शनिवार, ५ जून, २०२१

पर्यावरणाचं संरक्षण करू या - विशेष लेख

 

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्त पर्यावरण संरक्षणाविषयी केलेले चिंतन......


पर्यावरणाचं संरक्षण करू या - विशेष लेख

✍  डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: scotbuzz.org


प्रस्तावना:

       पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पर्यावरण असमतोलाच्या प्रखर व सातत्याने वाढणाऱ्या समस्येला आज संपूर्ण जगातील मानवजात तोंड देत आहे. प्रामुख्याने लोकसंख्या वाढ रोखण्यासाठीचा लढा, दारिद्र्य आणि निरक्षरता या बाबींचा देशाच्या विकासातील संबंध येतो. हे सर्व घटक पर्यावरणाच्या भविष्यातील नुकसानीला परस्परांशी संबधित व जबाबदार आहेत हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. म्हणूनच आपल्याभोवती असलेल्या परिसराची माहिती करून घेणे व त्यांचा मानवांशी असलेला संबंध जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने  महत्त्वाचे आहे. आपले अस्तित्व आपल्याभोवती असलेल्या भौतिक व जीवित पर्यावरणाच्या सुस्थितीवर अवलंबून आहे. आपली प्रत्येक व्यक्तीगत किंवा संघटित कृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणावर परिणाम करत असते.


       पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा कल सूचीत करतो की, आज प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबद्ध होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजे नाहीतर भावी पिढीला अपुरी साधनसंपत्ती, प्रदूषण, लोकसंख्यावाढ व त्याबरोबर येणाऱ्या सामाजिक आर्थिक व राजकीय तणावाला सामोरे जावे लागेल.


पर्यावरण म्हणजे काय?

       आमच्या सभोवताली जे जे दिसते ते सारे म्हणजे पर्यावरण! यात सजीव व निर्जीव सर्व काही येते. हवा हे निर्जीव तर असंख्य अतिसूक्ष्म जीव, झाडे, प्राणी आणि आपण हे सजीव घटक होत.


पर्यावरण प्रदूषण:

       ज्या वातावरणात, सर्व वनस्पती आणि प्राणी निर्माण होतात, ते पर्यावरण त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं. त्या पर्यावरणाच्या घटकातील कोणताही बदल हा त्यांना त्रासदायक ठरतो. त्यांच्या वाढीवर, जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. पर्यावरणात कोणत्याही प्रकारचा बिघाड किंवा अवनती याला पर्यावरणाचं प्रदूषण म्हणतात. पर्यावरण चांगले राखण्यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांची जोपासना करायला हवी. परिसर स्वच्छ ठेवायला हवा. आपली जमीन, पाण्याचे साठे, जंगल आणि वातावरण यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी लोकसंख्या तसेच जनावरांची संख्या आटोक्यात ठेवायला हवी. यामुळे पर्यावरणाचे घटक व साधनसंपत्ती यांचा समतोल साधणे शक्य होईल.


पर्यावरणाचा समतोल कशासाठी?

       वनस्पती या मूलभूत घटकापासून सर्वांना अन्न मिळतं. वनस्पतीवर जगणाऱ्या काही छोट्या प्राण्यांना मोठे प्राणी खातात. ज्या वनस्पती आणि प्राणी इतराचं अन्न असतात ते अन्न साखळीतील एक दुवा बनतात. या प्राण्यांचा व वनस्पतींचा जर नाश झाला तर अन्नसाखळीतील इतरांच्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अन्नसाखळ्यासाठी पुरेशा प्रमाणात वनस्पती आणि प्राणी असणं हे पर्यावरण समृद्ध असल्याचं एक लक्षण आहे.


अन्नसाखळी खंडित कशी होते?

       साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. बेडूक डासांच्या अळ्या आणि इतर कीटक खातात. बेडकांना साप खातात. सापांना मुंगूस आणि गरुड खातात. माणसांनी जर भातशेतातून मोठ्या प्रमाणावर, खाण्यासाठी, बेडूक पकडले तर बेडकांची संख्या घसरेल आणि त्यामुळे डासांची आणि इतर कीटकांची संख्या वाढून पिकांना तर हानी होईलच पण टायफॉईड, डेंग्यू यासारखे रोगही पसरतील. पुरेसे बेडूक नसले तर साप, उंदीर, छोटे पक्षी आणि अंडी खाण्यासाठी शेतातून घराजवळ येतील. जेंव्हा जंगलातून वाघ आणि सिंह कमी होतात तेंव्हा हरणे आणि गवे यांची संख्या वाढते आणि वनस्पतीवर अवलंबून असणारे हे प्राणी जंगलाचा नाश करतात. जेंव्हा हत्तीना जंगलात बांबूचे कोवळे कोंब आणि हिरवा चारा मिळेनासा होतो तेंव्हा ते चरण्यासाठी शेतात येतात. माकडांना जेंव्हा जंगलात पुरेशी फळं आणि पाणी मिळत नाहीत, तेंव्हा ती बागांमध्ये फळं आणि फुलं खाण्यासाठी येतात. कोल्ह्याना आणि लांडग्याना जंगलात जेंव्हा प्राणी मिळेनासे होतात तेंव्हा ती गावात कोंबड्या, कुत्री आणि मांजर खाण्यासाठी येतात.


       लोकसंख्या वाढीमुळे जेंव्हा मर्यादित जमिनीवर अधिकाधिक लोक राहू लागतात तेंव्हा पर्यावरणाचा समतोल ढासळतो. जुन्या काळी अनेक लोक रोगजंतूमुळे होणाऱ्या प्लेग, कॉलरा, देवी, क्षयरोग, विषमज्वर अशा अनेक रोगांमुळे मरत असत. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर अनेक रोगप्रतिबंधक लसी निघाल्या, त्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. परिणामी लोकसंख्येची भरमसाठ वाढ झाली आहे. अधिक लोक म्हणजे राहण्यासाठी अधिक जमीन, अधिक अन्न आणि अधिक इंधन! परंतु जमीन ही वाढत नसल्याने आपल्याला आहे तेवढ्याच जमिनीवर अधिक उत्पादन काढावं लागते. साठ वर्षापूर्वी एक चौरस जागेवर एकशे सतरा माणसं रहात होती. तेवढ्याच जागेवर दोनशे सत्तर माणसांना साधारणपणे रहावं लागत आहे. अन्नधान्य पिकविणाऱ्या दीड कोटी हेक्टर जमिनीतून एवढ्या प्रचंड लोकसंख्येला अन्न पुरवावे लागत आहे.


पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी उपाय:

खेडेगावातील लोकांनी करावयाचे उपाय :

  • निर्धूर चुलींचा वापर
  • स्वयंपाकघरातील धूर बाहेर जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था आणि तेथील हवा खेळती ठेवणे
  • गुरंढोरं घराबाहेर बांधणे.
  • चांगल्या जातीची गुरे बाळगणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची धूप थांबविणे.
  • रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांचा काळजीपूर्वक वापर करणे.
  • घराच्या सभोवती आणि सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे.
  • सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, झाडे लावणे.
  • गांवतळी आणि पिण्याच्या पाण्याचे साठे स्वच्छ ठेवणे.
  • मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे. पाळीव कुत्र्यांना लस टोचून घेणे.
  • घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे. 
  • घर तिथे शौचालय हा उपक्रम राबविणे.
  • आपलं पर्यावरण संरक्षण करणाऱ्या वन्य प्राण्यांचे रक्षण करणे.


शहरातील लोकांनी करावयाचे उपाय:

  • शाळेच्या आणि घरांच्या परिसरात झाडे लावणे.
  • रस्त्यावर लावलेल्या झाडांचे संरक्षण आणि संगोपन करणे.
  • स्वयंपाकघरातील आणि घरातील कचरा रस्त्यावर न फेकता घंटा गाडीत टाकणे.
  • सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.
  • ध्वनिप्रदूषण रोखणे.
  • पाणी, वीज, कागद अशा उपयुक्त वस्तूंचा अपव्यय टाळणे.
  • स्वयंचलित वाहनांचा वापर करणे. वाहनांचा वापर आवश्यक तेवढाच करणे.


चला तर आपण लगेच या कामाला आरंभ करु या आणि इतरांनाही सहभागी करून घेऊ या. यातच आपली आणि आपल्या पुढील पिढ्यांची सुरक्षितता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा