सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

संत तुकाराम महाराज - विशेष मराठी लेख


संत तुकाराम महाराज यांचा १६ फेब्रुवारी हा जन्मदिन त्यानिमित्ताने विशेष लेख....


संत तुकाराम महाराज - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती. किराणा मालाचे दुकान होते, परंतु तुकाराम संसारात फार काळ रमले नाहीत. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत. आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात. कीर्तन करत, अभंग रचत, ते लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. तुकाराम महाराज त्यांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत.

"जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले

तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा "

हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकाराम महाराजांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्र भर आपल्याला 'ग्यानबा-तुकाराम' हा जयघोष ऐकू येतो.


आधी प्रपंच करा नेटका...

       संत परंपरेने मायावादाला नकार दिला आहे. मायावादाच्या प्रभावातून समाजाला मुक्त करण्याचे महत्वपूर्ण कार्य संतांनी केले आहे. संत तुकाराम महाराजांच्यासह सर्व संतांनी संन्यासाकडून संसाराकडे जाण्याचा मार्ग सामान्य माणसांना दाखविला. 'ब्रम्हज्ञानातून प्राप्त होणाऱ्या जीवनमुक्त अवस्थेपेक्षाही  भक्तीची जोड देऊन केलेल्या संसारातील आनंद श्रेष्ठ आहे अशी वारकरी संतांची धारणा आहे.

घोटविन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती ।

मुक्ता आत्मस्थिती सोडविन ।

या अभंगात तुकोबारायांनी ब्रम्हज्ञान्याला जीवनमुक्त अवस्था सोडून लाळ घोटायला लावीन असा दावा केला आहे तो यामुळेच. मायाब्रम्हाची शुष्क चर्चा करून पांडित्य मिळविणाऱ्या तथाकथित ब्रम्हज्ञान्यांचा तुकोबारायांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मायाब्रम्ह ऐसे म्हणती धर्मठक ।

आपणासरिसे लोक नागविले ।।

अशा शब्दांत तुकोबांनी त्यातला फोलपणा उघडा पाडला आहे.

संतांंनी जगाला मिथ्या मानलं नाही, उलट परमात्मा जगत् रूपाने नटलेला असल्यामुळे जग हे परमात्म्याचे रूप आहे अशी संतांची धारणा आहे. जगत् रुपाने नटलेल्या या विश्वात्मक पांडुरंगाची सेवा करण्याचा मार्ग म्हणजे भक्तीची जोड असलेला संसार करणं. त्यामुळे संताना संसाराची भिती वाटत नाही.


मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा ।

आम्हा विष्णू दासा सुलभ तो।।

या अभंगात तुकोबारायांनी ऋषी मुनी गर्भवासाला घाबरून मुक्त झाले असले तरी, आम्ही वारकरी मात्र गर्भवासाला घाबरत नाही असं स्पष्ट केलंय. संसार म्हणजे केवळ दुःखाची अखंड मालिका समजून त्यापासून पळ काढणं संताना मंजूर नाही. उलट उत्तम व्यवहाराने धन जोडून केलेला नीतिमय संसारच वैराग्याच्या परमपदावर नेऊन पोहोचवतो असा तुकोबारायांना विश्वास वाटतो म्हणून ते म्हणतात

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।

उदास विचारे वेच करी ।

तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ ।

परमपद बळ वैराग्याचे ।।


मायावा जगाला माथ्या मानून परलोकातल्या मोक्षाचे वेध लावतो. तुकोबांना मात्र इहलोतला भक्तीचा आनंद मोक्षसुखापेक्षा अधिक महत्त्वाचा वाटतो. 'मोक्षफदा हाणोलाथा' असं म्हणत तुकोबाराया मोक्षाला लाथाडतात.


       संतांनी मायावाद नाकारल्यामुळे केवळ तत्वज्ञानाच्या पातळीवरच उलथापालथ झाली तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातही उलथापालथ झाली. महाराष्ट्राचा प्रवास संन्यासाकडून संसाराकडे, परलोकाकडून इहवादाकडे, ब्रम्हज्ञानाकडून विठ्ठलभक्तीकडे झाला, तो मायावाद नाकारल्यामुळेच झाला असे म्हणावे लागेल.


तुकोबारायांचे तत्वज्ञान - एक उदाहरण..

       एकदा पंढरपूरच्या यात्रेला जाण्यासाठी तुकाराम महाराजांचे मित्र त्यांना आग्रह करू लागले पण त्यांना जाता आले नाही पण त्यांंनी एक भोपळा त्यांच्या जवळ दिला व सांगितले की हा भोपळा विठ्ठलाच्या पायावर घाला व येताना परत आणा. मित्रांनी तसे केले व येताना तुकोबांच्याकडे त्यांनी तो भोपळा परत दिला. त्यांनी मित्रांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला व आपल्या पत्नीला, आवडाला त्या भोपळ्याची भाजी करण्यास सांगितले. जेवतांना सर्वांच्या लक्षात आले की भाजी कडवट झाली आहे. तुकोबाराय म्हणाले, "बघा विठ्ठलाच्या पायावर घालूनही हा गोड झाला नाही. श्रद्धा ह्रदयात असावी. श्रद्धेविना पायावर डोके ठेवून काय उपयोग?"


असे होते तुकाराम महाराज। अशा या महान संताला मनःपूर्वक वंदन ।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा