पुस्तक परीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक परीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

सुखाचा राजमार्ग-पुस्तक परिक्षण



सुखाचा राजमार्ग (कथासंग्रह) - पुस्तक परिक्षण

               ✍️ डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी. 


     


पुस्तक परिक्षण

सुखाचा राजमार्ग (कथासंग्रह)

लेखिका-डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी.

पुस्तक परिक्षण -श्री. बी. बी.गुरव

माजी मुख्याध्यापक जनतारा हायस्कूल व ज्युनिअर काँलेज, जयसिंगपूर.

       

       डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांनी लिहिलेले 'सुखाचा राजमार्ग 'हे कथासंग्रहाचे पुस्तक वाचनात आले.मजबूत बांधणीचे, उत्कृष्ट छपाई असलेले, आकर्षक मुखपृष्ठाने सजलेले हे पुस्तक पाहताक्षणीच माझ्या पसंतीस उतरले. मी हे पुस्तक वाचण्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.वाचन संपल्यानंतर सविस्तरपणे पुस्तक परिक्षण करण्याचा मोह मला आवरता आला नाही.

      

        'सुखाचा राजमार्ग 'हे या पुस्तकाचे शीर्षक सर्वांना खरोखरीच अंतर्मुख करतं.या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन-तीन शब्दांच्या चार ओळी लिहिल्या आहेत.


जीवनातील आपत्तीना

निर्धारपूर्वक तोंड देण्यात

लपला आहे.....

सुखाचा राजमार्ग.

      

      या चार ओळी किती सार्थ आहेत याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक कथा देत जाते. या कथासंग्रहात तब्बल साठ कथा समाविष्ट आहेत. दोनशे पृष्ठांचंहे आकर्षक पुस्तक साहित्य क्षेत्रातील एक दर्जेदार पुस्तक आहे यात तिळमात्र शंका नाही. कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर लेखिकेने मांडल्या आहेत या अर्थपूर्ण व समर्पक ओळी....

मनाची श्रीमंती दाखवणं,

श्रमस़ंस्काराची शिदोरी जपणं,

मुलीची माया अनुभवणं,

उदात्त निर्णय घेणं

सदृढ मातृत्व अंगीकारणं

मायेची इस्टेट वाढवणं

देण्यातील आनंद साठवणं,

स्वच्छंदी जीवन जगणं!

       

       कथांच्या शीर्षकातून गुंफलेल्या या ओळीतून कथावाचकांना सुखाचा राजमार्ग नक्की गवसेल असा  संदेश लेखिकेने कल्पकतेने दिला आहे. सर्वच कथा छोटेखानी, घाटदार, कसदार व चटकदार आहेत. जीवनावर भाष्य करणाऱ्या आहेत.


       सुखाचा राजमार्ग या कथासंग्रहातील ' नकुशीचा आहेर' या पहिल्याच कथेत केवळ पैशालाच जगात किती महत्त्व दिले जाते. सख्खे भाऊ बहिणीही गरीब बहिणीचा कसा पाण उतारा करतात, हक्काच्या माहेरातही गरीब बहिणीला कसा अपमान सहन करावा लागतो याचे सुंदर चित्रण या कथेत वाचायला मिळते.

        

       नोटांच्या बंडलाची बँग परत करणारा योगेश  'श्रमसंस्काराची शिदोरी' या कथेत संस्काराचे महत्त्व सांगताना म्हणतो ' मला यातील रकमेपेक्षा माझ्या आईने दिदीला व तिच्या परिवारासाठी स्वतः तयार करून दिलेली शिदोरी लाख मोलाची आहे' एवढेच नव्हे तर बक्षिस म्हणून दिलेले एक हजार रूपये तो नम्रपणे नाकारतो.ही कथा खरोखरीच संस्कारक्षम व अनुकरणीय आहे. 

      

       अमर प्रेमाची समग्र कहाणी या कथेत लेखिकेने शारीरिक संबंध नसलेल्या पवित्र प्रेमाची सुंदर मांडणी केली आहे. संजीवनीवर निखळ प्रेम करणाऱ्या बाळासाहेब या वयस्क दानशूर व्यक्तीची ही समग्र कहाणी थेट ह्रदयाला भिडणारी आहे।

       

        'ताई तूच सुखी रहा' या कथेत लहान बहिणीच्या सासऱ्याशी विवाह करणाऱ्या कमलाताईच्या रुपानं समाजात घडणाऱ्या विचीत्र घटनांचा गोफ समोर येतो आणि शेवटी लहान बहिणीच्या सुमनच्या आत्महत्येनं वाचकाचं मन सुन्न होतं. या कथेत प्रेमाच्या आंधळ्या बहिऱ्या आणि मुकेपणाची साक्ष आणखी एकदा पटते.

       

        दारुड्या वडिलांना आपण जाणतो पण दारूड्या आईची जगावेगळी कथा 'आईचा घोट, मायेला गालबोट' या कथेत पहावयास मिळते. बाजारात आलेल्या दारुड्या आईच्या कमरेचे पैसे दारूडा बाप फळवितो.त्याची लहान मुलगी व मुलगा त्यामुळे अधिकच विमनस्क होऊन रडत बसलेले आहेत आणि खरोखरीच फाटलेलं आभाळ, दुभंगलेली धरणी समोर येते. अशावेळी आम्ही शिकायचं काय? आम्ही करायचं काय? या लेखिकेच्या दोन ओळी काळजाला घर पाडून जातात.       

       

          अपेक्षांचे ओझे' ही कथा मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कथा आहे. पालकांनी मुलांकडून अपेक्षा ठेवताना त्या मुलांना झेपतील, पेलतील अशाच ठेवाव्यात हा महत्त्वपूर्ण संदेश लेखिकेने या कथेतून दिला आहे.

       

           'पहा कर्माची गती किती न्यारी'  ही कथा कर्माची गती किती न्यारी' ,राजाचा बनला भिकारी' हे सिद्ध करणारी अफलातून कथा आहे. नोकरी लागण्यासाठी खोटा घटस्फोट घेणाऱ्या मनीषाला खरोखरीचा घटस्फोट घेण्याची वेळ येते. ही अशी लोक विलक्षण कथा वाचकांना स्वतः वाचूनच त्याचे मर्म जाणून घ्या. असा संदेश देते.

       

         सासर व माहेर हे स्त्रीचे दोन डोळे आहेत. धनाच्या लालसेने भावाच्या इस्टेटीत वाटणी मागून स्वतःचे जीवन दुःखी करून घेणाऱ्या बहिणीची व्यथा' मायेची इस्टेट' या कथेत मांडली आहे.

       

       ' मुलीची माया' या कथेत मुलापेक्षा मुलीचा वाढदिवस वडिलांनी थाटामाटात का केला याचं रहस्य वाचकांना कथा वाचल्यावरच कळेल, अशी सुंदर मांडणी लेखिकेने खुबीने केली आहे. आदर्श ज्येष्ठ नागरिकांच्या सोनेरी संसाराचे सुखाचे रहस्य आयुष्याची सोनेरी सायंकाळ या कथेत वाचावयास मिळते.

       

        अशा प्रकारे 'सुखाचा राजमार्ग' या कथासंग्रहातील प्रत्येक कथा काही ना काही महत्त्वाचा संदेश देणारी आहे. वाचकाला उत्कट आकर्षण निर्माण करणारे उत्कृष्ट कथाबीज तर प्रत्येक कथेत आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक कथेचा शेवट व त्यातील संदेश 'सुखाचा राजमार्ग' दाखविणारा आहे याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानोपानी येतो.

        'सुखाचा राजमार्ग' या पुस्तकाच्या समग्र वाचनानंतर ज्यावेळी सर्व कथांचे मनन केले त्यावेळी लक्षात आले की.....

       

         या कथा अतिशय आटोपशीर आहेत.या कथा आपल्या अवतीभवती घडलेल्या आहेत असे वाटते.या कथामध्ये आलेली पात्रे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात.या कथा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या आहेत.या कथांमधून निश्चितच एक जीवनमार्ग म्हणजेच सुखाचा राजमार्ग सापडतो.

       

           या कथासंग्रहात लेखिकेने मांडलेली भाषा साधी सोपी असून सहजशैलीत प्रकट झाली आहे. त्यामुळे वाचकांच्या मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळते.प्रत्येक कथा वाचकाला अंतर्मुख करते.प्रत्येक कथेचे बीज व पात्रे लक्षात ठेवल्यास कोणीही कोणालाही या कथा सहज सांगता येतील अशा आहेत.

      

    डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांना शिक्षणशास्त्रातील पीएच्.डी.झालेली आदर्श प्राथमिक शिक्षिका या रूपात ओळखत होतो. त्यांनी वीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर संपादित केलेले 'हिंदी लोकसाहित्य का खजाना' हे पुस्तक मी वाचले होते. एक प्राथमिक शिक्षिका साहित्य क्षेत्रात इतकं महत्त्वपूर्ण भरीव कार्य करू शकतात. हे पाहून एक भगिनी म्हणून मला खूप अभिमान वाटतो.


गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

बळी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण


बळी (कादंबरी) -   पुस्तक परीक्षण

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी 




लेखक- श्री. सुनिल इनामदार

प्रकाशक- पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी 

ISBN: 978-81-951642-0-2


       लेखक सुनिल इनामदार यांच्या धारदार लेखणीतून साकारलेली 'बळी' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती लगेच वाचनात आली हे माझे परमभाग्य समजते.


       'बळी' हे कादंबरीचे शीर्षक वाचल्यानंतर 'बळी तो कान पिळी' या म्हणीची आठवण झाली. बळी कुणाचा गेला, कान कुणी पिळला हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. आजकाल सतत कानावर पडणाऱ्या हुंडाबळी, नरबळी, भूकबळी या शब्दांचीही आठवण झाली. बळी कोण पडला, कुणाकडून पडला हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने कादंबरी वाचण्यास सुरूवात केली. वाचल्यानंतर लक्षात आले की बळी या शब्दाचा वेगळा अर्थ आहे. एखाद्याचे मानसिक खच्चीकरण करणे, त्याच्या प्रगतीला मागे खेचणे हासुद्धा बळी घेण्याचाच एक प्रकार आहे.


       या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे कादंबरी, लिहून झाल्यानंतर ३५ वर्षानंतर प्रकाशित होणे. लेखक सुनिल इनामदार यांनी डाव्या कामगार काम करताना आलेले अनुभव प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहेत. कार्यकर्त्यानी भोगलेल्या यातना ठळकपणे, खूबीने वाचकांच्या समोर उभ्या केलेल्या आहेत. थोडक्यात ३५ वर्षे जपून ठेवलेली ही मर्मबंधातली ठेव, एक ऐतिहासिक ठेवा मुक्तपणे, सहजसुंदर शैलीत वाचकांच्या हाती दिला आहे.


       चंद्रशेखर कळंबीकर हा एक साधाभोळा, अतिशय प्रामाणिक, राजकीय डावपेच माहित नसलेला, पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याच्या जीवन संघर्षाची ही कहाणी आहे. चंद्रशेखरकडे संघटन कौशल्य आहे. हजारो श्रोत्यांवर प्रभाव टाकणारी वक्तृत्वशैली त्याच्याकडे आहे, हे सांगताना लेखक म्हणतात "चंद्रशेखरचं तंत्रच वेगळं. सरळ चौकात जाऊन स्टेजवर, पारावर उभं रहायचं आणि मेगँमाईकवर क्रांतिगीते म्हणायला सुरुवात करायची, तसा त्याचा आवाजही खणखणीत, त्याची भाषणाची शैलीही ढंगदार होती. हावभाव, आवाजातील चढ उतार, पटवून द्यायची पद्धत उत्तम होती.''


       चंद्रशेखरला अनेक लोक भेटले. बरे वाईट अनुभव आले. त्याच्या सानिध्यात मुंबईत राहणारे कार्यकर्ते ही आले, की ज्यांना बड्या पुढाऱ्यांचे डावपेच, प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून स्वतःचे चमचे पुढं घुसविण्याची वृत्ती माहित होती त्यांनी चंद्रशेखरला ते सांगण्याचा प्रयत्नही केला पण त्याची पक्षनिष्ठा ते ऐकायला तयार नव्हती.

       

मोठ्या पुढाऱ्यांची वृत्ती स्पष्ट करताना लेखक म्हणतात

       "मोठ्या पुढाऱ्यांना अडचणीत आणणारा कार्यकर्ता नकोसा वाटायचा. मग अशा कार्यकर्त्यांला वेगवेगळ्या मार्गाने आवरण्याचा प्रयत्न व्हायचा. कधी वरिष्ठ पदावर घेण्याचं तर कधी आर्थिक लाभाचं अमीष दाखवलं जायचं त्यातून तो बदलला नाही तर त्याची बदनामी करायचा हुकमी डाव नेतेमंडळी खेळायची".


या उताऱ्यावरून लेखकाची उत्कट व निर्भिड लेखनशैली वाचकांना दिसून येते.

       चंद्रशेखरच्या बाबतीत त्याचा मित्र विकास त्याला एकदा म्हणतो, "शत्रूच्या गराड्यात देखील मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आराम झोपू शकेन" अशा मित्रप्रेमाचे, चंद्रशेखरच्या उतुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.


ही कादंबरी फारच सुंदर सामाजिक, तात्विक  विचार देते. वाचकांना चिंतन करायला लावते. उदाहरणार्थ...

"तुम्ही बंदूक कुणाकडून घेता यापेक्षा ती कुणाविरूद्ध चालवता हे महत्त्वाचं आहे." 

"तोंडानं म्हणायचं भवानी भवानी आणि मनात मात्र अल्ला को प्यारी है कुर्बानी" हे अहिल्या रांगणेकर यांचं वाक्यही चपखलपणे बसले आहे.

"एखाद्या युनिटमध्ये वाद निर्माण होणं ही नेत्यांच्या दृष्टीने सुखद घटना असते."


जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारं एक वाक्य वाचकांच्या काळजाला जाऊन भिडते. ते वाक्य असे...

"चळवळीतल्या ब्राम्हणी पुढाऱ्यांना कार्यकर्ता कामासाठी पाहिजे होता पण दलित कार्यकर्ता नको होता." 


       ही कादंबरी एका प्रामाणिक पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं जीवन किती कष्टाचं असतं, बेभरवशाचं असतं हे दाखवून देणारी आहे. अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची ससेहोलपट कशी होते याचे प्रभावी चित्रण वाचकांच्या समोर उभे करणारी आहे.

   

       या कादंबरीत चंद्रशेखर, रामा,  विलास, मांगले, सुशीला, विकास के. आर्, श्रीकांत, विजय व संजय अशी भरपूर पात्रे आली आहेत. ही सर्व पात्रे वाचकांशी बोलतात, आपल्या मनातील भाव वाचकांसमोर आपुलकीने व्यक्त करतात. एकूण १८ प्रकरणात विभागलेली ही कादंबरी ३५ वर्षापूर्वीची असूनही वाचकांना विचारांचं खाद्य देऊन खिळवून ठेवणारी आहे.


       कादंबरीचे मुखपृष्ठ खूप आकर्षक व बोलकं आहे. बळी जाणाऱ्यांची वज्रमूठ पक्की आहे हेच मुखपृष्ठ सांगत आहे असे वाटते. उत्तम छपाई, सुबक बांधणी,सोपी भाषाशैली असलेली ही उत्कृष्ट  कादंबरी वाचकांच्या पसंतीस निश्चितपणे उतरेल अशी खात्री वाटते. सूज्ञ, रसिक वाचकांनी ही कादंबरी लवकरात लवकर वाचावी अशी नम्र विनंती.


लेखकांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!! 


डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

जयसिंगपूर.

रविवार, ४ जुलै, २०२१

हराकी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

 

हराकी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 






लेखक - मनोहर भोसले

प्रकाशक - तेजश्री प्रकाशन, कबनूर.

ISBN: 978-81-950181-2-3


       एका सुप्रसिद्ध, प्रतिभासंपन्न, चिंतनशील लेखकच्या धारदार लेखनीतून साकारलेली एक नितांतसुंदर कादंबरी वाचनात आली. ही कादंबरी वाचण्यापूर्वी 'हराकी' या शब्दाचा अर्थही माहित नसलेली मी कादंबरी वाचताना अक्षरशः भारावून गेले. स्मशानभूमीतून सुरु झालेली ही उत्कंठावर्धक कादंबरी स्मशानभूमीतच संपते, पण एकदा वाचायला सुरुवात झाली की वाचकाची अवस्था झपाटल्यासारखी होते. पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही, हेच या लेखकांचे यश आहे. ग्रामीण बाज असलेली चटकदार भाषाशैली, सुंदर मांडणी, हुबेहूब प्रसंगवर्णने यामुळे एक उत्कृष्ट साहित्यकृती साकारण्यात लेखक शंभर टक्के यशस्वी झाले आहेत. या कादंबरीने जीवनाचे एक विदारक सत्य वाचकांसमोर उभे केले आहे. मानवी जीवनाची विफलता स्पष्ट करतांना लेखक म्हणतात....

'सरणावर ठेवल्यानंतर कमरेचा करदोडासुद्धा तोडून काढला जातो.'

यावरून आयुष्यभर माझं माझं म्हणून धन जोडणारे निश्चितच बोध घेतील. बहुजन समाजाच्या पाचवीला पूजलेल्या गरिबीचं वर्णन या श्रीमंत लेखकाने फारच सुरेख रेखाटलं आहे.


       स्मशानभूमीतून चिता पेटवून उरलेल्या राॅकेलचं कॅन घेऊन घरी आलेल्या नवऱ्याला बघून सखूला आनंद झाला. बऱ्याच दिवसानंतर आज दिव्याला तेल मिळालं असं तिला वाटलं.


       मनुष्यानं कुठल्या जातीत जन्माला यावं हे त्याच्या हाती नसतं पण जीवनात येऊन कसं वागावं? कसं जगावं? हे साध्याभोळ्या यमनाप्पाच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे.


       या कादंबरीत समाजातील चालीरीती, अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून त्यामागील वैज्ञानिक, सामाजिक कारण सांगण्याचा अभ्यासपूर्ण  प्रयत्न केला आहे. जुने ते सोने आणि नवे ते हवे या कात्रीत सापडलेल्या लोकांना यामुळे निश्चित दिशा मिळेल असे वाटते कारण नैवेद्य शिवणारा कावळा निसर्गाचा समतोल राखणारा पक्षी कसा हे पटवून दिले आहे. हराळी दाहनाशक वनस्पती आहे असे सांगितले आहे. हराकी ची प्रथा सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी सुरु  झाली असावी. प्रेताच्या डोक्यावर दही का घालतात? प्रेताला कढत पाण्याची आंघोळ का घालतात? डोळ्यात सोन्याचा मणी का घालतात? निधन झाल्यावर घराची साफसफाई करून गोमूत्र का शिंपडले जाते? शिंकाळे कशासाठी असते? चितेभोवती पाणी का शिंपडले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत मोठ्या खुबीने दिली आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी रसिक वाचकहो ही कादंबरी तुम्ही अवश्य वाचावी.


       या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना प्रसंगाला जिवंतपणा आणण्यासाठी जी वाद्ये वाजविली जातात त्यांच्या आवाजाला दिलेले शब्दरूप. ते वाचताना ती वाद्ये वाजत असल्याचा भास होतो...

ढिप्पांग टिप्पांग

ढगाडांग टकाडांग टांग टांग

टकाटकाटकाटका 

काटकूट काटकूट फुटांग फुटांग.


       या कादंबरीत जातीभेदातून माणसा-माणसात पडलेली दरी दिसते. दरी  मिटविण्यासाठी प्रयत्न करणारे कॅप्टन कुटूंबिय  भेटतात. वेगळं व्हायचंय मला म्हणणारी युवा पिढी पुढे येते. कोळी गुरुजींचे देशप्रेम, पैलवान आण्णांचे मित्रप्रेम, एस्. टी. चालकाची माणुसकी, आत्मारामच्या भावाचे शहाणपण या सर्वासर्वांचा प्रत्यय कादंबरी वाचतांना येतो.


       कादंबरीत ह्दय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग  वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडतात. सखूच्या शेळी विक्रीचा प्रसंग, खुळ्या आत्मारामच्या मृत्यूचा प्रसंग, पैलवान आण्णांच्या निधनाचा प्रसंग अंगावर शहारे आणतात.


       थोडक्यात हराकी ही ग्रामीण साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. पानां-पानावर लेखकाच्या अचूक निरिक्षण क्षमतेचा, शब्दसंपत्ती वरील प्रभुत्वाचा, चिंतनशील लेखनाचा प्रत्यय येतो.


       या कादंबरीचे नेमके परीक्षण करण्यासाठी मला वाटते दुसरी कादंबरीच लिहावी लागेल आणि ते मला जमेल असे वाटत नाही.


शेवटी एवढंच म्हणेन....

शब्दानांही कोडं पडावं 

असे थोर लेखक असतात ।

केवढं आपलं भाग्य असतं

की ते आपल्या जवळचे असतात.


शब्दांकन

डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

जयसिंगपूर.