मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

वासुदेव बळवंत फडके - विशेष मराठी लेख


१७ फेब्रुवारी हा वासुदेव बळवंत फडके यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारा विशेष लेख....

वासुदेव बळवंत फडके - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




फोटो साभार: sharechat


       वासुदेव बळवंत फडके हे एकेकाळी ब्रिटिशांचे विश्वासू नोकर होते. पुण्यातील लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी लेखनिक म्हणून ब्रिटिशांची वाहवा मिळविली होती. चांगले तीस रुपये वेतन त्यांना मिळत होते. त्या काळात तीस रूपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्या रकमेतून सुखासमाधानाचे दिवस जात होते आणि अचानक स्वाभिमान जागृत होण्याची गोष्ट घडली.


       १८७० सालची गोष्ट. वासुदेव बळवंत फडके यांच्या आईची तब्येत बिघडली. कर्जत-शिरढोणला जायचे म्हणजे रजा घ्यावी लागणार होती. दुसऱ्या बाजूला त्यांना वाटलं, आईचं दुखणं नेहमीसारखंच असेल. चार दिवस औषधपाणी केल्यानंतर होईल बरी. रजा न घेणचं बरं पण त्यांचा अंदाज चुकला. दहा दिवसांनी निरोप आला, तातडीने शिरढोणला या. आई खूप आजारी आहे. फडके यांना शिरढोणचे वेध लागले. अर्थात त्याआधी बॉसची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यांनी रजेचा अर्ज केला. आपलं काम लक्षात घेऊन रजा पटकन मंजूर होईल, अशी त्यांची समजूत होती, पण ती गैरसमजूत ठरली. या टेबलवरुन त्या टेबलवर त्यांचा अर्ज जात होता. त्यात काहीं दिवस उलटले. फडके चिडले. अखेर वरिष्ठांनी त्यांना रजा नाकारल्याचे कळवले. त्यांना खूप दुःख झाले, पण त्याहूनही अधिक त्यांचा स्वाभिमान दुखावला होता. 'आई गंभीर असताना मला रजा मिळणार नसेल तर ही नोकरी करुच कशाला?' असे म्हणून त्यांनी वरिष्ठांना चिठ्ठी लिहिली, मी आजारी आईला भेटायला शिरढोणला जात आहे, याची नोंद घ्यावी. ते तडक शिरढोणला निघाले. पण पोहचेपर्यंत खूप वेळ निघून गेला होता. त्यांची आई जग सोडून निघून गेली होती. फडके तेथेच कोसळले. आपल्या आईची शेवटची भेटही आपण घेऊ शकलो नाही, हे दुःख त्यांना अनावर झाले होते. त्यामागे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्यावर केलेला अन्याय कारणीभूत आहे, याची जाणीव त्यांना झाली. दुसऱ्या दिवशी ते तडक पुण्याला आले आणि सरळ ऑफिसात घुसले. बॉसच्या समोर उभे राहून त्यांनी 'रजा का नाकारली?, तुम्ही इथे आम्हा भारतीयांचा छळ करायला आला आहात का?', असा थेट सवाल त्यांनी केला. बॉस हुशार होता. तो गप्प राहून भडकलेल्या वासुदेवांचं बोलणं ऐकत राहिला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी बॉसची तक्रार वरच्या ऑफिसात केली. त्या तक्रारीची चौकशी झाली. तेंव्हा त्यांच्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण बॉसवर कोणतीच कारवाई झाली नव्हती.

       

       १८७१ मध्ये आईच्या श्राद्धाचा दिवस होता. त्यासाठी त्यांनी पुन्हा रजा मागितली. पण पुन्हा रजा फेटाळली गेली. ते भयंकर संतापले. आधीच देशात गुलामगिरी आणि त्यात ब्रिटिशांची ही नोकरी म्हणजे गुलामगिरीचं भयंकर रूप. त्यांनी ठरवलं सूड घ्यायचा. ब्रिटीश बॉसचा नव्हे तर बॉसगिरी मिरवणाऱ्या सर्व ब्रिटिशांचा सूड घ्यायचा. एका प्रखर क्रांतीची ज्योत तेंव्हा पेटली होती. ज्यांच्याकडे स्वाभिमान असतो, त्यांच्याच मनात ही ज्योत पेटते हेच खरे.


क्रांतीची पहिली बीजे:

२३ फेब्रुवारी १८७९ हा वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतीसेनेच्या कारवाईचा पहिला दिवस. धामारी गावातील श्रीमंतावर ते छापा टाकणार होते. पुणे सोडून लोणी गाव आणि तेथून धामारी अशी दरमजल करण्याचे त्यांनी ठरवले. प्रवासात पुढे काय होईल, त्यावेळी काय करायचे, हेच विचारचक्र फडके यांच्या डोक्यात फिरत होते. या कारवाईनंतर पोलिसांचा ससेमिरा आपल्यापाठी लागणार हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. तेंव्हा भूमीगत व्हायचे आणि त्यासाठी काय करायचे, याचाही आराखडा त्यांनी पक्का केला होता. लोणीतील हनुमान मंदिरात त्यांनी रात्र काढली आणि सर्व सैनिकांनी जवळच्याच चिंचुशीच्या गुहेत जमायचे ठरले. तेथे लोणी गावचे वतनदार पाटील शिंदे यांनी आणि त्यांच्या मुलीने या सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. अर्थात पाटील शिंदे यांना क्रांतीसेनेचा उदात्त विचार माहित होता म्हणूनच त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. हे सर्व आटोपून सैनिकांनी अखेर २३ फेब्रुवारीला सायंकाळी धामारी गाठलं. सैनिक शिस्तबद्ध चालत होते. कांहीच्या हातात बंदुका, कांहीकडे तलवारी, भाले, काठ्या व गोफणी होत्या पण त्यांची शिस्त पाहता ते एक प्रशिक्षित सैन्यच वाटत होते.


       गावच्या वेशीवर आल्यानंतर सैनिकांनी रणशिंग आणि शंख फुंकले. 'शिवाजी महाराज की जय, वासुदेव महाराज की जय' असे जयघोष सुरु झाले. कांहीनी बंदुकीचे बारही उडवले. तेथे पहारा देणाऱ्या रामोशाला सैनिकांनी ताब्यात घेऊन त्याला गावातल्या शेठ सावकारांची घरे दाखवण्याची सूचना फडके यांनी केली. रावजी रामोशी घाबरला. तत्काळ हातापाया पडत त्यांने सैनिकांना सावकाराच्या घराच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. त्यावेळीही सैनिकांच्या तोंडात 'शिवाजी महाराज की जय' चा घोष सुरु होताच. हे ऐकतांना लोकांना प्रश्न पडला तो म्हणजे दरोडेखोरांच्या तोंडात शिवाजी महाराजांचे नाव कसे? अर्थात त्यांना माहीतच नव्हते की ही क्रांतिसेना आहे देशकार्याला वाहून घेतलेली. किलाचंद या सावकाराच्या घराला सर्व सैनिकांनी घेराव घातला आणि त्याच्या घरातील पैसाआडका घेऊन त्यांनी दुसऱ्या सावकाराकडे मोर्चा वळवला. त्यांना कोठेही मज्जाव झाला नाही. रामोशाचा तो संघटित 'अवतार' प्रत्येकाला अपरिचित होता .

   

       सर्व पैसाआडका फडके यांच्यासमोर ठेवण्यात आला. तेवढ्यात खुणेची शीळ वाजली. श्रीमंताची घरे दाखवल्यानंतर रावजी रामोशीने पोलीस ठाणे गाठले होते. तेथून पोलिसांना घेऊन तो धामारीकडे येत होता. फडके यांनी लगेच चिंचुशीच्या जंगलाकडे कूच केली. त्यापूर्वी टेकडीवरच बेसावध ब्रिटीश सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी आपले सैनिक लपवले. व्हायचे तेच झाले. ब्रिटिश पोलिस अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरले आणि तेथून पळाले. ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने दिलेला हा पहिला पराभव होता. तीच त्यांच्या क्रांतीची पहिली बीजे होती. तदनंतर जमा झालेल्या पैशापैकी त्यांनी रामोशाना वेतन दिले आणि उरलेले पैसे पुण्याहून काडतुसं आणि बंदुकी आणण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याजवळ दिले .

  

       असे होते महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. त्यांना अगदी मनापासून सॅल्यूट ।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा