गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख


वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


                वार्धक्य आल्यानंतर म्हटले जाते संध्याछाया, भिवविती हृदया. पण मी म्हणते 'संध्याछाया खुणविती हृदया' असे का ? प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तिने खाली दिलेले सप्तसूर आळवले की तुम्ही सर्वजण माझ्याशी सहमत व्हाल. हे सप्तसूर असे....


१) सावधानता:

निवृत्तीनंतर आहार, विहार आणि विश्रांती या तीन बाबीत सावधानता बाळगायला हवी. वेळेवर जेवणे, व्यायाम करणे, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. एवढे करुनही आजारी पडलोच तर वेळेवर औषधे घेणे व पथ्ये पाळणे आवश्यक.


२) रेखीवपणा:

जेष्ठ झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे मोठमोठी कामे तुमच्या हातून होणार नाहीत. पण छोटी छोटी कामे रेखीवपणे करा. भाजी आणायला सांगितली तर एकदम ताजी टवटवीत आणा. भाजी पाहून पत्नी किंवा पती, सूनबाई एकदम खूश झाली पाहिजे. घराचे अंगण इतके स्वच्छ ठेवा. सर्वांनी म्हणावे वा ! सुंदर आहे तुमचे अंगण ! कपडे निटनेटके, साहित्य व्यवस्थित ठेवा.


३) गर्व नको:

विसरुन जा आपण फार मोठ्या पदावर होतो व फार उत्कृष्ट काम आपण केले आहे. आता आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत. सर्वांशी प्रेमाने वागा. मला इतरांनी मान द्यावा असे वाटत असेल तर दुसऱ्याला मान द्या. आणि हे लक्षात ठेवा 'मुंगी होऊन साखर खाता येते गर्व सोडून द्या. कारण 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती,' 


४) मनोरंजन करा:

समस्येत गुंतलेले आपले मन मनोरंजनात गुंतवा. आनंदी रहा. घरातील इतर सदस्यांचा विचार करुनच टी. व्ही. पहा. कारण तरुणांना पिक्चर व लहानांना कार्टून पहायचा असतो. आपलाच हट्ट नको. बातम्या व क्रिकेट पहाण्याचा. त्यासाठी मोबाईल किंवा रेडिओ वापरा पण आवाज मोठा न करता स्वत:ला ऐकू येईल इतकाच ठेवा. 


५) परमार्थ करा:

आयुष्यभर आपण खूप काम केलं. या वळणावर स्वार्थ थोडासा बाजूला ठेवून परमार्थ करा. ईश्वरभक्ती जमेल, रुचेल तशी करा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा दानधर्म करा पण आपलं दान सत्पात्री होतंय का याकडे लक्ष द्या. आपल्या देण्यामुळे आपण कुणाला आळशी बनवत नाही ना? हेही पहायला हवे.


६) धन जोडा:

आपण आयुष्यभर कमावलेलं धन योग्य ठिकाणी गुंतवून ठेवा. फसवणूक होणार नाही ना? हे जरुर पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना जेवणाचं ताट अवश्य द्या. पण बसायचा पाट मात्र देवू नका. 


७) निर्मोही रहा:

जन्माला आलेल्या प्रत्येकाला एकन् एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे. जन्माला येताना कुणी कांहीही घेवून आला नाही. जातानाही काय घेऊन जायचे नाही. तेंव्हा जे ईश्वराने दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगा. मोह सोडल्यास सुख भरपूर मिळेल.


८) सामंजस्य ठेवा:

नव्या पिढीशी जुळवून घ्या. चालवू नका आपलाच हेका. कारण तुमचा हेका तुमच्यासाठी धोका ठरु शकतो. आमच्यावेळी असं नव्हतं असं वारंवार म्हणू नका. एखादे वेळी जरुर सांगा पण त्यांच्या नव्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. त्यांच्या प्रगतीला साथ द्या. नवी पिढी तुम्हाला हात देईल. व तुमचा उरलेला प्रवास सुखकारक, आनंददायी ठरेल.


             ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनो समजले ना तुम्हाला वार्धक्याचे सप्तसूर ? हे सूर आळवा. आयुष्याची संध्याकाळ सोनेरी किरणांनी शोभिवंत बनेल. होय 

कायमपणे लक्षात ठेवण्यासाठी खाली चार्ट देत आहे.

  • सा- सावधानता ठेवा.
  • रे- रेखीवपणा असू द्या
  • ग-गर्व नको
  • म- मनोरंजन करा
  • प- परमार्थ करा
  • ध- धन जोडा
  • नि- निर्मोही रहा
  • सा- सामंजस्य ठेवा












गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

लघुकथा संच क्र. ९

            मराठी लघुकथा संच क्र. ९

लघुकथा क्रं ४१    

झाशीची राणी बघ 

                एक इतिहासाचे तज्ज्ञ शिक्षक असतात. ते आपल्या वर्गात १८५७ चे युद्ध हा धडा शिकवून आलेले असतात. त्यांच्या शहरातील झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याचा संदर्भ देत या राणीने युद्धात दामोदर या दत्तकपुत्राला पाठीशी बांधून लढल्याचे रसभरीत वर्णन प्रभावीपणे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर केले होते. विद्यार्थीही या पाठात तल्लीन झाले होते. त्यामुळे  ते खूश होते. घरी आल्यावर ते पेपर वाचत बसले. नोकरीवरून दमून आलेली त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. एवढ्यात त्यांचे छोटे बाळ झोपेतून उठले व रडू लागले. बायको म्हणाली," जरा बाळाला घ्या ना " शिक्षक म्हणतात," अगं, राणी लक्ष्मीबाईनी मुलाला पाठीशी बांधून युद्ध केले .तू फक्त स्वयंपाक सुद्धा त्याला पाठीवर घेऊन करू शकत नाहीस ?काय हे!"

लघुकथा क्रं ४२   

खऱ्याचं खोटं, लबाडाचं मोठं

                 अलकाची आई कन्या शाळेत शालेय पोषण आहाराचे तांदूळ न्यायला आली. देसाई मँडम् म्हणाल्या," अलका पंधरा दिवस गैरहजर होती त्यामुळे तिला या महिन्याचे तांदूळ मिळणार नाहीत." त्यानंतर आई कुमार शाळेत शिकणाऱ्या अमोलकडे गेली. कुंभार सरांनी अमोलचे तांदूळ दिले. आई सरांना म्हणाली," तुम्ही तांदूळ दिलासा पण देसाई मँडम् अलकाचे तांदूळ देता येत नाही म्हणाल्या्!" कुंभार सर म्हणाले," अमोल गैरहजर असतानाही मी हजेरी मांडली म्हणून तांदूळ मिळाले तुम्हाला"सरांचे आभार मानून आई मँडम्कडे गेल्या व म्हणाल्या," तुम्ही अलकाची हजेरी का नाही मांडली ? जरा शिका त्या अमोलच्या सरांकडून गरिबांना मदत करायला. ते सर किती चांगले आहेत बिचारे! तुम्ही जरा खऱ्यानं वागायला शिका मँडम्  !" मँडम् मनात म्हणाल्या ' खऱ्याचं खोटं, लबाडाचं मोठं '

लघुकथा क्रं ४३

चष्मा धुतला स्वच्छ

                    रमाकाकूचं वय झालं होतं.त्यांना  फारसं बाहेर जाणं होत नव्हतं. त्यामुळे बेडवर बसल्या बसल्या खिडकीतून दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांचं निरिक्षण चालू असायचं. शेजारी एक नवीन कुटुंब रहायला आलं.त्यामुळे रमाकाकूना निरिक्षण करायला एक नवा विषय मिळाला.त्या कुटूंबातील स्त्री रमाकाकूंच्या खिडकीच्या समोर दररोज कपडे धुवून वाळत घालायच्या.रमाकाकू मनात म्हणायच्या या अजिबात कपडे स्वच्छ धुत नाहीत सारे धुतलेले कपडे मळकटच वाटतात. एके दिवशी रमाकाकू आपल्या पतीना गोपाळरावांना म्हणाल्या," इतके दिवस मी बघते त्यांचे कपडे अस्वच्छच असतात. आज मात्र त्यांनी कपडे स्वच्छ धुतलेले दिसतात." गोपाळराव हसत म्हणाले," त्या दररोजच कपडे स्वच्छ धुतात. तुला मात्र आज स्वच्छ दिसताहेत कारण तू झोपल्यावर मी तुझा चष्मा स्वच्छ धुवून पुसला आहे." रमाकाकू लाजत म्हणाल्या," अस्सं होय "

लघुकथा क्रं ४४

विमानाने सर्वेक्षण

                    कोरोना लाँकडाऊनच्या काळात कुटुंबाच्या आरोग्य सर्वेक्षणाची जबाबदारी प्राथमिक शाळेतील  शिक्षकांना दिली होती. प्रत्येक कुटुंबात जाऊन साठ वर्षावरील व्यक्ती किती आहेत. त्यापैकी कुणाला बी.पी. शुगरचा त्रास आहे याची नोंद करायची होती. नोंदीनंतर दररोज त्यांच्या घरी जाऊन कुणाला कांही त्रास आहे का हे विचारुन तसा रिपोर्ट ग्रामसेवकांच्याकडे द्यायचा होता. मोबाईलवरून पहिल्या आठवड्यात काम चोखपणे बजावल्यानंतर व कुणाला विशेष त्रास नसल्याने कामात थोडी शिथिलता आली होती .त्यात पावसाने जोर धरला होता. नद्यांना पूर आला होता. रस्ते बंद झाले होते. जवळच्या शहरात राहणाऱ्या एका मँडमनी ग्रामसेवकांना रिपोर्ट पाठवला.बी.पी.-०, शुगर-० . ग्रामसेवकांनी मँडमना मेसेज पाठवला.' मँडम् पुलावर पाणी आलय.रस्ते बंद आहेत सर्वेक्षण विमानांनी केलं का?बाकीच्या मँडम् सावध झाल्या व मनात म्हणाल्या,'  बरं झालं मी रिपोर्ट नाही पाठवला.'

लघुकथा क्रं ४५

साडीऐवजी घर

                     सुषमाने नवीन साडी घेण्यासाठी पती सुरेशकडे हट्ट केला.सुरेश म्हणाले," किती ढीगभर साड्या आहेत त्यातील एखादी नेस ना,काँलनीतला नवरात्र उत्सव तर आहे.' सुषमा म्हणाली," तशा भरपूर साड्या आहेत हो माझ्याकडे, पण त्या सर्व काँलनीतल्या सर्वाऔनी पाहिलेल्या आहेत.नवीनच आणा ना एखादी !" ठीक आहे म्हणत सुरेश आँफिसला गेले. सुषमा संध्याकाळी सुरेश यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली, हे नक्की आणणार नवीन साडी म्हणून! संध्याकाळी ते रिकाम्या हाती परतले. सुषमाने विचारले," का नाही आणली साडी? " सुरेश शांतपणे म्हणाले," साडी आणण्याऐवजी दुसऱ्या काँलनीत घर बघून आलोय. एक तारखेला तिकडे शिप्ट होवू या.त्या काँलनीतल्या कुणीच तुझ्या साड्या पाहिलेल्या नाहीत. पुढील एक दोन वर्षे तरी माझा साडी खरेदीचा त्रास वाचेल! होय ना सुषमा!"

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख


उत्कृष्ट प्राध्यापक, मुत्सद्दी प्रशासक, आदर्श तत्त्वज्ञ, विद्वान, बुद्धिवंतांचा मुकूटमणी आणि सामान्य प्राध्यापकापासून भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारे गुरुंचे गुरू डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर, भारत सरकारतर्फे 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख....


गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

अल्प परिचय:

       आंध्रप्रदेश जिल्हा चित्तूरमधील तिरूपती बालाजी या तीर्थक्षेत्राजवळच तिरुत्ताणी गांवात ५ सप्टेंबर १८८८ साली त्यांचा जन्म एका पंडितांच्या घरी झाला. त्यांची परिस्थिती बेताची होती पण ते विद्वान होते. घरात सुसंस्काराचे, ईश्वरभक्तीचे वातावरण होते. त्यांना चार भाऊ व एक बहीण होती. लहानपणीच ते पूजापाठ, मंत्रघोष याचे अनुकरण करायचे. सदाचार व सुविचार यांचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरूपतीतील शाळेत झाले. लहानपणीच ते वाचन, मनन, लेखन यात मग्न असायचे. तीव्र बुद्धिमत्ता, चांगली स्मरणशक्ती व संवेदनशील मन यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तरोत्तर संपन्न होत गेले. माध्यमिक शिक्षणासाठी ते लूथरन या मिशनरी शाळेत गेले. त्या शाळेतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार अधिक केला जायचा. या वातावरणामुळे त्यांच्या मनात आध्यात्मिक जीवनाविषयी ओढ वाटू लागली. हिंदू धर्माविषयी, परंपरेविषयी, तत्वज्ञानाविषयी त्यांनी जे ऐकले त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला हादरे बसले आणि हिंदू धर्म, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा चिकित्सक अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटले. हिंदू धर्मातील कांही रुढी, परंपरा, जातीयता, भेदभाव, अंधश्रद्धा मानवतेसाठी दूर झाल्या पाहिजेत हे त्यांना पटले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षेसाठी इतिहास व गणित विषयाची गोडी असूनही त्यांनी तत्वज्ञान विषय निवडला. त्यांचा पिंडच तत्वज्ञानाचा होता. बी. ए. च्या परीक्षेत ते प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम्. ए. ला त्यांनी प्रबंधासाठी "वेदांतातील नीतिशास्त्र" हा विषय निवडला व सखोल अभ्यास करून त्यांनी तो प्रबंध सादर केला. त्या प्रबंधास प्रथम श्रेणी मिळाली.


ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे:

       १९०९ मध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सी काॅलेजमध्ये प्राध्यापक झाले. तेंव्हापासून चाळीस वर्षे त्यांनी प्राध्यापक, कुलगुरु आदि पदावर कामगिरी बजावली. ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. ते विद्यार्थ्यांना अंधारातून उजेडाकडे नेणारे दीपस्तंभ बनले. त्यांची राहणी साधी पण नीटनेटकी असे. त्यांची वाणी मधुर होती. इंग्रजी व संस्कृत बोलण्याची त्यांची शैली आकर्षक होती. त्यांची अध्यापनाची हातोटी वेगळी होती. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले नसते तरच नवल! त्यांची ख्याती ऐकून म्हैसूर येथील नवीन विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.


अग्रणी भारतीय विचारवंत:

       आर्यांच्या सनातन धर्मापासून ते शंकराचार्यांच्या हिंदू धर्मापर्यंत त्यांनी चिंतन, मनन केले. वेद, वेदांग, उपनिषदे गीता यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. हिंदू धर्माचे सर्वसमावेशक स्वरूप बहुजन सुखाय बहुजन हिताय ही शिकवण रूजविण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांचे सुंदर शैलीतील ग्रंथ, रसाळ व्याख्याने आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधील प्रभावी सहभाग यामुळे एक अग्रणी भारतीय विचारवंत म्हणून जगात त्यांची कीर्ती पसरली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक यांनी त्यांचा गौरव केला. त्यांच्या अथांग विद्वत्तेपुढे पाश्चिमात्य विद्वान धर्मपंडीतही नतमस्तक झाले होते. त्यांनी राधाकृष्णन यांना अर्वाचीन महर्षि ही पदवी दिली. डॉ. राधाकृष्णन यांचा 'रेन ऑफ रिलीजन इन् काॅन्टेम्पररी फिलाॅसाफी' या ग्रंथातून भारतीय वेदांताची आध्यात्मवादी तत्कालीन परिभाषेतील मांडणी जगासमोर आली. म्हैसूर मध्ये कार्यरत असताना कोलकत्ता विद्यापीठाकडून की जे ज्ञानोपासनेचे एक सर्वश्रेष्ठ केंद्र होते त्यांच्याकडून आमंत्रण आले, त्यांनी ते स्विकारले. ते घोड्याच्या बग्गीतून रेल्वे स्टेशनकडे निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी व्यथित अंतःकरणाने जमलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बग्गीचे घोडे सोडले आणि बग्गी स्टेशनपर्यंत ओढत नेली. ते प्रेम, तो आदर पाहून राधाकृष्णन भारावून गेले.


ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी:

       जून १९२६ मध्ये इंग्लंडमध्ये विद्यापीठ परिषदेसाठी कोलकता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. १९२६ मध्येच अमेरिकेतील हाॅवर्ड विद्यापीठात सहावी आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषद झाली. त्या परिषदेत त्यांनी 'माया सिद्धांतः काही समस्या आणि तत्वज्ञानाचे संस्कृतीमधील कार्य' या विषयावर व्याख्यान देऊन श्रोत्यांवर विलक्षण पकड घेतली. भौतिक प्रगतीला जर आध्यात्मिकतेची जोड दिली नाही तर मानवाला खरी सुखशांती लाभणार नाही हे शाश्वत तत्व त्यांनी बिंबवले. श्रोत्यांच्या मनात भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आस्था व आदर निर्माण झाला. १९२३ मध्ये त्यांचा इंडियन फिलाॅसाफी खंड पहिला व १९२७ मध्ये खंड दुसरा प्रसिद्ध झाला.


       राधाकृष्णन यांना अनेक मानसन्मान मिळाले. आंध्र विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ यांनी त्यांना 'डॉक्टरेट' ही पदवी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को संघटनेने त्यांना कार्यकारी सदस्य केले. कांही काळ ते युनेस्कोचे अध्यक्ष झाले. पंडीत मालवीय यांच्या निधनानंतर १९४८ साली ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती झाले. त्याच वर्षी भारत सरकारच्या युनव्हर्सिटी कमिशनचे ते अध्यक्ष झाले. १९४९ ते ५२ या कालावधीत ते भारताचे रशियात राजदूत होते. त्यावेळी रशियाचा सर्वाधिकारी असलेल्या स्टॅलिनसारख्या कडक पोलादी पुरुषावरदेखील डॉ. राधाकृष्णन यांचा प्रभाव पडला. तो म्हणाला, "चोवीस तास ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी महापुरूष या जगात जर कोणी असेल तर तो फक्त डाॅक्टर राधाकृष्णन!"


प्राध्यापक ते राष्ट्रपती:

       डॉ. राधाकृष्णन यांची सन १९५२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. या पदावर असताना त्यांनी रशिया, अमेरिका, जर्मनी, पोलंड, बल्जेरिया, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, आफ्रिका आदि देशाचे दौरे केले. देशादेशातील संघर्ष मिटावेत, वर्णभेद दूर व्हावेत, आर्थिक शोषण थांबवावे आणि आखिल मानव जातीचे कल्याण व्हावे या भारताच्या भूमिकेचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. १९५८ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब प्रदान करण्यात आला. १२ में १९६२ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. राधाकृष्णन यांची निवड झाली. १९६७ साली ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले.


राधाकृष्णन यांचे महान कार्य:

       डॉ. राधाकृष्णन शांततेचे पुरस्कर्ते होते. आपल्या भाषणातून व लेखनातून त्यांनी सतत शांततेचा पुरस्कार केला. जगाला शांततेची गरज आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी जवळजवळ पस्तीस पुस्तके लिहिली. त्यात वेद, उपनिषदे, भारतीय तत्त्वज्ञान, रामायण, टागोरांचे तत्वज्ञान, महाभारत, भारत आणि चीन, गौतम बुद्ध, पूर्व आणि पश्चिम, महात्मा गांधी, हिंदू धर्म आदि पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन ऋषीतुल्य होते. निगर्वीपणा, साधेपणा हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण होता. ते आदर्श शिक्षक होते. सर्व शिक्षकांबद्दल त्यांना आदर वाटायचा. शिक्षकाला समाजात मानाचे स्थान असले पाहिजे असे ते म्हणायचे. शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वाढविले पाहिजे, आपल्या पवित्र आचरणाने समाजापुढे, विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे, निर्भय बनून समाजाला सुयोग्य मार्गदर्शन केले पाहिजे, विद्यार्थ्यांवर संस्कार घडविले पाहिजेत, सुसंस्कारित, सुखी, समृद्ध जीवन हेच शिक्षणाचं खरं ध्येय आहे, असे शिक्षण देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा समाजाने सत्कार केला पाहिजे, शिक्षकाला गुरू ही संज्ञा आहे, गुरू ला देव मानण्याची भारताची थोर परंपरा आहे असे ते म्हणत. पाश्चिमात्य राष्ट्रानी जगाला विज्ञान दिले तर डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला तत्त्वज्ञान दिले. बालवयातील तेजस्वी बुद्धी पाहून त्यांचे वडील म्हणाले, "उच्च शिक्षणाकरिता तुला मी परदेशात पाठवेन" तेंव्हा त्यांनी हजरजबाबी प्रत्युत्तर दिले, "बाबा, शिकण्याकरिता नाही तर मी शिकविण्याकरिता परदेशी जाईन" हे बोल त्यांनी खरे करून दाखविले. परदेशात तत्त्वज्ञानासारख्या कठीण विषयाचे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे मोठेपण जगात सिद्ध केले.


       अशा या थोर ऋषीतुल्य थोर शिक्षकाची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतभर आपण पाच सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपण देखील डॉ. राधाकृष्णन यांचा आदर्श समोर ठेवून नेहमी विद्यार्जनासाठी निष्ठेने कष्ट करून, आपल्या गुरूजनांविषयी आदराची भावना ठेवून ज्ञान दीप हातात घेऊन अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करु या.


डॉ. राधाकृष्णन यांचे १९७५ रोजी दुःखद निधन झाले.

अशा या महान तत्वज्ञानी थोर विभूतीस कोटी कोटी प्रणाम !


बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

श्रावणधारा - विशेष लेख


 
सद्या श्रावण महिना सुरु आहे त्यानिमित्त श्रावणातील साजऱ्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करणारा हा सुंदर लेख.....


श्रावणधारा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गुगल


हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजीरा श्रावण आला
सृष्टीत सुखाची करून पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला।

       दूरच्या आभाळातून थेंब थेंब पडणारा हा पाऊस आणि सोनेरी ऊन यांचा लपंडाव, जमिनीवर बागडणाऱ्या जीवांच्या निरागस मुग्धतेला श्रावणा शिवाय दुसरं नावच सुचत नाही. श्रावण सृष्टीच्या जीवांची प्रीति, मांगल्य, दिव्यत्वाची ओढ, सौंदर्याचा ध्यास, पूर्णत्वाचे स्वप्न, हळूवारपणा, कोमलता अशी सारी मानवी मूल्यं जपतो. या सर्वामध्ये तो आपलेच देखणे रूपडे न्याहळत राहतो. मंद झुळकीसरशी एक तरल गारवा देऊन हळूच सोनेरी हसून जातो. त्या हास्याने लुब्ध होऊन सृष्टीही या रंगसंगतीत आकंठ नहात जाते व एका अखंड, अदम्य, स्वच्छंद, मूर्तीमंत आनंदात श्रावण बरसत राहतो.

       अक्षय तारूण्य तेचं खुललेलं रूप घेऊन आलेला श्रावण जणू अनुरागाचं, उत्कटतेचं, हर्षोन्मादाचं प्रतीक. अतीव बहराची सारी आलम सृष्टी तेजानं टवटवीत होऊन निजल्या मनांच्या तारा हळुवारपणे छेडत जाते. ही सारी राजस सृष्टी एक निसर्ग गाणचं होऊन जाते. यावळी वाटतं की सारी पृथ्वी दाही दिशातल्या आनंदाला डोक्यावर घेऊन नाचते आहे. या निसर्ग गाण्यातच अचानक हिरव्या लुसलुशीत मऊशार गवताचा शुद्ध कोवळेपणा घेऊन साकार झालेली बालकविता न आठवली तर नवलच.

"श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे।"

       अशा या नितांत रमणीय वातावरणात कविमनाचे पक्षी तर दूरदूरच्या निळाईत आपले शब्द शोधत राहतात आणि अनेक रंगाची उधळण करीत इंद्रधनू त्यांना प्रतिसाद देतो. रानोमाळी तर हा निसर्ग आपला कोवळा अविष्कार दाखवत खुणावतो क्षणाक्षणाला या बहरलेल्या रानवाऱ्याला, या अफाट डोंगर पहाडांना, अंकुरलेल्या भावनांना आणि मुक्त मनमंजिराना.

       असा हा सरसरता श्रावणी पाऊस एक हिरवंगार स्वप्न देऊन जातो. कुठेतरी दूर खळाळता, निळासावळा निर्झर हसत खेळत, वाट काढीत चंदेरी ओळ रेखाटत जातो. तर दूर गर्द पानांपानातून इवल्या पक्ष्यांच्या किलबिलाटानी सारं वातावरण भारलं जातं. कधी सरींच्या शिरण्यामुळं पानापानातला हिरवेपणा उठून दिसतो अन् उन्हात तो आणखी खुलून दिसतो. या साऱ्या सौंदर्याने दिपून जाऊन एखाद्या निर्जीव मनाला संजीवनी मिळते व या साक्षात्काराच्या सौंदर्यग्रहणाचा अनुभव पुनःपुन्हा घ्यावा असं कुतूहल वाटतं व मनाचा एखादा कोपरा सुखावतो.

       असा क्षणोक्षणी पालवणारा हिरवाकंच श्रावणी पाऊस कधी इकडे तिकडे उधळतो तर कधी रोमरोमी सुखसंवेदनांचे तरंग उठवतो. मग एका विलक्षण झंकाराचे नाद कानात गुंंजत राहतात आणि स्वरगंध ल्यालेले सौरभघडे दाही दिशांना सांडले जाऊन तो परिमल आकाशालाच भिडू पहातो. जणू अशा या विस्तीर्ण पोकळीतला गंध जेंव्हा सापडतो तेंव्हा या घननिळ्या आसमंताची ओढ कांही औरच असते. घरट्याच्या ओढीने निघालेला दूरचा अनाम पक्षी जणू गगनाला कवेत घेतल्यासारखा भराऱ्या मारता मारता क्षितीजापल्याड जाऊ पहातो.

श्रावणाच्या सोनेरी सांजवेळी बालकवींचे संध्याचित्र आठवावे.

" सांज खुले सोन्याहुनी
पिवळे हे पडले ऊन।
चोहीकडे लसलसीत
बहरल्या हिरवळी छान।"

       पर्वतमाथे सूर्यकिरणांच्या सप्तरंगी कडांचे रंगमहाल बनतात तर सृष्टीजीवांच्या अमर्त्य सूरांनी, गंधानी वेडी होऊन सारी सृष्टी तालमय होते. हा सृष्टीसमारंभ पाहण्यासाठी तसंच श्रावणी मन हवं, मनी भाव हवा म्हणून तर समईच्या शुभ्र ज्योती लीली फक्त श्रावणाची असते.

       असं ओतू पहाणारं आभाळ, खट्याळ धुंद वारा, हिरवेपण जपलेली रंगीबेरंगी सृष्टी खरंच कल्पनेचा कुंचला एकेक चित्र काढीत जातो. हा श्रावण म्हणजे स्वप्नांचे सुंदर पक्षी घेऊन आलेला अजब जादूगार आहे, जो ऊनपावसाचे खेळ करतो व साऱ्या सृष्टीला चकित करतो. मनामनातले गुपित हळूच जाणतो आणि त्या लयीत, सुरात आकंठ बुडवतो. कधी सोनेरी सकाळ साऱ्या सृष्टीला शूचिर्भूत करते तर कधी धुंदल्या संध्याकाळी पश्चिमेचा रंगसूर पाहून इतर दिशा ही मग्न होवून जातात. चैतन्य दुथडी भरून वाहणाऱ्या सरींचा श्रावण बहरत जाईल. मनामनात संवाद साधत जाईल, अनादी सूर शोधत रम्य स्वप्नांची उधळण करीत राहील मग अशा श्रावणसरीत चिंब होत आपलाही श्रावणमय होण्याचा ब्रम्हानंद चिरकाळ टिकेल अन् श्रावण बरसत राहील. या देखण्या श्रावणाच्या अंगात डोळ्यांचे पारणे फेडणारे लावण्य आहे. रसिल्या मनाला मोहवून टाकणारी उन्मादकता या श्रावणात आहे. आंतरमनाला भुरळ पाडून पिसे लावणारी किमया आहे. तासन् तास हे लावण्य पहावं आणि हळूवार हातांनी मऊशार रेशीम कुरवाळावं तितकच मादक मदोन्मत्त होऊन ते लुटावं इतकी नशा या श्रावणात आहे. या पुरुषी श्रावणाची अवनी केंव्हापासून चातकासारखी वाट बघते. वचन दिल्याप्रमाणे श्रावण धरतीला भेटायला येतो आणि नटूनथटून, गळयात साज घालून नवयुवतीसारखी सजते, आनंदाने बहरते. श्रावण आणि धरतीचं मिलन होतं नि धरतीवरच्या नव्या अंकुराना कोंब येतात. संस्कृती जोपासणारा आणि संस्कृतीचं संवर्धन करणारा हा श्रावण पूर्वजांचं स्मरण करतो. मातीचं देणं लागतो. तो आपलं आगळं वेगळं महिरप घेऊनच उदयाला येतो. आपलं बावन्नखणी बिलोरी रूपडे तो उलगडून दाखवतो. धरतीवरच्या लेकरांना तो सुखावतो. आपल्यात गुंतवून ठेवतो. आत्म्याला आलेली बधिरता, मनाला आलेली मलिनता आणि शरीराची स्वच्छता श्रावण करतो, करवून घेतो.

       असा मनाला अल्हाद देणारा श्रावण प्रेमाने टपटपणाऱ्या प्राजक्तासारखा खाली सांडून धरतीशी संभाषण करतो. युगायुगाच्या ऋणानुबंधाची आठवण करून देतो पण तेवढ्यानेही धरती किती बरे सुखावते!अंगरोमांगी फुलून येते. तिच्या त्या फुललेल्या सौंदर्यात शालीनता असते, नादमयता असते. निसर्गाने कलाकुसर केलेले, विश्वकर्म्याने घडविलेले अपूर्व किमतीचे दागदागिने ती घालते. रातकिड्यांना रातराणीचे सुरेल गाणे गायला लावते. बेडकांना चौघडा वाजवायला सांगते, उंच झाडाच्या माथ्यावर डहाळीत लपून मधुर कंठाने कोकिळेला भजन गायला सांगते. लाजवाब रंगांची उधळण केलेला पिसारा उधळून ती आराधनेसाठी मोरांना थयथया नाचायला लावते. झाडाझुडपांवर वाढलेल्या लतावेलींना साज करून मंडप सजवायला सांगते. सागाच्या झाडांना तुरे हातात घेऊन उभारायला सांगते. जाईजुई  बटमोगऱ्याना फुलायला सांगते. श्रावण नटलेल्या धरतीसाठी आभाळात अधांतरी ढग चौऱ्या ढाळतात. कोवळी पहाट शुभ्र दव बनून अत्तरपाणी शिंपत असते. गडगडाट तिच्या आगमनाची आणि स्वागताची तुतारी वाजवतो. गवतफुले पाने उघडून मिटून टाळ्या वाजवितात. नानारंगी नानाछंदी फुले उमलून रंगांची उधळण करतात.

       नदीतलावातील कमळपुष्पे विनम्रतेने, भक्तीभावाने भाव व्यक्त करतात. अशा राजेशाही थाटात धरणी युवराज्ञी बनून श्रावण राज्यात राज्य करते सुखसमृद्धीची लयलूट करते. नदीनाल्याना, ओहोळांना ती आनंदाने खळाळा वाहायला लावते. कवींच्या ओठात आपल्या रसिल्या सौंदर्याचे गाणे देते. चित्रकारांना चित्रात रंग भरायला कल्पना देते. शेतकऱ्यांना मोत्याच्या किमतीचे दाणे देते. एवढे करुनही ती समर्पण भावनेनं म्हणते हे राज्य श्रावणाचं आहे. म्हणून तर भक्तीची सुरूवात श्रावणात होते.

       पशूमध्ये सिंह, पक्ष्यामध्ये मोर तसा महिन्यामध्ये श्रावण राजा असतो. चैतन्यानं फुलून आलेली धरती अंगाअंगावर हिरव्या पानांचे तोरण बेंदूर सणालाच बांधून घेते. नारळी पौर्णिमेला सागराला सामावून घेते. बृहस्पतीची पादपूजा करते. मानाच्या गणपतीला वंदन करत गौरीला साकार करते.

       असा हा श्रावण मनात उदबत्तीसारखा दरवळणारा, पहाटे पारव्यासारखा घुमणारा, मंदिरातील घंटीसारखा निनादणारा, मनाच्या अंतरनादातील भावनांना नित्य नवे संदर्भ देणारा, ऋणानुबंधाच्या धाग्याना जवळ करणारा, जीवनभरच्या आठवणींना साठवणारा हा. सुंदर श्रावण मनाच्या अंगणात पिंगा घालू लागतो. गंधभरल्या कंठातून प्रेमाने साद घालतो. गळालेल्या कंगोऱ्याना नवनवे, नव्या जीवनाचे कोंब आणतो. अखंड ऋतूचक्राचे हे गाणे भावभक्तीसाठी घुमत असावे. यासाठीच तर हे वर्तुळ आसाभोवती फिरत असावे.
अशा या नितांतसुंदर श्रावणाचे वर्णन किती करावे तेवढे थोडेच आहे.