सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी - विशेष प्रासंगिक लेख


माझे कुटुंब माझी जबाबदारी - विशेष प्रासंगिक लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल



कुटुंब असावे कुटूंबासारखे।

 नकोत नुसत्या व्यक्ती।

त्यात असावी जबाबदारी ।

नकोच नुसती नियमसक्ती ।


       एखादी व्यक्ती शिकून कितीही उच्चपदस्थ झाली, श्रीमंत झाली, प्रसिद्धीस आली तरी त्या व्यक्तीला कुटुंब हेच आपलं विश्व वाटतं आणि वाटलंच पाहिजे. पशुपक्ष्यांनाही कुटुंबाची ओढ असते. सायंकाळी जिवाच्या आकांताने ती आपल्या कुटूंबाकडे झेपावतांना दिसतात. हजारो-लाखो किलोमीटरचा प्रवास करुन कुटुंबाला भेटण्याची ओढ कांही औरच असते. कारण कुटूंबात असतो लळा-जिव्हाळा, माया-प्रेम, आपुलकी आणि बरंच कांही....? कुटुंबात एकमेकांसाठी झटणं असतं, एकमेकाची वाट पहाणं असतं, एकमेकावर जीव ओवाळून टाकणं असतं.


       मार्च २०२० पासून कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. प्रत्येकाचा जीव टांगणीला लावला आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी शतपटीने वाढली आहे. पूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीला काटा लागला की दुसऱ्याच्या डोळ्यात आपोआप पाणी यायचं. आज कोरोनामुळे कुटुंबातील एक व्यक्ती बेजबाबदार वागली तर कुटुंबातील सर्वांच्याच शरीरात कोरोना प्रवेश करतो आहे. पूर्वी कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असली की म्हटलं जायचं की, किती सांगितलं तरी ऐकत नाही, शेवटी तो भोगेल आपल्या कर्माची फळं। पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एकाने केलेल्या कर्माची फळं अनेक जणांना भोगावी लागत आहेत. म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः तर घ्यायला हवीच शिवाय आपल्यामुळे आपल्या कुटूंबाला त्रास होवू नये ही काळजी घ्यायला हवी. कुटूंबाची जबाबदारी स्विकारायला हवी.


       कुटुंबातील प्रत्येकाने अगदी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडायला हवे आणि बाहेर पडतांना विचार करायला हवा की, पाळण्यातील इवलासा जीव तुमच्याकडे येण्यासाठी झेपावत आहे, कुणीतरी तुमच्या खिशातून आणलेली कॅडबरी खाण्यासाठी उत्सुक आहे, सांजवेळी डोळ्यात जीव आणून तुमचा जीवनसाथी तुमची वाट पहात आहे, स्वतः काठीचा आधा घेणारे तुमचे बाबा तुम्हाला खंबीर साथ देण्यासाठी सज्ज झालेले आहेत, थकलेल्या, सुरकुतलेल्या हातानी तुम्हाला कुरवाळण्यासाठी तुमची आई वाटेकडे डोळे लावून बसली आहे. या सगळ्यांंसाठी तुम्हाला जगायचं आहे. कोरोनाशी सामना करायचा आहे. कुटुंबातील प्रत्येकाने ही त्रिसूत्री लक्षात ठेवायला हवी.

१. सॅनिटायझर

२. मास्क

३. फिजिकल डिस्टन्स


१: सॅनिटायझर स्वच्छता ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी, या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या शरीराची व घराची स्वछता राखायला हवी. बाहेरून आल्याबरोबर कपडे बदलायला हवेत. त्यांचं निर्जंतुकीकरण करायला हवे. हात सॅनिटायझरने वरचेवर धुवायला हवेत. महिन्याला आणायच्या साहित्ययादीत प्रथम सॅनिटायझरचे नांव लिहावे व त्याचा नित्यनियमाने आवश्यक वापर करावाच.


२: मास्क - ऑफिसला जाताना टाय लावायला विसरलात तर फारसं बिघडत नाही पण मास्क लावायला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, तो मास्क नाकातोंडावरच ठेवायला हवा. मास्क नावालाच लावून तो दाढीवर ठेवू नये. असं केल्याने तुमचा दंड वाचेल पण जीव वाचणार नाही. आणि हे लक्षात ठेवा, जगातील सर्व गोष्टीपेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे, लाखमोलाचा ही आहे. तुमच्या चुकीची शिक्षा तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे. ज्या कुटुंबावर तुमची खूप खूप मर्जी आहे.


३: फिजिकल डिस्टन्स - तुमची ड्यूटी सांभाळत असताना, व्यापार धंदा करताना, उपजिविकेसाठी बाहेर पडताना शारीरिक अंतर ठेवा. उपजिवीकेसाठी बाहेर पडावेच लागते हे मान्य आहे. पण उपजिवीकेसाठी जीव शाबूत रहाणे आवश्यक आहे. हे कायमपणे लक्षात ठेवा. घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रम माचे आयोजन करतांना गर्दी होणार नाही ही काळजी घ्या.वारेमाप खर्च टाळून बचत करा या निमित्ताने बचत होईल, जी भविष्यात उपयोगी पडेल. ती रक्कम गरजूना मदत करा.


शासनाच्या नियमांचे पालन करून कुटुंबाला जपू या कारण माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे.


आली कोरोना महामारी ।

स्वच्छता ठेवू घरोघरी ।

मास्क लावू तोंडावरी ।

हात धुवू या वरचेवरी ।

अंतर ठेवू परोपरी ।


1 टिप्पणी: