही लेकी अरमान व यास्मीन आपल्या लेकरांसह उन्हाळी सुट्टीतील माहेरपणासाठी आल्या आणि आमच्या घराचे गोकुळ झाले. रौनक व राहीबला खंदे सवंगडी मिळाले.


       अशा या रम्य वातावरणात आमच्या लग्नाचा पंचवीस में हा बेचाळीसावा वाढदिवस आला. आदल्या दिवसापासूनच हीना सूनबाईंची लगबग सुरू झाली. तिने लोणी डोशांचा बेत केला. त्यामुळे आदल्या दिवशी हळदी मेहंदीची जशी गडबड असते ना तश्शी लगबग सुरु होती. सकाळी उठल्यानंतर सहा नातवंडाकडून शुभेच्छा मिळाल्या. सून, चिरंजीव, लेकींनी शुभेच्छा दिल्या. आठवण आजीची ग्रुपवर शुभेच्छांचा पाऊस पडला. उरलेल्या पीठाचे लोणी डोशांचा नाष्टा झाल्यावर सर्व नातवंडे शुभेच्छा पत्रे बनविण्यासाठी सज्ज झाली. कागद मिळविले, रंगाची जुळणी झाली आणि प्रत्येकाने आपले कौशल्य पणाला लावून सुंदर सुंदर कार्डस् तयार केले. अल्फीया नातीचे कार्ड अतिसुंदर कारण ती सर्वात मोठी शिवाय चित्रकार. सोहानेही फार सुंदर कार्ड तयार केले व दाखवून दिले हम भी कुछ कम नही. झियान व रौनक या दोघांनी एकच कार्ड तयार केले पण भले मोठे. या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो. मुलींनी अबोलीची फुले आणून गजरे केले. आम्ही दोघे वास्तुशांतीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून मुली आम्हाला गिफ्ट आणण्यासाठी बाहेर पडल्या. बऱ्याच वेळाने एक छानशी साडी व यांच्यासाठी कपडे घेऊन परतल्या. संध्याकाळचा बेत तिघींनी ठरवून टाकला. वडापाव, केक, कलाकंद, दाल खिचडीचा फक्कड बेत ठरला. चिरंजीव ऑफिसहून आल्यानंतर दोघे केक आणण्यासाठी बाहेर गेले. घरी राहणाऱ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली. नव्या साडीसाठी मॅचिंगची तयारी झाली. साडी पिन्अप करण्यासाठी तिन्ही लेकी तयार होत्या. त्यामुळे बेचाळीस वर्षापूर्वीची आठवण झाली. मन भरून आले. आम्ही ही गोड नातवंडाना रिटर्न गिफ्ट आणून ठेवले. माझ्या मुलाच्या निरिक्षणशक्तीचे कौतुक वाटले कारण त्याने केक आणतांना पप्पांसाठी एक छानशी उन्हाळी टोपी आणली. केक कापल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. गोड केकचा आस्वाद घेतल्यानंतर मस्त वडा पाववर आडवा हात मारला. बेचाळीसावा लग्न वाढदिवस अविस्मरणीय केला माझ्या पिलांनी व लाडक्या नातवंडानी.

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

नातवंडांना गोष्टी सांगताना - विशेष लेख


नातवंडांना गोष्टी सांगताना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी

       मार्च २०२० ला कोरोना नावाच्या महाभयंकर राक्षसाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपल्या सर्वांचीच जीवनशैली बदलून गेली. जरा घर सोडा, थोडावेळ मोकळ्या हवेत फिरून या, निसर्गाच्या सहवासात राहा तुमचे आरोग्य उत्तम राहील असा सल्ला देणारे लोक, घरातून अजिबात बाहेर पडू नका, हात वरचेवर धुवा, मास्क लावा असा सल्ला देऊ लागले. शाळा, बाजार, चित्रपटगृह, एस. टी. बस प्रवास सारेकाही बंद झाले. आणि मागे पडलेले, जोपासता न आलेले छंद पुढे नेटाने निभाऊ लागले. वयाने मोठ्या असलेल्या लोकांचे ठीक झाले. पण लहान मुलांचे फार अवघड झाले. घरात कोंडून बसणे त्यांना जमेनासे झाले. अपवाद वगळता सर्वच लहान मुलांनी दूरदर्शनला आणि मोबाईलला जवळ केले. टीव्ही आणि मोबाईलचे त्यांना वेड लागले. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले. आयतीच संधी मिळाली. मोबाईल हातात धरूच नकोस म्हणणारे पालक आटापिटा करून मोबाईल खरेदी करून मुलांच्या हातात देऊ लागले त्याशिवाय काय करणार बिचारे पालक? आलिया भोगासी असावे सादर या उक्तीनुसार पालक आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ लागले.


            अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मुलांना मोबाईल नको घेऊ, टीव्ही पाहू नकोस हे सांगणे सोपे आहे पण त्यांनी काय करावे हे पालकांनी विचारपूर्वक ठरवले पाहिजे. त्यांना इतर बाबतीत रमण्याचे पर्याय शोधले पाहिजेत. त्यांच्याबरोबर खेळले पाहिजे. त्यांना कृतीत रमवले पाहिजे. त्यांची अभिरुची ओळखून त्यांच्या अभिरुची प्रमाणे त्यांना खेळात, गोष्ट ऐकविण्यात रमविले पाहिजे. असाच काहीसा विचार करून मी माझ्या नातवंडाना बालकथा, बोधकथा, संस्कारकथा सांगण्याचा नित्यकर्म लॉकडाऊनच्या काळात सुरू केला. गोष्टी ऐकण्यात ते छान रमू लागले. गोष्टी बरोबरच काही बडबड गीते म्हणू लागले. गोष्टी गाणी ऐकून त्यांच्यातही कमालीची सजगता निर्माण झाली. मध्ये मध्ये प्रश्नही विचारू लागले. त्यातून हल्ली मुलांची विचार शक्ती किती प्रबळ झालेली आहे हे समजले गाणी गोष्टी सांगताना आजी-आजोबांना सतर्क करण्याकरता हा लेखन प्रपंच.


           माझ्या साडेतीन वर्षाच्या राहीब नावाच्या छोट्या नातवाला एक गोष्ट सांगत होते. जी गोष्ट पाचवीच्या हिंदी पाठ्यपुस्तकात समाविष्ट होती. दोघे बहिण-भाऊ रस्त्याने चालले भाऊ होता आठ वर्षाचा व बहीण चार वर्षाची. एक कुत्रा त्यांच्या अंगावर आला. मी पळून गेलो तर कुत्रा बहिणीला चावेल म्हणून भावाने एक युक्ती केली. त्याने आपल्या अंगातला कोट काढला व कुत्र्याच्या तोंडावर फेकला. तो कुत्रा कोट बाजूला करेपर्यंत तो बहिणीला घेऊन पळाला व लपून बसला.

किती हुशार धाडसी होता ना तो भैय्या ?

          

        हे ऐकून राहीब म्हणाला, "वो भैय्या चालाक था. हमारा भैय्या ऐसा नहीं करेगा". मी म्हणाले, "क्यो नही करेगा ?" राहीब म्हणाला, "मेरा भैया मुझे घुमाने नही लेके जाता. वो हमेशा टीव्ही देखता है मोबाइल पर गेम खेलता है".

            

        काय म्हणावे याला? मी म्हणाले, "नही रे बाबा, तेरा भैया भी कुत्ता सामने आने पर ऐसाही करेगा". त्यावर राहीबचे उत्तर, "मॉ भैय्या कोट नही पहेनता. वो तो जाकेट पहनता है". मी म्हणाले, "जाकेट भी कोट जैसा काम करेगा". पण या बोलण्याने मी थक्क झाले नाही तरच नवल. 

          

        या चुणचुणीत राहिबला झोपवताना मी, 'इथं माझ्या हातावर नाच रे मोरा' हे गाणे म्हणत होते. डोळे उघडून मला मध्येच थांबवून तो म्हणाला, "मैने गाव को जाते वक्त मोर को देख लिया है. वो कितना बड़ा बड़ा होता है. मा मुझे बोल इतना बड़ा मोर हमारे हाथ पर कैसे नाचे गा?" मी त्याला समजावले, "मोर हातपे नही नाचेगा. लेकिन हम उसे बिनती कर रहे है, बुलाते है. हम बरसात को बुलाते है, येरे पावसा तुला देतो पैसा. हमारे बुलाने पर बरसात उस वक्त आयेगा ही ऐसा नही हो सकता. वैसे ही हम मोर को नाचने बुला रहे है व आयेगा या नहीं आयेगा हम गाते रहेंगे".


          तर अशी मजा होते आजी-आजोबांची नातवंडांना गाणी गोष्टी सांगताना. नातवंडे अपडेट झाली आहेत. आजी-आजोबानाही गोष्टी गाणी सांगताना अधिक हुशार व अपडेट व्हायला हवे. अनपेक्षित प्रश्नाने गोंधळून न जाता त्यांना समजवायला हवे तरच आपण लाडके आजी आजोबा बनू , होय ना?


     माझा सात वर्षाचा रौनक नावाचा नातू गेल्यावर्षी दुसरीत होता. मी त्याला कोल्हा आणि द्राक्षे हि गोष्ट सांगितली व काय बोध घ्यायचा हे ही त्याला प्रश्न विचारून सांगितले. त्यानंतर तो मला म्हणाला कोल्हा व्हेजिटेरियन आहे मी म्हणाले नाही. तो म्हणाला मग मला सांग तो कोल्हा द्राक्ष खाण्यासाठी का गेला होता? त्याच्या या प्रश्नाने मी क्षणभर अवाक झाले. मला आठवले इंग्लिश च्या पुस्तकात ही कथा होती आणि कित्येक वर्ष पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ही कथा शिकवली होती, पण असा प्रश्न यापूर्वी कोणीही विचारला नव्हता, स्वतःला त्याला समजावले बाळ ही कथा काल्पनिक आहे. कोल्हा प्रत्यक्षात बोलत नसतो. पण आपण म्हणतो, कोल्हा बकरी ला म्हणाला. त्याचप्रमाणे कोल्ह्याने द्राक्षे काढायचा प्रयत्न केला. पण त्याला द्राक्ष काढता आली नाही हे मान्य करायला तो तयार नव्हता. म्हणून त्याने द्राक्षाला आंबट म्हटले. थोडक्यात काय तर त्याला समजावताना माझी दमछाक झाली.


       एक दिवस रौनकला  "हात लावीन ते सोनं" ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट सांगून झाल्यावर तो म्हणाला; मा मला एक सांग! त्याने ताटाला हात लावल्यावर ते सोन्याचे झाले. त्यातील अन्नही सोन्याचे झाले. त्याला काही खाता येईना. तेव्हा त्यांनी असे करायला पाहिजे होते. त्याला दुसऱ्याने घास भरवावा म्हणजे त्या राजाचा हात ताटाला, अन्नाला लागणार नाही. अनायसे त्याचे पोट भरेल. त्या राज्याचे दोन्ही हात बांधून ठेवायचे. कुठली वस्तू सोन्याची करायची असली तरच त्याचे हात सोडायचे. देवाने तर त्याला हात लावला तर सोने असा वर दिला होता ना? या राजाने विनाकारण, दिलेला वर परत घ्यायला सांगितला.


            या त्याच्या युक्तिवादावर माझी क्षणभर बोलतीच बंद झाली. त्याला समजावले बाबारे हात लावीन तिथे याचा अर्थ त्याच्या शरीराचा कोणत्याही वस्तूला स्पर्श झाला तरी ती सोन्याची होईल असा आहे. त्याने नाखुशीने ते समजून घेतले. तुम्ही तरी सांगा ना काय उत्तर द्यायचे अशा वेळेला ?


शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

एक अविस्मरणीय फॅमिली ट्रीप - विशेष आढावा गणपतीपुळे सहलीचा


एक अविस्मरणीय फॅमिली ट्रीप - विशेष आढावा गणपतीपुळे सहलीचा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


ठिकाण: गणपतीपुळे

       ७५ वर्षाच्या आजोबांपासून एक वर्षाच्या नातवंडापर्यंत समावेश असलेली रत्नागिरी गणपतीपुळे ट्रीप सर्वांच्या जीवनातील एक अविस्मरणीय ट्रीप ठरली.


या ट्रीपमधील ठळक बाबी:

        सुरूवातीला नाही नाही म्हणत असलेल्या व्यक्ती फुल्ल तयारीनिशी ट्रीपमध्ये सामील झाल्या व त्यांनी अगदी मनापासून ट्रीपचा आनंद घेतला.


       सर्वांना मायेच्या धाग्यानी घट्ट बांधून ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या 'बू' ला विशाल समुद्र डोळे भरुन बघता आला. न्यू जनरेशन कपल्सनी फॅमिली ट्रीपमध्ये सुद्धा मनमुराद आनंद लुटला. साठ वर्षावरील व्यक्तीनी तो आनंद डोळे भरून पाहिला. एकल सभासदांनी मनातल्या मनात पुढील प्लॅन तयार केला. साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणातील सहभोजन म्हणजे जरा कमी सर्वांच्या डोहाळे जेवणाचाच कार्यक्रम ठरला.


       खरा अभिमान वाटला आमच्या खऱ्या वारसदारांचा. सर्वांना घोड्यावर बसवून इतकी सुंदर ट्रीप घडवून आणल्याचा. आमची न्यू जनरेशन इतकी समंजस, सर्वांच्या बद्दल नितांत आदर असलेली, सर्वांची काळजी घेणारी, मित्रपरिवार जपणारी आहे हे पाहून समाधान वाटले.


       लक्झरी मध्ये धमाल गाण्यांनी कमाल केली. लहान मुलांपासून आजीआजोबा पर्यंत सर्वांनी डान्सचा आनंद लुटला. विशेष म्हणजे बैठकीच्या डान्सचा एक नवा प्रकार शोधून काढला. झिंगाट, खंडेराया, शांताबाई, गाडीवर, इ. गाण्यावर बसून डान्स ........।


       ट्रिपमध्ये डिग्रजच्या बडेभाईंची स्मरणशक्ती, बोलण्यातील ठामपणा, आरोग्याचे सर्व नियम पाळण्याची सवय सर्वांनी अनुकरण करण्यासारखी आहे. कुणाचे गायनप्रेम, कुणाचे डान्सप्रेम, कुणाचे सेल्फी व फोटोप्रेम, कुणाचे पाण्यात पहुडणेप्रेम, कुणाचे कलाकुसरप्रेम, कुणाचे ड्रायव्हिंगप्रेम, कुणाचे हास्यप्रेम सगळंच अप्रतिम....।


अशी झाली सहल मजेशीर।

पुन्हा जाण्याची लागली हुरहुर।

 

To

डॉ. थोरात फॅमिली, गणपतीपुळे 

        डॉक्टर, तुम्ही आमच्या परिवाराला दिलेल्या स्नेहपूर्ण ट्रिटमेंटने आम्ही खरंच खूप भारावून गेलो. बागणीसारख्या ग्रामीण भागात जन्म घेऊन इतक्या लांब गणपतीपुळे सारख्या पर्यटनस्थळी इतकं सुंदर विश्व तुम्ही निर्माण केले आहे आणि इतकं करून सुद्धा तुमच्यामध्ये गर्वाचा लवलेशही आम्हाला दिसला नाही. जीवनात अनेक व्यक्ती सतत भेटत असतात पण कांही थोड्याच व्यक्ती भेटल्याक्षणीच आपल्या होऊन जातात त्यापैकी तुम्ही आहात. आजकाल चहा द्यावा लागेल म्हणून तोंड फिरवून सोईस्करपणे दुर्लक्ष करणारे कांही नातेवाईक आम्ही अनुभवले आहेत, या पार्श्वभूमीवर वीस बावीस व्यक्तिंची राहण्याची सोय करून त्यांचा पाहुणचार करणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्ती म्हणजे मनुष्यरूपात  वावरणाऱ्या देवताच म्हणणे योग्य ठरेल.


      पेशंटना सुयोग्य ट्रिटमेंट देऊन हजारोंनी बील वसूल करणाऱ्या डॉक्टरसाहेबांना पेशंटशी चार दिलासादायक शब्द बोलण्यासाठी अजिबात वेळ नसतो. नातेवाईकांना धीर देणे असभ्य वाटते. या कुठल्याच प्रकारात न बसणारे तुम्ही पेशंटच्या शरीराची व मनाची नस ओळखणारे डॉक्टर आहात असे आम्हाला अगदी मनापासून वाटले.


तुमची अशीच भरभराट होवो, सुयश लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.....। तुमचे आभार न मानता तुमच्या ऋणात राहणे आमच्या परिवाराला आवडेल.

आपले स्नेहांकित,

तांबोळी, शिकलगार व पटवेगार परिवार।


शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाताळ ख्रिसमस - विशेष लेख


नाताळ ख्रिसमस: विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       

       नाताळ  किंवा ख्रिसमस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म ही दंतकथा किंवा काल्पनिक गोष्ट नसून एक ऐतिहासिक घटना आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पवित्र शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त हे देवाचे, जिवंत देवाचे पुत्र आहेत.


       या देवाच्या पुत्राला या भूतलावर मनुष्याचा जन्म का घ्यावा लागला ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातील पहिलं पुस्तक अर्थात उत्पत्तीच्या पुस्तकात पहावे लागेल.


       उत्पत्तीच्या पुस्तकात असे नमूद केलेले आहे की, देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आकाश, पृथ्वी, समुद्र, नद्या, डोंगर, झाडी, पशू, पक्षी, पाण्यातील जीव इत्यादी आणि सर्वात शेवटी त्याने आदाम आणि इव्ह अर्थातच पुरुष व स्त्री यांची निर्मिती केली. देवाने या पुरुष आणि स्त्रीला ऐदेन नावाच्या बागेत ठेवले होते. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणिमात्र यांच्यावर देवाने मनुष्याला अधिकार दिला होता. बागेतील वाट्टेल त्या झाडाचे फळ खाण्याची मुभा होती पण 'बऱ्या वाईटचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको' अशी देवाने आदामाला आज्ञा दिली होती. 'ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील' अशी ताकीद देवाने आदामाला दिली होती. पुढे उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटले आहे की, सर्प जो सैतानाचा प्रतीक आहे, ज्याच्या आमिषाला बळी पडून स्त्रीने, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करून, त्या झाडाचे फळ खाल्ले व आदामाला ही ते खाण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीमुळे, पाप या जगात आले व मनुष्य देवापासून दूर झाला. देवामध्ये व मनुष्यामध्ये या पापामुळे एक दरी निर्माण झाली. ( उत्पती३ः१७-१९)


       देव जो पवित्र आहे, प्रेमळ आहे, कनवाळू आहे त्याची इच्छा होती की, मनुष्याबरोबर समेट करावा. यासाठी सर्वप्रथम पापाची खंडणी गरजेची होती. पापाचे वेतन मरण आहे. रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. रक्ताशिवाय जिवंत राहता येत नाही. अर्थातच पापक्षमेसाठी रक्तार्पण होऊ लागलं. प्राण्यांना व पक्षांना बळी देण्याची प्रथा सुरू झाली. परंतु या प्रथेने पापाचा नायनाट होत नव्हता तर पापावर तात्पुरते पांघरूण घातले जात असे आणि मनुष्य पुन्हा पुन्हा पाप करत असे व निष्पाप जनावरांचा व पक्षांचा बळी जात असे. देवाला या गोष्टीचा वीट आला. पापांच्या क्षालनासाठी पुरेपूर परिपूर्ण व कायमस्वरूपी खंडणी गरजेची होती अनिवार्य होती आणि म्हणून गलतीकारास पत्र ४ः४ मध्ये म्हटले आहे, 'काळाची पूर्णता झाली तेंव्हा देवाने पुत्राला पाठवले.' तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एका विशिष्ट उद्देशासाठी झाला होता. ख्रिस्ताचा जन्म ख्रिस्ती धर्म स्थापित करण्यासाठी नव्हे तर पापात गुरफटलेल्या समस्त मानव जातीला पापापासून सुटका करण्यासाठी, पापाच्या शापापासून त्यांना बंधमुक्त करण्यासाठी, लोकांना क्षमेचा अनुभव देऊन सार्वकालिक जीवनाची आशा देण्याकरिता ख्रिस्ताचा जन्म झाला होता.


     ख्रिस्ताचा जन्म झाला तेंव्हाच त्याने मोठेपणी मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावर बलिदान देणे निश्चित होते. मनुष्याच्या पापासाठी एका निष्पाप मनुष्याचाच बळी आवश्यक होता आणि यासाठी देवाला त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवावं लागलं. त्या देवाच्या पुत्राचा जन्म आपण नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून जगभर साजरा करतो.


ख्रिसमसचा केंद्रबिंदू:

       आज ख्रिसमस साजरा करताना लोक ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, ख्रिसमस केक इत्यादि गोष्टींचा समावेश करतात परंतु आपण सर्वांनी ख्रिसमसचा केंद्रबिंदू कधीच विसरता कामा नये आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला जगाचा प्रकाश म्हणतो (योहान८:१२) प्रकाश हा प्रत्येक सणाचा अविभाज्य हिस्सा आहे आणि ख्रिसमसचा प्रकाश म्हणजे स्वतः प्रभू येशू आणि प्रभू येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनादेखील जगाचा प्रकाश म्हणतो. मत्तय ५:१४,१६ मध्ये ते म्हणतात, "तुम्ही प्रकाश आहात त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा."


ख्रिस्ती जीवनशैली:

       ख्रिस्ती ही एक जीवनशैली आहे. या ख्रिसमसच्या दिवशी आपण सर्वांनी हे लक्षात ठेऊया की, ख्रिस्त आपल्याला धर्मांतर करायला शिकवत नाही तर कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करा असे अवाहन करतो. आपल्याला जर ख्रिसमस खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर आपण इतरांना क्षमा करू या, दुःखितांचे अश्रू पुसूया आणि सर्वांशी प्रेमाने आणि शांतीने वागून हा ख्रिसमस साजरा करू या. गरजू लोकांना मदतीचा हात देवू या. हे नेहमी लक्षात ठेवू या की, ख्रिसमसच्या दिवशी देवाचा पुत्र मनुष्य झाला जेणेकरुन मनुष्याच्या पुत्रांना देवाचे पुत्र होण्याचे सौभाग्य मिळावे.


सर्वांना ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा.....।


शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख

 

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख 

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मियांसह शीख धर्मियांसाठीही फार महत्त्वाचा मानला जातो. परमोच्च ज्ञानाचे सार सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत देणाऱ्या गुरूनानक यांचा जन्म इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे १५ एप्रिल १४६९ मध्ये सध्या पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या पंजाबच्या तलवंडी येथे झाला. त्यांचे जन्मस्थान 'ननकाना साहिब' या नावाने ओळखले जाते. संत गुरुनानक यांच्या वडिलांचे नांव मेहता काळू तर आईचे नांव तृप्तीदेवी होते. त्यांच्या बहिणीचे नांव नानकी होते. नानक लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते. प्रखर बुद्धिमता असणाऱ्या नानकांनी बालपणीच सांसारिक विषयांकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली होती. ते शाळेत जात असताना, शाळा सुटल्यावर गायी-गुरांना रानात चरावयास घेऊन जात असत. तेथे जाऊन ते देवाचे भजन करत असत. लवकरच त्यांनी शाळा सोडून दिली आणि त्यानंतर त्यांनी आपला सर्व वेळ आध्यात्मिक चिंतन व सत्संगात व्यतीत  केला. ते म्हणत, 'मन हे शेतकरी असून आपले शरीर हे एक सुंदर शेत आहे, तर ईश्वराचे नाम हे या शेतातील बियाणे आहेत. प्रेमानेच ही बियाणे रुजतात, फुलतात. माझ्या शेतातून मी अशा पद्धतीने पीक काढीन की, माझ्या कुटुंबाला भरपूर उत्पन्न मिळेल.' नानक यांचे वडील त्यांना बाजरात भाजी विकायला पाठवायचे. त्यावेळी हिशेब करतांना ते तेरा या संख्येला अडखळायचे. जेंव्हा ते तेरा उच्चारायचे तेंव्हा ते ईश्वराच्या स्मरणात रमून जायचे. कारण हिंदी मध्ये तेरा म्हणजे तुझा. त्यांचे मग तेथे लक्ष नसायचे तर ते ईश्वराकडे असायचे. ते नेहमी ईश्वराला उद्देशून म्हणायचे. 'मै तेरा, मै तेरा'.


प्रेम, भक्तीचे समतादूत: गुरुनानक

भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्यामध्ये समन्वय साधून प्रेम भक्तीला महत्त्व देणारे गुरूनानकजी खऱ्या अर्थाने समतेच्या वारीतील निष्ठावंत वारकरी आहेत. पंजाबातील शिखानांच नव्हे तर साऱ्या भारताला भक्ती प्रेमाद्वारे समतेचा संदेश देण्याचे काम गुरूनानकजी यांनी केले. संत कबीर यांच्याप्रमाणे अंधश्रद्धा, पाखंडीपणा, धार्मिक खेळांचा बुरखा फाडण्याचे काम गुरूनानकजीनी केला.


गुरूनानक यांचा उपदेश:

गुरूनानकजी त्यांच्या प्रवचनांमध्ये जातीवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्त्याच्या मार्गावर चालणे आणि सर्वांचा आदर सन्मान करणे आदि उपदेश द्यायचे. त्यांनी स्वतःला भक्ती योगाला वाहून घेतले होते. भक्तीयोग म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा योग होय.  गुरूगोविंदसिंग कर्मयोगी होते. कर्म करणे म्हणजेच मुक्तीचा मार्ग असे ते मानत तर नानकजी भक्तीयोगी होते. बाह्य घडामोडींमध्ये अडकून ईश्वराला विसरू नका, अंतर्मुख होऊन ईश्वराचे नामस्मरण करण्याचा संदेश देऊन त्यांनी लोकांना याकरिता प्रवृत्त केले. त्यांनी पंधराव्या शतकांमध्ये लंगर परंपरेला सुरुवात केली. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, तेथे जमिनीवर बसूनच भोजन केले. जातपात, उच्च नीच आणि अंधविश्वास संपविण्याच्या हेतूनेच त्यांनी ही लंगर परंपरा सुरु केली. लंगरमध्ये सर्वजण एकत्र बसून जेवण करू शकतात. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा शीख धर्मातील तिसरे गुरू अमरदास यांनी पुढे चालू ठेवली व ती आत्तापर्यंत कायम आहे. देशभरातील कोणत्याही गुरूद्वारामध्ये एखादा सण साजरा करण्यासाठी लंगरचे आयोजन केले जाते. लंगरशिवाय कोणताही सण संपन्न होत नाही. लंगरमध्ये विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र येतात. जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे शीखधर्मिय राहतात तेथे लंगरची प्रथा चालू आहे. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जगातील सर्वात मोठ्या लंगरचे आयोजन केले जाते. मंदिरात श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही.


गुरूनानक यांचे साहित्यिक तत्त्वज्ञान:

नानकांच्या मते ईश्वर कृपा झाल्यानंतर कदाचित तत्वज्ञानाचे दार्शनिक भांडार साधकासमोर प्रकट होईल, पण गुरूकृपेनेचते अनुभवाच्या पातळीपर्यंत पोहोचेल म्हणून ते नानकवाणीमध्ये एके ठिकाणी म्हणतात...

'आपे जाने आपे देई, आखहि 

सि भी केइ-केइ.

जिसनो बसते सिफती सलाह

नानक पतीसाही'


       भारतीय तत्व दर्शनात ईश चैतन्याचे जे एकरुपत्व आढळते ते नानकांच्या साहित्यातही भेटते. ईश्वर एक ओ, तो ओंकार स्वरूप आहे. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाची तो मूळ उर्जा आहे. त्यांचे कुणाशी शत्रुत्व नाही आणि मित्रत्व नाही, कारण तो कालातीत आहे म्हणून शिष्यांना मूलमंत्र देतांना नानक म्हणत......

ओंकार, सतिनामु, करता पुरस्खु निरभै, निरवैस, अकालि मुरति

अरजुनि सैभं गुरू प्रसादि ।


इस्लामी शक्तीच्या राजकीय वरवंट्याखाली रगडल्या गेलेल्या, विखुरलेल्या भारतीय समाजास एकत्र करून त्याला सत्नाम, सत्धर्म, सत्जीवन यांना नवी दिशा देण्याचे, त्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य गुरूनानकजींनी केले. त्यांच्या वाणीत एक अद्भूत प्रेरणाशक्ती होती. आपल्या जीवनातील घटनांची कर्मसुसंगत चिकीत्सा मांडतांना ते एके ठिकाणी म्हणतात....

'करमी वे कपडा, नदरीमोखु दुआरू।

नानक एवै जानिए , सभी आपे सचिआरू ।।


       आपण आपल्या जीवनात ज्याप्रमाणे प्रसंगानुरूप आपली वेशभूषा बदलत असतो, त्याचप्रमाणे कर्मास अनुसरून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात. या बदलातील अनुकूलता आणि प्रतिकूलता प्रेमयुक्त समर्पणाने आपल्याला सुखीच करते.


गुरुनानक यांचे कार्य: 

शीख धर्मात दहा गुरू असून, गुरुनानक हे संस्थापक गुरु मानले जातात. सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माविषयी जागृती करणाऱ्या, शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांनी जीवनभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. भारतातच नव्हे तर इराकमधील बगदाद, सौदी अरेबियातील मक्का मदिनासह अनेक अरब देशात भ्रमण केले. त्यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ त्यांच्या चिंतनात होते. एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या क्रांतिकारक विचारांच्या गुरुनानक यांनी 'ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे म्हणून प्रत्येकाशीआपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे' हा महत्त्वाचा संदेश दिला. ते केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा असून त्यांनी आपल्याला त्यांच्या मूल्यातून जीवनाचे महत्त्व शिकविले. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासावर आधारित आर्थिक व्यवस्था दिली. समाजात समानता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली.


आज गुरूनानक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पायी अनंत दंडवत ।।

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख


वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


                वार्धक्य आल्यानंतर म्हटले जाते संध्याछाया, भिवविती हृदया. पण मी म्हणते 'संध्याछाया खुणविती हृदया' असे का ? प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तिने खाली दिलेले सप्तसूर आळवले की तुम्ही सर्वजण माझ्याशी सहमत व्हाल. हे सप्तसूर असे....


१) सावधानता:

निवृत्तीनंतर आहार, विहार आणि विश्रांती या तीन बाबीत सावधानता बाळगायला हवी. वेळेवर जेवणे, व्यायाम करणे, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. एवढे करुनही आजारी पडलोच तर वेळेवर औषधे घेणे व पथ्ये पाळणे आवश्यक.


२) रेखीवपणा:

जेष्ठ झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे मोठमोठी कामे तुमच्या हातून होणार नाहीत. पण छोटी छोटी कामे रेखीवपणे करा. भाजी आणायला सांगितली तर एकदम ताजी टवटवीत आणा. भाजी पाहून पत्नी किंवा पती, सूनबाई एकदम खूश झाली पाहिजे. घराचे अंगण इतके स्वच्छ ठेवा. सर्वांनी म्हणावे वा ! सुंदर आहे तुमचे अंगण ! कपडे निटनेटके, साहित्य व्यवस्थित ठेवा.


३) गर्व नको:

विसरुन जा आपण फार मोठ्या पदावर होतो व फार उत्कृष्ट काम आपण केले आहे. आता आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत. सर्वांशी प्रेमाने वागा. मला इतरांनी मान द्यावा असे वाटत असेल तर दुसऱ्याला मान द्या. आणि हे लक्षात ठेवा 'मुंगी होऊन साखर खाता येते गर्व सोडून द्या. कारण 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती,' 


४) मनोरंजन करा:

समस्येत गुंतलेले आपले मन मनोरंजनात गुंतवा. आनंदी रहा. घरातील इतर सदस्यांचा विचार करुनच टी. व्ही. पहा. कारण तरुणांना पिक्चर व लहानांना कार्टून पहायचा असतो. आपलाच हट्ट नको. बातम्या व क्रिकेट पहाण्याचा. त्यासाठी मोबाईल किंवा रेडिओ वापरा पण आवाज मोठा न करता स्वत:ला ऐकू येईल इतकाच ठेवा. 


५) परमार्थ करा:

आयुष्यभर आपण खूप काम केलं. या वळणावर स्वार्थ थोडासा बाजूला ठेवून परमार्थ करा. ईश्वरभक्ती जमेल, रुचेल तशी करा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा दानधर्म करा पण आपलं दान सत्पात्री होतंय का याकडे लक्ष द्या. आपल्या देण्यामुळे आपण कुणाला आळशी बनवत नाही ना? हेही पहायला हवे.


६) धन जोडा:

आपण आयुष्यभर कमावलेलं धन योग्य ठिकाणी गुंतवून ठेवा. फसवणूक होणार नाही ना? हे जरुर पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना जेवणाचं ताट अवश्य द्या. पण बसायचा पाट मात्र देवू नका. 


७) निर्मोही रहा:

जन्माला आलेल्या प्रत्येकाला एकन् एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे. जन्माला येताना कुणी कांहीही घेवून आला नाही. जातानाही काय घेऊन जायचे नाही. तेंव्हा जे ईश्वराने दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगा. मोह सोडल्यास सुख भरपूर मिळेल.


८) सामंजस्य ठेवा:

नव्या पिढीशी जुळवून घ्या. चालवू नका आपलाच हेका. कारण तुमचा हेका तुमच्यासाठी धोका ठरु शकतो. आमच्यावेळी असं नव्हतं असं वारंवार म्हणू नका. एखादे वेळी जरुर सांगा पण त्यांच्या नव्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. त्यांच्या प्रगतीला साथ द्या. नवी पिढी तुम्हाला हात देईल. व तुमचा उरलेला प्रवास सुखकारक, आनंददायी ठरेल.


             ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनो समजले ना तुम्हाला वार्धक्याचे सप्तसूर ? हे सूर आळवा. आयुष्याची संध्याकाळ सोनेरी किरणांनी शोभिवंत बनेल. होय 

कायमपणे लक्षात ठेवण्यासाठी खाली चार्ट देत आहे.

  • सा- सावधानता ठेवा.
  • रे- रेखीवपणा असू द्या
  • ग-गर्व नको
  • म- मनोरंजन करा
  • प- परमार्थ करा
  • ध- धन जोडा
  • नि- निर्मोही रहा
  • सा- सामंजस्य ठेवा












शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख


उत्कृष्ट प्राध्यापक, मुत्सद्दी प्रशासक, आदर्श तत्त्वज्ञ, विद्वान, बुद्धिवंतांचा मुकूटमणी आणि सामान्य प्राध्यापकापासून भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारे गुरुंचे गुरू डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर, भारत सरकारतर्फे 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख....


गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

अल्प परिचय:

       आंध्रप्रदेश जिल्हा चित्तूरमधील तिरूपती बालाजी या तीर्थक्षेत्राजवळच तिरुत्ताणी गांवात ५ सप्टेंबर १८८८ साली त्यांचा जन्म एका पंडितांच्या घरी झाला. त्यांची परिस्थिती बेताची होती पण ते विद्वान होते. घरात सुसंस्काराचे, ईश्वरभक्तीचे वातावरण होते. त्यांना चार भाऊ व एक बहीण होती. लहानपणीच ते पूजापाठ, मंत्रघोष याचे अनुकरण करायचे. सदाचार व सुविचार यांचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरूपतीतील शाळेत झाले. लहानपणीच ते वाचन, मनन, लेखन यात मग्न असायचे. तीव्र बुद्धिमत्ता, चांगली स्मरणशक्ती व संवेदनशील मन यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तरोत्तर संपन्न होत गेले. माध्यमिक शिक्षणासाठी ते लूथरन या मिशनरी शाळेत गेले. त्या शाळेतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार अधिक केला जायचा. या वातावरणामुळे त्यांच्या मनात आध्यात्मिक जीवनाविषयी ओढ वाटू लागली. हिंदू धर्माविषयी, परंपरेविषयी, तत्वज्ञानाविषयी त्यांनी जे ऐकले त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला हादरे बसले आणि हिंदू धर्म, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा चिकित्सक अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटले. हिंदू धर्मातील कांही रुढी, परंपरा, जातीयता, भेदभाव, अंधश्रद्धा मानवतेसाठी दूर झाल्या पाहिजेत हे त्यांना पटले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षेसाठी इतिहास व गणित विषयाची गोडी असूनही त्यांनी तत्वज्ञान विषय निवडला. त्यांचा पिंडच तत्वज्ञानाचा होता. बी. ए. च्या परीक्षेत ते प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम्. ए. ला त्यांनी प्रबंधासाठी "वेदांतातील नीतिशास्त्र" हा विषय निवडला व सखोल अभ्यास करून त्यांनी तो प्रबंध सादर केला. त्या प्रबंधास प्रथम श्रेणी मिळाली.


ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे:

       १९०९ मध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सी काॅलेजमध्ये प्राध्यापक झाले. तेंव्हापासून चाळीस वर्षे त्यांनी प्राध्यापक, कुलगुरु आदि पदावर कामगिरी बजावली. ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. ते विद्यार्थ्यांना अंधारातून उजेडाकडे नेणारे दीपस्तंभ बनले. त्यांची राहणी साधी पण नीटनेटकी असे. त्यांची वाणी मधुर होती. इंग्रजी व संस्कृत बोलण्याची त्यांची शैली आकर्षक होती. त्यांची अध्यापनाची हातोटी वेगळी होती. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले नसते तरच नवल! त्यांची ख्याती ऐकून म्हैसूर येथील नवीन विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.


अग्रणी भारतीय विचारवंत:

       आर्यांच्या सनातन धर्मापासून ते शंकराचार्यांच्या हिंदू धर्मापर्यंत त्यांनी चिंतन, मनन केले. वेद, वेदांग, उपनिषदे गीता यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. हिंदू धर्माचे सर्वसमावेशक स्वरूप बहुजन सुखाय बहुजन हिताय ही शिकवण रूजविण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांचे सुंदर शैलीतील ग्रंथ, रसाळ व्याख्याने आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधील प्रभावी सहभाग यामुळे एक अग्रणी भारतीय विचारवंत म्हणून जगात त्यांची कीर्ती पसरली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक यांनी त्यांचा गौरव केला. त्यांच्या अथांग विद्वत्तेपुढे पाश्चिमात्य विद्वान धर्मपंडीतही नतमस्तक झाले होते. त्यांनी राधाकृष्णन यांना अर्वाचीन महर्षि ही पदवी दिली. डॉ. राधाकृष्णन यांचा 'रेन ऑफ रिलीजन इन् काॅन्टेम्पररी फिलाॅसाफी' या ग्रंथातून भारतीय वेदांताची आध्यात्मवादी तत्कालीन परिभाषेतील मांडणी जगासमोर आली. म्हैसूर मध्ये कार्यरत असताना कोलकत्ता विद्यापीठाकडून की जे ज्ञानोपासनेचे एक सर्वश्रेष्ठ केंद्र होते त्यांच्याकडून आमंत्रण आले, त्यांनी ते स्विकारले. ते घोड्याच्या बग्गीतून रेल्वे स्टेशनकडे निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी व्यथित अंतःकरणाने जमलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बग्गीचे घोडे सोडले आणि बग्गी स्टेशनपर्यंत ओढत नेली. ते प्रेम, तो आदर पाहून राधाकृष्णन भारावून गेले.


ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी:

       जून १९२६ मध्ये इंग्लंडमध्ये विद्यापीठ परिषदेसाठी कोलकता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. १९२६ मध्येच अमेरिकेतील हाॅवर्ड विद्यापीठात सहावी आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषद झाली. त्या परिषदेत त्यांनी 'माया सिद्धांतः काही समस्या आणि तत्वज्ञानाचे संस्कृतीमधील कार्य' या विषयावर व्याख्यान देऊन श्रोत्यांवर विलक्षण पकड घेतली. भौतिक प्रगतीला जर आध्यात्मिकतेची जोड दिली नाही तर मानवाला खरी सुखशांती लाभणार नाही हे शाश्वत तत्व त्यांनी बिंबवले. श्रोत्यांच्या मनात भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आस्था व आदर निर्माण झाला. १९२३ मध्ये त्यांचा इंडियन फिलाॅसाफी खंड पहिला व १९२७ मध्ये खंड दुसरा प्रसिद्ध झाला.


       राधाकृष्णन यांना अनेक मानसन्मान मिळाले. आंध्र विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ यांनी त्यांना 'डॉक्टरेट' ही पदवी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को संघटनेने त्यांना कार्यकारी सदस्य केले. कांही काळ ते युनेस्कोचे अध्यक्ष झाले. पंडीत मालवीय यांच्या निधनानंतर १९४८ साली ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती झाले. त्याच वर्षी भारत सरकारच्या युनव्हर्सिटी कमिशनचे ते अध्यक्ष झाले. १९४९ ते ५२ या कालावधीत ते भारताचे रशियात राजदूत होते. त्यावेळी रशियाचा सर्वाधिकारी असलेल्या स्टॅलिनसारख्या कडक पोलादी पुरुषावरदेखील डॉ. राधाकृष्णन यांचा प्रभाव पडला. तो म्हणाला, "चोवीस तास ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी महापुरूष या जगात जर कोणी असेल तर तो फक्त डाॅक्टर राधाकृष्णन!"


प्राध्यापक ते राष्ट्रपती:

       डॉ. राधाकृष्णन यांची सन १९५२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. या पदावर असताना त्यांनी रशिया, अमेरिका, जर्मनी, पोलंड, बल्जेरिया, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, आफ्रिका आदि देशाचे दौरे केले. देशादेशातील संघर्ष मिटावेत, वर्णभेद दूर व्हावेत, आर्थिक शोषण थांबवावे आणि आखिल मानव जातीचे कल्याण व्हावे या भारताच्या भूमिकेचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. १९५८ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब प्रदान करण्यात आला. १२ में १९६२ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. राधाकृष्णन यांची निवड झाली. १९६७ साली ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले.


राधाकृष्णन यांचे महान कार्य:

       डॉ. राधाकृष्णन शांततेचे पुरस्कर्ते होते. आपल्या भाषणातून व लेखनातून त्यांनी सतत शांततेचा पुरस्कार केला. जगाला शांततेची गरज आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी जवळजवळ पस्तीस पुस्तके लिहिली. त्यात वेद, उपनिषदे, भारतीय तत्त्वज्ञान, रामायण, टागोरांचे तत्वज्ञान, महाभारत, भारत आणि चीन, गौतम बुद्ध, पूर्व आणि पश्चिम, महात्मा गांधी, हिंदू धर्म आदि पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन ऋषीतुल्य होते. निगर्वीपणा, साधेपणा हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण होता. ते आदर्श शिक्षक होते. सर्व शिक्षकांबद्दल त्यांना आदर वाटायचा. शिक्षकाला समाजात मानाचे स्थान असले पाहिजे असे ते म्हणायचे. शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वाढविले पाहिजे, आपल्या पवित्र आचरणाने समाजापुढे, विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे, निर्भय बनून समाजाला सुयोग्य मार्गदर्शन केले पाहिजे, विद्यार्थ्यांवर संस्कार घडविले पाहिजेत, सुसंस्कारित, सुखी, समृद्ध जीवन हेच शिक्षणाचं खरं ध्येय आहे, असे शिक्षण देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा समाजाने सत्कार केला पाहिजे, शिक्षकाला गुरू ही संज्ञा आहे, गुरू ला देव मानण्याची भारताची थोर परंपरा आहे असे ते म्हणत. पाश्चिमात्य राष्ट्रानी जगाला विज्ञान दिले तर डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला तत्त्वज्ञान दिले. बालवयातील तेजस्वी बुद्धी पाहून त्यांचे वडील म्हणाले, "उच्च शिक्षणाकरिता तुला मी परदेशात पाठवेन" तेंव्हा त्यांनी हजरजबाबी प्रत्युत्तर दिले, "बाबा, शिकण्याकरिता नाही तर मी शिकविण्याकरिता परदेशी जाईन" हे बोल त्यांनी खरे करून दाखविले. परदेशात तत्त्वज्ञानासारख्या कठीण विषयाचे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे मोठेपण जगात सिद्ध केले.


       अशा या थोर ऋषीतुल्य थोर शिक्षकाची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतभर आपण पाच सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपण देखील डॉ. राधाकृष्णन यांचा आदर्श समोर ठेवून नेहमी विद्यार्जनासाठी निष्ठेने कष्ट करून, आपल्या गुरूजनांविषयी आदराची भावना ठेवून ज्ञान दीप हातात घेऊन अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करु या.


डॉ. राधाकृष्णन यांचे १९७५ रोजी दुःखद निधन झाले.

अशा या महान तत्वज्ञानी थोर विभूतीस कोटी कोटी प्रणाम !


बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

श्रावणधारा - विशेष लेख


 
सद्या श्रावण महिना सुरु आहे त्यानिमित्त श्रावणातील साजऱ्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करणारा हा सुंदर लेख.....


श्रावणधारा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गुगल


हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजीरा श्रावण आला
सृष्टीत सुखाची करून पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला।

       दूरच्या आभाळातून थेंब थेंब पडणारा हा पाऊस आणि सोनेरी ऊन यांचा लपंडाव, जमिनीवर बागडणाऱ्या जीवांच्या निरागस मुग्धतेला श्रावणा शिवाय दुसरं नावच सुचत नाही. श्रावण सृष्टीच्या जीवांची प्रीति, मांगल्य, दिव्यत्वाची ओढ, सौंदर्याचा ध्यास, पूर्णत्वाचे स्वप्न, हळूवारपणा, कोमलता अशी सारी मानवी मूल्यं जपतो. या सर्वामध्ये तो आपलेच देखणे रूपडे न्याहळत राहतो. मंद झुळकीसरशी एक तरल गारवा देऊन हळूच सोनेरी हसून जातो. त्या हास्याने लुब्ध होऊन सृष्टीही या रंगसंगतीत आकंठ नहात जाते व एका अखंड, अदम्य, स्वच्छंद, मूर्तीमंत आनंदात श्रावण बरसत राहतो.

       अक्षय तारूण्य तेचं खुललेलं रूप घेऊन आलेला श्रावण जणू अनुरागाचं, उत्कटतेचं, हर्षोन्मादाचं प्रतीक. अतीव बहराची सारी आलम सृष्टी तेजानं टवटवीत होऊन निजल्या मनांच्या तारा हळुवारपणे छेडत जाते. ही सारी राजस सृष्टी एक निसर्ग गाणचं होऊन जाते. यावळी वाटतं की सारी पृथ्वी दाही दिशातल्या आनंदाला डोक्यावर घेऊन नाचते आहे. या निसर्ग गाण्यातच अचानक हिरव्या लुसलुशीत मऊशार गवताचा शुद्ध कोवळेपणा घेऊन साकार झालेली बालकविता न आठवली तर नवलच.

"श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे।"

       अशा या नितांत रमणीय वातावरणात कविमनाचे पक्षी तर दूरदूरच्या निळाईत आपले शब्द शोधत राहतात आणि अनेक रंगाची उधळण करीत इंद्रधनू त्यांना प्रतिसाद देतो. रानोमाळी तर हा निसर्ग आपला कोवळा अविष्कार दाखवत खुणावतो क्षणाक्षणाला या बहरलेल्या रानवाऱ्याला, या अफाट डोंगर पहाडांना, अंकुरलेल्या भावनांना आणि मुक्त मनमंजिराना.

       असा हा सरसरता श्रावणी पाऊस एक हिरवंगार स्वप्न देऊन जातो. कुठेतरी दूर खळाळता, निळासावळा निर्झर हसत खेळत, वाट काढीत चंदेरी ओळ रेखाटत जातो. तर दूर गर्द पानांपानातून इवल्या पक्ष्यांच्या किलबिलाटानी सारं वातावरण भारलं जातं. कधी सरींच्या शिरण्यामुळं पानापानातला हिरवेपणा उठून दिसतो अन् उन्हात तो आणखी खुलून दिसतो. या साऱ्या सौंदर्याने दिपून जाऊन एखाद्या निर्जीव मनाला संजीवनी मिळते व या साक्षात्काराच्या सौंदर्यग्रहणाचा अनुभव पुनःपुन्हा घ्यावा असं कुतूहल वाटतं व मनाचा एखादा कोपरा सुखावतो.

       असा क्षणोक्षणी पालवणारा हिरवाकंच श्रावणी पाऊस कधी इकडे तिकडे उधळतो तर कधी रोमरोमी सुखसंवेदनांचे तरंग उठवतो. मग एका विलक्षण झंकाराचे नाद कानात गुंंजत राहतात आणि स्वरगंध ल्यालेले सौरभघडे दाही दिशांना सांडले जाऊन तो परिमल आकाशालाच भिडू पहातो. जणू अशा या विस्तीर्ण पोकळीतला गंध जेंव्हा सापडतो तेंव्हा या घननिळ्या आसमंताची ओढ कांही औरच असते. घरट्याच्या ओढीने निघालेला दूरचा अनाम पक्षी जणू गगनाला कवेत घेतल्यासारखा भराऱ्या मारता मारता क्षितीजापल्याड जाऊ पहातो.

श्रावणाच्या सोनेरी सांजवेळी बालकवींचे संध्याचित्र आठवावे.

" सांज खुले सोन्याहुनी
पिवळे हे पडले ऊन।
चोहीकडे लसलसीत
बहरल्या हिरवळी छान।"

       पर्वतमाथे सूर्यकिरणांच्या सप्तरंगी कडांचे रंगमहाल बनतात तर सृष्टीजीवांच्या अमर्त्य सूरांनी, गंधानी वेडी होऊन सारी सृष्टी तालमय होते. हा सृष्टीसमारंभ पाहण्यासाठी तसंच श्रावणी मन हवं, मनी भाव हवा म्हणून तर समईच्या शुभ्र ज्योती लीली फक्त श्रावणाची असते.

       असं ओतू पहाणारं आभाळ, खट्याळ धुंद वारा, हिरवेपण जपलेली रंगीबेरंगी सृष्टी खरंच कल्पनेचा कुंचला एकेक चित्र काढीत जातो. हा श्रावण म्हणजे स्वप्नांचे सुंदर पक्षी घेऊन आलेला अजब जादूगार आहे, जो ऊनपावसाचे खेळ करतो व साऱ्या सृष्टीला चकित करतो. मनामनातले गुपित हळूच जाणतो आणि त्या लयीत, सुरात आकंठ बुडवतो. कधी सोनेरी सकाळ साऱ्या सृष्टीला शूचिर्भूत करते तर कधी धुंदल्या संध्याकाळी पश्चिमेचा रंगसूर पाहून इतर दिशा ही मग्न होवून जातात. चैतन्य दुथडी भरून वाहणाऱ्या सरींचा श्रावण बहरत जाईल. मनामनात संवाद साधत जाईल, अनादी सूर शोधत रम्य स्वप्नांची उधळण करीत राहील मग अशा श्रावणसरीत चिंब होत आपलाही श्रावणमय होण्याचा ब्रम्हानंद चिरकाळ टिकेल अन् श्रावण बरसत राहील. या देखण्या श्रावणाच्या अंगात डोळ्यांचे पारणे फेडणारे लावण्य आहे. रसिल्या मनाला मोहवून टाकणारी उन्मादकता या श्रावणात आहे. आंतरमनाला भुरळ पाडून पिसे लावणारी किमया आहे. तासन् तास हे लावण्य पहावं आणि हळूवार हातांनी मऊशार रेशीम कुरवाळावं तितकच मादक मदोन्मत्त होऊन ते लुटावं इतकी नशा या श्रावणात आहे. या पुरुषी श्रावणाची अवनी केंव्हापासून चातकासारखी वाट बघते. वचन दिल्याप्रमाणे श्रावण धरतीला भेटायला येतो आणि नटूनथटून, गळयात साज घालून नवयुवतीसारखी सजते, आनंदाने बहरते. श्रावण आणि धरतीचं मिलन होतं नि धरतीवरच्या नव्या अंकुराना कोंब येतात. संस्कृती जोपासणारा आणि संस्कृतीचं संवर्धन करणारा हा श्रावण पूर्वजांचं स्मरण करतो. मातीचं देणं लागतो. तो आपलं आगळं वेगळं महिरप घेऊनच उदयाला येतो. आपलं बावन्नखणी बिलोरी रूपडे तो उलगडून दाखवतो. धरतीवरच्या लेकरांना तो सुखावतो. आपल्यात गुंतवून ठेवतो. आत्म्याला आलेली बधिरता, मनाला आलेली मलिनता आणि शरीराची स्वच्छता श्रावण करतो, करवून घेतो.

       असा मनाला अल्हाद देणारा श्रावण प्रेमाने टपटपणाऱ्या प्राजक्तासारखा खाली सांडून धरतीशी संभाषण करतो. युगायुगाच्या ऋणानुबंधाची आठवण करून देतो पण तेवढ्यानेही धरती किती बरे सुखावते!अंगरोमांगी फुलून येते. तिच्या त्या फुललेल्या सौंदर्यात शालीनता असते, नादमयता असते. निसर्गाने कलाकुसर केलेले, विश्वकर्म्याने घडविलेले अपूर्व किमतीचे दागदागिने ती घालते. रातकिड्यांना रातराणीचे सुरेल गाणे गायला लावते. बेडकांना चौघडा वाजवायला सांगते, उंच झाडाच्या माथ्यावर डहाळीत लपून मधुर कंठाने कोकिळेला भजन गायला सांगते. लाजवाब रंगांची उधळण केलेला पिसारा उधळून ती आराधनेसाठी मोरांना थयथया नाचायला लावते. झाडाझुडपांवर वाढलेल्या लतावेलींना साज करून मंडप सजवायला सांगते. सागाच्या झाडांना तुरे हातात घेऊन उभारायला सांगते. जाईजुई  बटमोगऱ्याना फुलायला सांगते. श्रावण नटलेल्या धरतीसाठी आभाळात अधांतरी ढग चौऱ्या ढाळतात. कोवळी पहाट शुभ्र दव बनून अत्तरपाणी शिंपत असते. गडगडाट तिच्या आगमनाची आणि स्वागताची तुतारी वाजवतो. गवतफुले पाने उघडून मिटून टाळ्या वाजवितात. नानारंगी नानाछंदी फुले उमलून रंगांची उधळण करतात.

       नदीतलावातील कमळपुष्पे विनम्रतेने, भक्तीभावाने भाव व्यक्त करतात. अशा राजेशाही थाटात धरणी युवराज्ञी बनून श्रावण राज्यात राज्य करते सुखसमृद्धीची लयलूट करते. नदीनाल्याना, ओहोळांना ती आनंदाने खळाळा वाहायला लावते. कवींच्या ओठात आपल्या रसिल्या सौंदर्याचे गाणे देते. चित्रकारांना चित्रात रंग भरायला कल्पना देते. शेतकऱ्यांना मोत्याच्या किमतीचे दाणे देते. एवढे करुनही ती समर्पण भावनेनं म्हणते हे राज्य श्रावणाचं आहे. म्हणून तर भक्तीची सुरूवात श्रावणात होते.

       पशूमध्ये सिंह, पक्ष्यामध्ये मोर तसा महिन्यामध्ये श्रावण राजा असतो. चैतन्यानं फुलून आलेली धरती अंगाअंगावर हिरव्या पानांचे तोरण बेंदूर सणालाच बांधून घेते. नारळी पौर्णिमेला सागराला सामावून घेते. बृहस्पतीची पादपूजा करते. मानाच्या गणपतीला वंदन करत गौरीला साकार करते.

       असा हा श्रावण मनात उदबत्तीसारखा दरवळणारा, पहाटे पारव्यासारखा घुमणारा, मंदिरातील घंटीसारखा निनादणारा, मनाच्या अंतरनादातील भावनांना नित्य नवे संदर्भ देणारा, ऋणानुबंधाच्या धाग्याना जवळ करणारा, जीवनभरच्या आठवणींना साठवणारा हा. सुंदर श्रावण मनाच्या अंगणात पिंगा घालू लागतो. गंधभरल्या कंठातून प्रेमाने साद घालतो. गळालेल्या कंगोऱ्याना नवनवे, नव्या जीवनाचे कोंब आणतो. अखंड ऋतूचक्राचे हे गाणे भावभक्तीसाठी घुमत असावे. यासाठीच तर हे वर्तुळ आसाभोवती फिरत असावे.
अशा या नितांतसुंदर श्रावणाचे वर्णन किती करावे तेवढे थोडेच आहे.

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

साप: शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र - विशेष लेख


साप: शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       नागपंचमीच्या सणादिवशी नागोबाची पूजा केली जाते. इतर अनेक पाळीव प्राण्याप्रमाणेच सापाची आपण मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. पण ही पूजा अंधश्रध्देतून केली जाते. कारण माणसाला सापाची खरी ओळख झालीच नाही. पर्यावरण संतुलनात सापाचं विशेष महत्त्व आहे.


सापांबाबत गैरसमजुती वा अंधश्रद्धा:

       साप हा पूर्णपणे मांसाहारी आहे. तो लाह्या खात नाही. तहानलेल्या सापापुढे दूध ठेवले तर ते पाणी समजून दूध पितो परंतु पाणी नाही हे समजल्यावर आपोआप तोंड बाजूला करतो. दूध पिल्यामुळे त्याला न्यूमोनिया होण्याची दाट शक्यता असते.


       साप पुंगीच्या तालावर नाचतो हाही एक गैरसमज आहे. खरं तर तो पुंगीच्या हालचालीप्रमाणे आपल्या फण्याची हालचाल करतो. आपल्याला वाटते तो डुलत आहे.


       सापाच्या डोक्यावर कोणताही मणी नसतो. सापाचं गुप्त धनाशी कांही देणंघेणं नसतं. साप डूख धरतात या समजुतीला कांहीही शास्त्रीय आधार नाही. साप विशीष्ट कालावधीनंतर कात टाकतो. सापाची कात नीटपणे निघून गेली नाही तर ती सापाच्या शरीरावर असतांना पांढऱ्या केसांसारखी दिसते.


       नागपंचमीची पूजा ही सापांच्या हालाची पर्वणी असते. गारूडी हाल हाल करून त्यांना पकडून ठेवतात. त्यामुळे त्यांना कित्येक दिवस उपाशी रहावे लागते. त्यांना नाईलाजाने दूध पिल्यामुळे आजारी पडावे लागते. फोटो काढण्यासाठीही सापांचा उपयोग केला जातो. दुसऱ्या दिवशी बिचारे साप मरून पडतात.


सापांविषयी अधिक माहिती:

       स्वतःच्याच धुंदीत तुरूतुरु सरपटणारा हा प्राणी कधी कधी धडकी भरवतो. केवळ स्पर्शज्ञान असलेल्या सापाला कुणाशीही देणंघेणं नसतं. केवळ स्वसंरक्षणासाठी तो चावतो. चुकून त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला स्पर्श झाला तरच तो चावतो. तो निघतो सावज शोधण्यासाठी दुर्दैवाने वस्तीत येतो आणि त्याचं आयुष्य संपून जातं.


       भारतात समुद्रसर्प आणि जमिनीवरील चार साप सोडले तर बाकी साप बिनविषारी आहेत. नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस हे ते चार विषारी साप आहेत. सापाच्या एकूण २३८ जाती आहेत. याचा अर्थ असा की केवळ दोन टक्के साप विषारी आहेत.


साप शेतकऱ्यांचा मित्र कसा ?

       शेतात पिकविल्या जाणाऱ्या अन्नधान्यातील सुमारे १६ टक्के धान्य उंदीर खाऊन फस्त करतात, तर साठवणीतील सुमारे १० टक्के अन्न उंदीर खाऊन टाकतात व सशक्त बनतात आणि पिलावळीचं लटांबर निर्माण करतात. उंदीर हे सापाचं नैसर्गिक खाद्य आहे. धामण नावाचा साप शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र आहे कारण हा साप केवळ उंदीरच खातो. विशेष म्हणजे हा साप बिनविषारी आहे. एक धामण आठवड्याला किमान सहा उंदीर खाते. अशा प्रकारे एक धामण आपल्या संपूर्ण जीवनात सुमारे सत्तर हजार उंदीर खाते. एवढी महत्त्वाची भूमिका धामण साप पार पाडत असताना केवळ अंधश्रद्धेपायी आणि भीतीपोटी दिसला साप की मारून टाकतो. हे बरे नव्हे.


सर्पविष  अनमोल कसे? 

       साप चावल्यानंतर त्याचं विष चढू नये म्हणून खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारी दवाखान्यात विषविरोधी इंजेक्शन घेणं केंव्हाही फायद्याचे आहे. हे इंजेक्शन सर्पविषापासून तयार केलं जातं. त्यामुळे विषारी साप मारून टाकण्याऐवजी ते पकडून हाफकिन संस्थेला पाठवून द्यावेत. सर्पाच्या विषामध्ये कितीतरी प्रकारची वितंचकं (enzymes) असतात. त्यांचा वापर प्रतिविषासारखी औषधे तयार करण्यासाठी होतो. अनेक प्रकारच्या कठीण अशा रासायनिक व जीवरासायनिक प्रक्रियाना गती देण्याचं कार्य करता येतं.


ढोलगरवाडीची शास्त्रीय नागपंचमी:

       कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी या छोट्या गांवी सर्पमित्र बाबूराव टक्केकरव त्यांचे शिष्यगण सर्पप्रदर्शन भरवतात. सर्पांचे चित्तथरारक खेळ सादर करतात. त्याचप्रमाणे सर्पाविषयी शास्त्रीय माहिती देतात. त्यांच्या सर्पालयात तीनशेहून अधिक सर्पांच्या जाती आहेत. विषारी, बिनविषारी वेगवेगळ्या रंगांचे अनेक प्रकारचे सर्प येथे पहावयास मिळतात. ढोलगरवाडीची ही शास्त्रीय नागपंचमी देशाला मार्गदर्शन करणारी आहे.


सारांश:

       पर्यावरण संतुलनात सर्पांचे विशेष महत्त्व आहे. अन्नसाखळीतील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. साप जगवणं म्हणजे पर्यावरण संतुलनासाठी सापांची मदत घेणं होय. १९७२ च्या कायद्यान्वये सापांना पूर्ण संरक्षण दिले आहे. या कायद्याप्रमाणे साप पकडणे, बाळगणे किंवा मारणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे येणारी नागपंचमी सापांचे संवर्धन, संरक्षण करण्यास उपयुक्त ठरावी.


सर्व वाचक बंधू भगिनींना नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ।


शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

आईचे दूध अमृततुल्य - विशेष लेख


दि.१ ते ७ ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो त्यानिमित्त आईच्या दुधाचे महत्त्व सांगणारा हा खास लेख....


आईचे दूध अमृततुल्य - विशेष लेख

डॉ. ज्युबेदा तांबोळी  


फोटो साभार: गूगल


       मातेच्या दुधाची तुलना जगातील कुठल्याही पेयांशी अथवा कोणत्याही पदार्थाशी होवू शकत नाही, म्हणून मातेचे दूध बाळासाठी अमृततुल्य आहे.


आईच्या दुधाचे महत्त्व सांगणारे एक वास्तव व बोलके उदाहरण....

       राजधानी दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल नवजात बाळासाठी दररोज १००० कि. मी. अंतरावरील लडाखमधून त्याच्या आईचे दूध येत असल्याचे सांगितले तर सहजासहजी विश्वास बसणार नाही पण ही सत्यघटना माझ्या वाचनात आली आहे.

       लेहमधील सोनम नुरबू मेमोरियल रूग्णालयात १६ जून २०२० रोजी तीस वर्षिय दोर्जे पाल्मो या महिलेने सिझेरियन पद्धतीने बाळाला जन्म दिला पण बाळाची श्वसननलिका अन्ननलिका एकत्र जोडलेले असल्याने त्याला दूध पिता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला तातडीने दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सिझेरीनमुळे त्याच्या आईला दिल्लीला जाता आले नाही. सुरूवातीला बाळाला पावडरचे दूध पाजले जात होते पण बाळ ते दूध पीत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर बाळाचे वडील जिकमेंट वांगडू यांनी दररोज मालवाहू विमानाने थेट लडाखमधून आईचे दूध आणण्याची व्यवस्था केली. त्यांचे कांही मित्र लडाख विमानतळाहून दररोज विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने दिल्ली विमानतळावर दूध पाठवून देतात. यानंतर बाळाचे बाबा किंवा मामा तेथून दूध रूग्णालयात घेऊन जातात. बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून बाळाची तब्बेत आईच्या दुधामुळे एकदम सुधारली. विशेष म्हणजे विमान कंपनीने दुधाची सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिली. सदर विमान प्रवासासाठी सुमारे एक तास पंधरा मिनिटे लागतात. सांगायचं तात्पर्य आईचे दूध बाळासाठी अमृतासमान आहे.

संदर्भ: दै. पुण्यनगरी २२ जुलै २०२०


आईच्या दुधाचे महत्त्व: पौष्टिकता

       आईच्या दुधात उच्च दर्जाची प्रथिने, ओमेगा ३ फॅटी ऍसिड व बाळाला शक्ती येण्यासाठी लॅक्टोज ही नैसर्गिक साखर असते, तसेच पिष्टमय पदार्थ, स्निग्धता, खनिज द्रव्य, अ जीवनसत्त्व व पाणीदेखील आईच्या दुधात संतुलित आणि आवश्यक त्या प्रमाणात असते. महत्त्वाचे म्हणजे आईच्या दुधात पांढऱ्या पेशी भरपूर असतात. त्या रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. थोडक्यात आईचे दूध बाळासाठी परिपूर्ण आहार असून, आरोग्य आणि बुद्धीवर्धक आहे. शिवाय ते निर्जंतुक असते. आईचे दूध योग्यवेळी व आवश्यकतेनुसार कोठेही बाळाला देता येते. आईचे दूध पचण्यास अगदी हलके असते. त्यामुळे अतिसार, ताप, खोकला, न्युमोनिया अशा आजारांपासून बाळाचे संरक्षण होते. दोन वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे ऍरोकिडाॅनिक ऍसिड आईच्या दुधात योग्य प्रमाणात असते. आईच्या दुधात टाॅरिन हे अमायनो ऍसिड असते. ते मुलाच्या नेत्रपटलांच्या गुंफणीला आवश्यक असते.


कोलेस्ट्रम अर्थात जीवनरस:

       बाळाच्या जन्मानंतर आईच्या स्तनातून चिकासारखा एक घट्ट द्रवपदार्थ पाझरतो, त्याला कोलेस्ट्रम म्हणतात. बाळाच्या जन्मानंतर लवकरात लवकर बाळाला स्तनपान द्यावे, म्हणजे महत्त्वाचे घटक आईच्या दुधातून पेशीद्वारे बाळाच्या रक्तात मिसळतात व रक्ताभिसरणाद्वारे बाळाच्या पेशीत कार्यरत होतात. तेथे त्यांची वाढ व विस्तार होतो व बाळाची प्रतिकारशक्ती कायम रहाते. महत्त्वाचे म्हणजे जंतुसंसर्ग होण्याची भीती रहात नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही ऍलर्जीपासून बाळाचे रक्षण होते.


बाळाला कोलेस्ट्रम कसे द्यावे? 

       बाळंतपण होताच बाळ रडल्याची खात्री करून घ्यावी व बाळाचे शरीर स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यावे. तळहात व तळपाय मात्र न पुसताच बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या आत पालथे झोपवावे म्हणजे बाळ आईला घट्ट चिकटते व आईला पान्हा फुटून स्तनात दुग्धनिर्मितीचे हार्मोन्स स्त्रवू लागतात. कारण आईच्या स्तनाग्राचा गंध व बाळाच्या हातापायाचा गंध सारखाच असतो. त्यामुळे आईच्या स्तनाला बाळाच्या हातापायाचा स्पर्श होताच बाळाला स्तनाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. बाळ स्तनाचा स्पर्श स्वतःहून शोधून काढतो आणि स्तनपान घेण्यास सुरुवात करतो. पूर्वी बाळंतपण घरीच होत असे, तेंव्हा अशीच प्रथा होती. आई जन्मानंतर थोड्याच वेळात स्तनपान देत असे. त्यामुळे बाळाला आजीवन प्रतिकारशक्ती असलेला द्रव आईच्या दुधातून मिळत असे. बाळंतिणीची तब्येत बरी नसल्यास किंवा सीझर झालेले असल्यास नर्स अथवा घरच्या नातेवाईकांनी बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या आत धरून पालथे झोपवावे आणि स्तनपान देण्यास सुरुवात करावी.


स्तनपान आईसाठी लाभदायक:

       स्तनपानाद्वारे बाळाची आईबरोबर भावनिक, मानसिक शक्ती वाढते व झोप चांगली लागते. म्हणून आईने दिवसभरात तीन ते चार वेळा संतुलित आहार घ्यावा व आपल्या बाळास स्तनपान द्यावे त्यामुळे मातेच्या आरोग्याचे धोके कमी होतात. आईचे गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यास मदत होते. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव कमी होतो. स्तनपान दिल्यास स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगभरात दरवर्षी आठ लाख बालकांचा तर वीस हजार महिलांचा कर्करोगाने मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी बाळाच्या जन्मानंतर लवकरात लवकर आणि किमान दीड ते दोन वर्षापर्यंत मातेने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. स्तनपान दिल्यास गर्भारपणात वाढलेले वजन सहज कमी होते. दररोज ५०० कॅलरीज कमी होतात. त्यामुळे स्त्रियांना वजन कमी करण्यासाठी कुठलाही खटाटोप करण्याची गरज नसते. आजकाल आपले सौंदर्य कमी होईल म्हणून स्तनपान न देण्याची पद्धत वापरली जाते. भावी काळात अशा मुलाने म्हणजे आईचे दूध मिळाले नसलेल्या मुलाने आईला घराबाहेर काढले किंवा दुर्लक्ष केले तर नवल वाटायला नको.


       म्हणून सांगावेसे वाटते की बाळाच्या आरोग्याचा विचार करून मनसोक्त स्तनपान द्यावे. बाळाला स्तनपान देणे बाळ दिसामिसांनी वाढतांना बघणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. तो आनंद घेऊन आपल्या बाळाचे भावी आयुष्य निरोगी करावे. उज्ज्वल करावे हीच सर्व मातांना कळकळीची विनंती ।


शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

संत नामदेव महाराज - विशेष लेख


संत नामदेव महाराज यांची ६ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त हा विशेष लेख.


संत नामदेव महाराज - विशेष लेख

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: twitter.com


       आपल्या देशात संतांचे एक वेगळे योगदान आहे, वेगळे अधिष्ठान आहे.  संतांनी लोकांना दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे आहेत. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत अशी समतेची शिकवण संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली.


अल्पपरिचयः

       संत नामदेव शिंपी समाजातील होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. संत ज्ञानेश्वरांबरोबर ते महाराष्ट्रभर फिरले. लोकांना गाढ भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. महाराष्ट्रात त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात.


संत नामदेव महाराज यांचे योगदान:

       संत नामदेव महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजांत त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या किर्तनात स्वतः विठूमाऊली डुलत असत, अशी आख्यायिका आहे. आपल्या संतपरंपरेने भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. या संप्रदायाच्या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला म्हणजेच संत नामदेवांना दूर ठेवणं, हा आपले आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान ठरेल. मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केले. भागवत धर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे, हे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सांगितले. नामदेव महाराजांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर फडकवली. तसेच वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात खूप मोठं योगदान दिलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माऊलीनंतर पन्नास भक्तीचा महिमा सांगितला.


       संत नामदेव महाराज यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुवादी संत आहेत. 


संत नामदेव यांच्या कार्याचे वेगळेपणः

       त्यांनी पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबामध्ये त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांच्या पुढाकारातून पंजाबमधील घुमानमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केलं होतं. त्यावेळी पंजाबी व मराठी भाषाभगिनी एकत्र आल्या होत्या.

संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या बहिणाबाईंच्या काव्य ओळी आठवतात.

"संत कृपा झाली। इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।

नामा तयाचा कंकर। तेणे केला हा विस्तार।

जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।"

महाराष्ट्र भागवत धर्माची ही इमारत किती भक्कम आहे हे बहिणाबाईनी इतक्या समर्थ शैलीत नोंदविली आहे.


नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात....

अहंकाराचा वारा न लागो राजसा।

माझिया विष्णूदासा भाविकांशी।।

आज हेच तत्त्वज्ञान आपण आचरणात आणणं गरजेचं आहे. जिथं अहंकार आला तिथं उध्वस्त होणं, नष्ट होणं आलं. भलीभली साम्राज्ये येतात जातात. नंतर त्यांच्या अस्तित्व खुणा दिसणंही दुरापास्त होतं. 


संत नामदेव आणि अभंगछंद:

       नामदेव महाराजासारख्या द्रष्ट्या युगपुरूषाचे सुरवातीच्या काळातील नेतृत्व हेच वारकरी संप्रदायाच्या अफाट लोकप्रियतेचे गमक आहे. केवळ वारकरी संप्रदायाच नाही तर कबीरपंथ, दादूपंथ, शिख यासारख्या अनेक धर्म पंथांचं प्रेरणास्थान संत नामदेव आहेत. नामदेवरायांचा आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाचा प्रभाव इतकी शतकं टिकून राहिला याचं एक कारण म्हणजे नामदेवरायांनी साहित्य व्यवहारात प्रस्थापित केलेला लोकाभिमुख असा अभंगछंद. त्यांच्या पूर्वीही अभंग असेल पण नामदेवरायांनी अभंग छंदाला लोकप्रिय केलं आणि ईश्वरी पावित्र्यही मिळवू दिलं. अभंग कसा लिहावा याची मांडणीही नामदेवरायांनीच केली. त्यांच्याच प्रेरणेतून अनेक संतांनी अभंगरचना केल्या. अगदी सतराव्या शतकातील तुकोबारायांनांही स्वप्नातून जागे करत अभंग लिहायला नामदेवरायांनी प्रवृत्त केलं.


       मध्ययुगीन मराठी साहित्यात सर्व स्तरातल्या जातीधर्माच्या स्त्री पुरूषांनी ज्या छंदात रचना केली असा अभंग हा एकमेव छंद असावा. त्यामुळेच अभंगसाहित्य हा मध्ययुगीन मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह ठरतो. त्र्यं. व. शेजवलकर म्हणतात, त्याप्रमाणे अभंग हा ओवी वृत्तापेक्षा पाठ करायला सोपा असणारा छंद आहे. त्यामुळे वारकरी संतांचे अभंग सहजपणे सर्वसामान्य लोक पाठ करू शकत. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या प्रसारात अभंग गाथेचाच अधिक वाटा आहे. हे अभंग सर्वसामान्य माणसाच्या तोंडी असल्यानेच पिढ्यानपिढ्या मौखिक रूपात संक्रमित होत राहिले.


       संत नामदेव महाराज ज्ञानेश्वरांनंतर भारतभर फिरले. पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची कांहीं पदे आजही शीख लोकांच्या धर्मग्रंथात पहावयास मिळतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अभग घराघरांतून भक्तीने गायले जातात.

अशा थोर संत महात्म्यास कोटी कोटी नमस्कार.......।


शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - विशेष लेख


१ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय.......

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 



फोटो साभार: गूगल


       भारत हा जेंव्हा परतंत्र, निर्धन आणि निःशस्त्र आणि तो काळ इंग्रजी साम्राज्याचा मध्यान्ह काळ होता, तेंव्हा इंग्रजांच्या सत्तेला जबरदस्त विरोध करणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांची जगाला ओळख आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करून ते टिकवून धरणे हे अतिशय अवघड काम लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्तृत्वाने केले. त्यावेळी त्यांच्या हातात कोणतीही सत्ता नव्हती. पैसा तर अजिबातच नव्हता. तरीही घरोघरी लोकांनी त्यांच्या प्रतिमा लावून त्यांचे पूजन केले. इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती.


अल्पपरिचय:

       लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नांव बाळ गंगाधर टिळक. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गांवी झाला. त्यांचे मूळ नांव केशव असे होते तथापि 'बाळ' हे टोपण नावच पुढे कायम झाले. त्यांचे वडील गंगाधरपंत हे प्रथम प्राथमिक शिक्षक व नंतर शिक्षण निरीक्षक होते. ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे बहुतेक सर्व शिक्षण पुणे येथेच झाले. ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून ते १८७७ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे १८७९ मध्ये ते एल. एल. बी. झाले. एल. एल. बी. च्या वर्गात असताना त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोघा तरूणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या देशाची सुटका करून घेण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोध्दाराच्या कार्यास स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला.


लोकजागृतीस आरंभ:

       त्याकाळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टिळकांच्या मनावर पडला. वासुदेव फडके यांच्यावरचा खटला कोर्टात सुरु होता. या खटल्यात वासुदेव यांच्यावर अन्याय होऊन त्यांची हार झाली कारण त्यांच्यामागे जनसमुदाय नव्हता. हे जाणून प्रथम लोकजागृती केली पाहिजे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत असे वाटून स्वाभिमान शून्य झालेल्या लोकांना नवा विचार देण्यासाठी टिळक आणि आगरकर प्रयत्न करू लागले. यासाठी एक संधी लवकरच चालून आली. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे एक शाळा काढणार होते. टिळक आणि आगरकर हे दोघे विष्णूशास्त्रीना जाऊन भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना झाली. त्या पाठोपाठ आर्यभूषण नावाचा छापखाना काढण्यात आला. लोकजागरण होण्यासाठी मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजी भाषेतून 'मराठा' हे वृत्तपत्र सुरु करण्यात आले. त्यातून लोकांपर्यंत स्वातंत्र्यप्राप्ती व्हावी या उद्देशाने विचार पोहचू लागले. १८८४ मध्ये न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती मंडलिक, डॉ. भांडारकर यांच्या सहाय्याने टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. स्वतः टिळक आणि आगरकर तेथे शिकवित असत. हे करीत असताना केसरीतून आपल्या अग्रलेखातून ब्रिटीश सरकार विरूद्ध टिळक झणझणीत अग्रलेख लिहू लागले. त्यांच्या कांही अग्रलेखांची शीर्षके ही ऐतिहासिक ठरलेली आहेत. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे' 'हे उपाय टिकाऊ नव्हेत' या त्यांच्या समाज जागृतीच्या लेखनामुळे त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. १०१ दिवस डोंगरीच्या तुरूंगात काढावे लागले. रँडचा वध  झाल्यानंतर त्याचे जनक म्हणून इंग्रजांनी त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा केली होती, त्यानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा झाली. या तुरुंगातच 'गीतारहस्य' हा ग्रंथ त्यांनी लिहून काढला.


इंग्रज सरकारच्या अन्यायाचा प्रतिकार:

       इंग्रज सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणाविरूद्ध आवाज उठविण्यात टिळक आघाडीवर राहिले होते. त्यांचे केसरीतील अग्रलेख या गोष्टीची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. दुष्काळ, प्लेग यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकरवर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक भाषेत निषेध केला. इ. स. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केल्यावर त्याविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती, हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि इतिहास हे हिंदी राष्ट्रवादाचे प्रमुख आधार आहेत असे त्यांचे म्हणणे होते. टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार व पुरस्कार केला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच" असा मंत्र उच्चारून त्यांनी राष्ट्राला स्वराज्याची प्रेरणा दिली.


जहाल राजकारण:

टिळकांनी राजकारणात जहालमतवादाचा पुरस्कार केला. हिंदी लोकांना अर्ज विनंत्यांच्या मार्गाने आपले राजकीय हक्क मिळणार नाहीत, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरून काँग्रेसमध्ये जहालमतवादी व मवाळमतवादी असे दोन गट पडले. टिळकांनी त्यातील जहाल गटाचे नेतृत्व केले. त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना स्थान प्राप्त झाले होते. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला होता. या देशातील सर्वसामान्य जनतेला जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. सर व्हँलेंटाईन चिरोल यांनी 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून त्यांना दोष दिला असला तरी खरे तर तेच त्यांचे भूषण ठरले आहे.


लोकमान्य टिळक यांच्या  बालपणीचा एक उल्लेखनीय प्रसंग:

सरकारी शिक्षण खात्यात नोकरी करणाऱ्या त्यांच्या वडिलांना गंगाधरशास्त्री यांना पुस्तकांचे विलक्षण वेड होते. पुस्तक वाचायला बसले की, ते अगदी तल्लीन होऊन जात. त्यातूनही त्यांच्या आवडीची पुस्तके असतील तर त्यांची वाचनात समाधीच लागायची. बाणभट्ट हा त्यांचा अतिशय आवडता लेखक होता. त्याची कादंबरी ते वाचायला बसले की, मग त्यांना वेळेचे भानही राहात नसे. असेच एकदा ते बाणभट्टाची एक प्रसिद्ध संस्कृत कादंबरी वाचत बसले होते. त्यांचा मुलगा बाळ त्यांच्या भोवताली घुटमळत होता. खूप वेळ झाला तरी त्यांचे वाचन कांही संपेना बाळचे घुटमळणे सुरूच राहिले.

अखेर बऱ्याच वेळाने गंगाधर रावानी पुस्तक मिटले.


शुक्रवार, २३ जुलै, २०२१

गुरूंची थोरवी अर्थात गुरुमहात्म्य - विशेष लेख


२३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा आहे त्यानिमित्त गुरुंच्या चरणी वंदन करण्यासाठी हा विशेष लेख...

गुरूंची थोरवी अर्थात गुरुमहात्म्य - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: ShareChat

       आज गुरूपौर्णिमा यालाच आषाढी पौर्णिमा व व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षि व्यास हे गुरूंचे गुरू होते. ते आद्यगुरू होते म्हणूनच त्यांना 'गुरूनाम गुरु' म्हटले जाते. महर्षि व्यासांनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. 'महाभारत' हा मानवजातीला आदर्श जीवनमूल्ये देणारा ग्रंथ आहे. यात संपूर्ण मानवजातीला उपकारक अशी शिकवण दिली आहे. म्हणूनच असे म्हणतात 'व्यासोच्छिष्ट जगत् सर्वम् '.

       गुरू या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ अज्ञान, अंधकार नष्ट करणारे असा होतो. गुरू हे ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत. इतकेच नव्हे तर गुरू हे साक्षात परब्रह्म असे म्हटले आहे. 
'गुरूविण देव दूजा ।पाहता नाही त्रिलोकी'
असे संतश्रेष्ठांनी म्हटले आहे. 

संत कबीर गुरूंबाबत म्हणतात.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसके लागू पाय ।
बलिहारी गुरूदेवकी, जिन गोविंद मिलाय ।
याचा अर्थ असा गुरू आणि गोविंद एकाच वेळेला माझ्यासमोर उभे राहिले तर मी प्रथम गुरुंच्या पाया पडेन कारण गुरूंनीच गोविंद म्हणजेच ईश्वराचा रस्ता मला दाखविला. गुरू हे कुंभार व शिष्य हा घडा असतो. आतून हाताचा आधार देऊन वरून धपाटा मारून, त्याचे दोष काढून त्याला सुंदर आकार तो कुंभार देत असतो.

       गुरू शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे. आध्यात्मातील दीक्षागुरू,  माता पिता हे संस्कारगुरू, विद्यादान करणारे शिक्षणगुरू, कला शिकविणारे कलागुरू असे अनेक रूपातील गुरु आपले जीवन संपन्न करतात म्हणूनच गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन, गुरूवंदन केले जाते. आज अगदी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही ही परंपरा जपली जात आहे. संकटकाळी शिष्य गुरूचा धावा करतो व गुरूही शिष्याला तारून नेतो असे म्हणतात....
"ज्याच्या पाठीशी सद्गुरूनाथ, तो कैसा राहील अनाथ?"

गुरूंच्या सहवासात अज्ञ असणारे तज्ज्ञ होतात. म्हणून म्हणतात 'गुरु के साथ जीना एक मजा है और गुरू को छोड के जीना एक सजा है।' 

       शारदेच्या मंदिरात विद्यार्थी हे भक्त व गुरू हे पुजारी असतात. भक्त आणि देवता यांची भेट घालून द्यायचे पवित्र काम गुरुना करायचे असते. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सूर्याला माहित नसते की त्याच्या किरणामुळे फुले फुलतात तसे गुरूंना माहित नसते की त्यांच्या संस्कारामुळे विद्यार्थी घडतात. म्हणून म्हटले जाते गुरूविण कोण दाखविल वाट' 'गुरुनी दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।'

       शिक्षकांच्या बौद्धिक उंचीवरुन राष्ट्राची उंची मोजली जाते. राष्ट्र उभारणीमध्ये गुरु हा महत्त्वाचा कणा असतो. गुरूंना गुरुमाऊली म्हटले जाते कारण गुरूंना मातेचे अंतःकरण असते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग व उपदेश गुरू आपल्या शिष्याला करतात. हा ज्ञानाचा प्रकाश देताना गुरू आपल्या शिष्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत याउलट त्याला सर्व प्रकारचे ज्ञान देऊन शिष्यांच्या जिवनाचे कल्याण करतात. सत्व-रज-तम या गुणांपासून उत्पन्न झालेली दिव्यशक्ती ज्याच्याजवळ असते तीच व्यक्ती गुरूपद भूषवू शकते.

       प्रत्येकाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात. त्यापैकी गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. आपल्या मनात ज्ञानार्जनाची खरी तळमळ, श्रद्धा, विश्वास, प्रेम या गोष्टी असतील तसेच आपली निष्ठा गुरूचरणी असेल तरच गुरूंच्या रूपात एक चांगली व्यक्ती आपल्याला भेटते व अशा गुरूंचा कृपाशिर्वाद आपणास मिळतो. संतवचनाप्रमाणे परीस लोखंडाचे सोने करतो कारण त्याचा तो गुणधर्म आहे. ते लोखंड नवे आहे, जुने आहे की गंजलेले आहे हे परीस पहात नाही. पण त्यासाठी गुरूबद्दल आदर व निष्ठा हवी.

       प्राचीन काळी मलयगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मिरच्या नंदनवनापर्यंत अनेक गुरुंचे आश्रम होते. एका ऋषीच्या आश्रमात 'अरूणी' नावाचा एक शिष्य रहात होता. एकदा ऋषींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. आश्रमापासून कांही अंतरावर एक बांध फुटला होता व त्याचे पाणी आश्रमाच्या दिशेने येत होते. तेंव्हा तो बांध दुरूस्त करण्याचे व पाणी अडवण्याचे किम गुरूंनी अरूणीला सांगितले. अरूणी त्याठिकाणी गेला. त्याने पाण्याचा प्रवाह अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्याला ते जमले नाही.  शेवटी स्वतःच तो आडवा झोपला व त्याने तो प्रवाह थांबविला. रात्र झाली तरी अरूणी आला नाही. तेंव्हा ऋषी त्याला शोधत त्याठिकाणी गेले. "अरूणी तू कोठे आहेस?" असे म्हणत गुरु त्या बांधाजवळ आले. अरूणीचा आवाज क्षीण झाला होता. पाण्याने व थंडीने तो गारठला होता. गुरूनी त्याला उठविले. त्याला पाहून ते ऋषी धन्य झाले. ते म्हणाले, "शिष्य असावा तर अरूणीसारखा! गुरूंची आज्ञा पाळताना स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणारा! धन्य तो शिष्य आणि धन्य त्याचे गुरु!

       जन्मल्यावर पहिल्यांदा 'आई माझा गुरु' असते कारण ती खायला, प्यायला, बोलायला, चालायला शिकविते. त्यासाठी मातृदेवो भव म्हटले जाते, पितृदेवो भव असेही म्हटले जाते. कारण वडिलांच्या खांद्यावर बसून आपण हे जग पहातो. आपल्याला अक्षर ओळख करुन देणारे, आपल्याला ज्ञानामृत पाजणारे आपले शाळेतील गुरू असतात. तद्वत मला वाटते निसर्ग हा आपला सर्वात मोठा गुरू आहे, जो सातत्यपूर्ण कर्तव्यकर्माची व निरपेक्ष ज्ञानाची शिकवण आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अखंडपणे देत असतो. अशा भिन्न भिन्न गुरूकडून आपण खूप कांही मिळवतो. खरंच जीवनात गुरूकडून कांहीतरी मिळवायचे असेल तर आपली समर्पणाची तयारी हवी. कारण घेण्यापेक्षा देण्यातून मिळणारा आनंद अनमोल असतो. शेवटी गुरूंची महती सांगताना मी एवढेच म्हणेन.....

रात्रीनंतर उगवते,
ती पहाट असते ।

कलेकलेने  वाढतो,
तो चंद्र  असतो ।

क्षीतिजापाशी झुकते ,
 ते आकाश असते ।

इतरांना श्रेष्ठ बनवतो,
तो गुरू असतो ।