मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

ज्येष्ठांच्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली - विशेष मराठी लेख


१ ऑक्टोबर हा 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

 

ज्येष्ठांच्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       एखाद्या लहानशा बीजाला वृक्ष होण्यासाठी, वृक्ष बनून सर्वार्थानं फुलण्यासाठी खूप लांबवर प्रवास करावा लागतो; तरच त्या वृक्षाच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेता येतो, वृक्षाच्या परिपक्वतेचा सुगंध सर्व सृष्टीला लाभू शकतो. खऱ्या अर्थाने निवृत्त व्यक्तीचे जीवन असंख्य फांद्यानी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे असते. ऊन, वारा, पाऊस, वादळ या सर्वांशी टक्कर देत त्यानं मोठ व्हायचं, अगणित मुळांच्या सहाय्याने खडकांशी टक्कर देऊन पाण्याचा शोध घेत मातीशी घट्ट नातं जोडायचं, गोड फळांना, सुगंधित फुलांना जन्म द्यायचा, पण आपली फळे-फुले कुठे पडावीत, ती कोणी घ्यावीत व खावीत, कुणाला द्यावीत हे वृक्षानं नाही ठरवायचं। या वृक्षाप्रमाणे जी व्यक्ती वागते त्या व्यक्तीलाचं निवृत्तीच्या सुखाची गुरुकिल्ली सापडले. निवृत्त व्यक्तीने पुढे दिलेल्या बाबींचे पालन केल्यास सुखासमाधानात उर्वरित आयुष्य घालवता येईल.


१) जेष्ठ व्यक्तीने गत आयुष्याकडे वारंवार मागे वळून पाहू नये. त्यामुळे गतायुष्यात अडकून पडण्याची भीती असते म्हणून आपल्या गतायुष्याकडे तटस्थपणे पहायला शिकावे.


२) ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाचा, घटना, प्रसंगांंचा उच्चार वारंवार करू नये, कारण तो विषय एकदा ऐकल्यावर इतरांच्या दृष्टीने जुना झालेला असतो.


३) जेष्ठ व्यक्तीने आपल्या भविष्याकडे संन्यस्त वृत्तीने पहावे. भविष्याच्या चिंतेने वर्तमानातील सुख दवडू नये.


४) जेष्ठ व्यक्तीने आपले रोजचे जगणे आवड-निवड विरहित ठेवावे जे समोर आले आहे ते आनंदाने खावे. जे दिसेल त्याकडे रसिकतेने पहावे जे ऐकायला मिळेल ते तृप्तपणे ऐकावे.


५) जेष्ठ व्यक्तीने आसक्तीला आपल्या जीवनात थारा देवू नये. आसक्तीला व अभिलाषेला चौफेर दृष्टीने, मायेने, वात्सल्याने समजून घ्यावे, त्यात गुरफटू नये.


६) जेष्ठ व्यक्तीने संघर्षापासून सदैव दूर रहावे. संघर्षाविना कृतीशील जीवन जगण्याचे शहाणपण दाखवावे.


७) ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या जीवनातील वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णतेने व दिलखुलासपणे व्यतित करावा. वर्तमानातील प्रत्येक क्षणांचा आस्वाद घेवून त्यातील अर्थ वेचून समृद्ध व्हावे.


८) जे आहे, जसे आहे ते स्विकारावे. वास्तवाचा सन्मान करावा. त्यामुळेच त्यात मानसिक शांतीचा धनी होणे सहज शक्य होते.


९) ज्येष्ठ व्यक्तीने रोज किमान अर्धा तास ध्यानासाठी द्यावा, कारण ध्यान हे आंतरिक शांततेसाठी व स्वतःला जास्तीत जास्त जाणून घेणेस उपयुक्त ठरते.


१०) ज्येष्ठ व्यक्तीने एखाद्या न आवडणाऱ्या गोष्टीला किंवा विधानाला अतिशय शांतपणे, सभ्यपणे व संयमाने सामोरे जावे. ती गोष्ट किंवा ते विधान का आवडले नाही ते खिलाडू वृत्तीने समजावून सांगावे. माझे तेच खरे न मानता, खरे तेच माझे ही वृत्ती ठेवावी.


११) ज्येष्ठ व्यक्तिने अधिकारशाही पासून नेहमी दूर रहावे. अधिकार न गाजवता प्रेमाने समजावून सांगावे. प्रेमाने जग जिंकता येते हे वचन लक्षात ठेवून वागावे.


१२) आपल्याला पेलणारी जबाबदारी स्विकारावी. स्विकारलेले काम हसतमुखाने पार पाडावे. जबाबदारीला ओझे समजू नये.


१३) आपले छंद, आपले व्यासंग अखंडपणे सुरु ठेवावेत. छंदात, व्यासंगात सातत्य व एकजिनसीपणा ठेवावा. समछंदिष्टांशी व समव्यासंगी मित्रांच्या सानिध्यात रहावे.


१४) ज्येष्ठ व्यक्तीने नेहमीच हेतुविरहीत कार्य करावे. मी जे काम करत आहे ते माझ्या समाधानासाठी करत आहे. त्याचे इतरांनी कौतुक करावे, भरपूर मोबदला मिळावा ही अपेक्षा ठेवू नये.


१५) निवृत्तीचे  जीवन जगताना कोणत्याही व्यक्तीचे किंवा त्यांच्या कृतीचे मापन करण्याचा प्रयत्न करू नये. चांगला शेरा नोंदविता आला, प्रशंसा करता आली तर जरूर करावी पण वाईट शिक्का मारुन त्याला नाराज करू नये, तटस्थ रहावे.


१६) ज्येष्ठ व्यक्तीने दुसऱ्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्या वाटेवरून न जाता स्वत:ची पायवाट तयार करावी.


१७) ज्येष्ठ व्यक्तीने स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. कारण परावलंबन निवृत्तीचा शत्रू आहे.


१८) ज्येष्ठ व्यक्तीने कधीही दुःखी होऊ नये. स्वतः नेहमी आनंदात रहायचे असेल तर दुसऱ्याला दुखवू नये.


१९) ज्येष्ठ व्यक्तीने सदैव गंभीरतेत जगावे कारण गांभिर्यातच प्रसन्नता व आनंद टिकून रहातो


२०) ज्येष्ठ व्यक्तीचे प्रत्येक पाऊल परिपक्वतेकडे जाणारे असावे कारण परिपक्वता ही एक अपूर्व आध्यात्मिक घटना आहे.


२१) जेष्ठ व्यक्तीने स्वत:च्या अंत:करणात खोलवर उतरावे. स्वत:ला कमालीच्या आत्मशोधकतेने व अंतर्मुखतेने जाणून घ्यावे त्यामुळेच तुम्ही परिपक्व होत जालं. परिपक्व व्यक्तीमध्येच समजूतदारपणा, नि:शब्द शांतता आणि निरागसता येते. परिपक्व व्यक्तीलाच सुखाची गुरुकिल्ली सापडते.


    वरील सर्व गोष्टींचा मनस्वी अवलंब केला तर निवृत्तीचे जीवन सुखासमाधानाने घालविता येईल. कमी आहार, विपुल विहार, विशुद्ध विचार आणि विमल आचार ठेवून निवृत्तीचे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळेच निवृत्तीचे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेले विश्रांतीस्थान होईल यात शंका कसली?


शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

जगू या प्रत्येक क्षण आनंदाने - मराठी कथा


जगू या प्रत्येक क्षण आनंदाने!

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल

       हिरेमठ सर तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते नुसतेच नावाला तत्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचा जीवनात अंगिकार करत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीनुसार त्यांची जीवनशैली  होती. त्यामुळे हिरेमठ सर आदर्श व विद्यार्थीप्रिय होते. त्यांची पत्नी मधुरा, नावाप्रमाणेच मधुर होती. ती जेमतेम जुनी मॅट्रिक शिकलेली होती पण सरांच्या सहवासात राहून, त्यांचं जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान ऐकून ती जणू तत्त्वज्ञानाचं विद्यापीठच बनली होती. संसार काटकसरीने, निगुतीने कसा करावा हे तिच्यापासून शिकण्यासारखं होतं. सरांच्या पगारातील पैसा न् पैसा ती सत्कारणी लावायची. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संसार सुखासमाधानाचा करण्यात ती यशस्वी झाली होती. दोन्ही मुलांना सुसंस्कारित बनविले होते. सद्या ते दोघेही उच्चशिक्षण घेऊन फॉरेनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत.


       कोरोना लॉकडाऊनच्या या बिकट काळात मधुरा कांहीशी नाराज  दिसत होती. दोन्ही मुलांच्या काळजीने त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. आजूबाजूला कोरोना बाधितांची सतत वाढत चाललेली संख्या पाहून मनातल्या मनात त्या हबकून गेल्या होत्या. जवळच्या नातेवाईकांंच्या, परिचीत व्यक्तींच्या मृत्यूची बातमी मधुराला घायाळ करत होती. तिला वाटायचे इथे आपण दोघेच आहोत. आपलं कांही बरंवाईट झालं तर आपली मुलं येतील का? आपल्या मुलांना त्या देशात कोरोनाची बाधा होईल का? अशा असंख्य विचारांनी ती गारठून गेली होती. सरांनी तिची मनःस्थिती ओळखली होती आणि त्यांच्या परीने ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.


       लॉकडाऊन संपले, दुकाने उघडली आणि मधुराने सरांकडे बेडशीट आणण्यासाठी तगादा लावला. सर विचार करत होते, एरव्ही कांही आणू या म्हटले की राहू दे आता नंतर आणू या, म्हणणारी मधुरा बेडशीट आणण्याची एवढी घाई का करत असेल? बेडशीट मध्यभागी फाटले होते हे मान्य परंतु यावेळी ती अतिघाई करतेय असे सरांंना वाटत होते.


    सरांनी बेडशीट आणून दिले. बेडशीट बेडवर विराजमान झाल्याचे त्यांनी पाहिले. कांही दिवसानंतर एका निवांत क्षणी त्यांनी मधुराला विचारले, "मधुरा, नवे बेडशीट बेडवर अंथरल्याचे मी पाहिले. पण त्या जुन्या बेडशीटचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा मध्यभागी जीर्ण झालेला भाग काढून टाकला. बेडशीटचे गादीखाली फोल्ड केलेले दोन्ही भाग एकदम छान होते. ते दोन्ही भाग एकमेकांना जोडून दिवाणवरील छोट्या गादीवर अंथरण्यासाठी त्याचे छानसे बेडशीट तयार केले."


सर म्हणाले, "मग त्या दिवाणवरील जुन्या बेडशीटचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा चांगलासा भाग काढून त्याचे दोन पिलोकव्हर शिवले."


सर म्हणाले, "अरे वा! पण त्या जुन्या पिलोकव्हरचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या पिलोकव्हरचा चांगला भाग काढून घेतला. त्या कापडाचा तुकडा मी भांडी, डबे पुसायला घेतला."


सर म्हणाले, "फारच छान केलंस. पण त्या जुन्या कपड्याचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या जुन्या कापडाचे धागे काढून आपल्या काथ्याच्या पायपुसणीतील छिद्रात बसवले. त्यामुळे ती पायपुसणी  मऊसूत झाली."


सर म्हणाले, "हे बघ मधुरा, मी तुला एक बेडशीट आणून दिलं आणि तू त्याचा किती हुशारीने, कौशल्याने वापर केलास. कसलाही एक कण वाया न घालवता त्याला नवं नवं सुंदर रूप दिलंस, असंच आहे आपल्या आयुष्याचं! परमेश्वराने आपल्याला एक सुंदर जीवन दिलंय. त्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा. या आयुष्यातील सुंदर क्षणांचा उपभोग घ्यायला हवा. आपल्या आयुष्यातील बरेच क्षण आपण काळजी करण्यात घालवत आहोत. कित्येक दिवस आपण कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत आहोत. ही भितीची छाया, काळजी सर्व बाजूला ठेवून प्राप्त परिस्थितीत आलेला प्रत्येक क्षण आनंदाने घालविण्याचा प्रयत्न करू या."


मधुरा म्हणाली, "छान समजवलंत हो मला जीवनाचं तत्त्वज्ञान. म्हणून तर मी नवं बेडशीट आणण्याची घाई केली. त्याच्या येण्यामुळे असं काय काय बनवायचं होतं. कोरोनाच्या काळजीला पळवायचं होतं." दोघेही मोठमोठ्याने हसले व कामाला लागले.

 

सरांनी सांगितलेले तत्वज्ञान ह्रदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे जपून ठेवू या.


जगू या आनंदाने

कोरोनाचा सामना करू नेटाने।


मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

कोणता पुत्र श्रेष्ठ? - मराठी कथा


कोणता पुत्र श्रेष्ठ?

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


       सविता आपल्या पतीसह पुण्याला निघाल्या होत्या.  ५, ६ तासांचा प्रवास होता. आता मुलांकडे जाणार म्हटल्यावर आईच्या मुलांवरील मायेपोटी घेतलेले बरेच साहित्य होते. तिखट, पीठ, डाळी, घरचे तांदूळ, भाज्या, भडंग, मुद्दाम केलेले तुपातील बेसनचे लाडू आदी बसमध्ये सर्व साहित्य चढवताना त्या दोघांना पुरेवाट झाली. पण त्यांना समाधानही वाटत होतं की सर्व काही लेकासाठी घेता आलं याचं. एवढ्यात सविताची बालमैत्रिण वनिता पतीसह बसमध्ये चढल्या. सविताप्रमाणेच वनिताही आपल्या मुलांकडे निघाल्या होत्या. त्यांच्याकडेही सविताप्रमाणेच भरपूर साहित्य होते. सामान व्यवस्थित ठेवल्यावर दोघी एका बाकावर बसल्या. मग काय गप्पांना पुण्यापर्यंत पूर आलेला होता. तुझा मुलगा काय करतो? कोठे राहतो? सविताने विचारले. वनिता म्हणाली, "माझा मुलगा बी.कॉम झालाय. टेलिफोन ऑपरेटर आहे. २०-२२ हजार पगार आहे. माझी सून पण कंपनीत जॉब करते. तिलाही १५ हजार पगार आहे. दोघं खूप आनंदात आहेत. ४- ५ महिन्यांंनी मी आजी होणार आहे. मुलानं आधीच सांगितलं आहे की, नातवडं आलं की तुम्ही दोघांनी इथेच कायमपणे रहायचं. माझा मुलगा वडगांवमध्ये रहातो, तुझा मुलगा काय करतो? कोठे राहतो? वनिताने विचारले. सविता जरा सावरून बसत अभिमानाने सांगू लागली. माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मोठ्या कंपनीत मुख्य मॅनेजर आहे. ९० हजार पगार आहे. शिवाय दोन वर्षे अमेरिकेत राहून आला आहे. सूनबाईही इंजिनिअर आहे. तिलाही ६० हजार पगार आहे. पैशांचा पाऊस पडतोय महिन्याला. चांगला अलिशान फ्लॅट घेतलाय त्यानं. त्या दोघांनी ठरवलय सद्या तरी मूल नकोच लाईफ एन्जॉय करायचं.


          एवढं बोलून थांबेल ती सविता कसली? ती पुढे म्हणाली, ३०-३५ हजारात पुण्यात राहताना तुझ्या मुलाला कठीण जात असेल. फ्लॅट वगैरे घेण्याचा विचारसुध्दा केला नसेल त्यानं. वनिता म्हणाली, "खरं आहे तुझं म्हणणं पण माझा मुलगा व सून दोघे समजूतदार व काटकसरी आहेत . नियमितपणे बचत करतात. त्यांनी फ्लॅटही बुक केलाय. येत्या एक-दीड वर्षात फ्लॅटचा ताबा मिळेल. वनिता मध्यमवर्गीय सुखी, समाधानी रहाणीमानाचे यथार्थ समर्थन करत होती. तर सविता आपल्या मुलांच्या व सुनेच्या उत्तुंग कार्याचे व भरमसाठ पगाराचं तोंड भरून कौतूक करत होती. मध्यंतरी दोन वेळा तिच्या मुलाचा फोन आला. आई-बाबा तुम्ही कुठपर्यंत आलाय? तुम्ही आल्यावरच सगळे मिळून जेवण करू या म्हणून. दोघींच्या गप्पात बस स्वारगेटला केव्हा येवून पोहोचली ते कळलेच नाही.


          बस थांबताच वनिताचा मुलगा व सून चपळाईने बसमध्ये चढले. त्यांना बिलगून नमस्कारही केला त्यांनी. ते दोघे १० मिनिटे आधीच इथे पोहचून चारचाकी पार्क करून थांबले होते. त्या दोघांनी आई-बाबांना सांगितले की तुम्ही निवांत मोकळेपणाने खाली उतरा. प्रवासाने तुमचे पाय भरून आले असतील. आई-बाबांनी आणलेले साहित्य गाडीत व्यवस्थित ठेवल्यावर हे दोघे वर चढणार तोपर्यंत मुलाचा एक मित्र त्याला भेटायला पुढे आला. ते दोघे थोडा वेळ गप्पात रंगले.


           वनिताने सविता गेली की काय म्हणून नजर टाकली. कारण तिने अध्यातासापूर्वीच मुलाला फोन करून तसे सांगितले होते. वनिता बघते तर काय सविता बसमधून एकेक बॅग खाली आणत होती. तिचे पती लंगडत लंगडत ते बाकावर ठेवत होते. प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गडबड करत होते. त्यामुळे सामान उतरवताना या दोघांची दमछाक चालली होती. सामान उतरवून झाल्यावर तिच्या मुलाचा फोन आला गाडीतून न उतरताच त्याने सांगितले की इकडे गाडीकडे या म्हणून. दोघे सामानाच्या बॅगा घेवून गाडीकडे गेले व स्वतःच बॅग गाडीत चढवू लागले. वर तिचे चिरंजीव म्हणाले, "आई-बाबा तुम्हाला हजार वेळा सांगितलय की गावाकडून एवढं सामान आणत जावू नका म्हणून. तरी एवढं सामान घेवून येता कशाला? आणि काय गं आई मी बरोबर आठ वाजता जेवायला बसतो हे माहित असूनही बरोबर आठ वाजता कशाला फोन केलास? मग मला जेवण करूनच निघाव लागलं. यापुढे काहीही न बोलता मुलानं गाडी स्टार्ट केली व निघाले. मघाशी अभिमानाने, मोठमोठ्याने मुलाचं कौतुक करणाऱ्या सविताचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. हे वेगळं सांगायला नको. 

     

          थोडक्यात समाधान मानून सुखाने जीवनाला सामोरे जाणारी वनिताची फॅमिली आनंदाने घरी पोहोचली. आता तुम्हीच सांगा वाचक बंधू-भगिनींनो पगार कमी असला तरी आई-वडिलांवर मायेचा वर्षाव करणारा पुत्र श्रेष्ठ की फॉरेन रिटर्न, उच्च शिक्षित, भरमसाठ पगार असलेला पुत्र श्रेष्ठ?


रविवार, २० सप्टेंबर, २०२०

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज - विशेष मराठी लेख


"२१ सप्टेंबर हा दिवस अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख"


अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज

✍️ ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

     प्रत्येकाची कशावर तरी, कोणावर तरी श्रध्दा असतेच कारण श्रध्दा ही मानवाच्या रुक्ष जीवनातील हिरवळ आहे. श्रध्दाळू असणे तर गैर नाही. कारण कोणतेही काम श्रध्दापूर्वक केले तर ते सफल होण्याची, यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. मग ती श्रद्धा परमेश्वरावरील असो, माता-पिता व वडीलधाऱ्या मंडळीवरील असो वा गुरू-साधू संत यांच्यावरील असो, श्रद्धा तुम्हाला शक्ती देत असते, तुमचे सामर्थ्य बनत असते. श्रध्देमुळे आत्मविश्वास वाढतो व या आत्मविश्वासामुळे काम करण्यासाठी दुप्पट बळ मिळते. नि त्यामुळेच कार्य यशस्वी होवू शकते.


     पण हीच श्रद्धा जेंव्हा अंधश्रद्धेकडे झुकते तेंव्हा विनाशाकडे वाटचाल सुरू होते. कारण अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या निखाऱ्यावरील राख आहे. ही राख झाडत असताना हाताला चटका बसण्याची दाट शक्यता असते किंवा निखारा विझण्याचीही शक्यता असते कोणतीही गोष्ट सबळ पुराव्याशिवाय स्विकारणे म्हणजेच अंधश्रद्धा होय. अंधश्रध्देमुळे सगळी कामे ईश्वरकृपेने व्हावीत, आपोआप व्हावीत असे वाटू लागते व त्यातूनच तथाकथित बाबा-बुवा यांच्यात समाजाचे शोषण करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.


      १९९५ साली सप्टेंबर महिन्यात अंधश्रध्देला पूर आला होता. मुंबईत माहिमच्या समुद्राचं पाणी गोड झाल्याची बातमी पसरली. माहिमच्या खाडीकिनारी एकच गर्दी झाली होती. लोक अक्षरशः वेड्यासारखे समुद्रातील पाणी घराघरात पीत होते, लहान मुलांना पाजत होते हा बाबा मगदूम शहांचाच चमत्कार असल्याचे एकमेकांना सहर्ष सांगत होते. माहिमच काय पण मुंबईतील संपूर्ण किनारा अस्वच्छतेचे माहेरघर बनलेला असताना अंधश्रध्देचे बारे अंगात संचारलेले मुंंबईकर बाटल्या भरभरून ते घाण पाणी मोठ्या श्रद्धेने पीत होते. महापालिका प्रशासन हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगत असताना सुध्दा अंंधश्रध्देची पट्टी बांधलेल्या लोकांना ते कसे ऐकू येणार?


       २१ सप्टेंबर १९९५ या दिवशी गणपती दूध पितो या अफवेत आपले महाराष्ट्र राज्य बुडाले होते. तेंव्हा तासाभरातच देशभर नव्हे तर साऱ्या जगभर गणपतीच्या मूर्ती दूध पीत असल्याचा बातम्या येत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यानीही आपल्या गणपतीने दूध प्यायल्याचे मोठ्या श्रध्देने सांगितले होते. त्यामुळे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, स्वातंञ्यवीर सावरकरांंची विज्ञाननिष्ठ परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागली होती. भूपृष्ठीय तणाव व केशाकर्षण यामुळे असे घडू शकते हे त्यामागचे वैज्ञानिक सत्य आहे. माहिमचे गोड पाणी पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण खात्याने परीक्षण करण्यासाठी पाठविले असता मिठी नदीचे पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळल्याने पाणी गोडे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला. 


       पार्वती माँ च्या कृपेने पुत्रप्राप्ती होते ही मोठी अंधश्रध्दा काही वर्षांपूर्वी पसरली होती. शेकडो किलोमिटरचे अंतरावरून लोक पुत्रप्राप्तीसाठी स्पेशल गाड्या करून पार्वती माँ कडे जात होते. शेकडो वर्षापूर्वीचे संतवचन आहे की "नवसे-सायास पुत्र होती, तर मग का करावे लागे पती?" विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातील लोकांना जे कळत नाही ते पूर्वीच्या संत महात्म्यांना कळत होते असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. कुशिऱ्याच्या औषधाने डोळे बरे होतात, ताईत-गंडा दोऱ्याने आजार बरा होतो, निर्जीव ग्रहांची कृपा-अवकृपा मानवावर होते, बालकाचा बळी देऊन धनप्राप्ती होते. उंबराच्या झाडाला फूल आले म्हणून पंचगंगेवर गर्दी होते, काही ठिकाणी आजही साप चावला तर मंत्रिकाकडे नेले जाते, ताप आला तर लिंबू गंडे दोरे उतरवून टाकले जातात. अशा कितीतरी अशास्त्रीय गोष्टीवर आपला सहज विश्वास बसतो. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभावच याठिकाणी दिसून येतो. त्यामुळेच प्रगत समाज बऱ्याच वेळा अप्रगत दिसत आहे.


      आमच्या जवळच्या नानेवाईकांच एक उदाहरण या ठिकाणी सांगते. लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घातल्याने मुलाचे डोळे मोठे होतात ही अंधश्रद्धा. त्यांनी घरीच काजळ तयार केले व व्हीक्सच्या डबीत भरून बाळाच्या डोळ्यात घातले. त्या बाळाच्या डोळ्यात कायमचा दृष्टीदोष निर्माण झाला.


       आपल्या देशामध्ये अजूनही लोक अज्ञानी व निरक्षर आहेत. स्त्रिया देवभोळ्या व धर्मभोळ्या आहेत. त्यांचा फायदा विशीष्ट लोक घेत आहेत सर्वच धर्म हे विज्ञानाच्या उदयापूर्वीचे आहेत. त्यामुळे धर्मात सांगितलेली बरीच सत्ये विज्ञानाच्या कसोटीला उतरतीलच असे नाही. युरोप खंडात धर्म आणि विज्ञान यांच्यात फार मोठा संघर्ष होवून त्यात विज्ञानाचा विजय झाला. परिणामी समाजाने विज्ञानाचा स्विकार केला. भारतात मात्र धर्म व विज्ञान यांचा संघर्ष न होताच विज्ञानाच्या सुविधा आल्या त्यामुळे आपल्या समाजात विज्ञानाची सृष्टी आली पण दृष्टी आली नाही. ती दृष्टी आणण्याचा या दिनी आपण प्रयत्न करूया.


शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

कर्मवीर भाऊराव पाटील : एक युगपुरुष


 कर्मवीर भाऊराव पाटील : एक युगपुरुष

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूूूगल


               कर्मवीर आण्णा, तुमचे पाऊल तिथे प्रकाश! तुम्ही नसता तर फत्तराच्या छातीतून प्राणांना कोंब फुटले नसते, दलितांच्या दंडात कर्तृत्वाच्या बेडक्या फुगल्या नसत्या, घाणेरीच्या फुलांना स्वाभिमानाचा रंग चढला नसता. सहकार्य, सेवा, श्रम व शिक्षण यातून जीवन सुखमय बनते. हा महान संदेश देणाऱ्या कर्मवीर आण्णांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे शिक्षण फक्त सहावीपर्यंत झालं होत, पण ध्येयाने झपाटलेल्या या महान कर्मवीरांनी वाट्टेल ते कष्ट झेलून आपले कार्य सिध्दीस नेले. ज्यावेळी आण्णांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरूवात केली. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्यावेळी जनता रूढी परंपरा भोंदूगिरी व धर्मभोळेपणा यामध्ये भरडली जात होती. हे लोक अंधारात चाचपडत होते. ज्या ज्या ठिकाणी अंधार होता त्या त्या ठिकाणी ते ज्ञानाची ज्योत घेवून गेले. लोकांच्या रोमा रोमात भरलेल्या अंधश्रद्धा त्यांनी ज्ञानज्योतीने दूर केल्या.


       आण्णा खेडोपाडी, घरोघरी हिंडले आणि त्यांनी ज्ञानाचे महत्व लोकांना पटवून दिले. निरनिराळ्या जाती धर्माच्या हुशार मुलांना साताऱ्याला एकत्र आणले आणि ज्ञानदानास सुरूवात केली. कर्मवीर आण्णा म्हणत, धर्म आहेत तरी काय? हे पाडले कोणी? बरं शेवटी प्रत्येक धर्मातील माणूस हाडामासांचाच बनलेला आहे ना? सगळ्यांचे रक्त लालचं आहे ना?

         

       आण्णांनी ठिकठिकाणी बोर्डिंगची स्थापना केली व तेथे निरनिराळ्या जातीधर्मांच्या मुलांना प्रवेश दिला. ही मुले एकत्र राहिली, एकत्र बसली-उठली, एकत्र जेवली, एकत्र शिकली, एकत्र झोपली आणि या एकत्रीकरणामुळेच या मुलांनी जाती धर्माची बंधने तोडून टाकून रूढी परंपरांना तिलांजली दिली. कर्मवीर आण्णांनी साताऱ्याला शाहू बोर्डिंगची स्थापना केली व रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला सुरूवात केली. कर्मवीर आण्णा व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या मुलांचे माता-पिता बनले. मुलांसाठी या शैक्षणिक कार्यासाठी या दांम्पत्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. तरूणांना स्वावलंबनाचे महत्व पटवून दिले. त्यांनी एक नवीन तत्व, नवीन सूत्र जनतेसमोर ठेवले ते म्हणजे म्हणजेच Earn and leam कमवा आणि शिका. त्या काळात गरीबीमुळे शिक्षण ही फार दुर्मिळ गोष्ट बनली होती. श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवायचे मग गरिबांनी जायचे कुठे? याच्यावर आण्णांनी तोडगा काढला. गरिबांनी प्रथम आपल्या पायावर उभं रहायचं, कमवायला शिकायचं व कमवत असतानाच शिकायचं. त्यांनी श्रीमंताकडे पडीक जमिनी मागितल्या ते लोकांना म्हणत,

"Give us waste land, we shall turn it into best land"

आणि या अशा पडीक जमिनीतूनच कष्टाच्या घामाचे मोती बनले. पडीक जमिनीतून सोनं पिकवलं व ते सोनं शिक्षण प्रसारासाठी खर्च केलं.

         

     आण्णा नसते तर बॅरिस्टर पी. जी. पाटील, आमदार एन. डी. पाटील यासारखे लोक विद्वान म्हणून चमकले नसते. आण्णा नसते तर शेतकऱ्यांच्या पायात त्राण व डोक्यात ज्ञान आले नसते, बहुजन समाज मागेच राहिला असता. आण्णा नसते तर लोकशाहीत लोकांना आपल्या हक्कांची जाणीव झाली नसती स्वराज्य मिळूनही त्याचे सुराज्य झाले नसते. आण्णांनी शिक्षणाचे बीज पेरले नसते तर आज काहीच उगवले नसते. संपादकांचे पेपर्स वाचले गेले नसते, लेखकांची पुस्तके ग्रंथालयात पडून राहिली असती, दलित पँथर सारख्या संघटना जागृत झाल्या नसत्या. नामदेव ढसाळ, अमर शेख, आण्णाभाऊ साठे, दया पवार, ना. दो. महानोर यासारखे कवि लेखक झाले नसते. कर्मवीर नसते तर हजारो शाळा, शेकडो कॉलेजेस आणि कोट्यावधी विद्यार्थी दृष्टीपुढे आले नसते. उच्च लोकांच्या हाती असलेली ज्ञानगंगा सामान्य लोकांच्या अंगणात आली नसती. त्यांनी स्थापन केलेल्या हायस्कूलमध्ये शिकून आलेली माझ्यासारखी सामान्य मुलगी त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक चार शब्द लिहू शकली नसती!

                

       साऱ्या जगाने वाहवा केलेले कर्मवीर, या भारतमातेचे सुपुत्र, महाराष्ट्राच्या शिरपेचातील मुकुटमणी आहेत. त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते


'असा मोहरा झाला नाही 

पुढे कधी ना होणार 

कर्मवीर अण्णा, तुमचे नाव

सतत गर्जत राहणार.'


शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

नात्यांची गुंफण - विशेष मराठी लेख


नात्यांची गुंफण

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


       स्नेह व सुखद सहवास हे जीवनातील सर्वात मोठे आध्यात्मिक मूल्य आहे. महासागरात दैवयोगाने जशी दोन ओंडक्यांची गाठभेट होते, तशी जीवनाच्या महासागरातही स्नेह्यांच्या गाठीभेटी जन्मजन्मांतरीच्या संकेतानुसार घडून येतात. जीवनप्रवासात वळणावळणावर त्यांचा स्नेह भरभरून मिळत जातो व एका अनोख्या नात्याची गुंफण तयार होते. त्यातील काही नाती मानलेली असतात, काही रक्तसंबंधामुळे निर्माण झालेली असतात.


   रक्तसंबंधाच्या नात्यांमध्ये स्वायत्तता नसते. त्यांच्यासोबत राहावेच लागते म्हणून प्रेम करावेच लागते. अशा नात्यांंमध्ये कित्येकदा नाइलाज असतो. जुलमाचा रामराम असतो. मानलेल्या नात्यात असे नसते. त्यामुळे अशा नात्यांत एक आगळीवेगळी शक्ती असते. ही नाती कळत नकळत, सहजपणे निर्माण होतात व जीवन सुखी, संपन्न, समृद्ध करतात. जीवनातील सर्व समस्यांवर मात करून जीवन सुसह्य करतात.


           माझ्या शेजारी राहणारी माझी मैत्रीण रिमा व तिचा मानसपुत्र आकाश यांच्यातील स्नेह पाहून एका अनोख्या नातेसंबंधाचे दर्शन होते. रिमाचा विवाहित मानसपुत्र आकाश कमालीचा हुशार, कर्तृत्ववान, महत्त्वाकांक्षी व समंजस आहे. चार वर्षांपूर्वी काही दिवस तो अस्वस्थ होता, तेव्हा रिमा त्याला म्हणाली, "आकाश आपण मानसोपचार तज्ज्ञांचा या बाबतीत सल्ला घेऊ." हे ऐकून आकाश म्हणाला, "आई, तू मला बरं करू शकतेस, मग विनाकारण त्यांना फी का द्यायची?" आकाशचे हे बोलणे ऐकून रिमाच्या मातृहृदयातील मायेला भरती आली. तिने आपल्या अल्पमतीने त्याला स्नेहाचे चार शब्द सांगितले. मायेचा घास भरविला. त्याला त्याच्या कार्यशक्तीची जाणीव करून दिली. त्याच्यातील हरवलेला आत्मविश्वास जागृत केला.


 या मायेच्या वर्षावाने आकाशच्या मनातील अस्वस्थता बाहेर पळून गेली. मूळचाच कर्तबगार असलेला तो जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करत आहे. आकाशाला गवसणी घालण्याचं बळ त्याच्यात निर्माण झालंय व आईला आकाश ठेंगणं वाटू लागलंय. 


    २ वर्षापूर्वी माझी मैत्रीण आजारी होती. तिला दवाखान्यात ऍडमिट केले होते. त्या वेळी आकाश कामानिमित्त हजार किलोमीटर दूर होता. त्याला फोनवर जेंव्हा हे समजले, तेंव्हा तो काम अर्ध्यात सोडून परत आला. तोपर्यंत रिमा बरी झाली होती. ती त्याला म्हणाली, "देवाच्या कृपेने मी वाचले, तू तर लांब गेला होतास." त्यावर आकाश म्हणाला, "आई, तुला आजारी पाडून देवाला वर राहायचं नसेल." या वाक्यानं रिमाला केवढं मोठं आत्मिक बळ मिळालं. त्यानंतर तिनं आजारी पडायचं सोडून दिलं. तिच्या जीवनातील ही समाधानाची झुळूक तिला, सुखावून गेली. तिने आपल्या मानसपुत्रासाठी मनोमन प्रार्थना केली. तिची अंतःकरणपूर्वक प्रार्थना सफल झाली.


       त्यांच्यातील हे स्नेहपूर्ण नाते पाहून मला रिमाचा हेवा वाटतो. हात शरीराचे, पापण्या डोळ्यांचे ज्याप्रमाणे रक्षण करतात त्याप्रमाणे या नातेसंबंधात एकमेकांची जपणूक होते. जीवनात येणाऱ्या सुखदुःखात सामील होण्यासाठी हे नाते सदैव तयार असते. शेवटी एवढेच म्हणेन,

मायलेकरातील हे ओलावा।

शेकडो वर्षे असाच पहावा।।


गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

सार्थक जीवन - मराठी कविता

 

सार्थक जीवन

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुुुगल

जीवन आहे जगण्याचं नावं

जीवन म्हणजे सुखदुःखाचा लपंडाव


जीवनात सुख हमखास येणार

सुखाच्या वस्त्राला दुःखाची झालर असणार


पण जीवन भरभरून जगावं

आनंदानं आणि उत्साहानं भरावं


सुख आलं तर जाऊ नये हुरळून

दुःख आलं तर जाऊ नये खचून


संकटाना घाबरून जो करी वाटचाल

त्याचे होतात जीवनी फार हाल


जो समजतो संधी संकटाना

त्याचं जीवन मार्ग दाखवी सर्वांना


जो करतो स्वागत संकटांचे

जीवन सार्थक होई त्याचे!


मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मराठी लघुकथा संच - ६


मराठी लघुकथा संच - ६


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - २६


एक व्यक्ती पोलिस असते. ती पोलिस ठाण्याच्या हेड ऑफिसमध्ये कार्यरत असतात. त्यांची पत्नीही पोलिस असते. लॉकडाऊनच्या काळात पन्नास वर्षावरील पोलिसांना सुट्टी दिल्याने तिला ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी करावी लागते. एके दिवशी पती ड्युटीवर निघालेले असताना ती सांगते हेल्मेट घाला, पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते निघून जातात. ड्युटी संपल्यानंतर परत येताना बघतात तर पत्नी पोलिस त्यांना अडवते. बिगर हेल्मेट प्रवास करणाऱ्याचा कॅमेरा चालू करून फोटो घेते व पाचशे रूपये दंडाची पावती फाडून दंड वसूल करते. पोलिस पतीना फार राग येतो पत्नीचा, पण पत्नी अविचलपणे आपले कर्तव्य पार पाडते. त्या दिवसापासून पती महाशय हेल्मेटशिवाय बाहेर पडत नाहीत. याला म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त।


लघुकथा क्रमांक - २७


एका ऑफिसमधील सर्व स्टाफ एका कर्मचाऱ्याच्या आईचे निधन झाल्याने त्याच्या सांत्वनासाठी भाड्याने गाडी ठरवून त्यांच्या बॉससह निघतात. अर्थात गाडीभाडे टी. टी. एम्. एम्. करून द्यायचे ठरते. स्टाफचे बॉस बॉसच्या रूबाबात ड्रायव्हर सीटच्या जवळच्या सीटवर बसतात. गाडी पेट्रोल भरायला थांबते. ड्रायव्हर खाली उतरतो. पाठोपाठ बॉसही उतरतात. स्टाफला बरे वाटते. आता बॉस पेट्रोल चे पैसे भागवणार नंतर हिशोब करून सर्वांचे पैसे गोळा करून देऊ त्यांना, असा विचार करतात. पण बघतात तर काय। बॉस महाशय लघुशंकेसाठी निघून जातात. दुसऱ्या एकाने पैसे भागवून गाडी निघाल्याचा  हॉर्न वाजल्यावरच परत येतात. स्टाफने काय ओळखायचे ते ओळखले, एकमेकांजवळ कुजबुजले असा हा बॉस आणि याला वाटतं मला सर्वानी मानलं पाहिजे. आधी बॉस सारखं वाग ना।


लघुकथा क्रमांक - २८


एस्. टी .स्टँडवर एस्. टी. बस थांबली. प्रवासी भराभर वर चढू पहात होते. कंडक्टर मॅडमनी त्यांना थांबवलं व म्हणाल्या ज्यांच्याकडे सुट्टे पैसे असतील त्यांंनीच गाडीत चढा. कांही प्रवासी चढायचे थांबले. तिकीट काढणे सुरु झाले. मॅडम एका महिलेजवळ आल्या. तिनं शंभरची नोट काढून दिली व एक तिकीट द्या म्हणाली. कंडक्टर म्हणाल्या, "सुट्टे सतरा रुपये  द्या, तुम्हांला त्र्याऐंशी रुपये कुठले देऊ परत? तुम्हाला सांगितले होते ना, सुट्टे पैसे असतील तरच वर चढा म्हणून." आता मात्र ती महिला जाम चिडली व फणकाऱ्याने म्हणाली, "आम्हाला सांगतीस सुट्टे पैसे असतील तरच गाडीत चढा, तुझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत मग तू कशाला गाडीत चढलीस. तुला काय वाटतं एस्. टी. तुझ्या बापाची हाय?" यावर कंडक्टर मॅडम काय बोलणार?


लघुकथा क्रमांक - २९


सुवर्णा एक समंजस, सुजाण महिला होती. घरातील व्यक्तींशी, नातेवाईकांशी तिचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते कारण सुवर्णा सर्वांशी प्रेमाने वागत होती. आपल्यामुळे कुणालाही कसलाही त्रास होणार नाही याची ती नेहमी काळजी घ्यायची. सर्वांचा पाहुणचार करणे, रीतीभाती सांभाळणे यात ती नेहमीच अग्रेसर होती सर्वजण तिच्या वागणुकीवर खूष होते. आत्तापर्यंत तिने कुणाला नावं ठेवायची संधीच दिली नव्हती. तिला ही आपल्या वागण्यावर ठाम आत्मविश्वास होता. एकदा तिच्या जाऊबाईंचे काका गैरसमजामुळे तिला म्हणाले, "सुवर्णा तू एका परीक्षेत नापास झालीस." सुवर्णा ठामपणे म्हणाली, "माझी परीक्षा घेणारा परीक्षकच कच्चा असेल काका, रिचेक करा हवं तर!"


लघुकथा क्रमांक - ३०


कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटना एका मंत्री महोदयांनी भेट दिली. "तुमची सर्व व्यवस्था चांगली आहे का? नाष्टा, जेवण, वेळेवर मिळतं का? हे विचारलं." सर्व पेशंटनी व्यवस्था चांगली आहे, नाष्टा, चहा, जेवण वेळेवर व चांगलं मिळतं असं सांगितलं. एक महिला पेशंट मध्येच ऊठून म्हणाली, "साहेब एकच गैरसोय आहे बघा. चार साडेचार वाजता चहा मिळतो बघा, त्या चहाबरोबर बिस्कीट फिस्किट देण्याची व्यवस्था करा. रात्री साडेआठपर्यंत फार भूक लागते हो. आम्ही की न्हाय कामाची आणि भरपूर खाल्ला्या पिल्ला्याली माणसं हाय!" साहेब मनात म्हणाले, "बरोबर आहे तुमचं. सरकारी पाहुणे आहात ना।"


शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी - विशेष लेख


राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी

१४ सप्टेंबर 'हिंदी दिन' यानिमित्त विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


       लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत हा जगाच्या पाठीवर सर्वात मोठा लोकतांत्रिक, बहुभाषी देश आहे. भारतात अनेकविध भाषांची रेलचेल आहे. भारताची भाषिक विविधता ही या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळापासून बहुभाषकता हे भारतीय समाजाचे मर्मस्थान आहे.


       १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला.  त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या बावीस भाषांना राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या १७ व्या भागात परिच्छेद ३४३ पासून ३५१ पर्यंत जी कलमे नमूद आहेत, त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून, तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.


       भारताची राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याच्या दृष्टीने हिंदी भाषा एका शतकापासून मोलाचं कार्य करून महत्वाची भूमिका बजावत आहे. हिंदी भाषेला संस्कृत भाषेचा वारसा लाभलेला आहे. संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचं कार्य हिंदी भाषा करत आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट यांच्याद्वारे हिंदी भाषेची संरचना, गती, प्रगती भारतीय नागरिक समजू लागले आहेत. देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक असलेला एक महत्वाचा घटक म्हणून हिंदी भाषेला पुढे आणण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी अग्रणी भूमिका स्वीकारली आहे. यात हिंदी चित्रपटांचं योगदान मोठे आहे. गेल्या दशकात हिंदीच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे हिंदी इंटरनेट, माहिती तंत्रज्ञान या आधुनिक साधनांमार्फत सर्वदूर पसरत आहे.


       आज भारतीय भाषांच्या समान विकासाची गरज भासू लागली आहे. त्यासाठी भाषांमध्ये परस्पर समन्वय स्थापित होणे आवश्यक आहे. हिंदी भाषा सर्वच भारतीय भाषांमध्ये समन्वय घडवून आणू शकते कारण हिंदी ही आज भारताची राष्ट्रभाषा, राजभाषा आणि संपर्कभाषा आहे. महान, उदार आणि सहिष्णुतेची भाषा म्हणून हिंदीकडे पाहिले जाते कारण सर्व भारतीय भाषांना आत्मसात करण्याची अदभूत क्षमता हिंदी भाषेत आहे. बाराव्या शतकापासून हिंदी भाषा सतत विकसित होत राहिली आहे. हिंदी भाषा ही स्वातंत्र्य संग्रामातून पुढे आली आहे. लोकशाही प्रणाली अधिकाधिक मजबूत करण्यासाठी हिंदी भाषेची मदत घेणं आवश्यक आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हिंदी भाषा राष्ट्रभाषा, महामंत्र, महाधार व मानबिंदू आहे.


       केंद्र सरकारने भाषाविषयक कायदे वेळोवेळी केले आहेत. या सर्व कायद्यांचा हेतू हिंदीला आणि प्रांतीय भाषांना संरक्षण मिळावे आणि त्यांची प्रगती व्हावी हा आहे. हिंदी दिवस हा फक्त हिंदी भाषेच्या विकासाची आठवण करून देणारा दिवस साजरा करण्याऐवजी सर्वच भारतीय भाषांचे संरक्षण करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. आज भारतातील बहुसंख्य जनता हिंदी भाषा बोलणारी व समजणारी आहे. अनुवादाच्या माध्यमातून हिंदी आणि इतर भाषा भगिनी एकमेकींच्या जवळ याव्यात, त्यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदान, सामंजस्य आणि प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा हीच सर्व भारतीयांची अपेक्षा आहे.


हिंदीमुळे ज्ञान-विज्ञान, मानवता व संस्कार गतिमान होवून विश्वाचे कल्याण होवो हीच प्रार्थना!


गृहिणींचे अनमोल योगदान - विशेष मराठी लेख

 

गृहिणींचे अनमोल योगदान

शब्दांकन: मोहसीन तांबोळी

फोटो साभार: share chat.com

 

       गृहिणी म्हणजे घरकाम करणारी स्त्री असा समज करुन आपण तिच्या स्वाधीन घर करुन बाहेर निघून जातो, परंतु त्या गृहिणीला करावी लागणारी कामे जर पाहिली तर मोठे मोठे धुरंधर ही ती कामे करू शकत नाहीत अशी असतात. गृहिणी ही कामे जराही कमीपणा न मानता अगदी सहजपणे करत असते.


       तर हे सर्व सांगायचे म्हणजे परवा झी मराठी या दूरचित्रवाणी वरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील एक प्रसंग जो गृहिणी कोण असते, तीचे योगदान, तिचे काम, तिची भूमिका हे सर्व दाखवणारे एक बोलके उदाहरण म्हणावे लागेल.


       या मालिकेमध्ये अभिजित राजे (डॉ. गिरीश ओक), त्यांची पत्नी आसावरी (निवेदिता अशोक सराफ), मुलगा सोहम उर्फ बबड्या (आशुतोष पत्की) व सून शुभ्रा (तेजश्री प्रधान) असं चार लोकांचं कुटुंब दाखवलेले आहे. यातील अभिजित यांचा हॉटेल व्यवसाय असतो व ते एक नामांकित शेफ असतात. आसावरी ही एक उत्कृष्ठ गृहिणी असते. बबड्या हा एक काहीही काम न करणारा, आईने लाडावून ठेवलेला, आईला मोलकरीण व स्वतःला फार हुशार समजणारा मुलगा असतो. शुभ्रा ही एक नोकरी करणारी, रोखठोक बोलणारी, समजदार, घरकामात मदत करणारी सून असते.


       यातील एका प्रसंगात असे दाखवले आहे की, आसावरी शाबुदाण्याची खिचडी बनवणार असते. त्यासाठी लागणारे शेंगदाणे संपलेले असतात. शेंगदाणे आणण्यासाठी ती तिच्या जवळील सर्व डबे, पर्स तपासते परंतु पैसे संपलेले असतात. ती पैसे मागण्यासाठी पती अभिजीत यांच्याकडे जाते. तिला पैसे मागताना फार संकोच वाटत असतो. ती पैसे मागताना फार सविस्तरपणे स्पष्टीकरण सांगत असते. ही गोष्ट अभिजीत यांच्या लक्षात येते. ते तिला म्हणतात, “किती पैसे पाहिजे तेवढे अगदी विनासंकोच माग. खरंतर तू न मागता आम्ही तुला पैसे दिले पाहिजेत.” यानंतर लगेचंच अभिजीत व शुभ्रा हे पैसे देतात. आसावरी ते पैसे बबड्या ला देते व शेंगदाणे आण्यासाठी पाठविते. बबड्या ७० रुपयांचे शेंगदाणे घेवून येतो व म्हणतो, “३० रुपये माझी टीप, शेंगदाणे घेवून यायची.”


       ही गोष्ट शुभ्रा व अभिजीत यांना ही खटकते. ते म्हणतात, “आजपासून या घरात प्रत्येकाला प्रत्येक कामाचा मोबदला मिळाला पाहिजे.” त्यानंतर अभिजीत सर शाबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी बसल्यावर प्रत्येकजण ७० रुपये जमा करायला सांगतात. सोहमला पैसे देताना कसेबसे वाटते. आसावरीला ही गोष्ट आवडत नाही. ती तिथून निघून जाते. पाठोपाठ अभिजीत व शुभ्रा ही तिच्या मागे निघतात.


       आसावरी म्हणते, “असे कोणी घरकामाचे पैसे देतात का? ही काय खानावळ आहे का? अशा घरातील कामाचे कुठेही बाजाराप्रमाणे मोल होऊ शकत नाही.” अभिजीत सर तिला समजावतात व म्हणतात, “आपण देवाकडेही काहीही मागतो व ते पूर्ण करण्यासाठी देवालाही काही रक्कम, वस्तू अर्पण करतो. म्हणजे काय ती किंमत नसते तर त्या मागील भावना महत्वाच्या असतात.” तरीही आसावरी हे सगळे न करण्यावर ठाम असते.


      त्यानंतर अभिजीत, शुभ्रा व बबड्या हे तिघे मिळून एक शक्कल शोधून काढतात. आजपासून घरातल्या प्रत्येकाचे एक एक बॉक्स तयार करतात त्यावर चार जणांची नावे लिहितात. काही छोटे व काही मोठे बॉक्स असतात. जो जेवढे काम करेल तेवढे पैसे त्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये जमा करायचे. बबड्याला वाटते मी घरात फार काम करतो त्यामुळे माझे सगळ्यात जास्त पैसे जमा होतील. तो शुभ्राकडे मोठा बॉक्स मागतो. ही सर्व गोष्ट आसावरी पासून लपवून ठेवतात. दिवसभर प्रत्येकजण त्या त्या व्यक्तीच्या कामानुसार पैसे बॉक्समध्ये जमा करत असतो. आसावरी भरपूर काम करत असते. बबड्याचे सर्व पैसे जवळपास संपत आलेले असतात कारण तो काहीच काम करत नसतो. आई साफसफाई करत असताना बबड्या मनातल्या मनात म्हणतो, “आई खूप काम करू नकोस नाहीतर मी कंगाल होईन.” तो आईला म्हणतो, “तू बस इथे मी तुझ्यासाठी चहा करुन आणतो” जेणेकरून थोडेतरी पैसे जमा होतील. शुभ्राही बबड्याला चहा करायला सांगते तो नाही म्हणणार इतक्यात त्याला पैसे दाखवते. बबड्या लगेचंच चहा करायला तयार होतो. चहा करताना त्याला घरातील काही वस्तू सापडत नाहीत. तो चिडतो व त्याच्या हातून साखरेची बरणी फुटते. ती बरणी व पडलेली साखर आसावरी येवून साफ करते. त्याचेही पैसे बबड्याला द्यावे लागतात.


     शेवटी रात्री सर्व कामे आटोपल्यावर सर्वजण एकत्र जमतात व त्या बॉक्समधील जमा रक्कम मोजू लागतात. बबड्या म्हणतो, “माझा बॉक्स आधी उघड, त्यात खूप पैसे जमा झाले असतील” प्रत्यक्षात बॉक्स उघडल्यावर त्यात फक्त ७० रुपये असतात. शुभ्रा त्यातील वीस रुपये काढून घेते व म्हणते हे तू मला चहा करुन दिला नाहीस त्याचे हे पैसे. शुभ्राच्या बॉक्स मध्ये ३०० रुपये जमा असतात. अभिजीत सरांच्या बॉक्स मध्ये ४५० रुपये जमा असतात तर आसावारीच्या बॉक्स मध्ये ११०० रुपये जमा असतात.


       या जमा रकमेतून घरातील सर्वजण आसावरीला हे दाखवून देतात की तू दिवसभर किती काम करतेस. या सर्व प्रसंगातून सांगायचा उद्देश एवढाच की घरातील गृहिणी ही दिवसभर किती काम करत असते. सकाळी सर्वजण उठण्याआधी पासून रात्री सर्वजण झोपेपर्यंत ती सतत काम करत असते. दिवसभर ती वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते. ती आई, बायको, सासू, आजी, सून या नात्यांसोबतच कामाच्या विविध भूमिका पार पडत असते. ती घरातील स्वयंपाक, साफसफाई, धुणीभांडी, कपडे इस्त्री, इ. तसेच इतर अनेक कामे प्रत्येकाच्या वेळानुसार करत असते. कधी घरातील नळ दुरुस्त करताना ती प्लंबर बनते, तर कधी वस्तू दुरुस्त करताना मेकॅनिक बनते, कधी एकाद्याला मार्गदर्शन करताना मार्गदर्शक बनते, कधी लहान मुलांची शिक्षक बनते, कधी घरातील आजारी माणसाची काळजी घेताना डॉक्टर, नर्स बनते, कधी घराची सुरक्षारक्षक बनते, तर कधी कुणी चिंतेत असेल तर त्याची कौन्सिलर बनते. या सर्वांबरोबर ती सर्वांची मैत्रीण बनते.


       खरे पाहता चार भिंतीच्या या इमारतीला ती घर बनवते. घराला घरपण देते. जर गृहिणीला तिच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला तर ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल कारण नोकरी, व्यवसाय किंवा शाळा, कॉलेज या निमित्ताने आपण घराबाहेर पडत असतो पण घरची पूर्णपणे जबाबदारी ही गृहिणी पार पडत असते. तिला तिच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेवून घरातील सर्व लोक गृहीत धरत असतात. इतरांना वाटते हिला काय काम असते? आम्ही बाहेर जाऊन खूप काम करतो हिचे आपले घरच्या घरी निवांत! त्यामुळे तिचा बरेचदा अपमान केला जातो, तिला टोमणे मारले जातात. त्यामुळे तिच्या मनाचे खच्चीकरण होते. तीसुद्धा बाहेर तिची ओळख मी घरात असते अशीच करुन देते. तिला आभाराचे दोन शब्दसुद्धा पुरेसे असतात पण आपण नेमके करतो उलट आपण तिलाच रागावतो व म्हणतो तुला काही कळत नाही.


      तरी समाजातील या घरच्या खऱ्याखुऱ्या योद्ध्यांना आपण योग्य तो सन्मान दिला तरच गृहिणींच्या या अनमोल योगदानाचे चीज होईल.


 संदर्भ: झी मराठी या दूरचित्रवाणी वरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० रोजी प्रसारित भाग.


सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

शिक्षकाने घडविले माणुसकीचे दर्शन - विशेष मराठी लेख


शिक्षकाने घडविले माणुसकीचे दर्शन

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




        कोरोनामुळे माणसाचे जीवन बदलून गेले आहे. जीवन किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय येत आहे. प्राप्त परिस्थितीत कोरोनायोद्धे आपले प्राण पणाला लावून लढत आहेत. पोलिस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी, बँक अधिकारी, शिक्षक बांधव जे कार्य करत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. शिक्षक बंधू भगिनी घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांच्या बरोबरीने प्रत्येक कुटूंबाची  माहिती घेत आहेत. आरोग्य सल्ले देत आहेत. प्रत्येक कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांची सेवा करत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तंत्रस्नेही शिक्षक आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. शिक्षिका कुटूंबाची जबाबदारी घेत, विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ तयार करत आहेत. विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधून शिक्षणाची नौका कौशल्याने पैलतीरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.


       परवाच ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षक करत असलेल्या उचित कार्याचा यथोचित गौरव झाला. ७ सप्टेंबर २०२० रोजी दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र या वर्तमानपत्रामध्ये माझ्या एका शिक्षक बांधवाने केलेल्या छोट्याशा पण महत्वपूर्ण कार्याची बातमी वाचली आणि मला याचा खूपच अभिमान वाटला.


   आलास बुबनाळ हायस्कूल, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे कार्यरत असलेले हेरवाड या गावचे रहिवासी श्री. विजय नरसगोंडा पाटील यांनी केलेले कार्य असे की, हेरवाड गावातील स्मशानभूमीत कांही कोरोनाबाधित मयत रूग्णांवर अंत्यसंस्कार केले गेले होते मात्र स्मशानशेडच्या आवारात अनावश्यक असे बरेच साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. या शेडजवळूनच पंचगंगा नदीच्या पाणवठ्यावर जाणारा रस्ता असल्याने तेथून महिला व  नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्या अनावश्यक साहित्यामुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पाटील सरांनी सामाजिक बांधिलकी स्विकारून स्मशानभूमी परिसरातील अनावश्यक साहित्य एकत्र करून ते सर्व जाळून टाकले व स्मशानभूमीचा सर्व परिसर जंतूनाशक व औषध फवारणी केली आणि शिक्षकांमध्ये ठासून भरलेल्या माणुसकीचे दर्शन घडविले.


     अशा संवेदनशील, प्रसंगावधानी शिक्षकाला अगदी मनापासून मानाचा मुजरा. देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांना घडवत असतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वच कोरोनायोद्धा शिक्षकांना खूप खूप धन्यवाद.



बातमी संदर्भ: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र दि. ०७ सप्टेंबर २०२० पृष्ठ क्रमांक २.


शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

मलिका - मराठी कविता


    ६ सप्टेंबर १९८२ रोजी मलिका या कन्यारत्नाने माझ्या पोटी जन्म घेतला. तिला जन्मतःच पाठीवर जखम होती. मणक्याची वाढ पूर्ण झाली नव्हती. तिला बरे करण्यासाठी खूप औषधोपचार केले पण ती बरी झाली नाही. १४ जानेवारी १९८३ रोजी ती देवाघरी निघून गेली तिला मांडीवर घेऊन सुचलेल्या या काव्यपंक्ती......


' मलिका '

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: pixabay.com

असुनी कुशल कलावंत

का पाहिलास माझा अंत


आजवरी पाहुनी परीक्षा

मन झाले नव्हते शांत?


द्यायचे नव्हते तुला सबळ मात्रुत्व

का व्यर्थ घालविलेस कर्तृत्व?


करायचे नव्हते मला सुखी

का सुख आणलेस मुखी?


निष्पाप निरागस माझ्या बाळा

तुझ्यासाठी स्वर्गात जाऊन 

मागितली असती दाद


पण जन्म घेतलास कलियुगात

येथे कोण घेतो कुणाची दाद


हे ईश्वरा।

तुला तरी ऐकू येतो का रे माझा साद?


शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

कोण म्हणतय माणूसकी संपलीय? (महापूरातील माणूसकी)


कोण म्हणतय माणूसकी संपलीय?
(महापूरातील माणूसकी)
 

 लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

         

            ऑगस्ट २०१९ चा अभूतपूर्व महापूर ही सर्वात मोठी जीवघेणी, संसाराची वाताहात करणारी, गोरगरिबांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी नैसर्गिक आपत्ती आली. एरव्ही संथपणे वाहणाऱ्या पंचगंगा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, वारणा व कृष्णा माईंनी रौद्ररूप धारण केले. महापूर आला. घराघरात पाणी शिरलं, भिंती खचल्या, चुली विझल्या, गॅस थंडावले, अनेक संसार उन्मळून पडले. मुकी जनावरे वाहून गेली. ब्रम्हनाळ ता. पलूस येथे प्राण वाचविणारी बोट पाण्यात बुडाली. बोटीतील २२ जणांचा मृत्यू झाला. नातेवाईक धाय मोकलून रडू लागले. आपल्या डोळ्यासमोर बोटीत चढलेला आपला नातेवाईक क्षणात पाण्यातून वाहून गेला. तो जिवंत आहे का मृत झाला हे सुध्दा समजेना. हे दृश्य पाहून सर्वा सर्वांच्या डोळ्यातही महापूर आले व पुराच्या पाण्यातच सामावून गेले. पूरग्रस्त लोकही आपस्वकीयांच्या काळजीने बेजार झाले. जीव तिळतिळ तुटू लागला. डोळ्यात प्राण आणून टी. व्ही. वरील बातम्या पाहू लागले. फोनद्वारे एकमेकांना आधार देवू लागले. या आपत्तीच्या वेळी खऱ्या माणुसकीचे झरे उफाळून आले. मनाला दिलासा मिळाला. दुःखातही अतीव सुखासमाधानाचे दर्शन झाले ते असे....


            एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल, गोरखा बटालियन आर्मी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, युवक संघटनांचे कार्यकर्ते हे सर्वच जवान सुरक्षारक्षक पूरग्रस्त लोकांसाठी देवदूत बनून आले. देशाचं आणि देशातल्या लोकांचे रक्षण करणं हे आमचं कर्तव्यच आहे असे म्हणणाऱ्या या जवानांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. आपली ड्युटी तर सर्वच बजावतात पण या जवानांनी या ड्युटीत आपला जीव ओतला. स्वत:चा जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या असंख्य जीवांना वाचवले. कोण? कुणाचे? कुठल्या जातीपातीचे? कुठल्या गटातटाचे? पण या बहाद्दरांनी स्वत:च्या नातेवाईकापेक्षा जास्त आपुलकीने आणि जिव्हाळ्याने पूरग्रस्तांना आपल्या हातांवर तोलून बाहेर काढले. छोट्या छोट्या गोंडस बालकांना गोंजारत कुरवाळत, त्यांचे अश्रू पुसत बाहेर काढले. म्हाताऱ्या कोताऱ्यांना धीर देत देत सुरक्षित ठिकाणी हलवले. केवळ माणसांनाच वाचवले असं नव्हे तर कुत्र्यासारख्या मुक्या प्राण्यालाही कडेवर घेतले. त्यांचे अंग पुसले, त्याला मायेची उब दिली. संसारात मन गुंतलेल्या घराबाहेर न पडणाऱ्या लोकांचे मनपरिवर्तन करून बाहेर काढले. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना खुबीने अन्नाची पाकीट, पाण्याच्या बाटल्या, दुधाची पाकिटे पोहोचवली. केवढा मोठा पराक्रम आहे यांचा! स्वत:च्या परिवारापासून दूर येऊन, पावसाची संततधार सुरू असताना पाय किरवंजलेले असतानाही प्रचंड मनोधैर्य राखून लोकांचे प्राण वाचविणाऱ्या या जवानांना कोटी कोटी सॅल्युट. या शूरवीर जवानांना राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्राण वाचविलेल्या या बंधू राजांच्या हातात राखी बांधली. त्यावेळी त्यांच्या मुखावरील आनंद समाधान अवर्णनीय होता. अशा वेळी वाटतं कोण म्हणतय माणुसकी संपलीय?

  

             ब्रम्हनाळमधील बोट दुर्घटना व त्यातून बाहेर काढलेली प्रेतं पाहून हृदय गलबलून गेले. डोळ्यात अश्रू दाटले. बोट बुडताना एका मातेने आपल्या तान्हुल्याला उराशी कवटाळले होते. पुरात वाहून जातानाही तिने तान्ह्याला सोडले नव्हते. एवढा मोठा पूर मातेच्या ममतेला तान्हुल्यापासून दूर करू शकला नाही. पत्नीच्या निधनाने हतबल झालेल्या पतीचा अक्रोश हृदय पिळवटून टाकणारा सर्वांनी पाहिला. महापुरातून वाचलेल्या वयस्क पण धाडशी तीन महिलांचे मनोगत, शेजारच्या गावातील लोकांनी आमचा जीव वाचवला हे बघून वाटते. कोण म्हणतय.... 

            

      काही ठिकाणी जनावरांना गच्चीवर नेऊन त्यांचा जीव वाचवला. कोल्हापूर जिल्ह्यातील कुण्या भल्या माणसाने स्वत:च्या शेतातील ऊस तोडून दीडशे जनावरांची भूक भागवली. दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व अशा सर्वच कारखानदारांनी, नेत्यांनी, सामाजिक बांधिलकी जपत हजारो लोकांना आसरा दिला. त्यांच्या जेवणाची व औषध पाण्याची व्यवस्था केली. हे बघून वाटते कोण म्हणतय... 

      

       एरव्ही हा हिंदू, तो मुस्लिम, हा अमक्या जातीचा तो तमक्या जातीचा म्हणणारे हे लोक पूरग्रस्त छावणीत एकमेकांना साथ देत मदतीचा हात देत गुण्यागोविंदाने राहिले. विशेष म्हणजे कुंजवनात अनेक मुस्लिम परिवार राहिले तर ईदगाह कार्यालयात अनेक हिंदू परिवार राहिले. महापुरात अनेक घरांच्या दगड, माती, विटा यांच्या भिंती कोसळल्या पण सर्वधर्म समभावाच्या, सहिष्णुतेच्या, जातीय सलोख्याच्या, बंधुभावाच्या व माणुसकीच्या भिंती भक्कम झाल्या. माणुसकीचे यापेक्षा सुंदर दर्शन नसेल.  

 

   दुष्काळग्रस्त जत, आटपाडी, मंगळवेढा यांच्याकडून मदतीचा ओघ आला. लातूर-सोलापूर कडून अन्न शिजवून देण्यासाठी आचाऱ्यांचं पथक आलं, या आचाऱ्यापैकी मुस्लिम असलेल्या बांधवांनी बकरी ईद असूनही घरांकडे न जाता अन्न शिजवून देण्याचं काम करत राहिले. अनेक मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करून पूरग्रस्तांना मदत केली. हे पाहून वाटतं माणुसकी अजूनही शिल्लक आहे, कोण म्हणतय....


    शैलजा जयंत पाटील या आमदार पत्नीनं आष्ट्यात दाखल झालेल्या कोवळ्या बाळंतिनीस, तिच्या आईस व छकुल्यास स्वत:च्या गाडीतून कारखान्यावर आणून तिच्या राहण्याची सोय केली. तिला गरम पाणी देण्याची सोय केली. एवढेच नव्हे तर छकुल्यासाठी नवा पाळणाही आणून दिला. माणुसकीची ही प्रज्वलीत ज्योत माणुसकी निश्चितच जिवंत ठेवेल, मग कोण म्हणतयं...


      बाप आणि मुलगी यांच अनोखं नातं महापुरातही दिसलं. माझ्या बाबाना पाण्यातून बाहेर काढल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही असे म्हणून भोकाड पसरलेली सात-आठ वर्षाची चिमुरडी आपणा सर्वांनाच दिसली. माणुसकीचा गहिवर प्रकर्षाने जाणवला.


    एरव्ही तावातावानं वस्तुस्थितीचं वर्णन करणारे आपण सर्वांनी बघितलेत पण सांगलीच्या पुराचं वर्णन करताना कंठ दाटून आलेल्या पत्रकार माणुसकीचं अनोखं दर्शन देऊन गेला. अशावेळी वाटलं कोण म्हणतय माणुसकी संपलीय?


      या धकाधकीच्या व गतिमान युगात एकमेकांकडे राहायला जाण्यास सवड नसलेले नातेवाईक आपल्या नातेवाईकांकडे तब्बल ८ ते १० दिवस सहकुटूंब सहपरिवार जाऊन राहिले. नातेवाईकांनीही सेवेची संधी समजून उत्कृष्ठ पाहूणचार केला. इथेही घडले माणुसकीचे दर्शन..!


   मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार स्वयंस्फुर्तीने पूरग्रस्तांच्या मदतीस हजर झाले. जेनेलिया व रितेश देशमुखांनी २५ लाखांची मदत केली. सकाळ वृत्तपत्र समुहाने कोटीची मदत दिली. शरद पवारांनी अर्ध्या तासात एक कोटींची मदत मिळवून दिली. खा. संभाजीराजे यांनी खासदार निधीतून ५ कोटींची मदत केली. मराठी चित्रपटसृष्टीतील सुबोध भावेंनी पुढाकार घेवून अनेक जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. मदतीचा ओघ सुरू राहिल. पूरग्रस्त बांधव बळ एकवटून आलेल्या संकटाचा सामना करतील. चिखलगाळ काढतील. मोडलेला संसार पुन्हा उभारतील. धरणीमाता तृप्तपणे सर्वांच्या शेतातील मातीतून मोती पिकवून देईल. पर्जन्य राजाचा अनावर झालेला क्रोध शांत होईल. नद्या रौद्र रूप सोडून संथपणे वाहतील व नेहमीप्रमाणे आपल्या लेकरांवर मायेचा वर्षाव करतील, यात शंका नाही. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. सुख के सब साथी दुख के न कोई असे न म्हणता 

दुःख के सब साथी । 

हमने देखी इन्सानियत की ज्योती !


बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

टीचर - मराठी कविता

एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच चित्रण करणारी कविता


टीचर

कवयित्री: डॉ. ज्युबेदा  तांबोळी

फोटो साभार: lifestyletodaynews.com


मी लहान होतो तेव्हां

आईचा हात घट्ट धरून,

डोळ्यात दाटलेले अश्रू,

पुसत-पुसत, रडत-रडत,

मी शाळेत पाऊल टाकलं

टीचर, तुम्ही माझा हात 

आईच्या हातातून मायेने

अलगद सोडवून घेतलात

आणि आईच्या मायेने

आम्हाला शिकवलत

दुःख अनावर झालं

तेव्हां वटवृक्षाची छाया

तुम्हीच दिली टीचर!

कसं वागावं, कसं जगावं

तुम्हीच शिकवलत आम्हां

याच शिदोरीवर,

जग जिंकण्याची हिंमत

तुम्हीच दिली टीचर

तुम्ही दिलेला वारसा संस्काराचा

आयुष्यभर जपत राहू

तुमचे व शाळेचे नांव

उज्ज्वल करण्यासाठी

सदैव झटत राहू

कृतज्ञतेची सुगंधी फुले

तुमच्या पायी,

सदैव वहात राहू

..*..*..*..  


मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

शिक्षक गौरव - विशेष मराठी लेख


   शिक्षक गौरव

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल

'करी मनोरंजन जो मुलांचे 

जडेल नाते प्रभुशी तयाचे'


      असे साने गुरुजींनी म्हटले आहे. गुरू नेहमीच मुलांचे मनोरंजन करीत असतो. त्यामुळे त्याचे नाते परमेश्वराशी जडलेले असते. आईच्या प्रेमळ छत्राखालून तो जेंव्हा बाहेर पडतो, तेंव्हा त्या निरागस, कोवळ्या मनाचा गुरू हाच परमेश्वर असतो.


       आपण शिक्षकास आचार्य म्हणतो. ज्याचे आचरण आदर्श असते, तोच आचार्य होय. शिक्षकाला अध्यापक म्हटले जाते. त्यातील 

म्हणजे अध्ययन करणारा,

ध्या म्हणजे अध्यापनाचा ध्यास घेतलेला,

म्हणजे अध्यापनाची पद्धत जाणणारा,

म्हणजे कर्तव्याची जाण ठेवणारा. 


        भारतीय संस्कृतीत शिक्षकांचं स्थान नेहमीच मानाचं मानलं गेलं आहे. भारतीय संस्कृतीचा दीप शिक्षकांमुळेच तेवत राहिला आहे. देशाचे भवितव्य ठरविणारे आजचे विद्यार्थी उद्याचे समर्थ, सक्षम नागरिक बनणार आहेत त्यांचे भविष्य शिक्षकांच्या हातूनच घडते. कोणत्याही व्यवसायापेक्षा शिक्षकांचा व्यवसाय सर्वार्थानं वेगळा आहे. त्या व्यवसायाचं यशापयश अनेक वर्षानंतर ठरते. त्यांच्यासमोर असतात ते बालकांचे निरागस कुतूहलाने रसरसलेले, अवखळ, अल्लड, चैतन्यदायी चेहरे. शिक्षक त्या बालकरूपी इवल्या रोपट्यांचे महावृक्षात रूपांतर करतात.

     

     मनुष्यबळ संपत्ती ही सर्वकाळात सर्वश्रेष्ठ साधनसंपत्ती मानली गेली आहे. म्हणून ही संपत्ती मोठ्या विश्वासानं पालक शिक्षकांच्या हाती देतात. अनेकविध भाव-भावना, बुद्धी-ज्ञान यांचा अखंड वाहणारा हा झरा  स्वतंत्र, निर्मळ, चैतन्यदायी ठेवण्यात शिक्षकांचं कौशल्य पणाला लागतं. हे कौशल्य प्राप्त करून स्वतः विद्यार्थी बनून शिकत-शिकत राहणारे शिक्षक हा राष्ट्राचा  अमोल ठेवाच असतो. शाश्वत मूल्यांवरचा विश्वास, प्रगत ज्ञानावरची निष्ठा वास्तवाला सामोरं जाण्याचं धैर्य, नवनवीन ज्ञान ग्रहण करणारं ताजंतवानं मन ठामपणे विकसित होणारा आत्मविश्वास, विधायक कार्य करण्याची प्रेरणा ही शिक्षकांकडून मिळणारी अमूल्य देणगी आहे. डॉ. राधाकृष्णन म्हणत, 'ज्यावेळी सारे जग ते उद्विग्न होईल, त्यावेळी फक्त दोन व्यक्तींच्या अंत:करणात सदिच्छा शिल्लक राहतील त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे आई व दुसरी म्हणजे शिक्षक.'


              भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारत  सरकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने १९६२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केला गेला.


        शिक्षकांच्या स्वास्थ्यावरच राष्ट्राचे स्वास्थ्य अवलंबून असते. आपल्या देशातील शिक्षक हेच आपल्या भविष्यकाळाचे रक्षणकर्ते आहेत. म्हणून  त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देऊन गुरुजनांसंबंधीच्या आपल्या विविध कर्तव्याची आठवण शिक्षकदिनी यावी  ही अपेक्षा.