गुरुवार, १७ जून, २०२१

झाशीची राणी लक्ष्मीबाई - विशेष लेख


१८ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या शौर्याची गौरवगाथा....


झाशीची राणी लक्ष्मीबाई -  विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


लक्ष्मीबाई यांंचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.


जन्म व बालपण:

       राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरातील मैदानीनगर येथे झाला. त्यांचे बालपणीचे नांव मणिकर्णिका असे होते. म्हणून बालपणी त्यांना सर्वजण मनू म्हणायचे. त्यांच्या वडिलांचे नांव मोरोपंत तांबे असे होते. ते दुसऱ्या बाजीरावांच्या पदरी अधिकारी होते. बिथूरच्या दरबारात पेशवे आणि आधुनिक विचारसरणीचे लोक होते, जे मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास ठेवत होते. लक्ष्मीबाईंच्या आईचे नांव भागिरथीबाई असे होते. लक्ष्मीबाई चार वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. लहानपणी पेशव्यांच्या नानासाहेब या स्वीकृत मुलाबरोबर ती वाढली. तिला मुलांचे खेळ फार आवडत. घोड्यावर बसणे, पोहणे आणि शस्त्रे चालविणे यात ती प्रविण झाली.


बालपणीचे प्रसंग:

       एकदा तिने स्वतःसाठी हत्ती मागितला. तिच्या वडिलांनी 'हत्ती तुझ्या नशिबात नाही' असे म्हणून तिला चापले. लक्ष्मीबाईंचे डोळे चकाकले. ती ताडकन् म्हणाली, "एकच काय, शेकडो हत्ती आहेत माझ्या नशिबात." ही जणू भविष्यवाणीच होती, जी सत्यात उतरली.


       दुसरा एक शौर्याचा प्रसंग असा, एकदा लक्ष्मीबाई घोड्यावरून जात असताना नानासाहेबांनी त्यांना म्हटले की, 'जर हिम्मत असेल तर माझ्या घोड्यापुढे जाऊन दाखव'. लक्ष्मीबाईनी हे आव्हान हसत हसत स्विकारले. नानासाहेबांचा घोडा वेगाने धावत असतांना लक्ष्मीबाईनी आपल्या घोड्याचा वेग वाढवत त्यांना मागे टाकले. नानासाहेबांनी लक्ष्मीबाईना मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले आणि घोड्यावरून पडले. लक्ष्मीबाईंनी आपला घोडा मागे वळवून नानासाहेबांना स्वतःच्या घोड्यावर बसवून घरी आणले. नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंची प्रतिभा ओळखली, कौतुक केले.


चरित्र व कार्य:

       लक्ष्मीबाईंचे लग्न गंगाधरराव या झाशीच्या राजाबरोबर झाले. त्यांचा मुलगा तीन महिन्याचा होऊन मरण पावला. निपुत्रिक अवस्थेतच कदाचित मरण येईल असे वाटून आजारी गंगाधररावांनी पाच वर्षाचा एक मुलगा दत्तक घेतला. अठरा वर्षाच्या लक्ष्मीबाईना विधवा करून गंगाधरराव स्वर्गवासी झाले.


       डलहौसीने दामोदरराव हा बेकायदेशीर वारस असल्याचे जाहीर केले. १८५४ मध्ये त्याने झाशीचे राज्य आपल्या राज्याला जोडले. झाशीच्या खजिन्याला सील ठोकले. राणी लक्ष्मीबाईना निवृत्ती वेतन देण्याची तयारी दाखविली. पण राणीने ती ठोकरली.


भारतीय स्वातंत्र्ययुद्ध:

       १८५७ साल सुरु झाल्यावर राणीला प्रतिकार करण्याची संधी मिळाली. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला. राणीच्या सेनापतीनी किल्ला व खजिना जिंकून घेतला. १८५८ मध्ये सर ह्यू रोझ याच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सैन्याने झाशीवर तोफगोळ्यांचा मारा केले राणीने प्रसंगी स्वतः तोफा डागल्या. दत्तक पुत्राला पाठीशी बांधून दुष्मनांचे आक्रमण रोखण्यात ती जवळ जवळ यशस्वी झाली होती. पण लक्ष्मीबाईंच्या सैन्यातला एकजण फितूर झाला आणि त्याने ब्रिटिशांना किल्ल्यात शिरण्याची वाट दाखवली. झाशी पडल्याचे राणीला समजले. तिने पुरूषी वेष धारण केला. दत्तक पुत्राला व अनुयायांना घेऊन यमुना तीरावरच्या काल्पीकडे प्रयाण केले. काल्पीला राणीने तात्या टोपे आणि इतर क्रांतिकारकांना गोळा करून ग्वाल्हेर काबीज केले. ग्वाल्हेरचे राजे जियाजीराव शिंदे यांना राज्यावर बसविण्यासाठी सर ह्यू रोझ यांनी ग्वाल्हेरला कूच केले. तात्या टोपेंचे सैन्य विखरून टाकण्यात ब्रिटिशांना यश मिळाले. त्यावेळी लक्ष्मीबाई मदतीला धावल्या. त्यांनी किल्ल्याचा पूर्व दरवाजा धरला. भयानक आक्रमण करीत शत्रूला मागे रेटले. पण दुसऱ्याच दिवशी ती रणांगणावर एकाकीच पडली. ब्रिटिश तलवारीने राणीला जखमी केले. भळाभळा रक्त वाहात असतानाही राणी आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूवर धावून गेली. राणीने त्याला ठार मारले. अशक्तपणाने पुढे जाणे अशक्य होऊन ती घोड्यावरून पडली. मृत्यूसमयी राणीचे वय फक्त तेवीस वर्षाचे होते.


       राणी लक्ष्मीबाई यांना क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या धाडशी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर स्त्रियांच्या मनात एक धाडशी उर्जा निर्माण केली आहे.

सर ह्यू रोझ यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे।

अशा या पराक्रमी राणी लक्ष्मीबाईना कोटी कोटी प्रणाम।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा