शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

बहिणीची माया - मराठी कथा

 

बहिणीची माया

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


      सुनिता नुकतीच पदवीधर झाली. तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. सुनीताचे वडील सरकारी  नोकरीत असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. शहरामध्ये छोटासा बंगला होता, गाडी दारात होती. सुनिता दिसायलाही सुंदर, बुद्धीनेही हुशार होती. तिला एक मिळवता भाऊ होता. दुसरा भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. इतके सारे आलबेल असतानाही बऱ्याच स्थळांंकडून सुनिताला नकार येऊ लागला, याचे कारण एकच होते ते म्हणजे सुनिताचा मोठा भाऊ  संजय याच्या अंगावर गेल्या तीन वर्षांपासून पांढरे डाग दिसू लागले होते. हे डाग तोंडावर, हातावर असल्याने संजय दुर्दैवाने कांहीसा विद्रूप दिसत होता. हा त्वचारोग अनुवांशिक आहे या गैरसमजामुळे सुनिताला कोणी पसंत करत नव्हते.

     बऱ्याच कलावधीनंतर एका स्थळाकडून होकार आला. मुलगा इंजिनिअर होता. पगारही चांगला होता. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. बंगला, गाडी सर्व काही होते पण त्यांची एक अट होती. तुझ्या भावाने आमच्या घरी कधीही येऊ नये. आम्ही तुमच्या घरी आलो की घरात थांबू नये. लग्नातही त्याने हजर राहू नये. सुनिताला ही अट मान्य नव्हती. तिने या स्थळाला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिच्यासाठी आणखी एक स्थळ आलं. बऱ्याच कालावधीनंतर एका वराकडून होकार आला. अमोल नुकताच इंजिनिअर झाला होता. खाजगी कंपनीत अल्पशा पगारावर नोकरीस लागला होता. त्याला शेत, घर  काहीच नव्हते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने मोलमजुरी करून त्याला शिकविले होते. अमोलनेही स्वतः कष्ट करून शिक्षण घेतले होते. अमोलने सुनिताच्या वडिलांकडे सुनिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यापूर्वीच सुनितानेही वडिलांकडे लग्न ठरविण्यापूर्वी अमोलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती अमोल सुनिताच्या घरी आला. तो तिला म्हणाला, "तू श्रीमंत परिस्थितीत लहानाची मोठी झाली आहेस. इथे तुला सर्व प्रकारच्या सुखसोयी प्राप्त आहेत. असे असताना तू माझ्यासारख्या दरिद्री वराला कसा काय होकार दिलास?" सुनिता म्हणाली, "तुझं दारिद्रय मी अगदी मनापासून स्विकारलं आहे. दारिद्र्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात, अडचणीत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, तुझी सावली बनेन. दारिद्रयातून येणारी प्रत्येक गैरसोय सोसेन. प्रसंगी उपाशी राहीन पण माझी एक अट आहे."

      अमोल घाबरला ही कोणती अट घालणार, त्याने अधिक सावरुन बसत सावधपणे विचारले, "सांग कोणती अट आहे तुझी?"  सुनिता म्हणाली, "लग्नानंतर दुर्दैवाने असा झालेल्या माझ्या भावाला तुम्ही योग्य सन्मान द्यावा. त्याची अवहेलना करू नये. तो आपल्याकडे येईल जाईल, त्याला योग्य वागणूक द्यावी". अमोलने ही अट मान्य केली.

   सुनिता अमोल विवाहबद्ध झाले. संजय त्यांच्या घरी येतो जातो. त्यांचा संसार सोन्यासारखा झाला आहे.

     या गोष्टीवरुन समस्त बहिणीनी आपला संसार फुलवत असताना दुर्दैवाने त्रस्त झालेल्या भावाला सुनिताप्रमाणे मायेचा वर्षाव केला, त्याला आधार दिला, तर बहीण भावाच्या या पवित्र नात्याला कधीही बाधा येणार नाही, होय ना?

२ टिप्पण्या: