मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

बीमार की इयादत -आजारी व्यक्तीला भेटणे

 बीमार की इयादत -आजारी व्यक्तीला भेटणे



        आपल्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना आपल्या सद्व्तनाने, गोड आचरणाने उल्हसित करून तिला आनंदित करण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. आपल्या जाण्याने, धीराच्या दोन शब्दांनी थोडा वेळ जरी त्या व्यक्तीला दुःखाचा किंवा काळजीचा विसर पडला तर आपल्या हातून एक मोठे पुण्यकर्म झाले अशी भावना आपण बाळगली पाहिजे. आजारी व्यक्तीच्या समाचारास जाणे, याला बीमार की इयादत म्हणतात. इस्लाम धर्मात हे पुण्य कर्म मानले जाते.


        यासंबंधी हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम म्हणतात, 'ज्यावेळी तुम्ही रोग्याच्या समाचाराकरिता जाता त्यावेळी त्याच्याशी समाधान देणाऱ्या, आनंद देणाऱ्या गोष्टी करून त्या आजारी व्यक्तीला त्याच्या दुःखाचा, वेदनेचा विसर पाडा आणि तू लवकर बरा होवून पुष्कळ वर्षे जगशील असा धीर द्या. तुमच्या बोलण्याने जे होणार आहे ते टळणारे नसले तरी त्यामुळे आजारी व्यक्तीच्या मनाला थोडीतरी प्रसन्नता प्राप्त होईल. दिलासा मिळेल. रोगी आसन्नमरण झाला असला, त्याच्या विषयीच्या सर्व आशा सुटल्या तरी आपण त्याला धीर दिला पाहिजे. आपण दिलेल्या धीराने, आपल्या गोड शब्दाने त्या बिचाऱ्याचे शेवटचे क्षण तरी आनंदात गेले. याबद्दलचे आत्मिक समाधान आपल्याला लाभते.


          काही लोक आजारी व्यक्तिला भेटण्यासाठी मिठाई, फळे, बिस्किटाचे पुडे घेवून जातात आणि आजारी व्यक्तिशी गंभीरपणाने संभाषण करतात. माझ्या अमक्या तमक्या नातेवाईकाला तुमच्यासारखाच आजार झाला होता. लाखोंनी पैसा खर्च केला, डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केला त्यांना वाचविण्याचा, पण यश आले नाही, गेला बिचारा ! अशाप्रकारे बोलतात. अशा बोलण्याने आजारी व्यक्तीचा धीर सुटतो. म्हणून भेटायला जाणाऱ्याने त्याच्यापुढे काय बोलावे व काय बोलू नये याबद्दल तारतम्य बाळगावे. त्याच्यापुढे सकारात्मक बोलावे. आजारातून ठणठणीत बरे झालेले उदाहरण द्यावे. आपुलकीने, हसतमुखाने बोलावे. आजारी व्यक्ती, त्यांची सेवा करणारे नातेवाईक यांच्या मनःस्थितीचा विचार करून बोलावे. आजारी व्यक्तीस त्रास होईल, इतरांना ऐकून कंटाळा येईल एवढा वेळ बसू नये. नाहीतर 'भीक नको पण कुत्रे आवर' या म्हणीप्रमाणे यापुढे बघायला येवू नका, तुमचे बोलणे बंद करा, अशी विनंती करण्याची पाळी येईल. बीमार की इयादतसंबंधी कुरआनमधील तपशील आता पाहू या. आपल्या अंतःकरणात प्रेमळपणाचा, परोपकाराचा ओलावा उत्पन्न झाल्याखेरीज दुसऱ्याशी सहृदयतेने, प्रेमळपणे वागता येणार नाही. प्रेमळ आचरण हे मुस्लिम धर्मास पूर्णत्व आणणारे महान साधन आहे.


हजरत अबू हुरैरह रजिअल्लाह यांचा हवाला देवून इस्लाम हदिसमध्ये खालील संवाद देण्यात आला आहे.


अल्लाह : हे आदमच्या पुत्रा, मी आजारी असताना तू माझी विचारपूस केली नाहीस.


मानव : हे अल्लाह ! तुझी विचारपूस मी कशी करू शकेन. तू तर सर्व जगाचा पालनकर्ता आहेस.


अल्लाह : अमका मनुष्य आजारी होता. त्याची बातमी तुला मिळाली नाही का? जर त्याच्या समाचारास तू गेला असतास तर माझी भेट तेथेच झाली असती, उपाशी व तहानलेल्या बाबतीतही असाच प्रश्न विचारला जाईल की अमूक मनुष्य उपाशी होता तर दुसरा तहानलेला होता जर तू त्यांना खायला अन्न दिले असतेस तर त्याच ठिकाणी तुला माझे दर्शन झाले असते.


         अल्लाहची कृपादृष्टी आपल्यावर पडावी अशी सद्भावना बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम मानवजातीवर प्रेम करावयास शिकले पाहिजे. अल्लाहना पहावेसे वाटते ते मनुष्याचे प्रेमळ मन, अंतःकरण आपण निर्माण केलेल्या मानवजातीवर प्रेमाची पखरण घालून तिचे दुःख दूर करणाऱ्या महाभागाकडे अल्लाहची मेहेरनजर चटकन् वळते. अल्लाह बेहद खूष होतात.


          इयादतीसंबंधी अनेक हदीस आहेत. त्यापैकी एक महत्वाच्या हदीसमध्ये म्हटले आहे. हजरत अबू हुरैरह रजिल्लाह फरमाते हैं कि नबी सल्लल्लाहने फरमाया, जब कोई किसी बीमार की पूछताछ करने जाता है तो एक पुकारनेवाला आसमान से पुकारकर कहता है, "तू अच्छा तेरा चलना अच्छा, तूने जन्नत में अपना घर बना लिया है।"


         हजरत सोबान रजिल्लाह रिवायत करते हैं कि नबी सल्लल्लाहु अलैहिवस्सलम ने फरमाया, जब कोई मुसलमान अपने मुसलमान भाईकी इयादत को जाता है तो वह जन्नत के बाग में होता है ।


        भाई बहनो ! अल्लाह के हुकूम से उपर दी गयी सूचनाओंका पालन करते हुए किसी बीमार की इयादत किया करो और इबादत का हिस्सेदार बनो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा