विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ मे, २०२१

कर्मवीर भाऊराव पाटील: एक अस्मिता - विशेष लेख


       ९ मे हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या महान शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकणारा हा   विशेष लेख..

कर्मवीर भाऊराव पाटील: एक अस्मिता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या केवळ स्मरणानेच आज लाखो सुशिक्षितांच्या तनामनात प्रेरणेचा, कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित होतो. कर्मवीर हे केवळ नांव नव्हते ते एक युग होते.

परिचय:
       महाराष्ट्रातील या महान समाजसेवकांनी त्यांचे शिक्षण संपल्यावर ओगले व किर्लोस्कर या कारखान्यांचे विक्रेते म्हणून काम केले. हे काम फिरतीचे असल्यामुळे या निमित्ताने त्यांचा संपूर्ण भारतभर प्रवास झाला. या भारत भ्रमणात त्यांना एक गोष्ट समजली की विचार, उच्चार व आचार यांचे उगमस्थान म्हणजेच शिक्षण होय. शिक्षण म्हणजे जनजागृती. जनजागृती म्हणजे समाजक्रांती आणि समाजक्रांतीमधूनच नवसमाजनिर्मिती हे सूत्र त्यांनी मनाशी पक्के केले.

शैक्षणिक कार्याचा आरंभ:
       १९११ साली तत्कालीन सातारा आणि सद्याच्या सांगली जिल्ह्यातील दुधगांव या गावी त्यांनी एक शिक्षणसंस्था स्थापून आपल्या शैक्षणिक कार्याचा आरंभ केला. १९१९ मध्ये सातारा येथे त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तिथून पुढे शैक्षणिक प्रचारासाठी त्यांनी व्याख्याने दिली. १९४७ मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सुरु केले. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिक्षण सुविधा मोफत देणाऱ्या या महाविद्यालयावर मोठे आर्थिक संकट आले. काही कारणामुळे महाविद्यालयाचे शासकीय अनुदान मिळणेही बंद झाले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेल्या या समाजसेवकांनी पदयात्रा काढली व देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. अगदी गिरणी कामगारांकडून देखील त्यांनी एक-एक रूपया गोळा केला.

भाऊरावांचे बाणेदार उत्तर:
       हे भले गृहस्थ देणगी मिळविण्यासाठी वणवण करत आहेत, ही बातमी खानदेशातील एका धनाढ्य मनुष्याला समजली. त्यांनी भाऊरावांना निरोप पाठविला की, 'असा एक-एक रूपया गोळा करण्यापेक्षा मी स्वतः एकरकमी कांही लाख रूपये देतो. फक्त त्या महाविद्यालयाला माझ्या वडीलांचे नांव द्या'. हा निरोप मिळताच भाऊरावांनी त्वरित उत्तर पाठविले, 'एक वेळ मी माझ्या बापाचे नांव बदलीन, पण पैशाच्या लोभाने छत्रपती शिवरायांचे नांव मुळीच बदलणार नाही'.

कर्मवीरांच्या उतुंग कार्याचा काव्यमय आढावा...
       अक्षय परिश्रम, अपार जिद्द, अतूट सत्यनिष्ठा, अभंग ताठपणा यांनी बनलेलं एक तेजस्वी संयुग होते कर्मवीर आण्णा.

       या तेजस्वीतेच्या उदरी होती एक प्रखरता..... जी अज्ञानाच्या अंधकाराला जाळून पोळून टाकत निघाली होती ज्ञानियाच्या तेजाकडे.

       त्यांच्या ठिकाणी होते घणाघाती प्रहार, जे जाती व धर्मभेदाच्या पाषाणांना भेदून तयार करत होते... समानतेचे, स्वतंत्रतेचे एक सुंदर शिल्प.

       कर्मवीर एक अस्मिता, जिनं माणसाला माणूस म्हणून जगायला  शिकवलं.

       या तेजस्वीतेच्या पोटी होती तेवढीच अथांग माया, मायेनं वत्सलतेला डोळस रुप दिलं, चेतना दिली नि हळूच फुंकला त्यात तेजोमय जीव.

       ही तेजोमय ज्योत तुझ्या माझ्यासाठी देखील आहे. या प्रकाशाने तुझं-माझं, प्रत्येकाचं  जीवन उजळण्याचा हक्क आहे हा दिलासा दिला कर्मवीरांनी.

       तो काळ होता उच्च वर्णियांच्या हक्कदारीचा, रूढीप्रिय समाजव्यवस्थेत प्रत्येकाच्या कार्याच्या चतुःसीमा ठरल्या होत्या. हजारो वर्षाच्या सवयीनं बेड्या, बेड्याही वाटत नव्हत्या. आपल्याचं शरीराचं, मनाचं एक अंग वाटत होत्या. मनं मृतप्राय होतात ती अशानच. पण कर्मवीरांनी ती मनं तळापासून हलवून सोडली, अंतःप्रेरणेनं जिवंत केली.

       श्रमाला विद्येची, विद्येला श्रमाची जोड देवून घडवली नवीन मनं.

       कर्मवीरांनी गीतेतील कर्मयोग कधी वाचला नसेल, पण ते जगले तो कर्मयोगच.

       ही यशोगाथा गायली जातेय आज घराघरातून, ज्यांनी हाती धरलं पुस्तक आणि वाचली देवाची अक्षरं, ही अक्षरे त्यांच्यासाठी घेऊन आली नवं गान, नवा प्राण
पण ठेवायला हवंय  खरंखुरं भान ।

आपण सर्वांनी काय करायला हवं ?
       फक्त पुतळे उभारून, गुणगान करून कर्मवीर आण्णांचे स्मरण न करता त्यांनी लावलेल्या वटवृक्षाचे संगोपन, जतन केले पाहिजे. शिक्षणाला श्रमाची जोड द्यायला हवी.

       आजचा शिक्षित श्रमाला कमी लेखू लागला आहे. श्रमदेवतेचं आणि विद्यादेवतेचं सहचर्य किती भाग्याचं असतं हे अनुभवायला हवे.

       श्रमामुळे येणाऱ्या घामाने डबडबलेले शरीर हाच सर्वोच्च अलंकार आहे. निकोप मनाची आणि निरोगी शरीराची माणसेच सामाजिक स्वास्थ्य टिकवू शकतील. श्रमाने बुद्धीला धार चढते. घामाने बुद्धीला तेज येते ही कर्मवीरांची शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न करायला हवा. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे, प्रत्येक नांगरामागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे असे स्वप्न बाळगणाऱ्या या थोर समाजसेवकांस ही भावसुमनांली....।

बुधवार, ५ मे, २०२१

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य - विशेष मराठी लेख


६ मे हा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस, त्यानिमित्त त्यांच्या आभाळाएवढ्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा हा खास लेख.....

राजर्षि  छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य - विशेष मराठी लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


राजर्षि तू राजा प्रेमळ , निधडा दिलदार ।
मराठगडी तू नेता आमुचा प्रणाम शतवार ।

मान आमुचा शान आमुची, तू दैवत आमचे ।
तुझ्या प्रतापे मोला चढले, हे जीवन आमचे ।


       पायी गती, हाती शक्ती व ह्रदयी मानवाची उन्नती हा ध्येयवाद स्विकारून भारताच्या इतिहासात अजरामर झालेल्या राजर्षि शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्रांतीचे बीजारोपण केले. समाजात पडलेली दरी, पराकोटीची हीन अवस्था दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही हे त्यांनी ओळखले. महात्मा फुले यांचा वारसा त्यांनी मोठ्या ताकतीने पुढे चालविला. देशाची सर्वांगिण उन्नती करावयाची असेल तर सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. १९१७ साली महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. यासाठी एक लाख रुपये खर्च करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्यापैकी ऐंशी हजार रूपये दरबार खजिन्यातून व वीस हजार रुपये देवस्थान फंडातून खर्च करण्यात आले. देवस्थानचा पैसा प्राथमिक शिक्षणाकडे वळविणारे शाहू महाराज हे देशातील क्रांतिकारक राजपुरूष होते. पंढरपूर येथील अन्नछत्रासाठी कोल्हापूरच्या दरबारातून दरमहा एकशे बारा रूपये आठ आणे जात असत. महाराजांनी ते अन्नछत्राऐवजी 'मराठा विद्याप्रसारक समाज'  या संस्थेला देण्याचा निर्णय ऑक्टोबर १९२० च्या आदेशान्वये घेतला. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे, अशी शाहू राजांची धारणा होती. ज्ञानसंपन्न माणूस अन्नासाठी वणवण भटकणार नाही, हे महाराजांचे मत होते.

       प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्यानंतर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत त्यांना दर महिना प्रत्येकी एक रुपया दंड करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. यातून महाराजांना शिक्षणाच्या प्रसाराची किती तळमळ होती हे लक्षात येते. ज्यावेळी ते आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करीत, त्यावेळी इंग्रज सरकारचा सिंध, गुजरात, मुंबई, कर्नाटक या सर्व प्रांताच्या शिक्षणावरील खर्च एक लाख रूपये होता. महाराजांनी अभ्यासक्रम तयार करण्यापासून ते शिक्षकांना प्रशिक्षण देणे, शाळा तपासणे याचीसुद्धा व्यवस्था केली. गावपाटलांना नियमितपणे शाळा तपासून तसा अहवाल पाठविण्याची योजना त्यांनी केली. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. त्यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.

       राजर्षिंनी सर्व जातीधर्माच्या वसतिगृहांची एकत्र उभारणी करून राष्ट्रीय एकतेचा, समतेचा मंत्र खऱ्या अर्थाने जनतेला दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येवू नये म्हणून त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. १८९६ मध्ये कोल्हापुरात एका वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. पण ब्राह्मण नि अब्राम्हण विद्यार्थी तिथे एकत्र रहाणे मोठे कठीण जाऊ लागले. त्यामुळे आणखी एक प्रबळ कल्पना त्यांना सुचली. तो त्यांनी माता भवानीचा आदेशच मानला.

       वसतिगृह स्थापना हा एक नवीनच उपक्रम होता. मुंबई इलाख्यातच नाही तर संपूर्ण भारतातही विद्यार्थ्यांसाठी विविध जातीधर्माची वसतिगृहे नव्हती. आपले सल्लागार न्यायमूर्ती रानडे, गो. कृष्ण गोखले, गंगाराम म्हस्के यांच्याशी त्यांनी विचारविनिमय केला आणि १८ एप्रिल १९०१ रोजी मराठा वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. महाराजांनी त्या काळचे चार हजार रुपये देणगी म्हणून दिले.

       जातीपातींचे निर्मूलन हे त्या काळी अवघड होते. शिक्षणाचा प्रसार तर झालाच पाहिजे म्हणून अन्य जमातीसाठी वसतिगृहे उभारण्याचे ठरले. नाव जरी मराठा वसतिगृह असले तरीही अन्य जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. १९०१ मध्ये दिगंबर जैन वसतिगृह स्थापन करण्यात आले. महाराजांनी त्याला देणग्या दिल्या पण कांही मराठ्यांनी विरोध केला. तेंव्हा महाराजांनी त्यांना खडसावले, "मी केवळ मराठ्यांचा राजा नाही. मी साऱ्यांचा राजा आहे". १९०८-१९०९ मध्ये जैन  वसतिगृहाने खास मुलींसाठी एक वसतिगृह उघडले व त्याला नांव दिले श्राविकाश्रम. त्यावेळी त्यात सोळा विद्यार्थिनी होत्या.

       आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी चित्रकलेच्या खास अभ्यासासाठी दोन जैन विद्यार्थ्यांना इटलीला पाठविले. मुस्लिम समाज अक्षरशत्रू, आर्थिकदृष्टया मागासलेला व प्रतिगामी होता. तेंव्हा महाराजांनी १५ नोव्हेंबर १९०६ रोजी 'किंग एडवर्ड महामेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना करून तिच्या वतीने वसतिगृह सुरु केले. १९०७ मध्ये लिंगायत वसतिगृह सुरू केले. महाराजांनी सगळ्याच वसतिगृहांना उदार देणग्या दिल्या. 

महाराजांनी हाती घेतलेला एक क्रांतिकारक प्रकल्प:
       खऱ्याखुऱ्या पददलित, विद्येच्या वाऱ्यालाही वंचित व उपेक्षित अशा अस्पृश्य मानलेल्या जातीत विद्याप्रसार करणारी एक संस्था स्थापन करून १४ एप्रिल १९०८ रोजी अस्पृश्यासाठीचे वसतिगृह स्थापन केले. वंचितामध्ये शिक्षण घेण्याची लाट उसळली. त्यानंतर सोनार समाज, शिंपी समाज, पांचाळ, सारस्वत, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, वैश्य समाज यांचीही वसतिगृहे चालू झाली. ख्रिस्ती समाजासाठी वसतिगृह स्थापन झाले. म्हणूनच राजर्षिंच्या करवीर नगरीला वसतिगृहांची जननी, वसतिगृहांची सुवर्णभूमी म्हणतात.

राजर्षि शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतांना एका कवीने म्हटले आहे.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, 
तेथे कर माझे जुळती।

अश्रूंचा हा बांध फुटूनी,
ह्रदय येते आज भरूनी।

जाणार इतक्या लवकर, नव्हते जाणिले कुणी ।
साश्रू नयनांनी असे वाटते, तुम्ही यावे परतुनी।

निजदेहाचे झिजवून चंदन ।
 तुम्ही वेचिलाइथे कण कण ।

आणि फुलविले हसरे नंदन ।
स्मृतीस तुमच्या शतशः वंदन ।

शनिवार, १ मे, २०२१

महाराष्ट्र माझा - विशेष मराठी लेख


       आज १ मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्यांची छाती अभिमानाने भरून येण्याचा दिवस. महाराष्ट्र दिनानिमित्त हा विशेष लेख.


महाराष्ट्र माझा - विशेष मराठी लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: twitter.com

माझा महाराष्ट्र, माझी मराठी ।

महाराष्ट्रा तुला वंदितो ।

भवानीला आम्ही मानितो ।

दऱ्याखोऱ्यांचा तू ,

उंचसखल तू ।

कीर्ति  तुझी आम्ही गातो ।


       महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेच राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनता जनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावार प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधीजी पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्चनेचे महत्त्व  महात्मा गांधींच्या पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषातून महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले.


नकाशा पुढे पाहता भारताचा।

महाराष्ट्र आधी भरे लोचनी ।

अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतानी लिहिली आहे.


महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ।

मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।

अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापट यांनी दिली आहे.


       या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य टिळक या भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले, आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतु हिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरूपाची ठरली, ते पलूसकर, भातखंडे इथलेच. बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके, मराठी चित्रपटातील पहिले राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे हे मराठी मातीत जन्मलेले मराठी मातीचेच सुपुत्र.


       महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले. महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. रयत त्रासलेली होती. अंधाधुंदी माजली होती. शिवरायांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज देऊन जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आजही शिवरायांचे नाव घेतले की सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते.


       महाराष्ट्रात चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्या सारखे अनेक थोर संतमहात्मे या भूमीत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राला दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभावाची शिकवण दिली. या शिकवणीने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे.


       महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे, समाजपरिवर्तनाचे व समाजजागृतीचे कार्य अनेक समाजसुधारकांनी केले आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, आचार्य विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आण्णा भाऊ साठे, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, बाबा आमटे, हमीद दलवाई इत्यादि महान विभूतींची नावे घेता येतील. या सर्वांनी महाराष्ट्राचे  नांव उज्ज्वल केले आहे.


       क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर महाराष्ट्रात जन्मला व जगात चमकला. गानकोकिळा लता  मंगेशकर यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि जगाचे कान तृप्त केले.


       देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधूसारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नांवे सांगावीत? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्य हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठी तच नव्हे तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच.


     अशा या थोर परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना या काव्य पंक्ती म्हणाव्याशा वाटतात....

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।


आदरणीय शाहिर कुंतीनाथ कर्के महाराष्ट्राची थोरवी गाताना म्हणतात...

या भारतात भाग्यवंत देश कोणता ।

देश महाराष्ट्र पुण्यशील भारता ।


या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू या.


गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज- विशेष लेख


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख....


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल

       आधुनिकतेची कास धरून अज्ञानाचा नाश करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन आणि कार्य अतिशय उद्बोधक आहे. समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी यांच्यावर घणाघाती प्रहार करून आदर्श समाजरचनेची उभारणी करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. आपल्या परखड विचारांनी आणि जागृतीपर लिखाणाने समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामविकास, राष्ट्रीय एकता, मानवता आणि विश्वशांती यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग त्यांनी दाखविला. त्यांच्या या महान कार्यामुळे 'राष्ट्रसंत' असा लौकिक त्यांना मिळाला.


       ३० एप्रिल १९०९ रोजी 'शहीद यावली 'या छोट्याशा गावी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव 'माणिक' असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नामदेव गणेशपंत इंगळे आणि आईचे नाव मंजुळादेवी असे होते. गरिबीचे चटके तुकडोजी महाराजांना बालपणी सहन करावे लागले. त्यांचे आई वडील अशिक्षित होते. मात्र त्यांनी छोट्या माणिकला इयत्ता चौथीपर्यंत शिकविले. माणिकला बालपणापासून भजन, कीर्तन, कविता करणे यांची आवड होती. शाळा सोडून ते रानावनात जात. तेथे भजन करीत बसत. शाळेपेक्षा त्यातच त्यांचे मन अधिक रमत असे. हळूहळू ते कीर्तनातच रमू लागले.


       भजन, कीर्तन आणि काव्य यामध्ये मन रमू लागल्यावर  त्यांच्या मनात भगवंताच्या दर्शनाची तळमळ वाढू लागली, म्हणून पंढरीनाथांच्या दर्शनासाठी ते पंढरपूरला दाखल झाले. पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचे चित्त वेडावले, देह भांबावला. अश्रूधारा विठ्ठलाच्या चरणावर ओसंडू लागल्या. पांडुरंगाच्या दर्शनाने ते देहभान विसरले. त्यामुळे वेडा समजून बडव्यांनी त्यांना कोरड्यांनी मारले.


       ते पंढरपूरहून यावलीला परत आले, मात्र देवदर्शनाची ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. मंजुळादेवीना वाटत होते की, आपल्या मुलाने विवाह करून आनंदाने संसार करावा. मात्र तुकडोजी महाराजांना या विश्वाचा संसार सुव्यवस्थित करायचा होता. आईचा विचार त्यांना पटला नाही. पुढे त्यांनी काशी, ओंकारेश्वर, हरीद्वार, पशूपतिनाथ इत्यादि तीर्थयात्रा केल्या. देश व देवदर्शनाबरोबर समाजातील चालीरीती, अंधश्रद्धा, विषमता यांचे निरीक्षण केले. अनेक ठिकाणच्या पंडीतांशी चर्चा केल्या.


       स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात तुकडोजी महाराजांनी असामान्य कार्य केले. पारतंत्र्यात भारतीय जनतेवरील अन्याय, अत्याचार स्वतः पाहिला व अनुभवला. त्यांनी १९३५ साली सालबर्डीचा महायज्ञ केला. जनतेला भावनिकदृष्ट्या संघटित करून राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली. १९४२ साली आष्टी आणि चिमूरच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले. त्यांनी चार महिने तुरुंगवास भोगला. राष्ट्र प्रेमाने ओथंबलेली भजने गाऊन जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनतेला स्वातंत्र्याचा विचार करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी धडपड चालू ठेवली.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिक्षणविषयक विचार:

       आपल्या भाषणात ते म्हणतात, "भारतात शिक्षणाची अत्यंत उणीव आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही नसतील इतके निरक्षर लोक आपल्या देशात आहेत. स्वातंत्र्यप्राप्ती होऊनही या देशाची ऐंशी टक्के जनता अंगठाछाप आहे. परंतु ही स्थिती भूषणावह नाही. हा ऋषीमुनींचा देश आहे. या देशात गुराखीसुद्धा पदवीधर असले पाहिजेत. कोणतेही काम जाणीवपूर्वक व ज्ञानपूर्वक करण्यातच खरी मजा आहे".


       तुकडोजी महाराजांच्या या भाषणातून आपणास जाणवते की, शिक्षणाविषयी ते अतिशय जागरूक होते. ग्रामगीतेमध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात...


ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण ।

उद्याचे राष्ट्र, आजचे संतान ।

यासाठी आदर्श पाहिजे गुरूजन ।

राष्ट्रनिर्माते ।


       ग्रामविकासाचा पाया शिक्षणातच दडला आहे, असे ते आवर्जून सांगत. आजची बालके उद्याचे भावी नागरिक होतील. त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था करणे हे प्रत्येक राष्ट्राचे कर्तव्य आहे असे ते सांगत.


       ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांनी जिव्हाळ्याने आणि आवडीने अध्यापन करायला हवे, असे त्यांचे मत होते. बालकांच्या साक्षरतेबरोबर प्रौढशिक्षणांविषयीही ते जागृत होते. साक्षरता प्रसाराविषयी ते म्हणतात, "साक्षरता प्रसार हा समाजशिक्षणाचा पाया आहे. भारताचा प्रत्येक घटक सुसंस्कृत, स्वावलंबी आणि सुखी व्हावा यासाठी समाजशिक्षणासारखा दुसरा उपाय नाही. आज आपल्या देशातील एक माणूससुद्धा अंगठाछाप असणे हे आम्हा सर्वांना लाजिरवाणे आहे. राष्ट्राचा हा कमजोर घटक म्हणजे राष्ट्राच्या जीविताला धोका आहे हे विसरू नका. समाजशिक्षण हाच खरा धर्मयज्ञ आहे, कारण यामुळेच समाजाचा विकास योग्य रीतीने होऊ शकेल. जनतेला जर आपण सुसंस्कृत व डोळस बनविले नाही तर यापुढील परिस्थिती आम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही". प्रौढशिक्षणांविषयी ते म्हणतात..


अक्षरशत्रूना सामर्थ्य यावे ।

म्हणोनी प्रौढ शिक्षण चालवावे ।

घरोघरी नंबर द्यावे।

नामपाटी लावोनिया ।


तुकडोजी महाराजांचे देशप्रेम:

       भारताबद्दल महाराजांच्या मनात अतिशय आदर होता. भारत-पाक व भारत-चीन युद्धाच्या वेळी ते प्रत्यक्ष युद्ध सीमेवर संरक्षण मंत्र्यांबरोबर गेले. सैनिकांसमोर देशप्रेमाने ओथंबलेली भजने गाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. देशसंरक्षणार्थ सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ते देशातील तरूणांना करत.


       ग्रामोन्नती झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही असे ते म्हणत. ग्रामगीतेमध्ये त्यांनी आदर्श ग्रामसंकल्पना मांडली आहे. ते म्हणत....


मेरा प्रभू सब व्याप्त है ।

हर मानवो की जान में ।

इस बात को भूलो नही ।

हर काम में हर ध्यान में।


सामान्य जनांमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महान राष्ट्रसंतास कोटी कोटी प्रणाम ।


शनिवार, २४ एप्रिल, २०२१

भगवान महावीर - विशेष लेख

 

भगवान महावीर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       भगवान महावीरांचा जन्म इ. स. पूर्व सहाव्या शतकात चैत्र शुद्ध त्रयोदशीला कुंडलपूर येथे झाला. त्यांच्या  पित्याचे नांव सिद्धार्थ व मातेचे नांव त्रिशला राणी होते. राजा सिद्धार्थ हे वैशालीचे राजे होते. त्रिशला राणी ही राजा चेढकची कन्या होती.


भगवान महावीरांची शिकवण:

अहिंसा हाच खरा धर्म आहे. कोणत्याही जीवाची हिंसा करु नका जगा आणि जगू द्या. सर्व प्राणिमात्रांवर दया करा, प्रेम करा. सर्वांशी संवाद साधा. शत्रू व मित्र सर्व आपलेच माना. संपूर्ण मानव समूह एक आहे. सर्वांच्या उदर्निवाहाची व्यवस्था करा. कुणीही उपाशी रहायला नको ही शिकवण दिली. जगात पहिल्यांदा अहिंसा धर्म कुणी सांगितला असेल तो भगवान महावीरांनीच. अहिंसेबरोबरच सत्य धर्माचे पालन करणे आवश्यक आहे असे ते सांगत. खोटे बोलणे म्हणजे सुद्धा एक प्रकारची अहिंसाच आहे, खोटे बोलण्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावते त्यामुळे ती हिंसाच आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, चोरी ही सुद्धा हिंसाच आहे. दुसऱ्याचे धन हरण करणे म्हणजे दुसऱ्याचे मन दुखवणे, ती सुद्धा हिंसाच आहे. अपरिग्रह म्हणजे गरजेपुरतं धनधान्य ठेवून घेणं आणि जादाचं गरजूंना देणं.


भगवान महावीर यांच्या जन्मापूर्वीची सामाजिक परिस्थिती:

भगवान महावीरांचा कालखंड सव्वीसशेहून अधिक वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी जिकडे तिकडे मिथ्या तत्वांचेच साम्राज्य प्रस्थापित झालेले होते. सामाजिक विषमतेला कुठलीच मर्यादा राहिली नव्हती. सामाजिक रूढी, परंपरा वैषम्याने बरबटलेल्या होत्या. स्त्रियांना शूद्राहून अधिक मोल नव्हते. शूद्रांना अतिशूद्र बनवून पशूहूनही त्यांना हीन लेखले जात  होते. पशूंना, मुक्या प्राणीमात्रांना याज्ञिकांच्या होमकुंडात बळी जावे लागे. मानव प्राण्यांचा तर स्वतःच्या अनंत शक्तीवरील विश्वास केंव्हाच उडून गेला होता. अन्यायी राजदंड आणि अनिष्ट रूढी परंपरा यामुळे सारा मानवसमूह भयाकुल व भयभीत बनला होता. थोडक्यात मिथ्यात्वाला महापूर आला होता.


       भगवान महावीर यांच्या कालखंडात देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठेमोठे यज्ञ करीत असत. यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला जात असे. हे सर्व धर्माच्या नावाने करीत असत. यज्ञ करणारा यजमान क्षत्रिय आणि पूजा करणारा पुजारी हे दोघेही यथेच्छ मांसाहार करीत, सुरापान करीत. अशाने देव प्रसन्न होतो अशी त्यांची समजूत होती.


भगवान महावीरांचा जन्म, बालपण व कार्य:

मिथ्यात्वाचा महापूर दूर करण्यासाठी एका भव्य जीवाचे या पृथ्वीतलावर आगमन होत होते. कुंडलपूरच्या सिद्धार्थ राजाच्या राजवाड्यात लगबग सुरु होती. महाराणी त्रिशलेला सोळा स्वप्ने पडलेली होती आणि तिच्या पोटी एक महामानव जन्माला येणार होता. त्याच्या येण्याची तयारी सुरू होती. अत्यंत आनंदाचा सोहळा पहाण्यासाठी इंद्रादी देवसुद्धा उत्सुक होते. महाराणी त्रिशला अत्यंत आनंदात होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. भव्य जीवांच्या जन्माच्या वेळी सगळी अनुकूलता असते. त्यांची पुण्याईच जबरदस्त असते. रात्रीची निरव शांतता होती. मंद वारा वहात होता. सगळी प्रजा आनंदात होती. राजकुमाराची वाट पहात सगळ्यांनी झोपेचा त्याग केला होता. महाराणी त्रिशलादेवीला प्रसव वेदनांचा  थोडासाही त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. पहाटेचा शांत चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर विराजमान झाला होता. जनतेचा उद्धारक जन्माला येणार होता. चतुर्थ काल संपून पंचमकालसुरू होण्याला अजून ७५ वर्षे तीन महिन्यांचा अवकाश होता. विश्व आनंदाने मोहरून गेले. भगवान महावीरांचा जन्मोत्सव फारच थाटामाटात साजरा झाला. अनेक नगर राज्यातील नायकांनी तर त्यात भाग घेतलाच पण स्वर्गातून देवेंद्र ही समारंभास हजर होते.


       बालकाला कुणी वर्धमान म्हणू लागले, कुणी सन्मती तर कुणी महावीर. सर्वांचा लाडका राजकुमार लहानपणापासूनच गुणी होता, निर्भय होता, विवेकी होता, धर्मशील होता. वयात आल्यावर विवाह करण्यास नम्रपणे नकार दिला.


       पहिली तीस वर्षे हा राजकुमार घरी राहून संयमाचे पालन करीत होता. आसक्ती अशी नव्हतीच. राजलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि इंद्रिय यावर त्यांनी सहजतेने लाथ मारली होती. आपल्यातच म्हणजे स्वमध्ये मग्न असणाऱ्या महावीरांनी आईवडिलांची अनुज्ञा घेऊन दिगंबरी दिक्षा घेतली. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा होता. त्यांनी आपली सारी संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली आणि ज्ञात्रु खंड वनाकडे तो निघाला. राजकुमार परिषह सहन करीत होता. घोर तपश्चर्या सुरु होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी, भूकतहान यांची तमा न बाळगता त्यांची तपश्चर्या सुरु होती. तो इतका आत्ममग्न होता की जगाचं त्याला भान नव्हतं. आतील आणि बाहेरील शत्रूशी त्याचा संघर्ष सुरू होता. बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर आत्म्यात लख्ख प्रकाश पडला. सर्वकांही उजळून निघाले सर्वकांही ज्ञात झाले. केवलज्ञानाची प्राप्ती झाली. देवेंद्राना कळलं की महावीरांना केवलज्ञान झालं आहे. ते स्वर्गातून खाली आले. भगवंताना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि जय हो, जय हो अशी गर्जना केली. समवशरणाची म्हणजे सभेची रचना केली. सर्वजण आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले. पशूपक्षी, मानव, राजेरजवाडे सर्व आले. पण भगवंतांचीवाणी कांही सुरु होईना. त्यावेळेस इंद्रभूती गौतम भगवान महावीरांशी वादविवाद करण्यासाठी आपल्या हजारो शिष्यांसह येत होते. आपल्या ज्ञानाचा त्यांना फार गर्व होता. समवशरणामध्ये आल्या आल्या त्यांचा अहंकार गळून पडला. भगवान महावीरांशी बातचीत झाली आणि ते त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. ते त्यांचे पहिले गणधर झाले. त्यांचे दोन भाऊही महावीरांचे शिष्य झाले. भगवंतांची वाणी सुरू झाली. गौतमांच्या मनातील अंधकार दूर झाला. भगवंतांची वाणी त्यांनी सोपी करून सांगितली.


       भगवान महावीरांची शिकवण आचरणात आणण्याचा निश्चय त्यांच्या जयंती दिनी करू या.


       अशा या थोर महामानवास कोटी कोटी प्रणाम। जय जिनेंद्र...


सोमवार, १२ एप्रिल, २०२१

गुढी पाडवा - विशेष लेख

 

गुढी पाडवा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       मराठी वर्षात एकूण साडेतीन शुभ अशा मुहूर्तांची माहिती मिळते. त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होय. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात चांगल्या दिवशी व चांगल्या मुहूर्तावर करावी अशी  आपल्या पूर्वजांची आज्ञा आहे. अशा शुभकामाच्या संकल्पाचा एक मंगल मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा होय.


       शिशिर ऋतुबरोबर कडाक्याची थंडी संपते. ऋतूंचा राजा वसंत पुढे सरसावतो. सृष्टीला नवे चैतन्य प्राप्त होते. उन्हाच्या झळा वाढत असतानाच सृष्टी बहरत असते. झाडेझुडपे आपला पर्णसंभार सोडून फुलांनी बहरून जातात. पांगारा, बहावा, गुलमोहर, पळस वेड्यासारखे वाढतात. झाडांवर आलेली पालवीसुद्धा कितीतरी प्रकारची असते. फिक्कट तांबडी, गर्द हिरवी, चक्क लालसर. कांही झाडांना पालवी येण्यापूर्वीच बहरण्याची हुक्की आलेली असते. यावेळी परागकण गोळा करणारे पक्षी, गुंजाररव करणारे भुंगे आणि मधमाशा यांची लगबग पहाण्यासारखी असते. वसंताच्या या आगमनाबरोबरच नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा मनामनात निर्माण होतात. चैत्र महिन्यात नव्या मराठी वर्षाची सुरुवात होते. वर्षाच्या सुरुवातीचा हा महत्त्वाचा दिवस लोक आनंदाने साजरा करतात. नव्या वर्षाची सुरुवात सुखासमाधानात साजरी केली की, सारं वर्ष सुखात जाते अशी भावना आहे. हा पहिला दिवस म्हणजे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडव्याचा मंगल दिवस.


सणाबद्दलच्या पौराणिक कथा:

       रामायण आपण सर्वजण जाणतो. त्यामध्ये एक कथा आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी चौदा वर्षे वनवासात काढली. वडील बंधूची प्रेमळ आज्ञा म्हणून भरत आयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्राच्या येण्याचीच वाट पहात होता. चौदा वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचं असं भरतानं ठरविलं. तशी त्यांनी तयारी पण केली. दुसऱ्या दिवशी भरत पहाटेच उठला. श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. मनोमन सीतामाई व श्रीलक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चित्तेकडे निघाला. एवढ्यात एक नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आला. भरतास वंदन करून त्यांनी प्रभू रामचंद्र येत असल्याची वर्दी दिली. भरताला खूप आनंद झाला. त्यानं शत्रुघ्नला सांगितलं, आयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्राम पासून आयोध्या नगरीपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या झंकाराने सारे आकाश भरून गेले. श्रीरामाचे पुष्पक विमान खाली आले. सर्वांचा आवडता राजा श्रीराम यांच्या दर्शनासाठी अनेकांचे प्राण डोळ्यात साठले होते. श्रीरामांच्या जयनादांनी आयोध्या दणाणून गेली. डोक्यावर श्रीरामांच्या पादुका घेऊन भरत पुढे गेला. भावाभावांची भेट झाली. तो देखावा पाहून आयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचे पूर लोटले.

ते म्हणू लागले...

राघवे उचलोनी ते समयी।

भरत दृढ धरिला हृदयी ।।


       श्रीराम भरत भेटीचा देखावा काय वर्णावा? लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली, गुढ्या उभारल्या. त्यातून आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस. तेंव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे मानतात.


       दुसरी एक कथा सांगितली जाते. फार वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती. प्रतिष्ठानपूर असेही त्या नगरीचे नांव होते. तिथे शालीवाहन नावाचा एक राजा होऊन गेला. राजा अतिशय पराक्रमी, न्यायी आणि शूर होता. याच काळात राजा शक आणि त्याचे सैन्य वेळोवेळी राज्यावर स्वारी करीत होते. जनतेची लूट, अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले. शक राजावर शालीवाहनाने स्वारी केली व त्याचा पराभव केला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले. लोकांना आनंद झाला. शालीवाहनाच्या पराक्रमाचा हाच विजयदिन होय. हाच तो चैत्र पाडव्याचा दिवस. या दिवसापासूनच इ. स.सुरू झाल्यावर ७८ वर्षानंतर शालीवाहन शक वर्षाची सुरूवात झाली. दक्षिण भारतात हाच वर्षारंभ मानतात.


सण कसा साजरा करतात:

       भारतातील बहुसंख्य लोक हा सण मोठ्या आनंदाने, हौसेने साजरा करतात. एखादा भव्य राजवाडा असो किंवा एखादी सामान्य फाटकी झोपडी असो या दिवशी त्यावर गुढी दिसतेच. एक सरळ उंच साधी किंवा वेताची काठी घेतात. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचे, तांब्याचे किंवा पितळी भांडे पालथे घालून बांधतात. एक सुंदरसं रेशमी वस्त्र किंवा चोळखण त्याच्या सोबत कडूलिंबाचे डहाळे आणि साखरेच्या गाठीची किंवा खोबऱ्याच्या वाटीची माळ त्याला घालतात. हीच गुढी होय. गुढीला गंध, फुले वाहून पूजा करतात. गूळ खोबऱ्याचा नैवद्य दाखवितात.


       गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी सर्वजण सुगंधी द्रव्य लावून मंगलस्नान करतात. गुढी उभारून पूजा करतात. त्यानंतर कडूलिंबाची पाने, मिरे, हिंग, साखर, जिरे, ओवा, चिंच यासह बारीक ठेचून खातात. या पदार्थामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते, बुद्धी तेजस्वी होते. या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या व अन्य गोडधोड पदार्थ केले जातात. एकत्र बसून मधुर जेवणाचा आस्वाद घेतला जातो.


       नव्या वर्षातील पहिला दिवस म्हणून लोक या नव्या दिवशी नव्या कामाची सुरुवात करतात. गुढीबरोबरच लोक आपल्या घरी नवे पंचांग आणून त्याची पूजा करतात. दुपारी जाणकार लोक पंचांगातील वर्षफल भविष्य वाचतात. हे वर्ष कसे जाईल? यावर विचार मांडतात. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात त्याचे श्रवण करतात. याच दिवशी ब्रम्हदेवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते.


       अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...।

शेवटी एवढंच म्हणेन....

वर्षाला येतो गुढी पाडवा।

सर्वांच्या जीवनात येऊ दे गोडवा।


मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

आरोग्यमंत्र कुटूंबाचा - विशेष लेख.

 

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्ताने,


आरोग्यमंत्र कुटूंबाचा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान आपण सर्वजण अनुभवत आहोत. कोरोनाने कित्येकांचे प्राण घेतले. मरण पावलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय अश्रूत भिजवून हुंदका आवरत घास गिळत आहेत. प्राप्त परिस्थितीशी सामना करता न आल्यामुळे कित्येकांनी आपली जीवनयात्रा आपल्याच हाताने संपवली आहे. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे.


       कोरोनामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली हे खरे आहे, पण कोरोनानं एक चांगले काम केले आहे.... दचकलात काय?


       कोरोनानं माणसाला आपल्या जीवनाचं मोल काय आहे हे दाखवून दिलं. सर्व प्रकारच्या धनसंपत्तीपेक्षा आपलं आरोग्य उत्तम राखणं महत्वाचं आहे हे पटवून दिले, समजावून सांगितलं. करोडोची संपत्ती, शेकडो नातेवाईक असूनही कोविड सेंटरमध्ये बेडवर एकट्यानेच जीवन मरणाची लढाई लढणे अटळ झाले. जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य व आपले कुटूंबीय हे कळून चुकले.


आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा आरोग्यमंत्र कुटूंबाचा.....

आरोग्य नियमांचे पालन करत असताना कुटूंबाचे सहकार्य खूप आवश्यक असते, शिवाय त्यामुळे सर्व कुटूंबाचे आरोग्य व्यवस्थित रहायला मदत मिळते. कुटूंबाच्या आरोग्याचा विचार करतांना सर्वप्रथम लक्षात घ्याव्या लागतील कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती व सवयी. कुटुंब म्हटले की परस्परासाठी थांबणे, परस्परांच्या आवडीनिवडीचा विचार करणे आले. कौटुंबिक प्रेमाखातर, कुटूंबाच्या मानसिक आरोग्याखातर हे करणे आवश्यक असले तरी त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही ना याकडे लक्ष द्यायला हवे. उदाहरणार्थ एखाद्या दिवशी यजमानांना रात्री घरी यायला उशीर होणार असला आणि पत्नी जेवायची थांबली तर दोघांना बरे वाटेल, पण पत्नीने दररोज असे करणे बरोबर नाही. अन्यथा रोजच्या जागरणाने व भुकेले राहिल्याने दोघांचे पचन बिघडून बाकीच्या त्रासांना आमंत्रण मिळेल.


       कुटूंबाच्या आहाराची योजना करतांनाही सर्वांच्या तब्येतीचा विचार करायला हवा. बहुतेक वेळेला आपण फक्त आवडीनिवडी सांभाळत राहतो. पण आरोग्य सांभाळण्यासाठी तब्येतीनुरुप आहारयोजना करणे अधिक गरजेचे आहे, हे समजून घ्यायला हवे. जसे इडली, डोसा, ढोकळा वगैरे आंबवून तयार केलेले पदार्थ कफप्रकृतीच्या व्यक्तीला सहज मानवतात पण पित्तप्रकृतीच्या व्यक्तीचे पित्त वाढवू शकतात किंवा वातप्रकृतीला पचायला जड ठरू शकतात. अशावेळी वात, पित्त प्रकृतीसाठी इडली सांबाराबरोबर भात सांबार किंवा वरण भातही बनवावा. दूध लोण्यासारखे कफ वाढविणारे पदार्थ वात पित्त प्रकृतीला थोडे अधिक दिले तरी चालते पण कफ प्रकृतीला मात्र मर्यादित प्रमाणात देणे चांगले. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य नीट रहावे यासाठी तांदूळ भाजून घेणे, कणीक भाजून घेणे यासारख्या साध्या उपायांचाही अधिक उपयोग होतो.


       कुटुंबाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन खेळ खेळण्याचा, सर्वांनी मिळून सहलीला जाण्याचा, कांहीतरी वेगळे उपक्रम करण्याचा उपयोग होत असतो. यातही कुटुंबातील सर्व सदस्यांचा विचार करायला हवा. उदा. वातपित्तात्मक प्रकृतीला अधिक धावपळ, दगदग सहन होत नाही, तर कफ प्रकृतीला शारीरिक हालचाली न करता एका ठिकाणी फार वेळ बसणे हितावह नसते. व्यायामाच्या बाबतीतही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे गोष्टी संतुलन साधणाऱ्या असल्याने घरातील सर्वांसाठी अनुकूल असतात, मात्र त्यांचे प्रमाण तब्बेतीला सोसवेल असे असावे. दमछाक करणारे, घामाघूम करणारे व्यायाम करू नयेत. सहलीला जातानाही असे ठिकाण निवडावे की जेथे कुटुंबातील सर्वांनाच आनंद घेता येईल. कुटुंबात आजी आजोबांनी अशा ठिकाणी जावे, जिथे चढ उतार करायची आवश्यकता भासणार नाही, दगदग होणार नाही.


       कौटुंबिक आरोग्याचा विचार करतांना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. घरातील सगळ्यांनी रोज किमान एकदा तरी एकत्र बसून जेवण करावे. याचा कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो. कुटूंबातील सर्वांना एकमेकांविषयी आदर व प्रेम असणे आवश्यक आहे.


       सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब ही संकल्पना मर्यादित ठेवू नये. घरातील लोक हे जसे कुटुंबातील असतात तसेच इमारतीतील किंवा कॉलोनीतील, आजूबाजूला राहणारे लोक मिळूनही एक मोठे कुटूंबच असते. आपल्या घरात काही समारंभ असला, लग्नकार्य असले तर  मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा किंवा वेळीअवेळी फटाके वाजविण्याचा आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवावे.


कुटूंबाच्या आरोग्याविषयी मौलिक टिप्स:

  • सर्वांनी रोज सकाळी भिजवलेले बदाम किंवा सुक्या मेव्यातील इतर पदार्थ खावेत.
  • रोजच्या आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा.
  • लहान मुलांना शारीरिक खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे. सातत्याने टीव्ही किंवा कॉम्प्युटर समोर बसून राहण्याची सवय लागणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • कुटुंबातील सर्वांनीच रात्री जड पदार्थ खाणे टाळावे. विशेषतः मांसाहार, तळलेले पदार्थ टाळावेत.
  • कुटुंबातील व्यक्तींच्या साध्यासुध्या तक्रारीवर उदा. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अपचन, हातपाय मुरगाळणे वगैरे साठी घरगुती उपाय करावेत. त्यासाठीचा किट तयार ठेवावा.
  • ऋतुनुसार हवामानात होणाऱ्या बदलांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या आहार आचरणात योग्य ते बदल करावेत. उदा. पावसाळ्यात पाणी उकळून पिणे, उन्हाळ्यात पित्त वाढविणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, हिवाळ्यात धातपोषक गोष्टींचे आवर्जून सेवन करावे.
  • अंगाला तेल लावणे, पाठीला तेल लावणे, यासारख्या गोष्टी कुटुंबातील सर्वांनाच हितकर असतात. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे वेळ काढला तर आरोग्य टिकेलच पण स्नेहबंध टिकायलाही हातभार लागेल.
  • स्वयंपाक करताना नुसत्या चवीचा विचार न करता आयुर्वेदिक संस्काराना महत्त्व द्यावे. केशर, डिंक, सुकामेवा, पालेभाज्या, फळभाज्या यांचा वापर योग्य प्रकारे करावा त्यामुळे स्वयंपाक चवदार बनेलच पण कुटूंबाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत मिळेल.


कोरोनासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी महत्वाच्या टिप्स...

  • आपले लक्ष आपण आरोग्यदायी होण्याकडे द्या. विनाकारण भिती बाळगू नका, काळजी करू नका, काळजी घ्या.
  • सतत कार्यमग्न रहा.
  • सकस आहार घ्या, अति खाणे पिणे टाळा.
  • व्यायाम किंवा शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल होईल असा व्यायाम करा.
  • सतत नवा विचार करा.
  • मनात निर्माण झालेले प्रश्न दाबून टाकू नका, त्यांची उत्तरे शोधा.
  • एखादा छंद जोपासा. एखादी कला आत्मसात करा, त्यात रममाण व्हा.
  • जे कच्चे खाता येते ते भाजून खाऊ नका, जे भाजून खाता येते ते शिजवून खाऊ नका, जे शिजवून खाता येते ते तळून खाऊ नका.
  • सकाळी नाष्टा राजासारखा घ्या. दुपारी प्रधानासारखा मध्यम आहार घ्या. रात्री मात्र भिकाऱ्याप्रमाणे अगदी थोडासाच हातावर मावेल एवढाच आहार घ्या.


अशा प्रकारे स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


शनिवार, २७ मार्च, २०२१

होळी पौर्णिमा - विशेष लेख


होळी पौर्णिमा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       वसंत ऋतूच्या च्या आगमनाची  सूचना देणारा होळी हा सण फाल्गुन शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या सणास होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, किंवा वसंतोत्सव असे म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला जातो, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो. यावेळी जत्रा-यात्रा उत्साहात सुरू असतात. कुस्त्यांचे फड, बैलांच्या शर्यती गाजत असतात. धरणीमाता हिरव्या पानाफुलांनी बहरलेली असते. शेतकऱ्यांची घरे धान्यांनी भरलेली असतात. त्यामुळे सर्वांची मनेही नवतेजाने बहरलेली असतात. हिवाळ्याची बोचरी थंडी दूर पळालेली असते. हा सर्व आनंद द्विगुणीत करण्यासाठी होळीचा सण येतो.  होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी असते.


होळी हा सण का साजरा करतात याविषयीच्या पौराणिक कथा....

       हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. या भक्तीपासून त्याला परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला. त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरीही प्रल्हादावर त्याचा कांहीही परिणाम झाला नाही. तो जसाच्या तसा राहिला. शेवटी दैत्यराज हिरण्यकश्यपूची बहीण होलिका उर्फ ढुंढा म्हणाली, "मला वर लाभल्यामुळे आगीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन आगीत बसते. प्रल्हाद जळून जाईल, मला कांहीच होणार नाही." ठरल्याप्रमाणे भक्त प्रल्हादास जिवंत जाळण्याच्या उद्देशाने होलिका प्रल्हाद यास मांडीवर घेऊन धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. सभोवताली गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य वर मिळविलेली होलिका आगीत जळून भस्म झाली. प्रल्हाद मात्र आगीतून नारायण नारायण म्हणत सुखरूप बाहेर पडला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तावून सुलाखून शुद्ध बनले. भक्त प्रल्हादाने जणू अग्नी परीक्षाच दिली. या आनंदाप्रीत्यर्थ होळी हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली.


       श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी कंसमामाने पुतना या राक्षसीला गोकुळात पाठविले. तिने एका तरुण सुंदर स्त्रीचे रुप घेतले होते. तिने श्रीकृष्णाला जवळ बोलविले. श्रीकृष्णाने तिचा कावा ओळखला व तिला ठार केले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा. नंतर गोकुळातील गवळ्यांनी मयत झालेल्या पुतनाच्या देहाला गोवऱ्या रचून, होळी करून अग्नी दिला. अमंगलाचा नाश झाल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद पसरला. तो दिवस गोकुळवासियांनी आनंदाने साजरा केला, त्या दिवसाची आठवण म्हणून होळी साजरी करतात.


       होळी संदर्भात आणखी एक कथा पुराणात प्रसिद्ध आहे. ती क्रुतयुगातील रघु नावाच्या राजाची. रघु राजाच्या राज्यात 'ढौढा' नावाच्या राक्षसीने हैदोस माजविला होता. सर्व प्रजाजन राजाकडे संरक्षण मागण्यास आले. चिंताग्रस्त रघुराजाने वशिष्ठ मुनींना तिच्या नाशासंबधी उपाय शोधण्याची विनंती केली. ढौढा राक्षसीने कठोर तपश्चर्या करून शंकरास प्रसन्न करून घेतले होते, व त्यांच्याकडून देव, दानव व मानव यापासून तिन्ही ऋतूत कोणत्याही शस्त्रापासून मला मरण येणार नाही असा वर मागितला होता. वर देतांना शंकरानेही एक अट घातली होती, की हिवाळ्याच्या अखेरीस व उन्हाळ्याच्या सुरवातीस अग्नी पेटवून तिला शिव्या देऊन हुसकावून लावले तर ती पळून जाईल. हीच ती आपली होळी दुष्टांना पळवून लावणारी. 


       या सर्व कथामधून एक गोष्ट आपणास दिसून येते की या कथात राक्षसी इतरांना त्रास देत होत्या, त्यावर उपाय म्हणून त्यांना ठार करून दहन केले गेले. पुराणकाळात ते ठीक होते. पण आजच्या काळात होळी अशी साजरी करावी...


आधुनिक होळी:

सद्या दुष्ट, राक्षसी प्रवृत्तीचे दहन करून होळी साजरी करावी. हवेतील प्रदूषण वाढवून, लाकूडतोड करून सण साजरा करणे योग्य नव्हे. गांवातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकाच पटांगणात गावातील कचरा जाळून होळी करावी. वेगवेगळ्या रसायनांनी युक्त रंग एकमेकांच्या शरीरावर फासून रंगपंचमी साजरी न करता अतिशय सौम्य रंग वापरून आनंदाने हा सण साजरा करावा. होळीसाठी झाडे न तोडता टाकाऊ पालापाचोळा, कचरा जाळावा. दुसऱ्याला हानी किंवा इजा होणार नाही याची खबरदारी घेऊनच होळी व रंगपंचमी साजरी करावी. झाडे तोडण्यापेक्षा प्रत्येकाने एक झाड लावून नवा उपक्रम सुरु करावा. संस्कृती व प्रगती यांना हाताशी धरुनच सण साजरे करावेत.


       होळी भोवती पाणी शिंपडून रांगोळी घालून मंगल वाद्यांच्या गजरात होळीची पूजा केली जाते. पेटलेल्या होळीत अनेकजण पोळी, नारळ, पैसे, सुपाऱ्या टाकतात. हे सर्व न करता या वस्तू गरजूना दान कराव्यात. होळी लहान करा व पोळी दान करा हा मंत्र सर्वांनी आचरणात आणावा त्यामुळे गरीबांना दोन घास गोडधोड मिळतील. देणाऱ्याला समाधान मिळेल.


       होळीभोवती फिरताना बोंब मारण्याची प्रथा आहे. होळीभोवती पुराणकथा सांगतात, पोवाडे, कीर्तने यातून पूर्वजांचा पराक्रम सांगितला जातो. खेडेगावात लोकगीतांना ऊत येतो. ही गीते स्वयंस्फूर्त व स्वरचित असतात. त्यात निर्मळ विनोद व खट्याळ टीकाही असते. आज या गोष्टीतून लोकांचे प्रबोधन व्हावे.


       गावाच्या मध्यभागी किंवा चव्हाट्यावर एरंड, आंबा, माड, पोकळ इत्यादी झाडांची फांदी जमिनीत खोल खड्डा करून त्यात उभारली जाते. म्हणून या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असेही म्हणतात. होळी पूर्ण झाल्यानंतर ती दूध, तूप घालून शांत केली जाते. जमलेल्या लोकांना खोबरं गूळ, पपनस, केळी ही फळे वाटली जातात. दुसऱ्या दिवशी होळीची रक्षा विसर्जित करतात. कांही ठिकाणी ही रक्षा चिखल शेण दुसऱ्याच्या अंगावर मारतात वाट अडवून पैसे मागतात ही प्रथा बंद व्हावी. कांही ठिकाणी ही रक्षा अंगाला लावून डान्स करण्याची पद्धत आहे. म्हणून म्हटले आहे...।

होळी रे होळी, पुरणाची पोळी।

धुलवडीचा रंग खेळी, सोंगट्यांची टोळी।


होळीचा संदेश:

       पूर्ण चंद्राच्या साक्षीने साजरा होणारा हा सण आकाशातील चंद्र आणि चांदण्याचे सौंदर्य टिपून, मन प्रसन्न करणारा सण आहे. गोडधोड करून खाण्याचा, नृत्य गायनाचा, मनसोक्त रंग उधळण करण्याचा आणि नववर्षाच्या आगमनाचे स्वागत करणारा हा सण होय. मनातील दुष्ट भावना, क्लेश, वाईट वृत्तींचे दहन होळीत करून वसंत ऋतूच्या आगमनाने जशी सृष्टी हिरवीगार शाल पांघरून जीवनसृष्टीला आनंदित करते त्याप्रमाणे आपणही तन, मन आनंदित, प्रसन्न ठेवून जीवनात आनंदी वृत्ती जोपासावी हा संदेश देणारा हा सण पर्यावरणाचे रक्षण करत नवविचारांनी प्रेरित होवून साजरा करू या।म्हणू या....

आला आला होळीचा सण।

आनंदून गेले तन आणि मन।


सोमवार, २२ मार्च, २०२१

महान क्रांतिकारक भगतसिंग - विशेष लेख

 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी फाशी दिली. आज त्यांचा शहीद दिन त्यानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली..... 


महान क्रांतिकारक भगतसिंग - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       शहीद भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी प. पंजाबमधील म्हणजेच विद्यमान पाकिस्तान मधील बंग जिल्हा ल्यालपूर या गांवी एका शेतकरी देशभक्त शीख कुटूंबात झाला. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतिकारी वाग्मयाचा प्रसार केल्याबद्दल दहा महिन्याची शिक्षा झाली होती. १९०९ साली प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी. ए. झाले. विद्यार्थीदशेत जयचंद्र विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरबा यांना दिलेली फाशी (१९१५), रौलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यासारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगांनी आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित करून १९२३ मध्ये हिंदूस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लवकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. स्वातंत्र्य मिळविण्याच्या लढाईत त्यावेळी दोन मार्ग होते. एक होता जहाल गट व दुसरा होता मवाळ गट. त्यापैकी भगतसिंग हे जहाल गटातील होते. वास्तविक प्रथमतः भगतसिंग हे महात्मा गांधीजींच्या विचाराने भारावून शिक्षण सोडून महात्मा गांधींच्या असहकार अंदोलनात सामील झाले होते, परंतु १९२२ मध्ये चौरीचौरा या ठिकाणी पोलिसांवर जनतेकडून झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. भगतसिंग नॅशनल कॉलेजमध्ये असताना भगतसिंग, सुखदेव, भगवतीचरण, यशपाल, रामचंद्र कपूर यांनी 'नौजवान भारत सभेची' स्थापना केली. या सभेचे भगतसिंग जनरल सेक्रेटरी व भगवती चरण प्रचार सेक्रेटरी होते. नौजवान भारत सभेचे उद्दिष्ट तडजोडवादी दृष्टीकोनाशी वैचारिक संघर्ष करून जनतेला क्रांतिकारक अंदोलनात सहभागी करणे हे होते. त्याचबरोबर जातिधर्माचे भेद नष्ट करून जनतेची एकजूट उभी करणे हासुद्धा उद्देश होता त्यासाठी नौजवान भारत सभेतर्फे लाहोर कोर्टात फाशी गेलेल्या कर्तारसिंगांचा गौरव करणारी जाहीर सभा लाहोरच्या बरसीबाँडला हॉलमध्ये घेऊन क्रांतीचा पुरस्कार करण्यात आला. नौजवान भारत सभेचे आणखी एक उद्दिष्ट होते ते म्हणजे कामगार शेतकऱ्यांचे गणराज्य स्थापन करून माणसाने माणसाची चालविलेली पिळवणूक नष्ट करणे. इन्कलाब झिंदाबाद व हिंदूस्थान झिंदाबाद या त्यांच्या प्रमुख घोषणा होत्या.


       मध्यंतरी भगतसिंग यांनी लाहोर व्यतिरिक्त दिल्ली, कानपूर, बंगाल आदी ठिकाणी असलेल्या क्रांतिकारकांशी संपर्क साधण्यासाठी लाहोर सोडले होते. त्यांचे वडील त्यांना लग्नासाठी सतत विचारत होते. हेसुध्दा लाहोर सोडण्याचे दुसरे कारण होते. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही असा त्यांनी निश्चयच केला होता. 


       भगतसिंग आणि त्याचा मित्र बाबूसिंग यांना लाहोरमध्ये घडलेल्या एका बाँबस्फोटामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली, परंतु भगतसिंग यांच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. भगतसिंगांना लालूच दाखवून खोटी साक्ष देण्यासाठी फोडण्याचे प्रयत्न देखील सरकारने केले पण भगतसिंगांनी त्यांना साथ दिली नाही. त्यांना चाळीस हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. पण ते पैसे भरु शकत नसल्यामुळे अखेर पंजाब असेंब्लीमध्ये याबाबत चा प्रश्न एका सदस्याने उपस्थित केल्यानंतर भगतसिंग यांच्यावरील जामिनीची अट रद्द करून त्यांची सुटका झाली.

       

       भगतसिंग यांनी भूमिगत राहून कार्य करण्यास सुरूवात केली. भारताला कोणत्या राजकीय सुधारणा द्याव्यात याच्या शिफारशी करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या सायमन कमिशनवर एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे त्याविरोधात भारतात प्रचंड जनक्षोभ उसळला. या कमिशन विरोधात नौजवान भारत सभेने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. त्यावर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केला. त्यात लाला लजपतराय यांचे निधन झाले. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी लालाजींच्या हत्येबद्दल ब्रिटिशांना धडा शिकविण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सोंडर्स याचा वध केला व वधाच्या समर्थनार्थ तशी पत्रके वाटली.


       भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली. शिवा वर्मा, किशोरीलाल, गयाप्रसाद, जयदेव कपूर, विजयकुमार सिन्हा, महावीरसिंह आणि कमलापती तिवारी यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. इतरांना ही दीर्घ मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या. या खटल्याचा निकाल ऐकताच देशभर त्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उसळल्या. ठिकठिकाणी निदर्शने झाली. कामगारांनी संप केले. शहरात हरताळ झाले. त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनी मुंबईतील 'प्रगती' च्या १६ ऑक्टोबर १९३० च्या अंकात म्हटले आहे, "महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा प्रसार सर्वात जास्त ज्या ठिकाणी झाला आहे, त्या मुंबईतील लोकांनी शिक्षेची वार्ता ऐकून अगदी कडकडीत हरताळ पाळला. आजपर्यंत गेल्या सहा महिन्यांच्या चळवळीत सुद्धा जेवढी गर्दी जमली नव्हती तेवढी सुमारे एक लाख लोकांची गर्दी येथील मैदानातील सभेस जमली होती. यावरून अखिल जनतेस या फाशीबद्दल काय वाटत आहे, याची कल्पना सरकारला येण्यासारखी आहे."


       त्यामुळेच भगतसिंग नावाच्या वादळासमोर ब्रिटीशांचा जुलमाचा वटवृक्ष उन्मळून पडला व लोकक्षोभ व भगतसिंगांच्या करारीपणाला घाबरून सर्व नियम व कायदे डावलून ब्रिटिशांनी भगतसिंगाना २४ मार्च ऐवजी २३ मार्च रोजीच फाशी दिली.


       भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळवला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यावेळी भगतसिंगांच्या वृद्धमाता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.


धन्य ती वीरमाता ! आणि धन्य तो तिचा क्रांतिकारी पुत्र !


बुधवार, १० मार्च, २०२१

मी बालिका बोलतेय.... - विशेष मराठी लेख.


मी बालिका बोलतेय......

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       खरं सांगू, माझ्या जन्मापासूनच नकारघंटा वाजायला सुरूवात झाली कारण, माझ्या आई-वडिलांना माझा जन्म होण्यापूर्वी एक धनाची पेटी व एक वंशाचा दिवा होता. 'पहिली बेटी धनाची पेटी' हे वाक्य ज्यानं कोणी पहिल्यांदा उच्चारलं त्या व्यक्तीला हार्दिक सलाम. कारण त्यामुळेच पहिल्याच मुलीचं स्वागत चांगलं होतं. तिच्या जन्माने धनाची पेटी घरात आली आहे, असे वाटते. त्याचवेळी कुणाला पहिला मुलगा झाला तर तोंड सुपाएवढं होतं. त्या मुलाच्या आईला सहजपणे म्हटलं जाते, 'नंबर मारलीस बाई, आता दुसऱ्यांदा काही का होईना'. 


तर मी सांगत होते माझ्या बद्दल,


४० वर्षापूर्वी चा तो काळ,


       मी आईच्या कुशीत असताना आमची आजी उठता बसता म्हणायची, 'एवढा मुलगा झाला की फार बरं होईल भावाला भाऊ असावा, पाठबळ होईल. मुलगी झाली तर दोघींच्या लग्नाचा भार माझ्या लेकावर पडेल.' आई-वडीलानाही आजीच म्हणणं पटायच, आई मनातल्या मनात देवाला नवस बोलायची की, 'एवढा मुलगा होवू दे म्हणून'. या पार्श्वभूमीवर माझा जन्म झाला. माझ्या जन्माने कुणालाच आनंद झाला नाही. अनिच्छेनेच माझा स्विकार झाला. केवळ नाईलाज म्हणून, टाकता येत नाही म्हणून त्या दोन भावंडाबरोबर माझे संगोपन सुरू झाले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात ना तसं! माझी दीदी धनाची पेटी असल्याने सर्वांची लाडकी होती. शिवाय ती दिसायला चांगली, गुटगुटीत व वृत्तीने शांत होती. त्यामुळे तिने सर्वांच्या हृदयात अढळपद प्राप्त केलेले होते. माझ्या दादाचे लाड इतके व्हायचे की, विचारूच नका. त्याला जबरदस्तीने दुधाचा ग्लास दिला जायचा. मला मात्र, मागून घ्यावा लागायचा. नशीब माझं मागितल्यावर तरी मिळत होतं. माझ्या काही मैत्रिणींना मागूनही दूध मिळायचं नाही. तिला मिळायच्या ताक कण्या. वर ऐकावं लागायचं की, 'हिला दुध देवून काय पैलवान करायच आहे काय?' उलट तब्बेत जाम झाली तर कोण पसंत करणार नाही, लग्न लवकर करावे लागेल, खपली नाही लवकर तर हुंडा जास्त द्यावा लागेल. खर्च जास्त करावा लागेल. माझा दादा अती लाडामुळे हट्टी बनला होता. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला जायचा न रागावता. मी एखादा हट्ट केला, की मला कळायला लागल्यापासून ऐकत होते, की मुलीच्या जातीनं असले हट्ट-बीट्ट काही करू नयेत. मुलीला परक्या घरी नांदायला जायचं आहे. तिथं असा हट्ट अजिबात चालायचा नाही. नांदण्याचं चांदण होईल. मुलीनं देईल ते घ्यावं आणि मिळेल ते खावं. मी रडायला सुरूवात केली तरी कुणी फारसं लक्ष द्यायचं नाही. पण, दादा रडायला लागला, की म्हटलं जायचं, 'बायकासारखा मुळमुळू रडतोस कशाला?' ते ऐकून दादाला वाटायचं मी कुणीतरी स्पेशल आहे. मी रडायच नसतं. जमलं तर दुसऱ्याला रडवायचं असतं. मला आठवतंय, की अगदी लहान असताना दादानं दीदीची एक बांगडी घेवून हातात घातली तर लगेच आजोबा त्याला म्हणाले, 'अरे मर्दा बांगड्या घालायला काय मुलगी आहेस काय?' त्या वेळीच दादाच्या मनात पक्क रूजलं, की मी मर्द आहे आणि बांगड्या घालणं हे बायकांचे काम आहे.


       दादा सुट्टीच्या दिवशी दिवसभर मित्राबरोबर खेळायला जायचा. रात्री उशिरा आला तरी घरातले लोक त्याला काही म्हणायचे नाहीत. मला व दीदीला मात्र सक्त ताकीद दिली जायची, की पाचच्या आत घरात यायला पाहिजे. एवढ्या लहान वयातही आम्हाला वाटायचं, की दादाचं आपलं बरं आहे. आपणही मुलगा असतो तर बरं झालं असतं! घरात दररोज दादाच्या आवडीचेच पदार्थ असायचे. भाज्या त्याच्या आवडीच्याच केल्या जायच्या. दादाची आवड आमची आवड सक्तीने बनली होती. नशीब त्याच्या आवडीची का असेना भाजी आम्हा दोघींना पोटभर अन्न मिळायचे. माझ्या काही मैत्रीणींना ही भाजीही मिळत नव्हती. ताक-कण्या, आमटी-भाकरीवरच भागवावे लागायचे. धुणं, भांडी, स्वयंपाक इतरांप्रमाणे माझ्या पाचवीलाच पुजलेला होता. त्या कामात सफाईदारपणा, निटनेटकेपणा येण्यासाठी आजी, आई, काकी म्हणायच्या की, "मुलीच्या जातीला हे काम सुटलेलं नाही. कितीही शाळा शिकलीस ना तरी तुला भांडी घासावीच लागतील, धुणं धुवावचं लागेल, स्वयंपाक करून वाढणं तरी तुझं आद्य कर्तव्य आहे. स्वयंपाक करणं हा तुझा जन्मसिध्द हक्क आहे. तो हक्क हक्काने स्विकारण्यातच तुझं भलं आहे." आई वारंवार आठवण करून द्यायची, की स्वयंपाक नीट कर, भाकरी नीट भाज. उद्या तुझ्या सासरी माझे नाव निघेल, तुझी सासू म्हणेल, की हेच शिकवलयं का तुझ्या आईन?


       दादा मस्तपैकी खेळून यायचा. आवडीच्या पदार्थांनी भरलेले ताट त्याच्या समोर ठेवलं जायचं. त्याचवेळी मला ऐकाव लागायचं, की हे पातेलं नीट घासलं नाहीस, दादाचा शर्ट नीट धुतला नाहीस, कॉलरला साबण लावला नाहीस, आज भाकऱ्या फुगल्याच नाहीत, काठ जाड झालेत इ. सूचनांचे डोस मिळायचे. कपडे खरेदी करतानाही माझ्या वाट्याला नवे कपडे कमीच मिळायचे कारण दीदी-दादांचे न बसणारे कपडे मला मिळायचे. घरकाम करत मी शिकत होते. दादा मॅट्रीकला गेल्यावर त्याला नवी सायकल मिळाली. त्याला ज्यादा तासाला जाता यावे म्हणून, पण मी जेंव्हा मॅट्रीकला गेले तेव्हा ज्यादा तासाला पायी जाणेही अशक्य होते कारण एवढ्या लवकर ज्यादा तासाला गेले तर धुण-भांडी, पाणी कोण भरणार?, आईला स्वयंपाकात मदत कोण करणार? तिला बिचारीला घरातील कामे आवरून शेतात जावे लागायचे. तरीही मी शिकत होते. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात मन लावून अभ्यास करत होते. त्यावेळी वारंवार ऐकावं लागायचं, की हिला शिकवून काय उपयोग? हे तर परक्याचं धन. शिकून नोकरी लागली तरी पगार तिच्या नवऱ्यालाच मिळणार, दादाला पन्नास टक्के मार्क्स मिळाले तरी कौतुक व्हायचे. त्याला शिकवण्यासाठी, डॉक्टर इंजिनिअर बनवण्यासाठी कर्ज काढायचीही तयारी असायची आई-बाबांची. पण मला फर्स्ट क्लास मिळाला तरी विशेष कौतुक वाटायचं नाही कारण आई-वडीलापुढे प्रश्न होता, हिला जास्त शिकवलं तर जास्त शिकलेलं स्थळ शोधावं लागेल. जास्त खर्च करावा लागेल. बरोबरच होतं माझ्या आई-बाबांचे!


सोमवार, ८ मार्च, २०२१

लेकापरीस लेक, कशानं झाली उणी? - विशेष लेख

 

८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या, चिंतनपर, हृदयस्पर्शी, उद्बोधनात्मक, वैचारिक लेखमालिका खास रसिक वाचक बंधूभगिनींसाठी........


लेखपुष्प तिसरे


लेकापरीस लेक, कशानं झाली उणी? - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल

८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साऱ्या जगभर साजरा केला जातो. हा दिवस कुणी सुरू केला व कशा प्रकारे सुरू झाला ते पाहू...


इतिहास:

       सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी इंग्लंड व अमेरिकेत कापडांचे व तयार कपड्यांचे कारखाने व गिरण्या निघाल्या. या गिरण्यांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात काम करू लागल्या पण त्यांना मजुरी मात्र अगदी थोडी मिळत असे. त्यामुळे त्या स्त्रियानी न्यूयॉर्क शहरातील कापड कारखान्यात ८ मार्च १९०८ साली संघर्ष उभारला. कामाचे तास सोळाऐवजी कमी व्हावेत आणि मजुरी वाढवावी यासाठी लढा दिला. अमेरिकन सरकारने त्यांच्यावर लाठीमार केला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचे अधिकार मागण्यांसाठी केलेला हा पहिला संघर्ष होता.


       १९९० साली विविध देशातील महिला प्रतिनिधींची परिषद कोपनहेगन येथे झाली. त्या परिषदेत जर्मनीतील कार्य कर्ती क्लारा झेटकी हिने ८ मार्च हा दिवस महिलांनी जगभर साजरा करावा, असे सुचविले व सर्वांनी या सूचनेस मान्यता दिली. अन्याय अत्याचाराविरुद्ध महिलांनी संघटित होऊन उठविलेल्या संघर्षाची ही खूण होती.


       ८ मार्च १९१७ ला जर्मनीतील महिलांनी घुसखोरी विरूद्ध आवाज उठविला. शांततेची मागणी केली. मार्च १९१७ ला रशियातील कापड कामगार महिलांनी निदर्शने केली होती.


आजची परिस्थिती:

       स्त्रियामधील शक्तीची जाणीव या महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना करून दिली जाते. हा दिवस स्त्री आंदोलनाच्या प्रेरणेचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आपल्या देशातही गेल्या वीस वर्षांत हा दिवस गावागावापर्यंत पोहचला आहे. स्त्रियांनी लढा देऊन मिळविलेल्या हक्कांची या दिवशी आठवण केली जाते. अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात.


       स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांत उज्ज्वल यश मिळविले आहे. त्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सुजाण व सबल झाल्या आहेत. महिलांनी आपल्या प्रतिभेच्या अविष्कारातून आम्हीही कांही कमी नाही, हे सिध्द करून पुरुषप्रधान समाजाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. रूढी परंपरेच्या जोखडाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रीने प्राप्त परिस्थिती, नैसर्गिक मर्यादा आणि उपजत कौशल्य व मेहनतीने आज चारी मुलखी आपला लौकिक वाढविला आहे. कोणतेही क्षेत्र स्त्रीने आपल्या प्रतिभेपासून वंचित ठेवलेले नाही.


       एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समानतेच्या कितीही घोषणा ऐकू येत असल्या तरी स्त्रियांची स्थिती शंभर टक्के सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ती उभी असली तरी ती अनेक बंधनातून आजही मुक्त झाली नाही. समाजात यशस्वीपणे वावरणाऱ्या महिलांची संख्या वीस टक्के असावी असा अंदाज आहे. बाकीच्या ऐंशी टक्के महिलांची काय अवस्था आहे? या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? याविषयी विचार करताना महिलाच जबाबदार आहेत, हे आपणास नाईलाजाने मान्य करावेच लागेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. गर्भजल चाचणी करून मुलीचा गर्भ काढून टाकण्याची प्रवृत्ती हे कशाचे निदर्शक आहे? २०११ च्या जनगणनेत स्त्रियांचे दर हजारी प्रमाण घटत चालल्याचे दिसून आले आहे, दिसत आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. शासनाला अशा प्रकारचा गर्भपातविरोधी कायदा करावा लागला, गर्भजल तपासणीवर बंदी  करावी लागली. पण आजही कमी अधिक प्रमाणात असे प्रकार घडतच आहेत, याला कारणीभूत स्त्रीच असते कारण आईला, आजीला, मावशीला, बहिणीला, वहिनीलाच मुलगी नको असते, त्यांना वंशाचा दिवा हवा असतो. या वंशाच्या दिव्याचा प्रकाश कसा पडतो हे माहिती असूनही स्त्री गर्भजल चाचणी करून गर्भपात करण्यास तयार होते. तिने या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला पाहिजे ना? समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या स्त्री डॉक्टरकडून असा गर्भपात होतो ही गोष्ट दुर्दैवीच म्हणावी लागेल.


       हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घ्यायला हवा. मुलगा मुलगी समानता दाखविणारे एक पारंपारिक लोकगीत मला आठवले ते असे.....


ल्येकापरीस लेक कशानं झाली उणी?

एका कशीची रतंनं ही दोनी।

लेकीच्या आईला, कुणी म्हणू नका हलकी।

लेकाच्या आईला, कुणी दिलीया पालकी।


       अशिक्षित, अडाणी समजल्या जाणाऱ्या पारंपरिक स्त्रियांची ही समज आजच्या सुशिक्षित स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल. या लोकगीताचा मतितार्थ जाणून घेऊन आपण सर्व स्त्रियांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की, मी मुलीचा गर्भपात करून घेणार नाही, असा प्रकार लक्षात आला तर त्या स्त्रीला त्यापासून दूर करण्यासाठी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करीन.