बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

आनंददायी दिवाळी - विशेष मराठी लेख

 

आनंददायी दिवाळी - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       आनंदाचा क्षण न् क्षण उधळण करत दिवाळी येते. सर्वत्र चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण पसरते. भारतीय संस्कृतीमध्ये सणांची अगदी रेलचेल असली तरी दिवाळी हा सर्व सणांचा राजा आहे. दरिद्री नारायणापासून ते कोट्याधीशापर्यंत सर्वच लोक अगदी धुमधडाक्यात, जल्लोषात, उत्साहात व अत्यंत आनंदात दिवाळी साजरी करतात.


       दिवाळी आली की दूरगांवी नोकरी चाकरीसाठी गेलेली माणसे घराच्या ओढीने परत येतात. शिक्षणासाठी दूरगांवी गेलेली मुले आपल्या आनंद घरट्याकडे परततात. मुलांना घरांची व घरांंना मुलांची ओढ असते. ती परस्परांंना भेटलेली पहाण्यातील आनंद वेगळाच असतो. पाठीवरचे बहीण भाऊ मोठे झालेले जाणवतात. आईला कालपर्यंत अवतीभवती भिरभिरणारं आपलं बाळ आता एकदम वेगळं रंगरूप घेत आहे असे वाटते आणि वात्सल्याचे निर्झर अनेक दिशांनी वहायला लागतात. घरातून कांही निमित्ताने उडालेली चिमणी पाखरे दिवाळीतील दिवसांच्या उबेसाठी योग्यवेळी पोहचण्याची काळजी घेतात.


       दिवाळीत बाजारांना उधाण येते, साहित्यिकांना सृजनांंसाठी समृद्ध दालने मोकळी होतात. त्यामुळे दिवाळीच्या दिवसातील आनंददायी समाज आपल्यापुढे उभा ठाकतो. ही दिवाळी बळीराजांची दिवाळी असते, कामगार बांधवांची असते आणि कष्टकऱ्यांचीही असते. त्या सार्यांची प्रसन्न पाऊले दिवाळीत आनंदाची बरसात करत घरोघरी उमटत असतात, त्यामुळेच प्रत्येक घरात भाग्योदय होतो व घरांना आनंदाचे आंदण मिळते.


       दिवाळीतील सुवर्णकाळ म्हणजे सायंकाळ. प्रत्येकाच्या घरापुढे रांगोळ्या सजलेल्या असतात. ओट्यावर, पायऱ्यावर, गच्चीवर, फाटकावर पणत्या आणि मेणबत्त्या तेवत असतात. रात्रीच्या दाट काळोखात चमकणारा आकाशदिवा सर्वानांंच सोबती वाटतो.

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची पार्श्वभूमी अशी आहे.


वसूबारस - गोवत्स द्वादशीः

आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारसही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी गृहिणी गाय वासराची पूजा करतात. गाईला फराळाचे पदार्थ, बाजरी व गूळ खायला घालतात.


धनत्रयोदशी:

या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून जगदीप लावतात. याची दंतकथा अशी आहे, हैमू नावाच्या राजाचा मुलगा अल्पायुषी होता. षष्ठीदेवीने भविष्य वर्तविले होते की हा मुलगा लग्नानंतर चारच दिवसांनी मरेल. हे संकट टाळण्यासाठी राजाने यमुना नदीच्या डोहात एक महाल बांधला आणि नंतर त्याचे लग्न केले. राजपुत्र त्या महालात राहू लागला पण होणारी घटना टळली नाही. तेंव्हा यमाने सांगितले जे लोक त्रयोदशीला मला टोपी दान करतील आणि प्रदोष समयी दीपोत्सव करतील त्यांच्यावरील संकट टळेल.


नरकचतुर्दशीः

नरकासूर हा प्राण ज्योतिषपूरचा राजा होता. ज्योतिषपूर भूतानच्या दक्षिणेला आहे. नरकासुर राजा अत्यंत बलाढ्य, तितकाच दुष्ट होता. देशात आणि देशाबाहेर त्याने धुमाकूळ घातला. देवांचा आणि सज्जन माणसांचा तो छळ करू लागला. हजारो मुली त्याने पळविल्या. पृथ्वीला नरकासुराचा त्रास सहन होईना. शेवटी दुष्टांचा नाश करणाऱ्या, सज्जनांचे रक्षण करणाऱ्या श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला युद्धात ठार मारले आणि सर्वाना वर दिला की आजच्या स्थितीला जो मंगलस्नान करील त्याला नरकाची पीडा होणार नाही.


लक्ष्मीपूजन:

आश्विनातल्या अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन होते त्याचे कारण दैत्यराज बलीने लक्ष्मीचे हरण केले असता विष्णूने तिची सुटका  केली. त्या आनंदाप्रित्यर्थ घरेदारे  सजवून, फुलांच्या माळा बांधून, खमंग पदार्थाचा आस्वाद घेऊन हा दिवस साजरा केला जातो. सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली जाते व फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीचे मोठ्या  थाटामाटात पूजन केले. म्हणून आजही तो प्रघात रूढ झाला आहे.


बलिप्रतिपदा - पाडवा:

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक मासाचा प्रथम दिवस असतो. कार्तिक शुद्धप्रतिपदा या दिवशी विष्णूनी दैत्यराज बलीला पाताळात पाठविले म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा असे म्हणतात. प्रल्हादाचा नातू बळीराजा खूप दानशूर होता. त्याला इंद्रपद हवे होते म्हणून त्याने खूप यज्ञ केले. विष्णू बळीवर संतुष्ट झाला आणि त्याने वामनरूप घेऊन बळीराजाजवळ तीन पावलाइतकी जमीन मागितली. वामनाने फक्त दोन पावलात सगळी जमीन व्यापली आणि बळीराजाला विचारले, आता तिसरे पाऊल कुठे ठेवू? तसेच बळीने आपले डोके पुढे केले. वामनाने तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात पाठवले आणि वामन म्हणाला, "तुझे दातृत्व पाहून मी संतुष्ट झालो मी तुला पाताळाचे राज्य देतो. त्याचा द्वारपाल मी होतो आणि तुझी सेवा करतो". ही घटना घडली कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात. इंद्र पाऊस पाडतो म्हणून त्याची पूजा करायचे. श्रीकृष्ण लोकांना म्हणाला, "इंद्रदेव पाऊस पाडत नाही तर पर्वत, डोंगर ढग अडवतात म्हणून पर्वताची पूजा करा". लोक पर्वताची पूजा करू लागले. याचा इंद्रदेवाला राग आला म्हणून इंद्रदेवाने खूप पाऊस पाडला पण श्रीकृष्णाने गोकुळातील लोक भिजू नयेत म्हणून आपल्या करंगळीवर पर्वत उचलून धरला आणि सर्व लोकांना आश्रय दिला. ही घटना कार्तिक शुद्ध प्रतिपदेला घडली.

       

       या दिवशी विक्रमादित्य राजाचा राज्याभिषेक झाला व या दिवसापासून विक्रमादित्य संवंत्सर सुरु झाले म्हणून व्यापारी लोक हा दिवस नवीन वर्षारंभ दिन मानतात. या दिवसाला पाडवा असेही म्हणतात. या पाडव्यापासून व्यापारी वर्ष सुरु होते. घरोघरी वह्या, पुस्तके, यंत्रे वगैरेंचे पूजन होते. बायकोने नवऱ्याला, आईने मुलाला व मुलीने वडिलांना ओवाळण्याची पद्धत आहे. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.


भाऊबीज - यमद्वितीया:

यमाची बहीण यमी. यमीने यमाला या दिवशी आपल्या घरी बोलावले. यमाची पूजा करून त्याला पाटावर बसविले. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली. पंचपक्वानांंचे स्वादिष्ट भोजन  वाढले. यम प्रसन्न झाला आणि यमीला म्हणाला, "आज तू माझे जे स्वागत केले त्यावर मी खूष आहे. तुला हवा तो वर माग." यमी म्हणाली, "भाऊराया दरवर्षी याच दिवशी तू माझ्या घरी जेवायला यावे, तसेच जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला तू सुखी ठेव." यम म्हणाला, 'तथास्तु'. त्यावेळेपासून भाऊबीज दरवर्षी साजरी केली जाते.


आनंदाचं शिंपण करीत

दीपावलीनं तुमच्या दारी यावं


नवस्वप्नांनी, आकांंक्षानी

जीवन सारं उजळून जावं


सप्तरंगी रांगोळीसारखं

जीवन रंगीबेरंगी व्हावं


स्नेहमयी शुभेच्छांनी 

घरदार बहरत रहावं ।


दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा