शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

शारिरीक स्वच्छता व पावित्र्य

शारिरीक स्वच्छता व पावित्र्य




       इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे जेव्हा गुस्ल म्हणजे स्नान आणि वुजू म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे तोंड, हात, पाय धुण्याची गरज असते. तेव्हा माणसाने टाळाटाळ करू नये व हे काम लवकर आटोपून टाकावे. तसे न केल्याने बाधा होण्याची भीती जास्त असते. शूचिर्भूत झाल्याने माणसात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि पुढे शूचिर्भूत होईपर्यंत त्यास ईश्वरी संरक्षणाचे विशेष कवच लाभते.


         खगोल शास्त्रज्ञांच्या मते माणसांसाठी राहण्याचे सर्वात असुरक्षित स्थान म्हणजे आपले पृथ्वीतल कारण आकाशातील हवामानापेक्षा जमिनीवरचे वातावरण कितीतरी पटीने हाणीकारक व बाधक असते. संसर्ग फक्त बॅक्टेरिया आणि अन्य जंतू पासूनच होत नसून काही कारणे अशी असतात. ज्यांच्यामुळे माणूस मानसिकरित्या आजारी पडतो. शारीरिक विकासापेक्षा मानसिक आणि आत्मिक विकार खूप त्रासदायक असतात. हे रोग लवकर बरे होत नसल्याने माणसे हतबल होतात आणि शेवटचा उपाय म्हणून तांत्रिक मांत्रिकांच्या कारस्थानांना बळी पडतात. खरे पाहता मानवी शरीरात संसर्गजन्य परिस्थिती केव्हा निर्माण होते. उत्तर अत्यंत सोपे आहे. शरीराची देखरेख अथवा स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर आजारी पडण्याची भीती अधिक असते. स्वच्छता ही चिकीत्साविषयक संज्ञा झाली परंतु ' धर्मशास्त्रात केवळ स्वच्छता अभिप्रेत नसून तिथे एक दर्जा अधिक म्हणजे पवित्रता किंवा पावित्र्य ही आहे. परिधान केलेले कपडे कितीही स्वच्छ दिसत असले तरी त्यावर मद्य, पू, रक्त, शौच, वीर्य अथवा लघवीचे थेंब असतील तर असे कपडे स्वच्छ असूनसुध्दा मलिन आहेत. इस्लामी शरीअतप्रमाणे असे कपडे परिधान करून कुठलीही इबादत म्हणजे प्रार्थना आपण करू शकत नाही आणि केलीच तर अल्लाहच्या दरबारात त्यांना स्वीकृती लाभत नाही.


         ईस्लाम धर्मात शारीरिक पावित्रतेला खूप महत्व आहे. शरीर शुध्द असले तर मन शुध्द रहाते. मन शुध्द राहिले तर आत्मा शुध्द रहातो. शरीर शुध्द नसल्याने काही विकार होणे अगदी नैसर्गिक आहे. त्या शारीरिक विकारांचा दुष्पपरिणाम मनावर होतो. मनाचे आरोग्य बिघडते तर आत्मा विचलित होतो. आत्मा बैचेन झाला की, माणसाला झपाटल्यासारखे वाटते आणि तो नको त्या उपायांच्या शोधात हिंडतो-फिरतो. म्हणून सफाई आणि पावित्र्य या. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सफाई केवळ शरीराला शुध्द करू शकते, परंतु पवित्रता मात्र आरोग्याचा एक अत्यावश्यक असा गुण आहे. ज्याला पर्याय नाही. पावित्र्य एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे माणसाला ईश्वराचे सामीप्य प्राप्त होते. अपवित्र माणूस ईश्वरी देणग्यांच्या निकट जावू शकत नाही. पवित्रता माणसाच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्तीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असते.


          इस्लामी धर्मकायद्यात शारीरिक निर्मलता आणि पावित्र्यास खूप महत्व आहे. हे पावित्र्य मूल जन्मल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत जोपासण्यात येते. माणूस मरण पावला तरी त्याच्या अंत्यविधीत प्रेताला स्नान घालण्याचे खूप महत्व आहे. प्रेताला स्नान घालण्याचे काम त्याच्या निकटच्या नातेवाईकांनी पार पाडावे. प्रेताला स्नान यासाठी की ती व्यक्ती आता संसारातील आपली सर्व कामे आटोपून मृत्यूमार्गे अल्लाह दरबारी दाखल होत आहे आणि अल्लाहचे स्थान अत्यंत पवित्र असे आहे. तेथे इहलोकातील अनिर्मल व अपवित्र शरीर घेवून जाणे म्हणजे अल्लाहच्या प्रकोपाला चिथावणी देण्यासारखे ठरेल.


         एवढेच नव्हे तर आता त्याचे संबंध अत्यंत पवित्र अशा ईश्वर निर्मित सृष्टी आणि फरिश्ते म्हणजे ईशदूत यांच्याबरोबर येणार असून ते संसार मानवाच्या संकल्पनेपासून अत्यंत भिन्न असे आहे. म्हणून मृत शरीराला सुध्दा सजीव प्राण्याप्रमाणेच स्नान घालण्याचे आदेश आहेत.


         गुस्ल करतेवेळी आधी शूचीर्भूत होण्याचा इरादा करावा नंतर 'बिस्मिल्लाह' उद्‌गारून सर्वप्रथम मनगटापर्यंत हात धुवावेत. शरीरावर जिथे घाण लागली असेल प्रथम ती धुवावी. नंतर गुळणी करून, नाकात पाणी टाकून नाक स्वच्छ करावे. नंतर सर्व शरीरावर पाणी टाकून चांगले चोळून चोळून मळ काढावा. नंतर तीनदा उजव्या खांद्यावरून, तीनदा डाव्या खांद्यावरून व तीनदा डोक्यावरून पाणी टाकावे. संपूर्ण शरीरावर एका केसाइतकीही जागा कोरडी राहिली असेल तर गुस्ल परिपूर्ण होणार नाही आणि उपासकाला पवित्र न झाल्याने त्याला व्यवस्थित स्नान केल्याशिवाय कुठलीही प्रार्थना करता येणार नाही. गुस्लकरिता किमान एक किलो ऐंशी ग्रॅम इतके पाणी आवश्यक आहे.


         मलमूत्रापासून सावध न रहाणे अत्यंत छोटा गुन्हा असला तरी त्याच्या यातना गुन्हेगाराला भोगाव्या लागतील. यावरून आपणास जाणीव होईल की ईस्लामी धर्मात शारीरिक स्वच्छता व पावित्र्य याला किती महत्व आहे. तेव्हा बंधूभगिनींनो या महिन्यात पावित्र्य राखून उपासना करा.

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे कार्य

हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे कार्य



         इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैहिवस्सलम एका अशा जनसमुदायासाठी अल्लाहकडून संदेशवाहक म्हणून पाठविण्यात आले, जो आपल्या जहाल प्रवृत्तीमुळे संपूर्ण सभ्य आणि सुशिक्षित जगापासून तुटलेला व अलिप्त होता. अरबस्तानच्या या दक्षिण-पश्चिम भागात कुठलेही राजघराणे नव्हते, राजकुमार नव्हते, नाण्याचे चलन नव्हते. राजमहाल दरबार, मंत्री, सैनिक, कायदे, न्यायालये वगैरे प्रकार नव्हते. 'बळी तो कान पिळी' असा प्रकार होता. या भौगोलिक क्षेत्रातील काही घराणी अत्यंत सभ्य व सुसंस्कृत होती. परंतु दुर्गम आणि वाळवंटी प्रदेश आणि काही लोकांच्या रानटीपणामुळे हा प्रदेश सुसंस्कृत जगतापासून दुर्लक्षित होता. कुणीही राज्यकर्ता या प्रदेशावर राज्य करण्यास तयार नव्हता. मक्का शहर यमेन आणि सिरीया आणि इराकच्या हमरस्त्यावर असले तरी येणारे जाणारे काफिले केवळ विसावा व चारापाणी घेण्यासाठीच तेथे थांबायचे. या शहरात अत्यंत प्राचीन काळापासून पवित्र कअबागृह असल्याने ज्या कबिल्यांची या गृहावर श्रध्दा होती. त्यापैकी अनेक जण वर्षातून किमान एकदा या शहरी हज्ज यात्रेसाठी हमखास यायचे. यापलिकडे या क्षेत्राची जगाला माहिती नव्हती.


         अशा दुर्गम प्रदेशात सोमवार दि. २३ जून ५७१ बारा रबीअलअव्वल रोजी पैगंबर हजरत सल्लल्लाहु अलैहीवस्सलम यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या सहा महिन्याआधीच वडिलांचे निधन झाले होते. वयाच्या सहाव्या वर्ष आईचेही निधन झाले. नंतरचे पालनपोषण वृध्द आजोबा अब्दुल मुत्तलिब आणि चुलते अबुतालिब यांनी केले. एका संकेतानुसार हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना २२ डिसेंबर ६०९ रोजी अल्लाहकडून प्रेषितत्व बहाल करण्यात आले. प्रेषित म्हणजे दिव्य बोधाद्वारे प्राप्त होणारे ईश्वरी आदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविणारा संदेशवाहक...


          या मक्का शहरात तब्बल तेरा वर्षे पैगंबर साहेबांनी कुरआन, एकेश्वरवाद, सत्य आणि अहिंसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु, बोटावर मोजण्याइतकीच माणसे त्यांच्या धर्मात परावर्तित झाली. उलट मक्कावासी आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या जिवाचे शत्रू बनले. नाईलाज म्हणून पैगंबर साहेबांनी स्वदेशत्याग करण्याचे ठरविले आणि ८ सप्टेंबर ६२२ रोजी मक्केहून मदिनेकडे त्यांनी स्थलांतर केले. मदिनेत पोहोचल्यावर दहा वर्षाच्या आत संपूर्ण परिसरात एक विधायक क्रांती घडून आली.


         मार्च ६३२ मध्ये जेव्हा पैगंबर साहेबांनी अंतिम हज्जयात्रा केली आणि अरफातच्या मैदानात हज्जचा एक विधी म्हणून अंतिम प्रवचन दिले. त्याप्रसंगी त्या मैदानात श्रोत्यांची संख्या एक लाख वीस हजारापेक्षा अधिक होती. जे कुटूंब आणि लांबच्या प्रदेशात वास्तव्य करणारी जी माणसे हज्ज यात्रेस पोहचली नव्हती त्यांची संख्या अगणित होती. ज्या लोकांनी इमान व श्रध्देच्या अवस्थेत पैगंबरसाहेबांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यावर ईमान राखले, त्यांच्यावर आपले सर्वस्व म्हणजे प्राणसुध्दा अर्पण करण्याचे साहस केले आणि खऱ्या अर्थाने ते राखले. अशाच व्यक्तींना इतिहासात सिहाबी म्हणजेच पैगंबर साहेबांचे सोबती ही उपाधी देण्यात आली. मक्कावासियांच्या द्वेष व अत्याचाराला कंटाळून जेव्हा पैगंबर साहेबांनी स्वदेशत्याग केला आणि सुमारे ४५० कि.मी. उत्तरेकडे प्रवास करून मदिना शहरी स्थायिक झाले. तेव्हा त्यांचे नातलग, अनुयायी, पैगंबर साहेबांचे सोबती म्हणजेच सिहाबी देखील त्यांच्या पाठोपाठ हिजरत म्हणजेच स्थलांतर करून मदिनेत दाखल झाले. ते पूर्णतः लुटले गेले होते. शरीरावर असलेले वस्त्र एवढीच त्यांची मालमत्ता होती परंतू यापैकी एकालाही पैगंबर साहेबांनी भीक मागू दिली नाही. त्यांनी मदिनेत बंधुसंघाची म्हणजे मुआखतची स्थापना केली. येणारा प्रत्येक मक्कावासी मदिनावासियांचा भाऊ होता. हे लोकदेखील इतके स्वाभिमानी होते की ते सतत मदीनावासियांवर अवलंबून राहिले नाहीत. काहीनी तर पहिल्या दिवशीच बाजारपेठ गाठली. काहींनी दुसऱ्या दिवशी जंगलाची वाट धरली आणि जळाऊ लाकडे तोडून बाजारात विकायला लागले. काहींनी मोलमजूरीची कामे पत्करली आणि पहाता पहाता मदिना शहर हे एक स्वावलंबी शहर म्हणून परिसरात प्रसिध्द झाले. पैगंबर साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन कार्यामुळे एका आत्मनिर्भर आणि आदर्श समाजाची निर्मिती झाली. मक्कावासियांकरिता मदिना एक नवीन शहर, अनोळखी गल्लीबोळ, अपरिचित माणसे, शेजारी परंतु प्रेषितसाहेब म्हणजे सर्वांचे अंतिम आणि पृथ्वीतलावरील एकमेव आश्रयस्थान, आत्मविश्वास आणि एकमेकांवरील भरवसा यामुळे एका मातब्बर समाजाची निर्मिती झाली.


          मदिनावासियांचे सर्वात मोठे संरक्षक त्यांचे शेजारी होते. आणि हे शेजारी एकाच धर्माचे नसून विविध धर्मीय होते. जेणेकरून या शहराचे रूपांतर लगेचच एका राष्ट्रकुलात कॉमनवेल्थमध्ये झाले जे नंतर एका शक्तीशाली संस्कृतीमध्ये परावर्तित झाले.

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

इस्तिगफार म्हणजे क्षमायाचना

           इस्तिगफार म्हणजे क्षमायाचना                                                         


           इस्तिगफार या शब्दाचा अर्थ आहे क्षमायाचना. रमजानचा महिना क्षमायाचनेचाच महिना आहे. क्षमायाचना म्हणजे नेमके काय करायचे ? शरीअतमध्ये त्याकरिता काही विधी काही शब्दावली, काही प्रार्थना किंवा काही जप वगैरे सुचविण्यात आले आहेत. ईश्वरी कमालीची गोष्ट हीच की, त्याने मानवाला निर्माण केले. त्यास उत्तम जीवन जगण्याचे मार्ग दाखविले. त्याकरिता प्रेषित, पीर, वली, पैगंबर आणि असंख्य समाजसुधारक व अनेक मार्गदर्शक पाठविले. एवढेच नव्हे तर लोकांच्या मार्गदर्शनाकरिता त्यांच्या भाषेत पुस्तके पाठविली. त्या पुस्तकांचे अनुवादक, विश्लेषक आणि भाष्यकार पाठविले हे सर्व काही करूनसुध्दा मनुष्य मार्गभ्रष्ट झाला आणि त्याच्या हातून पाप घडलेच तर त्या पापांचे निराकारण आणि प्रायश्चित कसे करायचे, त्याचे सन्माननीय मार्गसुध्दा दाखविले. ईश्वरी आदेशान्वये सर्व प्रेषित मासूम म्हणजे निरपराध असतात. त्यांच्या हातून एकही पाप घडलेले नसते. उलट पापी व्यक्ती प्रेषितांच्या सानिध्यात येताच त्याचा कायापालट होतो. प्रत्येक मनुष्य जन्मल्याबरोबर त्याच्यावर एक फरिस्ता म्हणजे एक नेक व सात्विक शक्ती आणि एक सैतान म्हणजे दुष्ट आणि तामसी शक्ती नेमण्यात येते. माणूस ज्या शक्तीचे आदेश अधिक स्वीकारतो. त्याप्रमाणे त्याचे जीवन सात्विक अथवा तामसी बनते व त्यांचा अंतसुध्दा या धर्तीवरील जीवनावरच आधारित असतो.


            इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहिवसल्लम यांच्या कथनानुसार, "मी, माझ्यावर नियुक्त केलेल्या सैतानावर संपूर्णपणे ताबा मिळविला असून तो मला कदापि मार्गभ्रष्ट करू शकणार नाही. "एवढे असूनसुध्दा प्रेषित साहेब दिवसातून किमान सत्तरवेळा इस्तिगफार म्हणजेच क्षमा मागायचे. ही क्षमायाचना करताना ते नेमके काय म्हणायचे ? ते शब्द मूळ अरेबिक भाषेत असायचे. कारण प्रेषित साहेबांची मातृभाषाही अरेबिक होती आणि या इस्तिगफारच्या शब्दावलीत मूळ शब्द असायचे "अस्तगफिरूल्लाह रब्बी !" याचा अर्थ 'हे माझ्या ईश्वरा ! हे माझ्या पालनकर्त्या ! मला क्षमा प्रदान कर...!' या मूळ मंत्रावरून प्रेषित साहेबांनी संपूर्ण मानवजातीला त्या अल्लाहल्ला निर्माणकर्त्याला, त्या सृजनकर्त्याला ध्यानी मनी राखून आणि अत्यंत विनम्रपणे, आपल्या अंतःकरणाला जागे राखून म्हणा, 'अस्तगफिरूल्लाह रब्बी मिनकुल्लीजमबिन व अतुबू इलैहि" या वाक्याचा मराठी अर्थ असा "हे ईश्वरा ! सृजनकर्त्या मी तुझ्या चरणी माझ्या पापांची क्षमा मागतो  आणि तुझ्याकडे परततो. म्हणजे माझ्या हातून पुनश्च असे काही घडणार नाही. याची मी हमी देतो. हा अनेक क्षमायाचनांपैकी एक संच आहे. या प्रार्थनांना अत्यंत इतमामपूर्वक आणि मन लावून व अत्यंत शांतचित्ताने पठण करणे जरूरीचे आहे. हजार वेळा पुटपुटत राहण्यापेक्षा अल्लाहकडे ध्यानधारणा करून आणि तोच जगाचा स्वामी आहे, तोच मला क्षमा प्रदान करणार आहे असा विश्वास धरून शंभर वेळा याचा जप केलेला बरा.


          रमजान महिन्यातील प्रत्येक क्षण अत्यंत मौल्यवान असून आपण उठता बसता क्षमायाचनेचे मंत्र म्हणत राहणे उचित ठरेल. इस्लाम धर्माने मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होण्याचा दरवाजा आपल्या अनुयायांकरिता सदैव उघडा ठेवला आहे. इस्लाम प्रत्येक माणसाला मुक्ती मिळवून देण्याकरिता वचनबध्द आहे. या वचनबध्दतेचा पवित्र कुरआनात अनेक  ठिकाणी उल्लेख आहे. 'जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृत्य घडेल अथवा आपल्या स्वतःवर अत्याचार केले आणि नंतर अल्लाहजवळ माफीची विनंती केली, तर अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आढळून येईल. असे अन्निसा या अध्यायात एकशे दहाव्या श्लोकात म्हटले आहे.


       पवित्र कुरआनातून अनेक ठिकाणी पापाचे प्रायश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. जे लोक पाप करून त्याच्यावरच अडून राहतात. घमेंड करतात तेच खरे द्रोही आहेत आणि जगात सर्वात मोठा द्रोह म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचाच इन्कार करणे किंवा संसाराचा निर्माता, पालनकर्ता एकापेक्षा अधिक ईश्वरांना मानणे हे होय. याच वर्तनाला क्रमशः 'कफ' आणि 'शिर्क' असे म्हणण्यात आले आहे. इस्लामी शरीअतमध्ये कुफ्र आणि शिर्क  मानवी जीवनात सर्वात मोठे अत्याचार मानले गेले आहे. पवित्र कुरआनमध्ये हजरत लुक्मान यांचे एक विधान नमूद करण्यात आले आहे.


       "या बुनैथाला तुश्रिक बिल्लाह, इन्नश शिर्क लजुल्मुन अजीम" याचा अर्थ असा "पुत्रा ! अल्लाहसमवेत कोणालाही सहभागी ठरवू नकोस. सत्य असे आहे की शिर्क फार मोठे पाप आहे. असे लुकमान या अध्यायातील तेराव्या श्लोकात म्हटले आहे.


        रमजानच्या महिन्यात विशेष करून एरव्हीही तौबा, दुआ ए मग्फिरत, इस्तिगफार, क्षमायाचना अल्लाहसमोर अत्यंत लाचारावस्थेत प्रार्थना करण्यात उपासकाने गर्क राहिल्यास त्याला अशा गोष्टी प्राप्त होतात, ज्यांचा तो विचारसुध्दा करू शकत नाही.

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

इस्लाम : स्त्री-पुरुष समानता

इस्लाम : स्त्री-पुरुष समानता




         पैगंबर हजरत मुहम्मद सलेअल्लाहु अलैहिवस्सलम यांच्या जीवनशैलीने आणि ते प्रचार-प्रसार करीत असलेल्या इस्लाम धर्माने प्रभावित होऊन ज्या प्रकारे असंख्य पुरूष इस्लाम धर्मात दाखल झाले, त्याप्रमाणे असंख्य महिलांनी देखील इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची जबाबदारी स्वतः पैगंबर साहेबांवर होती. ते त्या स्त्रियांच्या कुटूंबातील ज्येष्ठ म्हणजे आई, वडिल, भाऊ अथवा मामा, चुलते यांना या आधुनिक आणि प्रगत धर्माच्या अनेक बाबींचे शिक्षण प्रशिक्षण देत असत. पैगंबर साहेबांची कार्यमग्नता आणि गोषापर्दा यामुळे स्त्रियांबरोबर ते थेट संवाद साधत नसत. या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी विशेषतः आएशा रजिअल्लाहुतआला अन्हा त्यांच्या सर्वात मोठ्या सहकारी होत्या. त्या पैगंबर साहेबांच्या देहावसानंतर अर्धशतक हयात राहिल्या आणि त्यांनी सर्व मर्यादा सांभाळून या प्रबोधन कार्याचा विडा उचलला त्या खूप प्रतिभाशाली आणि बुध्दीमान होत्या. त्यांची स्मरण शक्ती अप्रतिम होती.


          इस्लामच्या उदयकाळात शत्रूनी या नवजात राज्यावर चोहीकडून हल्ला चढविला होता. अशा धर्मयुध्दात पैगंबर साहेबांच्या अनुमतीने महिलादेखील भाग घ्यायच्या. जखमींची मलमपट्टी करणे, त्यांना पाणी पाजणे, रणसामग्री आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करणे हे त्यांचे विशेष कार्य होते. काही प्रसंगी या महिलांनी सशस्त्र लढासुध्दा दिल्याची इतिहासात नोंद आहे. स्त्रियांना गोषा-पर्दा पाळण्याचे आदेश असलेतरी असे नाही की त्यांना सामाजिक कार्यातून वंचित करण्यात आले होते. युध्द केव्हातरी होते. परंतु, दैनंदिन जीवनातील अनेक कामे दररोज करावी लागतात. ही कामे स्त्री व पुरूष दोघांनी समान सामाजिक पातळीवर कायम राहून पार पाडण्याची मुभा इस्लाम धर्माने नैतिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या शर्तीवर दिली आहे.


         हजरत मुहम्मद पैगंबर सलेअल्लाहु अलैवस्सलम एक क्रांतिकारी प्रेषित, धर्मवेत्ते आणि धर्मपारायण होते. त्यांनी केवळ धर्मप्रचार आणि प्रवचनावरच भर दिला नसून प्रत्येक काम प्रत्यक्ष कृतीने आणि व्यवहारातून करून दाखविले. संपूर्ण पृथ्वी त्यांची कर्मभूमी होती. त्यांचे प्रत्येक कार्य प्रलयापर्यंत साक्षी म्हणून जगणार होते म्हणून त्यांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत पारदर्शक आदेश दिले. संपूर्ण पृथ्वी त्यांची कर्मभूमी असली तरी मदिना त्यांचे केंद्रबिंदू होते. त्यांनी मदिनेत एका  अत्याधुनिक बाजारपेठेची स्थापना केली. त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अनेक लोकांवर टाकली. त्यात अनेक महिलांचा देखील समावेश होता. सिग्रह बिन्त महारबा शिफा बिन्त अब्दुल्लाह, अस्मा बिन्त महारबा, खौला बिन्त सुवैब, मलिका उम्मे साएब आणि कीला अन्नमारिया इत्यादींची नावे उल्लेखनीय आहेत. त्यांच्या मदतीकरिता पुरूषांचा देखील समावेश करण्यात आला होता आणि या ग्रुपला जवळजवळ एका मंत्रालयाचे रूप प्राप्त झाले होते. या महिला कुशलतापूर्वक बाजारपेठेची कामे करायच्या. भाव, वजन, आयात, निर्यात, व्यापाऱ्यांची बसण्याची जागा, रहदारी, बाजार व्यवस्थापन, ग्राहक, सरकार व व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे या सर्व बाबींवर या स्त्रियांचेच नियंत्रण होते. त्यांनी ठरवून दिलेले भाव, वजन, नाण्यांचे मूल्य आणि गाहाण्यांचे निराकरण आजही आपणां सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.


           पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी स्त्री - पुरूष समानतेचे दर्शन घडवू आणले आहे. आणि तसे आदेशही दिले आहेत. मक्कावासियांच्या छळाला कंटाळून श्रध्दावंतांनी मदिनेकडे हिजरत म्हणजेच प्रयाण पत्करले होते. हा प्रवास आणि स्वदेश त्याग काही साधीसोपी गोष्ट नव्हती. बेबंदशाहीच्या काळात मुलाबाळांच्या समवेत, रखरखत्या वाळवंटातून साडेचारशे किलोमीटर गाठणे जिवापलिकडचे काम होते. हा मानसिक आणि शारिरिक त्रास पुरूषांबरोबर स्त्रियांनी देखील भोगला. पवित्र कुरआन त्यांना कोणत्या शब्दात सांत्वना देत आहे पहा...!


         "मी तुमच्यापैकी कोणाचेही कष्ट वाया घालविणार नाही, मग तो पुरूष असो वा स्त्री. तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले. त्यांचे सर्व अपराध दाखल करीन ज्यांच्याखालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि तो सर्वोत्तम आहे" असे कुरआनच्या तिसऱ्या भागात, अलिइमान या अध्यायात १९५ व्या श्लोकात म्हटले आहे.


          सांगायचे तात्पर्य एवढेच की, अल्लाहच्या दरबारात स्त्री व पुरूष दोघांना समान लेखले गेले आहे. त्यामुळे स्त्रियांना आपोआप शक्ती प्राप्त झाली आहे.

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

बीमार की इयादत -आजारी व्यक्तीला भेटणे

 बीमार की इयादत -आजारी व्यक्तीला भेटणे



        आपल्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना आपल्या सद्व्तनाने, गोड आचरणाने उल्हसित करून तिला आनंदित करण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. आपल्या जाण्याने, धीराच्या दोन शब्दांनी थोडा वेळ जरी त्या व्यक्तीला दुःखाचा किंवा काळजीचा विसर पडला तर आपल्या हातून एक मोठे पुण्यकर्म झाले अशी भावना आपण बाळगली पाहिजे. आजारी व्यक्तीच्या समाचारास जाणे, याला बीमार की इयादत म्हणतात. इस्लाम धर्मात हे पुण्य कर्म मानले जाते.


        यासंबंधी हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम म्हणतात, 'ज्यावेळी तुम्ही रोग्याच्या समाचाराकरिता जाता त्यावेळी त्याच्याशी समाधान देणाऱ्या, आनंद देणाऱ्या गोष्टी करून त्या आजारी व्यक्तीला त्याच्या दुःखाचा, वेदनेचा विसर पाडा आणि तू लवकर बरा होवून पुष्कळ वर्षे जगशील असा धीर द्या. तुमच्या बोलण्याने जे होणार आहे ते टळणारे नसले तरी त्यामुळे आजारी व्यक्तीच्या मनाला थोडीतरी प्रसन्नता प्राप्त होईल. दिलासा मिळेल. रोगी आसन्नमरण झाला असला, त्याच्या विषयीच्या सर्व आशा सुटल्या तरी आपण त्याला धीर दिला पाहिजे. आपण दिलेल्या धीराने, आपल्या गोड शब्दाने त्या बिचाऱ्याचे शेवटचे क्षण तरी आनंदात गेले. याबद्दलचे आत्मिक समाधान आपल्याला लाभते.


          काही लोक आजारी व्यक्तिला भेटण्यासाठी मिठाई, फळे, बिस्किटाचे पुडे घेवून जातात आणि आजारी व्यक्तिशी गंभीरपणाने संभाषण करतात. माझ्या अमक्या तमक्या नातेवाईकाला तुमच्यासारखाच आजार झाला होता. लाखोंनी पैसा खर्च केला, डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केला त्यांना वाचविण्याचा, पण यश आले नाही, गेला बिचारा ! अशाप्रकारे बोलतात. अशा बोलण्याने आजारी व्यक्तीचा धीर सुटतो. म्हणून भेटायला जाणाऱ्याने त्याच्यापुढे काय बोलावे व काय बोलू नये याबद्दल तारतम्य बाळगावे. त्याच्यापुढे सकारात्मक बोलावे. आजारातून ठणठणीत बरे झालेले उदाहरण द्यावे. आपुलकीने, हसतमुखाने बोलावे. आजारी व्यक्ती, त्यांची सेवा करणारे नातेवाईक यांच्या मनःस्थितीचा विचार करून बोलावे. आजारी व्यक्तीस त्रास होईल, इतरांना ऐकून कंटाळा येईल एवढा वेळ बसू नये. नाहीतर 'भीक नको पण कुत्रे आवर' या म्हणीप्रमाणे यापुढे बघायला येवू नका, तुमचे बोलणे बंद करा, अशी विनंती करण्याची पाळी येईल. बीमार की इयादतसंबंधी कुरआनमधील तपशील आता पाहू या. आपल्या अंतःकरणात प्रेमळपणाचा, परोपकाराचा ओलावा उत्पन्न झाल्याखेरीज दुसऱ्याशी सहृदयतेने, प्रेमळपणे वागता येणार नाही. प्रेमळ आचरण हे मुस्लिम धर्मास पूर्णत्व आणणारे महान साधन आहे.


हजरत अबू हुरैरह रजिअल्लाह यांचा हवाला देवून इस्लाम हदिसमध्ये खालील संवाद देण्यात आला आहे.


अल्लाह : हे आदमच्या पुत्रा, मी आजारी असताना तू माझी विचारपूस केली नाहीस.


मानव : हे अल्लाह ! तुझी विचारपूस मी कशी करू शकेन. तू तर सर्व जगाचा पालनकर्ता आहेस.


अल्लाह : अमका मनुष्य आजारी होता. त्याची बातमी तुला मिळाली नाही का? जर त्याच्या समाचारास तू गेला असतास तर माझी भेट तेथेच झाली असती, उपाशी व तहानलेल्या बाबतीतही असाच प्रश्न विचारला जाईल की अमूक मनुष्य उपाशी होता तर दुसरा तहानलेला होता जर तू त्यांना खायला अन्न दिले असतेस तर त्याच ठिकाणी तुला माझे दर्शन झाले असते.


         अल्लाहची कृपादृष्टी आपल्यावर पडावी अशी सद्भावना बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम मानवजातीवर प्रेम करावयास शिकले पाहिजे. अल्लाहना पहावेसे वाटते ते मनुष्याचे प्रेमळ मन, अंतःकरण आपण निर्माण केलेल्या मानवजातीवर प्रेमाची पखरण घालून तिचे दुःख दूर करणाऱ्या महाभागाकडे अल्लाहची मेहेरनजर चटकन् वळते. अल्लाह बेहद खूष होतात.


          इयादतीसंबंधी अनेक हदीस आहेत. त्यापैकी एक महत्वाच्या हदीसमध्ये म्हटले आहे. हजरत अबू हुरैरह रजिल्लाह फरमाते हैं कि नबी सल्लल्लाहने फरमाया, जब कोई किसी बीमार की पूछताछ करने जाता है तो एक पुकारनेवाला आसमान से पुकारकर कहता है, "तू अच्छा तेरा चलना अच्छा, तूने जन्नत में अपना घर बना लिया है।"


         हजरत सोबान रजिल्लाह रिवायत करते हैं कि नबी सल्लल्लाहु अलैहिवस्सलम ने फरमाया, जब कोई मुसलमान अपने मुसलमान भाईकी इयादत को जाता है तो वह जन्नत के बाग में होता है ।


        भाई बहनो ! अल्लाह के हुकूम से उपर दी गयी सूचनाओंका पालन करते हुए किसी बीमार की इयादत किया करो और इबादत का हिस्सेदार बनो.

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

वुजू व नमाज

 वुजू व नमाज



       प्रार्थना कुठलीही असो, दैनंदिन जीवनातून माणूस प्रार्थनेकडे वळला तर त्याला शूचिर्भूत होणे गरजेचे आहे. शूचिर्भूतता म्हणजे काय? तर अल्लाहच्या निकट जाण्याची शारीरिक अथवा मानसिक तयारी. नमाजपठण करण्याकरिता दिवसातून पाच वेळा वुजू करावी लागते. म्हणूनच प्रत्येक मशिदीत नमाज पठण करण्यापूर्वी बुजू करण्यासाठी पाण्याची उत्तम सोय केली जाते. वुजू करताना बसण्यासाठी आसन असते. एकाचवेळी पाच ते सात लोकांना वुजू करण्याची सोय असते.


       प्रत्येक नमाज पठण करण्यापूर्वी वुजू करण्याचे अर्थात शास्त्रशुध्द पध्दतीने तोंड, हात, पाय, धुण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पवित्र कुरआनमध्ये आदेश आहे की, हे श्रध्दावंतांनो जेव्हा तुम्ही नमाजपठण करण्यासाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड स्वच्छ धुवून, कानात व नाकात पाणी घालून बोटाने ते स्वच्छ करावेत. हात कोपरापर्यंत धुवावेत. डोक्यावर-मानेवर ओले हात फिरवावेत. पाय घोट्यापर्यंत धुवावेत. दिवसातून पाच वेळा डोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या या स्वच्छतेमुळे नमाजकर्त्यांचे शरीर व मन निश्चितपणे निर्मळ व पवित्र बनते. पवित्र कुरआनमध्ये एके ठिकाणी म्हटले आहे की, अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच एके ठिकाणी म्हटले आहे की, अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच पसंत आहेत. (अततौबा ९:१०८) शरीअतमध्ये असाही उल्लेख आहे की वुजू आणि गुस्ल म्हणजे स्नान करण्यात जास्त पाणी वापरू नये. जास्त पाणी वापरल्यास विधी मकरूह म्हणजे निषिद्ध होतो. अल्लाहच्या दरबारी अशा नमाजचे पुण्य पुर्णपणे लाभत नाही.


         यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा हा संदेश फार पूर्वीपासून आपल्याला दिला गेला आहे. त्याचे पालन करणे म्हणजेच अल्लाहचे आज्ञापालन होय. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी स्वच्छ मातीवर, कच्च्या भिंतीवर किंवा विटांवर हात मारून शूचिर्भूत होता येते. या कृतीस 'तयम्मुम' करणे असे म्हटले जाते. पाणी जवळ असताना आणि आरोग्याविषयी काही तक्रार नसताना कुणी तयम्मुम करत असेल तर ती व्यक्ती शूचिर्भूत होवू शकत नाही. इस्लामी शरीअतमध्ये म्हणजेच इस्लामी धर्मकायद्यात शुध्द व पवित्र राहण्याचे कितीही आदेश देण्यात आले असले तरी पाणी सांभाळून वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. म्हणून पाणी काटकसरीने वापरून वुजू करून नमाज अदा करावी. इस्लाम धर्मामध्ये अत्यंत साधे व शास्त्रशुध्द जीवन जगण्याचे आदेश दिले आहेत. नमाज एक अनिवार्य उपासना मानली आहे. इस्लामी शरीअतने लोकांसमोर अनेक उपक्रम व कर्तव्ये मांडली आहेत. या कर्तव्यापैकी सर्वात महत्वाचे कर्तव्य म्हणजे एकाच ईश्वराची उपासना आणि आराधना. ही उपासना उपासकाच्या मर्जीनुसार किंवा सवड मिळेल तेव्हा करायची नसते. त्यासाठी ठराविक वेळेत व ठरवून दिलेल्या पध्दतीनुसारच करायची असते.


       नमाजपठण दिवसातून पाच वेळा करावे लागते. नमाजपठण प्रत्येक मुस्लिम बंधू-भगिनींच्यावर सक्तीची आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी नमाज पठण करायचे असते. तिला सुबह की नमाज म्हणतात. ती चार रकआत पठण करावी लागते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला 'जोहर की नमाज' म्हणतात. ही नमाज १२ रकआत पठण करावी लागते. सायंकाळी पाचच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला 'असर की नमाज' म्हणतात. ही नमाज आठ रकआत पठण केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर सात वाजण्याच्या सुमारास नमाजपठण होते. त्या नमाजला 'मगरीब की नमाज' म्हटले जाते. ही नमाज सात रकआत पठण केली जाते. रात्री उशिरा नऊच्या सुमारास नमाज पठण होते. त्या नमाजला ईशा की नमाज' म्हणतात. ही नमाज १७रकआत पठण केली जाते. रमजान महिन्यात या पाच नमाज पठनाबरोबरच तरावीह की नमाज पठण करावे लागते.


         जी व्यक्ती या पाचही वेळा नमाज पठण करत असेल त्या   व्यक्तिजवळ फावला वेळच उरत नाही. फावल्या वेळात कुरआन पठण व हदीस पठणही करायचे असते. प्रत्येक नमाज अदा करणेसाठी १५ ते २० मिनिटे लागतात. परंतु, नमाज पठण करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी होण्याकरिता बराच वेळ लागतो. त्यामुळे नमाजी व्यक्तीच्या मनी अविचार येणे शक्य नसते. नमाज पठणामुळे व्यक्तिच्या विचारसरणीत बदल घडून येतो. तो अल्लाहच्या समीप जातो. अल्लाहच्या आशीर्वादामुळे उपासकाला नवनवीन कल्पना सुचतात. त्यांचे काम सोपे होते. कुकर्म टळते त्यामुळे पुण्याईचे वर्चस्व वाढते. आणि जीवनाला दिशा मिळते. तो वाईटाच्या मागे लागत नाही. त्याला भले बुरे समजायला लागते. 'नमाज' ही अशी उपासना आहे की जी व्यक्तिला सन्मार्गाला लावते. शरीराला व मनाला व्यायाम मिळून व्यक्ती सद्गुणी, शांत व सदृढ बनते. अल्लाह ! या महिन्यात सर्वांना नमाजपठण करून दिशादर्शी जीवन जगण्यास मदत कर.

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

पैगंबर साहेबांचे आज्ञाधारक सोबती

पैगंबर साहेबांचे आज्ञाधारक सोबती


        प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना जे अनुयायी आणि सोबती लाभले. पैगंबरसाहेबांचे हे सोबती कसे आज्ञाधारक होते याचा एक छोटासा दाखला देत आहे. एकदा प्रेषितसाहेब आपल्या मशिदीत शुक्रवारचे प्रवचन देत होते. लोक बसण्यासाठीच्या जागेच्या शोधात थोडेफार विखुरलेले होते. हे दृश्य पाहून पैगंबर साहेब प्रवचनादरम्यान एकदम उद्‌गारल, 'बसून घ्या' हे ऐकताच जो माणूस ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी जमिनीवर बसला. नंतर पैगंबर साहेब म्हणाले, 'मला असे म्हणायचे होते की... जागा शोधून लवकर बसून घ्यावे' परंतु सोबती यांना वाटले की, बसण्याच्या आदेशाचा अवमान केल्याने जणू काही ईश्वरी प्रकोपाला सामोरे जावे लागेल.


        दुसरे उदाहरण मदिनेत एक बागायतदार सोबती आपल्या खजुराच्या बगिच्यात खजुराच्या फुलांचे संक्रमण करीत होते. जाताना पैगंबर साहेबांची नजर त्यांच्या या कामावर पडली. त्यांनी सहज विचारले, 'काय असे करणे जरूरीचे आहे?' हे ऐकताच त्या गृहस्थाने संक्रमण करण्याचे काम स्थगित केले. नेमके त्या वर्षी त्यांच्या बागेचे उत्पन्न कमी झाले. पैगंबर साहेबांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की, आपल्या म्हणण्यानुसार मी संक्रमणाचे काम थांबविले. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उत्पादनावर प्रभाव पडला म्हणून पीक कमी आले. हे ऐकताच पैगंबर साहेब म्हणाले, 'मी तर तुझ्या कामाबद्दल सहज विचारले होते की, हा काय प्रकार आहे? काम थांबवायला थोडेच सांगितले होते. शेतीच्या कामात तुम्ही आपला अनुभव वापरीत जा.

  

         जुलै ६३० मध्ये तबूकचे युध्द रोमच्या कारस्थानामुळे या नवनिर्मित समाजावर लादले गेले. दक्षिणेपासून उत्तरेकडील खूप लांबचा प्रवास, उन्हाळ्याचे दिवस, अत्यंत खराब हवामान आणि त्यात खूप वाईट आर्थिक परिस्थिती पैगंबर साहेबांनी युध्दसामग्रीसाठी मदतीचे आवाहन केले. प्रेषित साहेबांच्या सेवेत लोक आपापली मदत घेऊन धावले. जी वस्तू ज्या व्यक्तीकडे होती त्याने ती पैगंबर सोहेबांच्या सेवेत अर्पण केली. हजरत उस्मान खूप श्रीमंत होते. त्यांनी आपल्या मिळकतीमधून एक चतुर्थांश इतकी रक्कम युध्द सामग्रीत दिली. याप्रसंगी हजरत उमर यांनी बाजी मारण्याचे ठरविले. त्यांच्यात आणि हजरत अबूबक्रमध्ये नेहमी चुरस असायची. उमर यांनी मागेपुढे न पाहता आपल्या संपत्तीचे दोन भाग केले. आणि निम्मी रक्कम पैगंबर साहेबांच्यापुढे आणली. मुला-बाळांकडून विचारल्यावर म्हणाले की, निम्मा माल अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांचा व निम्मा माल घरच्यांचा. आज त्याच्यापुढे कुणीच जावू शकत नव्हता. इतक्यात हजरत अबूबक्र त्या ठिकाणी पोहचले. त्यांच्यासमवेत रोख रक्कम, जिन्नस, सोन्या-चांदीची नाणी, हत्यारे, घोडे, खेचर, गाढव, उंट आदींनी लादलेला ताफा होता. हे पाहून पैगंबरसाहेब म्हणाले, 'कुटूंब आणि परिवाराची काळजी घेणे अत्यावश्यक आहे' हे ऐकून हजरत अबूबक्र सिद्दीक म्हणाले, 'प्रेषितसाहेब, तुमच्यामुळे चंद्र आणि सुर्य प्रकाशमान आहेत. तुमच्यामुळे संसाराची निर्मिती करण्यात आली. जसे फुलाला बुलबुल आणि समईसाठी परवाना पुरेसा आहे, मी पण आपल्या घरात अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांचे नाव सोडून आलो आहे' असे होते पैगंबरसाहेबांचे अनुयायी.


        हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम रमजान महिन्याच्या आगमनाचे स्वागत दोन महिन्या आधीपासून करायचे. रज्जब आणि शाबान हे ते दोन महिने होत. रज्जबचा महिना आला की पैगंबर साहेब उपवास ठेवायला सुरूवात करायचे. जास्तीत जास्त कुरआन पठण, जप, अधिक नमाज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उपवास करायला सुरूवात करायचे. पैगंबर साहेबांचे अनुकरण त्यांचे सोबती म्हणजेच सिहाबी हमखास करायचे. त्यामुळे रमजानच्या आगमनाचे आणि त्याच्या स्वागताचे एक उत्साही वातावरण तयार व्हायचे.


         पैगंबर साहेब अत्यंत दयाळू सवलतीवर निगा राखणारे होते. ही गोष्ट, त्यांच्याकरिता अत्यंत आनंददायक होती की, लोक त्यांचे अनुकरण करीत आहेत. परंतु मानवहितामुळे ते या दोन महिन्यात अधूनमधून उपवास करण्याचे टाळायचे कारण त्यांचे कथन आणि कृत्यच नंतर शरीअतमध्ये म्हणजे इस्लामी कायद्यामध्ये परावर्तित होणारे होते. लोकांना असे वाटू नये की रज्जब आणि शअबानचे दोन महिने सुध्दा उपवासाचे महिने आहेत. म्हणून या दोन महिन्यात ते अधून मधून उपवास खंडित करायचे. अल्लाहचा आदेशही तसाच होता.


पैगंबर साहेबांचे हे कार्य तंतोतंत करणारी मंडळी आजही मुस्लिम समाजात आहेत. ही माणसे केवळ उपवासच नव्हे तर बाकीच्या सर्व इबादती म्हणजे उपासना अत्यंत उत्साहात करतात. त्यांच्या या इबादती त्यांच्याकरिताच नव्हे तर संपूर्ण मानवजाती व सृष्टीकरिता एक अनोखा उपहार आहे.

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

इस्लामी जीवनशैली

 इस्लामी जीवनशैली


       काही तरूण मुले-मुली आपल्या तारूण्याच्या जोशात महामार्गावर आखलेल्या पट्ट्यांचे किंवा लेनचे भान ठेवत नाहीत. ते लेन मोडतात, वेगवान वाहनावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे स्वतःचे व दुसऱ्याचेही प्राण गमावून बसतात. जगात विद्यमान असलेले सर्व धर्म म्हणजे जनमानसांना जीवनाच्या महामार्गावर आखून देण्यात येणाऱ्या 'लेन' आहेत. आपल्या धर्मावर म्हणजे आपल्या लेनमध्ये राहून, वेळ आणि वेगमर्यादा सांभाळून द्रुतगतीने गाडी चालवा, कधीही अपघात होणार नाही. स्वतःच्या धर्मामध्ये करायचे आणि शिकायचे बरेच काही आहे. लोक ते सोडून बऱ्याचदा इतरांच्या धर्मात शिरकाव करतात व विनाकारण फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे अयोग्य आहे.


       इस्लाम एक साधा, सोपा आणि सर्वसाधारण व्यक्तिंना सहजासहजी आचरणात आणता येणारा धर्म आहे. इस्लाम धर्माला धर्म म्हणण्यापेक्षा दीन म्हणजे जीवनशैली समजण्याकरिता फार मोठ्या ज्ञानाची, तर्क अथवा दर्शनशास्त्राच्या भांडवलाची गरज नसेत. अल्लाह एक आहे. अल्लाहव्यतिरिक्त कुणीही उपास्य नाही. मुहम्मद सलेल्लाहु अलैहि वस्सलम त्याचे प्रेषित आहेत म्हणजे अंत:करणातून 'ला इलाहा इल्ललाहु मुहम्मदुर रसूलुल्लाहची उद्घोषणा करणे, इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरिता पुरेसे आहे. यालाच कल्लमाए तैयबाः किंवा इमान म्हणतात. इमानची यादी करायची झाली तर 

१) एकेश्वर वाद, वहदत किंवा अद्वैतवार म्हणजेच एका अल्लाहवर विश्वास ठेवणे, 

२) दुसरी गोष्ट मुहम्मद सलेल्लाहु अलैहिवस्सलम यांच्यावर अवतरित झालेल्या ईश ग्रंथ कुरआन आहे.

 ३) मुहम्मद सलेल्लाहु अलैहिवस्सलम अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. 

४) चौथी बाब यापूर्वीच्या सर्व प्रेषिर्तावर व त्यांच्यावर अवतरित झालेल्या ईश ग्रंथावर विश्वास ठेवणे, 

५) पाचवी बाब मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवणे, 

६) सहावी बाब अल्लाहचे दूत म्हणजे फरिश्ते यांच्यावर विश्वास ठेवणे, 

७) सातवी बाब नशीब आणि प्रलयाच्या दिवसांवर तसेच पुनरूत्थान व हिशोब तपासणीवर विश्वास ठेवणे इत्यादी 

ईमानचे अविभाजीत अंग आहेत. ईस्लामी जीवशैलीत त्याच्या चार उपासना आवश्यक आहेत. 

१) पहिली उपासनो नमाज म्हणजे सलात 

२) दुसरी उपासना रोजा म्हणजे उपवास 

३) तिसरी उपासना जकात म्हणजे अनिवार्य करण्यात आलेले दानधर्म 

४) चौथी उपासना हज्ज म्हणजे आयुष्यातून एकदा मक्केतील काबा गृहाच्या परिसरातील विधीकरिता प्रवास.

 संपूर्ण इस्लामी जीवनशैली फक्त दोन गोष्टीवर आधारित आहे. पहिली गोष्ट आहे कुरआन व दुसरी गोष्ट आहे हदीस. हदीस म्हणजे पैगंबर साहेबांचे कथन व आचरण.  कुरआन व हदीसचा फार मोठा वारसा मुस्लिम समाजाला लाभला आहे. इस्लामी धर्मकायदा म्हणजे शरीअत, शरीअत कायदा संकलित करताना किमान चार बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. पहिली बाब कुरआन, दुसरी बाब हदीस वा पैगंबरवारसा तिसरी परंपरा व चौथी बाब भाषा कारण मध्ये काही बाबतींमध्ये स्पष्ट संकेत आहेत. त्यात कुठलाही बदल करता येणार नाही. पैगंबर साहेबांनी आपल्या जीवन काळात जे आदेश दिले व आचरण केले त्यात आता कुठलाही बदल करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे कुरआन आणि पैगंबर साहेबांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी कसे वागले व त्यांनी या आदेशांचे कसे पालन केले, त्याचप्रमाणे तत्कालीन थोर सिहाबी म्हणजे पैगंबरसाहेबांच्या सोबतियांनी कुठल्या  शब्दाचा व संज्ञांचा काय अर्थ लावला व त्याला कसे वापरात व आचरणात आणले? या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विधीतज्ज्ञ, ज्यांना अरेबिक भाषा उत्तम अवगत असते आणि ते सुध्दा मक्तेतील परंपरेच्या संदर्भात तेथील भाषेचा सखोल अभ्यास करून शरीअतच्या कुठल्या कायद्याचे विश्लेषण व संकलन करू शकतात. भाषेच्या अभ्यासामध्ये व्याकरणाला विमानाच्या उड्डाणामध्ये मजबूत धावपट्टीला आणि द्रुतगती आगगाडीच्या खाली रूळाला जे महत्व आहे, नेमके तेच महत्व कुठल्याही धर्मात त्याच्या धर्मकायद्याला म्हणजेच शरीअतला आहे. इस्लामी शरीअत एक अजमावलेली व परिपूर्ण शरीअत असल्याकारणाने तिचे अस्तित्व प्रलयापर्यंत टिकणारे आहे. 


       इस्लामी शरीअतमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरविण्यासाठी उत्तेजित करण्यात आले आहे. विविध उपासनांच्या दरम्यान माणसाच्या हातून काही चुका घडतात उदाहरणार्थ रमजान महिन्यात कुणी जाणून बुजून वेळेच्या आधी उपवास सोडला किंवा उपवास राखलाच नाही अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून ६० दिवसांचे उपवास राखण्याचे आदेश आहेत. असे करताना एकही खाडा झाला तर पुन्हा एकपासून साठपर्यंत उपवास करावेत. एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने रोजा राहणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने साठ गरिबांना दोन वेळचे पोटभर जेवण द्यावे यालाच कफ्फारा म्हणजे परतफेड म्हणतात. तात्पर्य असे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने लोक देणारे बनावेत.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

सहरी व नीयत

 

सहरी व नीयत



        रोजे म्हणजे उपवास धरताना पहाटेच्या वेळी केलेले अन्नग्रहण म्हणजे सहरी. रोजाधारकाला सुर्योदय होण्यापूर्वी जेवण घ्यावे लागते. सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही प्राशन करायचा नसल्यामुळे पहाटेच्या वेळी थोडे का होईना भोजन घेणे अपरिहार्य आहे. कुणी म्हणेल की रात्रीचे जेवण घेऊन झोपतो व पहाटे काही न खाताच रोजा धरतो अशाप्रकारे केलेला रोजा अल्लाहचरणी मान्य होत नाही. खरे पहाता पहाटेची वेळ म्हणजे साखर झोपेची. यावेळी उठणे इतर वेळी कठीण जाते पण आपण पूर्ण श्रध्देने रोजे करायचा मनाशी निश्चय केला की पहाटे उठणे फार सोपे जाते. नव्हे तर त्या नेमक्या वेळी झोपेतून आपोआप जाग येते व उपवासधारक चटकन् उठून बसतो.


       पहाटेच्या वेळी खरं तर भूक नसते पण अल्लाहच्या आज्ञेनुसार आहार घेणे हे कर्तव्य समजून आहार घेतला जातो. कुणी चहा, ब्रेड, बिस्किट वगैरे तत्सम पदार्थ खातात. कुणी हत्का नाश्ता करतो तर कुणी पहाटे पूर्ण ताजा गरम आहारही घेतो. रमजान महिन्यात खरी कसोटी असते आम्हा स्त्रियांची, पती, मुले, सासू-सासरे हे रोजा धरणार असतील तर त्यांना उठवण्यापूर्वी त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक तयार करावा लागतो. म्हणजे सगळे उठण्यापूर्वी तास-अर्धा तास आधी स्वयंपाक करण्यासाठी उठावे लागते. आदल्या दिवशी ईशाची म्हणजेच रात्रीची नमाज, तरावीहची नमाज पठण स्वयंपाक जेवणखान आवरून झोपी जाताना किमान साडेदहा-अकरा वाजलेले असतात. पुन्हा पहाटे तीन-साडेतीन पूर्वी उठावे लागते. सर्व महिला वर्ग हे काम पूर्ण श्रध्देने व आवडीने करतात. कारण सर्वांच्या उपवासाच्या श्रेयातून मिळणारा काही हिस्सा तिलाही मिळणार असतो.


       उपवास राखतानाचे दुसरे महत्वपूर्ण घटक म्हणजे 'नीयत' हे आहे. नीयत म्हणजे इरादा, हेतू किंवा संकल्प असा आहे. 'नीयत' शिवाय उपवास होऊ शकत नाही. कुणी प्रातःकाळापासून सुर्यास्तापर्यंत त्या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहिला, ज्या पासून एक उपवासधारक स्वतःला सांभाळतो, परंतू त्याने रोजा राखण्याची नीयत केली नसेल तर अशा व्यक्तीचा उपवास होऊ शकणार नाही. प्रेषितसाहेबांनी फर्माविले की ज्या व्यक्तीने फज्र म्हणजे पहाटेपूर्वीच नीयत केली नसेल, त्याचा उपवास होऊ शकणार नाही. काही धर्म मार्तडांनी सखोल अध्ययन करून आणि प्रेषित साहेबांच्या इतर वाचनांना समोर ठेवून असा निर्णय दिला आहे की मध्यान्हच्या एक तासआधी जर कुणी उपवासाची नीयत केली असेल तर आणि काही खाल्ले पिले नसेल तर रमजान आणि इतर दिवसांचाही उपवास राखता येईल. नीयत राखणे आणि त्याचा निश्चय करण्याचे ठिकाण हृदय आहे, म्हणून केवळ मनातून जरी इरादा, निश्चय केला, की कुठला उपवास करीत आहे तरी पुरेसे आहे. तोंडाने नीयतीची 'दुआ उच्चारली नाही तरी चालेल, परंतु दुआ तोंडाने उच्चारणे जास्त बरे' असे म्हटले जाते.


       उक्ती आणि कृतीमध्ये एकनिष्ठता रहावी म्हणून प्रत्येक रोजाधारकाकडून एक वचन घेतले जाते. पहाटेची न्याहरी म्हणजेच सेहरी घेतल्यानंतर रोजाधारकाने एक श्लोक म्हणावा लागतो "अल्लाहुम्मा असूमु गदल्लका फग फिरली मा कद्दमतु वमा अख्तरतु" याचा मराठीत अर्थ असा "हे अल्लाह ! उगवणाऱ्या दिवशी मी तुझ्याकरिता उपवास करतोय, तूच माझ्या मागील व पुढील पापांना क्षमा प्रदान कर" या वचनाला सर्वसाधारण भाषेत 'सहेरी की दुआ' असे म्हणतात. ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे, वचन आहे, जी अल्लाहला साक्षी ठेवून उद्‌गारायची असते. याचा अर्थ असा की, "मी अल्लाहबरोबर केलेला करार दिवसभर मोडणार नाही.'


         सतत तीस दिवस या कराराचे पालन करत राहिल्याने माणसाच्या अंतःकरणात एक विधायक बदल घडून येतो आणि आपले वचन पाळण्याची त्याला सवय लागते. कुणी पहात नसले तरी तो सर्वज्ञ आणि सर्व काही पहाणारा आहे. मौज-मजेची सर्व साधने उपलब्ध असताना देखील अल्लाह पहात असल्याचे विचार ध्यानी-मनी राखून आपल्या करारांशी एकनिष्ठ राहणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उपवास करणे होय. इस्लामी शरीअतमध्ये उक्तीला जितके महत्व आहे, त्यापेक्षा अधिक महत्व कृतीला आहे. रोजे रमजानचे असोत किंवा एरवी विविध कारणांनी राखण्यात आलेले असतो, त्याकरिता सेहरीचे सेवन करणे आवश्यक आहे. पैगंबर साहेबांचा आदेश आहे की सेहरी खात जा, अशाकरिता की सेहरीच्या सेवनात बरकत म्हणजे कल्याणकारी अंश आहेत. एका हदीसमध्ये सांगण्यात आले आहे की 'आमच्यात आणि अहलेकिताबच्या म्हणजेच ईश्वरी ग्रंथावर श्रध्दा ठेवणाऱ्यांच्या उपवासामध्ये फरक व वैशिष्ट्य सहरी खाण्याचे आहे. म्हणजे आम्ही सहरी घेत असतो व ते घेत नाहीत. रोजाधारक बंधु-भगिनींनो सेहरी सेवन करा, नीयत करा व रोजा रहा. आता आपण शारीरिक स्वच्छता व पावित्र्य याविषयी पाहू या....!

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

'रमजान' महिन्याचे महत्व

      'रमजान' महिन्याचे महत्व


       





      मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरूवात आजपासून होत आहे. रमजान इस्लामी हिजरी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. इस्लामी पंचागांत दिवसाची गणना आणि वेळेचे मोजमाप सुर्याच्या हालचालीचा हिशोब लावून केले जाते, तर महिना चंद्रदर्शनावर आधारित म्हणजेच चांद्रमासावर अवलंबून आहे. इस्लामी परंपरेप्रमाणे सर्व दिवस आणि सर्व महिने शुभ व कल्याणकारी आहेत. परंतु काही दिवस व काही महिने अतिशुभ मानले गेले आहेत. त्यापैकीच एक अतिशुभ महिना रमजान होय. रमजानला इस्लाममध्ये वेगळे स्थान आहे.


       कुरआन उतरविण्याचे व आदेशाना ग्रंथीत करण्याचे काम रमजान या पवित्र महिन्यात झाले आहे. म्हणूनच या महिन्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हदीस म्हणजेच पैगंबर वाणीनुसार कुरआनचे एक एक अक्षर वाचणाऱ्यांला या महिन्यात दसपट पुण्य लाभते, अशी मुस्लिम बांधवांची धारणा आहे. त्यामुळे कुरआन वाचनाचे प्रमाण या महिन्यात दसपटीने वाढते. कुरआन वाचून झाल्यानंतर इमानधारक अल्लाहजवळ जी दुआ मागेल ती मंजूर होते, रद्द होत नाही अशी पूर्ण श्रध्दा ठेवून कुरआन वाचन होते.


       'रोजा' उपवास इस्लामच्या पाच आवश्यक उपासनांपैकी एक आहे. रमजानचे रोजे चाँद दिसल्यापासून सुरू होतात. रोजे म्हणजेच उपवास करणे याचा अर्थ केवळ उपाशी तापाशी राहणे नाही. मानवाच्या मनामध्ये चांगल्या भावना जागविण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया आहे. रमजान हा आत्मशुध्दी करणारा महिना आहे. रमजान पवित्र प्रार्थना करण्याचा अगदी मनापासून अल्लाहची उपासना करण्याचा महिना आहे. रोजे म्हणजे इंद्रियांना वश करण्याचा तप आहे. या महिन्यात वाईट गोष्टीकडे जाणे, वाईट गोष्टी करणे तर दूरच, त्यांच्याबाबत विचार करणे हा सुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, खोटे बोलणे अथवा दुसऱ्याला त्रास होईल असे बोलणे निषिध्द मानले जाते. थोडक्यात रोजे केल्यानंतर वाईट पाहू नये. वाईट ऐकू नये व वाईट बोलू नये. रोजे राहणाऱ्याने मन, वचन आणि कर्माने स्वतःला शिस्तबध्द आणि संयमित ठेवणे आवश्यक आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फक्त आपल्या दीन अर्थात अल्लाहच्या स्मरणात मग्न राहून आत्मिक शांति व समाधान मिळविण्याची नामी संधी उपासकाला अल्लाहने दिली आहे.


        रमजान महिन्यात रोजाधारकांची मने द्रवतात आणि त्यांच्या नजरेसमोर मानवी जीवनाचे नवे आयाम उभे राहतात. या महिन्यात आपल्या उपासकाला उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत सुर्यास्तापर्यंत ताटकळत ठेवण्यात अल्लाहचे काहीच हीत नाही. परंतु, रोजे राहण्याची ही उपासना उपवास धारकाच्या फारच हिताची आहे. या महिन्यात अल्लाहने रोजेधारकाला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या संधीचे सोने करणे सर्वस्वी रोजेधारकाच्या हाती आहे.


        या महिन्यातील संपूर्ण वातावरण पुण्य प्राप्तीच्या प्रयत्नांनी बहरले असल्यामुळे लोकांची मने भलाई, उपकार, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणाकडे वळलेली असतात. चांगले मित्र, चांगली पुस्तके, चांगला परिवार ज्याप्रमाणे आपल्या जीवनात आणि विचारात बदल घडवून आणतात त्याप्रमाणे या पवित्र महिन्यात अंत:करणपूर्वक केलेली उपासना, उपासनेनंतर मागितलेली दुआ मानवाच्या जीवनात विलक्षण संस्कार घडवून आणते. रोजा राहिल्याने मनुष्य अल्लाहच्या अधिक जवळ जातो. रोजेधारकांना मनःशांती मिळते.


       रमजानच्या पवित्र महिन्यात प्रत्येक रोजाधारकाला प्रातः काळापासून उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत रहावे लागते. भुकेलेल्या, तहानलेल्या अवस्थेत माणसाचा रक्तदाब म्हणजेच बी. पी. कमी होतो. पण त्याच्या पुण्याईकडे कल वाढल्याने त्याच्या रक्तात डोपामिनसारख्या विधायक द्रव्याचे प्रमाण वाढते आणि मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या सबल होऊन समाजहितासाठी स्वतःला वाहून देण्यासाठी सज्ज होतो. एवढेच नव्हे तर एका रोजाधारकाकडून या महिन्यात केवळ घेत राहण्यापेक्षा देत राहण्याची सवय लागते. कारण रोजाधारकाकडून जकात, फित्रा, सदका, कफ्फारा, फिदीया, अतिया इत्यादीसारख्या आर्थिक दानधर्माच्या उपासनाही रोजाधारकाकडून सातत्याने करवून घेतल्या जातात. या महिन्यात या सर्व शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि अध्यात्मिक उपासनां सतत महिनाभर करत असल्याने एका श्रध्दावंताच्या जीवनात एक प्रकारची क्रांती घडून येते. तो उपवासधारक विनम्र होण्याचे शिकतो. इतरांच्या भुकेची, तहानेची त्याला जाणीव होते. तो अंतरात्म्यात डोकावून पहाण्यास शिकतो. रोजाधारक एका अदृश्य म्हणजे निर्गुण निराकार शक्तीच्या प्रसन्नतेसाठी ही उपासना करतो. अल्लाह ! सर्वांना रोजे करून यश प्राप्तीसाठी संधी देवो.

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

Feed back अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल , जयसिंगपूर बाबत माझे मनोगत

 Feed back 
अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, जयसिंगपूर बाबत माझे मनोगत



"अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची शान।

रूग्णासाठी प्रभूजींचे वरदान"

       दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी पेशंट म्हणून या हॉस्पीटल मध्ये जाण्याचा योग आला. दोन पावलांची माझी चाल पाहूनच डॉ. शिवराज मंगसुळे यांनी दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार आहे असे सांगितले आणि भितीने पोटात गोळा उठला, छातीत धस्स झाले व डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. एकतर मला अस्थमाचा त्रास बऱ्याच वर्षांपासून आहे. सोबत हायपो थायराईड आणि बी.पी.ही आहे अशा परिस्थितीत ऑपरेशन कसे होणार? हा डोंगराएवढा प्रश्न समोर उभा राहिला. एक्स रे रिपोर्ट आला आणि डॉ. शिवराज यांचा अंदाज शंभर टक्के बरोबर निघाला. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून शरीराचा व्यायाम व मनाची तयारी सुरू झाली.


       प्राथमिक तपासण्या झाल्यानंतर २ डिसेंबर २०२५ दुपारी उजव्या पायाच्या ऑपरेशन साठी ऍडमिट झालो. ३ डिसेंबर २०२५ ते ७  डिसेंबर २०२५ या कालावधीत व उजव्या पायाच्या ऑपरेशनसाठी दि.११ जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी या कालावधीत मला ' अरिहंत ' हॉस्पीटलमध्ये वास्तव्य करण्याचा सुयोग आला. मला हॉस्पिटलमध्ये राहिल्यासारखे अजिबात वाटले नाही तर कुटूंबासोबत घरीच राहिल्याचा अनुभव आला कारण या हॉस्पिटलमधील तज्ञ, अनुभवी,  सुस्वभावी, सुसंस्कृत,  डॉक्टर्स  व आनंदी वातावरणामुळे रूग्ण  वेदना विसरून आनंदी राहतो.


         पहिल्या ऑपरेशनच्या वेळी म्हणजे ३ डिसेंबर च्या रात्रीच्या असह्य वेदना सहन केल्या. चार तारखेला दत्त जयंती होती आणि मला त्या दिवशी त्रिदेव भेटले. हे त्रिदेव कोण ? तर डॉ. निखील पाटील, डॉ. शिवराज मंगसुळे, व डॉ. अकलंक चौगुले आणि ओठावर शब्द आले.....


'ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले,

मला ते दत्तगुरू दिसले,मला ते दत्तगुरू दिसले।'


          कोरोनाकाळात माझी शिक्षिका असलेली कन्या सौ. अरमान हिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. आणि सारं कुटुंब भयभीत झालं. तिची लहान मुले रडत तिला बिलगू लागली. दोन तीन अनुभवी डॉक्टरांनी पेशंटला हातही न लावता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. बॅग भरून झाली. आणि एक एम्. आर्. मित्राने सल्ला दिला की डॉ. निखील पाटील यांना भेटा व त्यांनी सांगितले तर कोविड सेंटरमध्ये दाखल करा.  शेवटचा उपाय म्हणून डॉ. निखील यांच्याकडे गेलो. त्यांनी बिनधास्त तपासणी केली नि ताबडतोब डेंग्यूची टेस्ट करायला सांगितली.  व पाच दिवसात तिला पूर्ण बरी करतो असा ठाम निर्णय दिला आणि आश्चर्य म्हणजे सौ.अरमान पाच दिवसात पूर्ण बरी होऊन ड्युटीवर हजर झाली. ऑगस्ट २०२४ मध्ये मला अस्थमाचा जीवघेणा त्रास झाला. डॉ. निखील पाटील मला या कठीण  प्रसंगातून वाचविले. या दोन्ही  प्रसंगात मला डॉ. निखील यांच्यात देव दिसला.


       डॉ. शिवराज मंगसुळे एक निष्णात आर्थोपेडीक सर्जन आहेत. थोड्याशा चालण्यावरुन अचूक निदान करणारे माझ्या जीवनातील पहिलेच डॉक्टर आहेत. प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले, दिलखुलास बोलणारे व दुसऱ्याचंही शांतपणे ऐकून घेणारे,  पेशंटसमोर स्पष्टपणे वस्तुस्थिती मांडणारे,  रूग्णांना मानसिक आधार देणारे,  कठोरपणे व्यायाम करुन घेणारे, रुग्णांना स्वतः चालायला आधार देणारे, स्वतःच्या आधाराने जिना चढायला लावणारे, ड्रेसिंग स्वतः करणारे डॉ. शिवराज  वैद्यकीय क्षेत्रातील 'राजे' आहेत. रुग्ण औषधाने बरा होतो हे खरे आहे पण औषधोपचाराबरोबर डॉक्टरांच्या आत्मविश्वासपूर्ण आधाराची साथ असावी लागते. ती साथ डॉ. शिवराज यांच्याकडून मिळते. ऑपरेशन थिएटरमधून हसतमुखाने बाहेर पडून रूग्णाच्या नातेवाईकांना ऑपरेशन ठीक झाल्याचे सांगणारे डॉक्टर क्वचितच पहायला मिळतील. मला तर ते देवदूत वाटले.


         डॉ. अकलंक चौगुले हे वैद्यकीय क्षेत्रातील एक खणखणीत नाणे आहे. डॉ. अकलंक अष्टावधानी आहेत. डॉक्टर कसा असावा? याचे उत्तर डॉ. अकलंक सारखा असेच द्यावे लागेल. रूग्णांना त्यांच्याच शब्दात नव्हे तर त्यांच्या मनात शिरुन समजावून सांगतात. प्रत्यक्ष कृतीसह विनोदी शैलीत रूग्णांना मानसिक आधार देण्याची त्यांची खास खुबी मला मनापासून आवडली. उपचार तर सगळेच डॉक्टर करतात डॉ. अकलंक रूग्णांना विचार करायला लावतात वेगळ्या पद्धतीने. माझे चिरंजीव मोहसीन याचे डॉ. अकलंक क्लासमेट आहेत हे समजल्यावर शिक्षकाच्या या सुपूत्राचा  मला फारच अभिमान वाटला. रूग्ण डिसचार्ज घेऊन घरी जाताना रूग्णाला गाडीत बसविण्यापासून जिन्याच्या पूर्ण पायऱ्या  चढवून घरातील बेडवर पोहोचविण्यापर्यंत साथ देणाऱ्या या आगळ्या वेगळ्या  डॉक्टरांचे मी आभार कसे मानू?

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असणाऱ्या या तीनही डॉक्टरांना मी हार्दिक आशीर्वाद देते.

शेवटी एवढेच म्हणेन....

' जबतक चाँद सूरज रहेगा, तबतक तुम्हारा यह पेशंट तुम्हे आशीर्वाद देगा । तुम्हारी भलाई चाहेगा और आप तिन्होंको यश के पहाडपर देखना चाहेगा।'


           


                    डॉ. निखिल पाटील यांचा सत्कार


                                              
                 
                  
                  डॉ. शिवराज मंगसूळे यांचा सत्कार 



           

                   डॉ. अकलंक चौगुले यांचा सत्कार