सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

रक्तरंजीत बलिदानाची आठवण 'मोहरम' - विशेष मराठी लेख


रक्तरंजीत बलिदानाची आठवण 'मोहरम'

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल

      "मोहरम' हा आनंदाने साजरा करायचा सण नसून रक्तरंजीत बलिदानाची आठवण करण्याचा हा सण आहे. इस्लाम धर्मियांच्या वर्षाची सुरवात मोहरम या महिन्याने होते.

इतिहास:
       इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांची कन्या बीबी फातिमा हिचा विवाह हजरत अली यांच्याशी झाला होता. त्यांना इमाम हसन व इमाम हुसैन अशी दोन मुले होती. हजरत अलीनंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव इमाम हसन खलिफा झाले. खलिफा म्हणजे खिदमत करणारा म्हणजेच भक्ती करणारा.

       अमर माविया यांचा पुत्र यजिद हा दुष्ट व अहंकारी होता. कपट कारस्थान करून त्याने आपल्या कबिल्यातील मुलीचे लग्न इमाम हसन यांच्याशी केले. या नववधूने पहिल्याच रात्री विष देऊन इमाम हसन यांचा खून केला.

       इमाम हसन यांच्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू इमाम हुसैन खलिफा झाले. अमर माविया यांनी यापूर्वी झालेल्या तहाचा भंग करून आपला मुलगा यजिद याला खलिफा घोषित केले. त्याने इमाम हुसैन यांच्या कुराण व पैगंबरांच्या शिकवणुकीविरुद्ध वर्तन करण्यास सुरवात केली. स्वत:ला ईश्वराचा प्रेषित समजून तो लोकांना त्रास देऊ लागला. ही गोष्ट इमाम हुसैन यांना आवडली नाही. त्यांनी यजिदला विरोध केला. 

      कडक उन्हाळ्याच्या दिवसात मोहरमच्या पहिल्या तारखेपासून या सत्य-असत्य धर्मयुद्धास कर्बलाच्या मैदानात सुरुवात झाली. इमाम हुसैन प्रबळ आहेत हे पाहून यजिदने त्यांचे अन्न-पाणी बंद केले. पाच दिवस अन्न-पाण्यावाचून गेले. काफिल्यातील बालकांना पाण्याचा एक घोटसुद्धा मिळेना. इमाम हुसैन त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय हाल होऊ लागले. एकेक शहीद होऊ लागले. इमाम हुसैन यांच्या काफिल्यात दोन वर्षांचा असगरअली होता. तो पाण्यासाठी तडफडत होता. त्याच्या आईने शत्रुपक्षातील एकास आपल्या तान्ह्यासाठी पाण्याची मागणी केली. त्या दुष्टाने त्या मुलाच्या घशात बाणाचे टोक घुसविले. रक्ताचा घोट घेऊन असगरअलीने प्राण सोडला.

फोटो साभार: गूगल

       मोहरमच्या सातव्या तारखेला जोरदार युद्ध सुरू झाले. इमाम हुसैन आणि त्यांचे चिरंजीव जैनुल आबेदीन हे दोन पुरुष व बाकीच्या स्त्रिया फक्त जिवंत राहिल्या. जैनुल आबेदिन हाही त्यावेळी आजारी होता. मोहरमच्या नवव्या दिवशी शुक्रवार होता. इमाम हुसैन युद्धात घायाळ झाले होते. जोहरची नमाज अदा करण्यासाठी त्यांनी शत्रूला परवानगी मागितली. ते नमाज अदा करीत असताना यजिदच्या दुष्ट साथीदारांनी इमाम हुसैन यांना भोसकले. त्या दुष्ट सैनिकाचे नाव सनान असे होते. शुमद नावाच्या एका सैनिकाने त्यांंचा शिरच्छेद केला. एवढे करून यजिद थांबला नाही. त्याने मृत शरीराचे पंजे धडावेगळे करून आपल्या भाल्याच्या टोकावर घेऊन विजयाचा जल्लोष करत, घोषणा देत मदिना मध्ये दाखल झाला. हे पाहून बीबी फातिमा बेभान होऊन जमिनीवर कोसळल्या त्याच जागी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. पुत्रवियोगाच्या दुःखाने त्या मरण पावल्या.

   आत्याचारी, जुलमी, भ्रष्ट, सत्तापिपासू शासकांपासून पीडित जनतेला मुक्त करण्यासाठी इमाम हुसैन यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या घटनेची आठवण म्हणून 'मोहरम' पाळला जातो. ताबूत काढून मोहरम पाळावा असे काहींना वाटते. कडेगावचे महान खलिफा (संत) साहेब हुसैन पीरजादे यांनी आपल्या पुस्तकात ताबूत काढून मोहरम पाळावा असे लिहिले आहे. मोहरम कसा साजरा करावा यामध्ये मुस्लिम लोकांमध्ये मतभिन्नता आहे. मतभिन्नता असली तरी मोहरम पाळून इमाम हुसैन यांच्या महान कार्याचे स्मरण, महंमद पैगंबर यांच्या शिकवणुकीवरील श्रद्धाभाव एकच आहे.

कडेगावचा मोहरम:

फोटो साभार: गूगल

      मोहरम सण गावागावात साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणास थोडसे वेगळे स्वरूप आले आहे हे मान्य परंतु बऱ्याच ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा होतो. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील ताबूत म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होय. दोन-अडीच महिने ताबूत बांधणीचे काम सुरू असते. बांबूच्या कामठ्या चिकणमातीच्या सहाय्याने जोडतात. त्यावर आकर्षक कागदांची सजावट करतात. आधी कळस मग पाया या पद्धतीने हे नेत्रदीपक ताबूत तयार होतात. त्यांची उंची इतकी असते की कळसाकडे पाहताना डोक्यावरची टोपी खाली पडते. हे ताबूत म्हणजे हस्तकलेचा एक आदर्श नमुना होय. हे ताबूत तयार करण्यासाठी सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. एकमेकांच्या सहकार्याने ताबूत बसवून ऐतिहासिक घटनांचा निषेध म्हणून मोठ्या बंधूभावाने हा सण साजरा करतात. पाटील-कुलकर्णी यांच्या घरीही ताबूत बसवतात. कडेगावमधील मोहरम जातीय सलोखा निर्माण करणारा सण आहे. सण-उत्सव साजरे करण्याचा उद्देश पूर्णपणे येथे सफल होतो.

सद्यः परिस्थिती:

फोटो साभार: गूगल

       मोहरमच्या पाचव्या दिवशी गावागावात 'पीर' बसतात. त्यापूर्वी घरातील साफसफाई होते. इमाम हुसैन यांच्या पंजाची नाल पीराच्या शिरोभागी असते. पीर बसविण्यामध्ये गावातील सर्वधर्मिय लोकांचा सहभाग असतो. सातव्या दिवशी मलिदा करून नैवेद्य दाखविला जातो. मोहरमचा नववा दिवस ज्यादिवशी इमाम हुसैन शहीद झाले तो दिवस कत्तल रात म्हणून साजरा करतात. या दिवशी अलावा करून अग्नी पेटवला जातो व त्यातून लोक पीर घेऊन जातात. हा चमत्कार किंवा अंधश्रद्धा नसून त्याचे वैज्ञानिक कारण असे कि विस्तवात पाय घातल्यानंतर चटका बसल्याची संवेदना मेंदूपर्यंत जाण्यासाठी काही अवधी लागतो. ती संवेदना पोहोचण्यापूर्वीच लोक विस्तवाच्या बाहेर येतात. कुऱ्हाडी, कडाका, सुया टोचणे असे खेळही यावेळी खेळले जातात या सर्व खेळांचा हेतू माझ्या मते एकच असावा तो म्हणजे आपल्या अंगी सोशिकता यावी. इमाम हुसैन यांनी ज्या यातना सोसल्या त्या यातना त्यांची आठवण म्हणून काही प्रमाणात का होईना सोसाव्यात. मोहरमच्या सणात करबलही खेळतात. करबल खेळत असताना महान शहिंदाची गौरव गीते गायिली जातात. सर्व युवा पिढी या निमित्ताने एकत्र येते व त्यांचे करबल पथक तयार होते. पीर व करबल पथके एकमेकांच्या गावी भेटीसाठी जातात. मोहरमच्या दहाव्या दिवशी ताबूत विसर्जन होते. आपल्या घरातील व्यक्ती मृत झाल्यावर ज्याप्रमाणे दफनविधि झाल्यावर दुखवटा पाळतात त्याप्रमाणे दुखवटा पाळून दफनच्या तिसऱ्या दिवशी जियारत केली जाते. मोहरमच्या सणामध्ये ढोल-ताशा या वाद्यांनी वातावरण दुमदुमून जाते. कत्तल व दफन या दिवशी रोजा करण्याचीही पद्धत आहे. हा रोजा चिंचेचा पाला खाऊन सोडतात. याचे कारण करबलच्या मैदानावर युद्ध काळात अन्न-पाणी मिळत नव्हते तेंव्हा बरेच लोक भूक भागविण्यासाठी युद्धभूमीवरील चिंचेच्या झाडांचा पाला खाऊन राहिले होते.

समारोप:
     असा हा मोहरम सण आनंदाने साजरा करण्यासाठी नसला तरी युद्धात शहीद झालेल्यांची आठवण जपण्याचा आहे. जातीय ऐक्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा व्हावा. काही अनिष्ट प्रथांना फाटा देऊन ऐक्य जपण्यासाठी हा सण साजरा व्हावा.


1 टिप्पणी: