बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

इस्लाम : स्त्री-पुरुष समानता

इस्लाम : स्त्री-पुरुष समानता




         पैगंबर हजरत मुहम्मद सलेअल्लाहु अलैहिवस्सलम यांच्या जीवनशैलीने आणि ते प्रचार-प्रसार करीत असलेल्या इस्लाम धर्माने प्रभावित होऊन ज्या प्रकारे असंख्य पुरूष इस्लाम धर्मात दाखल झाले, त्याप्रमाणे असंख्य महिलांनी देखील इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची जबाबदारी स्वतः पैगंबर साहेबांवर होती. ते त्या स्त्रियांच्या कुटूंबातील ज्येष्ठ म्हणजे आई, वडिल, भाऊ अथवा मामा, चुलते यांना या आधुनिक आणि प्रगत धर्माच्या अनेक बाबींचे शिक्षण प्रशिक्षण देत असत. पैगंबर साहेबांची कार्यमग्नता आणि गोषापर्दा यामुळे स्त्रियांबरोबर ते थेट संवाद साधत नसत. या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी विशेषतः आएशा रजिअल्लाहुतआला अन्हा त्यांच्या सर्वात मोठ्या सहकारी होत्या. त्या पैगंबर साहेबांच्या देहावसानंतर अर्धशतक हयात राहिल्या आणि त्यांनी सर्व मर्यादा सांभाळून या प्रबोधन कार्याचा विडा उचलला त्या खूप प्रतिभाशाली आणि बुध्दीमान होत्या. त्यांची स्मरण शक्ती अप्रतिम होती.


          इस्लामच्या उदयकाळात शत्रूनी या नवजात राज्यावर चोहीकडून हल्ला चढविला होता. अशा धर्मयुध्दात पैगंबर साहेबांच्या अनुमतीने महिलादेखील भाग घ्यायच्या. जखमींची मलमपट्टी करणे, त्यांना पाणी पाजणे, रणसामग्री आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करणे हे त्यांचे विशेष कार्य होते. काही प्रसंगी या महिलांनी सशस्त्र लढासुध्दा दिल्याची इतिहासात नोंद आहे. स्त्रियांना गोषा-पर्दा पाळण्याचे आदेश असलेतरी असे नाही की त्यांना सामाजिक कार्यातून वंचित करण्यात आले होते. युध्द केव्हातरी होते. परंतु, दैनंदिन जीवनातील अनेक कामे दररोज करावी लागतात. ही कामे स्त्री व पुरूष दोघांनी समान सामाजिक पातळीवर कायम राहून पार पाडण्याची मुभा इस्लाम धर्माने नैतिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या शर्तीवर दिली आहे.


         हजरत मुहम्मद पैगंबर सलेअल्लाहु अलैवस्सलम एक क्रांतिकारी प्रेषित, धर्मवेत्ते आणि धर्मपारायण होते. त्यांनी केवळ धर्मप्रचार आणि प्रवचनावरच भर दिला नसून प्रत्येक काम प्रत्यक्ष कृतीने आणि व्यवहारातून करून दाखविले. संपूर्ण पृथ्वी त्यांची कर्मभूमी होती. त्यांचे प्रत्येक कार्य प्रलयापर्यंत साक्षी म्हणून जगणार होते म्हणून त्यांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत पारदर्शक आदेश दिले. संपूर्ण पृथ्वी त्यांची कर्मभूमी असली तरी मदिना त्यांचे केंद्रबिंदू होते. त्यांनी मदिनेत एका  अत्याधुनिक बाजारपेठेची स्थापना केली. त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अनेक लोकांवर टाकली. त्यात अनेक महिलांचा देखील समावेश होता. सिग्रह बिन्त महारबा शिफा बिन्त अब्दुल्लाह, अस्मा बिन्त महारबा, खौला बिन्त सुवैब, मलिका उम्मे साएब आणि कीला अन्नमारिया इत्यादींची नावे उल्लेखनीय आहेत. त्यांच्या मदतीकरिता पुरूषांचा देखील समावेश करण्यात आला होता आणि या ग्रुपला जवळजवळ एका मंत्रालयाचे रूप प्राप्त झाले होते. या महिला कुशलतापूर्वक बाजारपेठेची कामे करायच्या. भाव, वजन, आयात, निर्यात, व्यापाऱ्यांची बसण्याची जागा, रहदारी, बाजार व्यवस्थापन, ग्राहक, सरकार व व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे या सर्व बाबींवर या स्त्रियांचेच नियंत्रण होते. त्यांनी ठरवून दिलेले भाव, वजन, नाण्यांचे मूल्य आणि गाहाण्यांचे निराकरण आजही आपणां सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.


           पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी स्त्री - पुरूष समानतेचे दर्शन घडवू आणले आहे. आणि तसे आदेशही दिले आहेत. मक्कावासियांच्या छळाला कंटाळून श्रध्दावंतांनी मदिनेकडे हिजरत म्हणजेच प्रयाण पत्करले होते. हा प्रवास आणि स्वदेश त्याग काही साधीसोपी गोष्ट नव्हती. बेबंदशाहीच्या काळात मुलाबाळांच्या समवेत, रखरखत्या वाळवंटातून साडेचारशे किलोमीटर गाठणे जिवापलिकडचे काम होते. हा मानसिक आणि शारिरिक त्रास पुरूषांबरोबर स्त्रियांनी देखील भोगला. पवित्र कुरआन त्यांना कोणत्या शब्दात सांत्वना देत आहे पहा...!


         "मी तुमच्यापैकी कोणाचेही कष्ट वाया घालविणार नाही, मग तो पुरूष असो वा स्त्री. तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले. त्यांचे सर्व अपराध दाखल करीन ज्यांच्याखालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि तो सर्वोत्तम आहे" असे कुरआनच्या तिसऱ्या भागात, अलिइमान या अध्यायात १९५ व्या श्लोकात म्हटले आहे.


          सांगायचे तात्पर्य एवढेच की, अल्लाहच्या दरबारात स्त्री व पुरूष दोघांना समान लेखले गेले आहे. त्यामुळे स्त्रियांना आपोआप शक्ती प्राप्त झाली आहे.

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

बीमार की इयादत -आजारी व्यक्तीला भेटणे

 बीमार की इयादत -आजारी व्यक्तीला भेटणे



        आपल्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना आपल्या सद्व्तनाने, गोड आचरणाने उल्हसित करून तिला आनंदित करण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. आपल्या जाण्याने, धीराच्या दोन शब्दांनी थोडा वेळ जरी त्या व्यक्तीला दुःखाचा किंवा काळजीचा विसर पडला तर आपल्या हातून एक मोठे पुण्यकर्म झाले अशी भावना आपण बाळगली पाहिजे. आजारी व्यक्तीच्या समाचारास जाणे, याला बीमार की इयादत म्हणतात. इस्लाम धर्मात हे पुण्य कर्म मानले जाते.


        यासंबंधी हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम म्हणतात, 'ज्यावेळी तुम्ही रोग्याच्या समाचाराकरिता जाता त्यावेळी त्याच्याशी समाधान देणाऱ्या, आनंद देणाऱ्या गोष्टी करून त्या आजारी व्यक्तीला त्याच्या दुःखाचा, वेदनेचा विसर पाडा आणि तू लवकर बरा होवून पुष्कळ वर्षे जगशील असा धीर द्या. तुमच्या बोलण्याने जे होणार आहे ते टळणारे नसले तरी त्यामुळे आजारी व्यक्तीच्या मनाला थोडीतरी प्रसन्नता प्राप्त होईल. दिलासा मिळेल. रोगी आसन्नमरण झाला असला, त्याच्या विषयीच्या सर्व आशा सुटल्या तरी आपण त्याला धीर दिला पाहिजे. आपण दिलेल्या धीराने, आपल्या गोड शब्दाने त्या बिचाऱ्याचे शेवटचे क्षण तरी आनंदात गेले. याबद्दलचे आत्मिक समाधान आपल्याला लाभते.


          काही लोक आजारी व्यक्तिला भेटण्यासाठी मिठाई, फळे, बिस्किटाचे पुडे घेवून जातात आणि आजारी व्यक्तिशी गंभीरपणाने संभाषण करतात. माझ्या अमक्या तमक्या नातेवाईकाला तुमच्यासारखाच आजार झाला होता. लाखोंनी पैसा खर्च केला, डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केला त्यांना वाचविण्याचा, पण यश आले नाही, गेला बिचारा ! अशाप्रकारे बोलतात. अशा बोलण्याने आजारी व्यक्तीचा धीर सुटतो. म्हणून भेटायला जाणाऱ्याने त्याच्यापुढे काय बोलावे व काय बोलू नये याबद्दल तारतम्य बाळगावे. त्याच्यापुढे सकारात्मक बोलावे. आजारातून ठणठणीत बरे झालेले उदाहरण द्यावे. आपुलकीने, हसतमुखाने बोलावे. आजारी व्यक्ती, त्यांची सेवा करणारे नातेवाईक यांच्या मनःस्थितीचा विचार करून बोलावे. आजारी व्यक्तीस त्रास होईल, इतरांना ऐकून कंटाळा येईल एवढा वेळ बसू नये. नाहीतर 'भीक नको पण कुत्रे आवर' या म्हणीप्रमाणे यापुढे बघायला येवू नका, तुमचे बोलणे बंद करा, अशी विनंती करण्याची पाळी येईल. बीमार की इयादतसंबंधी कुरआनमधील तपशील आता पाहू या. आपल्या अंतःकरणात प्रेमळपणाचा, परोपकाराचा ओलावा उत्पन्न झाल्याखेरीज दुसऱ्याशी सहृदयतेने, प्रेमळपणे वागता येणार नाही. प्रेमळ आचरण हे मुस्लिम धर्मास पूर्णत्व आणणारे महान साधन आहे.


हजरत अबू हुरैरह रजिअल्लाह यांचा हवाला देवून इस्लाम हदिसमध्ये खालील संवाद देण्यात आला आहे.


अल्लाह : हे आदमच्या पुत्रा, मी आजारी असताना तू माझी विचारपूस केली नाहीस.


मानव : हे अल्लाह ! तुझी विचारपूस मी कशी करू शकेन. तू तर सर्व जगाचा पालनकर्ता आहेस.


अल्लाह : अमका मनुष्य आजारी होता. त्याची बातमी तुला मिळाली नाही का? जर त्याच्या समाचारास तू गेला असतास तर माझी भेट तेथेच झाली असती, उपाशी व तहानलेल्या बाबतीतही असाच प्रश्न विचारला जाईल की अमूक मनुष्य उपाशी होता तर दुसरा तहानलेला होता जर तू त्यांना खायला अन्न दिले असतेस तर त्याच ठिकाणी तुला माझे दर्शन झाले असते.


         अल्लाहची कृपादृष्टी आपल्यावर पडावी अशी सद्भावना बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम मानवजातीवर प्रेम करावयास शिकले पाहिजे. अल्लाहना पहावेसे वाटते ते मनुष्याचे प्रेमळ मन, अंतःकरण आपण निर्माण केलेल्या मानवजातीवर प्रेमाची पखरण घालून तिचे दुःख दूर करणाऱ्या महाभागाकडे अल्लाहची मेहेरनजर चटकन् वळते. अल्लाह बेहद खूष होतात.


          इयादतीसंबंधी अनेक हदीस आहेत. त्यापैकी एक महत्वाच्या हदीसमध्ये म्हटले आहे. हजरत अबू हुरैरह रजिल्लाह फरमाते हैं कि नबी सल्लल्लाहने फरमाया, जब कोई किसी बीमार की पूछताछ करने जाता है तो एक पुकारनेवाला आसमान से पुकारकर कहता है, "तू अच्छा तेरा चलना अच्छा, तूने जन्नत में अपना घर बना लिया है।"


         हजरत सोबान रजिल्लाह रिवायत करते हैं कि नबी सल्लल्लाहु अलैहिवस्सलम ने फरमाया, जब कोई मुसलमान अपने मुसलमान भाईकी इयादत को जाता है तो वह जन्नत के बाग में होता है ।


        भाई बहनो ! अल्लाह के हुकूम से उपर दी गयी सूचनाओंका पालन करते हुए किसी बीमार की इयादत किया करो और इबादत का हिस्सेदार बनो.

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

वुजू व नमाज

 वुजू व नमाज



       प्रार्थना कुठलीही असो, दैनंदिन जीवनातून माणूस प्रार्थनेकडे वळला तर त्याला शूचिर्भूत होणे गरजेचे आहे. शूचिर्भूतता म्हणजे काय? तर अल्लाहच्या निकट जाण्याची शारीरिक अथवा मानसिक तयारी. नमाजपठण करण्याकरिता दिवसातून पाच वेळा वुजू करावी लागते. म्हणूनच प्रत्येक मशिदीत नमाज पठण करण्यापूर्वी बुजू करण्यासाठी पाण्याची उत्तम सोय केली जाते. वुजू करताना बसण्यासाठी आसन असते. एकाचवेळी पाच ते सात लोकांना वुजू करण्याची सोय असते.


       प्रत्येक नमाज पठण करण्यापूर्वी वुजू करण्याचे अर्थात शास्त्रशुध्द पध्दतीने तोंड, हात, पाय, धुण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पवित्र कुरआनमध्ये आदेश आहे की, हे श्रध्दावंतांनो जेव्हा तुम्ही नमाजपठण करण्यासाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड स्वच्छ धुवून, कानात व नाकात पाणी घालून बोटाने ते स्वच्छ करावेत. हात कोपरापर्यंत धुवावेत. डोक्यावर-मानेवर ओले हात फिरवावेत. पाय घोट्यापर्यंत धुवावेत. दिवसातून पाच वेळा डोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या या स्वच्छतेमुळे नमाजकर्त्यांचे शरीर व मन निश्चितपणे निर्मळ व पवित्र बनते. पवित्र कुरआनमध्ये एके ठिकाणी म्हटले आहे की, अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच एके ठिकाणी म्हटले आहे की, अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच पसंत आहेत. (अततौबा ९:१०८) शरीअतमध्ये असाही उल्लेख आहे की वुजू आणि गुस्ल म्हणजे स्नान करण्यात जास्त पाणी वापरू नये. जास्त पाणी वापरल्यास विधी मकरूह म्हणजे निषिद्ध होतो. अल्लाहच्या दरबारी अशा नमाजचे पुण्य पुर्णपणे लाभत नाही.


         यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा हा संदेश फार पूर्वीपासून आपल्याला दिला गेला आहे. त्याचे पालन करणे म्हणजेच अल्लाहचे आज्ञापालन होय. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी स्वच्छ मातीवर, कच्च्या भिंतीवर किंवा विटांवर हात मारून शूचिर्भूत होता येते. या कृतीस 'तयम्मुम' करणे असे म्हटले जाते. पाणी जवळ असताना आणि आरोग्याविषयी काही तक्रार नसताना कुणी तयम्मुम करत असेल तर ती व्यक्ती शूचिर्भूत होवू शकत नाही. इस्लामी शरीअतमध्ये म्हणजेच इस्लामी धर्मकायद्यात शुध्द व पवित्र राहण्याचे कितीही आदेश देण्यात आले असले तरी पाणी सांभाळून वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. म्हणून पाणी काटकसरीने वापरून वुजू करून नमाज अदा करावी. इस्लाम धर्मामध्ये अत्यंत साधे व शास्त्रशुध्द जीवन जगण्याचे आदेश दिले आहेत. नमाज एक अनिवार्य उपासना मानली आहे. इस्लामी शरीअतने लोकांसमोर अनेक उपक्रम व कर्तव्ये मांडली आहेत. या कर्तव्यापैकी सर्वात महत्वाचे कर्तव्य म्हणजे एकाच ईश्वराची उपासना आणि आराधना. ही उपासना उपासकाच्या मर्जीनुसार किंवा सवड मिळेल तेव्हा करायची नसते. त्यासाठी ठराविक वेळेत व ठरवून दिलेल्या पध्दतीनुसारच करायची असते.


       नमाजपठण दिवसातून पाच वेळा करावे लागते. नमाजपठण प्रत्येक मुस्लिम बंधू-भगिनींच्यावर सक्तीची आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी नमाज पठण करायचे असते. तिला सुबह की नमाज म्हणतात. ती चार रकआत पठण करावी लागते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला 'जोहर की नमाज' म्हणतात. ही नमाज १२ रकआत पठण करावी लागते. सायंकाळी पाचच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला 'असर की नमाज' म्हणतात. ही नमाज आठ रकआत पठण केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर सात वाजण्याच्या सुमारास नमाजपठण होते. त्या नमाजला 'मगरीब की नमाज' म्हटले जाते. ही नमाज सात रकआत पठण केली जाते. रात्री उशिरा नऊच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला ईशा की नमाज' म्हणतात. ही नमाज १७रकआत पठण केली जाते. रमजान महिन्यात या पाच नमाज पठनाबरोबरच तरावीह की नमाज पठण करावे लागते.


         जी व्यक्ती या पाचही वेळा नमाज पठण करत असेल त्या   व्यक्तिजवळ फावला वेळच उरत नाही. फावल्या वेळात कुरआन पठण व हदीस पठणही करायचे असते. प्रत्येक नमाज अदा करणेसाठी १५ ते २० मिनिटे लागतात. परंतु, नमाज पठण करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी होण्याकरिता बराच वेळ लागतो. त्यामुळे नमाजी व्यक्तीच्या मनी अविचार येणे शक्य नसते. नमाज पठणामुळे व्यक्तिच्या विचारसरणीत बदल घडून येतो. तो अल्लाहच्या समीप जातो. अल्लाहच्या आशीर्वादामुळे उपासकाला नवनवीन कल्पना सुचतात. त्यांचे काम सोपे होते. कुकर्म टळते त्यामुळे पुण्याईचे वर्चस्व वाढते. आणि जीवनाला दिशा मिळते. तो वाईटाच्या मागे लागत नाही. त्याला भले बुरे समजायला लागते. 'नमाज' ही अशी उपासना आहे की जी व्यक्तिला सन्मार्गाला लावते. शरीराला व मनाला व्यायाम मिळून व्यक्ती सद्गुणी, शांत व सदृढ बनते. अल्लाह ! या महिन्यात सर्वांना नमाजपठण करून दिशादर्शी जीवन जगण्यास मदत कर.

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

पैगंबर साहेबांचे आज्ञाधारक सोबती

पैगंबर साहेबांचे आज्ञाधारक सोबती


        प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना जे अनुयायी आणि सोबती लाभले. पैगंबरसाहेबांचे हे सोबती कसे आज्ञाधारक होते याचा एक छोटासा दाखला देत आहे. एकदा प्रेषितसाहेब आपल्या मशिदीत शुक्रवारचे प्रवचन देत होते. लोक बसण्यासाठीच्या जागेच्या शोधात थोडेफार विखुरलेले होते. हे दृश्य पाहून पैगंबर साहेब प्रवचनादरम्यान एकदम उद्‌गारल, 'बसून घ्या' हे ऐकताच जो माणूस ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी जमिनीवर बसला. नंतर पैगंबर साहेब म्हणाले, 'मला असे म्हणायचे होते की... जागा शोधून लवकर बसून घ्यावे' परंतु सोबती यांना वाटले की, बसण्याच्या आदेशाचा अवमान केल्याने जणू काही ईश्वरी प्रकोपाला सामोरे जावे लागेल.


        दुसरे उदाहरण मदिनेत एक बागायतदार सोबती आपल्या खजुराच्या बगिच्यात खजुराच्या फुलांचे संक्रमण करीत होते. जाताना पैगंबर साहेबांची नजर त्यांच्या या कामावर पडली. त्यांनी सहज विचारले, 'काय असे करणे जरूरीचे आहे?' हे ऐकताच त्या गृहस्थाने संक्रमण करण्याचे काम स्थगित केले. नेमके त्या वर्षी त्यांच्या बागेचे उत्पन्न कमी झाले. पैगंबर साहेबांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की, आपल्या म्हणण्यानुसार मी संक्रमणाचे काम थांबविले. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उत्पादनावर प्रभाव पडला म्हणून पीक कमी आले. हे ऐकताच पैगंबर साहेब म्हणाले, 'मी तर तुझ्या कामाबद्दल सहज विचारले होते की, हा काय प्रकार आहे? काम थांबवायला थोडेच सांगितले होते. शेतीच्या कामात तुम्ही आपला अनुभव वापरीत जा.

  

         जुलै ६३० मध्ये तबूकचे युध्द रोमच्या कारस्थानामुळे या नवनिर्मित समाजावर लादले गेले. दक्षिणेपासून उत्तरेकडील खूप लांबचा प्रवास, उन्हाळ्याचे दिवस, अत्यंत खराब हवामान आणि त्यात खूप वाईट आर्थिक परिस्थिती पैगंबर साहेबांनी युध्दसामग्रीसाठी मदतीचे आवाहन केले. प्रेषित साहेबांच्या सेवेत लोक आपापली मदत घेऊन धावले. जी वस्तू ज्या व्यक्तीकडे होती त्याने ती पैगंबर सोहेबांच्या सेवेत अर्पण केली. हजरत उस्मान खूप श्रीमंत होते. त्यांनी आपल्या मिळकतीमधून एक चतुर्थांश इतकी रक्कम युध्द सामग्रीत दिली. याप्रसंगी हजरत उमर यांनी बाजी मारण्याचे ठरविले. त्यांच्यात आणि हजरत अबूबक्रमध्ये नेहमी चुरस असायची. उमर यांनी मागेपुढे न पाहता आपल्या संपत्तीचे दोन भाग केले. आणि निम्मी रक्कम पैगंबर साहेबांच्यापुढे आणली. मुला-बाळांकडून विचारल्यावर म्हणाले की, निम्मा माल अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांचा व निम्मा माल घरच्यांचा. आज त्याच्यापुढे कुणीच जावू शकत नव्हता. इतक्यात हजरत अबूबक्र त्या ठिकाणी पोहचले. त्यांच्यासमवेत रोख रक्कम, जिन्नस, सोन्या-चांदीची नाणी, हत्यारे, घोडे, खेचर, गाढव, उंट आदींनी लादलेला ताफा होता. हे पाहून पैगंबरसाहेब म्हणाले, 'कुटूंब आणि परिवाराची काळजी घेणे अत्यावश्यक आहे' हे ऐकून हजरत अबूबक्र सिद्दीक म्हणाले, 'प्रेषितसाहेब, तुमच्यामुळे चंद्र आणि सुर्य प्रकाशमान आहेत. तुमच्यामुळे संसाराची निर्मिती करण्यात आली. जसे फुलाला बुलबुल आणि समईसाठी परवाना पुरेसा आहे, मी पण आपल्या घरात अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांचे नाव सोडून आलो आहे' असे होते पैगंबरसाहेबांचे अनुयायी.


        हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम रमजान महिन्याच्या आगमनाचे स्वागत दोन महिन्या आधीपासून करायचे. रज्जब आणि शाबान हे ते दोन महिने होत. रज्जबचा महिना आला की पैगंबर साहेब उपवास ठेवायला सुरूवात करायचे. जास्तीत जास्त कुरआन पठण, जप, अधिक नमाज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उपवास करायला सुरूवात करायचे. पैगंबर साहेबांचे अनुकरण त्यांचे सोबती म्हणजेच सिहाबी हमखास करायचे. त्यामुळे रमजानच्या आगमनाचे आणि त्याच्या स्वागताचे एक उत्साही वातावरण तयार व्हायचे.


         पैगंबर साहेब अत्यंत दयाळू सवलतीवर निगा राखणारे होते. ही गोष्ट, त्यांच्याकरिता अत्यंत आनंददायक होती की, लोक त्यांचे अनुकरण करीत आहेत. परंतु मानवहितामुळे ते या दोन महिन्यात अधूनमधून उपवास करण्याचे टाळायचे कारण त्यांचे कथन आणि कृत्यच नंतर शरीअतमध्ये म्हणजे इस्लामी कायद्यामध्ये परावर्तित होणारे होते. लोकांना असे वाटू नये की रज्जब आणि शअबानचे दोन महिने सुध्दा उपवासाचे महिने आहेत. म्हणून या दोन महिन्यात ते अधून मधून उपवास खंडित करायचे. अल्लाहचा आदेशही तसाच होता.


पैगंबर साहेबांचे हे कार्य तंतोतंत करणारी मंडळी आजही मुस्लिम समाजात आहेत. ही माणसे केवळ उपवासच नव्हे तर बाकीच्या सर्व इबादती म्हणजे उपासना अत्यंत उत्साहात करतात. त्यांच्या या इबादती त्यांच्याकरिताच नव्हे तर संपूर्ण मानवजाती व सृष्टीकरिता एक अनोखा उपहार आहे.

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

इस्लामी जीवनशैली

 इस्लामी जीवनशैली


       काही तरूण मुले-मुली आपल्या तारूण्याच्या जोशात महामार्गावर आखलेल्या पट्ट्यांचे किंवा लेनचे भान ठेवत नाहीत. ते लेन मोडतात, वेगवान वाहनावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे स्वतःचे व दुसऱ्याचेही प्राण गमावून बसतात. जगात विद्यमान असलेले सर्व धर्म म्हणजे जनमानसांना जीवनाच्या महामार्गावर आखून देण्यात येणाऱ्या 'लेन' आहेत. आपल्या धर्मावर म्हणजे आपल्या लेनमध्ये राहून, वेळ आणि वेगमर्यादा सांभाळून द्रुतगतीने गाडी चालवा, कधीही अपघात होणार नाही. स्वतःच्या धर्मामध्ये करायचे आणि शिकायचे बरेच काही आहे. लोक ते सोडून बऱ्याचदा इतरांच्या धर्मात शिरकाव करतात व विनाकारण फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे अयोग्य आहे.


       इस्लाम एक साधा, सोपा आणि सर्वसाधारण व्यक्तिंना सहजासहजी आचरणात आणता येणारा धर्म आहे. इस्लाम धर्माला धर्म म्हणण्यापेक्षा दीन म्हणजे जीवनशैली समजण्याकरिता फार मोठ्या ज्ञानाची, तर्क अथवा दर्शनशास्त्राच्या भांडवलाची गरज नसेत. अल्लाह एक आहे. अल्लाहव्यतिरिक्त कुणीही उपास्य नाही. मुहम्मद सलेल्लाहु अलैहि वस्सलम त्याचे प्रेषित आहेत म्हणजे अंत:करणातून 'ला इलाहा इल्ललाहु मुहम्मदुर रसूलुल्लाहची उद्घोषणा करणे, इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरिता पुरेसे आहे. यालाच कल्लमाए तैयबाः किंवा इमान म्हणतात. इमानची यादी करायची झाली तर 

१) एकेश्वर वाद, वहदत किंवा अद्वैतवार म्हणजेच एका अल्लाहवर विश्वास ठेवणे, 

२) दुसरी गोष्ट मुहम्मद सलेल्लाहु अलैहिवस्सलम यांच्यावर अवतरित झालेल्या ईश ग्रंथ कुरआन आहे.

 ३) मुहम्मद सलेल्लाहु अलैहिवस्सलम अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. 

४) चौथी बाब यापूर्वीच्या सर्व प्रेषिर्तावर व त्यांच्यावर अवतरित झालेल्या ईश ग्रंथावर विश्वास ठेवणे, 

५) पाचवी बाब मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवणे, 

६) सहावी बाब अल्लाहचे दूत म्हणजे फरिश्ते यांच्यावर विश्वास ठेवणे, 

७) सातवी बाब नशीब आणि प्रलयाच्या दिवसांवर तसेच पुनरूत्थान व हिशोब तपासणीवर विश्वास ठेवणे इत्यादी 

ईमानचे अविभाजीत अंग आहेत. ईस्लामी जीवशैलीत त्याच्या चार उपासना आवश्यक आहेत. 

१) पहिली उपासनो नमाज म्हणजे सलात 

२) दुसरी उपासना रोजा म्हणजे उपवास 

३) तिसरी उपासना जकात म्हणजे अनिवार्य करण्यात आलेले दानधर्म 

४) चौथी उपासना हज्ज म्हणजे आयुष्यातून एकदा मक्केतील काबा गृहाच्या परिसरातील विधीकरिता प्रवास.

 संपूर्ण इस्लामी जीवनशैली फक्त दोन गोष्टीवर आधारित आहे. पहिली गोष्ट आहे कुरआन व दुसरी गोष्ट आहे हदीस. हदीस म्हणजे पैगंबर साहेबांचे कथन व आचरण.  कुरआन व हदीसचा फार मोठा वारसा मुस्लिम समाजाला लाभला आहे. इस्लामी धर्मकायदा म्हणजे शरीअत, शरीअत कायदा संकलित करताना किमान चार बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. पहिली बाब कुरआन, दुसरी बाब हदीस वा पैगंबरवारसा तिसरी परंपरा व चौथी बाब भाषा कारण मध्ये काही बाबतींमध्ये स्पष्ट संकेत आहेत. त्यात कुठलाही बदल करता येणार नाही. पैगंबर साहेबांनी आपल्या जीवन काळात जे आदेश दिले व आचरण केले त्यात आता कुठलाही बदल करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे कुरआन आणि पैगंबर साहेबांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी कसे वागले व त्यांनी या आदेशांचे कसे पालन केले, त्याचप्रमाणे तत्कालीन थोर सिहाबी म्हणजे पैगंबरसाहेबांच्या सोबतियांनी कुठल्या  शब्दाचा व संज्ञांचा काय अर्थ लावला व त्याला कसे वापरात व आचरणात आणले? या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विधीतज्ज्ञ, ज्यांना अरेबिक भाषा उत्तम अवगत असते आणि ते सुध्दा मक्तेतील परंपरेच्या संदर्भात तेथील भाषेचा सखोल अभ्यास करून शरीअतच्या कुठल्या कायद्याचे विश्लेषण व संकलन करू शकतात. भाषेच्या अभ्यासामध्ये व्याकरणाला विमानाच्या उड्डाणामध्ये मजबूत धावपट्टीला आणि द्रुतगती आगगाडीच्या खाली रूळाला जे महत्व आहे, नेमके तेच महत्व कुठल्याही धर्मात त्याच्या धर्मकायद्याला म्हणजेच शरीअतला आहे. इस्लामी शरीअत एक अजमावलेली व परिपूर्ण शरीअत असल्याकारणाने तिचे अस्तित्व प्रलयापर्यंत टिकणारे आहे. 


       इस्लामी शरीअतमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरविण्यासाठी उत्तेजित करण्यात आले आहे. विविध उपासनांच्या दरम्यान माणसाच्या हातून काही चुका घडतात उदाहरणार्थ रमजान महिन्यात कुणी जाणून बुजून वेळेच्या आधी उपवास सोडला किंवा उपवास राखलाच नाही अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून ६० दिवसांचे उपवास राखण्याचे आदेश आहेत. असे करताना एकही खाडा झाला तर पुन्हा एकपासून साठपर्यंत उपवास करावेत. एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने रोजा राहणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने साठ गरिबांना दोन वेळचे पोटभर जेवण द्यावे यालाच कफ्फारा म्हणजे परतफेड म्हणतात. तात्पर्य असे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने लोक देणारे बनावेत.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

सहरी व नीयत

 

सहरी व नीयत



        रोजे म्हणजे उपवास धरताना पहाटेच्या वेळी केलेले अन्नग्रहण म्हणजे सहरी. रोजाधारकाला सुर्योदय होण्यापूर्वी जेवण घ्यावे लागते. सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही प्राशन करायचा नसल्यामुळे पहाटेच्या वेळी थोडे का होईना भोजन घेणे अपरिहार्य आहे. कुणी म्हणेल की रात्रीचे जेवण घेऊन झोपतो व पहाटे काही न खाताच रोजा धरतो अशाप्रकारे केलेला रोजा अल्लाहचरणी मान्य होत नाही. खरे पहाता पहाटेची वेळ म्हणजे साखर झोपेची. यावेळी उठणे इतर वेळी कठीण जाते पण आपण पूर्ण श्रध्देने रोजे करायचा मनाशी निश्चय केला की पहाटे उठणे फार सोपे जाते. नव्हे तर त्या नेमक्या वेळी झोपेतून आपोआप जाग येते व उपवासधारक चटकन् उठून बसतो.


       पहाटेच्या वेळी खरं तर भूक नसते पण अल्लाहच्या आज्ञेनुसार आहार घेणे हे कर्तव्य समजून आहार घेतला जातो. कुणी चहा, ब्रेड, बिस्किट वगैरे तत्सम पदार्थ खातात. कुणी हत्का नाश्ता करतो तर कुणी पहाटे पूर्ण ताजा गरम आहारही घेतो. रमजान महिन्यात खरी कसोटी असते आम्हा स्त्रियांची, पती, मुले, सासू-सासरे हे रोजा धरणार असतील तर त्यांना उठवण्यापूर्वी त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक तयार करावा लागतो. म्हणजे सगळे उठण्यापूर्वी तास-अर्धा तास आधी स्वयंपाक करण्यासाठी उठावे लागते. आदल्या दिवशी ईशाची म्हणजेच रात्रीची नमाज, तरावीहची नमाज पठण स्वयंपाक जेवणखान आवरून झोपी जाताना किमान साडेदहा-अकरा वाजलेले असतात. पुन्हा पहाटे तीन-साडेतीन पूर्वी उठावे लागते. सर्व महिला वर्ग हे काम पूर्ण श्रध्देने व आवडीने करतात. कारण सर्वांच्या उपवासाच्या श्रेयातून मिळणारा काही हिस्सा तिलाही मिळणार असतो.


       उपवास राखतानाचे दुसरे महत्वपूर्ण घटक म्हणजे 'नीयत' हे आहे. नीयत म्हणजे इरादा, हेतू किंवा संकल्प असा आहे. 'नीयत' शिवाय उपवास होऊ शकत नाही. कुणी प्रातःकाळापासून सुर्यास्तापर्यंत त्या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहिला, ज्या पासून एक उपवासधारक स्वतःला सांभाळतो, परंतू त्याने रोजा राखण्याची नीयत केली नसेल तर अशा व्यक्तीचा उपवास होऊ शकणार नाही. प्रेषितसाहेबांनी फर्माविले की ज्या व्यक्तीने फज्र म्हणजे पहाटेपूर्वीच नीयत केली नसेल, त्याचा उपवास होऊ शकणार नाही. काही धर्म मार्तडांनी सखोल अध्ययन करून आणि प्रेषित साहेबांच्या इतर वाचनांना समोर ठेवून असा निर्णय दिला आहे की मध्यान्हच्या एक तासआधी जर कुणी उपवासाची नीयत केली असेल तर आणि काही खाल्ले पिले नसेल तर रमजान आणि इतर दिवसांचाही उपवास राखता येईल. नीयत राखणे आणि त्याचा निश्चय करण्याचे ठिकाण हृदय आहे, म्हणून केवळ मनातून जरी इरादा, निश्चय केला, की कुठला उपवास करीत आहे तरी पुरेसे आहे. तोंडाने नीयतीची 'दुआ उच्चारली नाही तरी चालेल, परंतु दुआ तोंडाने उच्चारणे जास्त बरे' असे म्हटले जाते.


       उक्ती आणि कृतीमध्ये एकनिष्ठता रहावी म्हणून प्रत्येक रोजाधारकाकडून एक वचन घेतले जाते. पहाटेची न्याहरी म्हणजेच सेहरी घेतल्यानंतर रोजाधारकाने एक श्लोक म्हणावा लागतो "अल्लाहुम्मा असूमु गदल्लका फग फिरली मा कद्दमतु वमा अख्तरतु" याचा मराठीत अर्थ असा "हे अल्लाह ! उगवणाऱ्या दिवशी मी तुझ्याकरिता उपवास करतोय, तूच माझ्या मागील व पुढील पापांना क्षमा प्रदान कर" या वचनाला सर्वसाधारण भाषेत 'सहेरी की दुआ' असे म्हणतात. ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे, वचन आहे, जी अल्लाहला साक्षी ठेवून उद्‌गारायची असते. याचा अर्थ असा की, "मी अल्लाहबरोबर केलेला करार दिवसभर मोडणार नाही.'


         सतत तीस दिवस या कराराचे पालन करत राहिल्याने माणसाच्या अंतःकरणात एक विधायक बदल घडून येतो आणि आपले वचन पाळण्याची त्याला सवय लागते. कुणी पहात नसले तरी तो सर्वज्ञ आणि सर्व काही पहाणारा आहे. मौज-मजेची सर्व साधने उपलब्ध असताना देखील अल्लाह पहात असल्याचे विचार ध्यानी-मनी राखून आपल्या करारांशी एकनिष्ठ राहणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उपवास करणे होय. इस्लामी शरीअतमध्ये उक्तीला जितके महत्व आहे, त्यापेक्षा अधिक महत्व कृतीला आहे. रोजे रमजानचे असोत किंवा एरवी विविध कारणांनी राखण्यात आलेले असतो, त्याकरिता सेहरीचे सेवन करणे आवश्यक आहे. पैगंबर साहेबांचा आदेश आहे की सेहरी खात जा, अशाकरिता की सेहरीच्या सेवनात बरकत म्हणजे कल्याणकारी अंश आहेत. एका हदीसमध्ये सांगण्यात आले आहे की 'आमच्यात आणि अहलेकिताबच्या म्हणजेच ईश्वरी ग्रंथावर श्रध्दा ठेवणाऱ्यांच्या उपवासामध्ये फरक व वैशिष्ट्य सहरी खाण्याचे आहे. म्हणजे आम्ही सहरी घेत असतो व ते घेत नाहीत. रोजाधारक बंधु-भगिनींनो सेहरी सेवन करा, नीयत करा व रोजा रहा. आता आपण शारीरिक स्वच्छता व पावित्र्य याविषयी पाहू या....!

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

'रमजान' महिन्याचे महत्व

      'रमजान' महिन्याचे महत्व


       





      मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरूवात आजपासून होत आहे. रमजान इस्लामी हिजरी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. इस्लामी पंचागांत दिवसाची गणना आणि वेळेचे मोजमाप सुर्याच्या हालचालीचा हिशोब लावून केले जाते, तर महिना चंद्रदर्शनावर आधारित म्हणजेच चांद्रमासावर अवलंबून आहे. इस्लामी परंपरेप्रमाणे सर्व दिवस आणि सर्व महिने शुभ व कल्याणकारी आहेत. परंतु काही दिवस व काही महिने अतिशुभ मानले गेले आहेत. त्यापैकीच एक अतिशुभ महिना रमजान होय. रमजानला इस्लाममध्ये वेगळे स्थान आहे.


       कुरआन उतरविण्याचे व आदेशाना ग्रंथीत करण्याचे काम रमजान या पवित्र महिन्यात झाले आहे. म्हणूनच या महिन्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हदीस म्हणजेच पैगंबर वाणीनुसार कुरआनचे एक एक अक्षर वाचणाऱ्यांला या महिन्यात दसपट पुण्य लाभते, अशी मुस्लिम बांधवांची धारणा आहे. त्यामुळे कुरआन वाचनाचे प्रमाण या महिन्यात दसपटीने वाढते. कुरआन वाचून झाल्यानंतर इमानधारक अल्लाहजवळ जी दुआ मागेल ती मंजूर होते, रद्द होत नाही अशी पूर्ण श्रध्दा ठेवून कुरआन वाचन होते.


       'रोजा' उपवास इस्लामच्या पाच आवश्यक उपासनांपैकी एक आहे. रमजानचे रोजे चाँद दिसल्यापासून सुरू होतात. रोजे म्हणजेच उपवास करणे याचा अर्थ केवळ उपाशी तापाशी राहणे नाही. मानवाच्या मनामध्ये चांगल्या भावना जागविण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया आहे. रमजान हा आत्मशुध्दी करणारा महिना आहे. रमजान पवित्र प्रार्थना करण्याचा अगदी मनापासून अल्लाहची उपासना करण्याचा महिना आहे. रोजे म्हणजे इंद्रियांना वश करण्याचा तप आहे. या महिन्यात वाईट गोष्टीकडे जाणे, वाईट गोष्टी करणे तर दूरच, त्यांच्याबाबत विचार करणे हा सुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, खोटे बोलणे अथवा दुसऱ्याला त्रास होईल असे बोलणे निषिध्द मानले जाते. थोडक्यात रोजे केल्यानंतर वाईट पाहू नये. वाईट ऐकू नये व वाईट बोलू नये. रोजे राहणाऱ्याने मन, वचन आणि कर्माने स्वतःला शिस्तबध्द आणि संयमित ठेवणे आवश्यक आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फक्त आपल्या दीन अर्थात अल्लाहच्या स्मरणात मग्न राहून आत्मिक शांति व समाधान मिळविण्याची नामी संधी उपासकाला अल्लाहने दिली आहे.


        रमजान महिन्यात रोजाधारकांची मने द्रवतात आणि त्यांच्या नजरेसमोर मानवी जीवनाचे नवे आयाम उभे राहतात. या महिन्यात आपल्या उपासकाला उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत सुर्यास्तापर्यंत ताटकळत ठेवण्यात अल्लाहचे काहीच हीत नाही. परंतु, रोजे राहण्याची ही उपासना उपवास धारकाच्या फारच हिताची आहे. या महिन्यात अल्लाहने रोजेधारकाला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या संधीचे सोने करणे सर्वस्वी रोजेधारकाच्या हाती आहे.


        या महिन्यातील संपूर्ण वातावरण पुण्य प्राप्तीच्या प्रयत्नांनी बहरले असल्यामुळे लोकांची मने भलाई, उपकार, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणाकडे वळलेली असतात. चांगले मित्र, चांगली पुस्तके, चांगला परिवार ज्याप्रमाणे आपल्या जीवनात आणि विचारात बदल घडवून आणतात त्याप्रमाणे या पवित्र महिन्यात अंत:करणपूर्वक केलेली उपासना, उपासनेनंतर मागितलेली दुआ मानवाच्या जीवनात विलक्षण संस्कार घडवून आणते. रोजा राहिल्याने मनुष्य अल्लाहच्या अधिक जवळ जातो. रोजेधारकांना मनःशांती मिळते.


       रमजानच्या पवित्र महिन्यात प्रत्येक रोजाधारकाला प्रातः काळापासून उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत रहावे लागते. भुकेलेल्या, तहानलेल्या अवस्थेत माणसाचा रक्तदाब म्हणजेच बी. पी. कमी होतो. पण त्याच्या पुण्याईकडे कल वाढल्याने त्याच्या रक्तात डोपामिनसारख्या विधायक द्रव्याचे प्रमाण वाढते आणि मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या सबल होऊन समाजहितासाठी स्वतःला वाहून देण्यासाठी सज्ज होतो. एवढेच नव्हे तर एका रोजाधारकाकडून या महिन्यात केवळ घेत राहण्यापेक्षा देत राहण्याची सवय लागते. कारण रोजाधारकाकडून जकात, फित्रा, सदका, कफ्फारा, फिदीया, अतिया इत्यादीसारख्या आर्थिक दानधर्माच्या उपासनाही रोजाधारकाकडून सातत्याने करवून घेतल्या जातात. या महिन्यात या सर्व शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि अध्यात्मिक उपासनां सतत महिनाभर करत असल्याने एका श्रध्दावंताच्या जीवनात एक प्रकारची क्रांती घडून येते. तो उपवासधारक विनम्र होण्याचे शिकतो. इतरांच्या भुकेची, तहानेची त्याला जाणीव होते. तो अंतरात्म्यात डोकावून पहाण्यास शिकतो. रोजाधारक एका अदृश्य म्हणजे निर्गुण निराकार शक्तीच्या प्रसन्नतेसाठी ही उपासना करतो. अल्लाह ! सर्वांना रोजे करून यश प्राप्तीसाठी संधी देवो.

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

Feed back अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल , जयसिंगपूर बाबत माझे मनोगत

 Feed back 
अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, जयसिंगपूर बाबत माझे मनोगत



"अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची शान।

रूग्णासाठी प्रभूजींचे वरदान"

       दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी पेशंट म्हणून या हॉस्पीटल मध्ये जाण्याचा योग आला. दोन पावलांची माझी चाल पाहूनच डॉ. शिवराज मंगसुळे यांनी दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार आहे असे सांगितले आणि भितीने पोटात गोळा उठला, छातीत धस्स झाले व डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. एकतर मला अस्थमाचा त्रास बऱ्याच वर्षांपासून आहे. सोबत हायपो थायराईड आणि बी.पी.ही आहे अशा परिस्थितीत ऑपरेशन कसे होणार? हा डोंगराएवढा प्रश्न समोर उभा राहिला. एक्स रे रिपोर्ट आला आणि डॉ. शिवराज यांचा अंदाज शंभर टक्के बरोबर निघाला. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून शरीराचा व्यायाम व मनाची तयारी सुरू झाली.


       प्राथमिक तपासण्या झाल्यानंतर २ डिसेंबर २०२५ दुपारी उजव्या पायाच्या ऑपरेशन साठी ऍडमिट झालो. ३ डिसेंबर २०२५ ते ७  डिसेंबर २०२५ या कालावधीत व उजव्या पायाच्या ऑपरेशनसाठी दि.११ जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी या कालावधीत मला ' अरिहंत ' हॉस्पीटलमध्ये वास्तव्य करण्याचा सुयोग आला. मला हॉस्पिटलमध्ये राहिल्यासारखे अजिबात वाटले नाही तर कुटूंबासोबत घरीच राहिल्याचा अनुभव आला कारण या हॉस्पिटलमधील तज्ञ, अनुभवी,  सुस्वभावी, सुसंस्कृत,  डॉक्टर्स  व आनंदी वातावरणामुळे रूग्ण  वेदना विसरून आनंदी राहतो.


         पहिल्या ऑपरेशनच्या वेळी म्हणजे ३ डिसेंबर च्या रात्रीच्या असह्य वेदना सहन केल्या. चार तारखेला दत्त जयंती होती आणि मला त्या दिवशी त्रिदेव भेटले. हे त्रिदेव कोण ? तर डॉ. निखील पाटील, डॉ. शिवराज मंगसुळे, व डॉ. अकलंक चौगुले आणि ओठावर शब्द आले.....


'ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले,

मला ते दत्तगुरू दिसले,मला ते दत्तगुरू दिसले।'


          कोरोनाकाळात माझी शिक्षिका असलेली कन्या सौ. अरमान हिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. आणि सारं कुटुंब भयभीत झालं. तिची लहान मुले रडत तिला बिलगू लागली. दोन तीन अनुभवी डॉक्टरांनी पेशंटला हातही न लावता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. बॅग भरून झाली. आणि एक एम्. आर्. मित्राने सल्ला दिला की डॉ. निखील पाटील यांना भेटा व त्यांनी सांगितले तर कोविड सेंटरमध्ये दाखल करा.  शेवटचा उपाय म्हणून डॉ. निखील यांच्याकडे गेलो. त्यांनी बिनधास्त तपासणी केली नि ताबडतोब डेंग्यूची टेस्ट करायला सांगितली.  व पाच दिवसात तिला पूर्ण बरी करतो असा ठाम निर्णय दिला आणि आश्चर्य म्हणजे सौ.अरमान पाच दिवसात पूर्ण बरी होऊन ड्युटीवर हजर झाली. ऑगस्ट २०२४ मध्ये मला अस्थमाचा जीवघेणा त्रास झाला. डॉ. निखील पाटील मला या कठीण  प्रसंगातून वाचविले. या दोन्ही  प्रसंगात मला डॉ. निखील यांच्यात देव दिसला.


       डॉ. शिवराज मंगसुळे एक निष्णात आर्थोपेडीक सर्जन आहेत. थोड्याशा चालण्यावरुन अचूक निदान करणारे माझ्या जीवनातील पहिलेच डॉक्टर आहेत. प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले, दिलखुलास बोलणारे व दुसऱ्याचंही शांतपणे ऐकून घेणारे,  पेशंटसमोर स्पष्टपणे वस्तुस्थिती मांडणारे,  रूग्णांना मानसिक आधार देणारे,  कठोरपणे व्यायाम करुन घेणारे, रुग्णांना स्वतः चालायला आधार देणारे, स्वतःच्या आधाराने जिना चढायला लावणारे, ड्रेसिंग स्वतः करणारे डॉ. शिवराज  वैद्यकीय क्षेत्रातील 'राजे' आहेत. रुग्ण औषधाने बरा होतो हे खरे आहे पण औषधोपचाराबरोबर डॉक्टरांच्या आत्मविश्वासपूर्ण आधाराची साथ असावी लागते. ती साथ डॉ. शिवराज यांच्याकडून मिळते. ऑपरेशन थिएटरमधून हसतमुखाने बाहेर पडून रूग्णाच्या नातेवाईकांना ऑपरेशन ठीक झाल्याचे सांगणारे डॉक्टर क्वचितच पहायला मिळतील. मला तर ते देवदूत वाटले.


         डॉ. अकलंक चौगुले हे वैद्यकीय क्षेत्रातील एक खणखणीत नाणे आहे. डॉ. अकलंक अष्टावधानी आहेत. डॉक्टर कसा असावा? याचे उत्तर डॉ. अकलंक सारखा असेच द्यावे लागेल. रूग्णांना त्यांच्याच शब्दात नव्हे तर त्यांच्या मनात शिरुन समजावून सांगतात. प्रत्यक्ष कृतीसह विनोदी शैलीत रूग्णांना मानसिक आधार देण्याची त्यांची खास खुबी मला मनापासून आवडली. उपचार तर सगळेच डॉक्टर करतात डॉ. अकलंक रूग्णांना विचार करायला लावतात वेगळ्या पद्धतीने. माझे चिरंजीव मोहसीन याचे डॉ. अकलंक क्लासमेट आहेत हे समजल्यावर शिक्षकाच्या या सुपूत्राचा  मला फारच अभिमान वाटला. रूग्ण डिसचार्ज घेऊन घरी जाताना रूग्णाला गाडीत बसविण्यापासून जिन्याच्या पूर्ण पायऱ्या  चढवून घरातील बेडवर पोहोचविण्यापर्यंत साथ देणाऱ्या या आगळ्या वेगळ्या  डॉक्टरांचे मी आभार कसे मानू?

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असणाऱ्या या तीनही डॉक्टरांना मी हार्दिक आशीर्वाद देते.

शेवटी एवढेच म्हणेन....

' जबतक चाँद सूरज रहेगा, तबतक तुम्हारा यह पेशंट तुम्हे आशीर्वाद देगा । तुम्हारी भलाई चाहेगा और आप तिन्होंको यश के पहाडपर देखना चाहेगा।'


           


                    डॉ. निखिल पाटील यांचा सत्कार


                                              
                 
                  
                  डॉ. शिवराज मंगसूळे यांचा सत्कार 



           

                   डॉ. अकलंक चौगुले यांचा सत्कार


शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

पती बनले प्रेरणास्थान

 पती बनले प्रेरणास्थान




             माझ्याप्रमाणेच पती मन्सूर रमजान तांबोळी यांनी प्रतिकूल परिस्थितीत डी. एड. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. होस्टेलवर राहणाऱ्या मित्रांचे डबे पोहचवत आपलं शिक्षण घेतलं होतं. डी. एड. झाल्यावर पाच वर्षे नोकरी मिळाली नाही. त्यावेळी भाजीपाला फळे डोक्यावर बुट्टी घेऊन घरोघरी विकून आई-वडील, भाऊ-बहीण, भाचा यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली. प्रसंगी शेतमजुरीही केली. १९७७ च्या संपकाळात काम केल्याने त्यांना सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये क्लार्क पदावर नोकरी लागली.


       २५ मे १९८० साली आम्ही विवाह बंधनात गुंतलो. त्यावेळी मीही शिक्षिका म्हणून कार्यरत होते. मी फक्त एफ. वाय. बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. लग्नानंतर पुढे शिकण्याचा मनोदय व्यक्त करताच त्यांनी कसलीही आडकाठी न घालता परवानगी दिली पण एक सूचना दिली की, तुझ्या शिक्षणाचा नोकरीमध्ये, अध्यापनामध्ये कसलीही कुचराई होता कामा नये. आपल्याला जीवनात स्थैर्य देणारी नोकरी प्रामाणिकपणे पार पाडण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांची सूचना शंभर टक्के पाळून मी प्रथम श्रेणीत हिंदी शिष्यवृत्ती मिळवून बी.ए झाले.

      

       लग्नाच्या वेळी मी खूपच अशक्त व सडपातळ होते. कॉलेजमध्ये 'वाऱ्यापासून सावधान', 'ग्राईप वॉटरचा अभाव' असे 'फिशपाँड' मला मिळाले होते. मला पाहिल्यावर माझ्यादेखत पतींना लोक म्हणायचे, 'काय बायको पसंत केलीस मर्दा! नुसती नोकरी पाहिलीस वाटतं. अंगात ताकद आहे का तिच्यात नोकरी करायची तरी?' लोकांचे हे बोलणे यांनी चांगलंच मनावर घेतलं व माझं आरोग्य सुधाण्यासाठी पूर्ण लक्ष दिलं. फळं-भाजीपाला यांच्या बरोबरच रात्री भिजवलेली हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे मला सक्तीने खायला लावले. ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनीही काही गोळ्यांचा कोर्स दिला. त्या महागड्या होत्या. नव्या संसाराची उभारणी चालू होती, लग्नासाठी झालेले कर्ज फेडायचे होते. मी गोळ्यांना नको म्हटले तरी पतीराजांनी माझं काही एक न ऐकता तो गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायला लावला. चार वर्षात नावे ठेवणाऱ्या लोकांची बोलती बंद केली. मला आरोग्याचं सुंदर लेणं मिळवून देणाऱ्या पतीराजांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन. 


         बीए झाल्यानंतर पुढची आठ-दहा वर्षे संसार नेटका करण्यात, नोकरीत, मुलांच्या संगोपनात व स्वतःचे घर बांधण्यात वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. मग मी बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून एम.ए.साठी एडमिशन घेतले. त्यानंतर सुट्टीतील बी. एड. चा कोर्स सोलापूर येथे जाऊन पूर्ण केला. त्यावेळी पतींसह सर्व नातेवाईकांनी मुलांची जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे मी एम.ए. बी एड. झाले. माझा मुलगा मोहसीन बीकॉमचा अभ्यास करत होता. कन्या अरमान डी. एड.चा कोर्स पूर्ण करत होती व छोटी कन्या यास्मीन बी. ई (इलेक्ट्रॉनिक्स) चा अभ्यास करत होती. मी पी.एच. डी. होण्याची मनीषा व्यक्त करताच मुलांसह पतीराजांनी आनंदाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या सक्रिय, भक्कम पाठिंब्यावरच मी उच्चतम शिक्षण घेऊ शकले. पी.एचडी झाले. आज माझ्या हातून जे लेखन कार्य होत आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या पतींना व कुटुंबियांना देते. अशा प्रेमळ, समंजस पतीसाठी मी परमेश्वराजवळ उदंड आयुष्य मागते.

 





शनिवार, १० जानेवारी, २०२६

लघकथा संग्रह क्र.१४ थीम - लग्न जमता जमेना मुलाचं

 लघकथा संग्रह क्र.१४
थीम - लग्न जमता जमेना मुलाचं




                         फोटो:साभार गूगल 


(१) हरीभाऊना दोन मुले. मोठा मुलगा ग्रज्युएट झाला. नोकरीवाल्या मुलाला मागणी जास्त आहे म्हणून घरच्या शेतीचं काम करायला लावायचं सोडून त्याला नोकरीला लावलं. पण नोकरी खाजगी आहे, कमी पगाराची आहे म्हणून नकार येऊ लागले. कुणाला शेत जास्त पाहिजे होते, कुणाला घर स्लपचं पाहिजे होतं. अशीच तीन वर्षे लोटली.  धाकट्या मुलाच लग्नाचं वय झालं. तो आईवडिलांना म्हणाला," दादानं ट्राफिक जाम करून टाकलय पण मी काही थांबणार नाही. माझ्या लग्नाचं बघा नाहीतर मला दुचाकी घेऊन मार्ग काढत पुढं जाव लागेल. "आता काय करावं हरीभाऊनी !

 शीर्षक- ट्राफिक जाम


(२) निदान पोहेतरी......

दोन मित्र वधूशोध मोहिमेत सहभागी होते. पहिला म्हणाला, "दोन वर्षे झाली मुली बघतोय. पंचवीस मुली बघून झाल्या अजून एकीन पण होकार दिला नाही. " यावर दुसरा म्हणाला," तुझं अजून बरं चाललय बाबा, बायोडाटा बघून मुलगी बघायला या म्हणतात. तू अजून मुलगी बघून, पोहे तरी खाऊन येतोस मर्दा ! माझं बघ मी मुली बघायला सुरुवात करून पाच वर्षे झाली. मुलगी बघायला या असा फोन येणं ही बंद झालय! काय करू सांग?



(3)मोठेपणा नडला

नारायणरावानी आपला रूबाब दाखविण्यासाठी आपल्या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या मेहुण्याचा व पुतण्याचा बायोडाटा मध्ये उल्लेख केला होता. एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची मुलगी नारायणरावांच्या मुलाने पसंत केली. त्याना हुंडा, मानपान कांहीच नको होते. त्यांनी मुलीच्या वडिलांना मुलगी पसंत असल्याचे कळविले पण मुलीकडून स्पष्ट नकार आला का तर मुलगी म्हणाली, "आत्तापासूनच तुम्ही मेहुण्या पाहुण्यांचा उल्लेख करून रूबाब दाखवत आहात. आमच्या सारख्या गरीबांना हा रूबाब पेलणार नाही. " परोपरीने समजाऊन सांगितले तरी मुलगी लग्नास तयार झाली नाही.


(४)मुलाचं लग्न महत्त्वाचं की दौलत?

शामराव एक सामान्य शेतकरी होते. शेतीत कष्ट करून कुटूंबाचा उदर्निवाह चालवित होते. त्यांचा मुलगा खाजगी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होता. त्याला पगार कमी होता. पण या एकुलत्या एक असलेल्या सुनिलचं लग्न  कांही केल्या ठरेना. शेवटी त्यांनी दुसऱ्या राज्यातील एक मुलगी एजंटमार्फत पसंत केली. त्या पाहुण्यांनी दोन लाखाची मागणी केली. ही रक्कम लग्नापूर्वीच द्यावी लागणार होती. शामरावांना ही रक्कम भरणे अवघड झाल्याने ते गप्पच बसले. सुनील ने एजंटला फोन केल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. सुनील वडिलांना म्हणाला, " तुम्हाला दोन लाख महत्त्वाचे की मुलाचे लग्न? शेत गहाण टाका आणि माझ्या लग्नाचं बघा" हे ऐकून शामरावांना चक्करच आली.


(५) लग्न झालं एकदाचं पण....

रामभाऊना मुलाच्या लग्नाची फार चिंता लागली होती. पाच सहा वर्षे अशीच टेंशनमध्ये निघून गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती म्हणून त्यांनी चार लाख रुपये रोख व पाच तोळे सोने घालण्याची पाहुण्यांनी अट घातली. त्यांची अट मान्य केल्यानंतर विवाह सोहळा पार पडला. पूजाअर्चा झाली. त्या दोघांना त्यांनी  हनीमूनला पाठवले. आणि घडलं भलतंच! नवरदेवाला रेल्वे स्टेशनवर बसवून मी स्वच्छतागृहाला जावून येते असं सांगून नवरीबाई गेली पळून! नवरदेव एकटेच घरी परतले. सांगा काय करायचं?

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

मायेचा पाझर

                          मायेचा पाझर

                          छोटी यास्मिन मम्मीसह


        स्वतःचे घरदार, गांव सोडून जयसिंगपूरमध्ये नोकरीसाठी आलेले आम्ही सर्व शिक्षक एका आदर्श कुटूंबाप्रमाणे राहतो. यापुढेही राहू. आमच्यापैकी कुणाच्याही घरी आनंदाचा कार्यक्रम असला तर आम्ही सर्वजण आवर्जून हजर राहतोच पण दुःखाच्या प्रसंगीही हजर होतो. मग कुणाचे गांव कितीही लांब असो. आमचा हा गोतावळा भेटून गेली की दुःखाचा भार क्षणात हलका होऊन जातो. आनंदाच्या क्षणी ही सर्व मंडळी हजर झाली की आनंद द्विगुणित होतो.


         १९८८ साली आमच्या ग्रुपमधील बरेच जण स्थिरस्थावर झाले होते. थोडीशी आर्थिक सुबत्ता आली होती. शिक्षक बँकेचे गृहकर्ज मिळत होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी प्लॉट खरेदी करून घरे बांधण्याचा सपाटाच लावला होता. रिमझिम पावसाचा श्रावण महिना सुरू होता. आमच्या शाळेतील शिक्षक डिग्रजे सरांच्या घराची वास्तुःशांती होती आणि तो वर्किंग डे होता. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण होतं. शाळा नं. १ मध्ये आम्ही तेवीस शिक्षक कार्यरत होतो. त्यापैकी ९ शिक्षिका होत्या. सर्वानुमते ठरले की लेडिजनी मधल्या सुट्टीत भोजनासाठी जायचे व आम्ही परत आल्यावर सर्व जेन्ट्स नी जायचे. त्या मुदतीत आम्ही शाळा सांभाळायची. त्यावेळी माझी कन्या यास्मीन चार महिन्याची  होती. मधल्या सुट्टीत मी तिला दुग्धपान देण्यासाठी रामनगरमध्ये घरी जात होते. ४० मिनिटांची सुट्टी असायची. त्यातील २०-२५ मिनिटे येण्याजाण्यात खर्च व्हायची. १५ मिनिटातच तिचे पिणे व माझे खाणे आवरावे लागायचे. त्यादिवशी सगळ्याजणी वास्तु शांतीसाठी निघाल्यावर मी त्यांना म्हणाले, 'तुम्ही जावून या सगळ्या मी संध्याकाळी जाईन'. माझी मैत्रिण लता हंकारे म्हणाल्या, 'चला आमच्याबरोबर नंतर कुठं जाता एकट्या परत येताना तुम्ही १० मिनिटे थांबून या हवं तर आम्ही सर्वजण पुढे येतो'. मी त्यांच्याबरोबर भोजनासाठी गेले. आम्ही तिथे पोहचण्यापूर्वीच नुकतीच पंगत बसली होती. त्यामुळे आम्हाला पंगत उठेपर्यंत थांबावे लागले. आमचं भोजन सुरू असतानाच शाळेकडून निरोप आला की, शाळेत आकस्मित तपासणी पथकाचे प्रमुख अधिकारी पाटणकरसाहेब शाळेत आलेले आहेत तुम्ही ताबडतोब शाळेत या.


        त्यावेळी आकस्मित तपासणी पथकाला जागेवर सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले होते. नावाप्रमाणेच हे पथक आकस्मितपणे शाळेत यायचे. पाटणकर साहेब खूप कडक  असल्याचे ऐकिवात होते. या पथकाने शिक्षकांवर कारवाई केल्याचेही ऐकले होते. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी खूप घाबरलो. आमच्या लीडर मुरगुंडे मॅडम यांनी एक टेम्पो थांबवला व आम्ही ताबडतोब शाळेत गेलो. इकडे माझी छकुली माझी वाट पाहून थकली होती. तिने जोर जोरात रडायला सुरूवात केली होती. त्यावेळी फोनचीही सोय नव्हती. माझ्या सासूबाई तिला वरचे दूध पाजण्याचा प्रयत्न करत होत्या पण ती एक घोटही घ्यायला तयार नव्हती. आमच्या शेजारी रहाणाऱ्या काकू आज कामाला गेल्या नव्हत्या. बाळाचं रडणं ऐकून त्या बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, 'आजी का रडतय बाळ एवढं' सासूबाई म्हणाल्या, 'बाळाची आई आज का आली नाही कुणास ठाऊक'. काकू म्हणाल्या, 'मॅडमचं काहीतरी काम निघालं असेल मी घेऊन जाते बाळाला शाळेकडे'.


        ऑफिसच्या शेजारीच माझा पाचवीचा वर्ग होता. मराठीचा तास होता. टाचण वही उघडून पाहिलं तर त्यात दया पवार या लेखकांचा मायेचा पाझर या धड्यावरील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून घेणे हा घटक मी नोंद केलेला होता. धडा यापुर्वी शिकवून झाला होता. वाक्यप्रचार फळ्यावर लिहिले. मायेचा पाझर फुटणे, डोळे भरून येणे, कालवाकालव होणे, भांबावून जाणे, कीव येणे इ. धडा शिकवत असताना वाक्यप्रचारांचा अर्थ सांगितलेला होता. त्यामुळे आता फक्त वाक्यात उपयोग करून घ्यायचा होता. साहेब सर्वप्रथम माझ्याच वर्गात आले. मी विद्यार्थ्यांना विचारले, मायेचा पाझर फुटणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून कोण सांगेल ?

 

         इकडे माझी यास्मीन जोरजोरात रडत होती. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकून तिने टाहो फोडला होता. त्या काकी माझ्या आवाजाच्या दिशेने खिडकीजवळ आल्या. त्यांना मी खुणेनेच लांब जायला सांगितले. तेवढ्यात बाळाची नजर माझ्याकडे गेली असावी ती दुप्पट मोठ्याने रडत होती. एका विद्यार्थ्यांने वाक्य सांगितले, ' मला पाहून माझ्या आईला खूप माया येते'. आणि खरं सांगू वाचकहो बाळाचे रडणे ऐकून मला ' खराखुरा मायेचा पाझर फुटला होता व तो आवरणे कठीण झाले होते. दुधाचे थेंब खाली पडत होते. विद्यार्थ्यांने अर्थाचा वाक्यात उपयोग केलाय हे माझ्या लक्षातही आले नाही. पुरती गोंधळुन गेले होते मी. साहेब मोठ्यानं मला म्हणाले, 'मॅडम विद्यार्थ्यांने अर्थाचा वाक्यात उपयोग केला. त्याला वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा अशी सुचना न देता त्याचं उत्तर स्विकारलं हे बरोबर नाही असे म्हणत अध्यापन कसं परफेक्ट असावं या विषयी त्यांनी लेक्चर द्यायला सुरूवात केली. मी त्याचं बोलणं ऐकत असल्याचं त्यांना भासवत होते पण माझं लक्ष होतं माझ्या रडणाऱ्या बाळाकडं, साहेब कधी एकदा दुसऱ्या वर्गात जातात असं वाटत होतं. पण साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासायला सुरूवात केली. गृहपाठ तपासून चुका दाखविल्या होत्या, चुकीचे शब्द ५-५ वेळा लिहूनही घेतले होते. पण त्या शब्दाखाली सही केली नव्हती. त्याविषयी सूचना देऊन, अधिक लक्षपूर्वक अध्यापन करण्याचा सल्ला देवून साहेब दुसऱ्या वर्गात गेले एकदाचे !


        वयाच्या मानाने अधिक पोक्तपणा व समज आलेली सुनिता घाळी नावाची विद्यार्थीनी मला म्हणाली, 'मॅडम बाळ किती रडलं घ्यायचं नाही होय त्याला. 'व ती काकूना बोलवण्यास बाहेर गेली. विद्यार्थ्यांनाही माझी ही अवस्था समजली असावी. ते शांतपणे फळ्यावरील वाक्यप्रचार लिहून घेवून वाक्यात उपयोग करून लिहू लागले. साहेबांना परत येताना दिसणार नाही अशा कोपऱ्यात बसून बाळाला शांत केले. बाळ शांत होऊन खुदकन् हसले. आज इतक्या वर्षानंतरही तो प्रसंग आठवला की डोळ्यात अश्रूची गर्दी होते. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे मान्य असूनही कर्तव्य पार पाडताना कशी अवस्था होते याची प्रचिती मला आली.


        मिळवत्या स्त्रीकडे पाहताना सर्वांना तिचा पगार दिसतो, तिचं ठीकठाक राहणीमान दिसतं, आर्थिक संपन्नताही नजरेत भरते पण आपल्या काळजाच्या तुकड्याला घरी सोडून ड्युटीवर जाताना तिला किती यातना होतात हे सहसा कुणालाच दिसत नाही. 'घार फिरते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी' अशी तिची अवस्था होते. पाण्यात अश्रू ढाळणाऱ्या माशाप्रमाणे तिचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. अश्रू पुसणारे कुणीच नसते. त्यामुळे रडण्यातही मजा नसते. म्हणून येणारा प्रत्येक दिवस ती पार पाडत असते.

            हीच यास्मिन माझ्या आजारपणात माझी आई बनली.

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

माझे ग्रेट बाबा

 आदरणीय बाबांना,.



                         ज.गुलाब नबी तांबोळी


        बाबा, आता मी ५८ वर्षाची झाले. गेल्या ५८ वर्षातील ३८ वर्षे ४ महिने शिक्षिका पदावर कार्य करून सेवानिवृत्तही झाले. गेल्या ५८ वर्षात मला थोडफार समजायला लागल्यापासून विविध विषयावर तुमच्याशी खूप बोलले. तुमच्याशी बोलता बोलता खूप शिकले. पण मला अगदी अंत:करणापासून जे बोलायचं होत ते राहूनच गेलं. म्हणून या लेखातून तुमच्याशी बोलते आहे.


        बाबा, मला आठवतोय तो माझ्या नोकरीचा पहिला दिवस. तुम्ही मला माझ्या शाळेत घेऊन आलात. मुख्याध्यापकांशी माझी ओळख करून दिलीत, त्यावेळी तुम्ही ही मुख्याध्यापक पदावर कवठेपिरान येथे कार्यरत होता. मी अगदी निश्चितपणे नोकरीत रूजू झाले, कारण मला आधार होता तो तुम्ही दिलेल्या शिकवणुकीचा व उत्तम संस्काराचा. तुम्ही नजरेनेच मला सांगितलत, 'तुला डी.एड्.पर्यंतच शिक्षण देवून इथपर्यंत आणून सोडलय. तुझी नोकरी तू व्यवस्थित सांभाळ, काहीतरी वेगळं करून दाखव जेणेकरून तुझं पर्यायाने आपल्या कुटूंबाचं नाव उज्ज्वल होईल'. आणि बाबा खरं सांगू तुम्ही सांगितल्याप्रमाणेच अगदी मनापासून, कर्तव्यात कसूर न करता अध्यापनकार्य करत राहिले. आदर्श शिक्षिका म्हणून दहा पुरस्कार प्राप्त केले. पी.एच.डी. सारखी पदवीही मिळवू शकले. कुटूंबाला अभिमान वाटावा असे कार्य करू शकले.


         माझ्या नोकरीच्या सुरूवातीच्या काळात वारंवार ब्रेक मिळत होता. ३ ते ४ महिने विनावेतन रहावे लागायचे. त्यामुळे खूपच ओढाताण व्हायची. आजीचा व माझा घरखर्च चालविणेही अवघड होते. त्यात आजी खूप आजारी पडली, तिच्या उपचारादरम्यान मला बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे मीही खूप आजारी पडले. मला खूप ताप भरला, दोन-तीन दिवस तो अंगावरच काढला. कारण बाबा, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि तुम्हाला त्यावेळी त्रास द्यायची माझी इच्छा नव्हती. तापामुळे माझं मानसिक संतुलनही बिघडल. मी गांवी आले त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी सांगलीला न्यायचा सल्ला दिला. त्याचवेळी तुमचा आष्टा येथे सेवांतर्गत कोर्स चालू होता, अधिकारी तुम्हाला रजा द्यायला तयार नव्हते. तुम्ही त्यांना म्हणाला, 'साहेब, माझी मुलगी आजारी आहे. तिला औषधोपचारासाठी सांगलीला नेणे जरूरीचे आहे. आज माझा राजीनामा घ्या, वाट्टेल ती कारवाई करा पण आज मी जाणारच'.  तुम्ही माझ्यावर औषधोपचार तर केलात पण माझ्यासाठी एवढा मोठ्ठा त्याग करणारे बाबा आहेत हे पाहून त्या भयंकर दुखण्यातून मी ताबडतोब बरी झाले.


        बाबा, आठवतय तुम्हाला दहावी इयत्तेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचं मार्कलिस्ट तुम्हाला दाखवताच डोळ्यात पाणी भरून म्हणालात, 'ज्युबेदा, तू आमच्यासारख्या गरिबाच्या घरात कशाला जन्माला आलीस, तुझ्या बुध्दीच्या मानाने उच्च शिक्षण आम्ही देवू शकत नाही'. माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही थोडं अतिशयोक्तीनं बोललात हे खरं पण त्या बोलण्याने माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.


       नोकरीतील बारीक-सारीक कटकटी, अडचणी मी तुम्हाला सांगायची, त्यावेळी तुम्ही मला सांगितलत. 'बेटा, प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेमळ वागण्यानं सर्वांची मने जिंकून घे; आणि लक्षात ठेव आपलं उत्कृष्ठ काम हाच आपला वशिला आहे. तुला भरपूर मित्र-मैत्रिणी जोडता आल्या नाहीत तरी चालेल पण तुझ्या वागण्याने शत्रू निर्माण करू नकोस" बाबा हे तुमचे तत्वज्ञान मला कुठल्याही पुस्तकी तत्वज्ञानापेक्षा मोलाचे वाटतात.


       बाबा मला चांगलं आठवतय एक नातेवाईक माझ्या बाबतीत तुम्हाला म्हणाला, 'गुरूजी तुमच्या मुलीच्या लग्नाचं बघा, स्त्री हे काचेचं भांड असतं' तुम्ही ठामपणे उत्तर दिलंत, 'माझं भांडं काचेचं नाही शिशाचं आहे तुम्ही नका काळजी करू'. एकदा कारखान्यात काम करणाऱ्या, कमी शिकलेल्या श्रीमंत मुलाचं माझ्या साठी स्थळ आल्यावर म्हणालात, 'नको हे स्थळ, माझ्या मुलीची भाषासुध्दा त्याला कळणार नाही'. तुम्ही सहजपणे बोललेल्या शब्दांनी माझा आत्मविश्वास शतपटीने, वाढत गेला. एकदा पत्रातून तुम्ही याबाबतीत माझा निर्णय विचारलात. त्यावेळी मी तुम्हाला लिहीलं होतं, 'बाबा ! प्रत्यक्ष ईश्वरानेही माझं कांही वाईट करण्याचा विचार केला तर माझे बाबा ईश्वराला प्रार्थना करून वाईट करण्यापासून परावृत्त करतील. तुम्ही घेतलेला निर्णय मी स्विकारेन'. तसंच केलत बाबा तुम्ही, माझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार निवडलात, माझ्या आयुष्याचं सोनं झालं.


        आम्हां भावंडासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. शिक्षकाच्या नोकरीबरोबरच शिकवण्या घेतलात. शिलाईकाम केलतं. आपल्या गरजा कमी करून, काटकसरीने राहून आमच्यासाठी वह्या-पुस्तके पुरवलीत. शाळेचा गणवेशही माप न घेता अगदी बरोबर शिवून पाठवत होतात. बाबा, हे तुमचे उपकार या जन्मी तरी फिटणार नाहीत. तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली रहाणे मला जास्त आवडेल.  माझा संसार सुरू झाला. तुमची आई म्हणजे माझी लाडकी दादी माझ्याजवळच रहात होती. त्यामुळे तुमचं येणं जाणं असायचं, प्रत्येक वेळी आम्ही घेतलेली एखादी वस्तू किंवा भांडं मी तुम्हाला दाखवायची. त्यावेळी एक अनमोल शिकवण तुम्ही मला दिली. 'वस्तू-भांडं असं घ्यायचं की आपल्या आयुष्यात ते पुन्हा पुन्हा बदलायला लागू नये.' तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खरेदी होत गेली. तुमचे बोलणे म्हणजे एक जीवनसिद्धांत होता. आम्ही रामनगरमध्ये छोटेसे घर बांधल्यावर मला म्हणालात, 'ज्युबेदा कोल्हापूर रोडवरून तुझ्या घराकडे येताना खूप मोठे बंगले दिसतात. त्यानंतर वडर समाजातील बांधवानी दगडाने रचलेल्या भक्कम झोपड्याही आहेत. बंगल्याकडे जरूर बघ पण त्यानंतर झोपड्यांकडे बारकाईने बघूनच आपल्या घराकडे बघ तुझं घर फार सुंदर वाटेल तुला'. जगातील कोणत्याही तत्वज्ञाने इतका महान संदेश आपल्या लेकीसाठी दिला नसेल.'


       खरंच बाबा मी माझ्या मानाने खूप शिकले, शिकवलेही पण जीवनाची पाठशाळा मात्र मी तुमच्याकडूनच शिकले, कळत-नकळत तुम्हीच ठरला माझ्या जीवनाचे शिल्पकार! तुमच्यामुळेच मी शिकत गेले. हे सुंदर जीवन घडवू शकले. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. 'माझ्या बाबांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य दे'.


तुमची लेक - ज्युबेदा


       माझे ग्रेट बाबा अर्थात माझे काका हा लेख युवकांचा नवा महाराष्ट्र या दैनिकामध्ये प्रकाशित झाला. त्यावेळी बाबा हयात होते , वाचून बेहद खूष झाले होते. बारा १२नोव्हेंबर २०१८ ला ते पैगंबरवासी झाले. त्यांना आमच्यातून जाऊन सात वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या आठवणी आम्हा सर्वांच्या ह्रदयात कोरलेल्या आहेत. त्यांच्या सातव्या पुण्यस्मरणा निमित्ताने हे मनोगत मनापासून........


मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

जग फुलांचं

जग फुलांचं 




 फुलं रोज उमलतात । 

सर्वांना आनंदी करतात । 

 पाणी देणारे हात गंधाळतात । 

मना हर्षाची देणगी देतात । 
 
फुले अंधारात फुलतात । 

अन् पहाटवाऱ्यात झुलतात । 
 
फुलं आभाळगाण्यात रंगतात ।

हरितपर्णानां हर्षटाळी देतात । 

 फुलं आपल्याच गंधात रमतात । 

आपल्याच छंदात झंकारतात । 

 फुलं वाऱ्याचे श्वास मंतरतात । 

प्रेमिकांना पाहून पानात दडतात। 

 फुलं स्वतः प्रसन्न हसतात ।

 बघणाऱ्यालाही प्रसन्न करतात । 

 फुलं केसांना सौंदर्यदान देतात ।

फुलं मातीशी इमान राखतात । 
 
फुलं स्वप्नांची आशा टिकवतात। 

आयुष्य कसं जगावं शिकवतात।


शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।

    दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।
      



                            फोटो साभार:गुगल
  


      दसरा सण नुकताच संपला होता 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या उक्तीप्रमाणे सर्वांवर आनंदाचा वर्षाव करून गेला होता. थंडीची चाहूल लागली होती. सणांचा राजा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला होता. त्याचवेळी माझ्या काकांना श्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले, तेही अतिदक्षता विभागात. प्रसंग गंभीर होता. इथेच मला स्वच्छंदी दिनू भेटला. दिनू पस्तीशीच्या आसपास वय असलेला दवाखान्यातील सफाई कर्मचारी. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा, सदा आनंदी दिसणारा, बोलका, परोपकारी, कार्यतत्पर दिनू दवाखान्यात आला की अतीव यातना भोगणाऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटायची. दिनू कचरा गोळा करत करत सर्वांशी बोलत बोलत गाडी पुढे ढकलतो. काय काका बरं हाय का? मावशी तुमची तब्बेत काय म्हणते ? पलीकडच्या माई, तुम्ही आज गप्प का दिसता ? आज हे दादा एकदम फ्रेश दिसतात अशी सर्वांची विचारपूस करतो. प्रसंगी कपडे बदलायला, कूस बदलायला, उठवून बसवायला मदत करतो. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या ताई-माईंना प्रेमळ सूचनाही देतो. असा हा दिनू सर्वांचा लाडका दिनू बनला आहे.


        डॉक्टरना, कर्मचाऱ्यांना, पेशंटना, पेशंटच्या नातेवाईकांना दिवाळीचे वेध लागले होते. दिवाळीला काय खरेदी करायचे याचे मनसुबे सुरू होते. महिला कर्मचाऱ्यांच्या ड्रेस, साडी खरेदीच्या गप्पा दवाखान्याच्या बाजूला हळू आवाजात रंगात येऊ लागल्या होत्या. दिवाळी पाच दिवसावर आलेली असतानाच केर गोळा करणारे दिनूचे हात चमचम चमकू लागले होते. निरखून पहाते तर काय दिनूच्या हातात चांदीचे सुंदर ब्रेसलेट व चांदीच्या दोन अंगठ्या विराजमान झाल्या होत्या. आज केर गोळा करणारे त्याचे हात अधिकच सुंदर दिसत होते. हातातल्या रूपेरी दागिन्यामुळे नेहमी प्रसन्न दिसणारा त्याचा चेहरा आज वेगळ्याच तेजाने उजळून निघालेला दिसत होता. त्याचा हात आज दररोजच्या गतीपेक्षा अधिक गतीने कचऱ्याची विभागणी करून कचरा गोळा करण्यात गुंतला होता. नेहमीप्रमाणे सर्वांची विचारपूस करून मदत करत होता. एका पेशंटने हाताकडे पाहून हसत विचारलेच 'दिनूची दिवाळी नटली जणू' तसा दिनू हसत म्हणाला, परवाच सरांनी दोन हजार बोनस दिला. फार फार दिवसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सरळ गेलो सराफ कट्ट्याकडे. एक हजाराचे ब्रेसलेट घेतले. व एक हजाराच्या या दोन अंगठ्या घेतल्या चांदीच्या. हात पुढे करून सर्वांना ब्रेसलेट व अंगठ्या दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद खरंच अवर्णनीय होता. एका सहकाऱ्याने शंका विचारलीच स्वतःसाठीच सगळा बोनस खर्च केलास ? बायको, मुलांना, आईला काय घेतलास की नाही ? दिनू हसत हसत म्हणाला, सिव्हीलचा पगार झाल्याबरोबर बायकोला दोन हजार साडीसाठी दिलं. पाहीजे तशी घे म्हटलं. असलीच आणली, तसलीच आणली नको पुन्हा. दोन्ही मुलांच्या कपड्यांसाठी दोन हजार आणि फराळाच्या बाजारासाठी दोन हजार दिलं. खूष झाली बायको व म्हणाली, तुमच्या आईसाठी लुगडं तुम्हीच आणा मला नाही त्या लुगड्यातलं कळत. "मी स्वतः जाऊन आईसाठी हजाराचं लुगडं चोळी आणली. आई जाम खूष झाली. पाचशे रूपये आधीच बाजूला ठेवलेत. फटाके, मेणबत्या, पणत्या, साबण, वाशेल तेल इ. या वस्तू आणण्यासाठी असा खुलासा करून दिनू गडबडीने बाहेर पडला कारण त्याला ही ड्युटी करून सिव्हीलची परमंनंट ड्युटी करायची होती. डबल ड्युटी आनंदाने पार पाडणाऱ्या दिनूने नऊ-दहा हजारात दणक्यात दिवाळी करण्याचा हिशोब कसा चुटकीसरशी मांडला बघा! दिनू निघून गेला पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.  

 

       उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या तुमच्या-आमच्या आसपास वावरणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या घरातील दिवाळी कशी साजरी झाली? किती आनंद देऊन गेली? किती निराशा पदरी पडल्या? किती समाधानाचे दीप मनामनात उजळून गेले? याबाबतीतील उदाहरणे पाहण्यात, ऐकण्यात आली ती सर्व उदाहरणे वाचल्यावर तुम्हीच सांगा 'दिनूची दिवाळी दणक्यात की या सर्वांची दिवाळी दणक्यात ?


* आयटी क्षेत्रात इंजिनिअर म्हणून लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या रोहितला ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रमोशन मिळाले. पगारात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली. रोहित - रीना आनंदून गेले. गावाकडचे कुटुंबीय, नातेवाईक खूश झाले. दिवाळीच्या आधी (चार दिवस) त्याला ऑफिसमध्ये एकाएकी चक्कर आली. उपचारादरम्यान समजले की रोहितची शुगर कमी झालीय व बी. पी. वाढलाय. आठ दिवस दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. शिवाय बी. पी. ची गोळी कायमची सुरू झाली. शुगर कमी होऊ नये याची दक्षता घेण्याचा सल्ला मिळाला. त्यामुळे रोहित रीना यांची यावर्षीची दिवाळी फुल्ल काळजीत गेली.


* निखिलरावांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ऐंशी लाखाचा फ्लॅट बुक केला. फ्लॅट सोळाव्या मजल्यावर होता. रम्य परिसर होता. सुशिक्षित अपार्टमेंट होते. तरीही त्यांची पत्नी नीरजा नाराज होती. याचे कारण असे होते मोठा फ्लॅट घेतल्यावर निखिलराव आईवडिलांना.  गावाकडून इकडे कायमचे राहण्यासाठी आणणार होते. त्यामुळे नीरजा तूर्त मोठा फ्लॅट नकोच म्हणत होती. कारण तिला आपल्या संसारात सासू-सासऱ्यांची लुडबूड नको होती. तिला येथे फक्त राजाराणीचा संसार हवा होता. सासू-सासरे कायमचे इकडे आले तर आपल्या मुक्त राहणीमानावर गदा येईल या भितीने ती ऐंशीलाखाच्या फ्लॅट बुकिंगमुळेही दिवाळीचा आनंद उपभोगू शकली नाही.


* सुषमा-सागरची दिवाळी यंदा दणक्यात होणार नव्हतीच कारण त्यांचा एकुलता एक श्रीराज यंदा बारावीला होता. श्रीराज हुशार होता. अभ्यास ही मन लावून करत होता. पण त्याच्या आई-वडिलांना फारच टेन्शन आलं होतं. कारण आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष होते. सुषमा सागरला अॅट ऍनी कॉस्ट श्रीराजला एम्. बी. बी. एस्. डॉक्टर बनवायचं होतं. चार-दोन मार्कासाठी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्याची संधी त्यांना घालवायची नव्हती. त्यांनी वर्षभर श्रीराजच्या मागे टुमणे लावले होते. एन्जॉय काय नंतर करता येईल यावर्षी अभ्यास महत्वाचा.. त्यात कालच अॅकॅडमीतून सरांचा फोन आला होता की श्रीराजला या युनिट टेस्टमध्ये ९६% च मार्कस् पडलेत. तो इतरांपेक्षा दोन टक्क्यांनी मागे पडलाय. मग काय विचारता दोन मार्कस् गेले कुठे? या विचारात श्रीबाळा अभ्यास कर म्हणण्यात दिवाळी निघून गेली. फराळाचं काहीच नाही केलं विकतच आणलं थोडं सुषमा-सागर यांची दिवाळी फुल्ल टेन्शन मध्येच गेली.


* सुशिलाताईना ही दिवाळी फारच दुःखदायक वाटली. त्यांच्यात कसलाही उत्साह, हुरूप राहिला नाही कारण त्यांच्या एकुलत्या एका लेकाला सुरेशला दुसरी मुलगी झाली लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी ऐन दिवाळीत लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या पोटी दीपाली आली म्हणून सुनिल-सुवर्णा खूश झाली. पण वंशाला दिवा नाही झाला म्हणून सुशिलाताईंनी अंथरूण घातलं. तिसरा चान्स घ्यायलाच पाहिजे असा त्यांच्याकडे हट्ट धरला पण ते दोघे आपल्या मतावर ठाम होते. दोन्ही मुलीना चांगल वाढवायचं शिक्षण देऊन स्वावलंबी बनवायचं असा ठाम निर्धार त्यांनी केला होता. हे पाहून सुशीलाताई खचून गेल्या आपल्या जावेला परिस्थिती गरीबीची असूनही देवाने दोन नातू दिले आणि मला दोन नाती. कष्टान मिळविलेल्या इस्टेटीचे मालक जावई होणार या कल्पनेने त्यांनी हाय खाल्ली होती. त्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ गोड वाटला नाही.


* स्मिताची दिवाळी काही वेगळीच म्हणा ना! स्मिताने पतीकडून सुभाषकडून हट्टाने चार तोळ्यांचा राणीहार करून घेतला होता. परवाच्या कार्यक्रमात रोहिणीने घातलेला हार तिला भारीच आवडला होता. तीन पदरी राणीहार शालूवर खुलून दिसत होता. अगदी अगदी तस्साच हार तिनं बनवून घेतला होता. भावाला ओवाळणी म्हणून शालू ची मागणी तिनं आधीच केली होती. शालूवर राणीहार घालून कॉलनीभर मिरवण्याचा घाट तिनं घातला होता. रोहिणीच्या राणीहारापेक्षा आपला हार वजनाने जास्त व सुंदर नाजूक डिझाइनचा आहे असे समजून ती खूप आनंदात होती. पण तिच्या आनंदावर विरजण पडलं मैत्रिणीसमवेत दुचाकीवरून तिन्हीसांजेला घरी परत येत असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठन हिसकावून नेले. ऐन दिवाळीत आलेला हा प्रसंग स्मिताला असह्य झाला. दिवाळी अशी तशीच गेली.


* मेघाला तिच्या पतीने मयूरने पाच हजाराची साडी आणली. आता तरी मेघा माझ्या पसंतीवर खूश होईल या कल्पनेने मयूर आनंदात घरी आला. त्याने साडी मेघाच्या हातात दिली. मेघाने साडी पाहिली नाक मुरडत म्हणाली, " मला हा कलर नको होता. या कलरच्या चार-पाच साड्या आहेत माझ्याकडे, शिवाय या डिझाइनच्या साड्या जांभळ्या रंगात जास्त खुलून दिसतात." काय बोलणार बिचारा मयूर? संयम राखत म्हणाला, 'उद्या तू माझ्याबरोबर दुकानात चल तुला पाहिजे तो कलर घे. बदलून देण्याच्या अटीवरच मी साडी आणली आहे.' दुसऱ्या दिवशी मेघा दुकानात गेली. पाहिजे तो कलर मिळविण्यासाठी दुकान पालथे घातले तरी तिला पाहिजे तसा कलर मिळाला नाही थोडा फेंटच वाटतो म्हणाली. ती साडी नेसल्यावर कॉलनीतल्या एकीनेही साडी छान आहे असे म्हटले नाही म्हणून मेघा लक्ष्मीपूजेच्या दिवसापासून नाराज झाली. मयुरने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाईसाहेबांचा मूड काही ठिकाणावर आला नाही. पाच हजार पाण्यात गेल्याच्या दुःखात मयूरही दिवाळीत डिस्मूड झाला. 


       पाहिलीत श्रीमंत लोकांची असंतुष्ट दिवाळी? कुणाचा टॉमी दिवाळीत आजारी होता. कुणाच्या मुलाने पसंत केलेल्या मुलीने लग्नासाठी नकार दिला होता. लाखो कारणे आहेत दिवाळीत दुःखी होण्याची पण या छोट्या दुःखावर मात करून दिनूप्रमाणे थोडक्यात सुख मानणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होते. दहा हजारात दणक्यात दिवाळी साजरी करणारा दिनू आणि त्याचं कुटुंब पाहिलं की, वाटतं सुख शेवटी मानण्यावर असतं. ते व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतं. फार दिवसांनी चांदीचं ब्रेसलेट व चांदीच्या अंगठ्या घालण्याचं स्वप्न साकार झाल्यावर आनंदसागरात पोहणारा दिनू, सकारात्मक वृत्ती ठेवून समाधानाने - आनंदाने जीवन व्यतीत करणारा दिनू मला आदर्शवत वाटला. तुम्हालाही वाटला ना ?


       नाहीतर एवढ्या तेवढ्या कारणावरून दुःखी होणारे बाकीचे लोक भौतिक सुविधा हात जोडून उभ्या असतानाही सुखी होऊ शकत नाही. आणखी हवं, वेगळं हवं, सर्वांत भारी हवं, आत्ताच हवं, या सगळ्या 'हवं' मुळे माणूस नेहमी असमाधानाच्या भोवऱ्यात अडकतो. त्या भोवऱ्यातून सुटका करून घेण्याची क्षमता तो 'हवं' मुळे आधीच गमावून बसलेला असतो. त्यामुळे आज परिस्थितीने समृद्ध असलेले लोकही असमाधानी राहतात. त्यांना सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही. सगळं माझ्या मनासारखं व्हावं. अशी अपेक्षा करणारे आपण कधीच सुखी होणार नाही का? त्यापेक्षा जे झालं ते चांगलं झालं. जे होत आहे ते चांगलं होत आहे व जे होणार आहे तेही चांगलच होईल अशी वृत्ती ठेवून जीवन व्यतीत करायचे ठरविले तर आपल्यासारखे सुखी आपणच होऊ. व दिनूप्रमाणे आलेली येणारी प्रत्येक दिवाळी दणक्यात साजरी करू. करणार ना अल्पसंतुष्ट, सुखी-समाधानी दिनूचे अनुकरण ?



शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

पुस्तक परीक्षण साथी आनंद के ( हिंदी अनुवाद )

 


पुस्तक परीक्षण

साथी आनंद के ( हिंदी अनुवाद )

मूळ लेखक ( मराठी ) - श्री. विजय दादा आवटी ( राष्ट्रपती                                                पुरस्कार विजेते मुख्याध्यापक )

हिंदी अनुवाद - डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी.

प्रकाशक- स्वरूप प्रकाशन ,जयसिंगपूर

प्रथम आवृत्ती- २ आक्टोबर २०२५

मूल्य-१५० रूपये

पृष्ठे -१४०


'सवंगडी हे आनंदाचे' हे व्याख्यान केसरी विजय दादा आवटी यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. या पुस्तकाचा डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांनी केलेला हिंदी अनुवाद 'साथी आनंद के' हे पुस्तक वाचनात आले.


         सुंदर, बोलके मुखपृष्ठ असलेले, मजबूत बांधणीचे, उत्कृष्ट छपाई असलेले हे पुस्तक मनोरंजनाचा खजिना आहे असे वाटले. या पुस्तकात १६३ विनोदी चुटकुले, घटना, सहज घडलेले प्रसंग समाविष्ट आहेत. प्रत्येक विनोदाला साजेशी बोलकी चित्रे आहेत त्यामुळे हे पुस्तक वाचताना खूपच मजा येते. हसू गालात लपून राहीना अशी अवस्था होते.


         या पुस्तकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना सतरा पानांची आहे. प्रस्तावनेमध्ये लेखकांनी सद्याच्या धावपळीच्या व तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांना मनोरंजनाची व हसण्याची किती आवश्यकता आहे हे समजावून सांगितले आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हसण्याची गरज आहे आणि ही गरज या पुस्तकाच्या वाचनातून बऱ्याच अंशी पूर्ण होते असे मला वाटते. तणाव कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात, त्यावरील उपाय कोणते?  आपण आनंद यात्री बनावे, गीत गुणगुणत जगावे, नेहमी आशावादी असावे, समाधानी व शांत रहावे, हसण्याचे फायदे, विचारविनिमय करावा, हसणे व हसविण्याचे तंत्र, विनोद कसे असावेत व कसे नसावेत या सर्व मुद्द्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती प्रस्तावनेत वाचायला मिळते. वैद्यकीय ग्रंथातून संकलित केलेली हसण्याचे महत्त्व विषद करणारी माहिती प्रस्तावनेत वाचायला मिळते. ज्ञानातून मनोरंजन व मनोरंजनातून माणसाने मनापासून हसले पाहिजे हा संदेश लेखकांनी दिला आहे.


     हसण्यामुळे बऱ्याच व्याधी दूर होतात हे सांगताना अनुवादित पुस्तकात म्हटले आहे.

"ही दवाएँ, नही गोलियाँ ।

हँसते हँसते बजाएंगे तालिया ।।

सब रोगों की एक दवाई ।

हँसना सीखो मेरे भाई ।।"


१६३ विनोदी घटनाओं मे बहुतही हसीन किस्से आएं हैं जैसे की- कॉलेज बस स्टाॅप पर ग्यारहवी की अपेक्षा बारहवी कक्षा में पढनेवाले छात्र बहुत होशियार। 

बारहवी कक्षा में पढनेवाला एक लडका खडा था। सामने से एक खूबसूरत लडकी जा रही थी। उसे देखकर लडके ने कहा

" रूप तेरा , सूर मेरा

गाना एक कहूँ क्या ? "

लडकी खूबसूरती के साथ होशियार भी थी। उसने कहा....

"गाल तेरे, हाथ मेरे

कान के नीचे एक दे दूँ क्या ?" 

 

विनोदी घटनांचा समावेश लेखकांनी खुबीने केला आहे. 

उदा. दुनिया गोल है।

अध्यापक ने एक लडके से पूछा ।

" बेटा, दुनिया गोल है, य  तू कैसे साबित करके दिखायेगा ?"

लडका कहता है,"झिंगुर चूहे से डरता है। चूहा बिल्ली से डरता है। बिल्ली कुत्ते से डरती है। कुत्ता पप्पा से डरता है । पप्पा मम्मी से डरते हैं  और मम्मी झिंगुर से डरती है।

झिंगुर से  झिंगुर तक, दुनिया गोल है ।"


या पुस्तकात लेखकांनी विनोदी घटना व चुटकुल्यांची विभागवार मांडणी केली आहे. शाळा व अभ्यासाच्या बाबतीततले विनोद, कुटुंबातघडलेले विनोद, प्रवासातील विनोद, व्यवहारात घडणारे विनोद, वक्त्यांच्या बाबतीततले विनोद, थोर व्यक्तींच्या जीवनातील विनोद, जनावरे व पक्षी यांच्या बाबतीततले विनोद, वाईट सवयीमुळे घडलेले विनोद व इतर हास्यविनोद. या विभागणीमुळे वाचकांना विनोद वाचणे सहज व सुलभ झाले आहे.


साथी आनंद के या पुस्तकाच्या मलपृष्ठावर विनोदामुळे हसण्याचे फायदे सारांश रुपात मांडले आहेत. त्यामुळे आपले जीवन आनंदी होण्यास निश्चितच मदत होईल अशी मी ग्वाही देते.

मुस्कराता हुआ चेहरा सफलता की कुंजी है ।

हँसने से बीमारी दूर हो जाती है, लोग करीब आ जाते हैं ।

हँसमुख लोग दीर्घायु होते हैं ।

हँसी के लिए कुछ भी नही लगता, यह मुफ्त दवा है ।

हमारे जीवन का उद्देश खुश रहना है...आनंदी रहना है ।

विनोद से हम हँसते हैं ,दुसरों को भी हँसाते हैं।

हँसने के लिए यह किताब अवश्य  पढो.....

' साथी आनंद के '

परीक्षण कर्त्या - हिना चौधरी.