गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख


वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


                वार्धक्य आल्यानंतर म्हटले जाते संध्याछाया, भिवविती हृदया. पण मी म्हणते 'संध्याछाया खुणविती हृदया' असे का ? प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तिने खाली दिलेले सप्तसूर आळवले की तुम्ही सर्वजण माझ्याशी सहमत व्हाल. हे सप्तसूर असे....


१) सावधानता:

निवृत्तीनंतर आहार, विहार आणि विश्रांती या तीन बाबीत सावधानता बाळगायला हवी. वेळेवर जेवणे, व्यायाम करणे, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. एवढे करुनही आजारी पडलोच तर वेळेवर औषधे घेणे व पथ्ये पाळणे आवश्यक.


२) रेखीवपणा:

जेष्ठ झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे मोठमोठी कामे तुमच्या हातून होणार नाहीत. पण छोटी छोटी कामे रेखीवपणे करा. भाजी आणायला सांगितली तर एकदम ताजी टवटवीत आणा. भाजी पाहून पत्नी किंवा पती, सूनबाई एकदम खूश झाली पाहिजे. घराचे अंगण इतके स्वच्छ ठेवा. सर्वांनी म्हणावे वा ! सुंदर आहे तुमचे अंगण ! कपडे निटनेटके, साहित्य व्यवस्थित ठेवा.


३) गर्व नको:

विसरुन जा आपण फार मोठ्या पदावर होतो व फार उत्कृष्ट काम आपण केले आहे. आता आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत. सर्वांशी प्रेमाने वागा. मला इतरांनी मान द्यावा असे वाटत असेल तर दुसऱ्याला मान द्या. आणि हे लक्षात ठेवा 'मुंगी होऊन साखर खाता येते गर्व सोडून द्या. कारण 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती,' 


४) मनोरंजन करा:

समस्येत गुंतलेले आपले मन मनोरंजनात गुंतवा. आनंदी रहा. घरातील इतर सदस्यांचा विचार करुनच टी. व्ही. पहा. कारण तरुणांना पिक्चर व लहानांना कार्टून पहायचा असतो. आपलाच हट्ट नको. बातम्या व क्रिकेट पहाण्याचा. त्यासाठी मोबाईल किंवा रेडिओ वापरा पण आवाज मोठा न करता स्वत:ला ऐकू येईल इतकाच ठेवा. 


५) परमार्थ करा:

आयुष्यभर आपण खूप काम केलं. या वळणावर स्वार्थ थोडासा बाजूला ठेवून परमार्थ करा. ईश्वरभक्ती जमेल, रुचेल तशी करा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा दानधर्म करा पण आपलं दान सत्पात्री होतंय का याकडे लक्ष द्या. आपल्या देण्यामुळे आपण कुणाला आळशी बनवत नाही ना? हेही पहायला हवे.


६) धन जोडा:

आपण आयुष्यभर कमावलेलं धन योग्य ठिकाणी गुंतवून ठेवा. फसवणूक होणार नाही ना? हे जरुर पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना जेवणाचं ताट अवश्य द्या. पण बसायचा पाट मात्र देवू नका. 


७) निर्मोही रहा:

जन्माला आलेल्या प्रत्येकाला एकन् एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे. जन्माला येताना कुणी कांहीही घेवून आला नाही. जातानाही काय घेऊन जायचे नाही. तेंव्हा जे ईश्वराने दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगा. मोह सोडल्यास सुख भरपूर मिळेल.


८) सामंजस्य ठेवा:

नव्या पिढीशी जुळवून घ्या. चालवू नका आपलाच हेका. कारण तुमचा हेका तुमच्यासाठी धोका ठरु शकतो. आमच्यावेळी असं नव्हतं असं वारंवार म्हणू नका. एखादे वेळी जरुर सांगा पण त्यांच्या नव्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. त्यांच्या प्रगतीला साथ द्या. नवी पिढी तुम्हाला हात देईल. व तुमचा उरलेला प्रवास सुखकारक, आनंददायी ठरेल.


             ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनो समजले ना तुम्हाला वार्धक्याचे सप्तसूर ? हे सूर आळवा. आयुष्याची संध्याकाळ सोनेरी किरणांनी शोभिवंत बनेल. होय 

कायमपणे लक्षात ठेवण्यासाठी खाली चार्ट देत आहे.

  • सा- सावधानता ठेवा.
  • रे- रेखीवपणा असू द्या
  • ग-गर्व नको
  • म- मनोरंजन करा
  • प- परमार्थ करा
  • ध- धन जोडा
  • नि- निर्मोही रहा
  • सा- सामंजस्य ठेवा












Shares
WhatsAppFacebookXPinterestSMSBloggerLinkedInEmailSumoMe

३ टिप्पण्या:

Shares
WhatsAppFacebookXPinterestSMSBloggerLinkedInEmailSumoMe