गुरुवार, ३१ मार्च, २०२२

नातवंडांना गोष्टी सांगताना - विशेष लेख


नातवंडांना गोष्टी सांगताना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी

       मार्च २०२० ला कोरोना नावाच्या महाभयंकर राक्षसाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपल्या सर्वांचीच जीवनशैली बदलून गेली. जरा घर सोडा, थोडावेळ मोकळ्या हवेत फिरून या, निसर्गाच्या सहवासात राहा तुमचे आरोग्य उत्तम राहील असा सल्ला देणारे लोक, घरातून अजिबात बाहेर पडू नका, हात वरचेवर धुवा, मास्क लावा असा सल्ला देऊ लागले. शाळा, बाजार, चित्रपटगृह, एस. टी. बस प्रवास सारेकाही बंद झाले. आणि मागे पडलेले, जोपासता न आलेले छंद पुढे नेटाने निभाऊ लागले. वयाने मोठ्या असलेल्या लोकांचे ठीक झाले. पण लहान मुलांचे फार अवघड झाले. घरात कोंडून बसणे त्यांना जमेनासे झाले. अपवाद वगळता सर्वच लहान मुलांनी दूरदर्शनला आणि मोबाईलला जवळ केले. टीव्ही आणि मोबाईलचे त्यांना वेड लागले. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले. आयतीच संधी मिळाली. मोबाईल हातात धरूच नकोस म्हणणारे पालक आटापिटा करून मोबाईल खरेदी करून मुलांच्या हातात देऊ लागले त्याशिवाय काय करणार बिचारे पालक? आलिया भोगासी असावे सादर या उक्तीनुसार पालक आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ लागले.


            अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मुलांना मोबाईल नको घेऊ, टीव्ही पाहू नकोस हे सांगणे सोपे आहे पण त्यांनी काय करावे हे पालकांनी विचारपूर्वक ठरवले पाहिजे. त्यांना इतर बाबतीत रमण्याचे पर्याय शोधले पाहिजेत. त्यांच्याबरोबर खेळले पाहिजे. त्यांना कृतीत रमवले पाहिजे. त्यांची अभिरुची ओळखून त्यांच्या अभिरुची प्रमाणे त्यांना खेळात, गोष्ट ऐकविण्यात रमविले पाहिजे. असाच काहीसा विचार करून मी माझ्या नातवंडाना बालकथा, बोधकथा, संस्कारकथा सांगण्याचा नित्यकर्म लॉकडाऊनच्या काळात सुरू केला. गोष्टी ऐकण्यात ते छान रमू लागले. गोष्टी बरोबरच काही बडबड गीते म्हणू लागले. गोष्टी गाणी ऐकून त्यांच्यातही कमालीची सजगता निर्माण झाली. मध्ये मध्ये प्रश्नही विचारू लागले. त्यातून हल्ली मुलांची विचार शक्ती किती प्रबळ झालेली आहे हे समजले गाणी गोष्टी सांगताना आजी-आजोबांना सतर्क करण्याकरता हा लेखन प्रपंच.


           माझ्या साडेतीन वर्षाच्या राहीब नावाच्या छोट्या नातवाला एक गोष्ट सांगत होते. जी गोष्ट पाचवीच्या हिंदी पाठ्यपुस्तकात समाविष्ट होती. दोघे बहिण-भाऊ रस्त्याने चालले भाऊ होता आठ वर्षाचा व बहीण चार वर्षाची. एक कुत्रा त्यांच्या अंगावर आला. मी पळून गेलो तर कुत्रा बहिणीला चावेल म्हणून भावाने एक युक्ती केली. त्याने आपल्या अंगातला कोट काढला व कुत्र्याच्या तोंडावर फेकला. तो कुत्रा कोट बाजूला करेपर्यंत तो बहिणीला घेऊन पळाला व लपून बसला.

किती हुशार धाडसी होता ना तो भैय्या ?

          

        हे ऐकून राहीब म्हणाला, "वो भैय्या चालाक था. हमारा भैय्या ऐसा नहीं करेगा". मी म्हणाले, "क्यो नही करेगा ?" राहीब म्हणाला, "मेरा भैया मुझे घुमाने नही लेके जाता. वो हमेशा टीव्ही देखता है मोबाइल पर गेम खेलता है".

            

        काय म्हणावे याला? मी म्हणाले, "नही रे बाबा, तेरा भैया भी कुत्ता सामने आने पर ऐसाही करेगा". त्यावर राहीबचे उत्तर, "मॉ भैय्या कोट नही पहेनता. वो तो जाकेट पहनता है". मी म्हणाले, "जाकेट भी कोट जैसा काम करेगा". पण या बोलण्याने मी थक्क झाले नाही तरच नवल. 

          

        या चुणचुणीत राहिबला झोपवताना मी, 'इथं माझ्या हातावर नाच रे मोरा' हे गाणे म्हणत होते. डोळे उघडून मला मध्येच थांबवून तो म्हणाला, "मैने गाव को जाते वक्त मोर को देख लिया है. वो कितना बड़ा बड़ा होता है. मा मुझे बोल इतना बड़ा मोर हमारे हाथ पर कैसे नाचे गा?" मी त्याला समजावले, "मोर हातपे नही नाचेगा. लेकिन हम उसे बिनती कर रहे है, बुलाते है. हम बरसात को बुलाते है, येरे पावसा तुला देतो पैसा. हमारे बुलाने पर बरसात उस वक्त आयेगा ही ऐसा नही हो सकता. वैसे ही हम मोर को नाचने बुला रहे है व आयेगा या नहीं आयेगा हम गाते रहेंगे".


          तर अशी मजा होते आजी-आजोबांची नातवंडांना गाणी गोष्टी सांगताना. नातवंडे अपडेट झाली आहेत. आजी-आजोबानाही गोष्टी गाणी सांगताना अधिक हुशार व अपडेट व्हायला हवे. अनपेक्षित प्रश्नाने गोंधळून न जाता त्यांना समजवायला हवे तरच आपण लाडके आजी आजोबा बनू , होय ना?


     माझा सात वर्षाचा रौनक नावाचा नातू गेल्यावर्षी दुसरीत होता. मी त्याला कोल्हा आणि द्राक्षे हि गोष्ट सांगितली व काय बोध घ्यायचा हे ही त्याला प्रश्न विचारून सांगितले. त्यानंतर तो मला म्हणाला कोल्हा व्हेजिटेरियन आहे मी म्हणाले नाही. तो म्हणाला मग मला सांग तो कोल्हा द्राक्ष खाण्यासाठी का गेला होता? त्याच्या या प्रश्नाने मी क्षणभर अवाक झाले. मला आठवले इंग्लिश च्या पुस्तकात ही कथा होती आणि कित्येक वर्ष पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ही कथा शिकवली होती, पण असा प्रश्न यापूर्वी कोणीही विचारला नव्हता, स्वतःला त्याला समजावले बाळ ही कथा काल्पनिक आहे. कोल्हा प्रत्यक्षात बोलत नसतो. पण आपण म्हणतो, कोल्हा बकरी ला म्हणाला. त्याचप्रमाणे कोल्ह्याने द्राक्षे काढायचा प्रयत्न केला. पण त्याला द्राक्ष काढता आली नाही हे मान्य करायला तो तयार नव्हता. म्हणून त्याने द्राक्षाला आंबट म्हटले. थोडक्यात काय तर त्याला समजावताना माझी दमछाक झाली.


       एक दिवस रौनकला  "हात लावीन ते सोनं" ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट सांगून झाल्यावर तो म्हणाला; मा मला एक सांग! त्याने ताटाला हात लावल्यावर ते सोन्याचे झाले. त्यातील अन्नही सोन्याचे झाले. त्याला काही खाता येईना. तेव्हा त्यांनी असे करायला पाहिजे होते. त्याला दुसऱ्याने घास भरवावा म्हणजे त्या राजाचा हात ताटाला, अन्नाला लागणार नाही. अनायसे त्याचे पोट भरेल. त्या राज्याचे दोन्ही हात बांधून ठेवायचे. कुठली वस्तू सोन्याची करायची असली तरच त्याचे हात सोडायचे. देवाने तर त्याला हात लावला तर सोने असा वर दिला होता ना? या राजाने विनाकारण, दिलेला वर परत घ्यायला सांगितला.


            या त्याच्या युक्तिवादावर माझी क्षणभर बोलतीच बंद झाली. त्याला समजावले बाबारे हात लावीन तिथे याचा अर्थ त्याच्या शरीराचा कोणत्याही वस्तूला स्पर्श झाला तरी ती सोन्याची होईल असा आहे. त्याने नाखुशीने ते समजून घेतले. तुम्ही तरी सांगा ना काय उत्तर द्यायचे अशा वेळेला ?