शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - विशेष लेख


१ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय.......

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 



फोटो साभार: गूगल


       भारत हा जेंव्हा परतंत्र, निर्धन आणि निःशस्त्र आणि तो काळ इंग्रजी साम्राज्याचा मध्यान्ह काळ होता, तेंव्हा इंग्रजांच्या सत्तेला जबरदस्त विरोध करणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांची जगाला ओळख आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करून ते टिकवून धरणे हे अतिशय अवघड काम लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्तृत्वाने केले. त्यावेळी त्यांच्या हातात कोणतीही सत्ता नव्हती. पैसा तर अजिबातच नव्हता. तरीही घरोघरी लोकांनी त्यांच्या प्रतिमा लावून त्यांचे पूजन केले. इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती.


अल्पपरिचय:

       लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नांव बाळ गंगाधर टिळक. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गांवी झाला. त्यांचे मूळ नांव केशव असे होते तथापि 'बाळ' हे टोपण नावच पुढे कायम झाले. त्यांचे वडील गंगाधरपंत हे प्रथम प्राथमिक शिक्षक व नंतर शिक्षण निरीक्षक होते. ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे बहुतेक सर्व शिक्षण पुणे येथेच झाले. ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून ते १८७७ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे १८७९ मध्ये ते एल. एल. बी. झाले. एल. एल. बी. च्या वर्गात असताना त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोघा तरूणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या देशाची सुटका करून घेण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोध्दाराच्या कार्यास स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला.


लोकजागृतीस आरंभ:

       त्याकाळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टिळकांच्या मनावर पडला. वासुदेव फडके यांच्यावरचा खटला कोर्टात सुरु होता. या खटल्यात वासुदेव यांच्यावर अन्याय होऊन त्यांची हार झाली कारण त्यांच्यामागे जनसमुदाय नव्हता. हे जाणून प्रथम लोकजागृती केली पाहिजे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत असे वाटून स्वाभिमान शून्य झालेल्या लोकांना नवा विचार देण्यासाठी टिळक आणि आगरकर प्रयत्न करू लागले. यासाठी एक संधी लवकरच चालून आली. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे एक शाळा काढणार होते. टिळक आणि आगरकर हे दोघे विष्णूशास्त्रीना जाऊन भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना झाली. त्या पाठोपाठ आर्यभूषण नावाचा छापखाना काढण्यात आला. लोकजागरण होण्यासाठी मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजी भाषेतून 'मराठा' हे वृत्तपत्र सुरु करण्यात आले. त्यातून लोकांपर्यंत स्वातंत्र्यप्राप्ती व्हावी या उद्देशाने विचार पोहचू लागले. १८८४ मध्ये न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती मंडलिक, डॉ. भांडारकर यांच्या सहाय्याने टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. स्वतः टिळक आणि आगरकर तेथे शिकवित असत. हे करीत असताना केसरीतून आपल्या अग्रलेखातून ब्रिटीश सरकार विरूद्ध टिळक झणझणीत अग्रलेख लिहू लागले. त्यांच्या कांही अग्रलेखांची शीर्षके ही ऐतिहासिक ठरलेली आहेत. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे' 'हे उपाय टिकाऊ नव्हेत' या त्यांच्या समाज जागृतीच्या लेखनामुळे त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. १०१ दिवस डोंगरीच्या तुरूंगात काढावे लागले. रँडचा वध  झाल्यानंतर त्याचे जनक म्हणून इंग्रजांनी त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा केली होती, त्यानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा झाली. या तुरुंगातच 'गीतारहस्य' हा ग्रंथ त्यांनी लिहून काढला.


इंग्रज सरकारच्या अन्यायाचा प्रतिकार:

       इंग्रज सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणाविरूद्ध आवाज उठविण्यात टिळक आघाडीवर राहिले होते. त्यांचे केसरीतील अग्रलेख या गोष्टीची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. दुष्काळ, प्लेग यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकरवर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक भाषेत निषेध केला. इ. स. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केल्यावर त्याविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती, हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि इतिहास हे हिंदी राष्ट्रवादाचे प्रमुख आधार आहेत असे त्यांचे म्हणणे होते. टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार व पुरस्कार केला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच" असा मंत्र उच्चारून त्यांनी राष्ट्राला स्वराज्याची प्रेरणा दिली.


जहाल राजकारण:

टिळकांनी राजकारणात जहालमतवादाचा पुरस्कार केला. हिंदी लोकांना अर्ज विनंत्यांच्या मार्गाने आपले राजकीय हक्क मिळणार नाहीत, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरून काँग्रेसमध्ये जहालमतवादी व मवाळमतवादी असे दोन गट पडले. टिळकांनी त्यातील जहाल गटाचे नेतृत्व केले. त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना स्थान प्राप्त झाले होते. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला होता. या देशातील सर्वसामान्य जनतेला जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. सर व्हँलेंटाईन चिरोल यांनी 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून त्यांना दोष दिला असला तरी खरे तर तेच त्यांचे भूषण ठरले आहे.


लोकमान्य टिळक यांच्या  बालपणीचा एक उल्लेखनीय प्रसंग:

सरकारी शिक्षण खात्यात नोकरी करणाऱ्या त्यांच्या वडिलांना गंगाधरशास्त्री यांना पुस्तकांचे विलक्षण वेड होते. पुस्तक वाचायला बसले की, ते अगदी तल्लीन होऊन जात. त्यातूनही त्यांच्या आवडीची पुस्तके असतील तर त्यांची वाचनात समाधीच लागायची. बाणभट्ट हा त्यांचा अतिशय आवडता लेखक होता. त्याची कादंबरी ते वाचायला बसले की, मग त्यांना वेळेचे भानही राहात नसे. असेच एकदा ते बाणभट्टाची एक प्रसिद्ध संस्कृत कादंबरी वाचत बसले होते. त्यांचा मुलगा बाळ त्यांच्या भोवताली घुटमळत होता. खूप वेळ झाला तरी त्यांचे वाचन कांही संपेना बाळचे घुटमळणे सुरूच राहिले.

अखेर बऱ्याच वेळाने गंगाधर रावानी पुस्तक मिटले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा