मंगळवार, २ मार्च, २०२१

मुलीच्या लग्नाची घाई कशाला? - विशेष लेख


८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या, चिंतनपर, ह्रदयस्पर्शी, उद्बोधनात्मक, वैचारिक लेखमालिका खास रसिक वाचक बंधूभगिनींसाठी........


८ मार्च महिला दिनानिमित्त वैचारिक, चिंतनपर लेखांची मालिका.......


जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख पुष्प पहिले


मुलीच्या लग्नाची घाई कशाला? - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


कळी खुलू द्या....

       गव्हाळ रंगाची, बोलक्या डोळ्यांची एक तरूणी, दोन्ही हातांना दोन छोट्या मुलींसह मला रस्त्यावर समोरून येताना दिसली. माझ्याकडे पाहून गोड हसली व म्हणाली, "मॅडम, ओळखलं का मला". मी तिच्याकडे निरखून पहात म्हटले, "तू उषा कोकाटे ना?" तिने होय म्हणताच मी विचारले, "या दोन छोट्या कुणाच्या? तुझ्या भावाच्या का?" ती म्हणाली, "भावाच्या न्हाईत माझ्याच हैत". मी आश्चर्याने विचारले, "अगं लग्न केंव्हा झालं? बोलवलं नाहीस लग्नाला". ती सहजपणे म्हणाली, "लग्न झालं बी, अन् नवरा मरून बी गेला, दारू पीत होता, लिव्हर खराब झालं नि गेला मरून". मी खेदाने विचारले, "पाठीमागे इस्टेट वगैरे आहे की नाही?" ती म्हणाली, "कुठली इस्टेट आणि कुठलं काय, फुटक्या कवडीचीबी इस्टेट न्हाय". मी विचारले, "मग काय करतेस आता?" ती म्हणाली, "वडील आधीच वारले होते. माझ्या काळजीनं आई बी दोन वर्षापूर्वी मरून गेली. एक भाऊ हाय पण या महागाईच्या काळात त्याचं त्याला फुरं झालय. माझी मी भाड्याची खोली घेऊन राहते. चार घरची धुणीभांडी करून घरखर्च भागवते. काय करायचं मॅडम माझं नशीबच फुटकं म्हणायचं. काय बी करून या पोरीस्नी लहानाचं मोठं करायचं ठरवलंय बघा".


       एवढं बोलून उषा गडबडीने निघून गेली. पण माझ्या मनात असंख्य विचारांचे काहूर माजवून गेली. चार-पाच वर्षापूर्वी स्वच्छंदपणे बागडणारी, क्रीडा स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविणारी, सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणारी उषा आज 'विधवा' बनली होती. अकाली प्रौढ बनून अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत लावू इच्छित होती. अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आतच तिच्या आईने आमची गल्ली चांगली नाही. मी दिवसभर कामाला जाते, तरण्याताठ्या पोरीची जबाबदारी कोण घेणार? म्हणून उषाचे लग्न करून मोकळी झाली होती. मुलीच्या जबाबदारीतून मुक्त झाली होती.


       आज समाजात मुलीचे लवकरात लवकर लग्न करून मुक्त होणाऱ्या अनेक माता आहेत. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्या मुलीचं यामुळे वाटोळं करत आहोत. उषासारख्या दुर्दैवी अनेक उषाही आहेत. दर २९ व्या मिनिटाला बलात्कारास, दर दिवशी ५० हुंडा अत्याचारास बळी पडणाऱ्या आपल्या महान देशात अशा उषानी दोन कोमल कलिकासमवेत कसे जगावे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. देशाच्या कानाकोपऱ्यात स्त्रियावरील अत्याचारांवर चर्चा होतात. अत्याचार रोखण्यासाठी कायदे होतात. समाजातील मूठभर लोक विचारमंथन करतात पण या चर्चेने, विचारमंथनाने किंवा कायद्याने स्त्रियांवरील अत्याचार दूर होतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. समाजाची, लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अशा लाखो उषा दुर्दैवाच्या अंधारात चाचपडतच राहणार का?


       शेवटी एकच सांगावेसे वाटते आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी मुलीचे लग्न लवकर उरकून टाकू नका तिला स्वावलंबी बनवा, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्याची क्षमता तिच्यात येऊ द्या. करालना एवढं!


२ टिप्पण्या:

  1. जेव्हा शिकलेल्या मुली आई-वडील यांचा विचार न घेता एका उनाड पोरासमवेत जातात तेव्हा ही हीच परिस्थिती निर्माण होते.

    उत्तर द्याहटवा