शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

आला श्रावण गाजत

                      आला श्रावण गाजत




आला श्रावण गाजत

सृष्टी डोलाया लागली

नव्या स्वप्नांची चाहूल

       भूमी मातेला लागली ।।१।।


होती मृतिका आतूर

पान फुलांची भुकेली

झेप घेऊनी बियांनी

        पिके डोलाया लागली।।२।।


ऋतूराजा हा लहरी

लपंडाव तो दाखवी

छाया इंद्रधनुष्याची 

       रंग मनास मोहवी ।।३।।


श्रावणाची ही किमया

हर्ष माईना मनात

बळीराजा सुखावला

       कष्ट करूनी रानात।।४।।


सरीवर सरी येती

नदी दुथडी भरली

हर्षे चिमणी पाखरे

         घरट्यात विसावली ।।५।।


रान होताच हिरवे

धनी हरखे मनात

पत्नी पाहते स्वप्नात

          तोडे घालीन हातात ।।६।।


मनोहरी श्रावणात

सुख भोगते सासरी

आठवणी बरसता

         मन ओढते माहेरी ।।७।।


 

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

हे वरदविनायका

                          हे वरदविनायका

 


  

     हे वरदविनायका

    तू सत्वर धावत ये

    अंधार फार झालाय

     त्यांना प्रकाश देण्या ये।


जनता वाईटाकडून

वाईटाकडे जातेय

विज्ञानाचा या अघोरी

उपयोग करतेय ।


बाँबस्फोट, भ्रष्टाचार

सर्वत्र बोकाळलाय

मारामाऱ्या, खून,चोऱ्या

धुमाकूळ चाललाय ।


मानवालाच तू मन

अन् विवेक दिलास

मानवाच्या मनातील

माया,ममता खलास ।


आईबाप वृद्धाश्रमी

बाळे पाळणाघरात

राहताहेत दुःखाने

अश्रू गिळून मनात ।


विद्यामंदिरातही या

गलिच्छ प्रकार घडे

साऱ्या नात्यांचे आदर्श

बेशुद्ध होऊन पडे ।


मोबाईल विळख्यात

गुरफटलीय जनता

आपुलकी व जिव्हाळा

नाही राहिली ममता ।


म्हणून ....

हे वरदविनायका

तू सत्वर धावत ये।

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

पावसाची सर

पावसाची सर



फोटो साभार:गुगल


आली सर पावसाची

बळीराजा सुखावला

ओल पाहुनी मृदेची 

   बीजबाळ सुखावला ।।


कोंब कोवळा अंकुरे

सारुनिया माती दूर

रंग पोपटी लेवून

   त्यांचा आगळाच नूर ।।


सारे शिवार रंगले

वारा येई सोबतीला

बहराचे हितगूज

   कानोकानी सांगायाला ।।


नदी दुथडी भरली 

सारी सृष्टी आनंदली

स्वप्नचाहूल सोनेरी

    झाडावेलींना लागली ।।


इंद्रधनूची कमान

दामिणीचे चकाकणे

डोळे भरुन पहावे

     सृष्टीसौंदर्याचे लेणे ।।


         

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

आमची विहीर

आमची विहीर 


                    

    

       १४ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत हाजी मन्सूर रमजान तांबोळी व परिवार यांच्या कोथळी येथील शेतात विहीर खुदाई संपन्न झाली. या कालावधीत अनेक भल्याबुऱ्या अनुभवांचे झरे लागले. या अनुभवांना शब्दबध्द  केलं आहे आमची कन्या सौ.यास्मीन नौशाद शिकलगार हिने. यास्मीन  बी.ई.   (इलेक्ट्रॉनिक्स ) आहे. कराडमध्ये राहते. विशेष म्हणजे १४ एप्रिल हा यास्मीन चा वाढदिवस आहे.


        त्या दिवशी विहीर खुदाईचा आरंभ झाला. व २५ एप्रिल रोजी विहीरीला पाणी लागले. त्या दिवशी आमची कराडची नात सोहा हिचा वाढदिवस आहे. या लेखाचे एडिटिंग माझी सून सौ. हिना हिने केले आहे. चिरंजीव मोहसीन व सौ. अरमान यांनी तिला सहकार्य केले आहे.

  

        


       माझे आई-वडील शेतकरी कुटुंबातून लहानाचे मोठे झाले त्यामुळे माझ्या वडिलांना शेतीची फार आवड. 31 मे 2010 रोजी माझे वडील दुय्यम निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची शेतीची आवड जोपासण्यासाठी त्यांनी जयसिंगपूर या आमच्या गावापासून जवळ कोथळी येथे सव्वा एकर शेत खरेदी केले. आणि या शेतात ते आवडीने काम व देखरेख करतात शेतीला पाणी शेजारच्या शेतकऱ्याकडून चालू होते पण ऐन उन्हाळ्यात शेताला पाणी मिळत नव्हते व त्यामुळे पिकांचे नुकसान होत होते म्हणून आमच्या कुटुंबाने शेतात विहीर काढण्याचा निर्णय घेतला.  

      

        पाणाड्याला बोलवून शेतातील विहीर काढण्याची जागा निश्चित करण्यात आली. 14 एप्रिल 2025 रोजी सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. त्यानंतर विहीर खुदाई साठी एक मोठे पोकलेन शेतात आणण्यात आले. आणि 19 एप्रिल पासून विहीर खुदाई चे काम चालू झाले. माझ्या वडिलांची व भावाची धावपळ सुरू झाली. वडील सकाळी नऊ वाजता डबा घेऊन शेतात जाऊ लागले. आणि दिवसभर विहीर खुदाईचे काम पाहून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येऊ लागले. आठ ते दहा फूट खोदल्यानंतर मोठा खडक लागला, मग त्यानंतर सुरुंग लावून खडक फोडण्याचे काम सुरू झाले. आणि 25 एप्रिल ला दुपारीच घरी आनंदाची बातमी कळली. पाणी लागलं घरातील सर्वांना फार आनंद झाला. काम करू देत नव्हतं एवढं पाणी लागलं होतं. मग पाण्याची मोटर खरेदी केली आणि मोटर लावून पाणी शेजारील शेतात सोडले इकडे वीर खोदायचे काम चालू होते. हे काम  उमेश पाटील यांना दिले होते. वीहीर खुदाई, सुरूंग लावायचं काम जोमात चालू होतं. माझ्या वडिलांची व भावाची धावपळ होत होती. भाऊ नोकरीत असल्याने तो पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. पण वडिलांची एकट्याची धडपड सुरू होती आमची शेती पाहणारे सुकुमार चिंचणे व त्यांचा मुलगा चेतन यांची मोलाची साथ मिळाली. 

       

        25 ते 30 फूट विहीर खोदून झाल्यानंतर आणखी सात ते आठ फूट विहीर खोदायचा निर्णय घेतला. त्यानंतर भरपूर अडथळे येऊ लागले एक दोन वेळा खुदाई करताना पोकलेनचे दात तुटले, पोकलेन कामगार व सुरूंग लावणारे कामगार हेही काम हळूहळू करत होते.

         

        घर पहावे बांधून, लग्न पहावे करून, आणि विहीर पहावी खोदून अशी आशयाची म्हण आहे पण अशी म्हण का बरं आली असावी याचा प्रत्यक्ष अनुभव आला. कदाचित या तिन्ही गोष्टी करताना होणारी धावपळ, होणारा त्रास, लागणारा वेळ, घ्यावे लागणारे कष्ट, इत्यादी आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं अनिश्चित स्वरूपाचे बजेट आणि काम पूर्ण होईपर्यंत होणारा प्रचंड मानसिक त्रास होतो तो वेगळाच. 

       

        साधारण 18 मे पर्यंत विहीर खुदाईचा अंतिम टप्पा पार पडला त्यानंतर दोन-तीन दिवस पाईपलाईन व इतर कामे पार पडली. विहिरीच्या चारी बाजूंनी जाई करण्यात आली.

     

       25 मे ला सर्व नातेवाईकांना विहीर पाहण्यासाठी व स्नेहभोजनासाठी शेतात बोलवायचे ठरले सर्व तयारी करण्यात आली. परंतु 20 मे पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस विश्रांती घेत नव्हता. हिरवी पाने हिरवी राने, हिरवी शेती, हिरवी मने,... पण हे वरूण राजा थोडी उसंत घे आणि आमच्या शेतातील स्नेहभोजनाचा  कार्यक्रम पार पडू दे. अशी सर्वांची मनोकामना झाली. त्यानंतर कार्यक्रम पुढील आठवड्यात घेण्याचे ठरले.

       

       माती सुपीक आणि बियाणं सकस असेल तर उगवलेले रोप सशक्त होतंच. सुपीक माती म्हणजे आमचे शेत आणि सकस बियाणे म्हणजे माझ्या आई-वडीलांचे  विचार आणि सशक्त रोप म्हणजे  शेतातील पिक. ते रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यातून आलेले शेती विषयाचे भान माझे आई-वडील त्यांच्या माझ्या आणि पुढच्या पिढीला देऊ पाहतायत.

     

         25 मे ला पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर माझा भाऊ व बहिण शेताकडे गेले. तेव्हा आमची विहीर तुडुंब भरली होती ते पाहून खूप समाधान झाले. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम 31 मे 2025 रोजी पार पडला.        


प्राऊड ऑफ यू माय फॅमिली फॉर कम्प्लिटिंग फार्म ऑफ हॅपिनेस 

     माझ्या माहेरी हत्ती ऐश्वर्याचा झुले ,

     आई-वडिलांची शेती प्रेमाणे फुले 


      विहीर आमच्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नाही, तर हृदयातील एक भावना आहे. शेतीच्या प्रवासातील आमची साथीदार आमची विहीर भविष्याची नांदि व्हावी ही सदिच्छा!