कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २२ जुलै, २०२०

वेळ द्या मुलांसाठी - मराठी संस्कार कथा.

 

" वेळ द्या मुलांसाठी "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



        हर्ष स्वरूपादेवी व सयाजीराव पाटलांचा एकुलता एक मुलगा. अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल या शहरातील प्रख्यात स्कूलमधील फिफ्थ स्टँडर्डमध्ये शिकणारा स्टुडंट. सयाजीराव उत्कर्ष शुगर कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या पिताश्रीनी या कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या अकाली निधनामुळे सयाजीरावाच्यांवर सर्व जबाबदारी येऊन पडली होती. वारंवार होणारी शेतकरी संघटनांची अंदोलने, कामगारांचे विविध मागण्यांसाठी होणारे संप, संचालक मंडळाच्या अंतर्गत कुरघोडी यामध्ये सयाजीरावांच्या कार्य कुशलतेची कसोटी लागायची. बहुतेक सर्व वेळ यासाठीच द्यावा लागायचा. याशिवाय वडिलांनी उभारलेले विशाल फार्म हाऊसकडेही लक्ष द्यावे लागायचे. या सर्व व्यापात कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा हे ओघाने आलेच. स्वरूपादेवी उच्चशिक्षित होत्या, कर्तबगार होत्या. सयाजीरावांच्या घराकडील दुर्लक्षामुळे ऐषोआरामात,नेत्रदीपक ऐश्वर्यात असूनही चार भिंतीत कोंडून घेणे त्यांना रुचले नाही. त्यानी स्वःताची एक प्रतिमा उभी केली होती. समाजसेविका म्हणून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत होत्या. त्यांचाही बराचसा वेळ घराबाहेरच खर्च होई. त्या सतत सभा समारंभात मग्न असत.

        घरात, आलिशान बंगल्यात भरपूर नोकर चाकर होते. हर्षला सांभाळण्यासाठी दोन स्पेशल आया होत्या. त्याला स्कूलमध्ये नेण्या आणण्यासाठी स्पेशल कार होती. हर्ष ज्यावेळी त्या देखण्या कारमधून उतरायचा त्यावेळी इतर विद्यार्थी ती कार पहाण्यासाठी गोळा व्हायचे, मनात म्हणायचे, हर्ष किती भाग्यवान आहे. किती ऐटीत येतो स्कूलला.असा रूबाब आमच्या नशिबी केंव्हा येईल का? हर्षकडे स्कूलमधील सर्व टीचर्स जातीने लक्ष द्यायचे. त्यांचे पप्पा दरवर्षी स्कूलला मोठी देणगी द्यायचे.

        त्या स्कूलमधील मोहिते सर  एक उपक्रमशील शिक्षक होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ते नेहमी विविध उपक्रम राबवायचे. यावेळी त्यांनी माझे आईबाबा या विषयावर निबंधलेखन स्पर्धा आयोजित केली होती. सगळीकडे फक्त माझी आई असो कि माझे बाबा असा विषय दिला जातो. सरांनी माझे आईबाबा हा विषय देऊन वेगळेपण जपत विद्यार्थ्यांना मुक्तपणे आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचे अवाहन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुक्तपणे आपले विचार मांडले होते.

        हर्षचा निबंध सर्वांना चक्रावून सोडणारा होता. त्याने लिहिले होते माझे आईबाबा खूप श्रीमंत आहेत. त्यांच्यामुळे अनेक परिवाराना उद्योग मिळाला आहे. ते अनेकांचे भाग्यविधाते आहेत. माझे आईबाबा माझ्यासाठी दैवत आहेत. हे खरे पण त्यांच्याविषयी माझी खूप मोठी तक्रार आहे. तुम्ही माझ्यासाठी हे वैभव उभे केले पण माझ्यासाठी, माझ्याकडे लक्ष देण्यासाठी तुमच्या कडे वेळ कुठे आहे. बाबा, तुम्ही घरासाठी फार कमी वेळ देता. जेंव्हा घरी असता त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्यांची गर्दी असते. माझ्याशी बोलायला खेळायला, माझे लाड करायला वेळ कुठे असतो तुम्हाला? आपल्या जुन्या मोटरसायकल वरुन बाबांच्या समवेत जे स्कूलमध्ये येतात ते मित्र माझ्यापेक्षा भाग्यवान आहेत असे मला वाटते. ते ज्यावेळी बाय करून आपल्या मुलाला निरोप देऊन कौतुकाने मुलाकडे पहातात त्यावेळी बाबा मला तुमची आठवण होते. ड्रायव्हरला बाय करण्यात तो आनंद मिळतो का बाबा?

        मी आमच्या बंगल्याच्या खिडकीतून जेंव्हा बाहेर नजर टाकतो त्यावेळी पहातो की आई आपल्या मुलांना प्रेमाने घास भरवते. मांडीवर खेळवते, छान अंगाईगीत म्हणून झोपवते. माझ्या आईने असे कधी केल्याचे मला नाही आठवत. या सर्व गोष्टी माझी मावशी आया करते. पण आईची जागा ती घेऊ शकेल? परवा खिडकीतून मी एक सुंदर दृष्य पाहिले. माझ्या एवढाच एक मुलगा मैत्रिणीशी गप्पा मारण्यात गुंतलेल्या आईच्या पदराशी खेळत. होता. पदराची छान गुंडाळी करत होता. पदराने तोंड पुसत होता. त्याची आई त्याला कांहीही म्हणत नव्हती. माझी आई मला हा आनंद नाही घेवू देत कारण ती असते चुडीदार लेगिन किंवा जीन्समध्ये वर्षातून एक दोनदा साडी नेसते पण मला त्या साडीला हातही लावू देत नाही कारण किमती असते ना! ड्रायक्लीन, स्टार्च केलेली. शाळेतून परत आल्यावर शाळेत घडलेल्या गमती जमती सांगाव्याशा वाटतात. पण मी सांगत असताना माझ्याकडे लक्ष देत नाही.

        मी बाबाना एकदा विचारूच पाहिले की, बाबा तुम्ही एका दिवसात किती रूपये मिळवता? बाबानी सांगितले हजारो रूपये. एवढ्यात कुणीतरी भेटायला आलं त्यांना. त्यांच्यासाठी विषय तेथेच संपला. पण मी विचार करतोय मी अजून लहान आहे. थोडा मोठा झाल्यावर हजारो रुपये मिळवून आणून बाबाना देईन व सांगीन हे घ्या हजारो रूपये आणि एक दिवस माझ्यासाठी घरी रहा, माझ्याशी बोला, खेळा, माझ्या सोबत रहा. छान आहे ना आयडिया? आवडली तुम्हाला.

        शेवटी मोहिते सरांचे आभार मानतो कारण त्यांनीच संधी दिली आई बाबाबद्दल एवढं लिहीण्याची. आता थोडं मोकळं वाटतय मला, बाय 
आपला हर्ष

        हर्षने व्यक्त केलेले विचार व्यस्त आईबाबांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. मुलांना पैसा अडका, धनदौलत नको असते. त्यांना बालपणी आईवडिलांच्या मायेची, त्यांच्या गोड सहवासाची गरज असते. म्हणून आईवडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी वेळ दिला पाहिजे. त्यांना चांगल्या शाळेत ऍडमिशन, उत्तम क्लासला पाठवणे एवढेच आपले कर्तव्य आहे असे न मानता मुलांच्या भावना समजून घ्या, त्याच्यात समरस व्हा.असे केलात तरच ठराल नवयुगातील ग्रेट आईबाबा. बनणार ना मग असे आईबाबा?

शनिवार, १८ जुलै, २०२०

उसवलेली नाती - मराठी कथा


उसवलेली नाती 

लेखिका  - डॉ. ज्युबेदा तांबोळी



       गेला महिनाभर आजारी असलेल्या शांताबाईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. आधीच क्रुश असलेल्या शांताबाईंच्या क्रुश देहाकडे पहावत नव्हते. लकवा मारल्यामुळे तिच्या शरीराची एक बाजू हलत नव्हती. तिला बोलताही येत नव्हते. पण तिचे डोळे मात्र कमालीचे बोलके वाटत होते. प्रकषार्ने जाणवत होते की तिचे डोळे नेहमी दरवाजातून येणाऱ्याकडे लागलेले होते. व्यक्ती पुढे आली की काहीशी नाराज दिसायची. त्याचं आनंदाने स्वागत करायची ती मूकपणे, पुन्हा दरवाजातून कुणी येण्याची चाहूल लागताच हरखून जायची, पुन्हा निराश व्हायची असा सिलसिला दिवसभर चालू असायचा तिच्या छोट्याशा वाडीतील सर्व बाया बापडी, मुली-बाळी, म्हातारी, कोतारी तिला भेटून गेली होती. 

        शांताबाई कुणाची तरी डोळ्यात जीव आणून वाट पहात होत्या हे नक्की. कुणाची बरं  वाट पहात होत्या त्या? वाट पहात होत्या त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या लेकीची. अरूणाची, जिला या दोघांनी म्हणजे शांताबाई, सखारामानी तळहातावरील फोडाप्रमाणे वाढवली होती. धुमधडाक्यात लग्न करून दिले होते. लग्नासाठी जमिनीचा एक तुकडाही विकला होता त्यांनी. स्वतः सरकारने बेघरासाठी बांधून दिलेल्या एका छोट्या खोलीत रहात होते. अरूणा त्यांच्या गावापासून तीनशे कि.मी. अंतरावर असलेल्या शहरात रहात होती. लग्न झाल्यावर कांही वर्षे ती इकडे यायची सुट्टीला,आईच्या हातून सेवा करून घ्यायची. काबाडकष्ट करून साठवलेल्या पैशातून मानपान, चालरीत हौसमौज करून घेऊन निघायची.

        वर्षामागून वर्षे, दिवसामागून दिवस जात होते. शांताबाई सखाराम दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायचे. जमेल तशी इतरांना मदत करायचे. कुणाच्या अध्यात मध्यात नसायचे. आपल काम भलं की आपण भले अशी त्यांची वर्ती त्यामुळे सगळ्या वाडीतील लोक या दोघांना मानायचे, त्यांच्याकड आदराने बघायचे. एकेदिवशी शेतात काम करत असतानाच शांताबाईना चक्कर आली. सोबत्यानी गाडी करून तिला शहरातील दवाखान्यात नेलं. ताबडतोब उपचार झाले. लकवा मारल्याने शांताबाईची एक बाजू निकामी झाली. योगायोगाने त्यांच्या वाडीच्या सरपंचाच्या सांगण्यावरून डॉक्टरानी बील तर घेतले नव्हतेच शिवाय आठवड्याला घरी येऊन ईलाज करण्याची हमी दिली होती. आंधळ्याच्या  गायी देव राखतो म्हणतात ते अगदी खरे आहे. शेतातून दवाखान्यात नेल्याबरोबरच शेजारच्या अशोकने तिच्या लेकीला फोन केला, तर लेक म्हणाली आम्ही उद्या फाँरेनटूरला निघालो आहोत. सहा महिन्यापूर्वीच आम्ही दोघांचे चार लाख भरून बुकिंग केले आहे. बुकिंग कँन्सल करता येणार नाही. आईला नेल ना दवाखान्यात, उपचार तर डाँक्टर करणार आहेत, फार तर मी बाबांच्या खात्यावर दोन हजार जमा करते. एक महिन्यानंतर आल्यावर आईला भेटून जाईन, बाबाना तिची काळजी घ्यायला सांगा. फोन बंद केला अशोकनेच.

          सखाराम अगदी मनापासून तिची सेवा करत होता. सकाळ संध्याकाळ अंथरूण पांघरूण बदलायचा, केस विंचरायचा,आंघोळ घालायचा, गरम खिचडी करून भरवायचा हे काम तो इतक्या सहजतेने करायचा की बस्स।पतीकडून सेवा करून घेताना शांताबाई त्याच्याकडे डोळे किलकिले करून पहायच्या. सेवा कळतानाचा सखारामचा कुर्तार्थ हसरा चेहरा पाहून शांताबाईंचा चेहराही  प्रसन्न दिसायचा. त्यांच्या चेहऱ्यावर भाव उमटायचे, किती भाग्यवान आहे मी. पण डोळे दरवाजातून येणाऱ्याकडे खिळलेले असायचे.

         बघता बघता महिना संपला. लेक आज येईल उद्या येईल अशी सखारामलाही  आशा होती. त्याने अशोकला लेकी ला फोन करण्याची विनंती केली. ती फोनवर म्हणाली बाबा, टूरवरून येऊन दोनच दिवस झालेत .आता मला शाळेत हजर व्हायला हवं. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. रजा वाढवून मिळणार नाही. शिवाय माझ्या लेकाची अमितची बारावीची परीक्षा पुढच्या आठवड्यात सुरु होतेय. फार महत्वाची परीक्षा आहे ही. या परीक्षेवरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे. बाबा कशी येऊ मी तिकडे? तुम्ही घेताय ना काळजी तिची, डॉक्टर येऊन तपासतात ना आठवड्याला, मग मी अमितची परीक्षा झाल्यावरच येऊन जाईन. हुंदका गिळत बाबानी फोन बंद केला.

         शेवटी तो दिवस उगवलाच. सकाळी चहा ठेवून तोंड धुवायला पाणी घेऊन सखाराम तिला उठवायला गेला पण शांताबाईनी झोपेत च जगाचा निरोप घेतला होता. सखारामने जिवाच्या आकांताने टाहो फोडला. हातातले काम सोडून शेजारी पाजारी जमा झाले. लेकीला फोन केला. थोड्या वेळाने अशोकला तिचा फोन आला. अशोक जे व्हायला नको ते झालय मला फार वाईट वाटत आहे पण माझा नाईलाज आहे. मी येईपर्यंत प्रेताची हेळसांड  नको. तुम्हा सगळ्यांचा वेळही वाया जायला नको. तुम्ही क्रियाकर्म आवरून घ्या. मी आले असते पण माझ्या लेकाची महत्त्वाची बारावीची परीक्षा सुरु आहे. क्रियाकर्मचा व्हिडीओ करून माझ्या मोबाईलवर पाठव. शांताबाईला मरण आले होते तेही शुक्रवारी. बायकांनी नवं कोरं हिरवं लुगडं आणल. तिला नेसवून कपाळाभर कुंकू लावलं. डोळ्याला लावायला सोन्याचा मणी आणला. तिच्या मंगळसूत्रातील काळे मणी वाटून घेतले. किती सुंदर दिसत होती शांताबाई. अशोकने शिंकाळे धरले. क्रियाकर्म यथासांग पार पडले. व्हिडीओ करून पाठवला. लेक थँक्स म्हणाली. आईच्या अस्थी कुरीअरने पाठवा म्हणाली. शेजार्यानी या गोष्टीला ठाम नकार दिला.

         अमितने जो अरुणाचा मुलगा होता त्याने आईला एक मेसेज पाठवला, आई तुझ्याविषयी मला नितांत आदर आहे. तुझे माझ्यावर अमाप प्रेम आहे. माझ्या भवितव्याची तुला खूप काळजी वाटते हे मी जाणतो. बारावीपर्यंत माझी आई या विषयावरील निबंधास मला पैकीच्या पैकी मार्कस् मिळाले आहेत. वक्तृत्व स्पर्धेतही या विषयावरील स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आलाय हे तुला माहित आहेच. पण गेल्या काही दिवसात माझ्या आईचे वेगळेच रूप मी पाहतोय. जन्मदात्या आईला तू भेटायला गेली नाहीस, क्रियाकार्मालाही गेली नाहीस त्यामुळे आता माझ्या कडून तुझ्या शेवटच्या क्षणी या अपेक्षा ठेवू नकोस, कारण त्यावेळी मी  फोरेनमध्येच असेन ना आई?

मंगळवार, १४ जुलै, २०२०

तुझी आई नशीबवान - मराठी कथा


तुझी आई नशीबवान

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गुगल


          जानकीबाईंचा कंठ दाटून आला होता. आयुष्यभर साथ देणाऱ्या घराला, जिवाला जीव देणाऱ्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, लेकराप्रमाणे वाढवलेल्या झाडावेलीना सोडून आपण दूर जात आहोत, ही भावना त्यांना सहन होत नव्हती. पण करणार काय नाईलाजको क्या ईलाज म्हणत, दुःखाचे कढ  गिळत होत्या गतस्मृतींना उजाळा देत मनाची तयारी करत होत्या. गेल्या चार दिवसापासून सूनबाई फारच खुशीत दिसत होत्या, वृदाश्रम किती छान आहे, तिथलं वातावरण तुम्हाला निश्चित आवडणार, असं वारंवार सांगत होत्या. परवाच मैत्रिणी बरोबर तिच्या सासूबाईना भेटून आल्या होत्या ना तेंव्हा पासूनच त्या अभयचे कान भरत होत्या आणि माझा अभय तिचं ऐकून माझी रवानगी वृद्धाश्रमात करायला तयार झाला होता.

     जानकीबाई विचार करत होत्या, लग्नानंतर सात वर्षानी अभयचं आगमन झालं. त्यावेळी किती नवस बोलले होते मी. अभय तू पाच वर्षाचा होईपर्यंत एकेक नवस फेडत होते मी तुझ्यासाठी, हाताचा वडोळ्यांचे दिवे केले. तुझ्या शिक्षणासाठी किती कष्ट उपसले आम्ही दोघांनी. आज तुझी आई तुझ्यापासून दूर निघाली, याचं काहीच दुःख  तुला वाटत नाही इतका कसा व्यवहारी झालास रे बाबा? भलंबुरं काहीच कळू नये इतका संवेदनाशून्य झालास असं जानकीबाई मनात म्हणत होत्या.

     आश्रमात जाण्याचा दिवस उगवला. दारात रिक्षा उभी राहिली. जानकीबाईचं सामान भरून तयार होतं. चार पाच साड्या, अंथरूण, त्यांचे जुने फोटो, पोथ्या पुराण, ताट वाटी, टेकायची काठी, बादली तांब्या सगळं तयार होतं. आई इथून गेल्यावर, आईची आठवण सुद्धा येऊ नये, अशी दक्षता घेतली होती दोघांनी. अभयने सामान रिक्षात चढवलं व आईच्या शेजारी बसला निर्विकार चेहऱ्याने. जानकीबाई त्याला म्हणाल्या, अभय तू कशाला येतोस माझ्याबरोबर एक दिवस सुट्टी आहे, कशाला दगदग करून घेतोस. आराम कर. मी जाईन एकटी. जानकीबाई चं बोलणं संपायच्या आतच आज्ञाधारक मुलाप्रमाणे अभय रिक्षातून उतरला व रिक्षा चालू झाल्या बरोबर पाठ फिरवून निघून गेला.

     रिक्षा वृद्धाश्रमच्या दारात आली. जानकीबाई नी रिक्षाचे भाडे दिले. एकेक सामान उतरून घेऊ लागल्या. रिक्षावाला उतरला. त्याने जानकीबाईंच्या हातातील सामान घेतले व चौकशी करून त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवले व जानकीबाईना नमस्कार करून तो चालू लागला. जानकीबाईनी त्याला थांबवले व त्याच्या हातावर वीस रुपयांची नोट देऊ लागल्या. त्याने विचारले हे कशाचे पैसे देत आहात? जानकीबाई म्हणाल्या, सामान आत आणून दिल्याबद्दलचे. तो म्हणाला ठेवा मावशी ते तुमच्या जवळ, मला पण तुमच्या सारखी आई आहे. आईकडून कामाचे पैसे घ्यायचे असतात का? असे म्हणत तो निघून गेला. जानकीबाई मनात म्हणाल्या, तुझी आई नशिबवान।

मंगळवार, ७ जुलै, २०२०

असे करा संस्कार ! (संस्कार कथा)


असे करा संस्कार! (संस्कार कथा)

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



          अनिल नुकतेच ऑफिसमधून घरी आले. चहा घेऊन मोबाईल पहात बसले होते एवढ्यात त्यांचा दुसरीत शिकणारा लाडका चिरंजीव अथर्व शाळेतून आला. त्याच्या आई सुखदाने त्याचे दप्तर घेतले, डबा काढून पाहिला व म्हणाली, "वा अथर्व, सगळा शिरा खावून आलास, कसा झाला होता शिरा?" अथर्व म्हणाला, अगं मम्मी जाताना इतकं भरपूर जेवलो होतो ना, मला भूकच नव्हती, माझ्या मित्राने रमेशने आज डबाच आणला नव्हता. त्याला दिला माझा डबा". अथर्वचे हे बोलणे ऐकून सुखदा जाम चिडून म्हणाली, "एवढा चांगला, साजूक तुपातला, काजू-बदाम घालून तुझ्यासाठी केलेला शिरा तू दुसऱ्याला दिलास? आता बघ मी तुला पुन्हा कधीच शिरा करुन देणार नाही". सुखदाचे बोलणे अनिलला खूप खटकले. त्याने मूकपणे इशारा करुन सुखदाला गप्प बसायला सांगितले. दूध-बिस्किटे खाऊन अथर्व खेळण्यासाठी कॉलनीतील ग्राऊंडवर गेला.

        सुखदा गवारी निवडत बसली. अनिलही तिच्यासोबत गवारी निवडत बोलले, "मघाशी तू अथर्ववर शिरा मित्राला खायला दिला म्हणून चिडलीस ना, हे बरोबर नाही. तुला आठवतंय ना अथर्व प्ले-ग्रुप ला  ऍडमिशन देताना स्कूलने आपला इंटरव्यूह घेतला होता. त्यावेळी आपल्याला विचारलं होतं, "मुलानं कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला? " आपण उत्तर दिलं होतं "चांगला माणूस". यावर मॅडमनी स्पष्टीकरण मागितलं होतं, कारण हे उत्तर सर्वांहून निराळं होते. स्पष्टीकरण देताना आपण म्हणालो, चांगला माणूस म्हणजे जीवनात येणाऱ्या संकटांना हसत-सुखाने सामोरे जाणारा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परोपकार करत आनंदाने जगणारा". आणि सुखदा एवढ्यातच विसरलीस आपला निश्चय आपल्या मुलावर आपल्याला सुसंस्कार करायचे आहेत. ते कुठे बाजारात विकत मिळत नाहीत. मुलं अनुकरण प्रिय असतात. ती आपल्या कृतीचं बोलण्याचं अनुकरण करतात. सुखदा म्हणाली, " सॉरी हं ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही".

          अनिल पुढे म्हणाले, "माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली, मी असेन दहा-अकरा वर्षांचा, आई दारात तांदूळ निवडत बसली होती, तांदळाची कणी चिमण्यांकडे टाकत होती, चिमण्या तांदळाचे दाणे टिपत होत्या, मी नेलकटर घेऊन तेथे नखे काढण्यासाठी गेलो. आई म्हणाली, "अरे इथे नको नखे काढुस". मी म्हणालो, "का?". ती म्हणाली, "अरे इथे चिमण्या दाणे टिपत आहेत, तुझी नखे इथे पडली तर, तांदूळ समजून चिमण्या तुझी नखे खातील, नख तिच्या पोटात टोचतील की नाही?". माझ्या आईने नकळत मला पक्षांवर प्रेम करायला शिकवले. याला म्हणतात संस्कार! आणि तू शिरा मित्राला खायला दिला म्हणून अथर्ववर रागावलीस. तुझ्या लक्षात आलं का सुखदा? आपल्या अथर्वने आज परोपकाराचा पहिला धडा गिरवलाय. तू म्हणायला हवं होतंस, " वा, छान केलंस हं, तुझ्या मित्राला आवडला का शिरा?" मी अथर्वपुढे तुला काही बोललो नाही कारण त्याला वाटले असते आमच्या मम्मीला काही कळत नाही, पप्पाना फार कळतं".

          प्रसंग छोटासाच, तुमच्या-आमच्या घरात घडणारा, पण सुजाण पालकत्व कसे असावे हे दाखवणारा. आई-वडील मुलांपुढे सतत भांडत असतील तर कुणाशी भांडू नको सांगितल्यावर ऐकेल का? मुलाला दुकानातून तंबाखू-गुटख्याची पुडी आणायला लावणाऱ्या पालकांनी तंबाखू गुटखा वाईट आहे खाऊ नकोस सांगितल्यास मूल ऐकेल काय? घरात असताना बाबा घरात नाही म्हणून सांग, कोथिंबीर घरात असूनही शेजारणीला संपलीय म्हणून सांग, असे कळत-नकळत वागणे बोलणे मुलांच्यावर खोटे बोलण्याचे संस्कार करुन जातात हे लक्षात घ्यायला हवे.

            सुज्ञ, सुजाण पालकहो आजची मुले कमालीची हुशार आहेत. ते सतत पालकांच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण करत असतात. मुलं अनुकरणप्रिय असतात म्हणून आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक करा व आपल्या मुलाला "चांगला माणूस" बनवा. 


        

बुधवार, १ जुलै, २०२०

जागवू संवेदना (संस्कार कथा)


जागवू संवेदना

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



            


 'लसूण घ्या लसूण' कांदे, बटाटे, आलं घ्या आलं' असा रस्त्यावरून आवाज आला. टीव्हीवर कार्टून पहाण्यात गुंग असलेल्या तुषारला तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने खिडकीतून रस्त्यावर नजर टाकली. पहातो तर काय त्याचा पाचवीत शिकत असलेला वर्गमित्र आकाश डोक्यावर बुट्टी घेऊन विक्री करत होता. तुषारला गेले तीन महिने घरातून बाहेर पडायला बंदी होती घरात बसून बसून तो कंटाळला होता. आकाश ला पहाताच तो पळत सुटला. आई तुषार तुषार करत त्याच्यामागे धावली. आई तिथे पोहचण्याआधीच तुषारने आकाशला मिठी मारली. तो बिचारा बुट्टी सावरत म्हणाला, "अरे तुषार!, कोरोना आलाय, आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं, कशाला भेटतोस मला? जा घरी". तुषार बाजूला होत म्हणाला, "का रे बाबा उन्हातान्हात असा फिरतोस? तुला भीती नाही वाटत कोरोनाची? आकाश म्हणाला,"वाटतेना भीती पण घरात बसून खाणार काय? वडिलांची हमाली बंद झाली,आईचं धुण्याभांड्याचं काम बंद झालं. माझ्यापेक्षा लहान दोन बहिणी आहेत घरात. तेव्हा काम केल्याशिवाय आमचं पोट कसं भरणार? आई-वडिलांनी भाजी विक्रीचा धंदा सुरू केलाय, मीही त्यांना थोडा हातभार लावत आहे." एवढे बोलून 'लसुण घ्या लसुण' म्हणत आकाश निघून गेला.

              इकडे तुषारच्या मनाला चैन पडेना तो विचार करू लागला. पोटासाठी आकाश आई-वडिलांना मदत करतोय आणि मी नाष्ट्याला किचन मध्ये बोलावलं तरी जात नाही, टीव्हीसमोर बसूनच नाष्टा करतो. आईने केलेला उपमा आवडत नाही म्हणून मॅगी करण्याचा हट्ट करतो. आईला किती दमवतो आपण त्याला स्वतःची लाज वाटली. तो मनात म्हणाला आकाश ची आई भाजी विकते मग स्वयंपाक कधी करते? धुणं-भांडी केव्हा करते? कामवाली बंद झाल्यामुळे माझी आई वैतागली आहे कामाने मग आकाश ची आई भाजी विक्री करूनही हे सगळं काम कशी करते? परवापासून ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे आकाश कडे टीव्ही नाही, मोबाईल फोन नाही मग तो कसा शिकणार? त्याचं शिक्षण बंद पडणार की काय? आपण काहीतरी करायला हवं आकाशसाठी असा विचार सुरू असतानाच त्याला एक उपाय सुचला. संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर त्याने पप्पांना विचारले 'पप्पा तुम्ही हा तीस हजाराचा मोबाईल घेतला पण त्याच्या आधीचा जुना मोबाईल कुठे आहे? पप्पा म्हणाले "तुला कशाला हवाय तो?" तुषार म्हणाला "मला नको माझ्या मित्राला आकाशला हवाय. बिचारा गरीब आहे तो, नवीन अभ्यास कसा शिकणार? वडील म्हणाले "अरे पण त्याला महिन्याला रिचार्ज कोण मारणार?" तुषार म्हणाला "मी खाऊच्या पैशातून रिचार्ज मारून देणार त्याला, आता यापुढे तुमच्याकडे खाऊसाठी हट्ट करणार नाही" त्या पैशातून त्याला रिचार्ज मारून देणार. वडिलांना फार आनंद झाला म्हणाले "शाब्बास बेटा, तुझ्यातील परोपकाराची भावना मला फार आवडली. हीच भावना कायम ठेव."

                तुषार ने आकाशला मोबाईल फोन तर दिलाच शिवाय त्याला ऑपरेट करायला मदत ही केली. एवढ्यावरच तुषार थांबला नाही. त्यांच्या पप्पांचा छोटा कारखाना नुकताच सुरु झाला, दररोज थोडे-थोडे कामगार रुजू होऊ लागले. बाजूच्या कारखान्यात ही थोडेफार लोक रुजू झाले. कामगारांच्या सुट्टीच्या वेळी तुषारने आकाशला कांदे, लसूण, बटाटे, भाजी घेऊन येण्यास सांगितले, तो स्वतः घरी जाताना कामगारांना भाजी घेण्यास प्रवृत्त करू लागला. आकाश ची भरपूर विक्री होऊ लागली तुषार आनंदाने मदत करत राहिला. 

               जागोजागी असे परोपकारी तुषार निर्माण झाले तर 'अच्छे दिन' दूर नाहीत.