शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

एक निष्काम कर्मयोगी: संत गाडगेबाबा - विशेष लेख

 

संत गाडगेबाबा यांचा दि. २० डिसेंबर हा स्मृतीदिन त्यानिमित्त ही शब्दरुपी भावांजली.......


एक निष्काम कर्मयोगी: संत गाडगेबाबा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       या महामानवाचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात शेडगावच्या झिंगराजी व सखुबाई या परीट दांपत्याच्या पोटी झाला. त्यांंचे नांव डेबूजी ठेवण्यात आले. छोटा डेबूजी आपल्या आईसोबत मूर्तीजापूर तालुक्यातील दापूर या लहानशा गांवी आजोळी आला. येथे त्याला निर्भयपणाचे बाळकडू मिळाले. गुराखी, शेतीकाम करीत मामांच्या हाताखाली कामाला लागला. एकदा मामांनी सावकारी पाशामुळे हातपाय गाळून अंथरूण धरले, पण डेबूजी घाबरला नाही. त्या सावकाराला त्याने धडा शिकविला. ८/१० गुंड मारेकऱ्यांना शेतातून हाकलून लावले तेंव्हापासून डेबूजीचा देवसिंग झाला.


       १८९२ साली डेबूजीचे लग्न कमलापूर येथील धनाजी परटाची मुलगी कुंताबाईशी झाले. डेबूजीला पहिली मुलगी झाली. बारशाला  मांसाहारी जेवण व पेय द्यावे लागे. या जुन्या रुढीला सुरुंग लावत त्यांनी बारशाला गोड जेवणाचा बेत केला व समाजाला ठणकावून सांगितले, गुमान जेवा गोड जेवण. तेंव्हा कांही जण म्हणाले जात कुळीला बट्टा लावला तुम्ही. तेंव्हा या विरोधाला न जुमानता त्यांनी जुन्या परंपरा मोडून काढल्या. पहिली मुलगी अलका, दुसरी कलावती व मुलगा मुदगल अशी तीन अपत्ये झाली पण मुलगा थोड्याच दिवसात मरण पावला.


       एक विभूती सन १९०५ साली दायूरेगावी आली. त्याने डेबूजीचा देवीदास केला व त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. १ फेब्रुवारी १९०५ रोजी गाडगेबाबा दापुरचे घर व संसार सोडून गेले. बारा वर्षे भ्रमंती करून षड्रिपूंचे दमन व अचाट निर्भयता कमावली व अखेर ऋणमोचन यात्रेला येऊन घरच्यांच्या संपर्कात आले पण घरी आले नाहीत. यावेळी त्यांचा वेष अंगावर फाटके कपडे, हातात गाडगे व काठी असा होता. तेंव्हा पासून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणून ओळखू  लागले.


        समाजसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून समाज प्रबोधन करण्यासाठी साधन म्हणून त्यांनी कीर्तनाचे माध्यम निवडले. १९२०-२२ सालापासून कीर्तने करण्यास सुरूवात केली. काळजाला जाऊन भिडणारी वाणी, प्रेम, कारूण्य व सेवाभाव यामुळे त्यांच्या कीर्तनाचा लोकांवर प्रभाव पडत असे.


       तुकाराम महाराज व महात्मा गांधीजीना त्यांनी पूज्य मानले होते. त्यांची कीर्तने प्रश्न उत्तरे स्वरूपात असत. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे आवडीचे भजन ते नेहमी गात असत. अंधश्रद्धा, व्यसन, अस्पृश्यता कीर्तनाद्वारे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्रियांना भजन करावयास लावले. पूर्वी स्त्रिया भजन करीत नसत. देव दगडात नसतो माणसात असतो त्याची सेवा करा. गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा द्या ही त्यांनी शिकवण दिली. वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला असे बाबा म्हणत. बाबांना व्यक्तीपूजा, अवतार वगैरे आवडत नसे.


बहिराव खंडेराव रोटी सूर्यासाठी देव

वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे ।

रंडीचंडी शक्ती मध मासांते भक्षती।

शेंदरी हेंदरीद दैवते कोणतीपूजी भूते खेते ।


       अशा अभंगातून बाबांनी खऱ्या धर्माविषयीची लोकांना ओळख करून दिली. पंढरीचा विठ्ठल, बाबांचा आवडता होता. बहू देवता वादाचे खंडन करून ते एकेश्वरवादाचा प्रचार करीत. मुक्या प्राण्यांना अभय, लग्नात हुंड्याला विरोध, व्यसनमुक्ती असे विषय कीर्तनात असत. ओबडधोबड व सरळ शब्दांनी माणसांची मने ते जिंकून घेत.


       भारतीय समाज सुधारणा कशी करावी याचा नेमका विचार गाडगेबाबांना सापडला होता. ते एका अर्थाने थोर समाजशिक्षक, जाणते संत, दीनाचा दीपस्तंभ होते. तळागाळातील मुले शिकली तर त्यांना चांगल्या पद्धतीने जगता येईल. शिकलेला मनुष्य सहसा अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या आहारी न जाता तो कोणताही निर्णय घेतांना बुद्धीचा उपयोग करील म्हणून शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी बाबांनी भगीरथ प्रयत्न केले. ते बुद्धी वादी संत होते. त्यांना चराचरात देव दिसत असे. चमत्कार व सिद्धी यांच्या अस्तित्वाला त्यांनी नेहमी विरोध केला. गोशाळेतील गाय, कुष्ठधामातील रोगी, झोपडीतील  अर्धपोटी गरीब, रस्त्यावरचा उपाशी भिकारी यात बाबांना ईश्वर दिसला. केरकचऱ्याने भरलेल्या देवळात घंटा वाजविणे ही जशी भक्ती होत नाही त्याप्रमाणेच सगळ्या समाजाचे जीवन गांजलेले असताना देशभक्तीचा रंग फासणे शहाणपणाचे नाही  असे बाबांना वाटे.


       बाबांच्या कीर्तनामुळे हिंसाबंदी झाली. ते महान कर्मयोगी होते, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न  क्षण समाजासाठी वेचला. अंधश्रध्दा आणि देवभोळेपणाच्या कचाट्यातील लोकांना प्रबोधन, समाजजागरण करून देव माणसांत पाहिला. आज आपणाला जर नवीन विचारांचा नवसमाज घडवायचा असेल तर जननायक गाडगेबाबांची शिकवण घरोघरी  पोहोचली पाहिजे. आजच्या युवकांसमोर बाबांचे आदर्श निस्वार्थी जीवन प्रेरणा म्हणून पुढे आले पाहिजे.


       गरीबांसाठी ज्यांचे ह्रदय द्रवते तो महात्मा होय, असे स्वामी विवेकानंद म्हणत असत. त्यांच्या या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने गाडगेबाबा महात्मा होते. बाबांना पारदर्शक ह्रदय होते. ते केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते. धर्माच्या नावावर शोषणाला बाबांचा कट्टर विरोध होता. सामाजिक सुधारणा व्हाव्यात, शिक्षण प्रसार व्हावा, उच्चनीच भेदभाव नाहीसे व्हावेत यासाठी बाबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.


       ८ नोव्हेंबर १९५६ ला मुंबई येथे बाबांनी शेवटचे कीर्तन केले. अमरावतीला जात असताना दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी या क्रियाशील सत्पुरुषाचे महानिर्वाण झाले. तेंव्हा ग. दि. माडगूळकर म्हणाले, 


विठ्ठलाच्या पायी थरारली वीट

राऊळाची घंटा निनादली।

संत माळेतील मणी शेवटला ।

आज ओघळला एकाएकी।।


अशा या थोर लोकोत्तर महापुरुषाला त्रिवार अभिवादन, कोटी कोटी प्रणाम ।


1 टिप्पणी: