शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

गृहिणींचे अनमोल योगदान - विशेष मराठी लेख

 

गृहिणींचे अनमोल योगदान

शब्दांकन: मोहसीन तांबोळी

फोटो साभार: share chat.com

 

       गृहिणी म्हणजे घरकाम करणारी स्त्री असा समज करुन आपण तिच्या स्वाधीन घर करुन बाहेर निघून जातो, परंतु त्या गृहिणीला करावी लागणारी कामे जर पाहिली तर मोठे मोठे धुरंधर ही ती कामे करू शकत नाहीत अशी असतात. गृहिणी ही कामे जराही कमीपणा न मानता अगदी सहजपणे करत असते.


       तर हे सर्व सांगायचे म्हणजे परवा झी मराठी या दूरचित्रवाणी वरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील एक प्रसंग जो गृहिणी कोण असते, तीचे योगदान, तिचे काम, तिची भूमिका हे सर्व दाखवणारे एक बोलके उदाहरण म्हणावे लागेल.


       या मालिकेमध्ये अभिजित राजे (डॉ. गिरीश ओक), त्यांची पत्नी आसावरी (निवेदिता अशोक सराफ), मुलगा सोहम उर्फ बबड्या (आशुतोष पत्की) व सून शुभ्रा (तेजश्री प्रधान) असं चार लोकांचं कुटुंब दाखवलेले आहे. यातील अभिजित यांचा हॉटेल व्यवसाय असतो व ते एक नामांकित शेफ असतात. आसावरी ही एक उत्कृष्ठ गृहिणी असते. बबड्या हा एक काहीही काम न करणारा, आईने लाडावून ठेवलेला, आईला मोलकरीण व स्वतःला फार हुशार समजणारा मुलगा असतो. शुभ्रा ही एक नोकरी करणारी, रोखठोक बोलणारी, समजदार, घरकामात मदत करणारी सून असते.


       यातील एका प्रसंगात असे दाखवले आहे की, आसावरी शाबुदाण्याची खिचडी बनवणार असते. त्यासाठी लागणारे शेंगदाणे संपलेले असतात. शेंगदाणे आणण्यासाठी ती तिच्या जवळील सर्व डबे, पर्स तपासते परंतु पैसे संपलेले असतात. ती पैसे मागण्यासाठी पती अभिजीत यांच्याकडे जाते. तिला पैसे मागताना फार संकोच वाटत असतो. ती पैसे मागताना फार सविस्तरपणे स्पष्टीकरण सांगत असते. ही गोष्ट अभिजीत यांच्या लक्षात येते. ते तिला म्हणतात, “किती पैसे पाहिजे तेवढे अगदी विनासंकोच माग. खरंतर तू न मागता आम्ही तुला पैसे दिले पाहिजेत.” यानंतर लगेचंच अभिजीत व शुभ्रा हे पैसे देतात. आसावरी ते पैसे बबड्या ला देते व शेंगदाणे आण्यासाठी पाठविते. बबड्या ७० रुपयांचे शेंगदाणे घेवून येतो व म्हणतो, “३० रुपये माझी टीप, शेंगदाणे घेवून यायची.”


       ही गोष्ट शुभ्रा व अभिजीत यांना ही खटकते. ते म्हणतात, “आजपासून या घरात प्रत्येकाला प्रत्येक कामाचा मोबदला मिळाला पाहिजे.” त्यानंतर अभिजीत सर शाबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी बसल्यावर प्रत्येकजण ७० रुपये जमा करायला सांगतात. सोहमला पैसे देताना कसेबसे वाटते. आसावरीला ही गोष्ट आवडत नाही. ती तिथून निघून जाते. पाठोपाठ अभिजीत व शुभ्रा ही तिच्या मागे निघतात.


       आसावरी म्हणते, “असे कोणी घरकामाचे पैसे देतात का? ही काय खानावळ आहे का? अशा घरातील कामाचे कुठेही बाजाराप्रमाणे मोल होऊ शकत नाही.” अभिजीत सर तिला समजावतात व म्हणतात, “आपण देवाकडेही काहीही मागतो व ते पूर्ण करण्यासाठी देवालाही काही रक्कम, वस्तू अर्पण करतो. म्हणजे काय ती किंमत नसते तर त्या मागील भावना महत्वाच्या असतात.” तरीही आसावरी हे सगळे न करण्यावर ठाम असते.


      त्यानंतर अभिजीत, शुभ्रा व बबड्या हे तिघे मिळून एक शक्कल शोधून काढतात. आजपासून घरातल्या प्रत्येकाचे एक एक बॉक्स तयार करतात त्यावर चार जणांची नावे लिहितात. काही छोटे व काही मोठे बॉक्स असतात. जो जेवढे काम करेल तेवढे पैसे त्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये जमा करायचे. बबड्याला वाटते मी घरात फार काम करतो त्यामुळे माझे सगळ्यात जास्त पैसे जमा होतील. तो शुभ्राकडे मोठा बॉक्स मागतो. ही सर्व गोष्ट आसावरी पासून लपवून ठेवतात. दिवसभर प्रत्येकजण त्या त्या व्यक्तीच्या कामानुसार पैसे बॉक्समध्ये जमा करत असतो. आसावरी भरपूर काम करत असते. बबड्याचे सर्व पैसे जवळपास संपत आलेले असतात कारण तो काहीच काम करत नसतो. आई साफसफाई करत असताना बबड्या मनातल्या मनात म्हणतो, “आई खूप काम करू नकोस नाहीतर मी कंगाल होईन.” तो आईला म्हणतो, “तू बस इथे मी तुझ्यासाठी चहा करुन आणतो” जेणेकरून थोडेतरी पैसे जमा होतील. शुभ्राही बबड्याला चहा करायला सांगते तो नाही म्हणणार इतक्यात त्याला पैसे दाखवते. बबड्या लगेचंच चहा करायला तयार होतो. चहा करताना त्याला घरातील काही वस्तू सापडत नाहीत. तो चिडतो व त्याच्या हातून साखरेची बरणी फुटते. ती बरणी व पडलेली साखर आसावरी येवून साफ करते. त्याचेही पैसे बबड्याला द्यावे लागतात.


     शेवटी रात्री सर्व कामे आटोपल्यावर सर्वजण एकत्र जमतात व त्या बॉक्समधील जमा रक्कम मोजू लागतात. बबड्या म्हणतो, “माझा बॉक्स आधी उघड, त्यात खूप पैसे जमा झाले असतील” प्रत्यक्षात बॉक्स उघडल्यावर त्यात फक्त ७० रुपये असतात. शुभ्रा त्यातील वीस रुपये काढून घेते व म्हणते हे तू मला चहा करुन दिला नाहीस त्याचे हे पैसे. शुभ्राच्या बॉक्स मध्ये ३०० रुपये जमा असतात. अभिजीत सरांच्या बॉक्स मध्ये ४५० रुपये जमा असतात तर आसावारीच्या बॉक्स मध्ये ११०० रुपये जमा असतात.


       या जमा रकमेतून घरातील सर्वजण आसावरीला हे दाखवून देतात की तू दिवसभर किती काम करतेस. या सर्व प्रसंगातून सांगायचा उद्देश एवढाच की घरातील गृहिणी ही दिवसभर किती काम करत असते. सकाळी सर्वजण उठण्याआधी पासून रात्री सर्वजण झोपेपर्यंत ती सतत काम करत असते. दिवसभर ती वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते. ती आई, बायको, सासू, आजी, सून या नात्यांसोबतच कामाच्या विविध भूमिका पार पडत असते. ती घरातील स्वयंपाक, साफसफाई, धुणीभांडी, कपडे इस्त्री, इ. तसेच इतर अनेक कामे प्रत्येकाच्या वेळानुसार करत असते. कधी घरातील नळ दुरुस्त करताना ती प्लंबर बनते, तर कधी वस्तू दुरुस्त करताना मेकॅनिक बनते, कधी एकाद्याला मार्गदर्शन करताना मार्गदर्शक बनते, कधी लहान मुलांची शिक्षक बनते, कधी घरातील आजारी माणसाची काळजी घेताना डॉक्टर, नर्स बनते, कधी घराची सुरक्षारक्षक बनते, तर कधी कुणी चिंतेत असेल तर त्याची कौन्सिलर बनते. या सर्वांबरोबर ती सर्वांची मैत्रीण बनते.


       खरे पाहता चार भिंतीच्या या इमारतीला ती घर बनवते. घराला घरपण देते. जर गृहिणीला तिच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला तर ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल कारण नोकरी, व्यवसाय किंवा शाळा, कॉलेज या निमित्ताने आपण घराबाहेर पडत असतो पण घरची पूर्णपणे जबाबदारी ही गृहिणी पार पडत असते. तिला तिच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेवून घरातील सर्व लोक गृहीत धरत असतात. इतरांना वाटते हिला काय काम असते? आम्ही बाहेर जाऊन खूप काम करतो हिचे आपले घरच्या घरी निवांत! त्यामुळे तिचा बरेचदा अपमान केला जातो, तिला टोमणे मारले जातात. त्यामुळे तिच्या मनाचे खच्चीकरण होते. तीसुद्धा बाहेर तिची ओळख मी घरात असते अशीच करुन देते. तिला आभाराचे दोन शब्दसुद्धा पुरेसे असतात पण आपण नेमके करतो उलट आपण तिलाच रागावतो व म्हणतो तुला काही कळत नाही.


      तरी समाजातील या घरच्या खऱ्याखुऱ्या योद्ध्यांना आपण योग्य तो सन्मान दिला तरच गृहिणींच्या या अनमोल योगदानाचे चीज होईल.


 संदर्भ: झी मराठी या दूरचित्रवाणी वरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० रोजी प्रसारित भाग.


४ टिप्पण्या: